(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – वेलची(छोटी)

    गोडाचा शिरा म्हणा,खीर म्हणा,मिठाई,मुरांबा, कोणताही गोड पदार्थ घ्या हिचा मनमोहक सुगंध त्या पदार्थाला आला नाहीतर त्या गोडधोड पदार्थाची सगळी मजा आणी लज्जतच निघून जाते बुवा. तर अशी सुंदर नाजूक सुवासिक वेलची अथवा वेल दोडा.विडा,चहा ह्यांना देखील एक वेगळीच रंगत देऊन जाते नाही का?

    गरम मसाल्यातील हा पदार्थ ह्याचे छोटे क्षुप असते आणी आपण वापरतो ती वेलची म्हणजेच ह्या क्षूपाची फळे होय.चवीला थोडी तिखट गोड आणी थंड अशी ही वेलची आपल्या शरीरातले वात,पित्त आणी कफ हे तिन्ही दोष आटोक्यात ठेवते.

    हिचा उपयोग फक्त गोडधोड पदार्थातच होतो असे नाही तर घरगुती उपचारांमध्ये देखील आपण हिला वापरू शकतो बरं का!आश्चर्य वाटले का?

    चला तर मग पहायचे ना ह्या इवल्याशा वेलदोड्याचे औषधी गुण:

    १)संडास मधून आव पडत असल्यास वेलचीपूड लोण्यात मिसळून द्यावी.

    २)चक्कर येणे,मळमळणे,डोके दुःखी ह्यात १/२ चमचा वेलची पूड+१/२ चमचा जीरे चूर्ण+ ४ चमचे लिंबाचा रस+१ चमचा साखर हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.

    ३)उचकी लागत असल्यास १ चमचा वेलचीची राख+ २ चमचे मध हे चाटण वारंवार चाटावे.

    ४)वेलचीच्या साली+रिठे पाण्यात उकळावे आणी हे मिश्रण आंघोळी पुर्वी अथवा दिवसातून २-३ वेळेस अंबाला लावावे ह्याने अंगाची खाज कमी होते.

    ५)खोकला येत असल्यास १/२ चमचा वेलची पूड मधासोबत मिसळून दिवसातून तीन वेळेस घ्यावे.

    वेलची खाण्याचा अतिरेक केल्यास आतड्यांना अतिरिक्त चालना मिसळून पोटदूखी आणी संडासला पातळ होणे ह्या तक्रारी सूरु होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • एम. आर. आय.

    एम. आर. आय.

    मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हा प्रामुख्याने मेंदूचा व स्पायनल कॉर्डचा तपास करण्यासाठी वापरला जातो. दमादियन आणि लॉटरवर्ग या शास्त्रज्ञांनी विद्युतचुंबकीय क्षेत्राचा वापर करुन, संगणकाच्या सहाय्याने शरीराच्या विविध भागांच्या उभ्या, आडव्या, तिरक्या अशा कोणत्याही अॅंगल्समध्ये प्रतिमा काढून प्रतिमा विच्छेदन शास्त्रच प्रगत केले (इमेजिंग सर्जरी).

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग १

    रोग झाला की, वैद्य आठवावा, गरजेपुरता त्याला वापरावा. त्याने दिलेला औषधसल्ला पाळावा. नंतर रोग विसरावा. (आणि वैद्य देखील !) म्हणून तर आपल्याकडे म्हण पडली आहे, गरज सरो, वैद्य मरो !

  • आहारातील बदल भाग ४४ – चवदार आहार -भाग ५

    जीभेला लागताक्षणी डोळे बंद करायला लावणारी, आणि अंगावर रोमांच उभे करणारी, आंबट पदार्थाबरोबरीची ही एक समाजमान्य चव. लवण म्हणजे खारट चव !

    नावडतीचे मीठ अळणी, म्हणणारा हा डाव्या हाताचा पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे.
    मीठाशिवाय आमटी भात, भाजी ही कल्पनाच करवत नाही. चव वाढवायला हा लवणरस फार मदत करतो मीठाशिवाय पेरू, मीठाशिवाय आवळा, चिंच, बोरे. छे ! मजा येणारच नाही. भेळ पाणी पुरीचा धंदा तर या लवणरसाच्या जीवावरच चालतो.

    सेंदेलोण, पादेलोण, काळे मीठ, बीड लवण, समुद्र मीठ, सर्व प्रकारचे क्षार, हे सर्व लवणरसाचे प्रतिनिधी आहेत. या प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. सर्वसाधारणपणे लवण म्हणजे खारट चव ही उष्ण गुणाने आपले परिणाम दाखवते. त्यामुळे वात शमन व्हायला मदत करते.
    शरीरात जिथे आखडलेपणाची भावना असते, तिथे हा लवणरस शिथीलता निर्माण करू शकतो. म्हणजे व्यवहारात कुठे लचकले, मुरगळले वगैरे तर गरम पाण्यात मीठ टाकून शेक घेतो ना, तो या गुणामुळे.

    लवण रस हा आयुर्वेद मतानुसार क्लेद म्हणजे चिकटपणा निर्माण करणारा, गुणाने स्निग्ध असून आणि मलमूत्र वाताला शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत करणारा आहे.

    याच्या उष्ण गुणामुळे स्नायु शिरा मांसपेशी मधील कडकपणा कमी होतो, आणि स्नायुमधे हलकेपणा निर्माण केला जातो.

    गुण स्वभावाने तीक्ष्ण, भेदक, घाम निर्माण करणारा, आणि अंगचे पाणी न वापरता हवेतील पाणी स्वतःकडे खेचून घेण्याच्या (अव)गुणामुळे जखम चिघळवण्याची प्रक्रिया वाढवणारा असतो.

    रक्तदाब वाढू नये, यासाठी मीठ जेवणातून बंद करायचा सल्ला आज दिला जातो, तो मीठाच्या याच अवगुणामुळे. (पण हाच अवगुण युक्तीने वापरला तर फायद्याचा देखील होतो. हे रक्तदाब आणि मीठाच्या पाण्याची आंघोळ या आरोग्यटीपेत यापूर्वी लिहिले आहेच.)

    खालित्य म्हणजे केस गळवणारा, पलित्य म्हणजे केस पांढरे करणारा, कुष्ठ म्हणजे विविध त्वचारोग निर्माण करणारा, वली म्हणजे त्वचेवर सुरकुत्या आणणारा, सांगितला आहे.

    सैंधव मीठाशिवाय बाकी सर्व मीठाचे भाऊबंद डोळ्यांसाठी हितकर नाहीत. म्हणजेच ज्यांना डोळ्यांच्या समस्या असतील, त्यांनी साध्या मीठाऐवजी सैंधव मीठ जेवणात वापरावे.

    (आयोडीनयुक्त मीठ हा केवळ बिझनेस आहे, भारतातील एक दोन अतिउंच प्रदेश सोडले तर भारतात कुठेही आयोडीनयुक्त मीठ वापरण्याची आवश्यकताच नाही. हा वेगळा विषय होईल. )

    एखाद्या पदार्थातील मीठ कमी झाले असेल तर टीका न करता, तो पदार्थ खावा. जास्ती झाला असेल तर वगळावा. काही जणांना तर वरून मीठ भुरभुरून घ्यायला पण खूप आवडते.पण हे पुढे त्रासदायक ठरू शकते.

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. या न्यायाने कितीही चविष्ट असले तरी ते ताटात वाढून घ्यायचे नसते. नैवेद्याच्या ताटातून गायब असलेला हे मीठ, एवढे नक्कीच शिकवून जाते, पानात वाढलेले हे मीठ, देवालासुद्धा चालत नाही.

    समुद्रातूनच तयार झालेल्या, या लक्ष्मी, चंद्र, धन्वंतरि, विष, अमृत, पारीजात, कामधेनु, यांच्या या सहोदराला, पंधरावे रत्न म्हटले तरी चुक होणार नाही. पण त्याला नैवेद्याच्या पानात स्थान नाही, हे कटु सत्य पचवावेच लागेल.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    05.11.2016

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग एकवीस

    गॅसनामा

    गॅस झालाय. आता काय करावे ? अनेक जणांनी हाच प्रश्न विचारलाय. आधीच्या सर्व टीप नीट वाचल्या असतील तर याचा खुलासा सहज होतोय. तरी सुद्धा परत सांगतो.

    गॅस होण्यासाठी काही तरी कुजणे आवश्यक आहे. काही तरी कुजल्याशिवाय गॅस तयारच होणार नाही. पोटात गॅस होतोय म्हणजे या ब्रह्मांडात कुठेतरी घोटाळा नक्कीच असणार. ( आमच्या वैद्य नानांचा हा आवडता शब्द, ब्रह्मांड ! )

    या आतड्याच्या आत काय कुजणार ? आपण जे काही खातो पितो तेच ना ! जर ते पुढे सरकले नाही, जिथे आहे तिथेच साठून राहिले की गॅस बनायला सुरवात होते. अन्न पुढे पुढे सरकत असले की गडबड नसते. पाणी पुढे सरकत असले की शेवाळ धरत नाही. अडकले की शेवाळ धरायला, बुळबुळीतपणा वाढायला सुरवात होते.

    लोकलच्या तिकिटाची रांग ( मराठीत लाईन लाईन ! ) व्यवस्थित पुढे जात असेल तर आरडाओरडा नसतो. जरा कोणाकडे सुटे पैसे नसले, आणि रांगेची हालचाल जरा थांबली की बोंबाबोंब सुरू झालीच म्हणून समजा !

    जीवनाला गती हवी, थांबला तो संपला.....
    याच न्यायाने खाल्लेल्या अन्नाला पण गती हवीच. अन्नाचा रस जिथे थांबेल तिथे अन्न चिकटून बसते. तिथेच जास्ती वेळ अडकले की कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. पहिले चिकटलेले असेल त्याला मागून येणारे अन्न चिकटते, आणि मागे रांग वाढत जाते. थरावर थर वाढतो. गॅस होत रहातो.

    चिकटवण्याची प्रक्रिया पाणी करते आणि तेल या चिकटवण्याच्या बरोब्बर विरोधी गुणाचे आहे.
    कणिक मळल्यानंतर हाताला चिकटते, कशाने काढली जाते ? तेलाने.
    फणसाचा डिंक हाताला चिकटला तर तो सोडवण्यासाठी फक्त तेलाचा एक थेंब पुरतो.
    ग्रीस डांबरासारखे चिक्कट पदार्थ हाताला चिकटले तरीसुद्धा खनिजतेल म्हणजे राॅकेलच मदतीला येते. याचा अर्थ चिकटपणा सोडवण्यासाठी तेल मदत करते.

    जसं बाहेर तसंच आतमधे देखील! पोटाला आतड्यांना चिकटून बसलेला चिकट आम सोडवून बाहेर काढण्यासाठी तेलच मदत करते. म्हणून जेवणात तेल वापरावे. वरून कच्चे वापरले तर अधिक फायदेशीर. म्हणजे तयार झालेला आम चिकटत नाही. आणि वायुची निर्मिती अगदी "न" के बराबर !

    गॅस वाढवायला पाणी पण मदत करते. म्हणून पाणी देखील गरजेनुसारच प्यावे. नियम करून अमुक लीटर पिऊ नये. पाणी जेवता जेवता प्यावे. अगोदर किंवा नंतर शक्यतो नको.

    तहान लागेल तेव्हाच पाणी पिणे, जेव्हा एक नंबर दोन नंबर काॅल येईल तेव्हा, टाळाटाळ न करता, लगेचच जाऊन येणे, भूक असेल तेव्हा जेवणे, जेवणात सहा चवींचा वापर करणे या छोट्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर गॅस होणारच नाही.

    गॅस होऊ नये म्हणून जेवणाची वेळ बदलावीच लागेल. सूर्यास्त होईपर्यंत खावे. त्यानंतर लगेचच आपली सायंपूजा आणि नैवेद्य! रात्रीचा नैवेद्य हा अगदी अल्प असतो, हे ध्यानात ठेवावे.

    गॅस होऊ नये यासाठी म्हणजे अन्नपचन नीट व्हावे यासाठी जे करायचे तेच गॅस झाल्यानंतर देखील करायचे असते.

    ( या विषयावर गेल्या वर्षी याच दिवसात सविस्तर लेखमाला आलेली होती. )

    हे करायचे नसेल तर नियमितपणे व्यायाम करावा. व्यायाम पोट हलेल, चिरडेल, असा असावा. उगाच चालण्याचा देखावा नसावा. यासाठी सूर्यनमस्कार आठवावा. नाहीतर देह जमिनीवर गडाबडा फिरवावा. लोटांगणे घालावीत. आतमधे चिकटलेले आम आदि सोडवून घ्यावे.

    "हे काही आम्हाला जमणारच नाही", अशी मनोभूमिका असणाऱ्या मंडळींनी, गॅस होऊ नये याकरीता जवळपास असणाऱ्या वैद्यांचे पत्ते शोधून ठेवावेत. ते वैद्य पंचकर्म आदि उपचार, जे जे सांगतील ते अगदी मनोभावे करावेत.

    अन्यथा नंतर कधीतरी जिथे जावे लागणारच आहे, अशा आपल्याला आवडेल तशा, मल्टी सुपर स्पेशालीटी हाॅस्पीटल मधली एखादी रूम आधीच बुक करून ठेवावी. पै पै मिळवलेली सर्व स्वकष्टार्जित मिळकत, दहा पंधरा दिवसात त्यांच्या खात्यात खात्यान्तरीत करावी. हल्ली मोबाईल वर सुद्धा अॅप आहेतच. बॅकेत जायचे सुद्धा कष्ट नाहीत.

    कष्टाविना काही नाही,
    आमाविना गॅस नाही,
    केल्याविना साध्य नाही,
    आधी केलेची पाहिजे ।।

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.04.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग अठ्ठावीस

    जेवताना जेवणात केस सापडणे म्हणजे जेवणाऱ्या व्यक्तीचा अपमान समजला जाई. एवढे निशिद्ध समजले गेलेले केस सौंदर्य स्पर्धांमुळे जरा जोरातच फडफडायला लागले. केस जेवणात पडू नये म्हणून डोक्यावर टोपी घातलेली दाखवली की झाले. केस बांधून, छान वेणी घालून पोरगी आली म्हणजे ती बावळट झाली. असा गैरसमज कधी झाला आम्हाला कळलेच नाही.

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग २

    माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच " माया " असे म्हणतात वाटतं.
    एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख.
    असो.

    मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, म्हणून गाता बोलता येते, भांडताही येते. असं इतर कार्निवोरस, हर्बीवोरस ना नाही करता येत.

    नजर रोखून, डूक धरून खाणे हे माणसाला जमत नाही. एखादा पदार्थ आवडला नाही तर नाक मुरडेल, पण मारक्या बैलासारखा, किंवा कुत्र्यामांजरा सारखा दुसऱ्या वर गुरगुरत तर खाणार नाही. बायकोने केलेलं कसं निमूटपणे गिळतो !!! ( म्हणजे तसं करायचं तरी असतं. )

    सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री असं रोज चार वेळा तरी पोटभर जेवतो. तरीदेखील काही जणांना रात्री परत भूक लागतेच. माणूस मांसाहारी प्राण्यांसारखा एकदा पोटभर खाल्ले की पुढे चार दिवस उपास नाही करत.

    माणसाची आतडी, मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लांब असतात, तर शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लहान असतात.

    मांसाहारी प्राण्यांप्रमाणे तोंड उघडे ठेवून, जीभ बाहेर काढून, श्वासोच्छ्वास करीत तापमान संतुलीत राखत नाही, की अंग चाटत बसत नाही. उन्हाळा आला की घाम खूप येतो, थंडी आली की शू शू खूप करतो आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढतो.

    माणसांच्या अंगाला दुर्गंधी नाही. कारण दररोज आंघोळ करतात. अपवादाने काही महाभाग असतीलही. पण ते घरात रहात नाहीत, हाॅस्टेलला रहात असतील कदाचित !

    दया, प्रेम, वात्सल्य, लळा माणसांमधे असते.
    नरो वा वानरो वा !
    मांसाहारी नरांइतके क्रूर नसतात. हे नक्की.

    माणसाचे डोळे जन्मतःच उघडलेले असतात. पण मिटून घेऊन झोप आणल्याचं सोंग मात्र उत्तम वठवतो. मला माहित नव्हतं, विसरलो, जमलंच नाही, सहन झालं नाही, झेपत नाही, ही अशी कारणं हर्बीवोरस किंवा कार्निवोरस देत नाहीत. त्याने नियम केलाय तो पाळण्यासाठी. टाळण्यासाठी नाही. बुद्धीचा अतिवापर झाल्यानं, त्यालाच टाळायला, पिटाळायला, रिटायर करायला निघालेल्यांना काय सांगणार आणि कसं समजवणार ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    2.10.2016

  • नैवेद्य भाग ६

    नैवेद्य दाखवण्यापूर्वी पानाच्या खाली पाण्याचे चौकोनी मंडल काढले जाते. पूर्वी जेवणासाठी केळीची पाने अथवा पानाच्या पत्रावळी वापरल्या जात असत.

    जेवायला सुरवात केल्यावर पान हलू नये, यासाठी कदाचित हे पाण्याचे मंडल असेल.
    जमिनीवर असलेले सूक्ष्म जीवजंतु ताटाखालून वर येऊ नयेत म्हणून पानाखाली पाण्याचे मंडल. जणु काही मिनी सारवणे

    आता सारवणे म्हणजे काय असा प्रश्न पुढची पिढी विचारेल.
    गाईचे शेण पाण्यात कालवून, हाताने जमिनीवर एक कोटींग करणे, अशी काहीतरी व्याख्या करावी लागेल. गेले ते दिवस......

    जमिन गेली सारवणे गेले, त्याजागी फरशी आणि टेबलखुर्ची आली, पण फरशीवरचे आणि ताटाखालचे जीवजंतु मात्र तसेच आहेत. काही वर्षांनी पाश्चात्य जेव्हा सांगतील please spray or sprinkle sterile water under your dish, before starting your food......

    तशी एखादी शुद्ध नलोदकाची स्र्पे बाॅटल ऑनलाईन विकत मिळेल, मग आम्हाला त्याचे महत्व लक्षात येईल.

    जमिन असो वा टेबल फरशी
    पत्रावळ असो वा बोनचायना डिशी
    ताटाखाली पाणी फिरवशी
    जीवजंतुना दूर ढकलशी.

    (बोनचायनावरून आठवले, जनावरांच्या हाडांपासून बनवतात, असे ऐकले होते....?)

    एकदा जेवायला सुरवात केली की पान हलवायचे नाही, हा नियम होता. पानावरून आपणही हलायचे नाही, म्हणजे उठायचे नाही, असाही शिरस्ता होता.

    आजकाल फिरतफिरत, ताट मांडीवर घेत, नवीन पदार्थ घेण्यासाठी आपले ताट शेजारी जेवणार्‍याच्या ताटावरून उचलणे, इ.इ. जेवणाचे सर्व मोबाईल प्रकार आठवले, म्हणून लिहिले. आपल्या उष्ट्या हातावरील, ताटातील जीवजंतु, आपण सर्वत्र पसरवतोय हे लक्षातच येत नाही.
    (भाऊ, उष्टे म्हणजे काय हो ? )

    जेवताना जेवढे सोवळे रहाता येईल तेवढे सोवळे रहावे. मुद्दामच सोवळेअसा शब्दप्रयोग केला, तो शब्द रूढार्थाने समजायला सोपा आहे.

    नैवेद्य सोवळ्यातच वाढावा. आणि जंतुसंसर्ग टाळावा.

    सोवळे म्हणजे धूतवस्त्र. स्वच्छ धुतलेले कपडे घालून जेवावे, जेवणापूर्वी हात पाय धुवावेत, हे स्वच्छतेचे साधा सोपा नियम कालबाह्य ठरू लागला आहे की काय, अशी भीती वाटू लागली आहे.

    स्वच्छतेचा हा नियम लक्षात घेऊन,
    सोवळ्यावर विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी आहे, सोवळे हा काही आम्ही पाळायचा प्रांत नाही, असे म्हणून सोडून देणार काय ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    12.09.2016

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग चौदा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे छापन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग चौदा

    पंधरा दिवसातून तीन वेळा म्हणजे दर पाच दिवसांनी डोक्याचे केस, दाढी, नखे, आदि कापावेत. त्यानंतर स्नान अवश्य करावे. मात्र स्वतःच्या हातानी विशेषतः केस कापू नयेत. ते नाभिकाकडून कापून घ्यावेत. दातानी नखे खाऊ नयेत.

    स्वतःचे स्वतः केस कापले तर नाभिकाचा रोजगार बुडेल हा व्यवहार सोडला तरी, स्वतःचे केस नीट कापता येत नाहीत. लहानपणी हळुच केस कापून पहाण्याचा अनुभव प्रत्येकालाच असेल.

    डोके, दाढी या ठिकाणी जे केस वाढतात, त्यांच्यावर बसलेली धुळ, जीवजंतु साफ होण्यासाठी ते दर पाच दिवसांनी कापावेत, असे ग्रंथकार म्हणतात. आजच्या युगानुसार, दाढी दर दिवशी किंवा एक दिवसाआड केली तरी चालेल, आणि केस दर महिन्याला तरी कापावेत.

    कोणत्याही प्रकारची धार्मिक कार्ये करायची असल्यास किंवा एखाद्याच्या मृत्युपश्चात धर्मशास्त्रानुसार मुंडन करायला सांगितले आहे. यामधेही शुद्धी क्रिया अपेक्षित आहे.

    पण डोळ्यांच्या पापण्या, भुवया, मिशी आणि छाती या ठिकाणी असलेल्या केसांना अजिबात कापू नये. त्याने नुकसान होते.

    छातीवरील केसांमुळे ह्रदय आणि फुफ्फुसे यांना संरक्षण मिळत असते. केसांमधून काही प्रमाणात मलद्रव्ये देखील बाहेर पडत असतात आणि घाम निर्माण व्हायला पण मदत होते. ज्यामुळे रक्ताची शुद्धी होते.

    डोळ्यावरील भुवयांचे केस हे डोक्यावरून येणारा घाम डोळ्यात जाऊ नये यासाठी संरक्षक म्हणून काम करत असतात. त्या उगाचच कोरत राहू नये.

    जशा भुवया तशा मिशा. नाकातील स्राव वा उच्छवास तोंडात जाऊ नये, यासाठी मिशांचे केस संरक्षण देतात. पिळदार मिशा व्यक्तीमत्व आणखी खुलवतात, हा भाग वेगळा !

    डोळ्यांच्या पापण्यांचे केस तर अतिशय नाजुक असतात. डोळ्यांच्या आतील सर्व स्तरांचे संरक्षण होण्यासाठी या पापण्या तत्पर असतात. आपल्या इच्छेविरुद्ध शरीराच्या फायद्यासाठी काही अवयव काम करत असतात. त्यात जसे ह्रदय, यकृत, किडनी, मेंदू हे आतील अवयव आहेत, तसे डोळ्यांच्या पापणीवर आपला ताबा बहुतेक वेळा नसतो. आपल्या नकळत काही धुळ, धूर, सूक्ष्म किटक जर डोळ्यांत जात असतील तर त्यांना अडवण्यासाठी एक सक्षम यंत्रणा असते, त्यात या पापण्यांचा समावेश असतो.

    जननेंद्रिये आणि कक्षा प्रदेशी असलेले रोम नियमितपणे काढावेतच. इथे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

    सर्व अंगावर असलेले केस हे जणुकाही शरीरावर असलेली पिसे आहेत. त्वचेचे संरक्षण करणे, घाम येणारी छिद्रे बाहेरील धुळीने बुजुन जाऊ नयेत यासाठी या बारीक लवीचा उपयोग होत असतो. सूक्ष्म स्पर्श संवेदना होण्यासाठी, समजण्यासाठी या छोट्या केसांचा उपयोग होत असतो. त्वचेची कांती चमकदार रहावी, यासाठी देखील हे रोम काम करीत असतात.

    डोक्यावरचे केस खूप कमी ठेवावेत आणि शेंडी राखल्यास उत्तम. शेंडी ठेवणे म्हणजे ब्रह्मरंध्राचे संरक्षण करणे. आणि विश्वातील सकारात्मक उर्जा थेट शरीरात. अर्थात ज्यांचा विश्वास असेल त्यांना पटेल. हा अनुभव घेऊन पाहण्याचा विषय आहे. शेंडी ही "डिश अँटीना" प्रमाणे काम करते, असा माझा अनुभव आहे. आणि फक्त ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्यानीच ठेवावी असं काही नाही. अन्य जातीमधे देखील शिखा ठेवतात. असो. ज्याची त्याची शेंडी, ज्याची त्याची मर्जी !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १४.०९.२०१७

  • किचन क्लिनीक – तुप कसे वापरावे

    १)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे.

    २)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो.

    ३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले.

    ४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे.

    ५)अजीर्णाचा त्रास असताना तुप सेवन करू नये.

    ६)तुपाचा वापर करत असताना नियमीत गरम पाणीच वापरावे.

    तुप कोणी खाऊ नये:

    स्थूल मेदस्वीव्यक्ती,आमवात,भुकनसणे,
    अजीर्ण,जुलाब व कफाचे विकार असल्यास तुप सेवन करू नये.

    तूपसेवनाचाअतिरेक केल्यास,मळमळ,
    उल्टी,जुलाब व शरीरात अवास्तव चरबी वाढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४