वामन निंबाळकर

निंबाळकर, वामन

‘शिका आणि संघटित व्हा,’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिरोधार्ह मानून तो प्रत्यक्षात आणणाऱ्या पहिल्या पिढीला विद्रोहाचा हुंकार देण्यासाठी एकोणिसाव्या शतकातील साठोत्तरी दशक उजाडले. या पिढीने विद्रोहाचा हुंकार दिला आणि साहित्य-समाजकारण-राजकारण अशा विविध क्षेत्रात मानवतावादी परिवर्तनाच्याही मशाली पेटल्या.

विद्रोहाचे धुमारे प्रज्वलित करणाऱ्या आघाडीवरील गटात वामन निंबाळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बुलढाणा जिल्ह्य़ातील लांजुळ येथे १३ मार्च १९४३ रोजी जन्मलेल्या वामन निंबाळकर नावाची मशाल आंबेडकरी प्रेरणांच्या अदृश्य इंधनावर अखेरच्या क्षणापर्यंत कोणतीही तडजोड न स्वीकारता तेवत राहिली. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात पदव्युत्तर शिक्षण घेता-घेता त्यांच्या गावकुसाबाहेरच्या कवितांनी वेदनेचा आणि विद्रोहाचाही एक वेगळा हुंकार मराठी साहित्यात उमटवला. गावकुसाबाहेरची ती वेदना हा काही व्यक्तिगत अनुभव नव्हता तर ते एक विद्रोहाचे समूहगान होते. जाणिवा पक्व होण्याच्या त्या काळापासून ते परवा, अखेरचा श्वास घेईपर्यंत वामन निंबाळकर तीच वेदना, तोच हुंकार आणि तोच विद्रोह समंजस एकनिष्ठतेने व्यक्त करत राहिले. इतिहास आणि हिंदी या दोन विषयात एम.ए.ची पदवी घेतल्यावर आंबेडकरांची विचारधारा हीच त्यांची जीवननिष्ठा राहिली. याच विषयात त्यांनी एम.ए.ची तिसरी पदवी संपादन केली आणि मराठी कवितेतून घडणाऱ्या आंबेडकर दर्शनावर संशोधन करून पीएच.डी.ची सन्माननीय पदवी संपादन केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आंबेडकर विचारधारा विभागात १३ वर्ष विद्यादान केल्यावर आंबेडकर विचारांचा पूर्णवेळ प्रचारक होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि अखेरच्या श्वासापर्यंत प्रचारकाची ही भूमिका अविरतपणे निभावलीही. प्रचारकाची भूमिका स्वीकारल्यावर त्यांनी कविता टोकदार केली तशीच स्वत:तला समीक्षकही जोपासला. या समीक्षकाने नवोन्मेषाचे अंकुर जोपासण्याची सर्जनशील आणि संवेदनशील भूमिका स्वीकारली. त्यामुळे मराठीत नवे कवी-लेखक मिळाले तसेच, मराठी साहित्यात तोवर अव्यक्त राहिलेल्या वेदनेची वेगवेगळी रूपेही उमटली. समीक्षकाच्या भूमिकेतून ते प्रकाशकाच्याही भूमिकेत शिरले आणि त्यांच्या प्रबोधन प्रकाशनाने अनेकांना प्रसिद्धीचा मार्ग दाखवला. साप्ताहिक ‘आजचे प्रबोधन’ आणि ‘परिचारक’ यातून संपादक म्हणून पत्रकाराचाही रोल निभावला. दिवसेंदिवस आणि वर्षोगणती त्यांच्या कवितेतला अनुभव विराट सामूहिक होत होता.
भारतात प्रत्येक माणसाची
एक जात असते
येथे आग लावणारी
ती हमखास वात असते
सामूहिक स्वप्नभंगाचे विशाल दु:खही ते अशा संयत शब्दात नेमकेपणाने व्यक्त करत होते. निंबाळकरांचे ‘गावकुसाबाहेरच्या कविता’ नंतर ‘धर्मयुद्ध’ आणि ‘वाहत्या जखमांचा प्रदेश’ असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कवितेसोबतच अन्य ठाशीव लेखनही ते अनेक वर्ष सातत्याने करत होते. हे नुसतेच लेखन नव्हते तर त्यातून नवी माहिती देण्याची निंबाळकरांची ओढ कशी तीव्र होती, यासाठी ‘सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. आंबेडकर’ आणि प्रा.म.भि. चिटणीस समग्र वाङ्मयाचा आढावा घेणारा ‘सामाजिक क्रांतीची दिशा’ या दोन ग्रंथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांना बंदिस्त करण्यात आलेल्या जात व धर्माच्या बंधनापलीकडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे होते, हे आंबेडकरांवरील ग्रंथातून पुरेसे स्पष्ट होते. वामन निंबाळकर व्यक्ती न राहता ते एक संस्था झाले होते. मात्र, या संस्थेचे आपण सर्वेसर्वा आहोत, याचा भ्रम न बाळगता मनस्वीपणे वामन निंबाळकर संचार करत राहिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातली या मनस्वी विद्रोहाची एक मशाल विझली आहे.



निंबाळकर, वामन

‘शिका आणि संघटित व्हा,’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिरोधार्ह मानून तो प्रत्यक्षात आणणाऱ्या पहिल्या पिढीला विद्रोहाचा हुंकार देण्यासाठी एकोणिसाव्या शतकातील साठोत्तरी दशक उजाडले. या पिढीने विद्रोहाचा हुंकार दिला आणि साहित्य-समाजकारण-राजकारण अशा विविध क्षेत्रात मानवतावादी परिवर्तनाच्याही मशाली पेटल्या.

विद्रोहाचे धुमारे प्रज्वलित करणाऱ्या आघाडीवरील गटात वामन निंबाळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. बुलढाणा जिल्ह्य़ातील लांजुळ येथे १३ मार्च १९४३ रोजी जन्मलेल्या वामन निंबाळकर नावाची मशाल आंबेडकरी प्रेरणांच्या अदृश्य इंधनावर अखेरच्या क्षणापर्यंत कोणतीही तडजोड न स्वीकारता तेवत राहिली. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात पदव्युत्तर शिक्षण घेता-घेता त्यांच्या गावकुसाबाहेरच्या कवितांनी वेदनेचा आणि विद्रोहाचाही एक वेगळा हुंकार मराठी साहित्यात उमटवला. गावकुसाबाहेरची ती वेदना हा काही व्यक्तिगत अनुभव नव्हता तर ते एक विद्रोहाचे समूहगान होते. जाणिवा पक्व होण्याच्या त्या काळापासून ते परवा, अखेरचा श्वास घेईपर्यंत वामन निंबाळकर तीच वेदना, तोच हुंकार आणि तोच विद्रोह समंजस एकनिष्ठतेने व्यक्त करत राहिले. इतिहास आणि हिंदी या दोन विषयात एम.ए.ची पदवी घेतल्यावर आंबेडकरांची विचारधारा हीच त्यांची जीवननिष्ठा राहिली. याच विषयात त्यांनी एम.ए.ची तिसरी पदवी संपादन केली आणि मराठी कवितेतून घडणाऱ्या आंबेडकर दर्शनावर संशोधन करून पीएच.डी.ची सन्माननीय पदवी संपादन केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात आंबेडकर विचारधारा विभागात १३ वर्ष विद्यादान केल्यावर आंबेडकर विचारांचा पूर्णवेळ प्रचारक होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली आणि अखेरच्या श्वासापर्यंत प्रचारकाची ही भूमिका अविरतपणे निभावलीही. प्रचारकाची भूमिका स्वीकारल्यावर त्यांनी कविता टोकदार केली तशीच स्वत:तला समीक्षकही जोपासला. या समीक्षकाने नवोन्मेषाचे अंकुर जोपासण्याची सर्जनशील आणि संवेदनशील भूमिका स्वीकारली. त्यामुळे मराठीत नवे कवी-लेखक मिळाले तसेच, मराठी साहित्यात तोवर अव्यक्त राहिलेल्या वेदनेची वेगवेगळी रूपेही उमटली. समीक्षकाच्या भूमिकेतून ते प्रकाशकाच्याही भूमिकेत शिरले आणि त्यांच्या प्रबोधन प्रकाशनाने अनेकांना प्रसिद्धीचा मार्ग दाखवला. साप्ताहिक ‘आजचे प्रबोधन’ आणि ‘परिचारक’ यातून संपादक म्हणून पत्रकाराचाही रोल निभावला. दिवसेंदिवस आणि वर्षोगणती त्यांच्या कवितेतला अनुभव विराट सामूहिक होत होता.
भारतात प्रत्येक माणसाची
एक जात असते
येथे आग लावणारी
ती हमखास वात असते
सामूहिक स्वप्नभंगाचे विशाल दु:खही ते अशा संयत शब्दात नेमकेपणाने व्यक्त करत होते. निंबाळकरांचे ‘गावकुसाबाहेरच्या कविता’ नंतर ‘धर्मयुद्ध’ आणि ‘वाहत्या जखमांचा प्रदेश’ असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले. कवितेसोबतच अन्य ठाशीव लेखनही ते अनेक वर्ष सातत्याने करत होते. हे नुसतेच लेखन नव्हते तर त्यातून नवी माहिती देण्याची निंबाळकरांची ओढ कशी तीव्र होती, यासाठी ‘सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. आंबेडकर’ आणि प्रा.म.भि. चिटणीस समग्र वाङ्मयाचा आढावा घेणारा ‘सामाजिक क्रांतीची दिशा’ या दोन ग्रंथांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांना बंदिस्त करण्यात आलेल्या जात व धर्माच्या बंधनापलीकडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसे होते, हे आंबेडकरांवरील ग्रंथातून पुरेसे स्पष्ट होते. वामन निंबाळकर व्यक्ती न राहता ते एक संस्था झाले होते. मात्र, या संस्थेचे आपण सर्वेसर्वा आहोत, याचा भ्रम न बाळगता मनस्वीपणे वामन निंबाळकर संचार करत राहिले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यातली या मनस्वी विद्रोहाची एक मशाल विझली आहे.

Author