लीला गांधी

लावणी म्हटलं की ' अप्सरा आली...' अन् 'मला जाऊ द्या ना घरी...' या लावण्या नवीन पिढीच्या ओठी सहजपणे येतात; पण याच लावणीला मान मिळावा म्हणून काहींनी आयुष्य खर्ची घातलं. त्यातील एक म्हणजे लीला गांधी. राज्य सरकारच्या व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली.

वयाच्या आठव्या वर्षापासून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत, तालबद्ध पदन्यास आणि त्याच तोडीच्या देहबोलीतून त्यांनी लावणी सादर करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तमाशापटांचा जमाना सुरू झाल्यावर नृत्यपारंगत लीलाताईंच्या कारकीर्दीला खर्‍या अर्थाने 'ब्रेक' मिळाला. 'कुण्या गावाचं आलं पाखरू', 'ऐन दुपारी, यमुनातिरी' अशा त्यांच्यावर चित्रीत झालेल्या लावण्या असो, वा 'बुगडी माझी सांडली गं' सारख्या लावणीला लाभलेली त्यांची नृत्यदिग्दर्शनाची साथ असो; हा प्रकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यामध्ये, शब्द-संगीताची किमया तर होतीच; पण त्याचबरोबर पडद्यावर पाहायला मिळणारा लावणीचा शृंगार आणि ऐटबाज ठसका, यांचाही वाटा होता. पडद्यावर दाखवल्या जाणार्‍या लावणीतील नजाकत कायम राहून, ती बीभत्सपणाकडे झुकणार नाही, याची काळजी लीलाताईंनी घेतली. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो, टाळ्या-शिट्ट्यांची दाद मिळते म्हणून लावणीच्या सादरीकरणात त्यांनी तडजोड केली नाही. लावणीचे लावण्य त्यांनी जपले, जोपासले आणि त्यातील निखळ सौंदर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले.

तमाशा आणि लावणी याऐवजी मराठी चित्रपट आणि लावणी, असा काळ निर्माण करण्यात लीलाताईंचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. असंख्य चित्रपटांतून लावणीचा ठुमका सादर केल्यानंतर त्यांनी 'लीला गांधी नृत्यदर्शन' हा कार्यक्रमही राज्यभर सादर केला. रुपेरी पडद्यावरची त्यांची लावणी गाजली, तशीच लोकप्रियता त्यांच्या या कार्यक्रमालाही मिळाली. सादरीकरणासाठी उत्तम स्टेज, येण्या-जाण्याचा खर्च, निवासाची पंचतारांकित व्यवस्था अशा सुविधा नसतानाही केवळ लावणीचा प्रेक्षक तयार करण्यासाठी त्यांनी राज्याचा काना-कोपरा ढवळून काढला. शेतातल्या ढेकळांवर आणि मुलाच्या आजारपणाची पर्वा न करता 'शो मस्ट गो ऑन' यासाठी त्या सातत्याने कार्यरत राहिल्या.

खूप वर्षांनी मराठी चित्रपटांमध्ये लावणीला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे; पण त्याच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार असलेल्या लीलाताईंना त्यातील बाजारू गोष्टी खटकतात. सध्याच्या नृत्यकलावंतांची तारीफ त्या आवर्जून करतात; परंतु त्याचवेळी लावणी चमचमत्या कपड्यांतून नाही, तर मुद्राभिनयातून, अदाकारीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असते, असे परखड मतही व्यक्त करतात. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शिष्य न घडवता आल्याची त्यांच्या मनातील सल म्हणूनच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही बोचत राहते.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)




लावणी म्हटलं की ‘ अप्सरा आली…’ अन् ‘मला जाऊ द्या ना घरी…’ या लावण्या नवीन पिढीच्या ओठी सहजपणे येतात; पण याच लावणीला मान मिळावा म्हणून काहींनी आयुष्य खर्ची घातलं. त्यातील एक म्हणजे लीला गांधी. राज्य सरकारच्या व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली.

वयाच्या आठव्या वर्षापासून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत, तालबद्ध पदन्यास आणि त्याच तोडीच्या देहबोलीतून त्यांनी लावणी सादर करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तमाशापटांचा जमाना सुरू झाल्यावर नृत्यपारंगत लीलाताईंच्या कारकीर्दीला खर्‍या अर्थाने ‘ब्रेक’ मिळाला. ‘कुण्या गावाचं आलं पाखरू’, ‘ऐन दुपारी, यमुनातिरी’ अशा त्यांच्यावर चित्रीत झालेल्या लावण्या असो, वा ‘बुगडी माझी सांडली गं’ सारख्या लावणीला लाभलेली त्यांची नृत्यदिग्दर्शनाची साथ असो; हा प्रकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. यामध्ये, शब्द-संगीताची किमया तर होतीच; पण त्याचबरोबर पडद्यावर पाहायला मिळणारा लावणीचा शृंगार आणि ऐटबाज ठसका, यांचाही वाटा होता. पडद्यावर दाखवल्या जाणार्‍या लावणीतील नजाकत कायम राहून, ती बीभत्सपणाकडे झुकणार नाही, याची काळजी लीलाताईंनी घेतली. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो, टाळ्या-शिट्ट्यांची दाद मिळते म्हणून लावणीच्या सादरीकरणात त्यांनी तडजोड केली नाही. लावणीचे लावण्य त्यांनी जपले, जोपासले आणि त्यातील निखळ सौंदर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविले.

तमाशा आणि लावणी याऐवजी मराठी चित्रपट आणि लावणी, असा काळ निर्माण करण्यात लीलाताईंचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. असंख्य चित्रपटांतून लावणीचा ठुमका सादर केल्यानंतर त्यांनी ‘लीला गांधी नृत्यदर्शन’ हा कार्यक्रमही राज्यभर सादर केला. रुपेरी पडद्यावरची त्यांची लावणी गाजली, तशीच लोकप्रियता त्यांच्या या कार्यक्रमालाही मिळाली. सादरीकरणासाठी उत्तम स्टेज, येण्या-जाण्याचा खर्च, निवासाची पंचतारांकित व्यवस्था अशा सुविधा नसतानाही केवळ लावणीचा प्रेक्षक तयार करण्यासाठी त्यांनी राज्याचा काना-कोपरा ढवळून काढला. शेतातल्या ढेकळांवर आणि मुलाच्या आजारपणाची पर्वा न करता ‘शो मस्ट गो ऑन’ यासाठी त्या सातत्याने कार्यरत राहिल्या.

खूप वर्षांनी मराठी चित्रपटांमध्ये लावणीला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे; पण त्याच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार असलेल्या लीलाताईंना त्यातील बाजारू गोष्टी खटकतात. सध्याच्या नृत्यकलावंतांची तारीफ त्या आवर्जून करतात; परंतु त्याचवेळी लावणी चमचमत्या कपड्यांतून नाही, तर मुद्राभिनयातून, अदाकारीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची असते, असे परखड मतही व्यक्त करतात. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शिष्य न घडवता आल्याची त्यांच्या मनातील सल म्हणूनच सर्वसामान्य प्रेक्षकांनाही बोचत राहते.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


Author