आपले हृदय

मानवी छातीत फुफ्फुसाच्या मधोमध पण मागच्या बाजूला किंचित डावीकडे झुकलेली, डावीकडील तिसर्‍या फासळीपासून आठव्या फासळीपर्यंत एक अत्यंत कोमल लाल रंगाची, स्नायूंची बनलेली थैली आहे. या थैलीलाच हृदय असे म्हणतात.



मानवी छातीत फुफ्फुसाच्या मधोमध पण मागच्या बाजूला किंचित डावीकडे झुकलेली, डावीकडील तिसर्‍या फासळीपासून आठव्या फासळीपर्यंत एक अत्यंत कोमल लाल रंगाची, स्नायूंची बनलेली थैली आहे. या थैलीलाच हृदय असे म्हणतात. या थैलीला किंवा हृदयाला पडद्यांच्या सहाय्याने चार कप्प्यात विभागलेले असते. ही थैली अत्यंत लवचिक स्नायूंपासून तयार झाली आहे. हिचा आकार माणसाच्या बंद मुठीएवढाच असतो. साधारणतः १२ सें.मी. लांब व ७ सें.मी. जाड असलेली हृदयाची थैली जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अखंडपणे क्षणभरसुद्धा न थांबता शरीरभर शुद्ध रक्त पोहचविणे व शरीरातून आलेले अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी फुफ्फुसाकडे पोहचविणे हे कार्य अहोरात्र करीत असते. त्यासाठी हृदय वारंवार आकुंचन व प्रसरण पावत असते. हृदय साधारणतः १ मिनिटात ७२ वेळा आकुंचन पावते व पुन्हा मूळ आकारात येते. म्हणजेच एक दिवसात १,०३,६८० वेळा किंवा वर्षात ३,७८,४३,२०० वेळा आकुंचन व प्रसरण पावते. एखाद्याचे आयुष्य आपण ८० वर्षे गृहीत धरले तर हृदयात ३,०२,८४,५६,००० ठोके अखंडपणे पडत राहतील. या हृदयाला क्षणाचीही उसंत नाही. महिलांच्या हृदयाची गती पुरुषांपेक्षा किंचित अधिक असते. त्यामुळेच की काय महिलांना हृदयाची भाषा लवकर समजते.

ज्या हृदयाच्या बळावर मानवी जीवनाचा पसारा चालू आहे त्याला कोणतीही व्याधी होऊ नये अशी संरचना व कार्यपद्धती निसर्गाने आखून दिली आहे. तरीसुद्धा हे विधान खोटे ठरावे इतपत हृदयविकाराच्या घटना ऐकू येतात.

हृदयाचे कार्य

शरीरातील प्रत्येक पेशीला प्राणवायू आणि पोषक पदार्थ पुरवणे आणि चयापचाने तेथे निर्माण झालेली मलद्रव्ये तेथून काढून ती उत्सर्जित करण्यास मदत करणे हे हृदयाचे मुख्य कार्य आहे.

हृदय हा एक प्रकारचा छोटा पंप आहे. या पंपामधूनच सर्व शरीरात शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो.

शरीरातील पेशींकडून परत आलेले अशुद्ध व निळसर रक्त उजव्या कर्णिकेत येते. कर्णिका आकुंचन पावल्यावर हे अशुद्ध रक्त उजव्या जवनिकेत जाते. पल्मनरी रोहिणीमधून फुफ्फुसांकडे ते शुद्ध होण्यासाठी जाते.

फुफ्फुसाकडून शुद्ध होऊन आलेले लाल रंगाचे रक्त डाव्या कर्णिकेत येते. कर्णिका आकुंचन पावली की हे रक्त डाव्या जवनिकेत लोटले जाते, डावी जवनिका आकुंचन पावली की हे शुद्ध रक्त महारोहिणीद्वारे संपूर्ण शरीराकडे पाठविले जाते.

ज्याप्रमाणे कार्बन डाय ऑक्साईड बाहेर टाकण्याचे काम फुफ्फुसे करतात त्याचप्रमाणे इतर चयापचयानंतर निर्माण झालेले युरिया वगैरे शरीराबाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंड (किडनी) करतात.

आपल्या स्वास्थ्यासाठी सदैव रक्त शरीरभर खेळते राहणे आवश्यक आहे. रुधिराभिसरण संस्था हे कार्य करीत असते. रोहिण्या नीला या नळ्यांमधून रक्त पुढे ढकलीत रक्तप्रवाह चालू ठेवण्याचे काम हा पंप अविश्रांत करीत असतो.

Author