जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन

भंवरलाल जैन यांनी मराठी, इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘ती व मी’ हे पत्नीवर लिहिलेले पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले. निसर्गकवी ना. धों. महानोर हे त्यांचे बांधभाऊ होते. राजकीय क्षेत्रात त्यांचे अनेक नेत्यांच्या बरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध होते किंबहुना सर्वच राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांशी त्यांची मैत्री होती.



जैन उद्योग समुहाचे संस्थापक व जळगावचे नाव जगाच्या नकाशावर नेणारे जळगावचे थोर भूमिपुत्र भवरलाल जैन यांचा जन्म १२ डिसेंबर १९३७ रोजी जळगावपासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या वाकोद या छोट्याशा गावी झाला.

कृषिविषयक आणि सामाजिक कार्यामुळे लाखोंचा पोशिंदा झालेले भवरलाल जैन यांनी आपली ‘भाऊ’म्हणून ओळख निर्माण केली होती. भंवरलाल जैन यांचे दहावीपर्यंत शिक्षण आर. आर. हायस्कूलमध्ये तर बी. कॉम, एलएल.बी. मुंबई विद्यापीठातून केले. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जेव्हा मुंबई-पुण्यापलिकडे जात नव्हती, तेव्हा भवरलाल जैन यांनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात रचला. शेती, शेतकरी आणि शेती संबंधित उद्योगात त्यांनी आपली बांधिलकी मानत पाश्चिमात्य देशांतले तंत्रज्ञान डोळसपणाने भारतीय मुशीत घालून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. स्वत: शेतकरी असल्याने आणि पिढ्यान् पिढ्या शेती करणाऱ्या घरात जन्म घेतल्याने त्या व्यवसायाशी त्यांची नाळ उत्तमरित्या जुळली होती. त्यांनी प्रथम शेतीमध्ये लागणाऱ्या म्हणजे खते, बी-बियाणे, जंतुनाशके, ट्रॅक्टर्स यांच्या जोडीला रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस यांचा व्यापार केला. कच्च्या पपईमधील चिकातून काढलेल्या पेपेन या एन्झाइमची निर्यात करून उद्योजक-कारखानदार म्हणून पदार्पण केले. पीव्हीसी पाइप्स, ठिबक सिंचन, एचडीपीई पाइप्स, पीव्हीसी शीटस् अशा उत्पादनांच्या साहाय्याने त्यांच्या उद्योगाचा विस्तार झाला, निर्यातही वाढत गेली. उती संवर्धनाने केळी पिकाला नवसंजीवनी मिळाली, तर सौरबंब आणि जैन ज्योत या उत्पादनांनी सौरऊर्जेवरील उत्पादनांमध्ये नवे दालन उघडले. कांदा निर्जलीकरणाची अन्नप्रक्रिया करून त्यांच्या गराची, सरांची, अर्काची निर्यात वाढवली. या एकूणच कामाचा सन्मान करत जैन इरिगेशनला फॉर्च्युनचा सन्मान प्राप्त झाला होता.

जगभरातील निवडक ५१ कंपन्यांच्या मानांकनात कंपनीचा ७ वा क्रमांक होता.

भंवरलाल जैन यांनी १९८० साली पीव्हीसी पाईप निर्मितीची कंपनी सुरु केली. इतकेच नव्हे तर ९० च्या दशकात त्यांची संपूर्ण भारतात सूक्ष्म जलसिंचनाची संकल्पना रुजवली.

जैन उद्योग समुह ११६ देशात विस्तारीत झाला असून सहा हजार कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल आहे. उद्योगाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी काम करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. भवरलाल जैन यांनी जळगावच्या जैन हिल्समध्ये त्यांनी दोन लाख चौरस फूट जागेवर गांधी तीर्थची उभारणी केली. त्यात गांधीजींनी लिहिलेली मूळ पत्रे, ग्रंथसंपदा, त्यांच्यावर इतरांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या मूळ प्रती, ७३५० पुस्तकांचा संग्रह, ४०१९ छायाचित्रे व चलचित्रे, १३८ भाषणे, १ लाख ७५ हजार मूळ कागदपत्रे, १९३६ मध्ये जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झालेल्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तू यांचा संग्रह त्यांनी उभारला.

भंवरलाल जैन यांनी मराठी, इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘ती व मी’ हे पत्नीवर लिहिलेले पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले. निसर्गकवी ना. धों. महानोर हे त्यांचे बांधभाऊ होते. राजकीय क्षेत्रात त्यांचे अनेक नेत्यांच्या बरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध होते किंबहुना सर्वच राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांशी त्यांची मैत्री होती.

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. १९९७ मध्ये जैन यांना प्रतिष्ठेच्या ‘क्रॉफोर्ड रीड मेमोरीयल’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अमेरिकन पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती होत. २००८ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’देऊन गौरविले होते.

शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आधुनिक आश्रमशाळा वाटावी आणि शिक्षणाबरोबरच संस्कार घडावे या हेतूने अनुभूतीसारखी इंग्रजी माध्यमाची शाळा काढून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

भवरलाल जैन यांचे २५ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author