आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 37
नैवेद्यम् समर्पयामी - भाग अकरा
नैवेद्य सेवन करून झाल्यावर हात तोंड धुवुन झाल्यावर आणखी एक अनोखा उपचार केला जातो. तो म्हणजे चंदन लावणे.
"करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी" असा मंत्र म्हणून देवाच्या हाताला चंदन लावले जाते.
हे चंदन, चंदन या झाडाच्या खोडापासून उगाळलेलं असावं. चंदनाची पावडर, गोपीचंदन, कुंकू पाण्यात कालवून गंध तयार करणे, अष्टगंध पाण्यात कालवणे, यापेक्षा चंदन उगाळून ते वापरणे हे देवाला आवडते. देवाला म्हणजे आपल्या देहातील अंतःस्थ देवाला !
जेवढे जास्त उगाळावे तेवढा चंदनाचा सुवास आणि औषधी गुणधर्म बाहेर येत जातात.
चंदन कपाळाला लावले जाते, ते औषध म्हणून ! अतिशय थंड गुणाच्या या चंदनाची उटी अंगाला लावणे, ही पद्धत दक्षिण भारतात आजही आहे दक्षिण भारतातल्या सर्व देवालयामधून चंदन उगाळणारी खास माणसे असतात आपल्याकडे जसा तीर्थप्रसाद देतात, तसा दक्षिणेकडे उगाळलेले चंदनाची गोळी प्रत्येकाच्या हातावर देतात, ती प्रत्येकाने आपल्या कपाळावर लावावी, असा संकेत आहे. स्त्री आणि पुरूष असा भेद न करता हे चंदन लावले जाते. फक्त महाराष्ट्रात उभा टिळा लावतात, तर दक्षिणेत आडवा. एवढाच फरक. पण चंदन तेच. काम तसेच. औषधी गुण तेच.
जेवणानंतर हाताला जेवणातील पदार्थांचा वास राहिलेला असतो. किंवा काही तेलकट पदार्थ हाताला चिकटतात. ते निघून जावेत, असं हे कर्मकांड. आजही आपल्याकडे जेवण झाल्यावर पानात राहिलेली लिंबाची फोड अथवा मीठाची चिमूट जेवल्या हाताला चोळून घेतात. ती याचसाठी. लिंबाच्या रसामुळे बोटांना लागलेला रस्सा, भज्यांचे तेल, लोणच्याचा अंश, आदि भोजनांश सहजपणे निघून जावेत. हात स्वच्छ व्हावेत. उगाळलेल्या चंदनाची जागा फक्त ताटातील लिंबाच्या फोडीने घेतली इतकेच ! कालानुरूप फरक पडतो तो हा असा !
जेवणानंतर हाताला लागलेला मसाला आदि जरी अगदी विषारी नसले तरी दाह करणारे असतात. जसे पाटावरवंट्यावर मिरच्या वाटल्यानंतर बोटांची होणारी आग किंवा दाह केवळ पाण्याने धुऊन जात नाही, त्यासाठी तेल गुळ असे पदार्थ वापरावे लागतात. तसंच जेवणानंतर हाताला जो मसाल्याचा सूक्ष्म अंश असतो, तो जावा, यासाठी हे चंदन लेपन. हे कपाळावर नसून हाताला बोटाला आहे, हे लक्षात घ्यावे.
जे जे देवासाठी ते ते देहासाठीच असते, हे कधीही विसरून चालणार नाही. त्यातील कर्मकांडे ही मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी असतात. ही शोधण्याची दृष्टी तोच देत असतो, यालाच देवाची कृपा म्हणतात. तोच कर्ता करविता मी निमित्तमात्र !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
30.06.2017
प्रत्येकाची गोधडी पण वेगळी. लहान बाळाकरीता तयार केलेली रंगीबेरंगी दुपटी म्हणजे या गोधडीचे जणु बाळच ! ही दुपटी नवीन साडी घेऊन शिवायचीच नसतात. ही साडी जुनी वापरलेलीच हवी. एका बाळासाठी वापरलेली दुपटीदेखील परत परत धुवुन पुढच्या बाळंतपणातदेखील वापरली जात होती.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग तीन
काही वेळा काही विषय परत परत येणार आहेत. कारण त्याविषयाचे गांभीर्यच तसे आहे.
विश्रांती घेताना आपल्या शरीरातील उर्जेवर आतली महत्त्वाची कामे शरीर पूर्ण करून घेत असते. बाहेरचे दार बंद केले तरच बॅकेला आतील कामे उरकता येतात. नाहीतर आव जाव सुरू असेल तर नीट लक्ष देऊन आतली कामे करता येत नाहीत. आणि सारखं आत बाहेर आत बाहेर करावं लागलं की, उगाच शक्ती फुकट जाते.
एखादी मातेला जर काही महत्त्वाची कामे करायची असतील तर बाळाला कसं ती जरा लवकर झोपवते. बाळ झोपले की कसं छान मन लावून काम करता येतं तसं !
फक्त ग्रीष्म ऋतुमधेच दुपारी झोप सांगितलेली आहे. अन्य ऋतुमधे दुपारी झोप निषिध्द आहे. असे का ?
ग्रीष्म ऋतुमधे निसर्गतः शरीरशक्ती कमी असते. सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येतात. वातावरणात प्रचंड उष्णता असते. अशा उष्ण वातावरणात जर बाहेर राहून काम केले तर शरीरातील स्निग्धत्व कमी होईल, रूक्षत्व वाढेल. तेज महाभूताचूया ऊष्णतेमुळे शरीरातील जलमहाभूताचे प्रमाण, स्निग्धत्व, गरजेपेक्षा कमी होईल. असे होऊ नये म्हणून दुपारच्या वेळी घरीच सावलीत विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे.
जेव्हा आपण झोपतो, तेव्हा सर्व अवयव आपल्या कामातून निवृत्त होतात. काम कमी होते. श्रम कमी होतात. घाम कमी येतो. उर्जा वाचते. शक्यी वाचते. ही उर्जेची बचत ही ग्रीष्मात उर्जा मिळवण्यासारखेच आहे. पैसे मिळवण्याबरोबरच पैसे वाचवणे ही पण एक मोठी बचत आहे तसे !
ग्रीष्म ऋतुमधे ही उर्जा बचत करण्यासाठी विश्रांती सांगितली आहे. केवळ ग्रीष्म ऋतुमधेच ताकद कमी असते म्हणून या ऋतुमधे जशी दुपारी विश्रांती घ्यायची असते, तशीच विश्रांती ज्यांची ताकद कमी आहे अशा, बाल, वृद्ध, गर्भवती आणि आजारी माणसांनी देखील घ्यावी.
जागे असताना काही ना काही तरी काम सुरू असते. जेव्हा काम सुरू असते, तेव्हा श्वासगती देखील जास्ती असते. त्यामधे देखील उर्जा संपत असते. आजारी पडल्यावर विश्रांती यासाठीच सांगितली जाते, की ज्यामुळे उर्जेची बचत व्हावी. आणि ही उर्जा अन्य महत्त्वाच्या अवयवांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी वापरता यावी.
मोबाईलची बॅटरी संपत आली की, आपण कसे मोबाईल कमीत कमी हाताळतो, व्हिडिओ पहाणे बंद, ऑडीयो ऐकणे बंद, डाटा कनेक्शन ऑफ, वायफाय बंद. ब्राईटनेस लो, अननोन नंबरचे काॅल कट करणे, तरच असलेल्या दोन चार टक्के बॅटरी साठ्यावर अत्यंत महत्त्वाचे काॅल करण्यासाठी मोबाईल "स्लीप" मोडला टाकतो, म्हणजेच बॅटरी शिल्लक ठेवतो.
हं आता कळले. आमच्या भाषेत आम्हाला समजावनू सांगितले की पटकन कळते, ती पंचमहाभूते वगैरे डोक्यावरून जाणारे विषय !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.05.2017
आरती करताना दोन्ही हातांनी टाळ्या वाजवल्या जातात.दोन्ही हातानी टाळ्या वाजवल्या की तळहातावरील प्रेशर पाॅईंट दाबले जाऊन आरोग्य मिळते. क्लॅपिंग थेरपी नावाची पोस्ट पण सगळीकडे फिरतेय…. त्यात तथ्य नाही, ते थोतांड आहे, असे आपण म्हणू शकत नाही. आणखी चौकस अभ्यास करायला हवा.
सोनोग्राफीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे.
ex - आय.व्ही.पी. हा स्पेशल एक्स-रे मूत्रपिंडाचा त्रास असणार्या बर्याच रुग्णांस माहीत आहे. या एक्स-रेमुळे मूत्रपिंडे कार्य करतात की नाही हे समजते.
आहारामधे फळांचा वापर करावा. आहारानंतर फळ नको किंवा आहाराऐवजी फलाहार करावा. आज जेवणानंतर फळे खायची प्रथा पडली आहे. फळे पचायला जड असतात. जे पदार्थ पचायला जड ते अग्नि प्रखर असतानाच म्हणजे भूक कमी होण्याअगोदरच संपवावे.
पाण्याचा सारांश
पाणी पिताना तहान लागेल तेव्हाच प्यावे.
तहान असेल तेवढेच प्यावे.
तांब्या पितळीच्या कल्हई केलेल्या पातेल्यातील प्यावे, नाहीतर मातीचे मडके उत्तम.
काच किंवा स्टील हे सुद्धा चांगले पर्याय आहेत, पण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी ? कभी नही. विष आहे ते. आज दुधही प्लॅस्टिकच्या पिशवीतच मिळते. प्रत्येक वेळी हे प्लॅस्टीक फूड ग्रेडचे असेल, यावर माझा तरी विश्वास नाही.
सकाळी उठल्यावर गरज असल्यास फक्त आठ घोट पाणीच प्यावे, ते सुद्धा तोंड धुवुन, दात घासून झाल्यावरच ! त्याअगोदर नाही.
पाणी जेवता जेवताच प्यावे. सकाळी तहान नसताना, रात्री झोपताना, कधीही अधेमधे उगाच बाटली दिसली की, रात्री जर लघवी करून आले तरी पाणी शक्यतो नकोच.
पाणी जेवताना जरूर प्यावे आणि जेवणानंतर पचन पूर्ण झाल्यावर, दोन तासांनी शरीराने मागितले तरच. नाहीतर फक्त एखादा कप भर. मिक्सरचे काम झाल्यावर मिक्सर कसा धुवुन ठेवला जातो, तसं.
पावसाचे पाणी जमिनीला लागायच्या अगोदर साठवले तर शुद्धीकरण नको. नाहीतर शुद्ध केल्याशिवाय अजिबात नको.
अति पाणी अतिरिक्त पिल्याने मधुमेह, मुतखडे, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमा, अॅलर्जी, कफाचे सर्व आजार, जलोदर, संधीवात, सूज येणे, पीसीओडी, थायराॅईड, सारखे आजार तसेच वाताची दुखणी वाढतात. रक्तदाबासारख्या आजारात जर शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढणे, ही चिकित्सा असेल तर वरून पाणी का ढोसावे ?
अजीर्ण, अपचन सारख्या आजारात अन्य काही न खाता, केवळ गरम गरम पाणी पिणे हे औषध आहे.
प्रदेशानुसार पाणी आपले गुणधर्म बदलते.
तहान लागली तर पाणी जरूर प्यावे. पण तहान हा रोग असेल तर मात्र साधे पाणी हे औषध नाही. त्यासाठी काही औषधे घालून मसाला पाणी घोट घोट घ्यावे.
सूर्यास्त झाल्यावर पाणी पचनशक्ती बिघडवते, म्हणून रात्रौचे जेवण देखील सायंकाळीच करावे.
संडास साफ होण्यासाठी पाणी पिणे भ्रामक आहे. पाणी संडासवाटे बाहेर पडतच नाही, ते लघवीवाटे बाहेर पडते. म्हणजे पुनः किडनीना गरज नसताना अतिरिक्त काम.
मग संडास साफ कसा होणार ? त्यासाठी जेवताना तेल कच्च्या स्वरूपात वापरावे, आणि जेवताना गरम पाणी वापरावे. बात खतम.
ग्रीष्म आणि शरद ऋतु सोडून निरोगी माणसाने देखील पाणी कमीच प्यावे.
पाणी तोंडात घोट घोट घेऊन, घोळवून मगच हे लाळमिश्रीत पाणी प्यायले तर पचन सुधारेल.
फ्रिजमधले पाणी. ना रे बाबा ना !
आपण उजव्या हाताने जेवतो, पानातील उजव्या बाजुचे पदार्थ भरपूर खावेत, पण डाव्या बाजुचे पदार्थ कमी खावेत. म्हणून भारतीय परंपरेत पाण्याचे भांडे डाव्या बाजुला ठेवतात.
सर्वात महत्वाचे आपण भारतात राहातो, भारतातील सर्व नियमांनी आपण बांधलेलो आहोत. उगाच पाश्चात्यांनी सांगितले म्हणून आपण तसेच वागायचे, हा गुलामीचा भ्रामक मूर्खपणा आता बंद करूया,
भारतीय आहोत, भारतीय म्हणून जगुया.
पाणी हे जसे जीवन देणारे आहे, तसे आलेला जलप्रलय जीवन उद्ध्वस्त करून जातो, हे पण लक्षात ठेवूया !
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.01.2017
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली.
वो हुआ कुछ इस प्रकार...
एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी "फिस्ट" चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन चार दिवसापूर्वी मेलेला असावा. किडे पण पडले होते. पण कावळ्यांसाठी ती दावतच होती. निरीक्षणाअंती असे दिसले, सर्वजण मजेत तो मेलेला, कुजलेला कुत्रा खात होते. म्हणजे अस्वच्छ, शिळे, नासलेले, कुजलेले खाऊ नये, हे पथ्य ते पाळत नव्हते. तरीही ते निरोगी दिसत होते. कारण त्यांचा नेहेमीचा आहार पण असलाच असतो. पण सगळे अगदी एकाच आकाराचे दिसत होते. एकही बारीक नाही, एकही जाड नाही.
असे का ? असे स्वतःलाच विचारले, तेव्हा असे लक्षात आले की, कावळे सूर्योदयापुर्वी उठतात, खायला सुरवात करतात, कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता खातात. कोणताही विचार न करता खातात, खाऊन झाल्यावर सुद्धा विचार करत नाहीत, की मी हे का खाल्ले ? हे असे खाऊन सुद्धा सगळे पचवतात. आणि त्यांच्या अंगावर चरबीचा अंशही शिल्लक रहात नाही !
कसा राहील आणि कशाला त्या कावळ्यांचा आकार बदलेल? जर खाल्लेलं सर्व अन्न पचवायला पुरेसा वेळ दिला तर !
कावळ्यांची सूर्योदयाला काव काव सुरू होते ती अगदी सूर्यास्त होईपर्यंत ! मग कावळ्यांच्या पोटात कितीही कावळे ओरडले तरीही...
त्यानंतर खाव खाव अजिबात नाही. अपवादाला पण नाही.
हे सगळे कावळे असे का वागतात, असा प्रश्न स्वतःला विचारल्यावर लक्षात आले, की कावळ्यांच्या शाळेत फक्त त्याचीच सत्ता चालते. त्याचाच नियम सर्वत्र पाळला जातो. त्याच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही.
सगळे कावळे फक्त त्याचेच ऐकतात. फक्त कावळेच नाही तर चिमण्या, पोपट, कबूतर आणि सर्व पशुपक्षी हाच एकमेव वैश्विक नियम पाळतात, सुर्योदय ते सुर्यास्त खायचे आणि सुर्यास्त ते सुर्योदय खाल्लेलं पचवायचे !
त्यानेच सांगितले आहे ना, "अहं वैश्वानरो भूत्वां..... " मीच तो जाठराग्नि आहे. तुम्ही चारही प्रकारचे अन्न खाल्लेत तरी ते पचवायचे काम माझे आहे.अन्न खाण्याची जबाबदारी तुमची आणि पचविण्याची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी पूर्णतः माझी. फक्त प्रत्येक वेळी एकच नियम पाळा, जो वैश्विक नियम मी आखून दिला आहे. तो म्हणजे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत मनसोक्त खावे. आणि नंतर सुर्यास्त ते सुर्योदय या वेळी खाल्लेलं पचवायला वेळ द्यावा.
या सुर्यास्ताच्या वेळेला येऊन थांबल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले........
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.02.2017
“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. “
Copyright © 2025 | Marathisrushti