लेखक किरण नगरकर

त्यांच्या कथालेखनास ‘ अभिरुची ‘ मासिकांमधून सुरवात झाली. त्यांनी ‘ ‘सात सक्कं त्रेचाळीस ‘ लिहिली आणि त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीवरून त्याच्याकडे एक गंभीर लेखक म्ह्णून वाचक बघू लागले.



किरण कमलाकर नगरकर यांचा जन्म २ एप्रिल १९४२ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या किंग जॉर्ज शाळेत झाली तर माध्यमिक शिक्षण पुणे येथील सेन्ट व्हिन्सेंट हायस्कुल आणि मुंबईमधील डॉन बाँस्को या शाळांमधून झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमधील सेन्ट झेवियर्स आणि पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयामधून झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठामधून इंग्रजीमध्ये एम.ए . ची पदवी मिळवली.

त्यांच्या कथालेखनास ‘ अभिरुची ‘ मासिकांमधून सुरवात झाली. त्यांनी ‘ ‘सात सक्कं त्रेचाळीस ‘ लिहिली आणि त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीवरून त्याच्याकडे एक गंभीर लेखक म्ह्णून वाचक बघू लागले. या कादंबरीचे मुखपृष्ठ अरुण कोलटकर यांनी काढले होते .
किरण नगरकर यांनी त्यांनतर ‘ बेडटाईम स्टोरी ‘ आणि ‘ कबिराचं काय करायचं ‘ ही दोन नाटके लिहिली. त्याचप्रमाणे त्यांनी रावण अँड एडी’, ‘ककोल्ड’ आणि ‘ गॉड्स लिटिल सोल्जर ‘ या तीन इंग्लिश कादंबऱ्या लिहिल्या. किरण नगरकर यांनी २००२ मध्ये ‘ द आर्सोनिस्ट ‘ हे संत कवी कबिरावर प्रकल्प केला. नगरकर हे उत्तम पटकथा लेखक आहेत त्यांनी ‘द कौपिटिशन’, ‘द परफेक्ट सर्कल’, ‘द जी गॅंग’, ‘द ट्युलिप’ यांच्या पटकथा लिहिल्या.

मला आठवतंय काही वर्षांपूर्वी ते मुंबईमध्ये आले असताना त्यांचे भाषण ऐकण्याचा आणि त्यांना भेटण्याचा योग आला होता तेव्हा त्यांना सहज एकाने विचारले तुमची ‘ सात सक्क ..’ नंतर कादंबरी का आली नाही . तेव्हा ते म्हणाले मला जे काय सांगायचे होते ते मी माझ्या कादंबरीमध्ये सांगितले . परत तेच सांगण्यासाठी दुसरी कादंबरी कशाला. त्यांच्या ‘ सात सक्कं ‘ ला हरिनारायण आपटे पुरस्कार मिळाला . अत्यंत वेगळ्या विषयावरचीही कादंबरी होती , अत्यंत गुंतागुंतीची अशी ही कादंबरी पारंपरिक लेखनाला छेद देणारी होती. उत्कट प्रेमामधून किती ताणतणाव निर्माण होतात हे ह्या कादंबरीमधून जाणवत्ते.

किरण नगरकर यांचे लेखन नेहमीच वेगळ्या धाटणीचे असते. त्याचप्रमाणे त्यांचे ‘ बेडटाईम स्टोरी ‘ हे नाटक होते . ते अप्रकाशित नाटक होते. ह्या नाटकांमधून अस्पृश्य , आदिवासी आणि स्त्रिया यांच्या दृष्टिकोनातून महाभारताचा अर्थ त्यांनी लावला आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग १९९५ साली झाला परंतु त्यानंतर त्याचे थोडेच प्रयोग झाले कारण राजकीय शक्तीच्या हस्तक्षेपामुळे , दबावामुळे , कायदयाच्या कटकटीमुळे ते बंद पडले, आजही २०१७ सालामध्ये तसेच होती आहे आपल्या भारतीयांच्या भावना इतक्या ‘ मृदू ‘ आहेत की सांगण्याची सोय नाही. त्यामुळे या नाटकाची संहिता प्रकाशित होऊ शकली नाही.

‘मिडनाइट काऊबॉय’ ह्या कादंबरीवर पुढे त्याच्यावर सिनेमा झाला. त्यात गाव सोडून आलेल्या जॉन वोइटला डस्टिन हॉफमन पूर्ण लुबाडतो, पण तरीही त्याला हॉफमनला पाहिल्यावर आनंदच होतो. त्याने लुबाडल्याची भावना राहत नाही. कारण तो एकटा असतो, आणि एकटेपणा काय करू शकतो हे त्या कादंबरीत दाखविलं आहे.

त्यांच्या ‘ गॉड्स लिटल सोल्जर ‘ चं वाचन आमिर खानने केलं. एकूणच मोजक्याच कादंबऱ्या लिहूनही स्वत:चा वाचकवर्ग तयार केला. आजही अनेकांमध्ये त्यांच्या लिहिण्याबद्दल आणि त्यांच्या विधानाबद्दल उत्सुकता आहे.

त्याचप्रमाणे किरण नगरकरांचे ‘ कबिराचे काय करायचे ‘ हे नाटक १९९३ च्या हिंदू-मुसलमान दंगलीनंतर लिहिले गेले होते . ह्या नाटकाचे सादरीकरण आणि वाचन झाले परंतु प्रकशित झाले नाही.

किरण नगरकर यांच्या ‘ रावण अँड एडी ‘ या कादंबरीचा रेखा सबनीस केला त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या ‘ ककॊल्ड ‘ या कादंबरीचा ‘ प्रतिस्पर्धी ‘ या नावाने २००८ साली केला. किरण नगरकर यांनी ‘ Seven sixes are forty three ‘ , ‘ द एक्सट्राज ‘ आणि नुकतेच त्यांचे ‘ रेस्ट आणि पीस -रावण अँड एडी ‘ ही पुस्तके लिहिली आहे.

किरण नगरकर हे रॉकफेलर फेलोशीपचे दोनदा मानकरी ठरले असून त्यांच्या ‘ ककोल्ड ‘ कादंबरीला साहित्य अकादमीचा २००२ साली पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतून , लेखनामधून मानवी स्वभावाचे अंतरंग आणि वेगवेगळे पैलू दिसतात. ‘ सात सक्कं ‘ च्याबाबतीत किरण नगरकर यांच्यावर खूप टीका झाली. ‘ नगरकर काय समजतात स्वत:ला ‘. खरे तर मराठीमध्ये तिची नीट अशी समीक्षा कोणीच केली नाही. ते म्हणतात हे पुस्तक वाचलेली मराठी माणसं मला फारशी भेटत नाहीत. किरण नगरकर यांची सध्याच्या शिक्षणाबद्दलची आणि राजकीय मते अत्यंत मते परखड आहेत. आज किती मराठी माणसांन ,लेखकांना किरण नगरकर माहीत आहेत ?

मला अनेक वेळा त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आलेला होता. त्यामुळे मी स्वतःला निश्चित भाग्यवान समजतो.

त्यांची भाषणे आजही इंटरनेटवर आहेत कितीजण ते जाणून घेतात हाच मोठा प्रश्न आहे. इंटरनेटवर अनेक गोष्टी आहेत पण त्या बघणार कोण ?
किरण नगरकर यांनी मोजक्याच कादंबऱ्या लिहिल्या परंतु ज्या काही लिहिल्या त्या अत्यंत परखड अशा होत्या जेणेकरून नेहमीच वाद निर्माण झाले. त्यांनी जाहिरात क्षेत्रातही काम केले. ‘ स्प्लिट वाईड ओपन ‘ ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनयही केला आहे. अस्तित्ववादी साहित्याचा महत्वाचा प्रमुख शिलेदार म्हणून किरण नगरकर यांचे नाव घेता येईल.

किरण नगरकर यांचे ५ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई मध्ये निधन झाले. वेळ होती रात्री १० ची. ठिकाण होते चंदनवाडी समशानभूमी. ..बहुतेक जवळची माणसे सोडली , मित्रमंडळी सोडली तर फारच कमी संख्या अर्थात किरण नगरकर पचणे तसे कठीणच होते त्यात पावसाचे निमित्त , गणपती सणाचे निमित्त. आमच्या मराठी नवीन पिढीला किरण नगरकर हे नाव तसे नवीनच. कदाचित त्यांच्या पुस्तकावर उड्या आता पडतीलही. अत्यंत साधेपणाने कुठलेही सोपस्कार न करता विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार झाले. अस्थिविसर्जन करावे म्हणून त्यांचे नातेवाईक आणि मित्र, रमेश पारधे वरळीला पोचलो. उतरत्या चौथऱ्यावर एका बाजूला गणपती विसर्जन होत होते तर दुसऱ्या बाजूला किरण नगरकर यांच्या अस्थी आणि आजूबाजूला ढोल-ताशे वाजत होते.. त्याच गजरात किरण नगरकर नावाचा एक लेखक लाटांमध्ये ..लाट होऊन गेला होता.

— सतीश चाफेकर.

Author