राज्य कारणे लुडबुड असावी (सुमंत उवाच भाग ९७)

सुमंत जयंत परचुरे. 

राज्य चालावे म्हणून केलेले कार्य याला राज्य कारण म्हणतात आणि राज करण्यासाठी केलेले कार्य त्याला राजकारण म्हणतात आजकाल राज्यकारणात राजकारण शिरल्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली आहे.



राज्य कारणे लुडबुड असावी
राज कारणे सीमा नसावी
परी नीती हो बाळगावी
उंबरठ्या मागे!

अर्थ

निष्ठा, विचार, ध्येय्य, कर्तृत्व, समानता, सर्वसमावेशकता या सगळ्या गोष्टींचा एकत्रित येऊन झालेला विषय म्हणजे राजकारण. पण समर्थांनी सांगितले आहे की राजकारण आणि राज्य कारण यात फरक आहे.

बहोत करावे राजकारण! परी घ्यावे सकळजन! नसावे कपट-मीपण! राज्य बुडते!!

राज्य चालावे म्हणून केलेले कार्य याला राज्य कारण म्हणतात आणि राज करण्यासाठी केलेले कार्य त्याला राजकारण म्हणतात आजकाल राज्यकारणात राजकारण शिरल्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली आहे.

राज्य कारणात सुयोग्य राज्य कारभार अपेक्षित असतो आणि राजकारणात बुद्धिबळाच्या चालींचा आणि वाऱ्याच्या वेगाचा खेळ अपेक्षित असतो. आजकाल वाऱ्याच्या वेगाने पक्ष आणि ध्येय बदलली जातात आणि निष्ठा या गोष्टीला विष्ठेचे स्वरूप प्राप्त होऊन ती कचऱ्याची टोपली गाठते.

पण जर हेच राजकारण एखाद्याच्या घरात घुसले तर? तर मराठी शाहीला मिळालेला शाप रुपी वारसा पुढे जाण्यास हातभार लागतो. म्हणून राज्यकारण असो किंवा राजकारण असो ते उंबरठ्या बाहेर असावे.घर शाबूत रहाण्यास मदत होते.

— सुमंत परचुरे.

Author

सुमंत जयंत परचुरे.