जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सतरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
हे सर्व कशासाठी, तर रोग होऊ नयेत यासाठी. रोगामुळे काय होतं ?
आयुष्य कमी होतं.
त्याने काय होतं ?
जीवनातील आनंद हरवून जातो. जीवन हे आनंद निर्माण करण्यासाठी आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसं, हे जग सुखी व्हावे. याचा दुसरा अर्थ दुःख नाहीसे व्हावे, असा आहे. रोगालाच दुःख असे पर्यायी नाव देखील आहे.
रोग म्हणजे दुःख. पण औषध म्हणजे सुख नाही.
एक गोष्ट लक्षात येतेय का बघा. निरोगी राहण्यासाठी ग्रंथकारांनी या श्लोकामधे कुठेही औषधांचा पुसटसा उल्लेख देखील केलेला नाही.
या श्लोकामधे नित्यं हिताहारविहार औषधसेवी.... असं म्हटलेलं नाही. तशी गरजच नाही, याचा विश्वास ग्रंथकारांना आहे.
याचा अर्थ रोग होऊ नयेत यासाठी औषधे कधीही काम करीत नाहीत. हे पटतंय का ?
आयुष्यभर, मरेपर्यंत औषधं खाणं ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे. आपल्याला त्रास असेपर्यंत औषध जरूर घ्यावे. भले कोणत्याही पॅथीचे असावे.
त्रास संपला की औषध संपलेच पाहिजे. जसं कावीळ झाल्यावर कावीळीवरील औषध जरूर घ्यावे.
किती दिवस औषध घ्यावे ?
कावीळ उतरेपर्यंत. म्हणजे कावीळीची शरीरावर असणारी लक्षणे नाहीशी होईपर्यंत औषधे जरूर घ्यावी. नंतर भूक वाढणारी औषधे घ्यावीत. नंतर मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी एखादे जुलाबाचे औषध घ्यावे. नंतर औषधांची गरज संपते.
रोगाची लक्षणे संपल्यानंतर रोगही विसरून जायचा आणि औषधे देखील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगाचा मनातला विचार देखील काढून टाकायचा, की मला असा रोग होता......
भूक वाढल्यानंतर आपला आहार विहार नियंत्रित असेल तर आपल्या शरीराला जे घटक हवे आहेत, ते सर्व शरीरालाच निर्माण करू देत. बाहेरून सतत मोजून मापून औषधांनी मदत पुरवून, शरीर निरोगी राहील, हा भ्रम आहे. असे होत नाही.
जसं कावीळीचं, तसंच तापासाठी. ताप उतरला तरी औषधं खायची आवश्यकता नसते. पण आजकाल रक्तदाब, मधुमेह, पीसीओडी, डिप्रेशन, यासरख्या अनेक आजारात यासाठी कायमस्वरूपी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. काही मोजकेच आजार असे असतात, की औषधं घेईपर्यंत बरे असतात, आणि औषधे संपली की पुनः डोके वर काढतात. याला याप्य असा शब्द आयुर्वेदात वापरलेला आहे. काही आजार असाध्यच असतात, त्यावर औषधेदेखील काही काम करीत नाहीत, मग औषधे पचवायचे ज्यादाचे काम तरी कशाला द्यावे ? औषधे कधीपर्यंत सुरू ठेवावीत हे सुद्धा रोग्याच्या लक्षणावर आणि रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते. याचा निर्णय एखादा कुशल वैद्यच घेऊ शकतो.
औषध हेच माझे सर्वस्व आहे. औषधे घेतल्याशिवाय माझं काही खरं नाही, ताकद वाढण्यासाठी औषधे घेतलीच पाहिजेत, टाॅनिकशिवाय बाळ अंग धरणारच नाही, असं नाही. न्यायालयाच्या भाषेत सांगायचे तर, हे सर्व खोटं आहे
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०६.०८.२०१७
August 6, 2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सत्तावीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
कुणाचे वर्म काढू नये
कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये.
बऱ्याच वेळा माणसे दुखावली जातात, ती चुकीचे शब्द, चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यामुळे. वर्म काढू नये म्हणजे अपमान होईल असे बोलू नये. परिस्थिती कोणावर कशी येईल, रावाचा रंक कधी होईल ते कधीच सांगता येत नाही. आंधळेपणा, पांगळेपणा ह्या वर्मावर बोट ठेवून कधी कोणाला दोष देऊ नये. हेच आई शिकवित असते. बाबा पण कधीतरी ओरडत असतात.
पण काहीही म्हणा हं आईचं शिकवणं आणि बाबांचं शिकवणं यात फरक असतोच. अगदी नव्वद टक्के मुलं सांगतील, आई शिकवित होती तेच बरं होतं. फक्त ओरडाच खायला लागायचा, मार तर नाही.
वर्म काढू नये. घालून पाडून बोलू नये. भांडणाची पण एक शैली असते. त्या शैलीतच भांडता आलं पाहिजे. अहो, हल्ली मुलांना नीट भांडतासुद्धा येत नाही. त्या वाॅटसप मुळे भांडण होतात, ती सुद्धा ऑनलाईनच ! ?? समोरासमोर.
भांडायला शब्द सुचावे लागतात. आणि शब्द सुचले नाही की थेट हल्लाबोलच.
आणि भांडायचं असतं ते मातृभाषेत. आणि शिक्षण होतं पूतना मावशीच्या भाषेत ! त्यामुळे भांडायला जे इरसाल शब्द भांडार लागतं, ते असतं मातृभाषेत! म्हणून तरी मातृभाषेत शिका !
बोलताना जशी भाषा समृद्धता असणं आवश्यक आहे, तशी भांडताना सुद्धा ही भाषा समृद्धता दिसणं आवश्यक आहे.
तुटे वाद संवाद तो हितकारी असे समर्थांचे बोल आहेत.
संवादाचे रुपांतर विवादात होऊ नये, यासाठी हितकर असणारे शब्द योजावे लागतात. अर्थात शहाण्याला शब्दांचा मार, बाकीच्यांची पूजा कशानी करायची ते, आपल्या मराठी वाड़मयात तेपण सांगितलेले आहे.
वर्म म्हणजे दुर्गुण, कमीपणा. कुणाचा दुर्गुण कुणाला सांगू नये, कारण त्यावरून आपलीच परीक्षा होत असते. आपले दुर्गण शोधावे आणि इतरातील सद्गुण.
हे उपदेशात्मक लिखाण फार गांधीगिरीचे वाटत नाही ना ?
वर्म म्हणजे वेदनेचे ठिकाण. नेमके इथे बोट ठेवले तर दुखणारच ना ! पण जिथे पूय साठून साठून जमा झालेला असतो, तिथे वेदना निर्माण होणारच ना. ? असणारच. आणि जिथे जिथे पूयसंचिती तिथून तो बाहेर काढावा, असे वैद्यक शास्त्र सांगते. जखमेतील वेदना कमी होण्यासाठी काहीवेळा ऑपरेशन करावेच लागते, मग ती जखम प्रत्यक्षात शरीरावरील असो, वा मनावर आघात करणारी. हेपण आईकडूनच शिकायचे असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१६.०८.२०१७
August 16, 2017
तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ?
त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल.
यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर तपासता येत नाही हेच खरे.
तेच प्रत्येक चवींच्या बाबतीत आहे. वापरून बघितली की, अभ्यास केला की, यांची अनुभूती घेता येते.
या सर्व चवींचे ज्ञान जीभ या ज्ञानेंद्रियानी होत असते. हे एकमेव इंद्रीय उभयात्मक आहे. म्हणजे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे.
रसना म्हणजे आत चवीची अनुभुति देणे म्हणून रसनेंद्रिय आणि निर्माण झालेला शब्द बाहेर फेकणे म्हणून वागेंद्रीय.
आत बाहेर दोन्ही कामे करते. म्हणून या जीभेवर संयम आणता आला की, सर्व साध्य झाले. ज्याने जिंकीली रसना, त्याने जिंकिली वासना.
सर्व इच्छांवर संयम आणण्यासाठीदेखील ही तुरट चव मदत करेल.
संयमात ठेवणे हा गुण झाला, पण काहीवेळा तो दोषही होतो. जिथून विष बाहेर काढायचे आहे तिथून ही तुरट चव बाहेर पडायलाच देत नाही. स्रोतसांचे आकुंचित झाल्यामुळे बाहेर पडणारे स्राव कमी होतात. न पचलेले अन्न देखील आत मधे पडून राहाते. आम जागचा हलत नाही, तो तुरट चवीच्या याच स्तंभ गुणामुळे ! त्याचा परिणाम म्हणून पोटदुखी, मलावष्टंभ.
रक्तवाहिनीचा गरजेपेक्षा जास्त संकोच झाला तर रस रक्त विक्षेपणात अडथळे येणे, ह्रदयात वेदना होणे, ह्रदयाची ताकद कमी होणे, ही लक्षणे दिसतात.त्याचा परिणाम अन्य अवयवांवर होऊन यकृत, किडनी इ. मधे पण अवरोध जमा होऊ लागतो. म्हणून थकवा येणे, ग्लानी येणे, उत्साह जाणे, रक्तदाब वाढणे, तोंड सुकणे, आवाज बसणे यासारखी लक्षणे निर्माण होतात. चेहेरा वाकडा होणे, एक बाजू लुळी पडणे, हे वाताचे आजार देखील याच तुरट चवीच्या अतिसेवनाने होतात. हे विसरता नये.
पोषण करणाऱ्या नलिकांचा संकोच झाल्यामुळे कमालीचा अशक्तपणा येतो. वजन खूप कमी होते, प्रतिकार करण्याची शारीरिक आणि मानसिक ताकदच संपून जाते. याला देखील हीच तुरट चव जबाबदार आहे.
आपणाला कायम एकच बाजू दिसत असते. दुसऱ्याची चुक आणि आपली बरोबर.
दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय ठेवली तर भूमिकेला योग्य न्याय देता येतो. आपले काय चूक नि काय बरोबर. आणि ते का. हे शोधले की सापडते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.11.2016
November 27, 2016
ज्या खाद्य पदार्थाभोवती कृष्णाच्या नटखट लिला भ्रमण करतात.कृष्णावर रचलेल्या अनेक पदांमध्ये त्याचे ह्या वरचे प्रेम व ते मिळवण्यासाठी तो करत असलेल्या खोड्यांचे वर्णन केले जाते.अर्थातच मैया मोरी मैं नही माखन खायो इ सारखी अनेक पदे कृष्णाचे हे माखन प्रेम दर्शविते तसेच गोपी देखील त्याला माखन चोर म्हणून चिडवत.असे हे नंदलाल प्रिय माखन अर्थात लोणी ह्या सदरात आपण पाहूया.
दुध,दही,ताक,लोणी असा क्रम आपण म्हंणतो पण काही मंडळी प्रत्यक्ष दुध घुसळून देखील लोणी काढतात.चला तर मग काही लोण्यांचे गुणधर्म पाहूयात:
१)दुधापासून काढलेले लोणी:
अतिस्निग्ध,डोळ्यांना हितकर,रक्तविकार शामक,पित्त शामक,शुक्रधातू वाढविणारे,बलकारक,संडास बांधून ठेवणारे,थंड व गोड असते.
२)ताकापासून काढलेले लोणी:
गोड,किंचीत तुरट,पचायलाहलके,थंड,बुद्धीवर्धक
,संडास घट्ट करविणारे,भुक वाढविणारे असते.
३)फार दिवसांचे लोणी:
खारट,आंबट,कडवट,विशिष्ट गंध युक्त,उल्टी करविणारे,मुळव्याध त्वचा विकार वाढविणारे,पचायला जड,त्रिदोष दुषित करणारे आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 17, 2017
इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात.
July 30, 2017
आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय,
हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.
February 1, 2018
पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते.तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारा माही उपलब्ध असे फळ.ह्याचा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकतो मग शेक असो वा फ्रूट सलाड सगळ्याच हि पपई रूचकर लागते.
तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व पिकल्यावर नुसतेच खायला छान लागते.
ह्याचे १०-१२ फूट उंच वृक्ष असतो व ह्या झाडाला फांद्या नसतात.पाने ताडाच्या पानांप्रमाणे छत्राकार,विस्तृत व विभक्त खणांची असतात.फुले हिरवी,पांढरी व एकलिंगी असतात.फळ एक कोष्ट,लंबगोल,कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर असते त्याच्या आत बिया असतात ज्या चाॅकलेटी रंगाच्या व पाणीदार अशा पिकलेल्या फळात तर कच्च्या फळात पांढऱ्या असतात.
कच्चे फळ हे चवीला तिखट,कडवट असते ते उष्ण असते व कफ वात शामक असून पित्तकर असते.
तर आता आपण प्रथम कच्च्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:
१)कच्च्या पपईचा चीक गजकर्णावर लावावा फायदा होतो.
२)मुळव्याधीवर पपईच्या कच्च्या फळाचा चीक लावल्यास ३ दिवसांनी मोड कमी होतो.
३)कच्ची पपई वाटून हातपायांवर बांधून झोपल्यास हातपायांची आग व भेगा कमी होतात.
४)कच्च्या पपईचे तुकडे मांस शिजवताना त्यात धालावे म्हटजे मांस लवकर शिजते व सुपाच्य होते.
५)कृमींवर मोठ्या माणसांना १ चमचा पपईचा चीक+साखर हे मिश्रण घ्यावे व लहान मुलांना हा चीक १-२ थेंब साखरे सह द्यावा.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के,
कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.
पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:
१)गाईचे ताक:
भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.
२)म्हशीचे ताक:
दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.
३)शेळीचे ताक:
अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.
आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:
१)वातविकारात:
आंबट ताक सैंधव घालून प्यावे.
२)पित्तविकारात:
गोड ताक साखर घालून प्यावे.
३)कफविकारात:
लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 14, 2017
निषेधार्ह पाणी भाग दोन
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे परत परत म्हणतात, आणि ते सुद्धा रोगांची नावे सांगायच्या अगोदरच सांगताहेत, न अम्बुपेयम्....पाण्याचा अतिरेक टाळा.
यापूर्वी, न पिबेत् सूर्येन्दु पवनम् अदृष्टम् । या श्लोकाची सुरवात त्यांनी "न" ने केली होती. या श्लोकाची सुरवात पण "न" ने केली आहे.
या उल्लेखित रोगांनी जे अशक्त झालेले रोगी आहेत, त्यांनी पाणी टाळावे.
अशक्त होण्याचे कारण यांची चयापचय प्रक्रिया बिघडलेली असते. शरीरातील दोषांच्या तरतम भावाने निर्माण झालेली रोगाची अवस्था, समान करण्यासाठी शरीर देखील काही तरी प्रयत्न (compensation) करीत असते.
सर्व रोग होण्यामागे मन्द झालेला अग्नी हेच कारण असते. अग्नी मंद झाला की, पाचनकर्म बिघडते. खाल्लेल्या अन्नाचे शरीराला अपेक्षित असलेले रूपांतरण, जे अग्निमहाराज करत असतात, ते बिघडते. पाचन बिघडले की, अन्नाचे पुढील शोषण पोषण बिघडते.
मोठ्या टोपात भात शिजवायचा असेल तर गॅस बारीक असून चालणार नाही. बर्नर मोठाच हवा तरच तांदुळ शिजतील, नाहीतर टोपात जे काही तयार होईल, त्याला भात असे म्हणता येणार नाही.
एक सुभाषित आठवतेय का, विद्येविना मति गेली....
तसं आहे, हे सर्व अनर्थ एका अग्निने केले. ज्या अग्निचा पाणी हा शत्रू आहे. म्हणून पाणी कमी (गरजेपुरतेच) प्यावे.असं वाग्भटजी सांगताहेत.
कोणताही रोग व्हायला लागला कि शरीर खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाची चव बिघडवून टाकते. चव बिघडली की, पाणी पण बेचव लागते. आणि खाण्या पिण्याची इच्छाच नाहीशी होते. शरीर जे सांगतेय, ते दीर्घकालीन विचार केला तर नेहेमी फायद्याचेच असते.
वाहातुक पोलीस शिटी मारून, बोलावून कसे सांगतो,
"पुढे अपघात झाला आहे. तातडीचे काम सुरू झाले आहे. इथून पुढे वाहाने नेऊ नका.अगदी स्कूटी सुद्धा जाणार नाही. जरा त्रास झाला तरी चालेल, पण आपली गाडी या मार्गाने नेऊ नका. वळवा. आणि परत मागे न्या. वाटलं तर दूरच्या पर्यायी मार्गाने जा"
तसं पोटात जेव्हा गडबड सुरू झालेली असते, तेव्हा "त्याचा" इंद्रियरूपी ट्रॅफिक अंमलदार मनामार्फत आतून सूचना देतो, "आतमधे किरकोळ दुरूस्तीचे काम सुरू आहे. कोणालाही, कोणत्याही कारणासाठी आत पाठवू नका. अगदी पाण्याला सुद्धा ! उगाच त्रास करू नका, त्रास देऊ नका. उगाच जबरदस्ती करू नका. थांबा थोडी विश्रांती घ्या.आणि द्या."
शरीराची ही अवस्था लंघन करण्याची असते. ही विशिष्ट अवस्था ओळखता यायला हवी. यावेळी फक्त जिभेवर संयम ठेवता यायला हवा. की पुढचे सगळं ट्रॅफीक जाम टाळता येते. नाहीतर टाळक्याला ताप होतो.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
January 10, 2017
तिखट झणझणीत असणाऱ्या, लालबुंद दिसणाऱ्या, कट तरंगणाऱ्या, रसभाज्या हे भारतीय आहाराचे वैशिष्ट्य आहे. अन्य पाश्चात्य देशात एवढे तिखट खाल्ले जात नाही.
भाजी खाल्ली की पाची बोटांना सचैल अभ्यंगस्नान झाल्याशिवाय एकही बोट बाहेर येणार नाही.
एवढे तिखट कसे काय चालते ? हीच प्रकृती आहे, प्रदेश विचार आहे, हेच आहाराचे रहस्य आहे. या तिखटाचे सर्व अॅण्टिडोटस् याच आहारात अन्यत्र असतात.
रस्सा असो वा मिसळ.
त्यावर तरंगणाऱ्या तर्रीचा तिखट तर्रेबाजपणा कमी करण्यासाठी आंबट लिंबू वापरले जाते. भेळेचा भडकपणा कमी होण्यासाठी त्यावर चिंचखजुराच्या पाण्याचा शिडकावा केला जातो. चटणीमधे कैरी किंवा साॅसमधे टोमॅटो असतोच. या आंबटपणामुळे तिखटपणा थोडासा का होईना कमी केला जातो.
जेवण झाल्यावर बोटांना लागलेले तेल काढण्यासाठीच जेवताना ताटात उरलेल्या लिंबाची फोड पिळून बोटांना चोळली जाते, ती यासाठीच ! प्रत्येक रस एकमेकांना खूप मदत करीत असतो.
तशी आंबट, गोड आणि खारट यांची छुपी युती असते. सामील होणार नाही, पण बाहेरून पाठींबा जाहीर केलेला असतो. तसंच कडू तिखट तुरट चवींची मैत्री जरा जास्तच आहे. एक गट जेव्हा सत्तेत चलती नाण्याच्या बाजुला असतो, तेव्हा बाकीचे तीन विरोधी पक्षात बोंबाबोंब करत बाके बडवायला बसलेले असतात. कुरघोडी करण्यात यांचा हात कोणीच धरू शकणार नाही.
तिखट झालेल्या रसभाजीमधला तिखट तोरा कमी करण्यासाठी काय करावे ?
रसभाजीमधे पाणी वाढवून तिखटपणा कमी होईल पण भाजीची मूळ चव पण बिघडून जाते, यासाठी आंबट चव मदतीला धावत येते. झणझणीत झुणक्यामधे देखील आमसोलाचे आंबट घातल्याखेरीज भाकरीलापण बरे वाटत नाही. तळलेल्या मिरच्यावर मीठ घालून लिंबू पिळून घेतले की.. व्वा, क्या बात है ! हे आपण व्यवहारात पण पहातो. मिरच्यांचा खर्डा मात्र काही वेळा या आंबटाशिवाय लांब जाऊन भांडून फटकून बसल्यासारखा असतो.
आंब्बट्ट म्हटले तरी दोन्ही डोळे एकदम बंद होतात.
आंबटगोड हा युती शब्द उच्चारला की फक्त एक डोळाच बंद होतो.
आणि तिखटात आंबट नाही घातले, तर मात्र दोन्ही डोळे हेऽ एऽवढे उघडतात.
तिखट लोणच्याची, कधी गोडाशी मैत्री होऊच शकत नाही. तिथे तिखट-आंबट युतीच कामी येते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
14.11.2016
November 14, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti