(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग साठ

    जे जे देवासाठी ते ते देवासाठी या न्यायाने देवाला जी फुले वाहिली जातात, ती दुसऱ्या दिवशी तशीच टाकून देण्यापेक्षा औषधी म्हणून वापरली गेली तर ? आणि कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता, या निर्माल्याचे पूर्ण पावित्र्य जपून वापरवी गेली तर फुलांचे औषधी गुण पण मिळतील आणि दैवी गुण सुद्धा !

  • आहारातील बदल भाग ६४ – चवदार आहार -भाग २६

    सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव.
    तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते.

    हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत.

    सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत.

    हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. )

    स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे काम ही चव करते. या एका अति महत्वाच्या गुणामुळे ती वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रिय झाली आहे.

    रक्तवाहिनींचा संकोच करीत असल्यामुळे रक्तस्राव थांबवणारी,त्यामुळे शस्त्रकर्मींना हुकुमी शस्त्रच जणु !

    आतड्यांचे, गुदमार्गाचे आकुंचित करत असल्यामुळे अतिसार कमी करणारी, सहन होत नाही, सांगताही येत नाही वाले सगळे खुश !

    तसेच पित्त वाहिनीचा संकोच झाला तर पित्ताचे स्रवण पण कमी करण्यासाठी वापरली जाणारी, म्हणजेच पित्तशामक गुणाची त्यामुळे गॅस्ट्रोएन्टराॅलीस्टना भक्कम आधार देणारी.

    रोमकुपांचा संकोच झाल्यामुळे घाम कमी करणारी, त्यामुळे त्वचारोग तज्ञांना सावरून घेणारी.

    शुक्रवाहिनीचा संकोच झाल्यामुळे शुक्राच्या बाहेर पडण्यावर बंधन आणणारी, म्हणून शीघ्रस्खलनामधे उपयोगी ठरणारी, म्हणजेच सेक्स स्पेशालिस्टच्या भात्यातील मदनाचा बाणच जणु !

    केस जिथून उगवतात, त्या पेशींना आकुंचित करत असल्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे स्त्रीयांची जीवश्च कंठश्च सखी !

    मूत्रमार्गाचा अवरोध करत असल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी करवणारी, म्हणून मधुमेह तज्ञांना मदत करणारी

    स्थूलता कमी करण्यासाठी, भूकेवर संयम आणण्यासाठी पण ही तुरट चव वापरता येते. म्हणजे ढेरपोटे, तुंदीलतनु कमी करण्यासाठी धडपडणारे स्लीम सेंटर वाले भी खुश !

    हिरड्यांना बलदायक आहे. म्हणून प्रत्येक दंतमंजनामधे वापरली जातेच जाते. दातांची हलणारी मुळे या संकोच गुणामुळे मजबूत होतात. म्हणजे सर्व दात पाडणारे तज्ञ पण खुश !

    गुणांचा अभ्यास केला की द्रव्य कोणतेही असो, ते कसे काम करेल, याचा अंदाज बांधता येतो आणि इच्छित ठिकाणी जावून औषध काम करते.

    यासाठी युक्ती वापरावी लागते. ही ज्याच्याकडे आहे तो बुद्धिमान यशस्वी होतो.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    26.11.2016

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग दहा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे बावन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग दहा

    आपण पूर्वाभिभाषी असावे, असे वाग्भटजी म्हणतात. म्हणजे स्वतःहून इतरांशी बोलायला जाणे. समोरून ओळखीचा कोणी येताना दिसला की, आपणच त्याला हाय, हॅलो, राम राम नमस्कार, नमस्ते, कसं काय, अशा शब्दांनी बोलायला सुरवात करावी. म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण त्याचे वाटू लागतो.

    आपल्याला यापूर्वी मदत केलेली व्यक्ती, ओळख झालेली व्यक्ती, उपयोगी ठरणारी व्यक्ती, डोक्यावरून पाणी नेणारी स्त्री, ज्येष्ठ नागरीक, ओझे घेऊन जाणारा, खूप जोरजोरात चालणारा, किंवा विद्वान व्यक्ती समोर आल्यास त्यांना स्वतः बाजूला होऊन रस्ता मोकळा करून द्यावा.

    आज अॅम्ब्युलन्स, शालेय वाहाने, शववाहिका, पोलिसांच्या गाड्या, यांना रस्ता मोकळा करून द्यावा. त्यांना कोणतीही असुविधा आपल्यामुळे होऊ नये असे पाहावे.

    आपली गाडी एखाद्या ठिकाणी पार्क करत असताना, दुसऱ्याला त्याची गाडी आत बाहेर करायला त्रास होऊ नये, याचा विचार करून आपले वाहन कुलुपबंद करावे, अन्यथा आपल्यामुळे इतरांचा खोळंबा होऊ शकतो, याची जाण ठेवावी. याने वाद वाढून आपल्या सोसायटीमधील माणसे देखील दुरावतात. हे लक्षात घ्यावे.

    माणसं जोडण्याची ही कला आहे. ती जोपासली पाहिजे. कारण ऐनवेळी मोबाईल पेक्षा माणसेच उपयोगी होतात. ती आधी पासूनच जोडून ठेवावीत.

    मी बरा माझे काम बरे, ही वृत्ती आता सोडून दिली पाहिजे. मला काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशतात, असे म्हणून चालणार नाही. सतर्कता हवीच. आजूबाजूला काय चाललंय हे समजून घेतलं नाही तर बाजूच्या घराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही.

    मान दिला की मान मिळतो, मान मिळवण्यासाठी मान थोडी खाली झुकवावी लागली तरी चालते. लोकांनी आपल्याला मान दिला पाहिजे, ही अपेक्षा सोडून दिली की लोकमान्य होता येते, असे लोकमान्य टिळकांनी सुद्धा सांगितले आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १०.०९.२०१७

  • आहारसार भाग ७

    केवळ फवारणी करणार्‍या शेतकऱ्याला जर कॅन्सर होतोय तर हे धान्य खाणार्‍यांना तो होईल की नाही, हे नीट विचार करून पहावे. ही समस्या फक्त भारतातीलच आहे असे समजू नये. पूर्ण जगात या रासायनिक शेतीचे कॅन्सर रूपी राक्षसी परिणाम दिसताहेत.या रासायनिक खत आणि विषारी औषधे निर्माण करणार्‍या भांडवलदार कारखानदारांची लाॅबी एवढी मजबूत आहे, की कोणत्याही देशातील सरकार उलथवून टाकण्याची यांची ताकद आहे.

  • याला जीवन ऐसे नाव भाग २५

    पाणी शुद्धीकरण भाग पाच

    पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.

    त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
    एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.

    याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.

    हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
    काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.

    पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
    आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.

    पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.

    केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.

    एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.

    नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    01.01.2017

  • अक्षोटक / अक्रोड

    अक्रोड चवीला गोड, उष्ण गुणाचा जड व स्निग्ध असतो. हा वातशामक व कफपित्त वर्धक आहे. फल त्वचा हि तुरट चवीची व थंड असते.

  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग १

    अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात.
    झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ?
    मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा शब्दच मुळात केलेला नाही. म्हणजे वनस्पतींना खातोय म्हणजे जीवहत्या वगैरे काही नाही. अखिल मानवजातीला योग्य पूरक अशी रचना निसर्गाने केलेली आहे, हे विसरून चालणार नाही.

    आता आणखी एक लघुशंका.. प्रण्यांपासून मिळते म्हणून, दूध पण मांसाहारी म्हणे.
    वाद घालायचेच ठरवले तर अश्या शंका ठीक आहेत. पण मुळात मांसाहारी या शब्दामधेच त्याची मर्यादा स्पष्ट होते. ज्यामधे मांस आणि त्यातील रक्त असते, तसेच ते मांस ज्याला चिकटलेले असते ते हाड, किंवा अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे झाल्यास आयुर्वेदात जे धातु म्हणून वर्णन केले आहेत, तत्या रक्तापासून पुढील धातुंचे सेवन करणे म्हणजे मांसाहार ! असा ढोबळ विस्तार करता येईल. यात दूध येत नाही. पण अंडी येतात.
    असो.

    व्याख्यांच्या मर्यादेच्या जाळ्यात न अडकता, आपण माणसासाठी, आयुष्य वाढण्यासाठी, वाढलेलं आयुष्य संपूर्ण पणे निरोगी निरौषधी जगण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण बघतोय ना? मग निरर्थक वादात कशाला शिरा ?

    तुटे वाद संवाद तो हितकारी....

    आयुर्वेदात हितकर आणि अहितकर या शब्दाचा खूप विस्तृतपणे अर्थ टीकाकारांनी सांगितला आहे.
    आयुर्वेदाच्या उपयोगितेचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात,

    हिताहितम् सुखं दुःखम् ।
    आयुस्तस्य हिताहितम्
    मानंच्च तच्च यत्रोक्तं,
    आयुर्वेद स उच्चते।।

    अखिल मानवजातीला योग्य काय अयोग्य काय, हितकर काय अहितकर काय, सुखकर काय दुःखकर काय, या सर्वांची चर्चा किंवा अभ्यास, विचार ज्या शास्त्रात केला जातो, त्यालाच आयुर्वेद म्हणतात.

    पशु खातात केवळ पोट भरण्यासाठी
    मूर्ख खातात केवळ चव वाढण्यासाठी
    संत खातात साधना करण्यासाठी
    आणि बुद्धिमान खातात,
    शक्ती, आयु, आरोग्य मिळवण्यासाठी...

    आपण जो आहार खातो, त्याचा आपले आचार विचार, चिंतन, मनन, व्यवहार, स्वभाव, यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. म्हणूनच जैसे अन्न तैसे मन असे म्हटले जाते.

    शरीराचे स्वतःचे एक अर्थशास्त्र असते. अत्यंत आवश्यक असेल त्याची पूर्तता पहिल्यांदा केली जाते. त्यानंतर कमी महत्वाच्या गोष्टींकडे शरीर लक्ष देते.

    जसे अत्यंत गरीब व्यक्तीला प्रथम पोट भरण्यासाठी अन्न हवे असते. मग कपडे, घर, मनोरंजन, स्वादिष्ट भोजन वगैरे. शरीराच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावरच मनाच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. मन संतुष्ट झाल्यानंतरच आत्मा प्रसन्न होण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.

    शरीराच्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेनंतर ऊरलेली उर्जा, मनाच्या संतुष्टीसाठी वापरली जाते. त्यातून शिल्लक असलेल्या उर्जेतून आत्म्याच्या गरजांकडे लक्ष दिले जाते, ज्यांची साधना, उपासना, आराधना योग्य असेल त्यांना या आत्म उर्जेचा लाभ मिळतो. तेव्हाच तो ध्यान समाधी यावर लक्ष केंद्रित करू शकतो.

    म्हणजेच ही उर्जा मिळवण्याची सुरवात ही आहारापासून आहे. म्हणून हा आहार जेवढा सात्विक असेल तसे चित्तावरचे संस्कार शुद्ध होत जातात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    16.10.2016

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग पंधरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यात मला जे सुचतंय, ते लिहितोय.

    उतु नको मातू नको
    घेतला वसा टाकू नको.

    चातुर्मासात कहाण्या वाचायची पद्धत आहे. या कहाण्यांची सुरवात, एक आटपाट नगर होते..... अशी असते, मधेच कुठेतरी एखादी देवी किंवा मैत्रिणीच्या तोंडी हे वाक्य असते, उतु नको मातु नको, घेतला वसा टाकू नको... आणि पाचागावची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण असा शेवट असतो.
    त्यात तुझ्यातील अहंकार सोडून दे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे. असा उपदेश केलेला असतो. जे व्रत तु स्विकारलेले आहेस, ते टाकू नकोस. तेच तुझे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. अशी समज दिलेली असते. म्हणून आई सांगते उतु नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.

    उष्टे खाऊ नये.
    एकमेकांच्या उष्टे खाल्ले की, जंतुसंसर्गामुळे होणारे व्याधी वाढतात, असे आधुनिक विज्ञान पण सांगते. पाश्चात्य संस्कारामुळे आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे, वेगवेगळ्या कुकरी शो मधे केक किंवा अन्य पदार्थ एकमेकांना हाताने भरवणे, किंवा त्याच उष्ट्या चमच्याने इतर सर्वांना भरवणे, या किळसवाण्या प्रकारामुळे, चलता है यार! उष्टे खाणे गैर नाही, असा चुकीचा संस्कार नकळतपणे होत जातो. आज असं चुकीचं का केलं जातं माहिती नाही, पण एकमेकांच्या उष्ट खाण्याची चुकीची प्रथा रूढ होत जातेय. यावेळी आईने किंवा बाबांनी आपल्या मुलामुलींना समजावून सांगितले पाहिजे, की उष्टे खाऊ नये. जंतुसंसर्गाचा पुढे धोका आहे.

    घटाघट पाणी पिऊ नये.
    पाणी सावकाश प्यावे. नाहीतर ठसका लागण्याचा संभव असतो. उगाचच बाटली लावली तोंडाला आणि संपवूनच तोंडातली काढली असं करू नये. पाणी वरून पिऊ नये. भांड्याला तोंड लावूनच प्यावे किंवा स्वतःच्याच ओंजळीने प्यावे.म्हणून पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचे स्वतःचे भांडे स्वतःबरोबर नेणारी मंडळी होती.

    उगाच आरश्यात पाहू नये.
    नटण्या मुरडण्याला पण मर्यादा असतात. सतत आरशासमोर उभे राहाणे, सतत चेहेरा पाहाणे, यात वेळ किती जातो, हे लक्षातच येत नाही. हे ज्या काळात सांगितले गेले, त्यापेक्षा आताचा काळ फार बदलला आहे. इतरांना आपण सुंदर दिसावे, ही विशिष्ट वयातील धडपड चुकीची नाही, पण सतत आरशासमोर उभे राहाणे चुकीचे आहे, हे मुलीला सांगितले तर आईचे काय चुकले ?
    आता तर सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी काढताना तोंडाचे चंबू, गडू करून, ओठांची तोंडली नि आवळे करत, डोळ्यावरच्या भुवयांची धनुष्ये वाकवित, जेवढा विचित्र चेहेरा करता येईल तेवढा विदूषकी चेहेरा करण्याचा फंडा आला आहे. या काळानुसार बदलणाऱ्या फॅशन्स आहेत. हे आयुर्वेदात कुठुन येणार ? पण मूळ सूत्र सांगितलेले आहे, त्यात विस्तार करायला हवाच. जसा भाव चेहेऱ्यावर असतो, तसा तो मनी रूजतो. म्हणून चेहेऱ्यावर कधीही आठ्या नकोत. काही जणांना आठ्या पाडल्याशिवाय बोलताच येत नाही. आठ्या पाडून बोलू नकोस. असं आईने सांगितले आणि चेहरा नीट ठेऊन सेल्फी काढ, असे बाबा ओरडले तर काही चुकले का ?

    परवाच एकाने प्रश्न विचारला, माझ्या चेहेऱ्यावर काळे डाग आहेत, मी काय करू ? विचारणाऱ्याने नाव सांगितलेले नाही, वय माहिती नाही, म्हणून सहज त्याचा डीपी पाहिला. तर डीपीवरच एवढा भेसूर चेहेरा ठेवलेला होता. आणि त्या चेहेऱ्यावर काळ्या रंगाचे पट्टे. मी सहज बापाच्या भूमिकेतून त्याला मेसेजलो, "अरे, आधी डीपी बदल. चेहेऱ्यावर काळे पट्टे ओढलेला हा भयानक डिपी कशाला ठेवलायस ?" त्यावर तो उत्तरला, "मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर द्या. नसत्या चौकशा कशाला ? "
    आता याला काय उत्तर देणार. ?
    माझेच चुकले म्हणा. मी कर्तव्य भावनेने त्याच्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायला हवं होतं. पण जळ्ळं बापाचं काळीज बाहेर पडलं. आणि हे असं उत्तर ऐकून घ्यावं लागलं.

    बदलत्या काळानुसार पालकांनी पण बदलणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाशी संवाद करताना पण त्यांना रूचेल अशा भाषेत बोलायला हवे, हे पालकांनी समजून घ्यायला हवं.

    केसांना हात लावू नये.
    हे वाक्य म्हणजे सरळ सरळ आरोग्य जपणारा सल्ला आहे. केसांवर धुळ माती, बसत असते. त्यावर अनेक प्रकारचे जंतु चिकटलेले असतात. उगाचच केसातून हात फिरवायची सवय असणारी अनेक मुलगे मुली दिसतात. केसांवरून फिरवलेला हात न धुताच, बर्गर पिझ्झ्याला पण लागतोच. तोही शेयरींग मधे. म्हणजे अर्धा मी अर्धा तू. म्हणजे तिथेही स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जंतुसंसर्गाचा धोका.

    केसांची मुळे नाजूक असतील तर ती सतत हलत रहातात. आणि गळतात. इतरत्र उडतात.

    आधी डोक्यावर तेल घालत नाहीत, त्यात स्टाईल म्हणून उडत्या भुरूभुरूत्या केसातून बोटे फिरवीत राहिले, तर लवकरच गाॅन केस व्हायला वेळ लागणार नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १०.०८.२०१७

  • किचन क्लिनीक – कढिपत्ता

    हि वनस्पती न ओळखणारी भारतीय व्यक्ती अत्यंत दुर्मिळ असेल.बहुतेक करून शाकाहारी जेवणामध्ये ह्याचा वापर जास्त केला जातो.फोडणी मग ती कशाला ही असो चिवडा,उपिट,पोहे,आमटी,डाळ,फोडणीचा भात,भाज्या अशा एक ना अनेक पदार्थांना फोडणी देण्यासाठी ह्याचा देखील आवर्जून वापर केला जातो कारण ह्याच्या विशिष्ट रूचीवर्धक सुगंधाने (इथे मन मोहक वापरणे इष्ट वाटले नाही)प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवितो.असा हा कढिपत्ता .

    ह्याचा व्रुक्ष असतो.ह्याच्या पानांचा उपयोग जेवणात केला जातो.चवीला कडू,तिखट,तुरट अशी मिश्र चव आणी थंड असा हा कढिपत्ता शरीरातील वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवतो.

    ह्याचा उपयोग देखील आपण घरगुती उपचारांमध्ये करू शकतो बरे का!अगदी डोळयांपासुन ह्रूदयाचा पर्यंत ब-याच अवयवांना हा हितकर आहे.चला मग पाहूयात ह्याचे औषधी उपयोग.

    १)एॅसीडीटी मध्ये २ चमचे कढिपत्ता रस+१ चमचा लिंबु रस+ २ चमचे खडीसाखर हे मिश्रण चाटावे.

    २)गजकर्ण,खरूज,इसब अशा त्वचा रोगात कढिपत्त्याची चटणी बनवून ती गरम करून त्या भागावर लावावी.

    ३)ज्यांना वारंवार जंत होतात त्यांनी साधारण पणे १५-२० दिवस १ चमचा कढिपत्ता चटणी गुळात मिसळून पाण्यासोबत गिळावी.

    ४)मार लागणे,ठेचलागणे,मुरगळणे ह्यामुळे आलेल्या सुजेवर कढिपत्ता + हळद ह्याच्या पोटीसाने शेकावे.

    ५)बरेचदा गांधीलमाशी,मधमाशी,कोळी असे किटक अंगावर चिरडून मरतात आणी त्या जागी विखार होतो आणी मग आग होणे,खाज सुटणे,पुरळ येणे अशा तक्रारी सुरू होतात तेव्हा कढिपत्ता चुरून त्या भागावर लावावा.

    कढिपत्ता अतिप्रमाणात खाल्ल्यास तोंडाला कोरड पडते,संडासला घट्ट होणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

    आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

    या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

    जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

    रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

    जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची....
    आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

    डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

    म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

    अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
    रोजच्या रांधा वाढा... या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही....

    रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

    एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.03.2017