वेगान् न धारयेत
न प्रवृत्तयेत
वेगांचे धारण करू नये अगर मुद्दाम प्रवर्तन करू नये.
म्हणजे शास्त्रकार असे सांगतात की, शरीराकडून आतून जे सांगितले जाईल तेवढे त्या वेळी करावेच. आणि जर केले नाही तर त्रास होणार हे शंभर टक्के सत्य आहे.
तहान, भूक, उलटी, संडास, लघवी इ. असे एकुण तेरा वेग आहेत, ज्यामधे त्याला विसरून चालत नाही.
जसे, उलटी होते, शिंक येते, लघवी होते, ही शरीराच्या चांगल्यासाठीच असते. पण उलटी होत नसताना उगाच सुके ओकांबे काढणे म्हणजे निव्वळ दमछाक करून घेणे आहे.
शिंक आल्यावर जरूर शिंकावे. पण उगाचच टा. पा. (टाईमपास) म्हणून नाकात काड्या घालतात, ते नाकाला हुळहुळ निर्माण करण्यापलीकडे काही करत नाही.
तशीच तहान लागणे आणि पाणी पिणे हे करावेच. तसेच तहान लागली नसताना पाणी पिणे म्हणजे किडनींची निव्वळ दमछाक होते. जेव्हा शरीराला पाण्याची गरज लागेल तेव्हा, शरीर तहान हे लक्षण निर्माण करतेच. तहान कळलीच नाही तर घश्याला कोरड पडेल, लघवीला पिवळसर होईल, लालसर होईल, जळजळ होईल, अर्थात अशावेळी सुद्धा साधे पाणी पिऊ नये तर, धने जिरे घालून उकळलेले पाणी थोडे थोडे घोटघोट प्यावे.
तहान लागणे आणि सारखी तहान लागणे, यातील सूक्ष्म फरक समजला पाहिजे. मधुमेहासारख्या आजारात जी वारंवार तहान लागते ती, रोग स्वरूपात असते. ती पाणी पिऊनदेखील थांबत नाही, भागत नाही, अशावेळी तो वेग नसून रोग आहे असे समजावे. ( ज्यावेळी पाणी पिऊन त्याचे समाधान होते, त्यावेळी तो शरीराकडून निर्माण झालेला वेग असतो. आणि तहान लागून पाणी पिऊनही जेव्हा त्याचे समाधान होत नाही, असे जेव्हा तोआपल्याला सांगतो, तेव्हा "आता वैद्याला दाखवून घ्या" असे तो, आपल्याला सूचित करतो. हे समजले पाहिजे.)
जसे कफ झाला असता उलटी होणे वेगळे आणि रोग म्हणून उलटी होणे वेगळे आणि तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली वमन म्हणजे पंचकर्मातील उलट्या करवणे वेगळे !
यातील फरक, पुस्तक वाचून किंवा वाॅटसप मेसेज वाचून कळणार नाही. याकरीता पूर्वीचा आपला स्वतःचा किंवा तज्ञ वैद्याचा अनुभव महत्वाचा आहे.
हे सर्व करवून घेणारा तो असतो.
दैनंदिन दिनचर्येतील त्याचे महत्व, त्याचे अस्तित्व, त्याचा आपल्याशी होणारा सुसंवाद,
हे समजून घेणाऱ्याला, नक्कीच समजून येईल. हे जो समजून घेईल, त्याला दुःख कधीच होणार नाही.
कारण तो म्हणजे फक्त सत् चित् आनंद !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
13.12.2016
माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच " माया " असे म्हणतात वाटतं.
एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख.
असो.
मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, म्हणून गाता बोलता येते, भांडताही येते. असं इतर कार्निवोरस, हर्बीवोरस ना नाही करता येत.
नजर रोखून, डूक धरून खाणे हे माणसाला जमत नाही. एखादा पदार्थ आवडला नाही तर नाक मुरडेल, पण मारक्या बैलासारखा, किंवा कुत्र्यामांजरा सारखा दुसऱ्या वर गुरगुरत तर खाणार नाही. बायकोने केलेलं कसं निमूटपणे गिळतो !!! ( म्हणजे तसं करायचं तरी असतं. )
सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री असं रोज चार वेळा तरी पोटभर जेवतो. तरीदेखील काही जणांना रात्री परत भूक लागतेच. माणूस मांसाहारी प्राण्यांसारखा एकदा पोटभर खाल्ले की पुढे चार दिवस उपास नाही करत.
माणसाची आतडी, मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लांब असतात, तर शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लहान असतात.
मांसाहारी प्राण्यांप्रमाणे तोंड उघडे ठेवून, जीभ बाहेर काढून, श्वासोच्छ्वास करीत तापमान संतुलीत राखत नाही, की अंग चाटत बसत नाही. उन्हाळा आला की घाम खूप येतो, थंडी आली की शू शू खूप करतो आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढतो.
माणसांच्या अंगाला दुर्गंधी नाही. कारण दररोज आंघोळ करतात. अपवादाने काही महाभाग असतीलही. पण ते घरात रहात नाहीत, हाॅस्टेलला रहात असतील कदाचित !
दया, प्रेम, वात्सल्य, लळा माणसांमधे असते.
नरो वा वानरो वा !
मांसाहारी नरांइतके क्रूर नसतात. हे नक्की.
माणसाचे डोळे जन्मतःच उघडलेले असतात. पण मिटून घेऊन झोप आणल्याचं सोंग मात्र उत्तम वठवतो. मला माहित नव्हतं, विसरलो, जमलंच नाही, सहन झालं नाही, झेपत नाही, ही अशी कारणं हर्बीवोरस किंवा कार्निवोरस देत नाहीत. त्याने नियम केलाय तो पाळण्यासाठी. टाळण्यासाठी नाही. बुद्धीचा अतिवापर झाल्यानं, त्यालाच टाळायला, पिटाळायला, रिटायर करायला निघालेल्यांना काय सांगणार आणि कसं समजवणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
2.10.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग सहा
औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला.
औषधे किती हवी जवळी ?
औषधे ? कि, "ती" हवी जवळी ?
औषधांमधे ताकद आहे कि "तिच्यामधे" जास्ती ताकद आहे.
जर "ती" जवळ असेल तर,
जर तिने जवळ घेतले असेल तर ,
जर तिला जवळ धरले असेल तर,
औषधे कशाला हवीत ?
असं या प्रश्नकर्त्याला विचारायचे आहे.
ती माझे सर्वस्व!
ती माझी प्रेरणा !
ती माझी धारणा !
ती माझी शक्ती !
तीच माझी भक्ती !
शक्तीचीही शक्ती तीच तूही !
सतत असतेस अंतरी
न दिसशी दुसऱ्यास जरी
माझी कर्ती करविती
बोलवती धनी तीच तूही !
केवळ बाजूला बसूनी
सतत सूचना करूनी
घेते गाडी चालवूनी
दुसऱ्या करवी
कधी कोपशी
कधी उर्वशी
कधी फटकारीशी
कशी कवटाळीसी
अशी कशी तू ललना
सांभाळीशी माझ्या जीवना
माझा प्राण तू
माझा श्वास तू
माझा भास तू
अंतरीची आस तू
तू माझे जीवन
जीवन झाले पावन
पावन होण्या कारण
कारण माझे मन !
मनासी देसी कामना
आत्म्यासी चेतना
शरीरासी वासना
तूची देसी
जन्मलो तुझ्यासाठी
जगेन तुझ्यासाठी
सोडलीस जर साथ तू
मृत्युही उभा दारी
सोडू नको साथ अशी
दुधावरची साय जशी
मुलाला माय तशी
रहा जवळी माझेपाशी
खरंय हे ?
एवढी ताकद आहे "तिच्यामधे" ?
का शंका का यावी मनामधे ?
एवढी जपावी ह्रदयामधे ?
अशी कोण लागोन गेली ?
"ती" म्हणजे कोण हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर अवलंबून आहे.
मला "ती" म्हणजे "प्रतिकारशक्ती" वाटली.
आणि आपल्याला. ?
वाचा पुनः
- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
24.04.2017
आजची आरोग्यटीप
असे का ?
मांस खाण्याविषयी दोन माणसांमधे तरी एकमत कुठे होते. ? प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या. प्रत्येकाची मते वेगळी. परस्पर अगदी विरूद्ध.
भारतातील हिंदु गाईला माता मानतात, ते गोमांस खात नाहीत, तर इतर देशा धर्मातील नव्हे तर भारतातील मुसलमान गोमांस खातात. ते माता बिता काही मानत नाहीत. पण मुसलमानांना डुकराचे मांस पूर्णतः निषिध्द. नाव सुद्धा चालत नाही. बाकी दोघांनाही शेळ्या मेंढ्या बकऱ्या चालतात. असे का ?
भारतातील जाऊ देत, जपानमधे कच्च्या मांसाचे लोणचे चटणी आवडीने खाल्ली जाते, तर इंग्लंडमधे मात्र कच्चे मांस खाणे अशिष्टपणाचे समजले जाते. असे का ?
चीन तैवान मधे कुत्र्याचे मास खाल्ले जाते, पण युरोपीयन देशात कुत्र्याचे मांस हा शब्द उच्चारला तरी ए, कुत्र्या म्हणून शिवी ऐकायला येईल. असे का ?
अरब देशात घोड्याचे आणि उंटाचे मांस प्रिय आहे, ऑस्ट्रेलियातून घोड्याचे मांस अरबांना विकले जाते, म्हणून अमेरीका, ऑस्ट्रेलियावर बंदी घालायची मागणी करते. असे का ?
डुकराचे साॅस खाणारे जर्मन, म्हणून इंग्रज लोक त्यांची टिंगल करतात, तर मासेमारीसाठी विनाकारण वेळ फुकट घालवणारे म्हणून इंग्रजांची जर्मनीमधे चेष्टा होते. असे का ?
अर्जेंटिना, मेक्सिको येथे हाॅटेलमधे जिवंत प्राणी तुमच्यासमोर आणून त्यातील कोणता अवयव तुम्हाला आहे, असे विचारून तुमच्या समोरच त्याला कापून तो अवयव तुम्हाला देतात, हे पाहून युरोपीयन माणूस चक्कर येऊनच पडतो. असे का ?
मध्यपूर्वेमधले देश प्राण्यांची हत्या करताना त्यांचा गळा चिरतात आणि वाहाणारे रक्त गर्दी करून गटागटा पितात, हे वाचताना देखील अस्सल मांसाहारींच्या अंगावर काटे येतात. असे का ?
भारतातील अस्सल मांस खाणारा जेव्हा अमेरीकेत किंवा युरोपमधे जातो, तेव्हा तेथील स्टेक म्हणजे नुसत्या वाफवलेल्या मांसाच्या तुकड्याला घश्याखाली घालवताना यांचा जीवच जातो. असे का ?
भारतातील बंगाली माणूस माशाचे डोकेपण आवडीने खातो, पण बिहारी लोकांना, साधे मासे पण खाता येत नाहीत, म्हणून बंगाली बाबु चिडवतात. असे का ?
भारतातील शीख लोक एका झटक्यात मारलेला प्राणीच खाण्यासाठी वापरणार पण मुसलमान मात्र प्राण्यांचा गळा अर्धा चिरून सारे रक्त वाहून गेल्यावर, हाल हाल होऊन मेल्यानंतरचे हलाल मांस खातात. दोघांनाही दुसऱ्या प्रकारचे मांस अजिबात चालत नाही. असे का ?
हे सर्व बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते, की मूळ संस्कार, तेथील नैसर्गिक उपलब्धता, धर्म भावना, जमिनीची कृषी उत्पादनांची सकसता आणि स्वाभाविक ओघ इथपर्यंत आपण पोचतो.
जिथे अन्नधान्यांचे उत्पादनच न के बराबर आहे तिथे जगण्यासाठी मांस खाण्यावाचून पर्यायच नव्हता. पण आता तसे नाही. काळ बदललाय, संसाधने बदलली आहेत. मेहनत केली तर, अन्नधान्याचा तुटवडा कधीही पडणार नाही एवढी उपजाऊ जमिन शिल्लक आहे, अशा देशात आता शेतीमधे बदलाचे वारे वाहू लागले आहेत....
गरज आहे आपल्या मानसिकतेमधे बदल करण्याची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
7.10.2016
पाणी शुद्धीकरण भाग चार
पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात.
दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. ही वात ओली करावी. त्याचे दुसरे टोक बाहेर काढून खालील मडक्यात असे लोंबत ठेवावे की, वरच्या मडक्यातील पाणी थेंब थेंब वातीवरून खाली ठिपकत राहील. दोन्ही मडक्यावर नीट आच्छादन घालावे.
वरच्या मडक्यातील काही अशुद्धी, वातीमुळे खालील पाण्यात येणार नाही. फक्त वरच्या मडक्यातील तळापर्यंत गेलेल्या वातीच्या पातळीपेक्षा दुसरे टोक आणखी खालील पातळीवर आले पाहिजे, हे पहावे.
ही वात घसरून खाली येऊ नये यासाठी वरच्या मडक्यात वातीवर एखादी वाटी वजनासाठी ठेवावी.
टीप टीप बरसा पानी.... सुरू होईल.
वरच्या मडक्यातील पाणी गाळून आपोआप खालील मडक्यात जमा होईल. वरच्या मडक्यातील पाणी कमी होत जाईल. खालचे मडके भरत जाईल.
वातीला चिकटलेली धुळ, माती सारखी अशुद्धी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहाता येते. कापडाची वात धुवुन वाळवून ठेवली की, पुनः दुसऱ्या दिवशी वापरायला तयार !
खर्च म्हणाल तर काही नाही. मडक्यामुळे पाणी थंड पण होईल. वरील मडक्यात रोज एखाददुसरे सुगंधीत फूल किंवा पान किंवा बी किंवा वाळ्यासारखे सुगंधी असलेले एखादे मूळ ठेवावे. त्याचा वास, अर्क, आणि काही प्रमाणात सूक्ष्म औषधी गुण पाण्यात येतील.
दररोज औषधीयुक्त शुद्ध गाळलेले थंडगार पाणी मिळत जाईल.
करून तर बघा,
गंमत म्हणून !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.12.2016
शाकाहारी आहारात जी विविधता आहे, ती मांसाहारामधे नाही.
मीठापासून ते अगदी लिंबू, लोणचे, कोशिंबीर, चटणी, सोलकढी, पापड, कुरडया, भजी, वडे, दही, हे सर्व पदार्थ शाकाहाराची शान आहे. आणि भारतीय मांसाहारात वर्ज्य नाहीत.
डाव्या बाजुला असणारे हे चटकमटक पदार्थ जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण एखादा मुख्य पदार्थ जर ढेपाळला तर, पूर्ण जेवणाला सांभाळून घ्यायचे महत्वाचे कामही करतात. आहार परिपूर्ण होण्यासाठी हे पदार्थ आवश्यकच आहेत.
आहारातील सहा चवींपैकी तीन चवी या डाव्या बाजुलाच आहेत. आंबट, खारट, कडू. जेवताना या चवींचा वापर युक्तीने करायचा असतो. यातील एकही चव कमी होता नये, तरच आहार परिपूर्ण होतो. हे लक्षात ठेवावे.
या प्रत्येक चवीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. ते जेवताना जपले पाहिजे. एखादा पदार्थ बंद केला तर तो आहार पूर्ण होणार कसा ? पुनरूक्ती दोष स्विकारून लिहितो,
मधुमेह झाला तर गोड बंद केले जाते.
पित्त वाढले तर आंबट, तिखट बंद.
रक्तदाब वाढू नये म्हणून खारट बंद.
आवडत नाही, म्हणून कडू पण बंद.
राहिली फक्त तुरट चव. ज्यातून पोषण काही होत नाही.
मग आपले जेवण परिपूर्ण कसे बनणार ?
आणि पॅथाॅलाॅजीचे रिपोर्ट पण परिपूर्ण कसे येणार ? एखादी चव इकडेतिकडे झाली कि त्याचा परिणाम रिपोर्टमध्ये दिसणार. त्याची पूर्तता करायला एखादी गोळी कायमची सुरू होणार.
त्यापेक्षा आपले नेहेमीचे जेवणच संतुलित ठेवावे. हा सोपा उपाय.
एखाद्या चवीचा पदार्थ काय गुणाचा, अवगुणाचा आहे, हे शास्त्रकारांनी ग्रंथात वर्णन केले आहे.
म्हणजे खारट पदार्थांनी केस गळतात, कडू चवीने धातुक्षय होतो, गोड पदार्थ खाल्ले की चरबी वाढते इ.इ.
याचा अर्थ ती चव अवगुणीच आहे, ती कायमची बंद करा, असे मात्र नक्कीच नव्हे.
तात्पुरत्या बिघडलेल्या दोषांवर विजय मिळवण्यासाठी त्याचे सर्व गुणअवगुण परिचित असावे लागतात, म्हणून त्यांना साम्यावस्थेत, म्हणजेच पूर्वपदावर आणण्यासाठी काय युक्त्या योजाव्यात, याचे दिशादर्शन वैद्यांना होते. म्हणून ग्रंथ शिकायचे असतात. त्यांना प्रमाण मानायचे असते, पण व्यवहारात मात्र स्थळ काळ वेळेनुसार यात बदल करण्याचे सर्व अधिकार ग्रंथकारांनी वैद्यांकडे दिलेले आहेत.
एखादा मुलगा वांड असतो, एखादा अवगुण त्याच्यात असतो, म्हणून आई बाबा त्याला झिडकारत नाहीत, तर युक्तीने त्याचा अवगुण कसा कमी करता येईल, हे पहातात. काहीवेळा प्रेम करून, काहीवेळा समजावून, कधीतरी थोडीफार शिक्षा करून, तो अवगुण काढण्याचा प्रयत्न करणे याला जीवन ऐसे नाव !
इथे तर कोणीच परिपूर्ण नाही. जेवणात आणि जीवनात देखील ! कुठेतरी कोणीतरी कमी अधिक असणारच.
परिपूर्ण तर नवीन सुन पण नाही, आणि अनुभवी सासु पण नाही. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांचे गुण अवगुण जाणणे, एकमेकांच्या चवी समजून घेणे, हे घर सांभाळण्यासाठी, अत्यंत आवश्यक आहे. तरच उत्तम संसार होतो.
मनापासून प्रेम करणारी, पण बाहेरून तत्वांसाठी भांडणारी, अवखळ फटकळ बहिण भावासाठी बाहेरून आंबट, पण आतून मधुर असते, पण नणंद या भूमिकेतून तिखट वाटते. मेहुणीचे मात्र तसे नसते हो, ती सदाबहार मधुर असते.
तसेच या चवींचे आहे.
कोण जास्त तिखट आहे, कोण कडू बोलतंय, हे इतरांनी समजून गोडपणा वाढण्यासाठी, काय करायचं हे ठरवावं लागतं. आमटी तिखट असली तर त्याला बॅलन्स करणारा आंबट आणि गोड पदार्थ वाढवावा, की झाले. तिखट आमटी टाकून देण्याची आवश्यकता नाही.
हे ज्या घरातील सासु सुनाना कळते ते घर सुदृढ होते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.11.2016
शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ?
मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते.
न मांसभक्षणे दोषः
न मद्येच न मैथुने
प्रवृत्तिरेषा भूतानां
निवृत्तिस्तु महाफला
असं स्मृतीग्रंथकार म्हणतात.
म्हणजे मांसभक्षणात दोष नाही. मद्यपानात दोष नाही. मैथुनातही दोष नाही. या गोष्टी करण्यामधे लोकांचा नैसर्गिक कल असतो. स्वभावतःच ओढ असते. ही प्रवृत्ती आहे. आणि त्यातून निवृत्ती मिळवता येणे हे महाफल आहे. हे जास्त महत्वाचे.
न मांसभक्षणे दोषः एवढाच (सोयीस्कर अर्थाचा) भाग सांगितला गेला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो, एवढेच सांगायचे होते.
अर्धवट श्लोक वाचून सोयीस्कर अर्थ काढले की चुकीच्या गोष्टींची भलावण करता येते, असा सध्याचा प्रघातच आहे. योग्य आणि अयोग्य याचा सारासार विचार करणे आणि निर्णय घेणे याला विवेकबुद्धी म्हणतात.
मांसाहार करणारे लोक आपली सोय बघतात. शाकाहार करणारे आम्ही कसे योग्य ते सांगत बसतात. त्याचे पुरावे पण सादर करतात.
गरज आहे वर्तमानात रहाण्याची. इतिहास यासाठी अभ्यासायचा, की त्यावेळी ज्या चुका झाल्या, अज्ञानामुळे केल्या गेल्या, त्या उज्वल भविष्याचा विचार करता, वर्तमानात होऊ नयेत.
प्राचीन भारतात मांसाहार सर्रास चालत असे, सर्व वर्णाचे लोक मांस भक्षण करीत होते, यज्ञासाठी पण प्राण्यांची हत्या होत होती, स्मृतीग्रंथातही मांसाहाराची भलावण दिसते, आयुर्वेदातही मांसाचे वर्णन आढळते.........
या सर्वात नाकारण्यासारखे काही नाही.
त्या काळात ते संमत होते. काळ बदललाय. आपणही नको का बदलायला ?
ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका आपणही परतपरत करायच्या का ?
नरबळींची प्रथा गेल्या शतकापर्यत भारतात सुरू होती. पण आज ? ती नाही. (अगदीच विकृत मनोवृत्तीतून नाकारता येत नाही.)
नरमांसभक्षक टोळ्या पूर्वी होत्या. आता नाहीत.
सतीची प्रथा, बालविवाह, जंगली प्राण्यांची शिकार, पुत्रप्राप्तीसाठी नियोग पद्धत, बहुपत्नीत्व इ.इ. गोष्टी संस्कारीत समाजाने अधिकृतपणे कायद्याने बंद केले आहे. आणि हे मोठे बदल जेमतेम साठ सत्तर वर्षातील आहेत.
वाल्या कोळ्याचा, वाल्मिकी ऋषी होऊन समाजमान्यता पावतो.
सार्वभौम राजा सम्राट अशोक आयुष्याच्या एका टप्प्यावर शाकाहारी बनला. जैन धर्माचे चौवीसावे तीर्थंकर महावीर जैन यांनी मांसभक्षण करू नये, अशी आज्ञाच काढली.
ज्यांच्या जन्मापासून मांसाहार सुरू असतो, अश्या अन्य धर्मातील लोक देखील आता मांसाहाराचा त्याग करू लागली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरीका स्थित नासा या स्पेस रिसर्च सेंटरचा नियमच आहे, अवकाशात जावू इच्छीणाऱ्या अंतराळरवीरांनी शाकाहारी बनले पाहिजे !
भारतातील आताचा सर्वे असं सांगतोय की भारतात शाकाहारी लोकांची संख्या वाढली आहे. आपण चुकीच्या गोष्टींचा त्याग करतोय, बदल होतोय, ही चांगली गोष्ट आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने, सण व्रतांच्या निमित्ताने चांगले आरोग्य मिळवण्यासाठी चाललेले ही प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील, सर्व समाज पुनः सत्वगुणी बनेल अशी आशा आहे.
बदल हा होतच रहातो. चांगल्यासाठी स्थित्यंतर घडणे, हे कालानुरूप होतच आले आहे. होतच रहाणार.
प्रश्न आहे, आपण त्यात सामिल होणार की नाही याचा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
6.10.2016
पाणी शुद्धीकरण भाग नऊ
या अति शुद्धिकरणाच्या भीतीमुळे काहीवेळा वाटतं आपणच आपल्या पोरांच्या पायावर धोंडा मारून घेत आहोत का ?
ती शाळेची विहीर..विहिरीजवळ पोरांची गर्दी एकाने घागर भरुन पाणी काढायचे. बाकीच्यांनी आपल्या हाताची ओंजळ धरून रांगेत उभे रहायचे आणि त्या ओंजळीत ती घागर रिकामी व्हायची. चड्डीलाच हात पुसत, आणि खांद्याला नाक पुसत धावत वर्गात पहिले कोण पोचतो यातही स्पर्धा व्हायची, बिचारा पाणी काढणारा तसाच तहानलेला रहायचा....
आठवतंय का शाळेतील पाण्याचे पिंप ? पी ई चा तास संपला की, धावत पळत पिंपाभोवती पाणी प्यायला धावत जाणं.... एकाने नळाखाली भांड धरलं असताना मधेच कोणीतरी नळ बंद करणे, पाणी वरून पित असताना मुद्दाम कोपरावर हात मारून पाणी त्याच्या शर्टावर सांडणे, मग रागाने भांड्याला तोंड लावूनच पाणी पिणे, खूप घाई असली तर नळाखाली पाणी पडण्याची वाट न बघता पिंपाचे झाकण काढून वरूनच भांडे बुचकळवून प्यायलेले पाणी. हातावरची सर्व शुद्धी पाण्यात उतरायची...
गंमत होती सर्व ...
गेली ती सारी गंमत.....
"एवढं अशुद्ध पाणी तुम्ही पित होतात बाबा," लेकीनं प्रांजळपणे प्रश्न विचारला. तिला म्हटलं,
" यामुळेच आमची इम्युनिटी वाढत होती. असंच पाणी पिण्याची सवय लहानपणापासून असल्यामुळे चांगलं शुद्ध पाणीच कधीतरी बाधायचं...." माझं तिरकस उत्तर.
त्यावर ती म्हणाली,
" आमच्या शाळेतच्या बाजुला लमाणी लोकांची वस्ती आहे. तिथली मुलं आम्ही खेळताना पाहून ग्राऊंडवर येतात आणि आमच्याबरोबर खेळतात. काय साॅलीड स्टॅमिना असतो एकेकाचा, पण अस्वच्छ दिसतात. आंघोळ नाही. वर कपडे नसतातच, सर्व अंगाला माती लागलेली, हात न धुताच खातात, पाणी पण साधेच पितात, न ऊकळलेलं."
तेव्हा लेकीला कुलकर्ण्यांची एक चारोळी ऐकवली,
" पिंपळाचं झाड कसं कुठेही उगवतं,
कुठेही उगवतं,
म्हणून त्याचं
कसंही निभावतं "
खरंच आहे, यानेच त्यांची प्रतिकारक्षमता वाढत असेल का ?
जमिनीवर पडलेलं खायचं नसतं, आमच्या लहानपणी खाली पडलेली एक सुद्धा चिंच, बोर किंवा लिमलेटची गोळी वाया जाऊ देत नव्हतो. काळा झालेला आंबा, काळा भाग काढून टाकून खात होतो, पक्ष्यांनी खाऊन टाकलेले पेरू आधी खात होतो, चुकुन खाली पडलेला प्रसादाचा पेढा किंवा फुटाणा मटकावीत होतो, आता आमच्या पोरांना शाळेला जाताना रोज उकळलेलं पाणी देतोय, पण शेंबडं ते शेंबडच !
जरा पाणी बदललं, सहलीला गेली, भेळवाल्याकडचं पाणी प्याली, मामा मावशीकडून सुट्टीवरून आली की आजारी पडलीच म्हणून समजा. असं का ?
एवढ्या निर्जंतुक पाण्याची रोज सवय असली तर जरा कधी पाणी बदललं तर आजारी पडणारच ना !
आजच्या भाषेत "इम्युनिटी" कशी वाढणार आणि कधी वाढणार ? जरा पिऊ देत ना साधं पाणी, बारा गावं, बारा ठिकाणचं पाणी पिऊन सगळीकडचं पाणी पचवायची सवय होते ना ! आणि एखाद्या रोगाची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, दंडावर, अर्धवट मारलेले रोगजंतुच टोचून भरतात ना !
हे असं लिहिलेलं पण काही मातांच्या पचनी पडणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.01.2017
।।वक्रतुण्डाय नम:शमीपत्रं समर्पयामि ।।
पांडवांनी युध्दात आपले शस्त्रसांभार ठेवायला ह्याच वृक्षाचा आसरा घेतला होता.आणी दसऱ्याला त्यांनी ह्या वृक्षाची पुजा करून मग युद्धाला सुरूवात केली होती.
ह्याचा लहान व मध्यम उंचीचे काटेरी वृक्ष असतो.ह्याची त्वचा धुरकट व रूक्ष असते.८-१२ अवृन्त पत्रकांच्या जोड्या असलेली पाने असतात.पानांवर बारीक कण असतात.फुले लहान पिवळसर,५-७ सेंमी लांबीची व मंजीरी स्वरुपाची असतात.फळ १०-१५ सेंमी लांब,लंबगोल १०-१२ बिया असणारी शेंग असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फल.
आता ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:
त्वचा: चवीला तुरट,कडू असते व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.
फल:चवीला गोड,उष्ण,जड व रूक्ष असते.
शमी ही कफपित्तनाशक आहे.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
सालीचा लेप हा विषनाशक आहे.
फळाची राख हि शरीरावरील रोमशातन अर्थात केस काढायला उपयुक्त आहे.मग ह्याचा वापर बायका हेअर रिमुव्हर म्हणून करू शकतील पण योग्य सल्ल्यानेच बरे.
शमी कृमिनाशक असल्याने जंतांमध्ये उपयुक्त आहे.
मुळव्याध,आवपडणे,जुलाब ह्यात देखील हिचा उपयोग होतो.
त्वचा रोगात हिच्या सालीचा लेप उपयोगी आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात.
ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप असते.ह्याची पाने आपण स्वयंपाकात वापरतो.ह्या पानांना एक छान ताक्ष्ण सुगंध येतो.
पुदीना हा चवीला तिखट व उष्ण असतो आणी तो शरीरातील वात व कफ दोष कमी करतो.ह्याचा वापर जसा स्वयंपाकामध्ये होतो तसाच तो घरगुती उपचारात देखील केला जातो.
चला तर पाहूयात ह्याचे औषधी उपयोग:
१)वेदना असलेल्या भागावर पुदिन्याची चटणी वाटून तिचा लेप लावावा.
२)नैसर्गिक माऊथवाॅश होय,पुदिन्याचा २ चमचे रस ग्लास भर कोमट पाण्यात घालून गुळण्या करा म्हणजे मुखदुर्गंधी कमी होते.
३)भुक न लागणे,तोंडास रूची नसणे,ह्यात पुदिन्याची चटणी खायला द्यावी.
४)त्वचेवर नायटा झालं असल्यास त्या जागी पुदिन्याच्या पानांचारस लावावा.
५)पोटदूखीमध्ये १ चमचा पुदीना रस+ १ चमचा आल्याचा रस+ १/४ चमचे सैन्धव घालून हे मिश्रण घ्यावे.
ह्याचे जास्त सेवन केल्यास एॅसीडीटी होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti