सज्जनगड/समर्थ रामदास स्थापीत मारूती-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यास अनुकूल पार्श्र्वभूमी तयार करणा-या समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य बराच काळ सातारा जिल्ह्यात होते. साता-याजवळ असलेल्या सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींची समाधीया असून येथे समर्थ रामदासांनी स्थापन केलेले श्रीराम मंदिरही आहे. रामदासी पंथाचे महाराष्ट्रातील हे एक प्रमुख केंद्र आहे. पाटण तालुक्यातील चाफळ या गावीही समर्थांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी दोन मारुतींची मंदिरे येथेचथेअसून याच मंदिराच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट झाल्याचेही मानले जाते.
प्रतापगड-
प्रतापगड महाबळेश्वर तालुक्यात असून शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी अफझलखानाची कबर येथे आहे.
शिखर शिंगणापूर-
शिखर शिंगणापूर हे स्थान सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. शंभू-महादेवाचे येथील मंदिर राज्यात प्रसिद्ध असून, हे एक जागृत देवस्थान मानले जाते.
औंध संस्थान-
खटाव तालुक्यातील औंध हे पूर्वीचे संस्थान. संस्थानी वातावरणाच्या खुणा आजही येथे दिसतात. येथील वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध असून, येथील डोंगरावर यमाई देवीचे मंदिर आहे.
गोंदवलेकर महाराज-
‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तेरा अक्षरी मंत्राचा प्रसार करणारे थोर श्रीरामभक्त गोंदवलेकर महाराजांची समाधी माण तालुक्यातील गोंदवले येथे आहे.
मांढरदेव-काळुबाई यात्रा-
वाई तालुक्यातील मांढरदेव हे गाव प्रसिद्ध असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते ५ किलोमीटर अंतरावर किकली या गावी हे मंदिर आहे. येथे काळूबाईची मोठी यात्रा भरते,व हिंदू-मुस्लीम धर्माचे भाविक गर्दी करतात.
श्री.भैरवनाथ मंदिर किकली तालुका-वाई (सातारा)-
वाई तालुक्यात वसलेल्या किकली गावातील पुरातन हेमाडपंती स्थापत्य असलेले मंदिर आहे.
ऑक्टोबर महिन्यात या गावची यात्रा भरते. या यात्राचे वैशिष्ट्य हे आहे, की भैरवनाथाचा छबिना हा दिवसा असतो. ही यात्रा दस-यानंतरच्या शनिवार व रविवार या दिवशी भरते. तसेच ही यात्रा या गावाचे बारा बलुतेदार भरवतात.
फलटणचे श्रीराम मंदिर-
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे संस्थानी वातावरणाच्या खुणा आढळतात. येथील श्रीराम मंदिर प्रसिद्ध असून येथील श्रीकृष्ण मंदिर व चक्रधर स्वामींचे मंदिर ही प्रेक्षणीय आहे.
महाबळेश्वर व पाचगणी-
ही भारतातील सुप्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत. ब्रिटिश काळात महाबळेश्र्वर ही मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी असणा-या या ठिकाणाचे,ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा प्रथम विकास केला. सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या एका गावाचे ग्रामदैवत महाबळी आहे. या महाबळीचे मंदिर यादव काळात यादव राजांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला,व महाबळी या नावावरून आसपासच्या वस्तीचे महाबळेश्र्वर असे नामकरण झाले, अशी ,अख्यायिका प्रचलित आहे. पश्र्चिम घाटाची डोंगररांग, उंच कडे, खोल द-या, दाट जंगले यांचे विपुल प्रमाण महाबळेश्र्वरमध्ये आहे. महाबळेश्र्वर हे समुद्रसपाटीपासून सुमारे १३७२ मीटर उंचीवर असून या उंचीवर पठारावर वसलेले आहे. येथील लॉडविक पॉईंट, विल्सन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, एलफिस्टन पॉईंट, ऑर्थर सीट, लिंगमाळा धबधबा, वेण्णा तलाव इत्यादी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. महाबळेश्र्वरजवळ क्षेत्र महाबळेश्र्वर येथे श्रीमहाबळेश्र्वराचे (महादेवाचे) मंदिर आहे. पूर्ण भारतातून येणारे तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकही येथे गर्दी करतात. महाबळेश्र्वरपासून सुमारे २० कि. मी. अंतरावर असलेले पाचगणी हे पर्यटनस्थळ ही जगप्रसिद्धअसून येथील निसर्गसंपन्नतेमुळे या ठिकाणाला”भारतातील स्वित्झर्लंड” असंही म्हटले जाते.
वासोटा किल्ला-
कोयना नदीच्या परिसरात वासोटा नावाचा दुर्गम किल्लाही असून यास व्याघ्रगड असेही म्हटले जाते. येथे वन्य श्र्वापदांचा येथे मुक्तपणे संचार असतो. घनदाट जंगल व निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटक व गिर्यारोहकांचे हे आवडते ठिकाण आहे. सातारा-कास-फळणी मार्गे वासोट्याला जाता येते.
अजिंक्यतारा-
जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या सातारा शहरातच अजिंक्यतारा किल्ला असून हा किल्ला शिलाहार राजवटीत राजा दुसरा भोज याने बांधल्याची नोंद इतिहासात सापडते. १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला होता. साता-यातील छत्रपती वस्तुसंग्रहालयही प्रसिद्ध आहे.
शाहू महाराजांची समाधी-
माहुली येथे कृष्णा-वेण्णा नद्यांचा संगम असून येथे छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे.
कास तलाव-
साता-यापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावरील कास तलाव हे ठिकाणदेखील अलीकडच्या काळात नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध होत आहे.
वाई-
वाई हे कृष्णाकाठ लाभलेले गाव असून येथे अनेक घाट नदीवर विकसित केलेले आहेत. वाईजवळ मेणवली येथे नाना फडणवीसांचा वाडा आहे, तसेच येथील गणपती मंदिरही प्रसिद्ध आहे.पालीचा खंडोबा, ठोसेघर धबधबा सारखी ठिकाणेही प्रसिद्ध असून जवळच असलेल्या आगाशिवा डोंगरात बौद्धकालीन लेणी सापडली आहेत. कोयना प्रकल्प (शिवाजीसागर), वेण्णा नदीवरील कन्हेर धरण व कृष्णेवरील धोम धरण ही सर्व ठिकाणे नैसर्गिकदृष्ट्या सुंदर आहेत. कोयना प्रकल्पाच्या परिसरात पंडित नेहरू स्मृती उद्यान विकसित करण्यात आले असून पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर भेट देतात.