दोन आण्याची मोड

जवळ जवळ ८० वर्षापूर्वी आचार्य अत्रे यांनी लिहीलेली ही कविता आजही लागू आहे



जवळ जवळ ८० वर्षापूर्वी आचार्य अत्रे यांनी लिहीलेली ही कविता आजही लागू आहे

दे रे हरि, दे रे हरि,
दोन आण्याची मोड!
मोडीसाठी भटकुन आले
तळपायाला फोड ॥ध्रु०॥

काडि मिळेना, विडी मिळेना,
इतर गोष्ट तर सोड!
मीठही नाही, पीठहि नाही,
मिळे न काही गोड!

पै पैशाचे धंदे बसले,
झाली कुतरेओढ!
‘मोड नाही,’ चे जेथे तेथे

दुकानावरी बोर्ड!
ट्रँम गाडितहि मोड न म्हणुनी,
करितो तंगडतोड!
कुणी ‘कूपने’ घेउनि काढी
नोटांवरती तोड!

मोडीवाचुनि ‘धर्म’ थांबला,
भिकारी झाले रोड!
दिडकि कशी तुज देऊ देवा,
प्रश्न पडे बिनतोड!

श्रीमंतांचे कोड पुरवुनी
मोडिशि अमुची खोड!
पाड दयाळा, खुर्द्याची रे
आता पाऊसझोड!

~ केशवकुमार
(झेंडूंची फुले, आचार्य अत्रे)

Author