अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख

भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे स्पेशल फायनान्सियल अँबेसेडर म्हणून अमेरिकेला पाठवले. पुढे त्यांना स्वतंत्र भारताचे तिसरे वित्तमंत्री म्ह्णून पद मिळाले ते त्यांनी जुलै १९५६ पर्यंत सांभाळले. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.



सी. डी. देशमुख म्हणजेच चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यात १४ जानेवारी १८९६ रोजी झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ देशमुख हे एक सन्माननीय वकील होते तर त्यांच्या मातोश्री भागीरथी बाई धार्मिक गृहिणी होत्या . ते १९१२ मध्ये मैट्रिकची परीक्षा उतीर्ण झाले.

चिंतामणराव देशमुख ज्या गुणांनी उतीर्ण झाले त्याची अजूनही आठवण काढली जाते , त्यांचा तो रेकॉर्ड अजून कुणीही मोडला नाही. त्यावेळी ‘गोविन्दाग्रज’ म्हणजे राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या या यशाबद्दल एक कविता लिहिली होती. त्याचप्रमाणे त्यांना संस्कृत भाषेतील जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली होती. १९१७ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पदवी घेतली. त्यांनी वनस्पतीशास्त्रात फ्रॅंक स्मार्ट प्राईजही जिंकले. १९१८ मध्ये लंडन येथे झालेल्या इंडियन सिविल सर्व्हिसच्या परीक्षेस ते बसले आणि त्यात त्यांनी प्रथम स्थान मिळवले. लंडनमध्ये त्यावेळी झालेल्या गोलमेज कॉन्फरन्समध्ये सेक्रेटरी म्ह्णून कामही केले. त्या परिषदेत महात्मा गांधींनीही भाग घेतला होता. त्यांनी सर्व प्रमुख पदे तर भूषवलीच परंतु ते वृत्तीने अत्यंत साधे होते त्यांना बागकामाची आवड होती , त्याचपप्रमाणे त्यांना संस्कृत भाषा खूप आवडायची , त्यांचा संस्कृत भाषेत कवितासंग्रही प्रकाशित झाला. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. ते अर्थशास्त्रज्ञ होते, १९३९ मध्ये चिंतामणराव देशमुख रिझर्व्ह बँकेचे लायजन ऑफिसर झाले. १ ऑगस्ट १९४३ साली ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले , त्यांनी ते पद ३० जून १९४९ पर्यंत सांभाळले. चिंतामणराव देशमुख यांनी रिझर्व्ह बँकेत अनेक योजना अमलात आणल्या त्यामुळे ते सर्वात प्रभावी गव्हर्नर म्हणून ओळखले गेले. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले.

भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे स्पेशल फायनान्सियल अँबेसेडर म्हणून अमेरिकेला पाठवले. पुढे त्यांना स्वतंत्र भारताचे तिसरे वित्तमंत्री म्ह्णून पद मिळाले ते त्यांनी जुलै १९५६ पर्यंत सांभाळले. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. १९५६ ते १९६० या दरम्यान त्यांनी विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे चेअरमन पद भूषवले , त्या कालावधीत शिक्षणाच्या पद्धतीत महत्वपूर्ण सुधारणा झाल्या. मार्च १९६० पासून फेब्रुवारी १९६७ पर्यंत ते दिल्ली विश्वविद्यालयाचे उपकुलपती होते. त्यांच्या कार्यकाळात दिल्ली विश्वविद्यालयाच्या त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत खूप मोठे काम केले. त्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतही महत्वाचे योगदान होते. त्यांनी भारतीय जीवन विम्याचे राष्ट्रीयीकरण केले , त्याचप्रमाणे तंबाखूवर पहिली कर योजना सुरु करून सरकारला लाखो रुपयाचा निधीचा स्रोत सुरु करून दिला.

द्वारकानाथ देशमुख यांना अनेक पुरस्कार मिळाले. कोलकाता विश्वविद्यालयाने ‘ डॉक्टर ऑफ सायन्स ‘ ही पदवी त्यांना १९५७ मध्ये दिली. १९५९ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला , तर १९७५ मध्ये भारत सरकारने पदमविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला.

सर्व पदे भूषवल्यानंतर ते आपल्या कुटुंबात रमले . ते त्याच्या एक पुस्तकात म्हणतात , ” निवृत्तीच्या अवस्थेत आम्ही अधिकारापासून , जनसमुदायापासून , गृहस्थाश्रमातील विवंचनापासून आणि संपतीच्या विचारांपासून दूर गेलो आहोत ” भारतात ही अनुभूती फारच थोड्याना येते. आचार्य अत्रे यांनी सी. डी. देशमुख यांच्याबद्दल म्हणताना ‘ चिंतामणी महाराष्ट्राचा कंठमणी झाला ‘ असे म्हटले आहे. चिंतामणरावांच्या जीवनकार्यातून सचोटी, चिकाटी यासारखे गुण घेतले तर देशातील भ्रष्ट्राचाराला आळा बसेल.

अशा निस्पृह , विद्वान , बाणेदार चिंतामणरावांचे २ ऑक्टोबर १९८२ रोजी हैद्राबाद येथे निधन झाले. भारत सरकारने २००४ साली त्याच्या नावाचे डाकतिकीट काढले.

सतीश चाफेकर

Author