या ‘सगुण ब्रह्मा’ची उपासना अतीव श्रद्धा, प्रेमाने अन् भक्तीने महाराष्ट्रतील घराघरांतून नित्य सुरू आहे आणि त्यांच्या अस्तित्वाने अन् कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवीत आहेत. भगवंताचा हा अवतार आमच्या महाराष्ट्रत झाला ही आमच्या दृष्टीने केवढीतरी भाग्याची गोष्ट. परंतु अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात. संपूर्ण विश्वाच्या आणि मानववंशाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी भगवंत भूतलावर अवतार धारण करीत असतो. कारण त्याची दृष्टी याच्याइतकीच विशाल असते!
श्रीस्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतील. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? ‘प्रत्यक्ष ज्ञानेश्वर विभूती। जगामाजी प्रकटली।।’ असे ज्यांचे माहात्म्य, त्या संतश्रेष्ठ श्रीगुलाब महाराजांनाही स्वामी समर्थांचा अपूर्व महिमा कसा वर्णन करावा असा जणू प्रश्न पडला आणि म्हणूनच आपल्या ‘सूक्त रत्नावली’ या भावमधुर काव्यात ते लिहितात –
अक्कलकोट ग्राम कलियुगी काशी।
जिवंत कैलासी लोक सारे ।।
स्वामी विश्वेश्वर दत्तात्रेय रूप।
महिमा अपूर्व वर्णवेना ।।
अशा या लोकोत्तर अवतारी पुरुषाचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्या सगुण ब्रह्माने आपल्या हृदयी नित्य वास करावा अशी तीव्र इच्छा श्रीगुलाबराव महाराज यांसारख्या संतश्रेष्ठाला झाली असल्यास नवल नाही. म्हणूनच दुसऱ्या एका ठिकाणी ते श्रीस्वामी समर्थांची पुढील शब्दांत विनम्र प्रार्थना करतात.
देवा दीन मी पदरी धरा।
कलियुगी श्रीदत्तात्रेय अवतार तुमचा खरा।।
अक्कलकोट निवासी ब्रह्म।
सगुण हृदयी उतरा।
श्रीज्ञानेश्वर रूप धरूनी।
शिरी ठेवा स्वकरा।
देवा दीन मी पदरी धरा।
या व अशा अनेक प्रकारे श्रीस्वामी समर्थांचे माहात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी रंगविले असले तरी त्याचा जो जो अधिक विचार करावा तो तो त्याचे अनंत नवे नवे पैलू आपल्या लक्षात येतात आणि आपली मती खरोखरच कुंठित होऊन जाते. सूर्याच्या किरणांची जशी व्याप्ती करता येत नाही. सागराच्या लाटांची जशी मोजदाद करता येत नाही, अंबरीच्या चांदण्यांची जशी गणती करता येत नाही त्याचप्रमाणे प्रज्ञापुरीच्या या अलौकीक आणि तेजस्वी सूर्याच्या चरित्राचा थांग लागता लागत नाही!