शांताराम बोकील

बोकील, शांताराम

संपादक केबिनबद्ध नसावा, त्याने दीनदलितांच्या, भूमिपुत्रांच्या, पीडितांच्या हितासाठी आणि धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाषा-धर्म-जाती-प्रदेशवादाच्या नावाखाली राजकारणाला विरोध करण्यासाठी कृतिशील असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणारा कार्यकर्ता-पत्रकार, शांताराम बोकील यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव हे गोष्टीवेल्हाळ शांताराम बोकील यांचे जन्मगाव.

विद्यार्थीदशेपासून बोकील शेती आणि शेतीच्या प्रश्नाकडे ओढले गेले. त्यांच्यावर पं. नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते झाले. काँग्रेसी कार्यकर्ता होण्याचे समर्थनही करण्याचे धाडस बोकील यांनी पत्रकार झाल्यावर जाहीरपणे केले. या कार्यकर्ता होण्याने शेतीचे प्रश्न समजून घेताना त्यामागचे राजकीय भान बोकील यांना आले. सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड या गावी सहा दशकांपूर्वी शेतकरी कुळाचा हक्क डावलला जाण्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे झाले, त्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी आमदार तुषार पवार यांच्यासोबत शांताराम बोकीलही आघाडीवर होते. या यशस्वी आंदोलनानंतर बोकील पत्रकारितेकडे वळले आणि तेथेच रमले. ‘पुढारी’ या दैनिकातून ग. गो. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची १९६० साली सुरू झालेली पत्रकारिता २००१ पर्यंत अखंड सुरू राहिली. या काळात शांताराम बोकील यांनी गोव्यात ‘नवप्रभा’, विदर्भात ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’ आणि ‘जनवाद’, औरंगाबाद आणि नांदेडच्या ‘लोकपत्र’ तसेच, कोल्हापूरच्या ‘पुढारी’ या दैनिकांचे कार्यकारी संपादकपद सांभाळत असताना महाराष्ट्रातील कृषी जगताचे साक्षेपी भाष्यकार-संपादक अशी ख्याती संपादन केली. उपसंपादक आणि सहाय्यक संपादक म्हणून नोकरी करताना आणि कार्यकारी संपादक म्हणून वृत्तपत्राचे नेतृत्व करताना शांताराम बोकील यांनी, पं. नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्यावरील निष्ठा आणि शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीशी प्रतारणा केली नाही. या तीन मुद्यांवर मतभेदाचे प्रसंग उद्भवले तेव्हा नोकरी सोडण्याचा बाणेदारपणा बोकील यांनी दाखवला. संपादक म्हणून वैपुल्याने वावरताना राज्याच्या ज्या भागात गेले तेथील अभ्यास हे त्यांचे अविभाज्य अंग झाले. ते एक छान शिक्षकही होते. त्यांची शिकवण्याची पद्धत मात्र कठोर होती. सहकाऱ्यांच्या भाषाविषयक आणि अन्य चुका दाखवताना त्यांची जीभ दांडपट्टय़ाच्या वेगाने वार करत असे. मात्र त्यात व्यक्तिगत विखार नसे; बोकील क्षणार्धात समजदार शिक्षकाच्या भूमिकेत शिरत आणि भाषा, व्याकरण, शैली, एखाद्या प्रतिपाद्य विषयावरील त्यांच्याकडील माहितीचा खजिना रिता करत. पत्रकारिता समरसून शिकवण्याच्या त्यांच्या या तळमळीची आठवण त्यांच्यासोबत काम केलेले अनेक सहकारी आजही काढतात. पानाच्या टपरीपासून ते बडय़ा राजकीय धेंडांपर्यंत बोकीलांचा वावर ‘डॉमिनेटिंग’ शैलीत पण सहज असे. अशा बडय़ा धेंडाने बोलताना एखादा तपशील चुकीचा दिला तर त्याला फाडकन सुनावण्यास बोकील कचरत नसत. शेती आणि शेतकरी तसेच, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि मुस्लिमद्वेषाचे धोकादायक वळणावर पोहोचलेले राजकारण हे बोकील यांच्या लेखनाचे, वक्तृत्वाचे मुख्य विषय असत. या विषयांवर त्यांची शैली तडजोडवादी कधीच नव्हती. त्यामुळेच पत्रकार म्हणून त्यांना स्थैर्य प्राप्त झाले नाही आणि आर्थिकदृष्टय़ाही संपन्नता दिली नाही, याबद्दल काहीशी कटुता शांताराम बोकील यांना होती. पण त्यापेक्षा जास्त खंत महाराष्ट्राने त्यांचे प्रतिपादन नीट ऐकले नाही, याची होती आणि त्यापेक्षा किती तरी जास्त पट वैषम्य या देशाने नेहरूवादाची कास सोडल्याचे होते. बोकील सर्वधर्मसहिष्णू धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते. ही धर्मनिरपेक्षता म्हणजे जात निरपेक्षताही आहे आणि नेहरूवाद तसेच यशवंतरावांचे विचार हाच त्याचा आधार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. जातीरहित धर्मनिरपेक्षतेचे स्वप्न साकार होण्याचे समाधान राजकारण्यांनी बोकील यांना लाभू दिले नाही ते नाहीच!



बोकील, शांताराम

संपादक केबिनबद्ध नसावा, त्याने दीनदलितांच्या, भूमिपुत्रांच्या, पीडितांच्या हितासाठी आणि धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाषा-धर्म-जाती-प्रदेशवादाच्या नावाखाली राजकारणाला विरोध करण्यासाठी कृतिशील असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणारा कार्यकर्ता-पत्रकार, शांताराम बोकील यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव हे गोष्टीवेल्हाळ शांताराम बोकील यांचे जन्मगाव.

विद्यार्थीदशेपासून बोकील शेती आणि शेतीच्या प्रश्नाकडे ओढले गेले. त्यांच्यावर पं. नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते झाले. काँग्रेसी कार्यकर्ता होण्याचे समर्थनही करण्याचे धाडस बोकील यांनी पत्रकार झाल्यावर जाहीरपणे केले. या कार्यकर्ता होण्याने शेतीचे प्रश्न समजून घेताना त्यामागचे राजकीय भान बोकील यांना आले. सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड या गावी सहा दशकांपूर्वी शेतकरी कुळाचा हक्क डावलला जाण्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे झाले, त्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी आमदार तुषार पवार यांच्यासोबत शांताराम बोकीलही आघाडीवर होते. या यशस्वी आंदोलनानंतर बोकील पत्रकारितेकडे वळले आणि तेथेच रमले. ‘पुढारी’ या दैनिकातून ग. गो. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची १९६० साली सुरू झालेली पत्रकारिता २००१ पर्यंत अखंड सुरू राहिली. या काळात शांताराम बोकील यांनी गोव्यात ‘नवप्रभा’, विदर्भात ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’ आणि ‘जनवाद’, औरंगाबाद आणि नांदेडच्या ‘लोकपत्र’ तसेच, कोल्हापूरच्या ‘पुढारी’ या दैनिकांचे कार्यकारी संपादकपद सांभाळत असताना महाराष्ट्रातील कृषी जगताचे साक्षेपी भाष्यकार-संपादक अशी ख्याती संपादन केली. उपसंपादक आणि सहाय्यक संपादक म्हणून नोकरी करताना आणि कार्यकारी संपादक म्हणून वृत्तपत्राचे नेतृत्व करताना शांताराम बोकील यांनी, पं. नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्यावरील निष्ठा आणि शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीशी प्रतारणा केली नाही. या तीन मुद्यांवर मतभेदाचे प्रसंग उद्भवले तेव्हा नोकरी सोडण्याचा बाणेदारपणा बोकील यांनी दाखवला. संपादक म्हणून वैपुल्याने वावरताना राज्याच्या ज्या भागात गेले तेथील अभ्यास हे त्यांचे अविभाज्य अंग झाले. ते एक छान शिक्षकही होते. त्यांची शिकवण्याची पद्धत मात्र कठोर होती. सहकाऱ्यांच्या भाषाविषयक आणि अन्य चुका दाखवताना त्यांची जीभ दांडपट्टय़ाच्या वेगाने वार करत असे. मात्र त्यात व्यक्तिगत विखार नसे; बोकील क्षणार्धात समजदार शिक्षकाच्या भूमिकेत शिरत आणि भाषा, व्याकरण, शैली, एखाद्या प्रतिपाद्य विषयावरील त्यांच्याकडील माहितीचा खजिना रिता करत. पत्रकारिता समरसून शिकवण्याच्या त्यांच्या या तळमळीची आठवण त्यांच्यासोबत काम केलेले अनेक सहकारी आजही काढतात. पानाच्या टपरीपासून ते बडय़ा राजकीय धेंडांपर्यंत बोकीलांचा वावर ‘डॉमिनेटिंग’ शैलीत पण सहज असे. अशा बडय़ा धेंडाने बोलताना एखादा तपशील चुकीचा दिला तर त्याला फाडकन सुनावण्यास बोकील कचरत नसत. शेती आणि शेतकरी तसेच, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि मुस्लिमद्वेषाचे धोकादायक वळणावर पोहोचलेले राजकारण हे बोकील यांच्या लेखनाचे, वक्तृत्वाचे मुख्य विषय असत. या विषयांवर त्यांची शैली तडजोडवादी कधीच नव्हती. त्यामुळेच पत्रकार म्हणून त्यांना स्थैर्य प्राप्त झाले नाही आणि आर्थिकदृष्टय़ाही संपन्नता दिली नाही, याबद्दल काहीशी कटुता शांताराम बोकील यांना होती. पण त्यापेक्षा जास्त खंत महाराष्ट्राने त्यांचे प्रतिपादन नीट ऐकले नाही, याची होती आणि त्यापेक्षा किती तरी जास्त पट वैषम्य या देशाने नेहरूवादाची कास सोडल्याचे होते. बोकील सर्वधर्मसहिष्णू धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते. ही धर्मनिरपेक्षता म्हणजे जात निरपेक्षताही आहे आणि नेहरूवाद तसेच यशवंतरावांचे विचार हाच त्याचा आधार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. जातीरहित धर्मनिरपेक्षतेचे स्वप्न साकार होण्याचे समाधान राजकारण्यांनी बोकील यांना लाभू दिले नाही ते नाहीच!

Author