(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा……

    सायन्स अजून पर्यंत व्हेन्स म्हणजे नसा बनऊ नाही शकल. डॉ.अब्दुल कलाम यांनी स्वतः त्यांच्या एका भाषणात म्हटलेले आहे की आपण या जगाला चालवतो, पण आपल्याला चालवणारी आपल्याला कंट्रोल ठेवणारी एक शक्ती वर आहे. ते तर स्वतः एक खूप मोठे सायंटिस्ट होते.

  • मूर्ख आणि शहाणे! शिका!

    समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

  • ही लूट आधी थांबवा!

    सिंचन, रस्ते, वीज, पाणी या विकासाच्या दृष्टीने पायाभूत ठरणाऱ्या सुविधांचे समान न्याय तत्त्वाने वाटप झाले नाही. सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्राला कायम झुकते माप दिले. किंवा असेही म्हणता येईल की, राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी एकजुटीच्या बळावर राज्याची आर्थिक सूत्रे कायम आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले.

  • आयुष्याची प्रश्नपत्रिका…

    आपल्या प्रत्येकाचे आयुष्य म्हणजे शेवटच्या क्षणापर्यन्त सोडवायची एक प्रश्नपत्रिका असते.या प्रश्नपत्रिकेसाठी अमुक एक विशिष्ठ असा विषय नसतो वा कसल्याही स्वरूपाचा अभ्यासक्रम आखलेला नसतो.प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जरी वेगवेगळी असली तरी काही असे प्रश्न असतात कि ते एकमेकांच्या मदतीने सोडवावे लागतात..आणि तशी आपल्याला मोकळीकही दिलेली असते..काही काळाची मर्यादा घालून.आपण तेवढ्या निर्धारित वेळेत सोबत्यांच्या साथीने त्या प्रश्नांना सामोरे जायचे असते.काही प्रश्नांसाठी आपल्यापुढे कुणाची बौद्धिक मदत ..तर कुणाची शारिरीक मदत ..आर्थिक..भावनिक घ्यावी लागते..असे पर्याय निवडण्याला प्रत्येकाला संधी मिळत असते.आपले पर्याय आपणच निवडायचे असतात आणि ते निवडताना आपण ही जी मदत घेत असतो तिचे योगदान हे केवळ आपल्याला उत्तरांच्या उद्दिष्ठाप्रत न्यावयासाठी आहे हे विसरायचे नाही..हे पर्याय आपली उत्तरे करण्याचा कधीच यत्न नसावा..कारण एकतर तशी मुभा आपल्याला नसते..आणि कुणी अट्टाहासाने जर तसा दांडगावा केला तर ती उत्तरपत्रिका त्याच्या नावाची समजली जात नाही.आणि आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडविण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ठ ठामपणे प्रत्येकाने स्वत:ला बजावायची ती ही कि आपली प्रश्नपत्रिका आपली आपण प्रामाणिकपणे सोडवायची..आपल्यावर कुणाची देखरेख आहे किंवा नाही याचा कानोसा घेण्यात अनमोल वेळ वाया न घालविता प्रश्न सोडवीत रहायचे..आपली उत्तरे कुणा दुसऱ्याच्या हाती कधीही परीक्षणासाठी ..मूल्यांकनासाठी अजिबात सोपवायची नाहीत..आपला गृहपाठ इतका जोमदार असायला हवा की आपणच आपल्या उत्तरांचे परीक्षण..मुल्यांकन करावयास सिद्ध असायला हवे..आणि कुठे काही चुकीचे वा अपुरे उत्तर आढळल्यास आपणच पुन्हा नव्याने ते लिहायला शिकले पाहिजे...आपण रोज झोपताना आपल्या उत्तरांबद्दल समाधानी नि संतुष्ठ असणं आणि आपल्या नजरेनं आपल्याला जोखताना ताठ मानेने वावरणं ही आपली जगण्याकडे पहाण्याची दृष्ठी असली पाहिजे.
    आणखी एक गोष्ठ ठाम ध्यानात ठेवायची ती ही कि या प्रश्नपत्रिकेत येणारे सारेच्या सारे प्रश्न सोडविणे अनिर्वार्य असते..वेळकाढूपणा करून प्रश्नांना बगल देता येत नाही..टाळता तर अजिबात येत नाही.आणि आपापली प्रश्नपत्रिका आटोपल्यानंतर आपल्याला उगाचच कुणासाठी रेंगाळता येत नाही..प्रत्येक प्रश्नाला असणारे गुण आपणाला कधीच दिसत नाहीत..आणि त्याही पुढे एकच प्रश्न जरी आजूबाजूच्या सहकाऱ्याच्या प्रश्नपत्रिकेत दिसला तरी प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिकेत त्याला असणारे गुण कधीच समान नसतात..तेव्हा आपली उत्तरे लिहताना शेजारी_पाजारी बघणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय ठरतो.

    या प्रश्नपत्रिकेत बरोबर लिहलेल्या उत्तरांना भरघोस गुण असतात..आणि त्या गुणांची सावली आयुष्यभर आपल्याला आणि आपल्या सोबतीला येणाऱ्या तथाकथित अपयशी म्हणून उल्लेख होणाऱ्या सगळ्या सोबत्यांना लाभत असते..आणि आपल्या चुकलेल्या उत्तरांना पुन्हा पुन्हा नव्याने लिहायची संधी प्रत्येकाला मिळत असते..आपण एकच करायचे असते कि कुठलाही मानपान ..आढेवेढे न घेता..यतकिंचितही अपराधीपणा न मानता..न्यूनगंड न जोपासता प्रसन्न मनाने चुकलेली उत्तरे लिहित जावे..आणि ही अशी उत्तरे सवयीने लिहिण्याचा नियम नसावा..तर ती सहजतेने लिहिली जावीत..एकदा आपल्याला आपल्या चुकलेल्या उत्तरांना समजावून ..सांभाळून घ्यायला जमू लागले की मग आपल्यामध्ये दुसऱ्याच्या चुकलेल्या उत्तरांची खिल्ली उडविण्याची वृत्ती मूळ धरणार नाही..
    आता इथला प्रत्येकजण ज्याची त्याची प्रश्नपत्रिका पूर्ण लिहूनच बाहेर पडत असला तरी बहुतांशी लोक ही परीक्षा देताना परीक्षेचा उद्देश..प्रयोजन..आपल्याला परीक्षेस बसण्याची मिळालेली संधी..आपल्याला परीक्षा देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासासाठी जन्मजात मिळालेली विचार..भावना हि आयुधे ..आपली काबिलीयत..हुनर..ईश्वरी अनुग्रह..अभिषेक या सगळ्याकडे पाठ फिरवून बसत उत्तरे लिहित असतात..आयुष्याचे जगणे सार्थकी होणे म्हणजे संपूर्ण प्रश्नपत्रिका लिहून झाल्यावर मिळणारा कौल नसतो...आणि सत्य हे की असा कौल स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचे भाग्य कुणालाही लाभलेले नाही..वा लाभत नसते..तर जगण्याचे सार्थक ..कुणी त्यास मोक्ष म्हणतात .. तो हा कि उत्तरे लिहताना प्रत्येक प्रश्नाशी आपला जुडलेला भाव..त्याच्याशी झालेला समागम आणि शेवटी उत्तर लिहून झाल्यावर अलवार..अवचित ..अनावधानाने ओठातून निसटणारी शीळ..बस्स याशिवाय आयुष्यात काहीही मिळवायचे नसते..हा प्रत्येक टप्प्यावर आपले नाव घेत ..शोधत शोधत आलेला आनंद जेव्हा आपण भेटल्यावर गळ्यात गळा घालून बिलगतो नि आपल्या खांद्यावर त्याचे आनंदाश्रू ओघळतात ..हा क्षण म्हणजे स्वर्गसुख नव्हे तर साक्षात इन्द्रपदच होय...आपल्यावर होत असलेल्या आसवांच्या अभिषेकात भिजून चिंब होताना आसवांच्या लहान_मोठ्या वर्गवारीकडे अजिबात ध्यान देऊ नये..कुणी आपल्याला तसे करण्यास भरीस पडत असला तरी त्याकडे कानाडोळा करावा..आनंदाचे मूल्य झोपडीपासून राजवाड्यापर्यंत वस्तुमानासारखे एकच असते..आपण आपल्या परीने ज्या गुरुत्वाकर्षणाचा चष्मा लावून त्या आनंदाकडे बघत असतो त्यानुसार आनंदाचे वजन बदलत असते..वस्तुमान नाही..हे जगण्याचे प्रमेय ही आपली आयुष्याची स्टेटस लाईन असावी.

    आता हे कागदावरचं प्रश्नपत्रिका सोडविण्याचे मार्गदर्शन कितीही सोप्पं..नि सहजशक्य वाटत असलं तरी प्रत्यक्ष प्रश्न समोर उभे ठाकल्यावर उत्तरे डोळ्याच्या आवाक्यात दिसत असली तरी कागदावर उतरवताना हात कापू लागतात...या अनुभवातून आपल बेडा यशस्वी बाहेर पाडावयाचा असेल तर आपणच आपल्या पाठीशी ठामपणे उभे रहायचा सराव अभ्यासाने अंगी बाळगून असावे. आपल्या प्रश्नपत्रिकेतील अवघड ..कठीण..प्रश्नांना सहजतेने स्वीकारावे .आपल्या बुद्धीवर ..चातुर्यावर ..क्षमतेवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा.किंबहुना त्याकडे बघूनच आपल्या प्रश्नपत्रिकेत अवघड ..कठीण प्रश्न आलेत या बद्दल खुशाल रहावे. आपल्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न ज्या ईश्वरी संकेतानुसार आलेले आहेत तोच ईश्वरी अंश आपल्यात आहे हे का जर जाणलं तर आपल्याला कृतार्थ जीवन जगणे सुलभ होऊन जाते..आणि शेवटी ज्यांचा ईश्वरावर..नियतीवर विश्वास..श्रद्धा नाही त्यांच्यासाठी..त्यानाही प्रश्नपत्रिका लागू आहे ..सर्व प्रश्न अनिर्वार्य आहेत..भले त्यांना त्यांच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्ना _मागील ईश्वरी संकेत कबूल नसेल तरी निसर्गाचे नियम साऱ्या सृष्टीला बंधनकारक आहेत ..सहजीवनाचे जगणे मान्य केल्यावर एकमेकाच्या उन्हा_सावलीत इच्छा असो वा नसो विसावा घ्यावाच लागणार हे ही त्यांना नाकारता येणार नाही..आता या साऱ्या नियमबद्ध नैसर्गिक सृष्टीतील श्वास_उ:श्वास यालाच कुणी ईश्वर म्हणू लागतो..आता याला मानणे आणि न मानणे याचा काही प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या स्वरूपावर परिणाम होत नसतो..मात्र उत्तरे लिहताना असणारी अदब मात्र जरूर बेमिसाल असते तिचा रंग आणि नूर काहीसा आगळा असतो..

    रजनीकान्त

  • विदर्भाची ओळख कोणती?

    मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी विदर्भ प्रदेश हा तत्कालीन सी.पी. अॅण्ड बेरार (मध्य प्रांत आणि वऱ्हाड) या प्रांताचा एक भाग होता.

  • स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या, तसेच धर्मनिरपेक्षता : एक टिपण

    (०१.०४.२०१६)

    मार्च २७, २०१६ च्या लोकसत्तामधील श्री. शेषराव मोरे यांच्या, धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या भाषणाची बातमी; तसेच ३० मार्चच्या ‘लोकमानस’मधील श्री. राजीव जोशी यांचें त्यावरील मत, व १ एप्रिलच्या ‘लोकमानस’मधील श्री. भालचंद्र कवळीकर यांची त्या मतावरील प्रतिक्रिया, हे सर्व वाचलें. त्यांत बरेच मुद्दे चर्चिलेले आहेत. सर्वांचा परामर्ष घेण्याचा माझा हेतू नाहीं. पण, त्यातील फक्त, १) स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या ; व २) धर्मनिरपेक्षता ; या, एकमेकांशी संल्लग्न असलेल्या दोन गोष्टीबद्दल मी इथे कांही माहिती पुढे ठेवीत आहे.

    • रत्नागिरीला नजरकैदेत असतांना सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा त्यांचा ग्रंथ लिहिला. तो १९२०च्या दशकात लिहिला गेलेला आहे, एवढे सांगितलें म्हणजे, देशातील राजकीय व सामाजिक परिस्थितीची कल्पना येते, तिचे वेगळे वर्णन करायची आवश्यकता रहात नाही. हा मूळ ग्रंथ सावरकरांनी टोपण नांवानें इंग्रजीत लिहिला , व त्याचे मराठी भाषांतर नंतर झालेले आहे, हे ध्यानीं घ्यावे. इंग्रजीत कां , तर इंग्रजी ही संपर्क-भाषा (लिंक-लँग्वेज) असल्यामुळे, कुठलीही मातृभाषा असलेल्या शिक्षित माणसाला तें लेखन सहज वाचता व समजता यावे ; तसेंच, पाश्चिमात्यांपर्यंतही (त्यात नवमतवादी ब्रिटिश आले, व अमेरिकनही आले), ते विचार पोचावेत.
    • ‘हिंदुइझम’ (Hinduism) हा शब्द त्याआधी बर्‍याच काळापासून प्रचलित होता. पण, तो न वापरता सावरकांनी हेतुत: ‘हिंदुत्व’ हा शब्द निर्माण केला (कॉइन केला) . याचे कारण असे की, ‘हिंदुइझम’ म्हटल्यावर त्या शब्दाचा अर्थ हिंदू धर्माशी जोडला जात असे, अजूनही जोडला जातो. पण , सावरकरांना तो अर्थ अभिप्रेत नव्हता. जसें ममत्व, स्वत्व, मातृत्व, दातृत्व, उत्तरदायित्व, वगैरे ; तसेंच, त्यांना अभिप्रेत असलेलें ‘हिंदुत्व’. अर्थात्, हिंदुत्व म्हणजे ‘हिंदुपण’ .
    • सावरकारांची हिंदुत्वची व्याख्या कुठल्याही प्रकारे धार्मिक नाहीं. याउलट ती, भाषा, जाती, ‘मतें’ (जसें, बुद्धिझम, जैनिझम इ. ) वगैरे सर्वांच्या पलिकडे आहे. ती व्याख्या त्यांनी संस्कृतमध्ये केलेली आहे. याचे पहिले कारण म्हणजे, वेगवेगळ्या मातृभाषा असलेले भारतीय लोक तिचा अर्थ समजू शकतील. अर्थातच, ही व्याख्या भारतीय जनांसाठी असल्यामुळे, (आणि, संस्कृत ही शतकानुशतकें भरतखंडातील संपर्क-भाषा असल्यामुळे), सावरकारांना ही व्याख्या इंग्रजीपेक्षा संस्कृतमध्ये करणें अधिक योग्य वाटले. दुसरें, आणि अधिक महत्वाचें, कारण म्हणजे, संस्कृतमध्ये अगदी थोड्या शब्दांत अतिशय चपखल, सुस्पष्ट, अॅप्ट् अशी वाक्यरचना करता येते. (कुणीही हीच सावरकर-रचित परिभाषा, इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा अन्य भाषेत, पूर्ण अर्थ सुस्पष्ट होईल अशाप्रकारें करून पहावी, म्हणजे याचा प्रत्यय येईल).
    • काय आहे ही परिभाषा :
      आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका
      पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिन्दुर् इतिस्मृत: ।।

    थोडक्यात सांगायचे म्हणजे, सिन्धुसागरापासून ते सिन्धु नदीपर्यंत पसरलेल्या भूभागाला जे लोक भारतभूमी समजतात, आणि या भूमीला पितृभूमी व पुण्यभूमी मानतात, ते सर्व लोक हिंदू आहेत.

    • सावरकरांनी या व्याख्येत ‘मातृभू’ असा शब्द कां वापरला नाहीँ ? ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या काव्यात त्यांनी भारताचा उल्लेख ‘मातृभूमी’ असा केलेलाच आहे. पण , इथें आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, संस्कृतमध्ये ‘पितरौ’ असा उल्लेख केल्यावर माता-पिता (parents) असा अर्थ होतो ; ‘पितर:’ अशा उल्लेख केल्यावर पूर्वज (ancestors) असा अर्थ होतो. म्हणजेच, ‘पितृभू’ असा उल्लेख केल्यावर, दोन्हीकडील सर्व पूर्वजांचा संबंध आपोआपच जोडला जातो. ( आतां मी जें उदाहरण देत आहे, त्याचा धार्मिक संदर्भ हा, संस्कृतृ-भाषिक अर्थामधून निर्माण झालेला आहे, हें ध्यानीं घ्यावें. भाद्रपदाचा वद्यपक्ष हा ‘पितृपक्ष’ मानला जातो ; येथें संदर्भ सर्व पूर्वजांचा आहे, ही गोष्ट जवळजवळ सगळ्यांनाच माहीत असेल). त्यामुळे, पितृभू असा शब्द योजल्यावर, ‘ज्यांचे पूर्वज पिढ्यान् पिढ्या या भूभागातले रहिवासी आहेत ’ , असा अर्थ साहजिकच ध्वनित होतो.
    • ‘पुण्यभू’ हा शब्द सावरकरांनी निर्माण केलेला आहे. तो पाश्चिमात्यांच्या ‘होली लँड’ (Holy Land) या कल्पनेवरून घेतलेला आहे, हे उघड आहे. म्हणजे, ‘जे लोक या भूभागाला पुण्यभूमी मानतात, महान मानतात ’, असा अर्थ येथे स्पष्ट आहे. मात्र, सावरकांच्या व्याख्येतील ‘पुण्यभू’ वाटणें , हें धार्मिक संदर्भातील नाहीं, तर तिचा महत्तेशी, थोरवीशी संबंध आहे.
      (उदाहरण द्यायचें झालें तर, ‘आई’ हें नातेंच पवित्र आहे, असा शब्दप्रयोग अनेकदा केला जातो; तेव्हां त्या ‘पवित्रते’चा अर्थ धार्मिक नसून, थोरवीशी जोडलेला आहे. त्याचप्रमाणें, ‘पुण्य’ असें म्हटल्यावर त्याचा अर्थ धार्मिकच असतो असे अजिबात नाहीं. ‘दुष्काळात दामाजीपंतांनी गरिबांना धान्य वाटून टाकले, हें पुण्यकृत्य केलें’ ; इथें धार्मिक कृत्य केलें असा अर्थ मुळीच होत नसून, सत्कृत्य केलें, महत्-कृत्य केलें, असाच अर्थ होतो. ‘पुण्यश्लोक’ असा शब्दप्रयोग केल्यावर त्याचा अर्थ ‘धार्मिक’ असा होत नाही, तर सद्वर्तनी, सद्प्रवृत्त असा होतो. संभाजीपुत्र शाहू यांस ‘पुण्यश्लोक’ म्हणतात, तें या अर्थानें ).
      म्हणजेच, सावरकरांच्या या व्याख्येत, ‘जे लोक या देशाला थोर समजतात, ज्यांची महत्तापूर्ण स्थळे या भारत-भूभागात आहेत ’ , असा अर्थ अभिप्रेत आहे. (काशी-प्रयाग वगैरे स्थानें आपल्याला महत्तापूर्ण वाटतात, तितकीच , शिवाजी महाराजांची राजधानी रायगड , परकीयांपासून या भूमीला वाचविण्यासाठी प्राण देणार्‍या मराठ्यांची युद्धभूमी पानिपत , जिथे शिवपुत्र संभाजी औरंगझेबाच्या कैदेत ताठ मानेने मृत्यूला सामोरा गेला तें वढू गाव , अशी स्थळेंसुद्धा आपल्याला महत्तापूर्ण वाटतातच ना ! ).
    • याहून अधिक खोलात जाऊन चर्चा करण्याचें ही जागा नव्हे. पण, यावरून हा मुद्दा स्पष्ट आहे, की, ही सावरकरीय व्याख्या, जातपात, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, वेदप्रामाण्य मानणारे-न मानणारे, अस्तिक (ईश्वराचे अस्तित्व मानणारे, या अर्थाने), एकेश्वरवादी-अद्वैतवादी-द्वैतवादी, इहवादी (जसे की चार्वाकपंथीय) , निरीश्वरवादी, जैन-बौद्ध-शीख-लिंगायत इत्यादी भिन्नभिन्न ‘मतें’ असलेले पंथ, चातुर्वर्णवादी, दलित, आदिवासी, वगैरे वगैरे सर्वांच्या पल्याड गेलेली आहे, सर्वसमावेशक आहे. इतकी विस्तृत व सुस्पष्ट व्याख्या दुसरी कुठली असेल असे वाटत नाहीं.
    • एका अर्थी, भारतीय संविधानानें, (तसें स्पष्ट न म्हणताही), ही व्याख्या स्वीकारलेली आहे, असें म्हणतां येईल. संविधानातील ‘ हिंदू लॉ ’ कुणाकुणाला लागू होतो, ते पहावे, म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल.

    धोडेसे धर्मनिरपेक्षतेबाबत.

    पाश्चिमात्यांनी १९ व्या शतकात, ‘धर्म’ म्हणजे ‘रिलिजन’ (Religion) असा अर्थ गृहीत धरला. भारतीयांच्या ‘धर्म’ या संकल्पनेचच्या विस्तृततेची त्यांना कल्पनाच नव्हती. परंतु, धर्म या शब्दाचा अर्थ खरें तर ‘रिलिजन’हून फार व्यापक आहे. शरीरधर्म, शेजारधर्म, पुत्रधर्म, कुलधर्म, युगधर्म, मानवधर्म, कर्मधर्मसंयोग, अशा अनेक शब्दांतून ही गोष्ट स्पष्ट होते. ‘धर्म’ या संकल्पनेचे महत्वपूर्ण विश्लेषण कुणाला समजून घ्यायचें असेल तर त्यांनी, ख्यातकीर्त विचारवंत श्री. नरहर कुरुंदकर यांचा, ‘शिवराज्याभिषेक त्रिशतकमहोत्सवा’च्या समयींच्या ग्रंथात लिहिलेला लेख वाचावा. ‘धर्मा’चे विविध अर्थ कोणते हें कुरुंदकरांनी विशद केलें आहे, आणि, शिवाजी महाराज कुठल्या अर्थाने धार्मिक होते व कुठल्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते, याचा ऊहापोह कुरुंदकरांनी तेथे केलेला आहे.

    • महात्मा गांधीजीबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून, नंतर हें सांगावेसें वाटतें की, ते व्यक्तिगत जीवनात ‘धार्मिक’ होते, व त्यांनी स्वत: तसा निर्वाळाही दिलेला आहे. पण, सामाजिक व राजकीय पटलावर ते ‘सेक्युलर’ मानले गेले आहेत (त्या बाबीच्या योग्यायोग्यतेची चर्चा तूर्तास करायची नाहींये, फक्त, तसे वास्तव आहे, एवढीच नोंद इथें करायची आहे ). सावरकर हे व्यक्तिगत जीवनात निरीश्वरवादी, जातिभेद न मानणारे, विज्ञानाची कास धरणारे असे होते. पण, त्यांची हिंदुत्वाची मूलभूत व्याख्या नीट न समजून घेतांच, किंवा पूर्वगृहदूषित (biased) वृत्तीने, त्यांना नॉन्-सेक्युलर ठरवलें गेले ! (सावरकरांचा राजकीय स्टॅन्स् --- stance --- काय होता व कां होता, हा वेगळा मुद्दा आहे. ती चर्चा तूर्तास अभिप्रेत नाहीं ).
    • कांहीं दशकांपूर्वी श्री. विठ्ठलराव गाडगीळ यांनी ‘सेक्युलरिझम’ या विषयावरील एक पुस्तिका प्रकाशित करून ती पार्लमेंटच्या सभासदांना वाटली होती (सर्क्युलेट केली होती). तिच्यात, त्यांनी, ‘सेक्युलर’ या शब्दाच्या संदर्भात, ‘निधर्मी/धर्मनिरपेक्ष आणि ‘सर्वधर्मसमभाव’ या बाबींची चर्चा केली होती. भारत हा देश सेक्युलर आहे, म्हणजे काय, तर इथें त्याचा, ‘निधर्मी’, ‘धर्मनिरपेक्ष’ असा अर्थ नसून, ‘सर्वधर्मसमभाव मानणारा’, असा अर्थ आहे, अशी त्यांनी मीमांसा केली होती.
      या सर्व विवेचनातून हाच अर्थ निघतो की, सावरकरांची ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या पूर्णपणें नॉनरिलिजियस (non-religious) आहे. लखनऊच्या शियांनी सावरकरांना अॅप्रोच् केलें असतां, तुमच्याशी आम्ही सहकार्य करू, अशीच भूमिका सावरकरांनी घेतली होती, याचा अर्थ उघड आहे. सिंधमध्ये तर कांहीं काळ हिंदुमहासभा पार्टी व मुस्लिमांचे संयुक्त सरकार होते, याच्या मागील खरा अर्थ आपण खोलात जाऊन समजून घ्यायला हवा.
    • समारोप : कुठल्याही कारणांनी का होईना पण, स्वातंत्र्यावीर सावरकरांबद्दल अनेक अपसमज आहेत ; आणि ते अपसमज, अपुर्‍या महितीमुळे, किंवा पूर्वग्रहांमुळे, बायस् मुळे (bias) झालेले आहेत. पण सावरकारांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वच उचललें होतें. (‘की घेतलें व्रत न हें अम्ही अंधतेनें …… बुद्ध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें’ असें त्यांनी म्हटलेलेंच आहे). पण त्या गैरसमजांमुळे होणारे नुकसान आपल्या सर्वांचे आहे. सावरकरांची मतें आपल्याला मान्य असोत वा नसोत, पण आपण निष्पक्षपणें त्यांचा संदर्भ आणि पूर्ण सुस्पष्ट अर्थ नीट समजून घ्यायला हवा, यात शंका नाहीं.
      सेक्युलरिझमचेंही तसेंच आहे. त्यासाठी व्यर्थचें ‘शंख फुंकणें’ व शड्डू ठोकणें नको ; त्यासाठी योग्य तो ‘वैचारिक चश्मा’ लावणें गरजेचें आहे. विचारी जन आज ना उद्या तसें करतील, अशी आशा आपण बाळगूं या.

    - सुभाष स. नाईक.
    सांताक्रुझ (प.), मुंबई.
    M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in.
    website : www.subhashsnaik.com

  • श्रद्धा की आत्मवंचन?

    जग एकविसाव्या शतकात दाखल झाले आहे, असे आपण अभिमानाने म्हणत असतो. या अभिमानाच्या मागे असते मानवाने वैज्ञानिक, तांत्रिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे पाठबळ. गेल्या शे-दीडशे वर्षात मानवाने शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगतीची शिखरे अतिशय झपाट्याने सर कलीत, यात काहीच शंका नाही.

  • नावडतीची लेकरे!

    सरकारकृपेने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आणि त्याच प्रमाणात उत्पन्न कमी झाले आणि म्हणूनच शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झाला. आता सरकारने शेती फायद्याची कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारने तसे लक्ष दिले तर शेतीसोबतच इतर अनेक प्रश्न आपोआप सुटतील.

  • एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – ३

    माणूस आयुष्यभर कमाईसाठी मरत असतो.यासाठी आयुष्यभर शरीराचे हाल करून पैसा कमवितो…नि म्हातारपणी तो मिळविलेला पैसा शरीराच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करतो…शेवटी गोळाबेरीज करताना हाती उरतं एक मोठ्ठ शून्य…

  • शाश्वत विकास का अडला?

    ज्या वाटेने जाऊन आजपर्यंत सगळ्यांचाच कपाळमोक्ष झाला आहे, त्याच वाटेने जाऊन आपल्याला मोक्ष मिळेल, ही आशा केवळ भाबडीच नाही तर प्रचंड अज्ञानमुलक म्हणावी लागेल. परंतु देशाचा गाडा हाकणारे अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस अधिकारी( देशाचा गाडा लोकनियुत्त* सरकार चालविते, हीदेखील मोठ्या प्रमाणात पसरलेली अंधश्रद्धा किंवा अफवा आहे) हे समजून घ्यायलाच तयार नाहीत.

    बदल आणि गती हे दोन्ही घटक परस्परपुरक आहेत.