लहान असताना लहानपण नको असतं
मज्जा असते पण शिस्त नको असतं
म्हणून पटापट मोठ्ठं व्हायचं असतं
सालं.....माणसाचं असंच असतं
आजोळी गावाला जायचं नसतं
चुलीतल्या निखार्यांवर काजू भाजत
कोपरापर्यंत रस गळणारा रायवळ
बदाक् कन परसात पडलेला फणस
त्यातले पिवळेजर्द गोडूस गरे
दुपारी खळात वाळवलेली आंबापोळी
कच्च्या फणसाचे तळलेले गरे
हे सगळं हवं पण गाव नको असतं
सालं.....माणसाचं असंच असतं
खडखड वाजत जाणारी एस.टी.
गुरवाचो बाबलो कंडक्टर
आन् पाटलाचो रमेश डायव्हर
गंगाधर तात्यांचो झिल म्हनान् वळखतो
म्हयनाभर हडे गावांक र्हावन् उंडारतां
नांक सुर्र व्हईस्तं आंबं वरपता
चिवडाक् चपाती न्हाय् म्हनान् रडता
आन् फटकीचो , ५ किलो वजन वाढवतां
शहराक् श्येजारच्या घराक् मयत जाली
ह्येकां WhatsApp वर गावकरी कळवतां
तरी पण खड्डे अडलेल्या शहराक् येवा र्हावान्
म्हनाक् त्वांडां उजाळतां शिंच्यांची
कुणालाच कुणाचं सोयर सुतक नसतं
तरी पण गांव नको शहर हवं असतं
सालं.....माणसाचं असंच असतं
गावचं शेत — घर — जमीन नको होते
पोरं जवळ हवीत म्हणून आजी तयार होते
सगळं विकून आजी आजोबा शहरी येतात
टिचभर खोलीत जीव गुदमरत मरून जातात
कधीतरी पैलतीर यालाही दिसू लागतो
दादरावर एस टी सुटताना
रडक्या तोंडांची आजी आठवते
धुळीच्या लोटात उंचावलेला हात दिसतो
आणि मग याचा बांध फुटतो
तो गावाला जाऊन घर विकत घेतो
पण आता याची पोरं परदेशी असतात
त्यांना त्यांचं क्षितिज खुणावत असतं
डोळ्यात पाणी आणून ब्येणं सांगत असतं
आपलं गांव हेच आपलं न्यूयाॅर्क असतं!
आपण किती माती खाल्ली!
हे ह्याच्या डोळ्यांत दिसत असतं
वय होऊन कधीतरी हा आणि बायको
गांवालाच डोळे मिटतात ,
गांवकरी पोरांना बोल लावत ,
यांना मसणात नेतात ,
WA वर पोरांना कळवतात
लगेच GPAY ने पैसे जमा होतात
पोराभोवती चिल्ली पिल्ली जमा होतात
Hey Dad What Happened?
हे येडं डोळ्यात आसू घेत कसनुसं हसतं
काही वर्षांनी आनंद साजरा करताना
..... ते आई बाबांचं आनंदी तोंड नसतं
आता याला मायदेशी परतायचं असतं
पण याच्या मुलांना भारतात नको असतं
बायकोला पण पोरांना सोडायचं नसतं
मग हे येडं एकटंच मायदेशी येतं
राजापुरात एक घर विकत घेतं
विकतची झुणका भाकर खातं
आता डोळ्यांत आजोळ दाटलेलं असतं
पण आजोळ माय बाप ...... संपलेलं असतं
हा स्वानुभव सगळ्यांना सांगत सुटतो
ऐकणार्या सगळ्यांना ते कळत असतं
पण कळलं तरी वळत कुठे असतं ?
पलिकडचं शेत — घर विकलं जात असतं
हे येडं विव्हल होत टिपं गाळीत असतं
इतिहास फक्त पाठ करायलाच शिकलो
बोध नाही घेतला —हे कळलेलं असतं
पण..... तोवर कुणाचं कुटुंब शहराकडे
खूप मोठ्ठी स्वप्नं आणि पालक घेऊन
गावकर्यांना जातो! म्हणून निघालेलं असतं
रहाट गाडगं परत तसंच फिरणार असतं.....
सालं.....माणसाचं असंच असतं
-उदय गंगाधर सप्रे
म—ठाणे
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येती,
सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असती...१,
ह्या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,
अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,
हेच तत्त्व त्या प्रभूचे, तीन गुणांनी बनला,
उत्पत्ती लय स्थीती, यांनी सर्वत्र व्यापला...३,
ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे
अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,
याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,
अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता
सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता
धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज
शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज
मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी
चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी
त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी
झेप घेवूनी समरस होतो, इतर जणांच्या काळजाशी
सुख दु:खातील दु:ख आधीक ते, पदोपदी जे दिसून येई
दु:खीतांचे अश्रू पुसण्यासाठी, दु:खी अनूभवी धाव घेई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ओरिसातील जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाचे ( भगवान श्रीकृष्णाचे) मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तेथेच घडलेली ही एक प्राचीन कथा आहे.
त्या नगरीत जयदेव नावाचा हरिभक्त राहत होता. श्रीकृष्णावरील भक्तीपोटी त्याने 'गीत गोविंद' हा ग्रंथ लिहिला. तो खूपच लोकप्रिय झाला. अतिशय प्रासादिक व मधुर रचना असलेला हा ग्रंथ घराघरात पोहोचला होता. त्या नगरीचा राजाही कृष्णभक्त होता. त्यानेही असाच एक ग्रंथ लिहिला होता. मात्र लोकांनी त्याचा फार स्वीकार केला नाही. राजाला त्याची फार मोठी खंत होती. त्यामुळे त्याने आपल्या राजसत्तेचा वापर करून आपला ग्रंथ लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचाही फारसा फायदा झाला नाही. नगरीतील प्रजा ' गीत गोविंद' याच ग्रंथाचे पारायण करी.
त्यामुळे राजा आणखीनच अस्वस्थ झाला. त्याने काही पंडितांना बोलावून यावर मार्ग काढण्याची सूचना केली. त्यावर पंडितांनी ग्रंथाबाबत जगन्नाथाचाच कौल घेण्याची राजाला विनंती केली. जगन्नाथाच्या मंदिरातील गाभार्यात जयदेव याचा 'गीत गोविंद' आणि राजाचा ग्रंथ असे दोन्ही ग्रंथ ठेवायचे. जगन्नाथाला जो ग्रंथ आवडेल तो गाभार्यात राहील व नावडता ग्रंथ मंदिराबाहेर पडेल, असे गृहीत धरून मंदिरात कौल मागण्यात आला.
दोन्ही ग्रंथ रात्री मंदिराच्या गाभार्यात जगन्नाथापुढे ठेवले गेले व सर्वाच्या समक्ष मंदिराला कुलूप लावण्यात आले. दुसर्या दिवशी राजासह सर्व लोकांना असे दृश्य दिसले की जयदेवचा ग्रंथ मंदिराच्या गाभार्यात आहे व राजाचा ग्रंथ मंदिराच्या बाहेर आहे.
जगन्नाथाचा कौलही आपल्या विरोधात गेल्याचे पाहून राजाही खूपच व्यथित झाला व त्याने मंदिरातच प्राणार्पण करण्याचे ठरविले. तलवारीने तो आपला शिरच्छेद करणार तेवढ्यात प्रत्यक्ष जगन्नाथ प्रकट झाले व त्यानी राजाला थोपविले. ते राजाला म्हणाले की, तुझ्या भक्तीबद्दल मला आदर आहे. मात्र जयदेवाचा ग्रंथ श्रेष्ठ आहे यात मुळीच शंका नाही. मात्र तुझ्या ग्रंथातील चोवीस ओव्या जयदेव याच्या ' गीत गोविंद ' ग्रंथात घातल्या जातील.
ते ऐकून राजाचे समाधान झाले.
असे म्हणतात की, जयदेव याच्या त्या 'गीत गोविंद' ग्रंथात राजाने रचलेल्या चोवीस ओव्या नंतर लोकांना पहायला मिळाल्या.
तुटलेल्या नात्यांचे
जरतारी पदर
त्या ना मायेची उब
प्रेमाची कदर
गाठीगाठीत फक्त
बोचरे आठव
कशास मिरवायचे?
भरजरी पाटव !……… १
तो पाठीवर हात अन
डोळ्यात पाणी
ते तुडुंबलेलं मन
श्वासात गाणी
क्षणाक्षणाने दिलं
जीवनाचं दान
उघडेल का कोणी ते?
मिटलेलं पान !………… २
.....मी मानसी
आंस लागली मजला,
बघून याव्या त्या शाळा,
देहू, आळंदी, परिसर,
जाऊनी तो धुंडाळला ।।१।।
कोठे शिकले तुकोबा,
कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले,
साधन दिसले नाहीं,
परि तेज आगळे भासले ।।२।।
विचार झेंप बघतां,
आचंबा आम्हां वाटतो,
कोठून शिकले सारे,
मनी हा प्रश्न पडतो ।।३।।
त्यांची शाळा अतर्मनीं,
गंगोत्री ज्ञानाची ती,
वाहात होती बाहेरी,
पावन करी धरती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मागील कर्म पुढे चालूनी, कर्माची होई शृखंला,
फळ मिळते कर्मावरूनी, मदत होई मुक्तीला.....१,
चांगले कार्य करीतेवेळी, मृत्यू येता अवचित,
पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां, खेचतो त्याच कार्यात....२,
अपूरे झाले असतां कार्य, ज्ञानेश्वराच्या हातून
पुनरपि येऊनी पूर्ण केले, आठरा वर्षे जगून......३,
ध्रुव जगला ५ वर्षे, अढळ पद मिळवी
कित्येक जन्मीचे तपोबल, पांच वर्षांत पूर्ण होई....४,
कर्म मुक्तता मिळे आत्म्याला, जन्म-मृत्यू पासूनी,
‘कर्म’ फळानेच जे साधते, ‘मोक्ष’ म्हणती कुणी....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
तुझ्या मंदिरी आलो पावन हो तू भक्तिला ।।धृ।।
तुझे अजाण बालक करितो खोड्या अनेक
न होई चित्त एक
तूच समजोनी घेई मम चंचल मनाला ।।१।।
रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला
जमदग्नीची कांता परशूरामाची तू माता
मनी तूजला भजता
आशशिर्वाद तू देई आनंदाने सर्वाला ।।२।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
गेले माझे जीवन तूझे नाम घेऊन
कंठ आले दाटून
चुका आमच्या होई क्षमा कर अज्ञानाला ।।३।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
सारे अर्पिले प्रेमांत आळविले भक्तित,
परि न कळली रित
अत:करण गाणे गाई आवाज नसे ओठाला ।।४।।
रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला
नको मजला धन विटले आतां मन
सोडव मोहमायेतून
चरणांवरी लोळण घेई हात पसरुं कुणाला ।।५।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti