(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुनः एकदा पीसीओडी

    मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले.
    काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !!

    काल मी संप्राप्ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही संप्राप्ती चुकीची / बरोबर असे कुणीही वैद्य बोललेच नाही.

    स्त्रीत्व आणि मासिक पाळी पाळणं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आधी बंद होत आलेली मासिक पाळी सुरू तर होऊ देत, मग पाळायची /नाही पाळायची/ कशी पाळायची/ का पाळायची/ आम्हीच का म्हणून, हे विषय घेऊ चर्चेसाठी ! पीसीओडी हा विषय एवढा गंभीर आहे, असं मला म्हणायचंय !

    असो.
    एक विचार मंथन सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. काही छान विचार वाचायला मिळाले. ज्ञानात खरंच भर पडली.

    मुळात हा आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनुक्त प्रकारात बसणारा व्याधी.
    त्याचे हेतु, त्याचे निदान त्याची चिकित्सा, त्याची दोषदूष्य संमूर्च्छना, संप्राप्ती भेद इ. वर आणखी सखोल विचार व्हायला हवाय.
    एक अत्यंत गंभीर आजार ज्याचे उत्तर अॅलोपॅथीमधे आजतरी अंधेरे मे तीर असेच आहे.
    पण आपण आयुर्वेदाचे दृष्टीकोन वापरला तर, हा पीसीओडी रोग थांबवू शकतो का ? त्याचे उत्तर "होय" असेच आहे. एखाद्या रोगाच्या हेतुशोधनापासून अपुनर्भवपर्यंत विचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पहायला मिळेल.

    मी "थांबवू" शकतो का असा शब्द मुद्दामच वापरला, विचारकक्षा आणखी वाढवल्या तर घालवू शकतो का ?, असा शब्दही वापरता येईल.

    हाच विचार अन्य सर्व कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी करावा लागेल.

    जर रोगाचा हेतु शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक
    जर हेतु मानसिक असेल तर चिकित्सा मानसिक
    जर हेतु आध्यात्मिक असेल तर उपाय आध्यात्मिक करावा लागेल. आणि हेतु सामाजिक असेल तर चिकित्सा देखील सामाजिक करावी लागेल. आणि सर्वच हेतु कारणीभूत असतील तर सगळ्या हेतुंचा विचार एकदम करावा लागेल.

    जर आपले शास्त्र हे तीनही शामाआ. सा सुद्धा. मानत असेल तर त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. शारीरिक हेतुंचा विचार केला तर बदललेली जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त पोषण, हेच शारीरिक हेतु मिळतात. जे सगळ्यांना माहिती आहेत.

    मानसिक हेतुंचा विचार केला तर मी अगोदर म्हटले तसे, स्त्रीत्वापासून लांब जाणे, तिटकारा वाटणे, वाढता ताणतणाव, नोकरी छोकरी या दोन्ही आघाड्यांवर काम करणे, हे हेतु मिळतात.

    आध्यात्मिक हेतुंचा विचारही करावाच लागेल, आध्यात्मिक हा आणखी एक वादाचा मुद्दा होईल, पण जे आहे त्याचा अभ्यास तर करायचाच हवा ना. आईने गर्भावस्थेमधे कुपथ्य करणे, नकोत तेवढ्या गोळ्या खाणे, इ. हेतुंमुळे मुलीला होणारा पीसीओडी हा त्या मुलीसाठी आध्यात्मिक दुष्टीहेतु ठरू शकेल. तिचा काहीही दोष नसताना, तिला पूर्ण आयुष्यभर हा रोग सांभाळत जगावं लागणं, हे तिचं नशीब, असे अनेक रोग आहेत, ज्याची कारणं आध्यात्मिक आहेत.

    आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, जेवायला पुरेसा वेळ न मिळणे, किवा जेवणाची वेळ नोकरीमुळे पाळता न येणे, जीवनात शांतपणा नसणे, नवरा किंवा बाॅसची हुकुमशाही, घरातील काही कारणाने घ्याव्या लागलेल्या पाळी पुढे जाणाऱ्या गोळ्या, सक्तीने घ्याव्या लागलेल्या ओसी पिल्स, या सामाजिक कारणामुळे पीसीओडी दिसतो.

    पाश्चात्य विचारसरणीच्या तज्ञांनी याचा विचार फक्त शारीरिकपुरता अधिक केला आहे. काही कारणाने होणारा हार्मोन्समधील बदल याचा विचार केला आहे. पण हे हार्मोन्समधील बदल घडवायला, मन, इंद्रिये, कारणीभूत आहेत, हा अधिकचा विचार आपणाला करता येणार आहे. कारण आपण तो शिकलोय. आणि त्याची चिकित्सा आपल्याला आपल्या पद्धतीने चांगली करता येणार आहे.

    ( मी असं म्हटलेलं नाही, की फक्त कुंकु, बांगड्या आणि पैंजण घालून पीसीओडी बरा होईल. पीसीओडीचा एक हेतु मन आहे, हे विसरून चालणारच नाही. आणि स्त्रीयांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, हे मी आधी नियमितपणे लिहित असलेल्या आरोग्यटीप मधून आपल्या लक्षात आले असेलच.
    ज्या मुली कुंकू, बांगड्या, पैंजण वापरतात, आणि ज्यांना पीसीओडीची लक्षणे दिसतात, त्यांचे इतर हेतु शोधावेच लागतील. अव्यायाम, रसायनांचा अति वापर, अवेळी जेवण, लवकर वयात येणे, जीवनशैली ही सर्व कारणे आहेतच ना ! त्याची वेगळी चिकित्सा करावी लागणारच !

    मी गेली दहा वर्ष या आजारात जसे कारण (हेतु) तशी चिकित्सा देतोय. माझा संमोहन हा आवडीचा विषय असल्यामुळे मानस हेतु शोधणे, आणि मानस चिकित्सा देणे, त्यामधेही आश्वासन, योगासन, संमोहित अवस्थेत सूचना देणे, नंतर दररोज त्याचा रुग्णाला अभ्यास करायला लावणे, हे मला आवडते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. काही रुग्ण मी मुद्दाम फक्त मनोवह स्रोतस शुद्धीचे वेगळे ठेवले आहेत, ज्यांना संमोहनाव्यतिरिक्त फक्त आहारातील पथ्ये आणि योगासने सांगतो. कोणतीही औषधे देत नाही. कुंकु, बांगड्या, पैजण त्याच रुग्णांना सुचवतो, ज्यांनी कधी ते घातलेच नाहीत. त्यांनी हे उपाय केले तरी परिणाम दिसतात. यांची पुढे मासिक पाळी नियमितपणे होताना दिसते.

    शमन औषधांचा आणि शोधन चिकित्सेचा परिणाम सुद्धा दिसतो, पण तो काही काळच टिकतो, पुनः कुपथ्य झाले तर किंवा कालाच्या प्रभावाने पुनः अनुपशय दिसतो. जेवढे आपण सूक्ष्मत्वाकडे जाऊ तेवढी शक्ती वाढत जाते,या न्यायाने, शरीरापेक्षा, मन सूक्ष्म आहे, तिथे केलेली चिकित्सा लवकर परिणाम दर्शवते. आत्मा तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचा अभ्यास गुरूकृपा झाल्याशिवाय सुरूच होत नाही. म्हणून मला असे वाटते,
    ( मला असे वाटते, म्हणजे मी अहंकाराने म्हणत नाही हो, ) की, सर्वच व्याधींचे हे तीनही हेतु शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, मी जे काम करतोय ते आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय.

    पूर्वीच्या काळी देखील स्त्रीयांना मानसिक ताणांना जास्त सामोरे जावे लागत होते. पण पीसीओडीचे प्रमाण एवढे नव्हते. कारण, त्यांची शारीरिक कामेदेखील तेवढीच प्रचंड कष्टांची होती. विहिरीतील पाणी ओढून काढणे, ते घागरीतून कमरेवर घेऊन येणे, सरपण गोळा करणे, चुल फुंकणे, इथपासून, सडा सारवण, रांगोळी काढणे, वाकून केर काढणे, जात्यावर दळणे, कांडणे, उकीडवे बसून कपडे धुणे, भांडी घासणे, पाट्या वरवंट्याने वाटणे, गाई गुरांचे करणे, जमिनीवर डावी मांडी दुमडून जेवणे, ओणव्याने वाढणे, पुनः उष्टशेण करणे, हे सग्गळं तिला एकटीलाच करावं लागत होतं. कोणताही पुरूष मदतीला जात नव्हता. त्यात पोरांकडे तिलाच लक्ष द्यायचं होतं.
    तिची करमणूक म्हणजे झिम्मा, फुगड्या, पिंगा, हे सर्व व्यायाम प्रकारच होते. वेगळे योगासनाचे क्लास लावावे लागत नव्हते.

    या सर्व प्रकारात तिचे पोट अक्षरशः पिळले जात होते, पिळवटले जात होते, खऱ्या अर्थाने स्त्रीची "पिळवणूक" होत होती. अशा कामामुळे पीसीओडी कशाला होईल ? आज पीसीओडी वाढलेला दिसतोय कारण ही सर्व कामे बंद झाली. मी पुनः एकदा सांगतोय, स्त्रीला कामाला लावायचा माझा हेतु बिलकुल नाही, पण आपण हेतुंचा विचार करतोय, म्हणून जुन्या भारतीय कामांची फक्त आठवण करून दिली.

    अन्नाचा दर्जाही उत्तम प्रतीचा होता. कमी खाल्ले तरी (आजच्या भाषेतील पोषणमूल्ये पुरेशी होती. मी आयुर्वेदाचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे मला म्हणे, असे माॅडर्न टर्मिनाॅलाॅजी असलेले शब्द वापरायची सुद्धा बंदी. ) पोटभर नसले तरी पुरेसे होते.

    भरपूर काम करायचं आणि काय खायचं, असा एक जमाना भोगलाय स्त्रीनं. आणि आज हे समीकरण बदलत बदलत, व्यायाम-काम कमी करायचं, आणि काय काय खायचं, असा प्रश्न भरल्या घरात पडतोय. चीज, पनीर, चायनीज, पंजाबी या खाण्याबद्दल मी बोलतच नाही.....
    एकंदरीत आज स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक कमी, आणि मानसिक जास्त असं झालंय.

    म्हणजे पुनः स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक करा, असं शब्दशः मला म्हणायचं नाहीये.

    आणि मी फक्त स्त्रीयांना म्हणतोय, कारण लेखाचा विषय पीसीओडी आहे. मी पुरूषांच्या बाजूने बोलतोय, असा (गैर) समज कृपया करून घेऊ नये.

    आणि हो, ही सर्व फक्त आपल्या प्रिय भारत देशातलीच वैशिष्ट्य सांगतोय बरं का !

    भारतात पीसीओडीचे थैमान आत्ता वीस पंचवीस वर्षातील. पण पाश्चात्य देशात हा आजार त्यांच्या यांत्रिक (सेडेंटरी) जीवनशैलीमुळे चाळीस पन्नास वर्षे तरी जुना असावा.

    हा आजार भारतातून हद्दपार करणे, आपल्याला शक्य आहे, कारण त्यांचे निदान हेतू आपणाला आयुर्वेदानुसार शोधता येतील, माहिती आहेत.

    गाडी जर चुकीच्या रस्त्याने गेली तर तसंच आणखी पुढे जायचं का ? ज्या रस्त्याचं भविष्य आपणाला माहितीच नाही. तिथून परत मागे फिरणे योग्य नाही का ?

    हेतु सेवन बंद झाल्याशिवाय कायमचा संप्राप्तीभंग कसा होईल ? नाहीतर कायमच्या घ्याव्या लागणाऱ्या व्याधींच्या यादीत आणखी एक नाव अॅड होईल.
    बघा विचार करून..

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ सिंधुदुर्ग.

  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग दोन

    नियम एक.
    कोणताच नियम पाळू नये. भाग दोन.

    दूध म्हणजे विष नाही, दही म्हणजे विष नाही, गुळ म्हणजे विष नाही, पाणी म्हणजे विष नव्हे, पण हे पदार्थ प्रमेहामधे रोगाचे कारण सांगितलेले आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणजे हे पदार्थ बंद करायला हवेत असं नाही. आपली प्रकृती आपली पचनशक्ती जर कफाकडे जाणारी, कफ वाढवणारी असेल, तर या पदार्थांचा वापर करताना युक्तीचा वापर करायला हवा. हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. हे पदार्थ खाल्ले आणि काहीच व्यायाम केला नाही तर मात्र गडबड होणार हे नक्की.

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खावे, दोन मुख्य जेवणे या वेळेत झाली, की त्याचे पचन सूर्य करतो, पचन सोपे होते, हा नियम झाला, पण एखादे वेळी दोनापैकी एक जेवण झालेच नाही, आणि सूर्यास्तानंतर खूप भूक लागली तर काय करावे ?
    मस्त जेवावे.
    फक्त अशा वेळी लक्षात ठेवावे की, सूर्यासारखा, पचनाला मदत करणारा अग्नी हा अत्यंत महत्त्वाचा घटक शरीराला पचनासाठी वापरता येणार नाही, तेव्हा फार लोड येईल असे खाऊ नये. जे काही खाऊ ते चापून खाण्याऐवजी हातचे राखून खावे, मटण चिकन, श्रीखंड, गुलाबजाम असे पचायला जड होणारे जेवण तर अजिबात नको. ही युक्ती हवी.
    असे जड जेवण घेतले तर त्याचे पचन पूर्ण होण्यासाठी तसाच व्यायाम, तसेच कष्ट, तशीच मेहनत करायला हवी. नाहीतर सगळेच ओमफस्स !

    संकष्टीला दिवसभर उपवास करून रात्री उशीरा चंद्रोदय झाल्यावर मोदकाचे जेवण जेवावे, या संकल्पनेमधे आपण नियम मोडलाच. पण दिवसभर उपाशी आहोत, स्वतः ठरवून, जाणून बुजुन, व्रत म्हणून, मनाला संयम घालून दिवसभर उपवास करून रात्री जेवलात तर ते क्षम्य ठरू शकते. पण ते सुद्धा महिन्यातून एक वेळ नियमाला हा अपवाद आहे. आम्ही अपवादाचा नियम केला की, सत्यानाश !

    चातुर्मास करताना, या चार महिन्यात "देव झोपतो", अशी आपली संकल्पना आहे. या चार महिन्यात देवच जर झोपला, तर शरीराचे सर्व व्यवहार आपल्यालाच पहावे लागणार आहेत, उगाच काही मोठे निर्णय घेण्याची चूक करू नये, याचे भान राखून आपण आपले व्यवहार करावेत, ही युक्ती आहे. हे आपल्या लक्षात असावे, म्हणून चातुर्मासामधे काही विशिष्ट व्रते सांगितली जातात. एखाद्या वेळी एखादा उपवास चुकुन मोडला, म्हणून लगेच, " आता उपास मोडलाच आहे, भजी खाऊन घेऊया" असा विचार करणे ही चुक आहे.

    तारतम्य बाळगणे, योग्य अयोग्याचा विचार करणे ही युक्ती असते. एखादी कृती दुसरा करतोय मग मी का नको ? असा विचार करणे चूक आहे असे नाही, पण त्यासाठी मला, जशाच्या तसा "दुसरा" बनणे आवश्यक आहे.

    व्यायामाचे तेच आहे. व्यायाम जरूर करावा, पण कोणी करू नये, हे पण शास्त्रात सांगितलेले आहे.

    प.पू. रामदेव स्वामी महाराज शीर्षासन करून हातावर चालतात, मग मला का नाही जमणार असे एखाद्यानं ठरवले आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? नाक तोंड फुटेल बाकी काही नाही. यासाठी तसा अभ्यास, तसे सातत्य, पहिल्यापासून हवे, तर जमेल. नाहीतर नाही.

    शेवटी नियम हे आपल्याला मर्यादा समजावी म्हणून सांगितलेले असतात. तसेच्या तसे ते तंतोतंत पाळणे आणि सगळे नियम धाब्यावर बसवणे, दोन्ही चुकच !
    युक्ती वापरली की, सगळ्याचा उपभोग घेता येतो. त्याचा हेतु योग्य असला की झालं.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.04.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 37

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग अकरा

    नैवेद्य सेवन करून झाल्यावर हात तोंड धुवुन झाल्यावर आणखी एक अनोखा उपचार केला जातो. तो म्हणजे चंदन लावणे.
    "करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी" असा मंत्र म्हणून देवाच्या हाताला चंदन लावले जाते.

    हे चंदन, चंदन या झाडाच्या खोडापासून उगाळलेलं असावं. चंदनाची पावडर, गोपीचंदन, कुंकू पाण्यात कालवून गंध तयार करणे, अष्टगंध पाण्यात कालवणे, यापेक्षा चंदन उगाळून ते वापरणे हे देवाला आवडते. देवाला म्हणजे आपल्या देहातील अंतःस्थ देवाला !

    जेवढे जास्त उगाळावे तेवढा चंदनाचा सुवास आणि औषधी गुणधर्म बाहेर येत जातात.

    चंदन कपाळाला लावले जाते, ते औषध म्हणून ! अतिशय थंड गुणाच्या या चंदनाची उटी अंगाला लावणे, ही पद्धत दक्षिण भारतात आजही आहे दक्षिण भारतातल्या सर्व देवालयामधून चंदन उगाळणारी खास माणसे असतात आपल्याकडे जसा तीर्थप्रसाद देतात, तसा दक्षिणेकडे उगाळलेले चंदनाची गोळी प्रत्येकाच्या हातावर देतात, ती प्रत्येकाने आपल्या कपाळावर लावावी, असा संकेत आहे. स्त्री आणि पुरूष असा भेद न करता हे चंदन लावले जाते. फक्त महाराष्ट्रात उभा टिळा लावतात, तर दक्षिणेत आडवा. एवढाच फरक. पण चंदन तेच. काम तसेच. औषधी गुण तेच.

    जेवणानंतर हाताला जेवणातील पदार्थांचा वास राहिलेला असतो. किंवा काही तेलकट पदार्थ हाताला चिकटतात. ते निघून जावेत, असं हे कर्मकांड. आजही आपल्याकडे जेवण झाल्यावर पानात राहिलेली लिंबाची फोड अथवा मीठाची चिमूट जेवल्या हाताला चोळून घेतात. ती याचसाठी. लिंबाच्या रसामुळे बोटांना लागलेला रस्सा, भज्यांचे तेल, लोणच्याचा अंश, आदि भोजनांश सहजपणे निघून जावेत. हात स्वच्छ व्हावेत. उगाळलेल्या चंदनाची जागा फक्त ताटातील लिंबाच्या फोडीने घेतली इतकेच ! कालानुरूप फरक पडतो तो हा असा !

    जेवणानंतर हाताला लागलेला मसाला आदि जरी अगदी विषारी नसले तरी दाह करणारे असतात. जसे पाटावरवंट्यावर मिरच्या वाटल्यानंतर बोटांची होणारी आग किंवा दाह केवळ पाण्याने धुऊन जात नाही, त्यासाठी तेल गुळ असे पदार्थ वापरावे लागतात. तसंच जेवणानंतर हाताला जो मसाल्याचा सूक्ष्म अंश असतो, तो जावा, यासाठी हे चंदन लेपन. हे कपाळावर नसून हाताला बोटाला आहे, हे लक्षात घ्यावे.

    जे जे देवासाठी ते ते देहासाठीच असते, हे कधीही विसरून चालणार नाही. त्यातील कर्मकांडे ही मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी असतात. ही शोधण्याची दृष्टी तोच देत असतो, यालाच देवाची कृपा म्हणतात. तोच कर्ता करविता मी निमित्तमात्र !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    30.06.2017

  • किचन क्लिनीक – कोहळा

    किचन क्लिनीक – कोहळा

    तसा कोहळा पौष्टिक असला तरी काही श्रध्दा अंधश्रद्धा ह्या फळाशी जोडल्या गेल्या आहेत जसे ह्याचा वेल बहरला आणी भरपूर फळे लागली कि ते अपशकुन मानला जातो,बऱ्याच घरात हा आणणे शिजविणे निषिद्ध असते.तसेच दृष्टबाधा होऊ नये म्हणून ह्याचे फळ धरा बाहेर बांधतात.

    एवढे चांगले फळ पण किती शापित बिच्चारे नाही का हो!बरे ह्याचा उपयोग खायला देखील केला जातो बरं का.आग्रा फेमस पेठा कोहळ्यापासून बनवितात,आपण उन्हाळयात करतो त्या वड्या कोळ्याच्याच,खीर देखील करतात,काहीजण ह्याचा खवा देखील करतात.आणी हे सगळे पदार्थ पौष्टिक असतात बरं का.

    कोहळ्याचा वर्षायू वेल असतो.ह्याची पाने ४-६ इंच लांब व हृदयाकृती असतात,पाने पिवळी २ इंच व्यासाची असतात.फळ अंडाकृती १-११/२ फूट लांब व वर सफेद पावडरचे आवरण असणारे असते.

    हा चवीला गोड,थंड व वात पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.

    चला आता ह्याचे औषधी व घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:

    १)अंगाची आग होत असल्यास फळाच्या गराचा लेप करावा.

    २)अम्लपित्तामध्ये कोहळ्याच्या रसात साखर घालून प्यावे.

    ३)बुद्धि व धारणाशक्ती वाढवायला पिकलेल्या कोहळ्याच्या १/४ कप रसात १/२ चमचा ज्येष्टमध उगाळून घालावे व हे मिश्रण रोज सकांळी अनशापोटी प्यावे.

    ४)४ चमचे कोहळ्याचा रस+ ४ चमचे आवळा रस रोजसकाळीघ्यावाह्यानेथुंकी ,नाक,लघ्वी,
    मुळव्याध ह्यातून होणारा रक्त स्त्राव कमी होतो.

    ५)डोळ्यांची आग होत असल्यास व डोळे लाल होत असल्यास कोहळ्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.

    ६)वजन वाढवायला ४ चमचे कोहळ्याचा रस +गव्हाचे सत्व १/२ चमचा+ खडी साखर १ चमचा रोज सकाळी अनशापोटी घ्यावे व वर १२ सुर्यनमस्कार घालावेत.

    कोहळा अति खाल्ल्यास शरीर स्थूल होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग सात

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे एकोणपन्नास
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग सात

    न हुं कुर्याच्छवं पूज्यं प्रशस्तान मंगलानि च !
    कोणाच्याही मृत शरीर म्हणजे शवाकडे पाहून तिरस्कार युक्त हुऽऽ असे तुच्छता पूर्वक संबोधू नये.

    मरणानंतर वैर संपते, नंतर त्याच्या शवाची हेटाळणी किंवा विटंबना होऊ नये. श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर त्याचे केलेले और्ध्वदेहिक प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवरायांनी अफजलखानाला वधल्यानंतर त्याचे थडगे बांधले. दुर्दैवाने पश्चात या थडग्याचे रूपांतर वातानुकूलित महालामधे केले गेले, हे उदात्तीकरण न्यायालयाने देखील अव्हेरले आहे. या उलट पाकिस्तानी सैनिकांनी अनेक वेळा भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची केलेली विटंबना आपणाला आठवण असेलच. इथे भारतीय संस्कारांचे महत्त्व लक्षात येते.

    प्रसिद्ध व्यक्ती, विद्वान व्यक्ती, कुठेही दिसल्या तरी त्यांना नमस्कार करावा. एवढेच नव्हे तर सिद्ध वनस्पती दिसताच त्या वनस्पतीना देखील नमस्कार करावा. सिद्ध म्हणजे ज्यांचे औषधी गुणधर्म प्रसिद्ध आहेत अशा वनस्पतीना मनोमन वंदन करावे.

    वेली वनस्पतीना देखील भावना असतात, त्यांना देखील स्पंदने कळतात. प्रत्यक्ष डोळे नसले तरी आजुबाजुला काय आहे, याची माहिती त्या घेत असतात. त्याचा आधारही आपल्या तंतु प्रतानाद्वारे घेतात. आपल्या आवाजाला, बोलण्याला, स्पर्शाला त्या प्रतिसाद देतात. माणसाच्या सहवासाने चाफा बहरतो, लाजरी स्पर्श झाला की लाजते, राहत्या घराजवळील काजु अधिक फळ देतो. हे तर प्रत्यक्षात दिसते.

    आपला जन्म ज्या नक्षत्रावर झालेला असतो, त्या नक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो. म्हणजेच आपला तो वृक्ष आराध्य असतो. आपले रक्षण करणारा आपला वृक्ष आपल्याला माहिती हवाच. जेव्हा कुठेही उत्तर सापडत नाही, तेव्हा हा वृक्ष आपले आरोग्य रक्षण करायला मदत करतो.

    नक्षत्र वृक्ष या कन्सेप्ट अनुसार काही ठिकाणी नक्षत्र उद्यान, हर्बल गार्डन, सुरू झालेल्या आहेत.

    नक्षत्र कोणतेही असो. वनस्पतीचे संरक्षण तर झालेच पाहिजे. त्यासाठी वनस्पतींची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आजुबाजुला असंख्य वनस्पती दिसतात, त्यांची नावे औषधी गुणधर्म आपणालाच माहिती असत नाहीत. हे गुणधर्म जर समजून घेतले तर अनेक छोट्या छोट्या आजारामधे आपण त्या वापरू शकतो. आणि हे ज्ञान फक्त आयुर्वेदच देऊ शकतो.

    या वनस्पतीचे संरक्षण व्हावे, यांची ओळख पुढील पिढीला व्हावी, एखादी वनस्पती आपल्या जवळपास कुठे आहे याची आपल्याला माहिती असावी, यासाठी देवाच्या नावाने पत्री पूजा वाहाण्याचे कर्मकांड आपल्या धर्मात सांगितलेले आहे. वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, आवळी भोजन, कुष्मांड नवमी, शमी आपट्यासाठी दसरा, दुर्वांसाठी गणपती, बेलासाठी महादेव, देवीसाठी कमळ, विष्णुंसाठी तुळस, मारूतीरायासाठी रूईची माळ, अशा अनेक वनस्पतीसाठी अनेक सण आणि देवता निश्चित करून ठेवण्यामागील दृष्टीकोन लक्षात घ्यावा. म्हणजे या प्रथा आणि कर्मकांडे का सुरू झाली याची उत्तरे सहज मिळतील.

    प्रत्येक वनस्पतीकडे आदराने पहावे, तिच्यातील औषधी गुणाचे ज्ञान मिळवावे, तिचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी या वनस्पतीना देवतेसमान दर्जा देणारे आमचे ऋषी खरंच "ग्रेट" होते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०७.०९.२०१७

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंचवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    शब्दाने शब्द वाढवू नये.

    अरे म्हटले की, कायरे असे उत्तर येते. आणि अहो म्हटले की, काय हो, असा प्रतिध्वनी येतो.
    रामराम म्हटले की, राम राम असेच प्रत्युत्तर मिळेल.

    ही जगाची रिती आहे. जगायची नीती आहे.

    आणि गरज नसताना शब्दाने शब्द का वाढवावा ? याने भांडण वाढते. भांडण मिटवायचे असेल तर एकाने तलवार काढली तर दुसऱ्याने ढाल स्विकारावी. म्हणजे भांडण मिटते.

    उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये.
    या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण !

    उंबरा हा घराला असतो. उंबरा ही घराची सुरवात आहे.
    बाहेरील काही सरपटणारी जनावरे दरवाजा आणि त्याखालील जमिनीच्या फटीतुन आत येऊ नयेत, यासाठी घराच्या पुढील आणि मागील मुख्य दरवाज्यांना उंबरठा असतो. म्हणजेच उंबरा हा घराचे एका अर्थाने संरक्षण करीत असतो.

    घर हे सर्वांचेच असते. घरात राहून काम करणाऱ्यांचे आणि घराबाहेर राहून घरासाठी राबणाऱ्यांचे. मग ती स्त्री असो वा पुरूष. आणि हो, घराच्या मर्यादाची काही लिखित संहिता नाही की, उंबरठ्यावर बसून नियम तपासून घरात प्रवेश. घराच्या मानमर्यादांचे उल्लंघन होऊ नये, एवढंच. या मानमर्यादा प्रत्येक घराच्या वेगळ्या असतील. काही जणांच्या कपड्यांच्या, काही जणांच्या सोवळ्याच्या, काही जणांच्या डोक्यावरून पदर घेण्याच्या तर काही जणांच्या चेहेरा सुद्धा झाकून घेण्याच्या या परंपरा त्या त्या घरानुसार पाळल्या गेल्या पाहिजेत. इथे त्या घराचा आत्मसन्मान, समाजातील स्थान, लपलेलं असतं. जसं एखाद्या डाॅक्टरकडे पहाण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन असतो. त्याने नीटनेटके कपडे घालावेत, जरा चांगले दिसावे, त्याच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटतंय, असं बघणाऱ्याला वाटलं पाहिजे. हे चुक नाही. समजा, एखादा डाॅक्टर आडव्या चट्यापट्याचा शर्ट, शर्टची वरची दोन बटणं उघडी, डोळ्यावर मल्टीकलर गाॅगल, पान चघळतोय, केसांचा स्पाईक, खांद्यावर रूमाल आणि स्वतः रिक्शा चालवित, ओपीडी मधे आला तर वेटींगमधे बसलेल्या रुग्णांना कसे वाटेल ? त्यांच्या मनातील डाॅक्टर या प्रतिष्ठेला धक्का बसेल.

    अशीच प्रतिष्ठा प्रत्येक घराला जोडलेली असते. घराला म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला जोडलेली असते. घराची ही प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे.

    घराच्या उंबऱ्याचे हे नियम गृहीत धरलेले असतात. आणि तसं बघायला गेलं तर हे नियम कुठे आहेत? घराचा उंबरठा ही घराची प्रतिष्ठा आहे. तुम्ही असं काही करू नका, ज्याने आपल्या प्रतिष्ठेला बाधा पोचेल, असं खरं तर म्हणायचं असतं आईला !

    पण आता घराला उंबरेच कुठे दिसतात ? तेच तर गायब झालेत आणि त्याबरोबर घराची प्रतिष्ठा देखील !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १४.०८.२०१७

  • आहारातील बदल भाग ६२-चवदार आहार -भाग २४

    कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे पराठे, शेवग्याच्या पाल्याची भाजी. याचा अर्थ हे पदार्थ मधुमेहाचे शत्रू आहेत का ? हो. नक्कीच. फक्त प्रमाण लक्षात ठेवावे. पानाच्या डाव्या बाजूला !

    मधुमेहाचा शत्रू म्हणजे कडू चव असे का म्हटले जाते ? मधुमेहात शरीराला चिकटण्याचा गुणधर्म वाढतो. मग तो, क्लेद असेल नाहीतर मेद असेल, रस धातू असेल नाहीतर स्तन्य असेल. हे दोष विशेष शरीरातील स्रोतसांना चिकटून राहिले तरच दुष्टी निर्माण होते.
    कडू चवीच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमध्ये खर म्हणजे खरखरीतपणा, दोन पेशींना एकमेकांपासून वेगळे करण्याचा गुण, याला शास्त्रकार विशद असे म्हणतात. आणि रूक्ष म्हणजे कोरडेपणा हे महत्वाचे गुण असतात.

    मधुमेहामधे नेमके यांच्या विरूद्ध गुण शरीरात वाढलेले असतात, त्यामुळे गुणविपरीत औषध म्हणून कडू चवीची औषधे मधुमेहावर छान गुण दाखवतात.

    मधुमेहाशिवाय वाढलेली ढेरी कमी करणे, किंवा शरीराचा कोणताही भाग फाजीलपणे वाढणे, गळ्याच्या गाठी वाढणे, गर्भाशयात फायब्राॅईडची गाठ वाढणे,शरीरात आत बाहेर कुठेही अमर्याद स्वरूपात वाढणारी कर्करोगाची गाठ, डोळ्यांचे आजार, सांध्यांना येणारी सूज, रक्तातील चिकटपणा वाढल्यामुळे रिपोर्टमधे दिसणारे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड, वगैरे पॅथालाॅजिकलल आजारदेखील या कडू चवीने कमी होतात. आमामुळे पोट गप्प होणे, बरेच दिवसांच्या बऱ्या न होणाऱ्या जखमा, ती अगदी साधी सर्दी देखील कडू चवीने कमी करता येते.

    तापावर हटकून उपयोगी पडते ती कडू चव ! म्हणून तापाची कारणे शोधता न आल्यास, कडू चवीची औषधे वापरली की ताप जातो. जसे महासुदर्शन काढा.

    औषध कोणतेही असूदेत, ताप उतरला पाहिजे. एवढेच रूग्णाला अपेक्षित असते. मग ते कडू चवीचे महासुदर्शन चूर्ण असू देत नाहीतर, कडू चवीची पॅरासिटेमोलची कडू जार गोळी. कडू म्हणजे ताप उतरवणारे हे साधे सोपे समीकरण आहे.

    पुस्तकात लिहिलं नसलं तरी या कडू चवीचा अतिरेकी परिणाम म्हणून वात आणि पित्त हे वाढतेच, हे आपण व्यवहारात बघतोच! हातच्या ( दिसणाऱ्या) वातपित्ताला ग्रंथाधार कशाला ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    24.11.2016

  • आजचा आरोग्य विचार – भाग तेहेतीस

    ६६ भारतीय आहारामधे सहा चवी हव्यात. पण आज मधुमेह झाला म्हणून गोड बंद, पित्त वाढते म्हणून तिखट आंबट बंद, रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद, आवडत नाही म्हणून कडू बंद, राहिली एक तुरट चव. पाश्चिमात्य आहाराविषयी न बोललेलंच बरं.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग आठ

    अन्नाला ओलेपणा क्लिन्नपणा येण्यासाठी महत्त्वाचे काम करते ती लाळ. डोळ्यात ज्याप्रमाणे पाणी स्रवत असते, तशी लाळ तोंडात स्रवत असते. लाळेच्या बुळबुळीतपणामुळे अन्न पुढे सरकायला मदत होते, आतड्यांना अन्न घासले जात नाही.म्हणून हा ओलेपणा एक प्रकारे वंगणाचे काम करत असतो.

    लाळेमधे टायलीन नावाचे हे एक प्रकारचे विकर म्हणजे एन्झाइम आहे. पचनाला मदत करणारी अन्य घटकद्रव्ये यात सामावलेली असतात. जेवढी लाळ जास्ती तेवढे पचन सुलभ. त्यामुळे प्रत्येक घास जेवढा अधिक वेळ चावला जाईल, तेवढीच जास्त लाळ तयार होते.

    शाळेत चौथीमधे असताना एक प्रयोग केलेला आठवतोय, भाकरीचा तुकडा जेवढा चघळला जाईल, जेवढी लाळ मिसळली जाईल, तेवढी भाकरी गोड होत जाते. पिष्टमय पदार्थांचे पचन करण्यासाठी लाळ मदत करते, असे अनुमान प्रयोगवहीत लिहिलेले होते.

    आज व्यवहारात मधुमेहाच्या अपथ्यामधे पिष्टमय पदार्थ सांगितले जातात. पिष्टमय पदार्थ पचले नाहीत तर मधुमेहासारखे आजार बळावतात, म्हणून मधुमेहामधे आपली लाळ हे आपले औषध ठरू शकते. घाईघाईने खाल्ल्यामुळे लाळ अन्नामधे चांगली मिसळली जात नाही. आणि पचन बिघडते.

    लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींची तोंडे नीट उघडी असतील तर लाळेचे स्रवण चांगले होते. गव्हापासून बनलेल्या मैद्याच्या लगद्याने लाळेची काही छिद्रे बंद होतात. याकरीता मैद्यापासून बनलेले पदार्थ रोज रोज खाणे बंद करायला हवेत.

    लाळ सुटण्यासाठी आंबट तिखट हे पदार्थ मदत करतात. चिंच म्हटली तरी तोंडात चिंच झरकन पाझरते. आवडीचे पदार्थ असतील तर तोंडाला पाणी सुटते. नारळाचा तुकडा, चार शेंगदाणे, दोन चिमूट बडिशेप, लवंग, वेलची, मसालापान यापैकी काहीही जेवणानंतर चघळल्यामुळे लाळ तयार होते आणि पचन सुधारते.
    तंबाखू, गुटका, मावा सारखे सतत काहीतरी चघळत राहाणे चुकीचे. हे लक्षात ठेवावे.
    नाहीतर आपण सोयीस्कर अर्थ काढण्यात पटाईत !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    23.03.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग अठरा

    भारतीय दर्शन शास्त्रात अनेक ग्रंथ अभ्यासासाठी आहेत. याविषयी सविस्तर दोन तीन दिवसामधे लिहीन. १८ दिशा विचार मल विसर्जन करताना उत्सर्जित केलेला मळ अथवा मूत्र पुनः आपल्या पायावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी जागेचा उतार नीट पहावा. आता मलविसर्जनावेळी जी भांडी वापरली जातात ती अशा उताराची असावीत.