विसरून साऱ्या ताणतणावां ,देवा तुझ्या कुशीत यावे,
करून निश्चिंत आपुल्या मनां, वरूनच पृथ्वीला बघावे,--!!!
कलंदर वावरणाऱ्या ढगां,
सोबत घेत दूरवर हिंडावे,
चहूकडे अन् चहूदिशांना,
आनंदाने गात फिरावे,--!!!
ताऱ्यांसवे फेर धरतां,
गगनाला मुठीत घ्यावे,
पिऊन आधी रजतकणां,
धरणीकडे अभिमानें बघावे,--!!!
नकोत भय भीती चिंता,
विद्युतलतेसह हिंडावे,
कुणी कुठे दहशत माजवतां, लख्खकन कसे चमकून उठावे,-!
पाहण्या सूर्य चंद्राला,
मेघांच्या मऊ दुलईत शिरावे,
पिट पिट करती जेव्हा पापण्या, प्रखर तेजाने भानही विसरावे,--!
वार्याबरोबर दाही दिशा, आपणही सुसाट सुटावे ,
झुगारत सगळ्याच बंधना,
अतुल वेगे मस्त फिरावे,--!!!
वादळासह पृथ्वीवर फेरा,
मनमुराद जिकडेतिकडे घुसावे भयकंपित करत साऱ्या जनां, दराऱ्यात कसे बांधून ठेवावे,
हिरवा गार पसरला गालिचा, नभातून विहंगम दृश्य दिसावे
शक्य तेवढे वसुंधरेला,
वरून प्रदूषणमुक्त करावे,--!!!
© हिमगौरी कर्वे
दु:खे आणि वेदना,
जीवना,तुझे दुसरे नाव,
माणूस हरून जातो,
जेव्हा घेतसे तुझा ठांव,
आपुले परके होती,
परके म्हणती आपुले,
या सगळ्यात सारखे,
भरडत जातो चांगले,--!!!
जीव किती जखमी होतो,
प्रेमाचा नसता लवलेश,
मानसिक यातना भोगतो,
अगणित असती क्लेश,--!!!
दात आहेत, चणे नसती,
चणे असती, दात नाहीत,
अशांत कोण घांस घेई,
कोण फडशा जातो पाडीत,--!!!
विचारताना साधे काही,
कोणी अंगावरी येते,
शब्द बोलतां पुढे-मागे,
अर्थाचा अनर्थ करीते,
द्यावा हात पुढे जाऊन,
तो झिडकारला जातो,
वास्तवाच्या अग्निदाहांत,
मनपक्षी कसा होरपळतो,-?
माझे सुख, तुझे दु:ख,
तुझे दु:ख ते माझे सुख,
का असे विपरीत होते,
नियतीच्या पटावर साऱ्या,
उलटेच का सगळे घडते,--!!!
प्रश्न राहती अनुत्तरीत,
उत्तरेही बनतील गहन,
या आवर्तातच मात्र,
घायाळ होई अंतर्मन,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
या कातरल्या क्षणांना,
सय तुझी येते,--
उन्हाची तप्त काहिली,
चटकन् दूर होते,
वारा धुंद वाही,
ढग जाती प्रवासी,
अधूनमधून बिजलीही,
उगा आपुले दर्शन देई,
अशा वेळी आठवे मज,
सोनेरी प्रभेची सांज,
याच समुद्रकिनारी,
वाजली मिलनाची गाज,
नभ सुंदर सोनबावरे,
होते भेटीस साक्षी,
कूजन करीत बागडती,
पक्षी आनंदें वृक्षी,
किनारा दूरवर तटस्थ,
उभ्याने राखी सागराला,
मिलनाची किती उदाहरणे,
ठेवून समोरी चंद्राला,---!!!
या मंतरलेल्या क्षणांना,
आठवे चांदणी उगवती,
प्रेमाखातर सुधाकराच्या,
नशेत त्या नाचती -गाती,
तिच्यावर चढली धुंदी,
आजही मज नीट स्मरे,
इकडे धरणीवर खाली,
कुणी प्रेमवीर गात फिरे,
अशी चांदणी नाचती-गाती,
इथेच त्याला ओढत आणी,
खळाळूंन उत्तेजित होई,
निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
कधी वाटते,
कोसळता पाऊस व्हावे,
रपरप पडत धरणीला,
सर्वकाळ बहरत ठेवावे,---
कधी वाटते
उसळणारा दर्या व्हावे,
विशाल रूप बघणार्यांना,
चकित करून सोडावे,---
कधी वाटते
लख्खकन आभाळी चमकावे, प्रचंड मोठी वीज होऊनी,
पृथ्वीला भारावून टाकावे,---
कधी वाटते
घनगर्द अरण्य व्हावे,
भयभीत आकार पाहुनी,
इतरांनी गर्भगळीत व्हावे,---
कधी वाटते,
झुळझुळणारा झरा व्हावे, आपल्याच धुंदीत मस्तमौला, सगळीकडे थेंब लुटावे,---
कधी वाटते,
वळसेदार नदी व्हावे, गावाला कुशीत घेऊनी,
त्याची प्रेमळ आई बनावे,---
कधी वाटते,
गगनांगणी मेघडंबरी व्हावे, विविधरंगी पंचमी खेळत,
धरेवरील सृष्टीला न्याहाळावे,--!!!
हिमगौरी कर्वे ©
देहमनाचा आनंद औरची,
नसे तयाला दुजी कल्पना ।
जीवनामधले मिळता सारे,
न तेथे कसली तुलना ।।१।।
आनंदाचा घट भरूनी हा,
तन मन देयी पिण्यासाठी ।
आनंदाला नसे सीमा मग,
अनेक घट अन् अनेक पाठी ।।२।।
एक घटातूनी आनंद मिळता,
दुजे घट हे जाती विसरूनी ।
अनेक घटांतील आनंद हा,
लुटाल कसा तृप्त होवूनी ।।३।।
दुजामध्ये समरस होवूनी,
लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा ।
‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो,
आनंद घटाचा भव्य पसारा ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
उतलो नाही मातलो नाही
कर्तव्याला चुकलो नाही ।
तरीही लढणं अटळ आहे
अटळ आहेत धक्के।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के।।ध्रु।।
नियतीची एकच चाल
दुनिया सगळी बेहाल
जमिनीवर आले सितारे
बंदी झाले देव-देव्हारे
कोण राहील कोण जाईल
कुणा न ठाऊक पक्के ।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।१।।
नियतीला हवेत जसे
पडतील फासे तसे तसे
राजा, वजीर, त्यांचे मोहरे
लढत राहतील सारे
म्हणतील आहेत हातात
अजून सारे एक्के ।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।२।।
खेळ संपता संपत नाही
जोवर नियती मानत नाही
तिची हर एक चाल अवघड
आपली? बचावाची धडपड
सुटलो आता म्हणता उरतो
होऊन हक्केबक्के ।।३।।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।
....मी मानसी
सौख्य, समृद्धीच्या पंखाखाली
जरी निश्चिंती, मी सदैव जगलो...
तरीही अव्यक्त हुरहुर अनामिक
स्मरणगंध सारे उसवित राहिलो...
उसवीणे ते, आनंदी आत्मरंगले
धागे सारे शब्दात गुंफित राहिलो...
प्रीतभावनांचे पदर ते दवभरलेले
गीतात, नित्य आळवित राहिलो...
तरीही अजुनही हुरहुर अनामिक
आत्मारामा अंतरी शोधित राहिलो...
हुरहुर जरी ती, तरीही शांती सुंदर
मनास माझ्या समजावित राहिलो...
साक्षी, उभी अंगणी प्रसन्न बकुळी
तीलाच स्मरत मी गंधाळत राहिलो...
--वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८५
२/८/२०२२
महात्मा गांधींना गोरगरिबांविषयी अतिशय आपुलकी व जिव्हाळा होता, आपल्या प्रत्येक कृतीमधून गरिबाविषयीचा कळवळा ते व्यक्त करीत असता. गांधीजींच्या आश्रमात एक तरुण डॉक्टर सेवक होता. तो परदेशातही जाऊन आला होता. मात्र महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित होऊन तो त्यांच्या आश्रमात आला होता. आश्रमात येणाऱ्या रुग्णांवर तो गांधीजींच्या सल्ल्याने निसर्ग उपचार करीत असे.
एकदा सकाळीच आश्रमात एक आजारी महिला उपचार घेण्यासाठी आली. आजारपणामुळे तिला खूपच अशक्तपणा आला होता. महात्मा गांधी त्या डॉक्टरला म्हणाले की, या महिलेला कडूनिंबांची पाने खाऊ घाला! तसेच तिला ताक घ्यायला द्या. काही दिवसांनी ती बरी होईल. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे महिलेला कडुनिंबाची पाने व ताक द्यायला सांगितले. दुपारी गांधीजी व डॉक्टरांची पुन्हा भेट झाली. त्या वेळी गांधीजींनी त्या डॉक्टरला त्या महिलेला कडूनिंबाची पाने व ताक दिले का हे विचारले. त्यावर डॉक्टरने हो, तिला घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे तिने घेतली असेल असे सांगितले. त्यावर गांधीजी त्याला म्हणाले, घेतले असेल म्हणजे? तुम्ही तिला ते स्वतः दिले नाहीत काय? त्यावर डॉक्टरने नकारार्थी मान हलविली.
गांधीजी त्याला म्हणाले की, केवळ औषध घ्या एवढेच सांगणे हे डॉक्टराचे काम नसते तर ते घेतले की नाही हे पाहणेही डॉक्टरांची जबाबदारी असते. त्यानंतर गांधीजी स्वत: आश्रमात फिरले व त्या महिलेला त्यांनी शोधून काढले व तिची विचारपूस केली. त्या वेळी ती महिला म्हणाली की, ग्लासभर ताक घ्यायला देखील माझ्याजवळ पैसे नाहीत. त्या महिलेचे दारिद्रय पाहून गांधीजींना खूप वाईट वाटले. त्यांनी त्या महिलेला आश्रमात ठेवून घेण्याबाबत संबंधितांना सांगितले व त्या डॉक्टरलाही तिच्यावर जातीने देखरेख करून रोज सांगितलेले औषध देण्यास सांगितले. काही दिवसांनी ती महिला खडखडीत बरी होऊन आश्रमातून आपल्या घरी गेली.
आधी मूळ धाडा
अष्ट गणेशांना
इच्छिल्या कार्याला शुभारंभ ।
आधी मूळ धाडा
बापुजी देवाला
घरच्या कार्याला हातभार ।
आधी मूळ धाडा
कार्ला गडावरी
बैसोनी अंबारी येई माते ।
आधी मूळ धाडा
सप्तश्रुंगावरी
भगवतीची स्वारी येई कार्या ।
आधी मूळ धाडा
कृष्णेला वाईच्या
मान आजोळीचा आहे तिचा ।
आधी मूळ धाडा
जेजूरी खंडेराया
बहिणीच्या कार्या पाठी उभा ।
अध्यात्म ही भारतीयांची शक्ती, मानसिक स्वास्थ्य व आत्मिक बळ प्राप्त करून देणारं माध्यम ! जगात वैज्ञानिक क्रांती झाली, तरी भारतीयांनी आपली अध्यात्माची परंपरा सोडलेली नाही. कॅनडात आलेल्या बहूसंख़्य लोकांमध्ये पदवीधर त्यातही तांत्रिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक…. नोकरीच्या निमित्तांने त्यांनी देश सोडला; परंतु आपली आध्यात्माची परंपरा कायम जतन केली.
Copyright © 2025 | Marathisrushti