दीपस्तंभ, रातराणी, पांडगो इलो रे, आसू आणि हसू, रमले मी अशी विविध विषयांवरील उत्कृष्ट नाटके देणारे प्रख्यात ज्येष्ठ नाटककार प्र.ल.मयेकर यांनी ‘बेस्ट’मध्ये नोकरीला असतानाच लेखनाला सुरुवात केली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९४६ रोजी झाला.
जगन हं’, ‘आद्यंत इतिहास’ ही फँटसीच्या अंगाने जाणारी, काल्पनिक प्रदेशातील रुपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये गाजली होती. कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके त्यांनी लिहिली.
नाटकाविषयी आवड, तळमळ जपणा-या तरुणांना ते स्वत: मार्गदर्शन करत असत.
प्र.ल.मयेकर यांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे मराठी भाषेवरचे प्रेम! भाषेच्या शुद्धतेचा आग्रह नेहमीच त्यांच्या बोलण्यातून, लेखनातून उमटायचा. भाषा शुद्ध बोलली, लिहिली जात नसल्याबद्दल ते अनेकदा खंत व्यक्त करायचे. आपल्या लेखनातून ती मांडायचे. मराठी भाषेचे उत्तम जाणकार असल्याने दूषित होत चाललेल्या भाषेचा सल त्यांच्या मनात होता.
कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशा सर्व प्रकारची नाटके प्र. ल. नी लिहिली.
रातराणी, सवाल अंधाराचा, रानभूल, तो परत आलाय, काळोखाच्या सावल्या, केला तुका न झाला माका, सुखा सैलाब, श्रीयुत नामदेव म्हणे, पांडगो इलो रे बा इलो, अंदमान, तक्षकयाग, रमले मी, आसू आणि हसू, अब्द शब्द, शांत-श्रांत, घोस्ट यासारखी अनेक रसांनी परिपूर्ण अशी अनेक नाटके त्यांनी मराठी रंगभूमीला दिली.
‘मसीहा’ या त्यांच्या कादंबरीवरून त्याच नावाचे नाटकही उदय कला केंद्राने रंगभूमीवर आणले होते. आय कन्फेस, रोप ट्रिक यांसारख्या १३ एकांकिका त्यांनी लिहिल्या.
मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले.
प्र.ल.मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला. प्र.ल.मयेकर यांचे १८ ऑगस्ट २०१५ रोजी निधन झाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. https://www.marathisrushti.com/articles/pra-la-mayekar/