“पूर्वी म्हणजे दृकश्राव्य माध्यमाचा उदय होईपर्यंत केवळ आकाशवाणी हा एकमेव मनोरंजनाचा पर्याय श्रोत्यांसाठी उपलब्ध होता, करमणूकी सोबतच ज्ञान तसंच प्रबोधन होत असल्यामुळे त्याकाळी अनेक कार्यक्रम गाजले, आणि आजही त्या कार्यक्रमांची लोकप्रियता टिकून आहे ते केवळ सर्वसमावेशक विषयांमुळे; आणि ज्यावेळी आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रमांचा आपण विचार करतो तेव्हा एक नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे “वनिता मंडळ” मुंबई केंद्रावरुन अर्ध्या शतकाहून अधिक काळ प्रसारित होणार्या या कार्यक्रमांचं स्वरुप कालपरत्वे बदलत राहिलं, ते फक्त श्रोत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच वनिता मंडळ कार्यक्रमाच्या सद्यस्थिती व होणार्या बदलांविषयीचा उहापोह या कार्यक्रमाच्या प्रमुख उमा दिक्षित यांनी मराठीसृष्टी.कॉम ला दिलेल्या खास मुलाखतीत केला…”
“वनिता मंडळ” कार्यक्रमाची सुरुवात झाली तिच मुळात स्त्री वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन, त्याची उदघोषणा सुद्धा “महिलांसाठी सादर होतोय कार्यक्रम वनिता मंडळ” अशी असायची पण आजमितीला हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी न राहता तो संपूर्ण कुटुंबासाठी, परिवारातल्या प्रत्येक सदस्याला आपला वाटावा असं व्यापक स्वरुप त्याला प्राप्त करुन दिलेलं आहे; अर्थात यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणार्या महिला आमच्या कार्यक्रमातून सहभागी होत असतातच त्याशिवाय चालू घडामोडींविषयी, आरोग्याविषयी, लहान मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने, तसंच मनोरंजन क्षेत्रातल्या कलाकारांच्या स्मृतींना दिलेला उजाळा असेल किंवा कौटुंबिक श्रुतिकेतून ही, श्रोत्यांना नवीन विषयांसह बोधता मिळेल यासाठी आमचा प्रयत्न राहिला आहे.” असं उमा दिक्षित सांगतात; त्याचबरोबर बदलत्या जीवनशैलीप्रमाणे स्त्रीयांचे व कुटुंबाचे मानसिक ताणतणाव, कामाचं नियोजन, व्यस्त दिनचर्या सारखे विषय आम्ही तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन करत आहोत; तसंच तळागळातील महिलांचे प्रश्न, आणि समस्या अप्रकाशित पण समाजासाठी भरीव कामगिरी करणार्या व्यक्तींच्या मुलाखती सुद्धा या कार्यक्रमातनं प्रसारित होतात. अर्थात आकाशवाणीच्या धोरणांप्रमाणे सर्व स्तरातील व्यक्तींना व्यासपीठ मिळावं हे कटाक्षानं पाळलं आहे. अगदी कचरा वेचणारी महिला किंवा वाङ्मय रचणारी गृहिणी असेल या सर्वांना आमच्या कार्यक्रमातनं सहभागी करण्याचा प्रयत्न राहिला आहे व इथुन पुढे ही तो होत राहिल, अशी भूमिका ही त्या व्यक्त करतात.
स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातून तसंच त्यांच्या कर्तृत्वाला उभारी देण्यासाठी “गाथा स्त्री शक्तीची”, “मंत्र जगण्याचा” सारख्या मालिका ही प्रसारित झाल्या आहेत, हा उद्देश वेळोवेळी आमच्याकडून एक जबाबदार प्रसार माध्यम म्हणूनकेला जात असला तरीपण, आमची भूमिका ही समानतेकडे वाटचाल अशा पद्धतीचीच आहे,” असं ही उमा दीक्षित नमूद करतात.
एकीकडे श्राव्य माध्यमांचा झपाट्यानं विस्तार होत असताना, त्यातही “कमर्शियल अॅसपेक्ट” डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रमाची रचना आखताना, ज्ञान-प्रबोधन हे पैलू जवळपास हद्दपार झाले असं जरी वाटत असलं तरीपण सरकारी वाहिन्यांनी अजुनतरी आपली “आयडॉलॉजी” कायम राखत, “समाजाच्या सशक्तीकरणासाठीच आहोत”, हे दाखवून दिले आहे. कादाचित वनिता मंडळाच्या यशाचं आणि श्रोत्यांच्या मनात आज ही अढळ स्थान असण्याचं हेच कारण असावं.
— सागर मालाडकर