(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • अनंतात नाम तुझे

    अनंतात नाम तुझे
    तुझ्या चरणी माथा,
    कानडा विठ्ठल तू
    उभ्या पंढरीचा राजा
    धाव घेतो तू सत्वरी
    भोळा भाव भक्तीचा,
    नामदेवाची खातो खीर
    काय वर्णावा तुझा सोहळा
    जनीचे दळतो दळण
    सावत्या माळ्याचा पिकवी मळा,
    श्रीखंडया बनून पाणी
    भरले एकनाथांच्या घरा
    चंद्रभागेच्या तिरी जमला
    साऱ्या वैष्णवांचा मळा,
    तुझ्या नामात तल्लीन
    होतो भक्तांचा हा मेळा
    ज्ञानदेवांनी सुरु केली
    वारीचा अनमोल हा ठेवा,
    नतमस्तक तुझ्या चरणी
    माझा नमस्कार पांडुरंगा सदा
    -- स्वाती ठोंबरे.
  • सोना बंटी

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

  • माणुसकी

    कुणी नटसम्राट म्हणून गेले
    मला घर हवंय घर,
    इथे माणसाच्या आयुष्याला
    लागलीय घरघर.
    काँक्रिटचे या जंगलात
    हरवलीय एक गोष्ट,
    माणसा माणसातला
    माणूस झालाय नष्ट.
    चार घासांसाठी
    प्राण जाती कुणाचे,
    कुणी करी दान
    उकिरडयाला अन्नाचे.
    मुक्या प्राण्यांना
    कुणी लावी लळा,
    आपल्याच रक्ताचा
    कुणी दाबे गळा.
    कुणी करी मुस्कटदाबी
    शक्तीच्या जोरावर,
    कुणी भांडी खुर्चीसाठी
    सत्तेच्या बळावर.
    दाम करी काम
    परी दाम होतो खोटा,
    सर्व मिळूनही
    कुणी कपाळकरंटा.
    टीचभर जागेसाठी
    कुणी होई बेघर,
    महालात ही दिसे
    इथे मोठे विवर.
    कुणा अग्नी देण्या
    असे बालक अजाण,
    कुणा मातीत मिसळण्या
    पडे माणसाची वाण.
    इथे कुणास नाही
    कुणाचीच पर्वा,
    समजतो प्रत्येकजण
    स्वतःला सर्वेसर्वा.

  • असे निसर्गाचे चक्र

    रोपट्याचे होते झाड,
    झाडाचा होतो वृक्ष,
    वृक्षातून मिळते बी,
    असे निसर्गाचे चक्र, --!!!

    पाण्याची होते वाफ,
    वाफेचे होतात ढग,
    ढगांचे पुन्हा पाणी,
    असे निसर्गाचे चक्र,--!!!

    सृष्टी मातीतून जन्मे,
    चराचरातील घटक,
    घटकांचे होते विसर्जन,
    मातीत जातात मिळून,
    असे निसर्गाचे चक्र,--!!!

    जन्मतात किती झरे,
    जाऊन मिळती नदीला,
    नदी एकरूप सागराशी,
    सागरांतुनी पुनश्च वाफ,
    असे निसर्गाचे चक्र,-!!!

    कचऱ्याचे होते खत,
    झाडाला लागती फळे-फुले, कचऱ्यातच रूपांतर होते,
    असे निसर्गाचे चक्र,--!!!

    प्राणी, पक्षी, मानव,
    जन्मे,जगे वर्षानुवर्षे,
    *जन्मातूनच मरण जन्मे,
    असे निसर्गाचे चक्र,--!!!

    एक रूप एक रंग,
    बनवती अधिक संग,
    अशाने रंगसंगती वाढे,
    असे निसर्गाचे चक्र,--!!!

    © हिमगौरी कर्वे

  • वेड लावतोस तूं कुणां कुणां !

    हे मुरलीधर मनमोहना

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//

    तुझ्या भोवती नाचती गौळणी

    भान त्यातर गेल्या हरपूनी

    थकूनी गेल्या नाच नाचुनी

    विसरुनी गेल्या घरदारानां //१//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    रमले सारे गोकूळवासी

    पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी

    बागडती सारें तव सहवासी

    करमत नाही तुजविण त्यांना //२//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    संसार सोडला राधेने

    भारुनी गेली तव प्रेमानें

    ध्यास घेतला तुझाच तिनें

    तुजविण नव्हती दूजी भावना //३//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    मीरेचे तर प्रेम निराळे

    विषालाही प्राशन केले

    तुजसाठी सर्वस्व अर्पिले

    कसा तारशी तुं भक्तांना //४//

    वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

    हे मुरलीधर मनमोहना

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • गर्भावस्थेतील आनंद

    जीवनातील परमानंद,
    केंव्हां लाभतो त्या जीवना ?
    मातेच्या त्या उदरामध्ये,
    शांत झोपला असताना ।।१।।

    असीम ‘आनंद’ अनुभव,
    घेत असे तो जीवात्मा
    सोsहं निनाद करूनी,
    सांगतो मीच परमात्मा ।।२।।

    आनंदाने नाचू लागतो,
    मनांत येता केंव्हां तरी,
    मातेलाही सुखी करती,
    त्याच्याच आनंदी लहरी ।।३।।

    पुढे त्याचे प्रयत्न होती,
    मिळवण्या तोच आनंद
    सुख, दु:खाच्या चक्रामध्ये,
    विसरूनी जातो तो नाद ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • पाऊस

    पाऊस असा हा पडताना
    वर्षाव, आठवांचा होतो
    बरसणाऱ्या सरिसरितूनी
    तू बिलगल्याचा भास होतो
    स्मरते, अजुनही ती पिंपर्णी
    अंतरी मी चिंब भिजुनी जातो
    पाऊस असा हा पडताना
    तुझा, गंध बकुळी दरवळतो
    रिमझिमता भावनांच्या स्मृती
    अंतरास, आजही मोहर येतो
    पाऊस असा हा पडताना
    तुझ्याच, आठवात मी दंगतो
    पाऊस,असा हा पडताना
    गड़गडाट, गतस्मृतींचा होतो
    मनभावनांची, ओढ़ अनावर
    जीव, व्याकुळ होवूनी जातो
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र.१२६.
    २९ - ४ - २०२२.
  • माते दुर्गे चंडिके

    जय दुर्गे चंडिके

    माते, हे दुर्गे चंडिके

    तुझ्या वरदहस्ताविण, माते, जग ना चालुं शके ।।

    तूं चामुंडा, काली माता

    अंबा, ‘शेरोंवाली’ माता

    वेगवेगळें रूप तुझें भक्तांच्या मनिं झळके ।।

    रुंड चेचशी पायाखालीं

    मुंडमालिका कंठीं घाली

    शूल नि खड्गावरुन करींच्या खलशोणित टपके ।।

    तुझ्या कृपेनें जीवन फळतें

    विश्व तुझ्या इच्छेनें पळतें

    आज्ञेनेच तुझ्या, रविशशिनें अंबर नित चमके ।।

    जन्ममृत्युचें करसि नियंत्रण

    तूंच काळचक्राचें कारण

    काल-आज-अन्-उद्यापलिकडे तव अस्तित्व टिके ।।

    तव गरिमा गातात सर्वजण

    जगत् तुला करताहे वंदन

    लक्ष देवदेवींचें मस्तक तुझियापुढे झुके ।।

    नयनें उत्सुक करण्यां दर्शन

    पदरज करो ललाटा पावन

    अथक तुझें गुणगान गर्जुं दे सार्‍या भक्तमुखें ।।

    पापांचें क्षालन कर माते

    क्लेशांचा आतप हर माते

    भर माते आमुच्या जीवनीं चिन्मय सर्व सुखें ।। - - -

    - - -

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • मानवता धर्म

    परमेश्वर अगाध । त्याच्या शक्तीचा नसे वाद ।।

    मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक ।।

    नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।।

    प्रभु निराकार । निर्गुण असुनी होई साकार ।।

    आस्तिक प्रभु मानती । नास्तिक समजती शक्ति ।।

    ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।।

    ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।।

    वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती ।।

    धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक ।।

    हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां ।।

    झगडे मार्गासाठीं । ध्येय मात्र विसरती ।।

    धर्मासाठीं भांडण । मुर्ख त्याहूनी कोण ।।

    भांडतो करवंटीसाठी । विसरुनी खोबरे वाटी ।।

    होता अतिरेकी । बनती सर्व दुःखी ।।

    वाद करती विद्वान । सामान्यांस विचारी कोण

    समजून घ्यावे सर्व धर्म । हेच मावतेचे मर्म ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • सुप्रसिध्द हिंदी कविता ‘मोची’ चा मराठी अनुवाद

    हिंदी साहित्यातील सुप्रसिध्द कवि स्व. धूमिल ( सुधाकर पांडे) यांची सुप्रसिध्द कविता मोची या रचनेचा मराठी अनुवाद वाचकां पुढे सादर करीत आहे.
    ( मुळ नांव- सुदामा पांडेय, उपनाम धूमिल जन्म स्थानखेवली, जिला वाराणसी, उत्तरप्रदेशकुछ

    प्रमुख रचना- संसद से सड़क तक (1972), कल सुनना मुझे, सुदामा पाण्डे का प्रजातंत्र (1983)विविध कल सुनना मुझे काव्य संग्रहा करीता 1979 साली साहित्य अकादमी पुरस्कार)

    **********

    मोची

    रापी चालवताना
    त्‍याने माझ्याकडे क्षणभर वर खाली पाहिले
    आणि दयनीय स्‍वरात
    तो हसत म्‍हणाला -
    'बाबुजी, खर सांगू - माझ्या नजरेत
    कोणी छोटा नाही
    कोणी मोठा नाही
    माझ्या दृष्‍टीने प्रत्‍येक माणूस एक जोडी चप्‍पल आहे.
    जो माझ्या समोर
    दुरुस्‍ती करीता उभा आहे.
    आणि मुख्‍य गोष्‍ट म्‍हणजे
    तो आपल्‍या जागी कोणीही असो.
    जसा आहे, ज्‍या ठिकाणी आहे.
    आजकाल, कोणीही व्‍यक्‍ती चपलेच्‍या मापाबाहेर नाही.
    तरी सुध्‍दा माझे लक्ष असते की
    व्‍यावसायिक हात व फाटलेल्‍या चपलेच्‍या मध्‍ये
    कोठे ना कोठे एक साधारण माणुस आहे
    ज्‍याच्‍यावर टाके पडतात
    जो चपलेच्‍या बाहेर डोकावणा-या अंगठयाची जखम
    छातीवर घाव सोसत सहन करतो.

    येथे नानाविध चपला येतात
    आणि माणसाला निरनिराळया आपआपल्या पसंती दाखवतात.
    सर्वांचा आप आपला चेहरा आहे.
    आपआपली शैली आहे.
    उदाहरणार्थ- एक चप्‍पल आहे
    चप्‍पल काय ती एक ठिगळांची थैली आहे
    जिला एक चेहरा वापरतो
    जो देवीच्‍या व्रणाने भरलेला आहे.
    विश्‍वास दर्शक हसण्‍यामध्‍ये
    टेलिफोन खांबावर अडकलेली पतंग आहे.
    जी फडफड आवाज करीत आहे
    'बाबुजी या चपलेवर पैसे व्‍यर्थ का उधळता?' ,
    मी हे बोलु इच्छितो परंतु
    माझ्या आतुन एक आवाज येतो-
    काय मानुस आहे?

    आपल्‍या जातीवर थुंकतो आहेस,
    तुम्‍ही विश्‍वास ठेवा त्‍या क्षणी मी
    ठिगळाप्रमाणे मी डोळे शिवुन घेतो
    आणि संकटात पडलेल्‍या माणसाची
    मोठ्या मुश्‍कीलीने सुटका करतो,

    एक चप्‍पल अशी आहे
    जी गुंफून एक माणुस निघतो सफरीवर ,
    तो हुशार नाही वेळेचा ताबेदार नाही
    त्‍याच्‍या डोळ्यात लालच भरलेली आहे
    हातात त्‍याच्‍या घड्याळ आहे
    त्‍याला कोठे जायचे नाही परंतु
    चेह-यावर त्‍याच्‍या गडबड आहे
    तो कोणी व्‍यापारी आहे किंवा दलाल
    परंतु उध्‍दट असा कि हिटलरचा नातु आहे
    इथे बांध,तिथे काप, इथे ठोक तिथे पिट
    चांगले घास,असे चमकवं, चपलेचा आरसा बनवं
    ओफ्फ किती उकाडा आहे!
    रुमालाने हवा घेत तो हवामानावर संतापतो
    सडकेवर येणा-या जाणा-यावर
    वानराप्रमाणे टवकारुन पाहतो
    यावर कडी म्‍हणजे घंटाभर काम करुन
    मजुरी देताना साफ नाटक करतो
    सज्‍जन लोकांना लुटता का ? असे डाफरत तो
    काही नाणी फिरकावतो व
    पुढे निघून जातो.
    अचानक दचकत तो सडकेवर धावतो
    आणि मार्गस्‍थ होतो.

    व्‍यवसायावर जेव्‍हा घाव पडतो
    तेव्‍हा कोठेतरी एक चोर खिळा
    दबा धरुन वेळ मिळताच
    अंगठ्यात रुततो.
    याचा अर्थ असा नाही की माझा
    गैरसमज झालेला आहे.
    प्रत्‍येक क्षणी मला असे वाटते की
    चप्‍पल व व्‍यवसायाच्‍या दरम्‍यान
    कोठेतरी एक साधारण माणुस असतो
    ज्‍याच्‍यावर टाके पडतात
    जो चपलेच्‍या बाहेर डोकावणा-या बोटाची जखम
    छातीवर हातोड्याचे घाव सोसत सहन करतो,

    आणि बाबुजी, खरे सत्‍य हेच आहे की
    जिवंत राहण्‍यासाठी खरा तर्क नसेल तर
    रामनाम विकून या वेश्‍यांची दलाली करुन
    रोजीरोटी कमावण्‍यात काहीच फरक नाही
    आणि हेच ते ठिकाण आहे जिथे
    प्रत्‍येक माणुस आपला धंदा सोडून
    गर्दीत उजळणारा हिस्‍सा बनतो

    सगळ्या लोकाप्रमाणे
    भाषा त्‍याला चावते
    मौसम सतावतात
    आता तुम्‍ही त्‍या वसंताकडे पहा.-
    हा दिवसा धाग्‍याप्रमाणे ताणतो
    झाडावरील लाल लाल हजारो पानांच्‍या टोकाला
    उन्‍हात शिजवण्‍यासाठी लटकावतो,
    खरे सांगतो त्‍या समयी
    रापीची मुठ हातात सांभाळणे
    फार मुश्‍कील बनते
    डोळे कोठे जातात तर हात कोठे तरी चालतो
    मन त्रासलेल्‍या बालकाप्रमाणे
    कामावर परतण्‍यास इंकार करते
    वाटते की चमड्याच्‍या सज्‍जनतेमागे
    एखादे जंगल आहे

    जो माणसावर
    झाडामागून वार करतो
    आणि हे धक्‍कादायक नव्‍हे तर विचार
    करण्‍या योग्‍य गोष्‍ट आहे,
    परंतु जो जीवनाला पुस्‍तकांनी मापतो
    जो सत्‍य आणि अनुभवाच्‍या दरम्‍यान
    हत्‍येच्‍या क्षणी डरपोक आहे
    तो मोठ्या सहजपणे म्‍हणू शकतो
    यार तु मोची नव्‍हे तर शायर आहेस
    जो विचार करतो की आग
    सर्वांना जाळते, सत्‍य सर्वांच्‍या पलीकडे आहे
    काही आहेत ज्‍यांना शब्‍द गवसले आहेत.
    काही आहेत जे अक्षरांसमोर आंधळे आहेत
    ते प्रत्‍येक अन्‍याय चुपचाप सहन करतात
    आणि पोटाच्‍या आगीसमोर डरपोक बनतात.
    जेव्‍हा मी हे जाणतो की-
    "नकाराने व्‍याप्‍त एक आरोळी "
    आणि "एक समजुतदार मौन"
    दोघांचा मतलब एक आहे
    भविष्‍य घडवण्‍यासाठी 'मौन' व 'आरोळी'
    आप आपल्‍या जागी एक प्रकारे
    आप आपले कर्तव्‍य बजावीत असतात.

    -- विजय प्रभाकर नगरकर