कधी संपणार हे मांसपुराण असे वाटत असेल ना ? पण काय करणार ? आहार हेच औषध असल्याने दुसऱ्या कोणत्याही औषधाशिवाय जगायचे असेल तर मूळ कारण नष्ट व्हायला नको का ? निदान त्याच्यापर्यंत पोचले तर पाहिजे.
भारतातल्या मानसिकतेचा आणि गरजांचा विचार करणारे पुणे येथील सुप्रसिद्ध डाॅक्टर कल्याण गंगवाल यांचे नाव घेतल्याशिवाय रहावत नाही. शाकाहारच का ? या त्यांनी लिहिलेल्या आणि राजहंस पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामधे विस्ताराने माहिती आहे. डाॅ. श्रीराम गीत हे त्याचे सहलेखक आहेत.
त्यांनी फारच सुंदर अभ्यास करून आपले विवेचन दिलेले आहे.
एखाद्या देशात उपलब्ध असलेली साधनसामुग्री ही प्रत्येक देशाचे बलस्थान असते. अमेरीका, डेन्मार्क न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड या देशातील लोकसंख्या आणि देशाचा भौगोलिक विस्तार, आर्थिक सुबत्ता यांचा विचार केला तर त्यांना मांसाहार करण्यासाठी लागणारी प्राथमीक पशुंची पैदास आणि पोषण सहज उपलब्ध होते. परवडते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होणारच नाही कारण तेथील अत्यंत प्रतिकुल हवामान. तिथे तयार होणारी मका गहू ही मुख्य पिके प्रामुख्याने पशुपालनासाठीच घेतली जातात. देशात उपलब्ध पाण्याचा साठ्यापैकी निम्मा खर्च पशुपालनावर आणि कत्तलखान्यावर होतो.
तसा खर्च करणे भारताला शक्य नाहीये. भारतातील मांसाहार करणाऱ्या सर्व लोकांनी ठरवले तरी ते या प्रगत देशातील लोकांच्या बरोबरीने मांस खाण्यात कधीही तुलना करू शकत नाही.
अमेरिकन माणूस दररोज मांसाहार करतो. याउलट भारतीय माणसे आठवड्यातून दोन वेळाच मांसाहार करतात. इतर वेळा भारतीय शाकाहाराचाच विचार करतो.
आर्थिक गणित पाहिले तरी प्रमाण व्यस्तच आहे. आठवड्यातून दोन वेळा जरी मांसाहार केला तरी देखील दरमहा सात ते साडे सात हजार रूपये खर्च येतो. एवढा खर्च केवळ मांसाहारावर करू शकणारी किती कुटुंब भारतात आहेत ? दारीद्रय रेषेखालील लोकसंख्या आणि तिचे दरमाणशी उत्पन्न पाहिले तर मांसाहार करणे अशक्यप्राय वाटते.
या सर्व गोष्टींचा विचार करता भारतात
शाकाहार करणे व सोयीचे झालेले आहे.
भारतातील शेतजमिनीची कमतरता, त्यावर होणारे शाकाहारी प्राणी आणि माणसाचे पोषण, त्यावर अवलंबून असलेल्या मांसाहारी प्राण्यांची गरज हे सर्व व्यस्त प्रमाणात आहे.
परंपरा, गरज, उपलब्ध पशुधन, शेतीप्राधान्य आणि आर्थिक कुवत यांचा विचार करता, शाकाहारी बनणे आवश्यक वाटते.
म्हणून जगा आणि जगू द्या, ही विचारसरणी असणाऱ्या भारतात प्रार्थना म्हटली जाते,
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
15.10.2016
नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.अगदी शुभ कार्य असो,श्राद्ध असो,स्वयंपाक असो,औषधी निर्माण असो अशा वेगवेगळ्या विभागात ह्याचा महत्त्वाचा वापर आढळतो.नारळाच्या झाडाला आपण माड म्हणतो तसेच ह्याला कल्पवृक्ष असे देखील आदराने संबोधले जाते.माडाला कल्पवृक्ष म्हणण्याचे कारण म्हणजे हा एकमेव वृक्ष असा आहे कि त्याच्या प्रत्येक भागाचाआपल्याला कुठे ना कुठे तरी वापर करता येतो.
माडाचा बुंधा वासे करायला वापरतात,चुडीत झावळे,केरसुण्या करायला वापरतात,फुलांचा उपयोग औषधामध्ये होतो,तसेच नारळाचा उपयोग स्वयंपाक,औषधी व सौंदर्य प्रसाधने निर्माण करायला होतोच पण त्यात हि नारळाचे वरचे आवरण हे राजू,पायपुसण्या करायला वापरतात,तसेच करवंटीचे तेल काढतात कोळसे करतात तसेच घर सजावटीच्या वस्तू त्या पासून बनवितात.
आता नारळाचे म्हणाल तर कोवळा नारळ किंवा शहाळे हे त्यातील पाणी पिण्याकरिता वापरतात
तसेच आतील मलई खातात.तसेच नारळाचा उपयोग आपण स्वयंपाकात भाजी,आमटी,चटणी इ पदार्थ करतो.कारण कोकण,गोवा,कारवार,केरळ,ओडीशा ह्या प्रांता मध्ये जेवणाची कल्पना नारळा शिवाय होऊच शकत नाही.
नारळाचे वृक्ष हे १०-७० फूट उंचीचे असतात व त्याच्या खोडांवर लोंबणाऱ्या गडद हिरव्या रंगाच्या झावळ्या असतात ज्या पिकल्यावर पिवळ्या होतात.झावळ्यांच्या मुळाशी पिवंळी गर्द सोनेरी फळे लागतात जी सुरूवातीला फुलांच्या स्वरूपात असतात.फळे म्हणजे नारळ जे प्रथमप् पिवळे,कोवळे असताना हिरवे व पिकल्यावर राखाडी रंगाचे होतात.
नारळ कोवळा असताना त्याला शहाळे असे म्हणतात व तेव्हा त्यात भरपूर पाणी व थोडी पातळ मलई असते.जेव्हा त्याचे रूपांतर नारंळामध्ये होते तेव्हा त्या मलईचे रूपांतर खोबऱ्या मध्ये होते व आत मध्ये थोडे पाणी रहाते.
तसे पाहता सध्या डायटींग ह्या गोंडस नावा खाली पुष्कळ मंडळी शहाळ्याचे भरपुर पांणी दिवस भर पितात काही जण तर नित्य नेमाने दिवसाला १-२ शहाळ्याचे पाणी पितात.पण हे पुर्णत: चुकीचे आहे कारण आयुर्वेद सांगतो कि कुठले ही फळ हे पिकल्यावरच खावे मग नारळ त्याला अपवाद कसा असेल.आणी हे असे शहाळ्याचे पाणी आपण आजारी असताना पथ्य म्हणून वापरणे ठिक आहे पण त्याचा अतिरेक हा शरीरातील वात व कफ विकार वाढवून त्याचे आजार हमखास निर्माण करणार ह्यात वाद नाही.सांगायचेच झाल्यास आपल्याकडे गरोदर बायकांनी नारळाचे पाणी प्यावे असे सांगितलेले आहे पण प्रत्यक्षात मात्र गरोदर बायका पितात शहाळ्याचे पाणी आणी होते काय तर त्याचा दुष्परिणाम त्या बिचाऱ्या चिमूकल्या जीवला जन्मानंतर भोगावा लागतो.आपण पाहिलेच असेल कि काही मुलांना जनमत:च सर्दि,दमा,न्यूमोनिया किंवा अन्य श्वसन संस्थानाचे विकार जडतात तर त्याच्या मुळाशी कारण असते बरेचदा आईने गरोदर असताना केलेला शहाळे पिण्याचा अतिरेक.आयी ना बात अब समझमे!
चला मग शहाळे व नारळ ह्या दोघांचे गुण धर्म ह्या लेखात पाहुयात:
शहाळे हे चवीला गोड पचायला जड व थंड असून ते पित्तशामक व वात कफ वाढविंणारे आहे.
नारळ हा चवीला गोड,थंड,पचायला जड असला तरी शहाळ्या पेक्षा हल्का असतो व वात पित्त शामक व कफ वाढविणारा आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे थंड हवेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे फळ.ह्याला मराठी मध्ये नाश्पती असे म्हणतात.हे फळ बऱ्याच जणांना आवडते.
हे हिरवट पिवळ्या रंगाचे पेरूच्या आकाराचे फळ असते.ह्याची चव आंबट गोड असते व त्याला मंद मादक सुवास येतो.
हे फळ थंड गुणाचे असून वात पित्त नाशक असून थोडे कफकर आहे.
चला आता ह्याचे घरगुती उपचार पाहुया:
१)संडासला पिवळसर काळे,भसर,भरपूर वारंवार होत असेल तर अर्ध कच्चा पेअर खावे व इतर आहार घेऊ नये.
२)पोटात जळजळ,भुक मंदावणे,आव पडणे,पोट दुःखी ह्या तक्रारी असल्यास जेवणासह पेअरचे तुकडे खावे.
३)जीभेवर पांढरा थर,दात व हिरड्या शिवशिवणे,हिरड्या मधून रक्त वाहणे ह्यात कडक पेअर चावून खावे.
४)थकवा येणे,तोंड सुकणे,घशाला कोरड पडणे,शरीरातील उष्णता वाढणे ह्यात पेअरचा रस थोडे सैंधव मीठ घालून प्यावा.
अती पेअर खाल्ल्याने सर्दी,खोकला होतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
।।गणधिपाय नम: भृंगराजपत्रं समर्पयामि।।
भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते.
औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.
आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :
जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो.
केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.
केस व हाडांचा आयुर्वेदा मध्ये जवळचा संबंध आहे. केस हा अस्थिधातूचा मल मानला जातो. त्यामुळे जर माका केस बळकट करतो तर त्याचे कार्य हे आपल्या हाडांची बळकटी करायला देखील होणारच ना!
माका हा यकृत, प्लिहा ह्या अवयवांचे कार्य सुधारतो त्यामुळे रक्ताची कमतरता, भुक न लागणे, अजीर्ण, ह्यात ह्याचा चांगला उपयोग होतो.
त्वचा रोगात ज्या मध्ये स्त्राव येतो जसे गजकर्ण, इसब, ह्यात देखील ह्याच्या सेवनाने लाभ होतो.
ज्यांची दृष्टी क्षीण आहे त्यांनी ह्याचे नियमीत सेवन केल्यास दृष्टी सुधारते. त्यामुळेच ह्याला नेत्र्य असे म्हटले आहे.
माक्याचे बीज हे वाजीकर आहे अर्थात कामशक्ती वाढविते.
असा हा माका आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९६०६९९७०४
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे एकोणपन्नास
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग सात
न हुं कुर्याच्छवं पूज्यं प्रशस्तान मंगलानि च !
कोणाच्याही मृत शरीर म्हणजे शवाकडे पाहून तिरस्कार युक्त हुऽऽ असे तुच्छता पूर्वक संबोधू नये.
मरणानंतर वैर संपते, नंतर त्याच्या शवाची हेटाळणी किंवा विटंबना होऊ नये. श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर त्याचे केलेले और्ध्वदेहिक प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवरायांनी अफजलखानाला वधल्यानंतर त्याचे थडगे बांधले. दुर्दैवाने पश्चात या थडग्याचे रूपांतर वातानुकूलित महालामधे केले गेले, हे उदात्तीकरण न्यायालयाने देखील अव्हेरले आहे. या उलट पाकिस्तानी सैनिकांनी अनेक वेळा भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची केलेली विटंबना आपणाला आठवण असेलच. इथे भारतीय संस्कारांचे महत्त्व लक्षात येते.
प्रसिद्ध व्यक्ती, विद्वान व्यक्ती, कुठेही दिसल्या तरी त्यांना नमस्कार करावा. एवढेच नव्हे तर सिद्ध वनस्पती दिसताच त्या वनस्पतीना देखील नमस्कार करावा. सिद्ध म्हणजे ज्यांचे औषधी गुणधर्म प्रसिद्ध आहेत अशा वनस्पतीना मनोमन वंदन करावे.
वेली वनस्पतीना देखील भावना असतात, त्यांना देखील स्पंदने कळतात. प्रत्यक्ष डोळे नसले तरी आजुबाजुला काय आहे, याची माहिती त्या घेत असतात. त्याचा आधारही आपल्या तंतु प्रतानाद्वारे घेतात. आपल्या आवाजाला, बोलण्याला, स्पर्शाला त्या प्रतिसाद देतात. माणसाच्या सहवासाने चाफा बहरतो, लाजरी स्पर्श झाला की लाजते, राहत्या घराजवळील काजु अधिक फळ देतो. हे तर प्रत्यक्षात दिसते.
आपला जन्म ज्या नक्षत्रावर झालेला असतो, त्या नक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो. म्हणजेच आपला तो वृक्ष आराध्य असतो. आपले रक्षण करणारा आपला वृक्ष आपल्याला माहिती हवाच. जेव्हा कुठेही उत्तर सापडत नाही, तेव्हा हा वृक्ष आपले आरोग्य रक्षण करायला मदत करतो.
नक्षत्र वृक्ष या कन्सेप्ट अनुसार काही ठिकाणी नक्षत्र उद्यान, हर्बल गार्डन, सुरू झालेल्या आहेत.
नक्षत्र कोणतेही असो. वनस्पतीचे संरक्षण तर झालेच पाहिजे. त्यासाठी वनस्पतींची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आजुबाजुला असंख्य वनस्पती दिसतात, त्यांची नावे औषधी गुणधर्म आपणालाच माहिती असत नाहीत. हे गुणधर्म जर समजून घेतले तर अनेक छोट्या छोट्या आजारामधे आपण त्या वापरू शकतो. आणि हे ज्ञान फक्त आयुर्वेदच देऊ शकतो.
या वनस्पतीचे संरक्षण व्हावे, यांची ओळख पुढील पिढीला व्हावी, एखादी वनस्पती आपल्या जवळपास कुठे आहे याची आपल्याला माहिती असावी, यासाठी देवाच्या नावाने पत्री पूजा वाहाण्याचे कर्मकांड आपल्या धर्मात सांगितलेले आहे. वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, आवळी भोजन, कुष्मांड नवमी, शमी आपट्यासाठी दसरा, दुर्वांसाठी गणपती, बेलासाठी महादेव, देवीसाठी कमळ, विष्णुंसाठी तुळस, मारूतीरायासाठी रूईची माळ, अशा अनेक वनस्पतीसाठी अनेक सण आणि देवता निश्चित करून ठेवण्यामागील दृष्टीकोन लक्षात घ्यावा. म्हणजे या प्रथा आणि कर्मकांडे का सुरू झाली याची उत्तरे सहज मिळतील.
प्रत्येक वनस्पतीकडे आदराने पहावे, तिच्यातील औषधी गुणाचे ज्ञान मिळवावे, तिचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी या वनस्पतीना देवतेसमान दर्जा देणारे आमचे ऋषी खरंच "ग्रेट" होते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०७.०९.२०१७
ह्याच्या सुंदर रंगावरून ह्याला वांगे हे नाव पडले असावे.बायकांचा फेव्हरेट वांगी कलर हो.वांगीची भाजी हि ब-याच मंडळीची आवडीची बुवा.वांगीच भरीत,रसभाजी,कापं,वांगी भात,भरली वांगी,वांगीचं लोणचे,वांगीची आमटी सगळेच पदार्थ सुरेख लागतात बुवा.
हि वांगी लहान व मोठी अशा दोन आकारात मिळतात बरं का.दोन्ही छान लागतात.वांगीचे रोप हे कंबर भर उंच असते व त्यात हि गोल गोमटीफळे लागतात जी आपण भाजी करीता वापरतो.जसा हिचा उपयोग स्वयंपाकात होतो तसाच हिचा आपण घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो बरं.
वांगे हे चवीला तुरट,कडवट,तिखट असे मिश्र चवीचे असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात पित्त व कफ हे तीन्ही दोष कमी करते.पण वांग्यावर केल्या जाणा-या संस्काराचा जबरदस्त परिणाम होतो बरे का ह्याचा अर्थ असा कि आपण जर वांग्याची रस भाजी केली अर्थात बटाट व पाणी ह्या सोबत वांगे शिजवल्यावर ते हमखास वात वाढवणार पण तेलात तळलेले काप व वांग्याचे भरीत वात कमी करणार, आहे ना हि गंमत संस्काराची.
आता वांग्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहुया:
१)वांग्याचे गुळ घालून केलेले भरीत संध्याकाळी खाल्ल्यास छान झोप लागते.
२)गळवे पिकुन सूज कमी व्हायला वांगी भाजून त्याचे पोटीस बांधावे.
३)कोरडा खोकला येऊन घशाला कोरड पडत असल्यास १ कप कच्च्या वांग्याचे तुकडे ४ कप पाण्यात १० मिनिटे उकळावे व गाळून त्यात १/२ चमचा हळद व १ चमचा खडीसाखर घालून ते पाणी प्यावे.
४)कोवळ्या वांग्याचे तुकडे रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी ते तुकडे काढुन त्या पाण्याने हात धुवावे.ह्याने तळहातावर येणारा घाम कमी होतो.हा प्रयोग ३ आठवडे करावा.
५)डोळे दुखत असल्यास वांग्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात आराम मिळतो.
वांगे अतिमात्रेत खाल्ल्याने पोटात वात धरून संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
केवळ दुधच नव्हे तर दुधाचे सर्व पदार्थ प्रमेह होऊ नयेत म्हणून कमी करावेत. खरवस, पेढा, खवा, कुंदा, बासुंदी, रबडी, रसमलाई, पनीर, चीज, बटर हे सर्व पदार्थ जे थेट दुधापासून बनवले जातात, ते तर प्रमेहाचे निमंत्रकच !
दुधापासून बनविलेले हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. थोडक्यात बंगाली मिठाई अति खाई तो प्रमेही होई. असे म्हणायला काही हरकत नाही. मग बंगालमधे प्रमेहाचे प्रमाण जास्ती असेल का ? शोधावे लागेल, पण बंगाल या प्रांतात परंपरेने दुधाचे रोशगुल्ले, पनीर इ.पदार्थ वंशपरंपरेने खाल्ले जात असल्यामुळे ते तिथे सात्म्य झाले असावेत.
या पदार्थांमधे वापरली जाणारी साखर ही पण प्रमेहाची सख्खी मैत्रिणच जणु ! आज आधुनिक विज्ञान पण तेच सांगते, साखर हे पांढरे विषच आहे. त्याच्या फारसे पाठी न लागलेले बरे !
अर्थात एकदा हे पदार्थ खाऊन प्रमेह होणार नाही, पण दिवसातून एकदा खाल्ले तर मात्र नक्कीच होईल. त्यातून कफाची प्रकृती आणि पाणथळ दलदलयुक्त प्रदेशी रहाणाऱ्यांना अधिकच सावध रहायला हवे. त्यात भूक कमी असली तर बघायलाच नको. त्यामुळे सावध तो सुखी हेच खरे. सावधपणा पण एवढा नको की मनातून खूप घाबरत घाबरत खाल्ले जात आहे. तरीसुद्धा साखर वाढलेलीच राहाते.
दूध हे मधुर रसाचे वर्णन केले आहे. मधुर रसाच्या गुणांचे वर्णन करताना वाग्भटजींनी सूत्रस्थान अध्याय दहामधे, मधुर रस अति सेवन करणाऱ्या मंडळींना सावधपणे प्रमेहाचा धोका असतो, असा उल्लेख पण करून ठेवलेला आहे.
सद्यो शुक्रकरःपयम् म्हणजे अंतिम धातु (जो शुक्र) उत्पत्ती करणाऱ्या पदार्थात दूध हे सर्व श्रेष्ठ सांगितलेले आहे. उत्तम तर्पक, रसधातुपोषक, वातपित्त कमी करणारे पण कफ दोष वाढवणारे, शीत गुणाचे आणि पचायला जड असते. निरसे दूध, म्हणजे तापवायच्या अगोदरचे दूध पचायला अत्यंत जड असून, अभिष्यंद म्हणजे कफाचा स्राव निर्माण करणारे असते. पण दूध काढल्या काढल्या( म्हणजे धारोष्ण ) घेतल्यास अमृताप्रमाणे असते. पण खूप तापवले असता, पचायला जड होते. (उदा. बासुंदी) हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. अग्निचा संस्कार बदलला की गुण बदलतात. इतर सर्व पदार्थ अग्निने पचायला हलके होतात तर दूध मात्र अग्निच्या संस्काराने जाड होत जाते, परिणामी पचायला जड होते. बासुंदीचे उदाहरण लक्षात ठेवावे. जसजसे दूध तापवत जावे, तसतसे, ते आटते. घट्ट होते. शेवट खवा बनतो, त्यात आणखी साखर घातली तर पेढा ! त्याच्याही पुढे संस्कार करून दुधाची पावडर बनवतात. आणि नंतर चाॅकलेट आणि मिठाया बनतात. म्हणजे हे अंतिम पदार्थ पचायला किती जड होत जातील याची कल्पना करावी. एका चाॅकलेट बारने काय होणार आहे असे म्हणून, एखादे जरी तोंडात टाकले तरी तो सारा ऐवज, लिटरभर दुधाचा असू शकतो.
पोटावर अत्याचार करणे, म्हणजे यापेक्षा वेगळे काही नाही.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.01.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ
धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन
धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. खजूर आणि खारीक, आलं आणि सुंठ, द्राक्षे आणि मनुका या जोड्या लक्षात आणा, म्हणजे हा विषय समजेल. (उगाच आंबटगोड गैरसमज नकोत.)
ज्या फळामधील रस. (रस म्हणजे जलमहाभूत.) कमी होत जातो, ते टिकाऊ होत जाते. आमरस आणि आंब्याची पोळी ( आमच्या कोकणात आंब्याच्या पोळीला "साट" म्हणतात.) यात टिकाऊ काय आहे ? साट जास्ती दिवस टिकते, कारण त्यातील पाणी कमी होत जाते.
निसर्गामधे सूर्य हा जणुकाही साक्षात अग्निदेव. अन्न पदार्थातील रस, पाणी, द्रवांश, जलमहाभूत ओढून घेत असतो. याला "आदान कर्म" असे म्हणतात. या पाण्याला शोषून, ओढून घेण्यामुळे अन्न टिकाऊ बनते. आजच्या भाषेत, सूर्यापासून येणाऱ्या काही किरणांमधून काही उपकारक तर काही अपायकारक किरणे येत असतात. या किरणांमधे प्रचंड उर्जा साठवलेली असते. व्हिटामिन डी सारखी उर्जा जी फक्त थेट सूर्य किरणांमधूनच मिळत असते, ती पत्र्याच्या डब्यातील टाॅनिकच्या पावडरीमधे कशी भरतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. असो.
धान्य वाळवून ठेवल्याने, त्यांना चार पाच कडकडीत उन्हे दिल्याने ती टिकून रहातात, हे सत्य आपण बघतोच आहोत. धान्यामधे टोका, बरड आदि जंतुसंसर्ग देखील होत नाही.
टीव्हीवरील एका कंपनीच्या बासमती तांदळाची जाहीरात बघितली आहे ? ती कंपनी चक्क जाहीरात करते आहे, की आमचे तांदुळ एवढे जुने करून ठेवल्यानंतर, आता आम्ही विकायला काढले आहेत. ( म्हणून त्याची किंमत एवढी जास्त आहे)
बिझनेस सोडला तर जाहीरातीमधे तथ्य आहे. जुना तांदुळ शिजल्यानंतर, तो वाफेवर झाकून ठेवल्यानंतर, छान फुलतो. नवीन तांदळाचा भात केला तर कसा होतो, ते सुगृहिणीला विचारून बघा. शिजताना कमी पाण्यात जरी शिजवला तरी, नवीन तांदळामधे अंगभूत पाणी जास्ती असल्याने, शिजताना जरा जोरात ढवळले तरी त्याची कणी होते, तुकडा पडतो, परिणामी तो भात चिकचिकित, गिजगिजीत होतो. अशा भाताची बिर्याणी कशी चांगली होणार ?
भातात अपेक्षित असलेला मोकळेपणा येण्यासाठी तो जुनाच हवा ! जुना करूनच वापरायला हवा.
प्लॅस्टिकच्या डब्यात भात साठवून ठेवले तर, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम तर त्यावर होणारच. प्लॅस्टिकमधे उष्णता असतेच, पण डबा अगदी "एअर टाईट" झाल्यामुळे भाताच्या गोट्यातील आतील पाण्याची होणारी जी वाफ आहे, ती कुठे जाणार ? ती बाहेर तर जाऊच शकत नाही, म्हणजे ती पुनः डब्यातील भातातच मुरून राहते.
गवताच्या मुडीत साठवून ठेवलेला भात आणखी हलका होतो, कारण हे गवताच्या मुडीत, साठवलेले भात "वेल व्हेंटिलेटेड" असते. या मुडीतून भाताचा गोटा बाहेर पडणार नाही, पण तयार होणारी वाफ मात्र गवतामधून बाहेर जायला, भरपूर जागा असते. हीच तर निसर्गाची किमया आहे.
गवतामधे मात्र प्रचंड उष्णता दडलेली असते. ही उष्णता मुडीमधील भातातील जलांशाचे, वाफेत रूपांतर करायला पुरेशी असते.
आवश्यक असतील ते बाकी सर्व बदल घडवायला गवताच्या मुडीतील निसर्ग समर्थ आहे.
सिर्फ अपना "मूड" बनना चाहीये ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.05.2017
वेदामधून घेतलेले, जवळपास सर्वांचेच पाठ असलेले, हे मंत्रपुष्प ही आपली भारतभूची राष्ट्रीय प्रार्थना आहे, हे कोणाला माहिती नसेल. ही जणु काही शपथ आहे. देवाच्या समोर उभे राहून एका सर्व शक्तीमान शक्तीला शरण जाऊन सांगतोय, की हे राष्ट्रदेवते, मी तुला साक्ष ठेऊन ही शपथ घेतोय,
शाकाहारी की मांसाहारी या द्वैतामधे आपण अजूनही आहोत. आपल्याला नीट निर्णय घेता येत नाहीत की योग्य काय आणि अयोग्य काय ?
मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर माणूस शाकाहारी आहे हे सत्य पटते. पण लगेच आयुर्वेदात सांगितलेले मांसाहारी औषध पण आठवते. आपण सोयीस्कर अर्थ काढणारी जमात आहोत. बुद्धीचा अति वापर करतो, म्हणून गडबड उडते.
न मांसभक्षणे दोषः
न मद्येच न मैथुने
प्रवृत्तिरेषा भूतानां
निवृत्तिस्तु महाफला
असं स्मृतीग्रंथकार म्हणतात.
म्हणजे मांसभक्षणात दोष नाही. मद्यपानात दोष नाही. मैथुनातही दोष नाही. या गोष्टी करण्यामधे लोकांचा नैसर्गिक कल असतो. स्वभावतःच ओढ असते. ही प्रवृत्ती आहे. आणि त्यातून निवृत्ती मिळवता येणे हे महाफल आहे. हे जास्त महत्वाचे.
न मांसभक्षणे दोषः एवढाच (सोयीस्कर अर्थाचा) भाग सांगितला गेला तर अर्थाचा अनर्थ कसा होतो, एवढेच सांगायचे होते.
अर्धवट श्लोक वाचून सोयीस्कर अर्थ काढले की चुकीच्या गोष्टींची भलावण करता येते, असा सध्याचा प्रघातच आहे. योग्य आणि अयोग्य याचा सारासार विचार करणे आणि निर्णय घेणे याला विवेकबुद्धी म्हणतात.
मांसाहार करणारे लोक आपली सोय बघतात. शाकाहार करणारे आम्ही कसे योग्य ते सांगत बसतात. त्याचे पुरावे पण सादर करतात.
गरज आहे वर्तमानात रहाण्याची. इतिहास यासाठी अभ्यासायचा, की त्यावेळी ज्या चुका झाल्या, अज्ञानामुळे केल्या गेल्या, त्या उज्वल भविष्याचा विचार करता, वर्तमानात होऊ नयेत.
प्राचीन भारतात मांसाहार सर्रास चालत असे, सर्व वर्णाचे लोक मांस भक्षण करीत होते, यज्ञासाठी पण प्राण्यांची हत्या होत होती, स्मृतीग्रंथातही मांसाहाराची भलावण दिसते, आयुर्वेदातही मांसाचे वर्णन आढळते.........
या सर्वात नाकारण्यासारखे काही नाही.
त्या काळात ते संमत होते. काळ बदललाय. आपणही नको का बदलायला ?
ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका आपणही परतपरत करायच्या का ?
नरबळींची प्रथा गेल्या शतकापर्यत भारतात सुरू होती. पण आज ? ती नाही. (अगदीच विकृत मनोवृत्तीतून नाकारता येत नाही.)
नरमांसभक्षक टोळ्या पूर्वी होत्या. आता नाहीत.
सतीची प्रथा, बालविवाह, जंगली प्राण्यांची शिकार, पुत्रप्राप्तीसाठी नियोग पद्धत, बहुपत्नीत्व इ.इ. गोष्टी संस्कारीत समाजाने अधिकृतपणे कायद्याने बंद केले आहे. आणि हे मोठे बदल जेमतेम साठ सत्तर वर्षातील आहेत.
वाल्या कोळ्याचा, वाल्मिकी ऋषी होऊन समाजमान्यता पावतो.
सार्वभौम राजा सम्राट अशोक आयुष्याच्या एका टप्प्यावर शाकाहारी बनला. जैन धर्माचे चौवीसावे तीर्थंकर महावीर जैन यांनी मांसभक्षण करू नये, अशी आज्ञाच काढली.
ज्यांच्या जन्मापासून मांसाहार सुरू असतो, अश्या अन्य धर्मातील लोक देखील आता मांसाहाराचा त्याग करू लागली आहेत. एवढेच नव्हे तर अमेरीका स्थित नासा या स्पेस रिसर्च सेंटरचा नियमच आहे, अवकाशात जावू इच्छीणाऱ्या अंतराळरवीरांनी शाकाहारी बनले पाहिजे !
भारतातील आताचा सर्वे असं सांगतोय की भारतात शाकाहारी लोकांची संख्या वाढली आहे. आपण चुकीच्या गोष्टींचा त्याग करतोय, बदल होतोय, ही चांगली गोष्ट आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने, सण व्रतांच्या निमित्ताने चांगले आरोग्य मिळवण्यासाठी चाललेले ही प्रामाणिक प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील, सर्व समाज पुनः सत्वगुणी बनेल अशी आशा आहे.
बदल हा होतच रहातो. चांगल्यासाठी स्थित्यंतर घडणे, हे कालानुरूप होतच आले आहे. होतच रहाणार.
प्रश्न आहे, आपण त्यात सामिल होणार की नाही याचा !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
6.10.2016
Copyright © 2025 | Marathisrushti