समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
देहे दुःख ते सुख मानीत जावे....
सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे !
प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात,
सुखापेक्षा समाधान महत्वाचे.
सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख संपते तिथे समाधान सुरू होते. किती अर्थपूर्ण वाक्य आहे ना हे. एका गोष्टी मधे संतुष्टी होतच नाही. एकावर एक फ्रीचा जमाना आहे. तिथे सुख कुठे संपते हे कसं कळणार ?
प्रमेहाच्या सूत्रामधे या सुखासनाचा सर्वात प्रथम उल्लेख करावासा वाटला. आळशी बनत जाणे, वृत्तीने, कर्माने, तनाने आणि मनाने सुद्धा!
आजची तरूण पिढी. दोष देत नाही, पण नाक्यावरून दळण आणायचं झालं तरी बाईकचं बटन स्टार्ट केल्याशिवाय दळण सुद्धा आणले जात नाही. छोटी छोटी काम करायचा आळस हा पुढे मधुमेहासारख्या आजाराला जन्म देतो, हे लिहून ठेवणारे दूरदृष्टीचे ऋषी, भारतात होऊन गेले याचा अभिमान बाळगायलाच हवा. पण पाश्चात्यांच्या आपण एवढे आहारी गेलो आहोत की, आमच्या ऋषींचे कौतुक सोडाच, पण भारतीयांनाच मागासलेपणाचा शिक्का मारून आपण मोकळे होतो.
घरातील छोट्या छोट्या गोष्टी करायला लाज कशाला बाळगायची ? ही कामे करताना आरोग्याचे पण रक्षण होतेच आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.
किती सोप्पं आणि सुखासिन झालं आहे जगणं.
चुल फुंकावी लागत नाही, की जमिन सारवावी लागत नाही,
पाणी ओढायला लागत नाही, किंवा शेंदावे लागत नाही, नळ सोडला किंवा बटन दाबले की पाणी किचनमधे !
ठिबक सिंचनमुळे पाणी झाडांना सुद्धा द्यावे लागत नाही.
ट्रॅक्टरमुळे नांगर हातात धरावा लागत नाही,
मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंटाही गेला. टेबलखुर्ची आली नि खाली बसून जेवणारी पंगत संपली,
एवढंच काय वारा घेण्यासाठी सुद्धा हात हलवावा लागत नाही.
हळदीकुंकु असेल तर निमंत्रणे देण्यासाठी फिरावे लागत होते, वाॅटसपमुळे तेही नाही.
शाॅपिंगही ऑनलाईन. पैसे मोजायचे पण श्रम नाहीत, करा स्वाईप !
पाश्चात्य देशात काम करायला माणसं मिळत नाहीत म्हणून मशीनची निर्मिती करणे ही त्यांची गरज होती, पण माणसांची मुबलकता असलेल्या प्रिय भारत देशात, पाश्चात्यांनी बनवलेली मशिन्स घरात आणून, माणसे मुबलक मिळतात म्हणून मशिन चालवायला पुनः बाई किंवा बाबाला ठेवायला लागले. ही सुखासिनता नव्हे काय ?
नंतर आजारपण आल्यावर दिवसाला सोळा सोळा प्रकारची औषधे खात बसून आरोग्य विकत घ्यायचे ? याला काय म्हणावे ?
मध्यंतरी एक जपानी व्हिडिओ बघीतला होता, माणसाला बेड वरून हलवून उठवायला घड्याळ. त्याचा बेड आणि त्याला उभा करायला मशिनची प्रगत टेक्नाॅलाॅजी. त्याचे गाल बाजुला करून तोंडात टूथब्रश ढकलून त्याचे दात घासले गेले, नंतर चुळ भरायला पाणी तोंडात सोडले गेले, चुळ भरायला छोटे बेसिन, आपल्या पिकदाणी सारखे तोंडासमोर हजर.
रोबोच्या दुसऱ्या हातानी ओले झालेले तोंड पुसायचे. वगैरे वगैरे टेक्नाॅलाॅजीची कमाल दाखवली जात होती. हा सुखाचा अतिरेक नव्हे काय ?
अतिशयोक्तीचा दोष सोडून देऊ....
पण निदान...
आपली ताट वाटी आपली आपण उचलून ठेवावी, जमलं तर घासावी.
आपले कपडे आपण बुचकळून काढावेत.
आपली गाडी आपण धुवावी. पुसावी तरी.
आपले अंथरूण पांघरूण आपणच घालावे, आपणच आवरावे.
आणि
आपल्या देवघरात एकदा तरी त्याच्यासमोर ओणवे रहावे.
देहे दुःख ते सुख मानीत जावे......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.02.2017
कधी संपणार हे मांसपुराण असे वाटत असेल ना ? पण काय करणार ? आहार हेच औषध असल्याने दुसऱ्या कोणत्याही औषधाशिवाय जगायचे असेल तर मूळ कारण नष्ट व्हायला नको का ? निदान त्याच्यापर्यंत पोचले तर पाहिजे.
भारतातल्या मानसिकतेचा आणि गरजांचा विचार करणारे पुणे येथील सुप्रसिद्ध डाॅक्टर कल्याण गंगवाल यांचे नाव घेतल्याशिवाय रहावत नाही. शाकाहारच का ? या त्यांनी लिहिलेल्या आणि राजहंस पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामधे विस्ताराने माहिती आहे. डाॅ. श्रीराम गीत हे त्याचे सहलेखक आहेत.
त्यांनी फारच सुंदर अभ्यास करून आपले विवेचन दिलेले आहे.
एखाद्या देशात उपलब्ध असलेली साधनसामुग्री ही प्रत्येक देशाचे बलस्थान असते. अमेरीका, डेन्मार्क न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड या देशातील लोकसंख्या आणि देशाचा भौगोलिक विस्तार, आर्थिक सुबत्ता यांचा विचार केला तर त्यांना मांसाहार करण्यासाठी लागणारी प्राथमीक पशुंची पैदास आणि पोषण सहज उपलब्ध होते. परवडते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होणारच नाही कारण तेथील अत्यंत प्रतिकुल हवामान. तिथे तयार होणारी मका गहू ही मुख्य पिके प्रामुख्याने पशुपालनासाठीच घेतली जातात. देशात उपलब्ध पाण्याचा साठ्यापैकी निम्मा खर्च पशुपालनावर आणि कत्तलखान्यावर होतो.
तसा खर्च करणे भारताला शक्य नाहीये. भारतातील मांसाहार करणाऱ्या सर्व लोकांनी ठरवले तरी ते या प्रगत देशातील लोकांच्या बरोबरीने मांस खाण्यात कधीही तुलना करू शकत नाही.
अमेरिकन माणूस दररोज मांसाहार करतो. याउलट भारतीय माणसे आठवड्यातून दोन वेळाच मांसाहार करतात. इतर वेळा भारतीय शाकाहाराचाच विचार करतो.
आर्थिक गणित पाहिले तरी प्रमाण व्यस्तच आहे. आठवड्यातून दोन वेळा जरी मांसाहार केला तरी देखील दरमहा सात ते साडे सात हजार रूपये खर्च येतो. एवढा खर्च केवळ मांसाहारावर करू शकणारी किती कुटुंब भारतात आहेत ? दारीद्रय रेषेखालील लोकसंख्या आणि तिचे दरमाणशी उत्पन्न पाहिले तर मांसाहार करणे अशक्यप्राय वाटते.
या सर्व गोष्टींचा विचार करता भारतात
शाकाहार करणे व सोयीचे झालेले आहे.
भारतातील शेतजमिनीची कमतरता, त्यावर होणारे शाकाहारी प्राणी आणि माणसाचे पोषण, त्यावर अवलंबून असलेल्या मांसाहारी प्राण्यांची गरज हे सर्व व्यस्त प्रमाणात आहे.
परंपरा, गरज, उपलब्ध पशुधन, शेतीप्राधान्य आणि आर्थिक कुवत यांचा विचार करता, शाकाहारी बनणे आवश्यक वाटते.
म्हणून जगा आणि जगू द्या, ही विचारसरणी असणाऱ्या भारतात प्रार्थना म्हटली जाते,
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
15.10.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 21-धूपं समर्पयामी-भाग दोन
धूपन ही एक उत्तम चिकित्सा म्हणून आयुर्वेदात वर्णन केली आहे. औषधे टिकून रहावीत यासाठी जी भांडी बरण्या वापरल्या जात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडाच्या धुराने धुपीत करून घ्यायला सांगितले आहे. उद्देश्य एकच. जंतुनाश ! जखमेतील सूक्ष्म जीव नाहीसे व्हावेत, मरून जावेत, जखमांना धूप दाखवण्याची पद्धतही आपल्याकडे आहे. अनेक प्रकारचे हट्टी त्वचारोग धुपन केल्यावर काबूत येतात. धुपन करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. कोळसा पेटवून लाल करून घ्यावा, त्यावर धूपन द्रव्य घालावे, आणि जिथे आवश्यक आहे तिथे युक्तीने फिरवावा.
कोळसा नसेल तर काय ? आणि धूपन द्रव्य कोणती ? असेच प्रश्न आले ना मनात.
कोळसा नसेल तर नारळाची करवंटी गॅसवर ठेवावी आणि पेटवावी. पूर्ण पेटल्यावर ती एका पत्र्यावर काढून घ्यावी आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे तीक्ष्ण वास येईल अशी जंतुनाश करणारी द्रव्य घालावे. जसे धूप, हळद पूड,कांद्याची साले, लसणीची साले, लवंग, वेलचीची टरफले, काजूची टरफले, मिरचीचे देठ, मीठ मोहोरी, तूप तांदुळ, कढीलिंबाची किंवा कढीपत्त्याची पाने, ज्यातून तीक्ष्ण वास येईल असे काहीही चालेल. ज्याचा दळ गेलेला आहे असा मसाला, किड पडलेली हळकुंडे, टोके झालेली मिरचीपूड, यापैकी सुद्धा काहीही चालेल. पण प्रमाण कमी वापरावे. अगदी चिमूटभर. नाहीतर धूप, गुग्गुळ, हिंग, डिंक, यासारखे नैसर्गिक निर्यास, नाहीतर काळाच्या ओघात फुकट गेलेली आयुर्वेदातील चूर्ण, जसे त्रिफळा चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण, हिंग्वाष्टक चूर्ण, यापैकी चूर्ण देखील धूपाप्रमाणे वापरावे. आपल्याला तीक्ष्ण वास तयार करायचा आहे, हे तत्व लक्षात ठेवायचे. आणि त्या वासाचा आपल्याला त्रास न होता, फक्त रोगजंतु घराबाहेर जावेत हा हेतु, ही युक्ती मात्र वापरावी. नाहीतर घरात एवढा धूर होईल की, आपणालाही आपले घर सोडावे लागेल ऐसे न व्हावे !
वर्षातून एकदा घरामधे होम करावा तो यासाठी असाही विचार करायला हरकत नाही. यासाठी द्रव्य म्हणून अनेक प्रकारच्या समिधा वापरल्या जातात. वड, गुळवेल, औदुंबर, पिंपळ, रूई, पळस, दुर्वा, तीळ, शिजलेला भात, रेशमी वस्त्र, केळी, नारळ, तूप, इ. अनेक हविर्द्रव्य सांगितलेली आहेत. ही सर्व औषधे आहेतच. यांचा धूर महा औषध आहे.
एक साधे उदाहरण बघूया. जो मिरची चावतो, त्याला ती तिखट लागते, नाकातोंडातून पाणी येते, डोळे चुरचुरतात, अंगाची आग होते हे फक्त मिरची चावणाऱ्यालाच होते इतरांना नाही. पण हीच मिरची निखाऱ्यावर टाकली तर हीच सर्व लक्षणे तिथे आसपास असणाऱ्या सर्व माणसांवर दिसतात. याचा अर्थ एक मिरची जर जाळली तर त्याचा परिणाम सार्वजनिक स्वरूपात दिसतो, आणि चावण्यापेक्षा जहाल रूपात दिसतो. हा आहे धुराचा सूक्ष्म परिणाम. त्रिफळा किंवा हळदी सारखे प्रमेहावर काम करणारे औषध, दोन चिमूट प्रमाणात जर निखाऱ्यावर धुपाप्रमाणे घालून रोज सकाळी सायंकाळी घरात सर्वत्र फिरवले तर ? ....
तर निर्माण होणारा धूर प्रमेहातील क्लेद म्हणजे चिकटपणा कमी करायला मदत करतो, असा अनुभव घेतला आहे. आपणही असा प्रयोग करायला हरकत नाही. अपाय नक्कीच नाही.
आपल्याकडे सायंकाळी मीठ मोहोरीची दृष्ट काढण्याची पद्धत आहे. ती या चिकित्सेतीलच एक भाग आहे. हा "मिनी होम" झाला. सायंकाळच्या वेळी घरात प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना, जीवजंतुंना, अटकाव करण्यासाठी हा धूर मदत करणार नाही का ?
ज्यांना या शक्तींचे अस्तित्व मान्य नाही, त्यांनी देखील असा धूर घरात रोज सकाळ संध्याकाळ करावा. त्यांचे विचार शुद्ध व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.06.2017
निरोगी कोण ?
आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या 'देवदत्त' प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.
यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.
जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.
जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.
प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा "नाॅर्मल" वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.
आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.
म्हणजे एखाद्याला "तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल " असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.
पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?
या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.
आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.
आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?
सकाळी हलकेच जाग यावी.
उठल्यावर लगेच "ती" जागा आठवावी.
पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
समाधानाची अनुभूती घ्यावी.
सणसणीत भूक लागावी.
मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
दिवसभर गाडी पळवावी.
तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
शक्ती पुरवून वापरावी.
विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
पुनः भुकेची जाणीव व्हावी.
हलक्या आहाराने ती पुरी करावी.
झालेली कामे सहज आठवावी.
ही ईश्वराची कृपा समजावी.
आणि मस्त झोप यावी.
निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
"तो" मला उठवणार, याची खात्री असावी.
आणि सकाळी हलकेच जाग यावी.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.04.2017
हा मुळ भारतीय संस्कृतीचा धागा आज हरवत चाललाय, तो शोधायला पाश्चात्य भारतात येताहेत, जगातल्या अनेक देशात भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू आहे. त्यासाठी जे करावे लागेल ते करण्याची पाश्चात्यांची तयारी आहे.आणि आपण मात्र नित्याच्या सर्व भारतीय गोष्टी विसरत आहोत.
आंबट आणि तिखट या मिश्र चवीचा एक पदार्थ म्हणजे लोणचे.
पानातील डाव्या बाजूला वाढलेल्या लोणच्याला डाव्या बाजूचा राजा म्हटलं तरी चालेल, एवढा मान या लोणच्याला भारतीय जेवणाच्या दुनियेत आहे. आणि पानामधे स्थान पण अगदी वर. राजाचेच.
भारतीय म्हणण्याचे कारण, हा अस्सल भारतीय प्रकार आहे. कारण त्यात वापरले जाणारे मसाले, हे मूलतः भारतातीलच आहेत.
एकेकाळी भारत हाच सर्व जगाला मसाले पुरवित होता. भारताचा इतर देशात असलेला व्यापार हा मसाल्याच्या पदार्थामुळे दरवळत होता. काही परदेशी नागरीकांना तर भारतातील मसाले देणारी झाडं ही जादूची झाडं वाटंत.
काय कमाल आहे ना ईश्वराची, एकाच जमिनीमधे आंबट चिंचेचे झाड, तुरट सुपारीचे झाड, या हलणाऱ्या डुलणाऱ्या सुपारीच्या झाडाला, जणुकाही ते वाऱ्याने पडू नये म्हणून, घट्ट बिलगून राहिलेली तिखी मिरीची वेल. या पोफळीच्या सावलीत, मातीला अगदी कुशीत वाढणारी मंद वासाची वेलची, कळीरूपातच वापरली जाणारी लवंगाची मध्यम आकाराची झाडे, तर काहीसे मोठे होणारे आणि एकाच झाडाच्या सालीतून मिळणारी दालचिनी आणि पानातून मिळणारे तमालपत्रे, असे दोन वेगळे फ्लेवर देणारे दालचिनीचे झाड. फळ फोडून आतला सुवास देणारे जायफळ, आणि भूगर्भातच तयार होणारी काहीशी कडवट चवीची पिवळी धम्मक हळद,
हे सर्व वेगवेगळ्या वासाचे, वेगवेगळ्या रंगाचे, चवीचे पदार्थ, एकाच पाण्यावर पोसले जातात. पण, कडु तिखट आणि तुरट ( कटु तिक्त कषाय ) या वेगवेगळ्या औषधी गुणांनी भरलेले
(असतात. (एकही मसाला, मधुर अम्ल लवण रसाचा नाही.)
माती, पाणी, सूर्यप्रकाश हवा एकच असते, पण विविधता किती दिसते. खरंच गाॅड इज ग्रेट !
या लोणच्यात हिंगासारखे काही पाश्चात्य मसालेपण येऊन बसलेत. पण या विविधतेला एका बरणीत सामावून घेणारे हे भारतीय लोणचे.
हळद, मेथी, हिंग, मीठ, मिरची, मोहोरी, तेल हा मुख्य मसाला, काही फोडींना लावला की झाले लोणचे तयार. पण ते टिकाऊ होण्यासाठी, बाहेरचा जंतुसंसर्ग टाळला जावा, यासाठी सर्व फोडी बुडतील एवढे तेल आणि त्यांना सर्व बाजूनी दाबून टाकणारा एक गोल दगड, आणि चिनी मातीच्या, फिरकीच्या झाकणाच्या बरणीत दादरा बांधून, आमच्या देवघरात वर ठेवलेली लोणच्याची बरणी, माझ्या अजूनही लक्षात आहे.
हे लोणचे त्यातील या वेगवेगळ्या मसाल्यामुळे एवढे औषधी बनले आहे, की ते औषध म्हणूनच पानात वाढून घ्यावे, एवढेच त्याचे प्रमाण. डाव्या बाजुचा पदार्थ तिथेच रहावा, तो उजव्या बाजूला आला की साईडइफेक्ट सुरू.
मग ते लोणचे कैरीचे असूदेत नाहीतर लिंबू मिरचीचे. नाहीतर गाजरा कारल्याचे ! औषधी गुण जवळपास तेच. फोडींनुसार बदलणारे. पण मसाला तोच.
काही लक्षात येतंय का ?
हा सर्व मसाला म्हणजे मधुमेहावरील औषधांचे मिश्रणच आहे. आणि फोडी जर आवळ्याच्या किंवा ओल्या हळदीच्या असतील तर ???
जैसे घी मे शक्कर.
इन दोनोंका आजके जमाने मे दिखनेवाला साईड इफेक्ट, याने कोलेस्टेरॉल और डायबेटीस.
दोनों के उपर काम करनेवाली एकही दवा !
पिकल, लोणचे, अचार माझ्या पानात हवा.!!
पण....
हे अचार बाजारी नको. आणि आचारी सुद्धा !
बाजारी लोणच्यात चार दोष दिसतात.
एक कृत्रिम रंग, दोन हानीकारक प्रिझर्वेटीव, तीन सरकीचे तेल, आणि चार, व्हिनीगर मधे बुडवून ठेवलेल्या फोडी. हे दोष टाळण्यासाठी आणि औषधी फायदे मिळवण्यासाठी उपाय एकच,
हे लोणचे घरीच घातलेले हवे. आईच्या किंवा आज्जीच्या हातचे.
पण घरात वेळ मोडून करणार कोण ?
इथेच तर लोणच्याचा लोच्या आहे ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
03.11.2016
निषेधार्ह पाणी भाग दोन
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे परत परत म्हणतात, आणि ते सुद्धा रोगांची नावे सांगायच्या अगोदरच सांगताहेत, न अम्बुपेयम्....पाण्याचा अतिरेक टाळा.
यापूर्वी, न पिबेत् सूर्येन्दु पवनम् अदृष्टम् । या श्लोकाची सुरवात त्यांनी "न" ने केली होती. या श्लोकाची सुरवात पण "न" ने केली आहे.
या उल्लेखित रोगांनी जे अशक्त झालेले रोगी आहेत, त्यांनी पाणी टाळावे.
अशक्त होण्याचे कारण यांची चयापचय प्रक्रिया बिघडलेली असते. शरीरातील दोषांच्या तरतम भावाने निर्माण झालेली रोगाची अवस्था, समान करण्यासाठी शरीर देखील काही तरी प्रयत्न (compensation) करीत असते.
सर्व रोग होण्यामागे मन्द झालेला अग्नी हेच कारण असते. अग्नी मंद झाला की, पाचनकर्म बिघडते. खाल्लेल्या अन्नाचे शरीराला अपेक्षित असलेले रूपांतरण, जे अग्निमहाराज करत असतात, ते बिघडते. पाचन बिघडले की, अन्नाचे पुढील शोषण पोषण बिघडते.
मोठ्या टोपात भात शिजवायचा असेल तर गॅस बारीक असून चालणार नाही. बर्नर मोठाच हवा तरच तांदुळ शिजतील, नाहीतर टोपात जे काही तयार होईल, त्याला भात असे म्हणता येणार नाही.
एक सुभाषित आठवतेय का, विद्येविना मति गेली....
तसं आहे, हे सर्व अनर्थ एका अग्निने केले. ज्या अग्निचा पाणी हा शत्रू आहे. म्हणून पाणी कमी (गरजेपुरतेच) प्यावे.असं वाग्भटजी सांगताहेत.
कोणताही रोग व्हायला लागला कि शरीर खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाची चव बिघडवून टाकते. चव बिघडली की, पाणी पण बेचव लागते. आणि खाण्या पिण्याची इच्छाच नाहीशी होते. शरीर जे सांगतेय, ते दीर्घकालीन विचार केला तर नेहेमी फायद्याचेच असते.
वाहातुक पोलीस शिटी मारून, बोलावून कसे सांगतो,
"पुढे अपघात झाला आहे. तातडीचे काम सुरू झाले आहे. इथून पुढे वाहाने नेऊ नका.अगदी स्कूटी सुद्धा जाणार नाही. जरा त्रास झाला तरी चालेल, पण आपली गाडी या मार्गाने नेऊ नका. वळवा. आणि परत मागे न्या. वाटलं तर दूरच्या पर्यायी मार्गाने जा"
तसं पोटात जेव्हा गडबड सुरू झालेली असते, तेव्हा "त्याचा" इंद्रियरूपी ट्रॅफिक अंमलदार मनामार्फत आतून सूचना देतो, "आतमधे किरकोळ दुरूस्तीचे काम सुरू आहे. कोणालाही, कोणत्याही कारणासाठी आत पाठवू नका. अगदी पाण्याला सुद्धा ! उगाच त्रास करू नका, त्रास देऊ नका. उगाच जबरदस्ती करू नका. थांबा थोडी विश्रांती घ्या.आणि द्या."
शरीराची ही अवस्था लंघन करण्याची असते. ही विशिष्ट अवस्था ओळखता यायला हवी. यावेळी फक्त जिभेवर संयम ठेवता यायला हवा. की पुढचे सगळं ट्रॅफीक जाम टाळता येते. नाहीतर टाळक्याला ताप होतो.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला जन्मापासूनच त्याची सर्व माहिती असते. त्यामुळे निदान करायला किंवा अपथ्य, चिकित्सा सांगायला सोपे होते.
मी असं सांगतो, एकच नियम पाळावा, की (वैश्विक नियम सोडून) कोणताच नियम पाळू नये. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सली अॅक्सेप्टेड. जगन्मान्य !
आपण आता सर्वसामान्य जगन्मान्य नियम काय असतात ते पाहू.
1. पाणी कधी प्यावे ?
तहान लागेल तेव्हा. गरज असेल तेव्हा.
2. पाणी किती प्यावे ?
तहान भागेपर्यंत. गरजेपुरते.
याला म्हणतात, वैश्विक नियम. जगात कुठेही जा. हाच नियम पाळायचा. म्हणजे कोणताही शास्त्राधार शोधण्याची आवश्यकताच पडणार नाही.
एवढे साधे प्रश्न आणि एवढी साधी उत्तरे असताना, आपण नियम करून खूप गोंधळ निर्माण करून ठेवतो. जे सोप्पं आहे ते, अवघड करून सांगितले, तरच ते शास्त्र आणि ते जाणणारा कोणीतरी मोठ्ठा विद्वान वगैरे वाटतं. असं काही जणांना वाटतं म्हणून जरा अघळपघळ करून सांगितले तर ऐकणाऱ्यालाही जरा बरे वाटते ना !
ताप आहे असं सांगण्याऐवजी पायरेक्झिया ऑफ अननोन ओरीजीन, वगैरे भाषेत सांगितले तर रूग्णालापण आपणाला कोणता तरी मस्त मोठा आजार झालाय असे वाटते. मग नंतर बिल भरताना फार कटकट वाटत नाही. असो.
पाणी पिण्याचे हे दोन नियम मोडले नाहीत, तर पाण्यापासून होणारे रोग निकाली निघतील. (आणि हे एवढ्या पटकन, समजले तर ही लेखमाला पण लवकर बंद होईल.)
याला शास्त्राधार काय ? असंही कोणाच्या तरी मनात येईल. त्यालाही उत्तर देतो.
ही गरज कोण ठरवणार ?
तहान लागली की नाही, हे कसं समजणार ?
सोप्प आहे.
यासाठी त्याला काही काळ गृहीत धरावा लागेल. उत्तर मिळेपर्यंत वाट पहावी लागेल. नंतर वाटलं तर विसरून जायचं. गणितामध्ये नाही का आपण एक्स गृहीत धरंत. तसं. एक्सचं उत्तर मिळालं, की त्याला विसरून जायचं.
आपली तहान भूक, झोप, ढेकर,जांभई, अश्रु, मलमूत्र विसर्जन इ. क्रियांची जाणीव आपणाला कोण करून देतो ? जर त्याने ही जाणीव करून दिली नसतीच तर ? म्हणजे तो आतून काहीतरी सांगतोय, हे असं कर. हे तू असं केलंस तर बरं वाटेल, वगैरे.
कोण आहे तो?
तोच तो निर्गुण निराकार...... आत्मा !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
09.12.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे- क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 33
नैवेद्यम् समर्पयामी-भाग सात
मुळातच चंचल असलेला वात वाढू नये, यासाठी आधीच वाताला शांत करून घ्यायचे. विरोधकांना कसे चहापानाला बोलावतात तसे ! यासाठी त्या प्रत्येकाचे नाव घेऊन पुकारा करायचा..
प्राणाय स्वाहा
अपानाय स्वाहा
व्यानाय स्वाहा
उदानाय स्वाहा
समानाय स्वाहा
ब्रह्मणे स्वाहा
अन्न गिळण्याचे काम करणारा वात म्हणजे प्राण, ढेकर काढून पोचपावती देणारा वात म्हणजे उदान, अन्नाला आतमध्ये नेऊन मिक्सरमध्ये फिरवणारा, अग्निला प्रज्वलीत करणारा तो समान, अन्नाला पुढे पुढे ढकलत नेणारा अपान आणि तयार पोषकांशाचे रक्तात रूपांतर झाल्यावर ही उर्जा, ह्रदयामार्फत सर्व शरीरात आत बाहेर फिरवणारा तो व्यान. असे हे पाच भाऊ, भांडण न करता, नेमून दिलेले काम चोख बजावत असतात. पित्त आणि कफ हे दोघेही पंगु. स्वतःची गती नाही. वात येऊन ढकलणार, तेव्हा या पित्त आणि कफाचे काम पूर्ण होणार. म्हणून पित्त कफापेक्षा व्रात्य वाताला जिंकण्यासाठी या आहुत्या फक्त वातालाच !
सर्व सामर्थ्यवान ब्रह्मरूप असलेल्या वाताला माझा नमस्कार असो. मी सेवन करीत असलेल्या भोज्य चोष्य लेह्य पेय अशा चारही प्रकारचे अन्नाचे पचन नीट होवो. आणि त्यापासून ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये मन, शरीरातील आणि बाहेरील सर्व अवयव यांचे उत्तम प्रकारे पोषण होवो, या सेवन करीत असलेल्या आहाराने, मला माझे धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त करणे, या पुरूषार्थाच्या प्राप्तीसाठी उत्तम बुद्धि आणि शारीर मानस आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होवो, अशी प्रार्थना या पाच प्रकारच्या वातांकडे करावी.
असे म्हणून वाढलेल्या पानाभोवती पाणी फिरवायचे हे झाले कर्मकांड.
आता देवाला सांगायचे,
"हं, करा सुरवात ! होऊ दे सावकाश !"
तो आपल्या हाताने स्वतःच कुठला जेवतोय.?
मग आपण मानसभावाने त्याला एकेक घास भरवायचा. जणुकाही समोर देव बसलेलाच आहे, तसा भाव ठेवीत भरवावे. बाळ नीट पोटभर जेवला म्हणजे स्वतः न जेवता आईचे पोट भरते तसे आहे. मध्ये मध्ये थोडावेळ थांबावे. त्याला घास चावायला गिळायला वेळ द्यावा. बकाबक, घाईघाईने जेवणाऱ्या (गिळणाऱ्या) मंडळींना ह्रदयरोग होतात, असेही वाचनात आले आहे.
जेवण म्हणजे "जाणिजे यज्ञकर्म " असं समर्थ रामदास स्वामी देखील सांगत आहेत. जो यज्ञ असतो, त्यात आहुती घालताना देखील सावकाश अर्पण करायची असते. नाहीतर अग्निच्या ज्वाला तयार न होता, नुसता धुरच होईल. ऐसे न व्हावे.
तोंडात घेतलेला घास आपण किती वेळ इकडे तिकडे फिरवतो, यावर आज थोडे लक्ष द्यावे. सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस वेळा, अगदीच डोक्यावरून पाणी म्हणजे पंचवीस वेळा आपण घास चावतो. आणखी फक्त पाच सात वेळा जास्ती चावावा, म्हणजे घास बत्तीस वेळा सावकाश चावायचा, दात बत्तिस असतात, प्रत्येक दाताला त्याचे काम द्यावे म्हणजे पचन व्यवस्थित होते. अर्धे पचन तोंडातच करून घेतले की पोटातील पुढील अवयवांवरचा ताण आपोआपच कमी होतो.
सर्व काही चालले आहे ते पोट भरण्यासाठीच ना. मग तिथे घाई कशाला ? घाई घाईने जेवून पोट बिघडवून घ्यायचे आणि जास्त काम करून मिळवलेले पैसै तब्येत ठीक होण्यासाठी परत डाॅक्टरना देऊन टाकायचे ? म्हणजे पैसे कोणासाठी मिळवायचे ?
या निमित्ताने याचा पुनः एकदा विचार करावा लागेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.06.2017
आयुर्वेद समजून घेताना
विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, आयुर्वेद समजतोच असे नाही.
अभ्यासासाठी ग्रंथकारांनी याचे तीन भाग केलेत. शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक. जसा रोग तसे त्याचे कारण. जसे कारण तसे औषधी उपाय योजना करणे, म्हणजे चिकित्सा करणे. रोग जर. शारीरिक कारणामुळे झाला असेल, तर उपाय देखील शरीरावर हवा, तिथे आश्वासन देऊन किंवा मानस चिकित्सा करून फरक पडणार नाही. जसे, पायात काटा गेलाय तर उपाय त्याच पायावर, तिथेच, करायला हवा, ज्या पायात काटा घुसलाय. इथे मंत्र म्हणून काटा बाहेर येणार नाही.
पायात काटा गेलाय असे सारखे वाटत रहाणे, तपासण्या केल्या तरी त्यात काहीही व्रण किंवा काटा न दिसणे अशा लक्षणामधे मानसोपचारच उपयोगी पडणारा असतो जो, शंका या रोगाचे समाधान करतो.
आणि सतत एकाच पायात, एकाच ठिकाणी, एकाच कारणानी, वारंवार काटा टोचणे आणि व्रण बरा न होणे, आणि याची सकृतदर्शनी कोणतेही कारणे लक्षात न येणे, यासारखी लक्षणे ही रोगाचे मुळ आत्मदोषापर्यंत नेऊन पोचवतात.
भुवया उंचावून बघण्याची गरज नाही. हो. हा आत्मदोष जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा मान्य केला आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या काही संघटनांच्या विरोधामुळे व्हावे तसे संशोधन या विषयावर होत नाही, ही खंत जरूर आहे. असे होऊ नये, आमचे शास्त्र लेबल बदलून, भाषा बदलून, 'त्यांना' ( म्हणजे पाश्चात्य लोकांना ) हवे तसे अर्थ काढून, आम्हालाच शिकावे लागणार आहे. वेदांचे पण तेच झाले आहे. मॅक्समुल्लरला समजलेला भारताचा इतिहास आज आम्हाला शिकावा लागत आहे. जो अतिशय चुकीचे अर्थ शिकवतो.
शुद्धिकरण मुळापासूनच भारतीय मानसिकतेचा, भावनांचा विचार करून व्हायला हवे. केवळ शब्दाला प्रतिशब्द देणे म्हणजे वेदांचे प्रतिसंस्करण नव्हे. हे आयुर्वेद शिकताना लक्षात घ्यायला हवे.
ही मानसिकता झाल्यावरच आयुर्वेदाचा श्रीगणेशा आरंभ होईल.
आयुर्वेद समजून घ्यायला ती विशिष्ट दृष्टी हवी. जसं भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप बघण्यासाठी अर्जुनाची सामान्य दृष्टी बदलून, वेगळी विशाल दृष्टी होणे आवश्यक होते, तसे आहे. भगवंत गीतेमधे हेच सांगत आहेत. मोक्ष समजून घ्यायला, कर्तेपण लयाला जायला, मी कोण हे शोधताना ती वेगळी विशाल दृष्टी आवश्यक आहे.
भगवंताची कृपा झाल्यावर संजयाला आणि अर्जुनाला ती दृष्टी प्राप्त झाली. आपण सारे अर्जुन आहोत, या भावनेने जर भगवंताकडे ती दृष्टी मागितली तर तो निश्चितच ती दृष्टी देतो. फक्त भाव अर्जुनाचा हवा.
........आणि भक्तीदेखील !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
13.02.2017
Copyright © 2025 | Marathisrushti