मराठी चित्रपटांनी अलीकडे तांत्रिकदृष्टय़ा आणि आशयदृष्टय़ा कात टाकली असली तरी गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटांची प्रतिमा, तंत्राच्या दृष्टीने दरिद्री, अशीच होती. ‘कॅमेरा एकाच ठिकाणी ठेवून चित्रीत करण्यात आलेल्या नाटकांचे स्वरूप,’ बहुतांश मराठी चित्रपटांचे असे, हे नाकारता येत नाही.या आरोपातून मराठी चित्रपटांना ‘मुक्ती’ देण्यासाठी धडपडणारी जी मूठभर माणसे मराठी, चित्रपटसृष्टीत होती त्यात छायाचित्रकार देबू देवधर यांचे नाव महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या चौकटी देखण्या असाव्यात,
त्यांची मांडणी, प्रकाशयोजना यामागे काहीतरी विचार असावा, केवळ प्रसंग चित्रीत करण्याऐवजी, त्या प्रसंगांला, अर्थाला त्या दृश्यांतून उठाव मिळावा आणि एकूण चित्रपटाच्या परिणामात त्याने भर घालावी, यासाठी या सगळ्यांची जाण असलेले छायाचित्रकार आणि दिग्दर्शक असावे लागतात. त्यामुळेच देबू देवधरांना ‘छायालेखक’ हा शब्द फार आवडत असे. ‘छाया-प्रकाशा’च्या मदतीने पडद्यावर चित्र काढणारा अथवा चित्रचौकटींच्या भाषेत आपले लिखाण करणारा तो छायाचित्रकार, अशी व्याख्या देबूदा करीत. त्यांच्या या वैचारिक स्पष्टपणामुळे आणि कलात्मक भूमिकेमुळेच, ‘पाटय़ा टाकू इच्छिणारे’ निर्माते-दिग्दर्शक त्यांच्याकडे येण्याचे टाळत असत आणि मोजक्या परंतु मनाजोगत्या कामावर स्वत: देबूदाही खूश होते, त्यामुळेच तीन दशकांच्या वाटचाली त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकी राहिली. देबूदांचे वडील फोटोग्राफर होते व त्यांच्या स्टुडिओतच देबूदांनी ‘स्थिरचित्रणाचे’ पहिले धडे घेतले. त्यातूनच त्यांना ‘हलत्या चित्रणा’चे अर्थात मुव्ही कॅमेऱ्याचे आकर्षण निर्माण झाले व पुढे त्यांनी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये छायाचित्रणाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. या संस्थेतून तांत्रिक पदवी मिळविणाऱ्या बहुसंख्य तंत्रज्ञांचा व्यावसायिक चित्रपटांमधील तंत्रज्ञांकडे, प्रशिक्षण न घेता केवळ अनुभवाच्या शिदोरीवर या क्षेत्रात येणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असतो, देबूदा हे त्याला अपवाद होते. प्रशिक्षण हा केवळ पाया असतो, अनुभवातून येणारे शहाणपण कलेच्या क्षेत्रात फार महत्त्वाचे असते, याची जाण त्यांच्या वागण्या-बोलण्यात सतत असे. चित्रपटांसोबत दूरचित्रवाणी क्षेत्रातही ‘कॅमेरामन’ म्हणून काम करताना त्यांनी त्या क्षेत्राची गरज ओळखून आपल्या तंत्रात सहज बदल केला. अर्थात तिथेही त्या माध्यमाकडे गंभीरपणे पाहणाऱ्या जाणत्या लोकांसोबतच काम करण्याचे व्रत त्यांनी कसोशीने पाळले आणि त्या माध्यमाला कमी लेखण्याची वृत्तीही कधी दाखवली नाही. १९७८ च्या सुमारास ते छायालेखक ए. के. बीर यांच्याकडे साहाय्यक म्हणून रुजू झाले, चित्रपट होता ‘दूरियाँ’ (दिग्दर्शक भीमसेन यांचा हा सुंदर चित्रपट, संगीतकार जयदेव यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे’ अशा गाण्यांमुळे अविस्मरणीय ठरला.) त्यानंतर स्वतंत्रपणे छायाचित्रकार म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘नागीण’ (मराठी) परंतु देबूदांच्या वेगळेपणाची पहिली मुद्रा उमटली ती अमोल पालेकर दिग्दर्शित, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या ‘आक्रित’ या चित्रपटामुळे. त्या काळी गाजलेल्या मानवत खून खटल्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या एकूण ‘डार्क मूड’ला अधिक उठाव देणारे, त्यातील व्यक्तिरेखांच्या मनोव्यापारांना, कृतींना अधिक गहिरे करणारे छायाचित्रण देबूदांनी केले होते. ‘आक्रित’ने एक चित्रपट म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण कलात्मकतेचा, नव्या सिनेमाचा स्पर्श दिला आणि छायाचित्रणाचा नवा विचारही दिला. देबू देवधर त्याच्या केंद्रस्थानी होते. जानेमाने, ज्येष्ठ छायाचित्रकार गिरीश कर्वे यांनी देबूदांच्या चित्रणाचे मर्म त्यांच्या ‘डाक्युमेण्ट्री स्टाइल’मध्ये आहे, असे म्हटले आहे. म्हणजे वास्तवाचा वेध घेणारे छायाचित्रण ही त्यांची खासियत होती, असे त्यांना म्हणावयाचे आहे. त्यांची पत्नी श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरकारनामा’ या चित्रपटाची, त्याच्या बजेटची खूप चर्चा झाली. देबूदांनी या चित्रपटाद्वारे ‘डिजिटली शूट’ केलेल्या दृश्यांचा, अर्थात आधुनिकतेच्या आणखी एका अंगाचा मराठीला परिचय करून दिला. त्यांनी मुख्य धारेतील हिंदी चित्रपटही केले, उदाहरणार्थ सचिन यांनी सुभाष घईंसाठी दिग्दर्शित केलेला ‘प्रेम दिवाने,’ श्रावणी देवधरांचा ‘सिलसिला है प्यार का’ परंतु जिथं नृत्यदिग्दर्शक, फाइट मास्टर पन्नास टक्के चित्रपट करतात तिथं छायाचित्रणाला कितीसा ‘स्कोप’ असेल, असे ते म्हणत. त्या त्या प्रसंगांची प्रकाशयोजना अर्थात ‘लाइटिंग’ करण्यात छायाचित्रकाराचे कसब असते. अनेकदा नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एखादा ‘स्पॉट’ कॅमेऱ्यातून पडद्यावर येतो तेव्हा खूपच वेगळा, अपरिचित वाटतो. ती किमया छायाचित्रकाराची असते. ‘लाइटिंग’ हे देबूदांचे एक खास वैशिष्टय़ होते. चित्रपट जेव्हा एका दृश्याकडून दुसऱ्या दृष्याकडे सरकतो तेव्हा ‘जर्क’ जाणवू नये, ‘जोडकाम’ दिसू नये यालाच चित्रपटाच्या भाषेत ‘स्मूथ मुव्हमेण्ट’ म्हणतात, त्यात देबूदा ‘दादा’ होते. प्रेक्षकांनी कॅमेऱ्याने चित्रपट पाहू नये तर त्यांचे डोळेच ‘कॅमेरा’ व्हायला हवेत. त्यांना कॅमेऱ्याचे अस्तित्वच जाणवू नये हे छायाचित्रकाराचे खरे कसब असते याचा वस्तुपाठ देबू देवधरांच्या चित्रपटांमधून अनेकदा येतो. त्यामुळेच त्यांचे अनेक चित्रपट हे, तो चित्रपट आवडो न आवडो देबूदांच्या कामगिरीमुळे डोळ्यांना ते मेजवानी देत. अर्थात पटकथा, दिग्दर्शक, विषय, निर्मिती संस्था, माणसे हे सगळे पारखूनच देबूदांनी बहुतेक चित्रपट केले. त्यांनी अखेरचे चित्रीकरण केले ते ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ची वाटचाल सांगणाऱ्या माहितीपटाचे. सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या व रघुवीर कूल यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाचे चित्रीकरण संपले त्याच दिवशी देबूदांना प्रथम पाठीचे दुखणे जाणवले. त्यानंतरच्या १० महिन्यांत दुखणे विकोपाला गेले आणि देबूदांची ‘छाया’ ‘प्रकाशात’ विलीन झाली!
देवधर, देबू
मराठी चित्रपटांनी अलीकडे तांत्रिकदृष्टय़ा आणि आशयदृष्टय़ा कात टाकली असली तरी गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटांची प्रतिमा, तंत्राच्या दृष्टीने दरिद्री, अशीच होती. ‘कॅमेरा एकाच ठिकाणी ठेवून चित्रीत करण्यात आलेल्या नाटकांचे स्वरूप,’ बहुतांश मराठी चित्रपटांचे असे, हे नाकारता येत नाही.या आरोपातून मराठी चित्रपटांना ‘मुक्ती’ देण्यासाठी धडपडणारी जी मूठभर माणसे मराठी, चित्रपटसृष्टीत होती त्यात छायाचित्रकार देबू देवधर यांचे नाव महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या चौकटी देखण्या असाव्यात,
त्यांची मांडणी, प्रकाशयोजना यामागे काहीतरी विचार असावा, केवळ प्रसंग चित्रीत करण्याऐवजी, त्या प्रसंगांला, अर्थाला त्या दृश्यांतून उठाव मिळावा आणि एकूण चित्रपटाच्या परिणामात त्याने भर घालावी, यासाठी या सगळ्यांची जाण असलेले छायाचित्रकार आणि दिग्दर्शक असावे लागतात. त्यामुळेच देबू देवधरांना ‘छायालेखक’ हा शब्द फार आवडत असे. ‘छाया-प्रकाशा’च्या मदतीने पडद्यावर चित्र काढणारा अथवा चित्रचौकटींच्या भाषेत आपले लिखाण करणारा तो छायाचित्रकार, अशी व्याख्या देबूदा करीत. त्यांच्या या वैचारिक स्पष्टपणामुळे आणि कलात्मक भूमिकेमुळेच, ‘पाटय़ा टाकू इच्छिणारे’ निर्माते-दिग्दर्शक त्यांच्याकडे येण्याचे टाळत असत आणि मोजक्या परंतु मनाजोगत्या कामावर स्वत: देबूदाही खूश होते, त्यामुळेच तीन दशकांच्या वाटचाली त्यांच्या चित्रपटांची संख्या मोजकी राहिली. देबूदांचे वडील फोटोग्राफर होते व त्यांच्या स्टुडिओतच देबूदांनी ‘स्थिरचित्रणाचे’ पहिले धडे घेतले. त्यातूनच त्यांना ‘हलत्या चित्रणा’चे अर्थात मुव्ही कॅमेऱ्याचे आकर्षण निर्माण झाले व पुढे त्यांनी फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये छायाचित्रणाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. या संस्थेतून तांत्रिक पदवी मिळविणाऱ्या बहुसंख्य तंत्रज्ञांचा व्यावसायिक चित्रपटांमधील तंत्रज्ञांकडे, प्रशिक्षण न घेता केवळ अनुभवाच्या शिदोरीवर या क्षेत्रात येणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असतो, देबूदा हे त्याला अपवाद होते. प्रशिक्षण हा केवळ पाया असतो, अनुभवातून येणारे शहाणपण कलेच्या क्षेत्रात फार महत्त्वाचे असते, याची जाण त्यांच्या वागण्या-बोलण्यात सतत असे. चित्रपटांसोबत दूरचित्रवाणी क्षेत्रातही ‘कॅमेरामन’ म्हणून काम करताना त्यांनी त्या क्षेत्राची गरज ओळखून आपल्या तंत्रात सहज बदल केला. अर्थात तिथेही त्या माध्यमाकडे गंभीरपणे पाहणाऱ्या जाणत्या लोकांसोबतच काम करण्याचे व्रत त्यांनी कसोशीने पाळले आणि त्या माध्यमाला कमी लेखण्याची वृत्तीही कधी दाखवली नाही. १९७८ च्या सुमारास ते छायालेखक ए. के. बीर यांच्याकडे साहाय्यक म्हणून रुजू झाले, चित्रपट होता ‘दूरियाँ’ (दिग्दर्शक भीमसेन यांचा हा सुंदर चित्रपट, संगीतकार जयदेव यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘मेरे घर आना जिंदगी’, ‘जिंदगी में जब तुम्हारे गम नही थे’ अशा गाण्यांमुळे अविस्मरणीय ठरला.) त्यानंतर स्वतंत्रपणे छायाचित्रकार म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘नागीण’ (मराठी) परंतु देबूदांच्या वेगळेपणाची पहिली मुद्रा उमटली ती अमोल पालेकर दिग्दर्शित, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या ‘आक्रित’ या चित्रपटामुळे. त्या काळी गाजलेल्या मानवत खून खटल्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या एकूण ‘डार्क मूड’ला अधिक उठाव देणारे, त्यातील व्यक्तिरेखांच्या मनोव्यापारांना, कृतींना अधिक गहिरे करणारे छायाचित्रण देबूदांनी केले होते. ‘आक्रित’ने एक चित्रपट म्हणून मराठी चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण कलात्मकतेचा, नव्या सिनेमाचा स्पर्श दिला आणि छायाचित्रणाचा नवा विचारही दिला. देबू देवधर त्याच्या केंद्रस्थानी होते. जानेमाने, ज्येष्ठ छायाचित्रकार गिरीश कर्वे यांनी देबूदांच्या चित्रणाचे मर्म त्यांच्या ‘डाक्युमेण्ट्री स्टाइल’मध्ये आहे, असे म्हटले आहे. म्हणजे वास्तवाचा वेध घेणारे छायाचित्रण ही त्यांची खासियत होती, असे त्यांना म्हणावयाचे आहे. त्यांची पत्नी श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सरकारनामा’ या चित्रपटाची, त्याच्या बजेटची खूप चर्चा झाली. देबूदांनी या चित्रपटाद्वारे ‘डिजिटली शूट’ केलेल्या दृश्यांचा, अर्थात आधुनिकतेच्या आणखी एका अंगाचा मराठीला परिचय करून दिला. त्यांनी मुख्य धारेतील हिंदी चित्रपटही केले, उदाहरणार्थ सचिन यांनी सुभाष घईंसाठी दिग्दर्शित केलेला ‘प्रेम दिवाने,’ श्रावणी देवधरांचा ‘सिलसिला है प्यार का’ परंतु जिथं नृत्यदिग्दर्शक, फाइट मास्टर पन्नास टक्के चित्रपट करतात तिथं छायाचित्रणाला कितीसा ‘स्कोप’ असेल, असे ते म्हणत. त्या त्या प्रसंगांची प्रकाशयोजना अर्थात ‘लाइटिंग’ करण्यात छायाचित्रकाराचे कसब असते. अनेकदा नुसत्या डोळ्यांनी दिसणारा एखादा ‘स्पॉट’ कॅमेऱ्यातून पडद्यावर येतो तेव्हा खूपच वेगळा, अपरिचित वाटतो. ती किमया छायाचित्रकाराची असते. ‘लाइटिंग’ हे देबूदांचे एक खास वैशिष्टय़ होते. चित्रपट जेव्हा एका दृश्याकडून दुसऱ्या दृष्याकडे सरकतो तेव्हा ‘जर्क’ जाणवू नये, ‘जोडकाम’ दिसू नये यालाच चित्रपटाच्या भाषेत ‘स्मूथ मुव्हमेण्ट’ म्हणतात, त्यात देबूदा ‘दादा’ होते. प्रेक्षकांनी कॅमेऱ्याने चित्रपट पाहू नये तर त्यांचे डोळेच ‘कॅमेरा’ व्हायला हवेत. त्यांना कॅमेऱ्याचे अस्तित्वच जाणवू नये हे छायाचित्रकाराचे खरे कसब असते याचा वस्तुपाठ देबू देवधरांच्या चित्रपटांमधून अनेकदा येतो. त्यामुळेच त्यांचे अनेक चित्रपट हे, तो चित्रपट आवडो न आवडो देबूदांच्या कामगिरीमुळे डोळ्यांना ते मेजवानी देत. अर्थात पटकथा, दिग्दर्शक, विषय, निर्मिती संस्था, माणसे हे सगळे पारखूनच देबूदांनी बहुतेक चित्रपट केले. त्यांनी अखेरचे चित्रीकरण केले ते ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ची वाटचाल सांगणाऱ्या माहितीपटाचे. सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या व रघुवीर कूल यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाचे चित्रीकरण संपले त्याच दिवशी देबूदांना प्रथम पाठीचे दुखणे जाणवले. त्यानंतरच्या १० महिन्यांत दुखणे विकोपाला गेले आणि देबूदांची ‘छाया’ ‘प्रकाशात’ विलीन झाली!