अधीर मना (सुमंत उवाच – २७)

सुमंत जयंत परचुरे. 

संयम ठेवावा लागतो जेव्हा कठीण समय येतो, संयम असावा मनी जेव्हा काळ चालून येतो वगैरे गोष्टी शिकायच्या म्हणजे अधीरता मनातून निघून गेली पाहिजे.



अधीर मना कोण सांगे
काय ठेवुनी जगावे
भक्ती, शक्ती, युक्ती घेऊनी
कुठे काय मागावे

समोर दिसले मृगजळ म्हणूनी
का उगाच थांबावे
योग्य ते जाणून घ्यावे
जगण्यासाठी…

अर्थ

अधीर मना कोण सांगे
काय ठेवुनी जगावे
भक्ती, शक्ती, युक्ती घेऊनी
कुठे काय मागावे

(संयम ठेवावा लागतो जेव्हा कठीण समय येतो, संयम असावा मनी जेव्हा काळ चालून येतो वगैरे गोष्टी शिकायच्या म्हणजे अधीरता मनातून निघून गेली पाहिजे. आयुष्यात येणारा क्षण दुःखाचा असो किंवा सुखाचा, आनंदाचा कसलाही अधिरपणा जर त्या वेळी दाखवला तर अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. हे करायचं आहे पण ते लक्ष देऊन करण्यापेक्षा जर विचार न करता केले तर त्यातुन काही प्राप्त होत नाही. भक्ती करताना याचं फळ कधी मिळेल हा विचार करून ती केलीत की त्याचं फळ कधीही मिळणार नाही. अचाट शक्ती आहे म्हणून नको ते साहस करायला गेलं की हमखास तुम्ही तिथे अपयश घेणार हे नक्की. युक्तिवाद हा प्रत्येक वेळी चांगलाच असा समज असणे म्हणजे मूर्खपणा ठरतो. म्हणून जरी तुम्ही सर्वगुण संपन्न असलात तरी संयम हा तुमचा राजा आहे हे लक्षात ठेवावे.)

समोर दिसले मृगजळ म्हणूनी
का उगाच थांबावे
योग्य ते जाणून घ्यावे
जगण्यासाठी…

(मृगजळा सारख्या असंख्य गोष्टी आपल्याला आयुष्यात दिसतात की ज्या हव्याहव्याशा वाटतात. पण प्रत्यक्षात घडत काहीच नाही आणि मग त्या साठी केलेला अट्टाहास मातीमोल ठरतो. म्हणून संयमाने वागणे, योग्य माणसांचे मार्गदर्शन आणि तुम्हाला नक्की काय हवे याचे भान असले की जगायला मजा ही येतेच.)

— सुमंत परचुरे.

Author

सुमंत जयंत परचुरे.