(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग नऊ

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 5

    लॅबच्या रिपोर्ट मधे आणखीन एक वाक्य असते.
    Results of test may vary from laboratory to laboratory and also in some parameters from time to time, for the same patient.

    इतकं खरं कोणच बोलत नसेल. आता हेच बघा ना,
    आम्ही ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत, त्याचे आमच्या लॅबोरेटरीमध्ये जे रिपोर्टस् आले आहेत ते दुसऱ्या लॅबमधे कदाचित वेगळे येऊ शकतात. आणि काही वेळा कदाचित एकाच रुग्णाचे, वेगवेगळ्या वेळी तपासणी केली असता, ते ही रिपोर्टस् वेगळे येऊ शकतात.

    भाषा इतकी गोड असते, पण खरं आणि निर्णायक काय आहे, ते अगदी आयएसो प्रमाणित लॅबसुद्धा सांगू शकत नाही. कारणही तसेच आहे. प्रत्येक रुग्णाचे शरीर क्षणाक्षणात बदलत जाणारे असते. त्याची व्याख्या करतानाच शीर्यते तत् शरीरः अशी केली आहे. जे क्षणाक्षणाला क्षरण पावते, किंवा संपत जाते ते शरीर. त्यामुळे प्रत्येक पेशी जी आत्ता आहे ती नंतर बदललेली असते. हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. त्याला विशिष्ट काळात बंदिस्त करणे कधीही शक्य नाही. त्यामुळे त्याचे रिपोर्टस देखील बदलतेच रहाणार.

    यावरून आपण लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच की, लॅबोरेटरीमध्ये तपासून आलेलं शरीर म्हणजे पूर्णत्व नाही. " शरीराच्या सर्व तपासण्या करून घेतल्या पण कुठेच एकपण फाॅल्ट मिळाला नाही" असं जेव्हा रुग्ण सांगतात, तेव्हा त्यांच्या अपेक्षांची कीव करावीशी वाटते.
    सर्व शरीर यंत्राने तपासून मिळते, ही विज्ञानावरची अंधश्रद्धा आहे. असं मी म्हटलं तरी ते चुक ठरू नये.

    किती जणांना, किती पद्धतीने आणि कसं समजावून सांगणार की, सर्व तपासण्या हा शब्दच फसवा आहे. सर्वांना असे वाटते आहे की, विज्ञानाला सर्व शरीर समजले आहे. यंत्राने वरून तपासले, किंवा मशीनमधे शरीर घातले, की आतून उत्तर येईल. "हे बघा, इथे फाॅल्ट आहे. इथेच लक्ष द्या." तर असं नाहीये. हा भ्रम आहे. यालाच आध्यात्मिक भाषेत "माया" म्हणतात. जे आहे ते तसे नाही, या नाव माया.

    विज्ञानाला जे काही शरीर समजलेलं आहे, ते खूप मर्यादित स्वरूपात आहे. हे शरीर समजून घेण्यासाठी किती तरी पद्धतीने प्रयत्न सुरूच आहेत. अजूनही हे स्थूल शरीर काय आहे हे कळलेलंच नाही. मग सूक्ष्म शरीराची बातच वेगळी! मन, इंद्रिये, आत्मा तर दूरच राहिले. यांचा प्रत्येकाचा एकमेकांशी, आणि प्रत्येकाचा शरीराशी असलेला संबंध अभ्यासायला एक जन्म पण पुरा पडणार नाही.

    हे शरीर 'आतून' समजून घ्यायला एक वेगळी दृष्टी लागते, ( जिची चर्चा आपण आधी केली आहे.) ही दृष्टी मिळाली की चिकित्सा कशी करायची, कुठे करायची, का करायची, करायची की नाही, हे सर्व स्पष्ट होत जाते. यालाच मी म्हणतो, आयुर्वेद चिकित्सेमागील दृष्टीकोन! ही दृष्टी सर्वांना लवकरात लवकर लाभो ही प्रार्थना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.02.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सतरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    पंगतीत ढेकर देऊ नये
    मधेच पंगतीतून उठून जाऊ नये

    "सहनाववतु सहनौ भुनक्तु" या श्लोकाने सुरवात झालेली असताना या सर्वांमधून एकट्यानेच उठून कसे जायचे ?
    असे मधेच उठून जायचे नसते.
    एकतर आपणाला जेवण आवडलेले नाही, अशा प्रकारचा संदेश यजमानांना दिला जातो. नाहीतर आपले काहीतरी चुकले असावे असे यजमानांना वाटते.

    खरंतर ढेकर हा वेग आहे. आयुर्वेदात सांगितलेले आहे, वेगान् न धारयेत. मग आई असं चुकीचं कसं सांगते ?
    चुकीचं मुळीच नाही.
    पंगतीमधे आपण जेव्हा मोठ्याने आवाज करत, विचित्र आवाजात ढेकर देतो, तेव्हा इतरांना ऐकायला थोडे अवघडल्यासारखे वाटते.

    पंगतीमधे मधेच उठून जाणे हा यजमानांचा आणि अन्नपूर्णेचा अपमान समजला जातो. जर काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जसे डाॅक्टरना आत्ययिक अवस्थेतील एखाद्या रुग्णाला तपासायला जायचे असते, किंवा एखाद्याला (एक करंगळी) लघुशंका किंवा (दोन नंबरी व्हिक्टरी) बृहतशंका असते तेव्हा, बाजूला बसलेल्याची परवानगी घेऊन उठावे असा अलिखित अघोषित नियम आहे. जो नियम आईला तिच्या आणि त्याच्या आई आणि बाबांनी सांगितलेला असतो.

    पंगत हा प्रकार पूर्णपणे भारतीय. याच धर्तीवर पाश्चात्य देशात जे होते त्याला पार्टी म्हणतात.

    पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.
    पार्टी म्हणजे धांगडधिंगा.

    पंगत म्हणजे सहभोजन.
    पार्टी म्हणजे स्वभोजन.

    पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.
    पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे.

    पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार
    पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार.

    पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.
    पार्टी म्हणजे हवंतर जेवा.

    पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.
    पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट.

    पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई
    पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई

    पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली
    पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली

    पंगत म्हणजे ताटाला काढलेली रांगोळी
    पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई

    पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची
    पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची
    कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खीरीची

    पंगत म्हणजे हर हर महादेवा
    पार्टी म्हणजे डान्सचा जलवा

    पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ
    पार्टी म्हणजे डीजे नाय तर सगळं व्यर्थ

    पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची
    पार्टी म्हणजे भीती उपाशी राहाण्याची

    पंगत म्हणजे सत्व रजाची आरास
    पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास

    पंगतीमधे यजमानी पाहुण्यांना शोधतात.
    तर पार्टीत पाहुणे यजमानांना हुडकतात.

    पंगत म्हणजे काय काय सांगू !!!
    पार्टी म्हणजे आणखी काय सांगू ???

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १२.०८.२०१७

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग दहा

    ताटात वाढलेलं जेवण ताटातून तोंडात आणि आता पोटात जाणारे. आपल्याला हवं तसं संस्कारीत करून अन्न खाल्ले. घश्यातून जेवढे बारीक होऊन उतरायला हवं तेवढं दातांनी दाढांनी, सुळ्यांनी बारीक केलं. दात दाढा सुळे प्रत्येकाचे काम वेगवेगळे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे, तेवढं काम निमूटपणे करत असतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही भांडणे नाहीत, मलाच मोठे तुकडे बारीक करायचं काम का, मी लहानच तुकडे बारीक करणार. मला नाही ते काम आवडत, मला आपलं एवढंच जमेल, असं कोणताही दंतप्रकार म्हणत नाही. मोठे तुकडे आपोआपच सुळ्यांनी फोडले जातात. फोडलेले तुकडे दाढांकडे येतात, ते बारीक करून झाले की, परत इकडे तिकडे फिरवून काही शिल्लक राहिले नाही ना, याची चाचपणी मधे मधे जीभ करत असते, काही काम बाकी राहिले असेलच तर दात आहेतच. दातांना घट्ट धरून ठेवायला हिरडी आहेच. म्हणजे दात घट्ट हवेत तर हिरड्याही तेवढ्याच मजबूत पाहिजेत. नाहीतर ज्या घराचा पाया कमकुवत असतो, ती घरे कितीही सुंदर टाईल्सनी सजवलेली असली तरी छोटा भुकंप सगळं घर उद्ध्वस्त करून टाकतो, तसं एखादा खडखडा लाडू किंवा चिक्की चा तुकडा देखील, सगळे दात खाली पाडू शकतो.

    एकमेकांना पूरक असलेले हे इंजिनियरींग आधी नीट शिकले तर अन्य कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही समस्या सोडवता येतील, असे वाटते.

    कोणतेही अन्नावशेष बाहेर पडू नये यासाठी गाल आहेत. ज्यांचे गाल कॅन्सर सारख्या आजाराने काढावे लागलेत, त्यांच्या व्यथा लक्षात घेतल्या की गालाचे महत्व समजते. केवळ गालावर खळी पुरते गाल लक्षात ठेवायचे नाहीत.

    ज्या विधात्याने हे सर्व निर्माण केले तो केवढा मोठा स्ट्रक्चरल इंजिनिअर असेल ना !

    बारीक झालेले अन्न घश्यातून आत खाली जाऊ शकेल अशी खात्री झाली की, जीभ आपले काम करते. आणि अन्न खाली उतरवले जाते.

    ढकलून दिले जात नाही, तर सापाच्या तोंडातून जसे अंडे हळुहळू आत सरकवले जाते, तसा अन्नाचा गोळा आत लहरीप्रमाणे सरकवला जातो.

    अगदी अलगद लहरेदार !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.03.2017

  • आहाररहस्य ८

    जर हे सर्व विश्व, एक कुटुंब एक क्षणभर जरी मानले तरी, या कुटुंबातील प्रत्येक देश, हा या घराचा सदस्य झाला.
    या प्रत्येकाला जर हे घर “वाटायचे” ठरवले तर प्रत्येक खोलीची जबाबदारी वाटून द्यावी लागेल.
    ज्याची मास्टरी ज्याच्यात, त्याला ती जबाबदारी द्यावी.

  • आहारातील बदल – भाग १

    आजच्या काळातील एक जोरदार चर्चा सुरू असलेला एक विषय. आहारातील बदल चांगले की वाईट ?

    कोणासाठी कसा आहार असावा, याचे काय काय नियम आहेत हे तारतम्याने ठरवायचे असतात.

    वाॅटसपवर अनेक लोकाचे अनेक आहार सल्ले येत असतात. निसर्गोपचार, घरगुती आहार सल्ले, अनुभविक उपचार, आजीबाईचा बटवा, लेखाखाली स्वतःचेच नाव असलेले, दुसर्याच्या नावावरील लेख तिसर्याच नावाने खपवलेले, अनेक विरोधाभास असलेले सल्ले आपल्याला वाचायला मिळत असतात. त्यातील खरेखोटेपणा शोधायला तेवढा वेळही नसतो.म्हणून काही नियम गृहीत धरावे लागतात.

    आपला पारंपारिक आहार कधीही बदलू नये.
    जो आहार आपल्या पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई बाबांनी घेतलेला आहे, तोच आहार आपल्यासाठी योग्य असतो. त्यांनी तो तेथील परिस्थिती, उपलब्धता, आवश्यकता, गरज, प्रकृती, विचार, इ. गोष्टी विचारात घेतलेल्या असतील.

    आपले पूर्वज खूप हुशार होते, ज्ञानी होते, सूक्ष्मातील जाणणारे होते. प्रत्यक्ष कृती करणारे होते. केवळ वाचाळवीर आणि आरंभशूर नव्हते.

    सांगे वडिलांची किर्ती, तो एक मूर्ख. असे समर्थांनी सांगून सुद्धा तो दोष मी स्विकारतो.

    अनुभवाच्या आधारे जीवन जगायची एक आदर्श पद्धत त्यांनी निर्माण केली होती. खरं सांगायचं तर शास्त्र निर्माण करत गेले. अनुभवाच्या जोरावर, प्रायोगिकता वापरत, भविष्याचा वेध घेत जगायचं कसं हे पुढील पिढीला प्रत्यक्ष शिकवित गेले. आचरणात आणत गेले. त्याची पुढील पिढी त्यात ज्ञानाची आणखी भर टाकत गेली. अनुभव जोडत गेली. अनावश्यक गोष्टी काढत गेली, काही वेळा कालानुरूप बदलतही गेली. नवीन सिद्धांत तयार करत गेली. नवीन बदलाला समोरी गेली. मूळ तत्व न सोडता, होणारे बदल मान्य करत गेली. नवीन गोष्टींना मान्यता देत गेली.
    यालाच सनातन म्हणतात. नित्य नूतन सनातन !

    म्हणून तर हजारो वर्षे झाली तरी वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय संस्कृती अजून ही जिवंत आहे. केवळ कागदी घोडे न बनता, कृतीच्या स्तरावर बदल मान्य करत गेलेली आधीची वडील पिढी.

    आता हेच पहा ना, अगदी आपल्या लक्षात येतील असे आपल्या डोळ्यासमोर झालेले आहारातील काही बदल आपल्या आधीच्या वडील पिढीने मान्य केलेच ना !

    दोन पिढ्यांपूर्वी न्याहारीच्या वेळी फक्त कोंड्याची भाकरी आणि पेज जेवून रहाणार्या या पिढीने उपमा आणि पोहे स्विकारले.
    त्या पुढच्या पिढीने थालीपीठ, आंबोळी, डोसा पण स्विकारला, वडा भजी ऊसळ मिसळ पण पचवली. आवडीने आणि चवीने खाण्याची चटक वाढत गेली.
    आणि अगदी आताची पिढी पिझ्झा बर्गर पनीर बटरच्या बदलाला सामोरी जातेय.

    परिवर्तन , बदल ही काळाची गरज असते. युक्ती वापरून त्यातील योग्य अयोग्य ठरवणे हे आपल्याच हातात असते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    22.09.2016

  • किचन क्लिनीक – पपई

    किचन क्लिनीक – पपई

    पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते.तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारा माही उपलब्ध असे फळ.ह्याचा आपण वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकतो मग शेक असो वा फ्रूट सलाड सगळ्याच हि पपई रूचकर लागते.

    तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व पिकल्यावर नुसतेच खायला छान लागते.

    ह्याचे १०-१२ फूट उंच वृक्ष असतो व ह्या झाडाला फांद्या नसतात.पाने ताडाच्या पानांप्रमाणे छत्राकार,विस्तृत व विभक्त खणांची असतात.फुले हिरवी,पांढरी व एकलिंगी असतात.फळ एक कोष्ट,लंबगोल,कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर असते त्याच्या आत बिया असतात ज्या चाॅकलेटी रंगाच्या व पाणीदार अशा पिकलेल्या फळात तर कच्च्या फळात पांढऱ्या असतात.

    कच्चे फळ हे चवीला तिखट,कडवट असते ते उष्ण असते व कफ वात शामक असून पित्तकर असते.

    तर आता आपण प्रथम कच्च्या पपईचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)कच्च्या पपईचा चीक गजकर्णावर लावावा फायदा होतो.

    २)मुळव्याधीवर पपईच्या कच्च्या फळाचा चीक लावल्यास ३ दिवसांनी मोड कमी होतो.

    ३)कच्ची पपई वाटून हातपायांवर बांधून झोपल्यास हातपायांची आग व भेगा कमी होतात.

    ४)कच्च्या पपईचे तुकडे मांस शिजवताना त्यात धालावे म्हटजे मांस लवकर शिजते व सुपाच्य होते.

    ५)कृमींवर मोठ्या माणसांना १ चमचा पपईचा चीक+साखर हे मिश्रण घ्यावे व लहान मुलांना हा चीक १-२ थेंब साखरे सह द्यावा.

    (क्रमश:)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहाररहस्य ५

    छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
    अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग अकरा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे त्रेपन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग अकरा

    घराबाहेर गेल्यावर स्नान, भोजन, जलपान आधी वाहनाला द्यावे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास रथातून असे, त्यांची व्यवस्था आधी पहावी. केवळ सारथीच नव्हे तर घोडे आदि प्राण्यांचे पोटापाण्याचे आधी पहावे. कारण परतीच्या प्रवासामधे हे वाहन, वा चालक पुनः ताजेतवाने व्हायला हवेत, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.

    अनोळखी ठिकाणी गेल्यावर माहिती नसलेल्या जलाशयात पोहायला अथवा आंघोळीला पण जाऊ नये. मगरीसारखे प्राणी आधी चाहुल लागू न देता हल्ला करतात. बाहुबली करतो, म्हणून बाहुंचे बळ दाखवून, नदीत पोहू नये. उंचसखल वाकड्यातिकड्या पर्वतावर चढू नये, या कड्यावरून त्या कड्यावर माकडासारख्या उड्या मारू नयेत. घसरून पडण्यामुळे, जीवाला धोका संभवू शकतो. पिक्चरमधे दाखवतात, ते सर्व खोटे असते, ब्लु व्हेलसारखे मोबाईल गेम तर प्रत्यक्षात मानसिकताच बदलवून टाकतात, याची जाणीव मुलांना वारंवार करून द्यावी.

    पेटलेल्या अग्निसमोरुन जाऊ नये, अग्निकडे पाठ करून कधी बसू नये, अग्निच्या आणि अग्निच्या जवळ बसलेल्या माणसाच्या मधूनही कधी जाऊ नये. अग्निशी विनाकारण खेळ खेळू नये. आज मंकी जंपिंग, रिव्हर राफ्टींग, व्हॅली क्राॅसिंग सारखे साहसी प्रकार केले जातात, तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे.

    हे साहस करणे देखील एकवेळ परवडेल, पण प्रत्यक्षात कोणतेही साहस न करता, साहस केल्याचा आभास निर्माण करीत स्वतःचा स्वतः फोटो काढणे हे जास्ती खतरनाक असते. आजच्या मराठी भाषेत याला "सेल्फी" म्हणतात. नाकाला हात बोट न लावता, नाकावरची माशी कशी उडवायची याचे प्रात्यक्षिक किंवा नसलेल्या भुवया ताण ताण ताणून त्याची धनुकली करायची, आणि ओठ जेवढे होतील तेवढे डुकराच्या तोंडासारखे करायचे, आणि हे सगळं करताना, एका हाताने अधांतरी राहात, दुसऱ्या हाताच्या तीन बोटानी मोबाईल सांभाळत, करंगळी मागे उचलून एका बोटाने फोटो काढायचा. महाडेंजरस. ग्रंथकार ग्रंथ लिहित होते, त्यावेळी जर हा सेल्फी प्रकार पाहिला असता तर त्याच्यावर तीन चार श्लोक तरी रचले असते.

    हे सर्व आपला जीव सुरक्षित रहावा यासाठी सांगितलेले आहे.

    याचा अर्थ असा नव्हे की, साहस करूच नये, गिर्यारोहण करूच नये, नदीमधे पोहूच नये. हे सर्व करताना आधी आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा. आपल्या सोबत ( नंतर ओरड मारायला तरी ) कुणीतरी असावे. एवढेच. बाकी व्हा बाहुबली !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ११.०९.२०१७

  • आहारसार भाग ९

    अन्नावरचे संस्कार अन्नाचे गुण बदलून टाकतात. मक्याचे दाणे खायचे असतील तर, त्याअगोदर कणीस स्वच्छ तर करायला हवे. त्याच्यावरची आवरणे आणि तूस काढून टाकायला नकोत का ?

    तस्संच अन्नाचंही आहे. आपल्याला जसं हवंय तसं आपण शुद्ध करून घेतो, वरून खाली पोटात ढकललं की, आपली जबाबदारी संपली. मग शरीराला जसं हवं तसं, शरीर ते शुद्धकरून घेतं. ही सर्व जबाबदारी यकृतावर असते.

    वरून खाली आलेल्या अन्नातील भेसळ दूर करणे, त्यातील विषावर तात्पुरते आवरण घालून बाजूला करणे, चांगले अन्न पचनासाठी पाठवणे, हे पाचन होण्यासाठी जे जे अन्नरस आवश्यक आहेत तेते पुरवणे, नकोत ते पुनः शुद्ध करून घेणे, तयार झालेल्या अन्नरसातून रक्तनिर्मितीला आवश्यक ती तयारी करणे, तयार रक्तातील दोष शोधून ते मूत्र, रज, घामाद्वारे बाहेर काढणे इ. सर्व शुद्धीकरणाचे काम यकृत करीत असते.

    पुरवून पुरवून वापरणे, अत्यंत आवश्यक तेव्हाच नवीन उत्पादन करणे, नाहीतर टाकाऊतून टिकाऊ तयार करणे हा तर यकृताचा आवडीचा छंद !

    आपण जेवढे शुद्ध अन्न आतमधे देऊ, तेवढे यकृताचे काम कमी होते, त्याला पुरेशी विश्रांती देखील मिळते. काम करून दमल्यानंतर परत ताजेतवाने होऊ शकते. एकदम फ्रेश !

    नाहीतर हे यकृत, कामाच्या ओझ्याखाली एवढे दबून जाते की, स्वतःच्या मूलभूत गरजांकडेदेखील त्याला लक्ष देता येत नाही. अगदी एखाद्या राबराब राबणाऱ्या आदर्श गृहिणीसारखे. मग कधीतरी ठिणगी उडाली आणि स्फोट झाला तर दोष कुणाचा ?

    सावध तो सुखी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. वेळीच घातलेला एक टाका पुढील नऊ टाके वाचवतो, असे पाश्चात्य तज्ञ देखील म्हणतात.

    यकृताकडे आतून लक्ष देणे म्हणजेच घातक रसायनांपासून दूर रहाणे. आज एवढी विषे आपल्या अवती भवती आहेत, त्यातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर विवेकाने वागले पाहिजे.

    एकतर टोटल प्रिव्हेंशन, नाहीतर टोटल क्युयर

    काय योग्य, काय अयोग्य हे वेळीच ठरवता आले पाहिजे. अनावश्यक विषे टाळू शकलो तर आवश्यक ती विश्रांती आपण आपल्याच यकृत किडनी या अवयवांना देणार आहोत.

    हलाहल पोटात गेले तर, पुढे धोका आहे, हे वेळीच ओळखून, ते विष योग्य त्या ठिकाणी रोखून, शोषून, कंठामधेच धारण करणारे हलाहलधर, नीलकंठ व्हावे.
    हे झाले टोटल प्रिव्हेंशन

    आणि टोटल क्युयर करायचे असेल तर ...???

    वेळप्रसंगी प्रजेचे रक्षण झालेच पाहिजे, हा उदात्त हेतू लक्षात घेऊन, यमुनेतील कालीयाच्या विषारी डोहात उतरून, जमीन, पाणी आणि आसमंतामधे विष निर्माण करणार्‍या, या कालीयांच्या डोक्यावर थयथय नाचून, रक्त ओकेपर्यंत नामोहरम करून, त्याला त्याच्याच देशातून, दहशत निर्माण करणारा, आणि डोह सोडून जाईपर्यंत, पाठपुरावा करणारा गोपालक कालीयामर्दक बालकृष्ण तरी व्हायला हवे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    27.08.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग छत्तीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

    कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग एक

    आपण सूर्यवंशी आहोत. आपला दिवस सूर्योदयाला सुरवात होतो आणि रात्री संपतो. सर्वसाधारणपणे सगळीकडे असेच चालते. असेच चालावे, कारण दिवसा सूर्य असतो आणि रात्री सूर्य नसतो.

    निद्रा म्हणजे झोप ही रात्रीच प्रशस्त आहे. शरीर दिवसभर काम करून दमते, त्याला विश्रांती ही हवीच ! अन्यथा इंजिनकडून फक्त काम करून घेतले गेले आणि पुरेशी विश्रांती दिली नाही तर इंजिनचे आयुष्य लवकर संपुष्टात येते. साधा ब्लेंडर आणला तर त्याच्यावर सूचना लिहिलेली असते. हे मशीन फक्त दहा मिनीटे सुरू ठेवावे. नाहीतर याची गॅरंटी वाॅरंटी काही मिळणार नाही. अगदी बारीक अक्षरात हे लिहिलेले असते. त्यामुळे कोणी नीटसे वाचत नाही, वाचले तरी फारसे लक्ष देत नाही, शेवटी परिणाम व्हायचा तोच होतो, मशीन अकाली बंद पडते.

    इसापनीती मधील दोन कष्टकरी मुलांची ती गोष्ट आठवत असेलच ! वडील आपल्या दोन्ही मुलांना एका दिवसात जास्त उत्पन्न आणण्यासाठी काम करायला सांगतात. पहिला एक जण न थांबता, दिवसभर राब राब राबतो, न थांबता कष्ट करतो. न थांबल्यामुळे त्याच्याकडील हत्यारे देखील दमतात, त्यांची धार जाते. धार गेलेल्या हत्यारांनी काम करायला जास्ती शक्ती संपून जाते. उत्न्नावर परिणाम होतो. उत्पादन कमी भरते.

    तर दुसरा मधे मधे थांबून पुरेशी विश्रांती घेऊन पुनः दुप्पट वेगाने काम करतो, विश्रांतीच्या वेळी आपल्या हत्याराना धार काढून परत कार्यक्षम बनवणे, आदि कामे करतो. ( विश्रांती म्हणजे गाढ झोपलेच पाहिजे असे नाही हो, ) परिणाम दुसऱ्या मुलाची कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता दोन्ही वाढते.

    माॅरल ऑफ द स्टोरी काय ?
    काम करताना पुरेशी विश्रांती घ्यावी.

    "पुरेशी" या शब्दाचा आणखी थोडा खुलासा, स्पष्टीकरण करावे लागेल. प्रत्येकाचं हे "पुरेसं " वेगळं असतं. हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरतं. पुनः त्यासाठी नियम करून काम करू नये, किंवा तशी विश्रांती ठरवू नये. नाहीतर पुनः गोंधळ होईल. हेच तर आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून तर आपण पहिला नियम केला की, "कोणताही नियम पाळू नये."

    आयुर्वेद सांगतो, विश्रांती ही रात्रीच घ्यावी. निसर्ग पण हेच सांगतो, विश्रांती रात्रीच घ्यावी. सगळे पशुपक्षी दिवसा खातापितात, आणि रात्री विश्रांती घेतात. अपवाद वटवाघुळ, घुबड आदि निशाचर प्राणी. आणि माणसांमधील शिफ्ट ड्यूटी करणारे प्राणी !

    गरज म्हणून, पोटासाठी, रात्री जागरण करून नोकरी चाकरी करावी लागते. आपले आपल्या कुटुंबाचे पोट एका बाजूने भरत जायचे, रात्री पैसे मिळवत जायचे, तर दुसऱ्या बाजूने ते दिवसाढवळ्या डाॅक्टरांचे पोट भरायला सहजपणे देऊन जायचे !

    असंच चाललंय, अवतीभवती. पोटाला चिमटा घेत, श्रम करायचे आणि अन्न पचत नाही, पोट दुखतंय ही तक्रार घेत डाॅक्टरांकडे जायचं. पोट आणि खिसा दोन्ही फाडून घ्यायचं. हे कुठंवर चालायचं ?

    हे असंच चालायचं, असं म्हणून नाही चालायचं. समस्या आहे तिथे उत्तर आहे. शोधा म्हणजे सापडेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.05.2017