जगात भाषाच नसती तर?
भाषेशिवाय जगाची कल्पनाच होऊ शकत नाही. माणसाला भाषा अवगत नसती तर माणसात आणि जनावरात फरकच उरला नसता… माणुस ह्या प्राण्याने भाषेची निर्मिती केली.. पण माणुस जातीच्या आत्तापर्यंतच्या टप्प्यात बर्याच भाषा त्या पिढी बरोबर, त्या माणसांबरोबर मृत पावल्या..
आता हेच बघा ना. आपल्या इथे संस्कृत भाषा पुरातन भाषा आहे असा समज आहे. पण अभ्यासकांच्या मते संस्कृतच्याही पेक्षा पुरातन भाषा आहे पण त्या भाषेचे ज्ञान कोणासही अवगत नाही.. त्यामुळेच तर आपल्या इथल्या पाली, अर्धमागधी भाषा लोप पावत गेल्या आणि अभ्यास करण्यापुरत्याच मर्यादित राहिल्या..
अर्थात या सगळ्याला माणूसच जबाबदार आहे.
आजच्या घडीला जगात ६ हजार ९१२ भाषा अवगत असाल्याचे म्हटले जाते. त्यापैकी ५१६ भाषा मृत झाल्यात जमा आहेत.
पण मानवाच्या हे लक्षात येत नाही की या भाषाच फक्त मृत होत नाहीत तर त्या सोबत त्या भाषेचा इतिहास, तिची संस्कृती, साहित्य, सारं काही त्या भाषेबरोबर मृत होतं…
त्यामुळे या पुढे प्रत्येकाचीच जबाबदारी आहे की त्याने इंग्रजी व इतर नव्या भाषा शिकता शिकता किमान स्वत:ची मातृभाषा तरी जोपासावी.. जेणेकरून त्यामुळे आपण या भाषांच्या संस्कारांचा, संस्कृतीचा ठेवा आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकू.
— स्नेहा जैन