गोव्यातील महाराष्ट्र परिचय केंद्र कायमचे बंद

हे कधीतरी घडणार होते आचके देत रुग्णालयात आय सी यु मध्ये असणाऱ्या रुग्नाप्रमाणे शेवटी महाराष्ट्र परिचय केंद्राचे पणजीतलं कार्यालय बंद पडले व शेवटी महाराष्ट्राशी असणारा दुवा निखळला असे खेदाने म्हणावे लागेल.



हे कधीतरी घडणार होते आचके देत रुग्णालयात आय सी यु मध्ये असणाऱ्या रुग्नाप्रमाणे शेवटी महाराष्ट्र परिचय केंद्राचे पणजीतलं कार्यालय बंद पडले व शेवटी महाराष्ट्राशी असणारा दुवा निखळला असे खेदाने म्हणावे लागेल. ह्या केंद्राने मोठमोठे साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करताना अनेक साहित्यिकांमध्ये लिहिण्याची उमेद जागविली मोठी केली , श्रवणा तुन अनेक दिग्ग्जना ऐकविले गोव्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना नेले ते साहित्यिक जाण, आस्था असलेल्यांनीच.माझा व्यक्तीशी ह्या केंद्राशी अनेक कार्यक्रमामुळे सम्पर्क आला होता पण हे केंद्र कधी ना कधी कायमचे बंद पडणार हि भीती वाटत होती व शेवटी ती खरी ठरली. एखादे पुस्तकाचे दुकान कायमचे बंद पडल्यानन्तर दुःख व्हावे तसे दुःख हे केंद्र कायमचे बंद पडल्याने झाले. अशी भावना माझ्यासारख्या अनेकांची असेल ह्यात दुमत नाही.

परिचय केंद्र प्रभाकर भुसारी मुळे अनेक कार्यक्रमामुळे गोव्याच्या कानाकोपऱ्यात पोचले हे कोणीही नाकबूल करणार नाही तोच कित्ता अनुराधाताई आठवलेंचाही आहे. मला आठवते कि लहान मुलांना पुस्तके वाचण्याची सवय लावण्यासाठी पुस्तकांची फिरती पेटी द्वारे त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न . . विशेष म्हणजे ह्या उपक्रमांना एका स्थानिक दैनिकाची साथ नेहमीच लाभली. आमचा अनेकांप्रमाणे ह्या परिचय केंद्राकडे सम्बन्ध आला तो त्यांच्या निवडक चित्रपट प्रदर्शनाच्या कार्यक्रमामुळे. एखादा गावात उत्सव असला किंवा सरस्वती पूजनासारखा सांस्कृतिक सोहळा असला कि एक तरी चित्रपट परिचय केंद्रातर्फे आयोजित केला जायचा. आयोजन समितीला कधीच त्यांनी नकार दिला नव्हता. फक्त तारखांच्या बाबतीत थोडे मागे पुढे करावे लागे तेवढेच. मोठमोठ्या साहित्यिकांना निमंत्रित करणे त्याची व्याख्याने आयोजित करणे जन्मशताब्दी सारखे भव्य दिव्य सोहळे आयोजित करणे,साने गुरुजी कथामाला असो वा अन्य चर्चासत्रे असो वा कवी संमेलन असो ह्याचा लाभ माझ्यासारखा अनेक उदयानमुख पिढीने घेतला असेल . ह्यातूनच तेथील सम्पन्न ग्रँथालयाची ओळख झाली व रीतसर सदस्यही झालो. ह्या नियमित्ताने केंद्राच्या कार्यालयाला भेट देणे व्हायचे. गोव्यातील रसिकांना श्रवणासाठी उत्तमातील उत्तम साहित्यिक विचारवन्त कलावन्त पाहुणे ह्या केंद्रातर्फे यायचे कार्यक्रम व आपल्या विचारांनी कलेनी सर्व रसिकांना तृप्त करत. राम शेवाळकरापासून श्रीधर नवरे पर्यंत कित्येकांनी इथल्या रसिकांना तृप्त केले आहे ते न विसरण्याजोगे.

प्रथम मधु भाई कर्णिकांच्या मदतीने हे केंद्र मडगांव येथे सुरु झाले ते १९६६ साली. ह्या केंद्राचा व्याप वाढल्याने पणजीत ते आले त्यावेळी फोफळे अधिकारी होते त्यांनतर पत्की , प्रभाकर भुसारी राम पाटील अनुराधा आठवले अजय अंबेकर सतीश पाटणकर दयानंद कांबळे आदी अनेक अधिकारी येऊन गेले . प्रत्येक अधिकाऱ्याची कामकाजची पद्धती वेगवेगळी असली तरी त्यांनी केंद्राचे कार्यक्रम तुटपुंज्या निधीतून आपल्यापरीने पुढे नेले होते. काहींनी संधीचे सोने केले होते म्हणून ह्या केंद्राकडे मोठ्या आशेने सर्वजण पाहत होते. पण राजकारण कुठेतरी शिजू लागले. काहीना हे स्थानिक भाषेवर आक्रमण आहे असे वाटू लागले त्यामुळे हे केंद्रच बंदच करण्याच्या हालचालींना जोर आला.

तशात महाराष्ट्रातील मंडळींचे ह्या केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आणि त्यात बळी गेला तो ह्या केंद्राचा .

एकेकाळी बांदोडकर असताना महाराष्ट्रात गोवा विलीन होण्याचे धाटले होते तो इतिहास झाला आणि गोवा स्वतंत्र राहिला. मध्यन्तरी मराठी कोकणी भाषावाद उफाळला त्यामुळे ह्या केंद्राकडे दुर्लक्ष होत गेले. पण ग्रँथालय सेवा मात्र सुरूच होती. ह्या ग्रँथालयातील चांगली पुस्तके वाचायला मिळाली. लोकराज्य सारखे उत्तम माहिती देणारे मासिक इथे वाचायला मिळत असे त्याची आठवण होते. ह्यावर आता केवळ अस्सल वाचनप्रेमी काय ते गळा काढतील. खरेतर एक फोन जरी केला असता तर केंद्र चालू राहिले असते पण नाही ते होणे नव्हते. आपणही करायचे नाही व जर कोणी करत असेल तर त्याचे पाय खेचायचे हि वृत्ती. आता जो तो एखाद्यावर आरोप करेल पण शेवटी केंद्र कायमचे बंदच झाले ना !

ह्या केंद्रातील एकेक कर्मचारी निवृत्त होऊ लागला पण नवीन नियुक्ती होत नव्हती तेव्हाच केंद्र हळूहळू बंद पडणार हे दिसत होते पण अधिकृतपणे कोणीही बोलायला तयार नव्हते. मध्यन्तरी तर अशी स्थिती आली कि शिपाई नियुक्त न केल्याने चक्क ग्रँथालयही बंद ठेवले गेले . एखादा दिव्यांग कर्मचारी नेमला जाईल अशी माहिती मिळाली होती पण तो दुसऱ्या केंद्रावर असल्याने घरघर सुरु झाली होती . ह्या केंद्राच्या अख्यतारीत कार्यालयाची इमारत एक सदनिका आणि वाहनतळ भाडेतत्वावर का होईना पण मालमत्ता आहे. त्यापायी होणारा खर्च आता जवळजवळ कमी तरी होईल किंवा बंदच होईल. केंद्राकडे ह्यापूर्वी चक्क तीन वाहने होती त्यापैकी एकही वाहन शिल्लक नाही त्यामुळे जो वाहनतळ होता त्याचे काय होणार? हा प्रश्न हे स्मार्ट सिटी होत असल्याने पुढे येत आहे . ह्या सम्बंधीच्या बातम्या पण आल्या होत्या . असो .

एखाद्या राज्याचे केंद्र असले म्हणजे स्थानिक वातावरणावर त्याचा पोषक परिणाम होतो त्या राज्याचा परिचय जवळून होतो . साने गुरुजींच्या स्वप्नातली आंतरभाषा कल्पना देशातल्या भाषेचा परिचय होणे तसा सांस्कृतिक होणे पण तेवढेच गरजेचे. आज म्हादई मुळे जो पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे त्याला पर्याय म्हणून जलसंवर्धन उपक्रम हाती घ्यावा त्यासाठी आपल्या देशातील विविध राज्यातील तज्ञांना पाचारण करावे व त्यांच्या भाषेत आपण संवाद साधला तर जास्त परिणाम होऊ शकतो.

केंद्राच्या उपस्थितीमुळे त्या भाषेचे संवर्धन होऊ शकले असते. आपल्याला मराठी भाषेची जवळीकता प्राथमिक स्तरावरून होती, अनेक पुस्तके वृत्तपत्रे आपण त्या भाषेतून वाचतो. त्यामुळे महाराष्ट्राशी भावनिक जवळीकता निर्माण झाली होती तिला कुठेतरी अशा वृत्तामुळे ठेच पोचू शकते. हे केंद्र पुन्हा त्याच ठिकाणी सुरु व्हावे ह्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भले तुम्ही मोठाले कार्यक्रम ठेऊ नका पण निदान संवादासाठी ह्या केंद्राचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. नवीन केंद्र सुरु व्हायला कदाचित जागेमुळे अडचणी येऊ शकतात पण ह्या केंद्राची भाडेपट्टीवरची जागा उपलब्ध आहे तेव्हा मायबाप सरकारने ह्यात लक्ष घालून हे केंद्र सुरु होतील ते बघावे.

आता संगणकामुळे जास्त कर्मचारी लागत नसतील तेव्हा किमान कर्मचाऱ्याच्या मदतीने तिथले सुसज्ज ग्रँथालय व जमत असतील ते उपक्रम जरूर सुरु करावे अशी प्रामाणिक इच्छा आहे.

— प्रा रामदास केळकर

Author