भारती गोखले-रुस्तम

सत्तरीच्या दशकातील उत्तरार्धात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरुन घराघरात पोहोचलेला एक सुमधुर आणि लक्षणीय आवाज म्हणजे भारती गोखले-रुस्तम यांचा.



सत्तरीच्या दशकातील उत्तरार्धात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरुन घराघरात पोहोचलेला एक सुमधुर आणि लक्षणीय आवाज म्हणजे भारती गोखले-रुस्तम यांचा.

महाबळेश्वर येथे जन्मलेल्या गोखल्यांची कारकीर्द सरकारी माध्यमात होत राहिली. दिल्ली आकाशवाणी मराठी वृत्तनिवेदिका आणि संबंधित विभागात काम करण्या अगोदर त्या नागपूर आकाशवाणीवर कार्यरत होत्या.

दुरदर्शनचा आपल्या देशात उदय झालेला आणि १९८३ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्रातल्या वृत्तविभागात त्या निर्मात्या म्हणून रुजू झाल्या. दूरदर्शन वरील कार्यक्रमांमध्ये अनेक अमुलाग्र बदल केले. नवीन संकल्पनांनी, विषयांनी आणि आशय असलेले मनोरंजक कार्यक्रम सुरु केले “आस्वाद” हा संगीत विषयक कार्यक्रम त्यांच्या सृजनशीलतेचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. यामध्ये केवळ गायक आणि संगीतकार यांची मुलाखत इतकंच स्वरुप न ठेवता, त्यांचे संगीताचे विचार, नवीन प्रयोग यांची दखल “आस्वाद” मधून घेतली जात; त्याबरोबरच अनेक विषयांना स्पर्श करणारा “प्रतिभा आणि प्रतिमा” हा सुद्धा वैविध्य आणि अनोखे पण जपणारा कार्यक्रम त्यांच्याच कल्पनेतला; जो आजही प्रेक्षकांच्या मनात करुन आहे.

पुढे आकाशवाणी पणजी केंद्राच्या संचालिका, त्यानंतर विविध भारतीच्या प्रमुख असा प्रवास करत त्यांची आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रमुख संचालक पदापर्यंत येऊन पोहोचल्या. संगीत तसंच अनेक कलांची आवड असणार्‍या भारती गोखले-रुस्तम यांनी श्रोत्यांसाठी नवीन कार्यक्रमांची मेजवानी बहाल केली. “नवनीत” हा रविवार सकाळचा संगीत विषयक कार्यक्रम सुरु करुन वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा बहुमान त्यांना जातो.

मुंबई केंद्रावर संचालिका म्हणून नियुक्त झाल्यानंतर, “आकाशवाणी ऑडिओटोरियम जे सुरक्षेच्या कारणास्तव सरकारनी बंद करुन टाकले होते, त्याचे कुलूप गोखलेंनी काढले आणि तेथे स्वर, ताल, सूरांचे राज्य सुरु झाले. काही वर्षे दिवाळी पहाट ही प्रांगणात रंगत असे, त्याला हक्काचं व्यासपीठ मिळालं होतं.

भारती गोखले या मनस्वी, कलेच्या भोक्त्या आणि तितक्या लढवय्या ही अनेक शारिरीक व्याधी, तसंच कारकीर्दीत आलेल्या अडचणींचा निडरपणे सामना केला.

३१ जानेवारी २०११ रोजी त्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संचालिका म्हणून निवृत्त झाल्या. निवृत्ती नंतर ही त्या दुखापतींमुळे आजारी होत्या.

२०१२ या वर्षी त्यांच निधन झालं.

Author