काही प्रश्न काही जणांच्या मनात काल उपस्थित झाले.........
आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत,
आमचा प्रोटीन्सचा सर्वात मोठा पर्याय म्हणून आम्ही दुधाकडेच पहात होतो,
मग आम्ही असे पौष्टिक दूध पिणे बंद करायचे का ?
असे भावनिक होऊन नाही चालणार ! दूध म्हणजे अमृततुल्य आहे, हे जरी सत्य असले तरी व्यवहार पण लक्षात घ्यावा. दूध पचायला जड असते. टिकाऊ नाही. जरा दुसरा हात लागला तरी नासते, एवढे नाजुक आहे.
लहर आली तर प्यावे. उपास असेल तर प्यावे, भूक चांगली असेल तर प्यावे. पण दूध नियम करून पिऊ नये.
आम्ही सकाळी चहा पिणार, त्यात मैद्याची बिस्किटे बुचकळून खाणार, नंतर भरपेट नाश्ता करणार, दुपारी परत जेवणार, मधे एखाद्या औषधांचा डोस अगर टाॅनिक, अॅण्टी ऑक्सीडंटचा डोस घेणार, आणि विसरलोच, सकाळी चहा अगोदरचा एलोवेरा आवळा करेला ज्युस. दुपारी अगदी वेळेत जेवणार. जेवणानंतर तांब्याभर पाणी पिणार. जेवणानंतर घ्यायच्या औषधी. पुनः त्याच्या बरोबर भांडभर पाणी. नंतर तासभर झोपणार. परत तीन चार वाजता फक्त कपभर चहा. अधे मधे चहा होतो तो वेगळाच. त्यावेळी पुनः म्हणे शुगर फ्री मारी नाहीतर एखादी खारी. दर तीन चार तासांनी खाल्ले नाहीतर म्हणे अॅसिडीटीच वाढते, असं डाॅक्टरनीच बजावून सांगितले आहे, म्हणून सायंकाळी सहा वाजता परत काहीतरी लाईट नाश्ता. मधल्या वेळेचा औषधांचा डोस असतोच. पुनः बाजारात गेलो तर एखादा दाट लस्सीचा ग्लास. नशीब या ग्लासबरोबर अजून तरी चकना नाही . भूक लागल्याशिवाय जेवायचे नाही. हा नियम आम्ही हटकून पाळतो, त्यामुळे भूक लागेपर्यंत रात्रीचे दहा वाजलेले असतात. म्हणून जेवण होते दहा वाजता.! आणि आयुर्वेदात रात्री झोपताना म्हणे दूध प्यायला सांगितले आहे. म्हणून परत झोपताना एखादा ग्लास दूध घेतले जाते. सकाळी उठल्यापासून पोटाचे मशीन चालूच. त्यात फळे भरणे, सॅलेडचा कचरा, हाय प्रोटीनच्या नावाखाली गिळलेले मांस, चवीला छान म्हणून मासे, डब्याची सोय म्हणून गव्हाची चपाती, आणि भरपूर पाणी.......
आणि या डब्याच्या मधली जागा भरून काढण्यासाठी पौष्टिक दुध !!!!!??????
किती अत्याचार करायचे ?
तो जागा आहे, म्हणून निदान पचवतोय आणि आपण हिंडतोय फिरतोय ! एखादा दिवस जरी त्याने काम थांबवले की आजार पाठी लागतातच. दूध अत्यंत पौष्टिक आहे. यात वाद नाहीच. पण जे अत्यंत पौष्टिक असते, ते पचवण्यासाठी अग्निदेखील तेवढाच प्रखर लागतो.
आहे उत्तम गुणाचे म्हणून काय सगळं एकदमच खाल्लं पाहिजे काय ?
ग्रंथामधे जे लिहिलेलं असतं, ते अगदी कडक नियम म्हणून नव्हे तर एक आधार म्हणून लिहिले जाते, काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
काही सूत्रांचे भावार्थ, (जसे देव ह्रदयात असतो. )
काहींचे लक्षार्थ, ( आम्ही काही अगदी तसे नाही हो )
काहीचे शब्दार्थ ( मेहनत केल्याशिवाय प्रमेह नत होणार नाही. )
तर काहींचे श्लेष लक्षात घ्यावे लागतात,( माहीतीये किती श्याणा आहेस ते !)
नाहीतर क्लेष होतात.
दिनान्ते पिबेत पयम् हा जो श्लोक सांगितला जातो, तो वैद्यकीय सुभाषितामधला असावा. ग्रंथातला नाही. हा नियम देखील सर्वसाधारण सांगितलेला आहे. सर्वासाठी आहे, असे नाही. त्याचे व्यावहारिक उपयोग वैद्य ठरवित असतो.
आज अॅलोपॅथी डाॅक्टरदेखील, दूध पिताना सायीखालचे दूध प्यावे असे सांगतात. पण या प्रयोगाने शरीरातील सर्व स्निग्धत्व संपून जाते. स्नेह विरहित दूध पिऊन नुसते पोट भरेल, पण पोषण होणारच नाही. मग प्यायचेच कशाला ?
दूध प्यायचेच असेल तर केवळ दूधच पिऊन रहावे. त्यावेळी दुसरे काहीही पदार्थ नको. हे कोजागिरी पौर्णिमेला विशेष लक्षात ठेवावे. भेळ भजी खातखात आटीव मसाला दूध प्यायले तर काय होणार ?
पिताना गोड लागणार, पण पोटात जाऊन नासणार !
मग कसे पचणार ?
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.01.2017
January 23, 2017
“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. “
April 13, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग तीन
यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.
अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.
या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.
एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.
औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.
एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.
एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.
एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.
पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......
या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.05.2017
May 25, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही. - भाग नऊ
विश्वासराव पानीपतच्या लढाईत मारला गेला. आता कोणावर विश्वास म्हणून ठेवायला नको, असे वाक्प्रचार आपण व्यवहारात वापरतो.
औषध देणाऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवून औषध घेणं महत्वाचे असते, तसंच मी बरा होत आहे, बरा होणार आहे, हा स्वतःवरचा विश्वास देखील महत्वाचा असतो.
औषध सेवन करत असताना हा विश्वास मिळवण्यासाठी भाव निर्माण करणं महत्त्वाचा असतो.
औषधं जाह्नवीतोयं, वैद्यो नारायणो हरिः ।
...... श्रद्धय हरिकिर्तनम।
मी हे जे काही औषध घेत आहे, ते जणुकाही गंगोदक आहे, त्याने माझे सर्व रोग नष्ट होत आहेत, आणि "औषध देणाऱ्या वैद्याला, मी नारायण स्वरूपात पहातोय, मग त्याने दिलेले तीर्थ घेतल्यावर मला गुण का येणार नाही," अशी श्रद्धा हवी, म्हणजे साधे एचटुओ सुद्धा तीर्थ बनते.
अकाल मृत्यु हरणम्
सर्व व्याधी विनाशनम्,
विष्णुपादोदकं तीर्थे
जठरे धारयाम्यहम् ।
असा मंत्र आपण देवाचे तीर्थ घेताना म्हणतो, (असा म्हणावा, म्हणजे तसा भाव, कल्पनेने तयार करावा, म्हणजे आपण जे एचटुओ, दूध, पंचामृत, नदीचे, नळाचे पाणी पितो, ते जणुकाही प्रत्यक्ष भगवंताने दिलेले औषध आहे, असा भाव ठेवावा. ब्रॅण्डेड औषध आणि जेनेरीक औषध घेताना सुद्धा असाच भाव ठेवावा का, असा प्रश्न कृपया विचारू नये.
हे तीर्थस्वरूप औषध घेतल्यावर, माझा अकालमृत्यु टळणार आहे, सगळे व्याधी मुळातून नष्ट होत आहेत, म्हणून हे औषध स्वरूपात असलेले तीर्थ, मी माझ्या जठरात म्हणजे पोटात घेत आहेत. (आता मला काळजीचे काहीच कारण नाही. आता माझी काळजी घेणारा, सर्व शक्तीमान परमेश्वर माझ्याबरोबर असताना काळजी कशाला ? काळोख कितीही पडलेला असेना का, जर माझ्याकडे उजेड करण्याचे खात्रीचे साधन जर असेल तर काळोखाची भीती वाटायचे काहीच कारण नाही.)
आता, परमेश्वरच नाही, ही विकल्प भावना आपणच जर तयार करून घेतली असेल तर, तीर्थ काय, पाणी काय. ब्रॅण्डेड काय, जेनेरीक काय, कशानेच गुण येणार नाही. एक भक्कम आधार भक्तीचा हवा तर भीती नाहीशी होते.
"मेरे लिए दुवा करो,"
"प्लीज, प्रे फाॅर मी" असं सांगणारी मुसलमान ख्रिश्चन माणसे आपण अवतीभवती बघतो, पिक्चरमधे असे डायलाॅगदेखील आपण ऐकतो, पण "माझे आजारपण कमी होण्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी देवाला सांगा", असं विश्वासाने सांगणारी माणसे कमी होत चालली आहेत.
केवळ औषध काम करत नाही.
हरबार दवा काम नही करती, कभी कभी दुवा भी काम करती है !
यालाच दैवं पंचमम् उत्तमम् असे म्हटलेलं आहे.
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
27.04.2017
April 27, 2017
पदार्थामधील पाणी कमी केले की तो टिकाऊ होतो. द्राक्ष आणि मनुका बेदाणे, ओला अंजीर सुका अंजीर, ताजी फळे आणि सर्व ड्राय फ्रूटस, यात टिकाऊ काय ? कोणते पदार्थ ?
जे सुके आहेत ते. ज्यांच्यात पाणी कमी आहेत ते !
साधा रवा आणि भाजून ठेवलेला रवा. साध्या रव्यात कीड पटकन होते. पण भाजून ठेवल्याने त्यातील पाणी कमी केले जाते. जंतुना जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी कमी झाल्याने, भाजून ठेवलेल्या रव्यात कीड, टोका पडत नाही. बरोबर ना !
घरात आणलेल्या पालेभाज्यांचं सर्वसाधारण आयुष्य किती ? एक दिवस. जास्ती जास्त दोन दिवस. नंतर त्या चक्क मान टाकतातच ! पाण्याच्या अभावाने त्या मरतात. पालेभाज्या म्हणजे ऐशी नव्वद टक्के पाणीच ना ! पाणी संपले की संपले. हीच पालेभाजी पाणी शिंपडून ओट्यावर ठेवली तर जिथे पाणी साठले आहे, त्या ओट्याला चिकटून राहिलेल्या भागातील भाजी कुसुन लिबलिबीत होते. फुकट जाते.
पाण्याशिवाय जीवन नाही. जंतुचे देखील तसेच आहे. स्थूल आणि सूक्ष्म जीवांना जगण्यासाठी देखील पाणी हवे असते, ते मिळाले नाही तर ते पण मरतात.
झुरळांची पैदास कुठे होते ? बेसिनच्या खाली.
डासांची वाढ कुठे होते ? पाण्यामध्ये.
त्यांचा जन्म, पोषण, वंशवृद्धी पाण्यावर, पाण्याच्या दमटपणावर अवलंबून असते. पाणी नसले की जीवन संपले.
चंद्र मंगळावर जी अंतराळ याने पाठवताहेत, ती कशासाठी? केवळ दगडधोंडे आणि हवामान तपासायला ?
नाही.
त्या दगडातील पाण्याचा अंश शोधायला.
त्या दगडात जरा जरी पाण्याची शक्यता वाटली तर तिथे इतर जीवजंतु नक्कीच असणार. या शक्यतेवरच या मोहिमा चालतात.
म्हणजे जीवांना त्यांचे पोषण करणारे पाणी जिथून मिळेल तिथे हे जीव स्थिरावतात, हा वैश्विक नियम आहे.
याची दुसरी बाजू. जिथे पाणी नाही, तिथे जीव संसर्ग नाही. इन्फेक्शन नाही.
म्हणजेच
शरीरातील पाणी गरजेपेक्षा वाढत गेले तर तिथे जीवांची उत्पत्ती होणारच. आणि अवास्तव पाणी कमी करत गेलो तर जंतुसंसर्गही तेवढाच कमी होत जाणार ! बरोबर ना ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.12.2016
December 18, 2016
आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी हि वनस्पती.तशी सगळ्याचीच लाडकी.कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसहारी पदार्थ असो जसे वरण,डाळ,पोहे,उपिट,भाज्या,माशांची आमटी,चिकन,मटण ह्यावर सजावटी करीता हिची पेरणी करतात.तसेचकाथिंबीर चटणी,कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या.ब-याचं व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविणा करिता केला जातो.कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जत हि वाढते.
कोथिंबीरीचे १ मीटर उंचीचे नाजुक क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली व सुगंधी असतात.हि चवीला तुरट,कडवट व गोड असते व गुणाने थंड असते.म्हणुनच हि शरीरातील तिन्ही दोष शांत करते.
जसा आपण हिचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतो तसेच हिचा वापर घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.
१)तोंड आले असता कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.
२)डोकेदुखी मध्ये कोथिंबीरीचा पाला वाटून त्याचा लेप कपाळावर करावा.
३)कामाच्या दरम्यान जर चेहर्याचा संपर्क उष्णतेशी आल्यास त्वचा कोरडी होते व त्वचेची आग होते तेव्हा कोथिंबीरीच्या रसांच्या घड्या चेहर्यावर ठेवाव्या थंडावा मिळतो.
४)वारंवार उल्ट्या होत असल्यास कोथिंबीरीचा रस+मध हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.
५)ओल्या इसबावर कोथिंबीर वाटून त्यात वेखंड घालून ह्या मिश्रणाचा जाडसर लेप त्यांवर करावा.
६)हाता पायाची आग होत असल्यास कोथिंबीरीच्या पाल्याचा रस काढुन हातापायांच्या तळव्यांना चोळावा.
कोथिंबीर खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील धातूंना क्षीणता येते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 29, 2016
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 4
आपण अवलंबून रहात असलेल्या रिपोर्ट मधला फोलपणा आपल्याला काही वेळा दुसरे निदान करायला भाग पाडतो. निदानच बदलले तर चिकित्सा पण बदलत जाते, पथ्यपाणी बदलते.
आयुर्वेदाचा एखाद्या रोगाच्या चिकित्सेमागील दृष्टीकोन लक्षात यावा यासाठी हे लिहितोय.
म्हणून वैद्य जेव्हा रूग्णांची तपासणी करतात, तेव्हा रिपोर्ट तपासणे, हा कार्यक्रम सगळ्यात शेवट पार पाडतात. पण रूग्णांना काय कौतुक असते, रिपोर्ट दाखवण्याचे ! एवढ्याऽऽऽऽऽ तपासण्या केल्यात ! ही एवढी फाईल. ज्याचा खरंतर त्यावेळेस काऽऽही उपयोग नसतो.
हे सर्व रिपोर्ट का करायचे, तर त्यावेळेस रुग्णाची काय परिस्थिती होती, एवढंच समजण्यासाठी. तो रिपोर्ट " असा " का आला याचे उत्तर मात्र कोणाकडेच नसते. तो आत्ताच असा का आला, याचेही उत्तर कोणाकडे नसते. हे कमी आहे, आणि हे वाढले आहे, त्यासाठी आमच्याकडे हे औषध आहे, हे उत्तर मात्र सगळ्यांकडे असतं. फक्त कंपन्यांची नाव फक्त बदलतात. एवढंच !
आयुर्वेदात अश्या काही प्रयोगशालेय चाचण्या सांगितलेल्या नाहीत का ?
आयुर्वेदातील सारे निष्कर्ष हे संशोधनाअंतीच लिहिलेले आहेत. "इदं आगमसिद्धत्त्वात्" असे ग्रंथकर्ते स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात,
" हे आम्ही यापूर्वी तपासून बघितलेले आहे, आता यावर पुनः डोके खर्च करू नका. यापुढील संशोधन करा."
त्वचेची, रक्ताची रंग परीक्षा, लघवीची तेलबिंदू परीक्षा, मलाची परीक्षा करून निदान कसे करावे, हे सुस्पष्ट पणे मांडून ठेवलेले आहे. काळाच्या ओघात यातील काही तपासण्या मागेच राहिल्या, त्यातील मुत्राच्या तैलबिंदू परिक्षणा सारख्या परीक्षांचा वैद्यांनी पुनः अभ्यास करायला हवाय.
थोडं विषयांतर होतंय, पण मनात आलं ते लिहून टाकतो,
कावीळ झालेली नाही, काविळीचे एकही लक्षण रूग्ण सांगत नाही. पण रिपोर्टमधे कुठेतरी विकृती दाखवली जाते, कावीळ वाढू नये म्हणून उगाचच आयुष्यभर पथ्य करीत बसायचे असते का ? रोगापेक्षा रोगाची भीती ही आपल्याला मृत्युकडे लवकर नेणारी असते.
त्यापेक्षा कोणताही रोग होऊ नये यासाठी आपली प्रतिकारक्षमताच एवढी वाढवून ठेवावी, की चुकुन जरी काही वेळा अपथ्य झाले तरी, काहीही होता कामा नये.
चेक बाऊंस होऊ नये यासाठी कसं पुरेसा बॅलन्स अकाउंटमधे ठेवणे आवश्यक असते, तसं आपल्याकडील इंद्रियांच्या सर्व क्षमता एवढ्या वाढवून ठेवायच्या की, चुकुन एखाद्या वेळी एखाद्या रोगाचा सामना करायची वेळ आलीच तर पुरेसा शक्तीचा साठा आपल्याकडे तयार असेल. ऐनवेळी कुठे जाणार ना ! एनी टाईम मनी कधी मिळतील? पुरेसा बॅलन्स असेल तरच !
केवळ अॅण्टीऑक्सीडंटस् घेणे म्हणजे प्रतिकार क्षमता वाढवणे नव्हे हं !
हे सगळं पाश्चात्य डोकं. त्यांना सगळं कसं इन्स्टंट हवं असतं. पाणी विहिरीतून येतं, त्यासाठी ती जमिन खणावी लागते, विहिर बांधावी लागते, तरच विहिरीला असलेले पाणी हवे तेव्हा वापरता येते.
हे कोणाला कळेल ? ज्यांनी कायम टॅप वाॅटरच वापरले आहे त्यांना ? विहिरच बघीतली नाही त्यांना ? मग त्यांच्यासाठी वेगळी गरज निर्माण होते, त्याला ते इन्स्टंट म्हणतात.
एक गोळी टाकली तोंडात की आली एनर्जी. असं कुठाय ? ती काय हवा आहे का ? चाकाला ट्यूब जोडली आणि हवा भरली !
तसं शोधायला गेलं तर आयुर्वेदातील सगळी रसायन औषधे ही अॅण्टी ऑक्सीडंटच आहेत. सगळे मसाल्याचे पदार्थ अॅण्टीऑक्सीडंटच आहेत. असो. पाश्चात्यांची संशोधक वृत्ती मात्र अभ्यासण्यासारखी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचाही ते अतिशय मनापासून अभ्यास करतात, आणि महत्त्वाचे म्हणजे आपले संशोधन लिहून ठेवतात, इतरांना सांगतात. त्यामुळे पुढील पिढीला त्याचा फायदा होतो. एकदा झालेली चुक टाळता येते.
भारतीय संशोधनातील एक मोठ्ठा दोष हा रहातो, की आमचं डाॅक्युमेंटेशन नीट होत नाही. ज्यावेळी जे गरजेचं आहे, ते केलंय. काहीवेळा, त्याचं महत्व लक्षात येत नाही, काही वेळा, कशाला लिहून ठेवायचं, राहातंय लक्षात. असं म्हटलं जातं.
मग कधीतरी गरज असते तेव्हा इसारलंय म्हटलं की झालं....
भारतीय संशोधक प्रत्येक वेळी चुकतात असं नाही,
आता इस्रोचीच गोष्टच बघा ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.02.2017
February 18, 2017
हा देखील गरम मसाल्यातील एक अत्यंत सुगंधी पदार्थ.आपल्यापैकी बरेच जण ह्याचा उपयोग जेवणातील मसालेभात,पुलाव,गरम मसाला ह्या मध्ये तर केला जातोच.पण चहा अथवा काॅफी बनवताना देखील दालचिनी वापरली जाते.
दालचिनीचा वापर आपण घरगुती औषधामध्ये देखील करू शकतो.वाचून आश्चर्य वाटले का?
दालचिनीचा व्रुक्ष नेहमी हिरवागार असतो.आणी आपण वापरत असलेली दालचिनी ही त्या झाडाच्या बुंध्याची त्वचा हो.ह्यात एक उडवशील सुवासिक तेल असते ज्याचा बराचसा उपयोग त्याच्या औषधी गुणधर्मामध्ये होतो.
दालचिनी ही चविला कडू,गोड अशा मिश्र चवीची असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणी कफ दोष कमी करते आणी पित्त दोष वाढवते.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:
१)दात किडून दुखत असल्यास दालचिनीच्या तेलात भिजविलेला कापूस दाता खाली धरावे वेदना कमी होतात.
२)सर्दी,खोकला ह्या मध्ये सुंठ+दालचिनी+धणे घालून केलेला काढा प्यावा.
३)वारंवार पोटात क्रूमी होण्याची सवय असल्यास २ इंच दालचिनी +३० वावडींग दाणे+१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण दररोज साधारण दहा ते पंधरा दिवस घ्यावे व वर कोमट पाणी प्यावे.हा प्रयोग दर तीन ते सहा महीन्यांनी परत करावा.
४)लिंबाच्या रसात दालचिनी उगाळून लावल्यास वांग आणी चामखीळ कमी होतात.
५)वाढत्या वया सोबत काहीजणांची लघ्वीची तक्रार वाढते जसे वारंवार थोडी थोडी लघ्वी होणे,लघ्वीवरचा ताबा सुटणे,किंवा झालेली लघ्वी न समजणे ह्यात १/२ चमचा दालचिनी पूड सकाळ संध्याकाळी गरम पाण्यासोबत घ्यावी.
दालचिनीच्या अतिवापराने एसिडीटी,तोंडात उष्णतेचे फोड येणे,तसेच शरीरातील धातूंना क्षीणता येणे अशा तक्रारी उत्पन्न होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 24, 2016
एका गंभीर सुरात सर्वानी मिळून म्हटलेले हे मंत्रपुष्प, केवळ ऐकत असताना देखील अंगावर रोमांच उभे राहातात.
July 25, 2017
हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात ह्यात वादच नाही.
गोड,तिखट,कडू अशी ह्याची मिश्र चव असते आणी हि उष्ण असतात.ह्यास बोलू भाषेत तेजपत्ता असे ही म्हणतात.ह्याचे देखील काही औषधी उपयोग आहेत ते आता आपण पाहूयात.
१)१/२ चमचा तमालपत्र चुर्ण+४ चमचे लिंबाचा रस + १/२ ग्लास कोमट पाणी हे मिश्रण जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे घेतल्यास अन्नपचन नीट व्हायला मदत होते.
२)ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनी १/२ चमचा तमालपत्र पूड +१/४ चमचा हिंग+ २ चमचे लिंबाचा रस+१ चमचा आल्याचा रस हे मिश्रण गरम पाण्या सह घ्यावे.
३)वारंवार जुलाब होत असल्यास १/२ चमचा तमालपत्र चुर्ण+१/२ चमचा सुंठ पूड गरम पाण्यासोबत घ्यावी.
४)ज्या स्त्रीयांना वारंवार गर्भपात होण्याची सवय असते त्यांनी १/२चमचा तमालपत्र पूड + ६ चमचे केळफूलाचा रस हे मिश्रण सलग तीन महीने घ्यावे पण क्रूपया वैद्यांचा सल्ला देखील घ्यावा हि विनंती.
५)सर्दी,डोकेदुखी,नाक चोंदणे ह्यात तमालपत्र पूड हुंगावी कफ पातळ होऊन पडतो.
तमालपत्र अधिक मात्रेत घेतल्यास पित्ताचा त्रास आणी शरीरातील धातू क्षीण होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti