(प्रा.) ल. ना गोखले

गोखले, (प्रा.) ल. ना.

लक्ष्मण नारायण गोखले हे नाव पत्रकार ही त्यांची ओळख दिली जाईल. ते पत्रकार होते, पण पत्रकारांचे ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक मित्र होते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते दीपस्तंभ होते. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते पहिले उत्तम संयोजक होते. ‘ल.ना.’ अशी आद्याक्षरे उच्चारली तर त्यापुढे केवळ गोखले हेच नाव येते ते यामुळेच. ही आद्याक्षरे त्यांच्या त्या आडनावाशी एकरूप झाली होती आणि ती त्यांचा व्यासंग सांगायला पुरेशी होती. ल.ना. सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे झाली, पण तरीही त्यांना सर्व घडामोडी इत्यंभूत माहित असायच्या. पत्रकारितेतही रोजच काही ना काही घडत असते.

कुणी त्याकडे लक्ष देते, कुणी देत नाही. ‘लनां’ना आपल्याकडून ती सांगितली जाईपर्यंत ती त्यांना मिळालेली असे. ल.ना. हे त्याही अर्थाने ज्ञानकोशच होते. कोणत्या वृत्तपत्रात काय आले आहे आणि काय हवे होते ते ल.ना. अचूकपणे सांगू शकायचे! वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी मराठी भाषा बिघडत चालली आहे, अशी तक्रार अनेकजण करतात, पण कोणी त्यावर उपाय सांगत नाही. ल.ना. म्हणायचे, ‘तुम्हाला वाटले तर मला सांगा, मी एखादा तास घेऊन काय चुकते ते सांगू शकेन.’ अर्थात, यामागे चुका दाखवून देण्यापेक्षा त्या पुन्हा केल्या जाऊ नयेत, हा दृष्टिकोन होता. ‘पत्रकारांसाठी मराठी’ या पुस्तकाचा जन्मही त्यांच्या अशाच आग्रहातून झाला. या पुस्तकातही लिहिताना त्यांनी संपूर्ण वर्षभराचे अंक समोर ठेवून कोणत्या वृत्तपत्राने कोणता शब्दप्रयोग केला आहे, तेही तपासून पाहिले होते. काही वेळा तर अनर्थ होईल, असेही शब्दप्रयोग केले गेल्याचे त्यांना आढळले. या चुका दाखवताना एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी सोपी मांडणी केली आहे. पत्रकारांना भाषा शिकवायचा उद्देश त्यामागे नक्कीच नव्हता, तर पत्रकारांनी सुबोध मराठीचा वापर करून वाचकांना चुकीच्या मराठीपासून वाचवावे, ही त्यामागे असणारी दृष्टी होती. त्यांचा त्यासाठी आग्रह होता, पण तो अनाठायी नक्कीच नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये कोठे काय आले आहे आणि त्यामागे काय भूमिका असू शकते, याचे नेमके ज्ञान त्यांना होते. इंग्रजी किंवा हिंदी वृत्तपत्रे मराठीचा वापर करतात का, तर नाही. मग आपण त्यांच्या त्या शब्दांची उसनेगिरी का करायची, असा त्यांचा साधा सवाल असे. फलटणच्या मुधोजी प्रशालेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली तरी पत्रकारितेची उपजत वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. ते पुण्यात आले आणि ‘काळ’, ‘त्रिकाळ’ या वृत्तपत्रांनंतर ‘केसरी’मध्ये दाखल झाले. ‘केसरी’त त्यांनी काही काळ ‘वाट्टेल ते’ या नावाचे सदर लेखनही केले, ज्याचे पुढे पुस्तकही झाले. त्या काळात पत्रकारांचे आर्थिक जीवनमान फार चांगले नसले तरी जे होते त्यात समाधान मानणारे ते होते. पुणे विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरू करायचे ठरवल्यानंतर ते त्या विभागाचे प्रमुख बनले. अतिशय विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणूनही ते ओळखले गेले. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठात ‘संदेश’कार कोल्हटकर शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती, पण पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई पाहून त्यांनी साऱ्या विद्यापीठाला हलवून सोडले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या बैठकींमध्ये कधी वादावादी झालीच तर तिथे एकच व्यक्ती अशी असे, की जी त्या सर्व वादावर पडदा टाकून पुढे जाणे श्रेयस्कर मानत असे. ते अर्थातच ल.ना. होते. जयंतराव टिळक, भा. गो. बापट, प्र. ल. गावडे, द. मा. मिरासदार, दा. सी. देसाई, मा. वि. साने आदींबरोबर त्यांनी काम केले. बाहेरच्या अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. पत्रकारितेबाहेर शिक्षण क्षेत्रात काम करतानाही त्यांनी पत्रकारांबरोबरचा संवाद तोडला नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थिवर्गाचे पत्ते आणि त्यांचे काम करण्याचे ठिकाण यांचीही हमखास माहिती त्यांच्याकडेच मिळत असे. संगणकयुग अवतरायचे होते, त्या काळात त्यांच्याकडे जमा होणारी ही माहितीही थक्क करून सोडणारी असे. त्याचा अनाठायी अभिमान बाळगणे हेही त्यांच्या गावी नव्हते. अलीकडे ते एका पुस्तकाच्या लेखनात गुंतले होते, त्याचे काम चालू होते, तोपर्यंत त्यांच्या तब्येतीने उमेद बाळगली होती. पुस्तकाचे काम संपत आले तेव्हा त्यांनी पडद्याआड जायचे ठरवले होते की काय, हे न कळे, पण झाले तरी तसेच! त्यांच्या निधनाने मात्र एका अतिशय चिकित्सक वृत्तीच्या सुसंस्कृत पत्रकारास आपण मुकलो आहोत.



गोखले, (प्रा.) ल. ना.

लक्ष्मण नारायण गोखले हे नाव पत्रकार ही त्यांची ओळख दिली जाईल. ते पत्रकार होते, पण पत्रकारांचे ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक मित्र होते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते दीपस्तंभ होते. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते पहिले उत्तम संयोजक होते. ‘ल.ना.’ अशी आद्याक्षरे उच्चारली तर त्यापुढे केवळ गोखले हेच नाव येते ते यामुळेच. ही आद्याक्षरे त्यांच्या त्या आडनावाशी एकरूप झाली होती आणि ती त्यांचा व्यासंग सांगायला पुरेशी होती. ल.ना. सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे झाली, पण तरीही त्यांना सर्व घडामोडी इत्यंभूत माहित असायच्या. पत्रकारितेतही रोजच काही ना काही घडत असते.

कुणी त्याकडे लक्ष देते, कुणी देत नाही. ‘लनां’ना आपल्याकडून ती सांगितली जाईपर्यंत ती त्यांना मिळालेली असे. ल.ना. हे त्याही अर्थाने ज्ञानकोशच होते. कोणत्या वृत्तपत्रात काय आले आहे आणि काय हवे होते ते ल.ना. अचूकपणे सांगू शकायचे! वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी मराठी भाषा बिघडत चालली आहे, अशी तक्रार अनेकजण करतात, पण कोणी त्यावर उपाय सांगत नाही. ल.ना. म्हणायचे, ‘तुम्हाला वाटले तर मला सांगा, मी एखादा तास घेऊन काय चुकते ते सांगू शकेन.’ अर्थात, यामागे चुका दाखवून देण्यापेक्षा त्या पुन्हा केल्या जाऊ नयेत, हा दृष्टिकोन होता. ‘पत्रकारांसाठी मराठी’ या पुस्तकाचा जन्मही त्यांच्या अशाच आग्रहातून झाला. या पुस्तकातही लिहिताना त्यांनी संपूर्ण वर्षभराचे अंक समोर ठेवून कोणत्या वृत्तपत्राने कोणता शब्दप्रयोग केला आहे, तेही तपासून पाहिले होते. काही वेळा तर अनर्थ होईल, असेही शब्दप्रयोग केले गेल्याचे त्यांना आढळले. या चुका दाखवताना एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी सोपी मांडणी केली आहे. पत्रकारांना भाषा शिकवायचा उद्देश त्यामागे नक्कीच नव्हता, तर पत्रकारांनी सुबोध मराठीचा वापर करून वाचकांना चुकीच्या मराठीपासून वाचवावे, ही त्यामागे असणारी दृष्टी होती. त्यांचा त्यासाठी आग्रह होता, पण तो अनाठायी नक्कीच नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये कोठे काय आले आहे आणि त्यामागे काय भूमिका असू शकते, याचे नेमके ज्ञान त्यांना होते. इंग्रजी किंवा हिंदी वृत्तपत्रे मराठीचा वापर करतात का, तर नाही. मग आपण त्यांच्या त्या शब्दांची उसनेगिरी का करायची, असा त्यांचा साधा सवाल असे. फलटणच्या मुधोजी प्रशालेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली तरी पत्रकारितेची उपजत वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. ते पुण्यात आले आणि ‘काळ’, ‘त्रिकाळ’ या वृत्तपत्रांनंतर ‘केसरी’मध्ये दाखल झाले. ‘केसरी’त त्यांनी काही काळ ‘वाट्टेल ते’ या नावाचे सदर लेखनही केले, ज्याचे पुढे पुस्तकही झाले. त्या काळात पत्रकारांचे आर्थिक जीवनमान फार चांगले नसले तरी जे होते त्यात समाधान मानणारे ते होते. पुणे विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरू करायचे ठरवल्यानंतर ते त्या विभागाचे प्रमुख बनले. अतिशय विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणूनही ते ओळखले गेले. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठात ‘संदेश’कार कोल्हटकर शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती, पण पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई पाहून त्यांनी साऱ्या विद्यापीठाला हलवून सोडले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या बैठकींमध्ये कधी वादावादी झालीच तर तिथे एकच व्यक्ती अशी असे, की जी त्या सर्व वादावर पडदा टाकून पुढे जाणे श्रेयस्कर मानत असे. ते अर्थातच ल.ना. होते. जयंतराव टिळक, भा. गो. बापट, प्र. ल. गावडे, द. मा. मिरासदार, दा. सी. देसाई, मा. वि. साने आदींबरोबर त्यांनी काम केले. बाहेरच्या अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. पत्रकारितेबाहेर शिक्षण क्षेत्रात काम करतानाही त्यांनी पत्रकारांबरोबरचा संवाद तोडला नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थिवर्गाचे पत्ते आणि त्यांचे काम करण्याचे ठिकाण यांचीही हमखास माहिती त्यांच्याकडेच मिळत असे. संगणकयुग अवतरायचे होते, त्या काळात त्यांच्याकडे जमा होणारी ही माहितीही थक्क करून सोडणारी असे. त्याचा अनाठायी अभिमान बाळगणे हेही त्यांच्या गावी नव्हते. अलीकडे ते एका पुस्तकाच्या लेखनात गुंतले होते, त्याचे काम चालू होते, तोपर्यंत त्यांच्या तब्येतीने उमेद बाळगली होती. पुस्तकाचे काम संपत आले तेव्हा त्यांनी पडद्याआड जायचे ठरवले होते की काय, हे न कळे, पण झाले तरी तसेच! त्यांच्या निधनाने मात्र एका अतिशय चिकित्सक वृत्तीच्या सुसंस्कृत पत्रकारास आपण मुकलो आहोत.

Author