आस्यासुख या शब्दावरून आठवले, आस्य या शब्दाचा एक अर्थ तोंड, मुख असा सुद्धा होतो.
म्हणजे आपण आस्य सुख या शब्दाने जीभेचे चोचले पुरवणारे सुख जे कफ वाढवणारे असते, ते सुख प्रमेहाचा हेतु असते, असे म्हणायलाही हरकत नाही.
जेव्हा ग्रंथ लिहिले गेले तेव्हा जीभेचे फार चोचले नव्हते, त्यामुळे ग्रंथकारांना हा मुद्दा फार भर देऊन सांगावासा वाटला नसेल. पण आजच्या काळात मात्र हे जिह्वालौल्य खूपच वाढलेले आहे. याचे अतिसुख प्रमेहाचे कारण ठरेल. याचेच नव्हे तर कोणत्याही गोष्टीतील अति सुख किंवा अति दुःख हे सुद्धा रोगाचे कारण आहे.
शिवलीलामृतामधे देखील वर्णिलेलं आहे.
अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतिपूर्ण ।
अतिभोगं अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय।।
जिह्वा सुख म्हणजे मला जे आवडतं तेवढंच मी खाणार, बाकीचे नाही. मग ते हितकर असो, वा नसो. काही वेळा आपल्याला आवडत नसलं तरी एखादा पदार्थ आपल्याला खावा लागतो. त्यात आवड निर्माण करून खाल्ले तरच तो पचतो, नाहीतर नाही. आयुर्वेदातील बहुतांश औषधे न आवडणाऱ्या चवींची असतात. पण अंतिमतः सुख देणारी असतात, त्यामुळे कितीही वाईट तोंड करून प्यायला खायला लागली तरी हितकरच असतात, आणि मुख्य म्हणजे आयुर्वेदीय औषधे कायमची घ्यावी लागत नाहीत. रूग्णाला खायला काय आवडतेय यापेक्षा, वैद्य जाणतो, रूग्णाचे हित कशामधे आहे. म्हणून पथ्य संकल्पना फक्त आयुर्वेदातच आहे !
आता या पथ्य अपथ्यामधे रुग्ण, वैद्याचे डोके खातो, हे वेगळं हं !
असो.
माझे हित कशात आहे, हे वैद्याला विचारून आपला आहार ठरवला तर मरेपर्यंत औषधांची गरज उरत नाही. यासाठी थोडा संयम पाहिजे मनावर. आणि मनावर संयम ठेवण्यासाठी जीभेवर....
म्हटलंच आहे ना,
जेणे जिंकिली रसना....
जिंकल्या साऱ्या वासना.
जीभ हे ज्ञानेंद्रिय पण आहे, कर्मेंद्रिय सुद्धा !! वाक् इंद्रिय आणि रसनेंद्रीय !
एकाचे काम बाहेर टाकणे, जसे शब्द.बोलणे.
एकाचे काम आतमधे घेणे जसे अन्नपाणी. गिळणे.
नियंत्रित खाणे आणि विचारपूर्वक बोलणे हाच संयम. म्हणून या आत बाहेर वळवळणाऱ्या जीभेवर संयम ठेवला तरच सर्व इंद्रियावर संयम येतो. पटलं ना !
मला सर्व मिळतंय मग मी खाल्लं तर काय बिघडलं? मी भोगून संपवेन, प्रत्येक वेळी त्यागच करायला हवा असं कुठाय ? असा विचार करणं चुकीचं आहे.
माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवून खाणं, हे हितकर असते.
हे ज्याला समजले त्याला जीवन उमजले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.02.2017
ह्याचे २०-३० फुट उंचीचे भराभर वाढणारे झाड असते.ह्याला शरद ऋतुमध्ये फुले येतात म्हणून ह्याला अगस्त्य ऋषिंच्या नावाने अगस्त्य असे ही म्हणतात.
हि भाजी चवीला कडवट असते व थंड असते त्यामुळे ती शरीरातील कफ व पित्त दोष कमी करते.
हि भाजी जशी स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा उपयोग आपण घरगुती उपचारांमध्ये देखील करू शकतो.
१)जखमेवर हादग्याच्या पानांची चटणी बांधावी म्हणजे जखम लवकर भरत.
२)ठेच लागुन सुज आली असल्यास ठेचाळलेल्या भागावर हाद्ग्याच्या पानांचा रस लावावा.
३)जुना खोकला कमी होत नसल्यास हादग्याच्या पानांचा रस २ चमचे + मध १ चमचा हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्यावे.
४)वारंवार जंत होणे,अंगावर पांढरे डाग उठणे,पोट दुखणे,भुक न लागणे,जुलाब होणे ह्या तक्रारी करीता हादग्याची भाजी जेवणात काही दिवस नियमीत घ्यावी.
५)डांग्या खोकल्यात हाद्ग्याच्या पानांचा रस ४ चमचे+ कांद्याचा रस २ चमचे हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस १५दिवस घ्यावे.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा.
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे पंचावन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग तेरा
आपले अवयव जरी आपले असले तरी त्या अवयवांना सार्वजनिक ठिकाणी प्रकट करू नये. अशी कृती आपल्याकडून होऊ नये, जी सार्वजनिक क्षेत्रात निंद्य मानली आहे.
जसे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मल मूत्र विसर्ग करणे, चुकीचे आहे. यासाठी सरकारने तशी बंद व्यवस्था ठिकठिकाणी निर्माण करून देणं, हा सरकारी व्यवस्थापनाचा भाग आहे. मुंबई सारख्या गजबजलेल्या ठिकाणी मल विसर्जनासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर यावे लागते, ही शरमेची बाब आहे.
शरीराच्या मूलभूत गरजा आणि जागेची उपलब्धता यापेक्षा शासनाची पराभूत मानसिकता आणि लोकप्रतिनिधींचे गांधारी धोरण, हे सार्वजनिक स्वच्छता मोहिमेतील मोठ्ठे अडथळे आहेत. केंद्रसरकारचे यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत, ही समाधानकारक बाब आहे.
परदेशात रस्त्यावरून स्वतःचे कुत्रे फिरवताना देखील त्यांनी केलेली शी शू मालकाला उचलावी लागते. पण भारतात मात्र मर्सीडीज गाडीची काच खाली करून रस्त्यावर थुंकणारे महाभाग देखील कमी नाहीत.
जे अवयव झाकले जाणे अपेक्षित आहे, ते जाणुनबुजुन दिसतील आणि अंग प्रदर्शन होईल असे कपडे सार्वजनिक ठिकाणी न घालणे, हा नियम पुरुष आणि महिला दोघांसाठी लागू आहे.
प्रत्येक देशाच्या परंपरा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. ब्राझील सारखा देश, अमेरिकेसारखा देश आणि भारतासारखा देश या देशांच्या सभ्यता आणि परंपरा वेगवेगळ्याच असणार. मुस्लिम महिला बुरखा घालणे ही सभ्यता मानतील, भले ती इतराकरीता कट्टर असेल. मुसलमान तरूण मिशी भादरून टाकतील तीच मिशी भारतात प्रतिष्ठेची गोष्ट ठरते. उत्तर भारतात डोक्यावरून पदर घेणं ही सभ्यता आहे, तर दक्षिण भारतात कमरेखाली महावस्त्र आणि खांद्यावर उपवस्त्र घेणं प्रतिष्ठेची बाब समजली जाते.
भारतातील काही भागात घागरा आणि चोळी हा मुख्य पोशाख आहे तर दक्षिणेकडील काही भागात चोळी वापरलीच जात नाही.
सांगायचे काय तर या संस्कृती सभ्यता ज्या त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अस्मितेच्या गोष्टी आहेत. त्या तशाच पाळल्या जाव्यात. जागतिकीकरणाच्या किंवा ग्लोबलायझेशनच्या गोंडस नावाखाली, मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचावे का ? हा प्रश्न आहे.
हात, पाय, ओठ, पोट, कंबर, डोळे, छाती अथवा जननेंद्रिये यांचे प्रदर्शन होऊ नये. याकरीता पालकांनी जागरूक राहून आपल्या कुटुंबाच्या हितासाठी काही कठोर निर्णय वेळोवेळी घेणे आवश्यक आहे.
कायदे आणि नियम करून किंवा सेन्साॅर बोर्डची स्थापना करून हे प्रश्न सुटतील, असे वाटत नाही. त्यासाठी आपल्या कुल परंपरा, प्रदेश विचार आणि नीतीच्या मर्यादेचे लहानपणापासूनच प्रशिक्षण गरजेचे आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१३.०९.२०१७
अ) गाईंचे दुध:
१)गुळवेलीच्या काढ्यात गाईंचे दुध घालून काढा आटे पर्यंत दुध उकळावे व ताप येत असणाऱ्या व्यक्तींचा पिण्यास द्यावे.
२)पोटात काही गंभीर आजारामुळे पाणी झालेल्या रूग्णाला इतर औषधांसोबतच नियमीत गाईचे दुध पाजावे फायदा होतो.
३)पोटात आग होणे,पोट दुखणे,काही खाल्ल्यावर बरे वाटणे ह्या तक्रारीमध्ये कोमट दुध,खडी साखर व गाईचे तूप हे मिश्रण दिवसातून ४ वेळेस थोडे थोडे प्यावे.
४)वारंवार संडास मधून आव पडून त्रस्त झालेल्या व्यक्तीला १ कप गाईचे दुध+१ कप पाणी+१/२ चमचा सुंठ घालून हे मिश्रण फक्त दुध शिल्लक राही पर्यंत उकळावे व त्यास थोडे थोडे पाजावे.
५)संडासला घट्ट होत असल्यास १ वाटी दुध+ १ मोठा चमचा तूप किंवा लोणी चपाती किंवा भाकरी सोबत खावे.
गाईचे दुध प्यायचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
४)मेंढीचे तुप:
पचायला जड,तत्काळ पोषण व बल गाणारे,शरीर पुष्ट करंणारे.नाजूक प्रकृतीच्या माणसांनी ह्याचे सेवन करू नये.
५)ताजे तुप:
श्रमनाशक,तृप्तीकर,नियमीत भोजनात सेवन केल्यास अशक्तपणा,रक्ताची कमतरता भरून काढते.तसेच डोळंयाना हितकर आहे.
६)जुने तुप:
दहा वर्षांवरील तुपास रसायन म्हणतात.शंभर वर्ष जुन्या तुपाला कुंभसर्पि म्हंणतात.त्याहीपेक्षा जुने तुप म्हणजे महाघृत होय.जसजसे तुप जुने होत जाते तसे ते अधिक गुणकारी होते.जुने तुप खोकल्याचा नाश करते,डोळ्यांना हितकर आहे,टाळुवर चोळून जिरवले असता मानेच्यावरील सर्व आजारांना बरे करते,तसेच ते त्वचारोगा मध्ये देखील उपयुक्त आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
तुळशीला प्रदक्षिणा घालणे हा प्रकार तर आता हद्दपारच झाल्यासारखा आहे. जिथे आम्हाला राहायला जागा इंच इंच लढवून मिळवली आहे, तिथे तुळशीला कुठे जागा ? शक्यच नाही. जमलंच तर गॅलरीतला एखादा कोपरा मिळेल.
पाणी जिथे जास्ती काळ साठून राहते, तो प्रदेश म्हणजे आनूप. या प्रदेशात निर्माण होणारे सर्व अन्नधान्य, पालेभाज्या, फळे ही कफाच्या आधिक्यातील असतात. म्हणून यांचा अतिवापर नको, असे शास्त्रकार सांगतात. या अन्नधान्यादि पासून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि अग्निमांद्य होते, तसे होऊ नये. स्पष्ट उदाहरण द्यायचे झाल्यास कोकणातील लोकांनी सफरचंद खाणे. बर्फाळ प्रदेशातील हे फळ समुद्राजवळ रहाणाऱ्या लोकांनी खाल्ले तर पचन बिघडते. आणि क्लेद वाढतो.
आधीच जमिनीमध्ये, वातावरणात पाण्याचे प्रमाण जास्त अशा प्रदेशातील एखादे फळ आणि तेही रसरशीत असेल तर प्रमेहाला आणखीन पूरक. जसे ऊस. ऊसाचा रस,त्यापासूनची काकवी, गुळ, साखर आणि हे पदार्थ ज्यामधे आहेत, अशा सर्व मिठाया जर खाऊन पचवता आल्या नाहीत तर प्रमेह ठरलेला.
रसदार फळे नकोतच, त्याचा ज्युस काढून पिणे हे आणखीनच खतरनाक. याविषयी सविस्तर आपण वाचले आहेच.
आयुर्वेदातील आणखीन एक संकल्पना म्हणजे नवे धान्य आणि जुने धान्य. आजच्या विज्ञानाला कदाचित हे रूचणार नाही, पटणार नाही, पण जेवढे धान्य नवीन तेवढे ते पचायला जड. जेवढे जुने तेवढे पचायला हलके. धान्य सूर्याच्या किरणांनी संरक्षित करून ठेवायची पद्धत भारतीयच ! किमान एक वर्ष जुने तांदुळ वापरले तर भात मोकळा होतो, हे व्यवहारात आपण बघतोच. मोकळा होणे म्हणजे त्यातील चिकटपणा कमी होणे. दही जसे प्रमेहामधे नको, तसेच दह्याप्रमाणे आंबलेले अन्य पदार्थ देखील क्लेद निर्माण करतात. जसे, आंबोळी, इडली, दहिवडा, मेदूवडा, ढोकळा. या पदार्थांमधे केवळ साखर नाही म्हणजे मधुमेहात चालतील असे नाही. तर आयुर्वेदीय पद्धतीने विचार केला तर चिकटणारे, चिकट असणारे आणि चिकटपणा वाढवणारे जे जे पदार्थ आहेत, ते ते सर्व क्लेद वाढवणारे, प्रमेहाचे कारण जाणावे.
म्हणजे आंबवलेले सर्व पदार्थ बंदच करायचे का ? कधीच खायचे नाही का ?
नाही. एवढं टोकाला जाऊन अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.
आपल्याला चिकटपणा कमी करायचा आहे. पीठ जरी आंबवलेले असले तरी त्या पीठापासून तयार झालेल्या इडली, दहीवडा, ऑम्लेट, या फुगलेल्या पदार्थापेक्षा, डोसा प्रकार जो खमंग खरपूस भाजलेला असतो, त्यामुळे त्यातील जलीय अंश बऱ्यापैकी कमी करून घेतलेला असतो, त्यातील पोकळपणा तुलनेने कमी असतो, तव्याच्या म्हणजे अग्निच्या जास्ती जवळ असतो, म्हणजेच डोसा, पेपरडोसा, मसाला डोसा, हे पदार्थ इतर आंबवलेल्या पदार्थांच्या तुलनेत, पचायला हलके असतील. जेव्हा आंबवलेलेच पदार्थ खाण्याशिवाय अन्य कोणतेही पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा हे डोसा आयटम आपल्याला नक्कीच मदत करतील!!!!
चिकटपणा युक्तीने कमी करावा, जेवढा चिकटपणा कमी तेवढे पदार्थ पचायला हलके, चिकटपणा म्हणजे क्लेद. ही सर्व साखळी लक्षात ठेवली तर आपणच ठरवू शकतो, क्लेद कशाने कमी करता येतो ते !
यासाठी शास्त्रकार अनेक प्रकाराने समजावून सांगताहेत, इथे पाणी आहे, इथे चिकटपणा आहे, इथे ओलावा आहे, इथे हवेत आर्द्रता जास्ती आहे, इथे गती कमी आहे, इथे इथे प्रमेहाचा धोका आहे.
तेवढी दृष्टी तयार झाली की, झाले. प्रमेह गेलाच म्हणून समजा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.02.2017
संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था.
एवढा सगळा खटाटोप कशासाठी ?.....
गेली चाळीस पन्नास वर्षे झाली, आमची वाढ होऊन, आत्ता कशाला एवढं बदलायचं ?...
आमची अर्धी लाकडं गेली मसणात.....
काय वाढणारे आयुष्य असं वाढून वाढून....
आणि खाव्या लागल्या अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणून कुठे बिघडणार आहे ?......
जगात एवढी लोक खातातच आहेत ना या अॅलोपॅथीच्या गोळ्या. ती काय सगळी वेडी आहेत का ?......
विज्ञानावर, त्याच्या नवनवीन शोधांवर, या आयुर्वेदीक वैदूंचा अजिबात विश्वास म्हणून नाही. भोंदूगिरी सगळी.....
असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आत खदखदत आहेत, हे कळतंय....
आजची टीप त्यांच्यासाठी...
आयुर्वेद सांगतो, निरामय जीवन जगावं. औषधांशिवाय जगावं, दिलखुलास जगावं, आपण निरोगी रहावं, इतरांना निरोगी होण्यास मदत करावी.
औषध कसं असावं यावर आयुर्वेद सांगतो, एक औषध घेताना अन्य कोणत्याही स्वरूपाचा बिघाड शरीरावर दिसू नये, आजच्या भाषेत सांगायचे तर कोणतेही साईड इफेक्ट, म्हणजे दुष्परिणाम नकोत. ज्या कारणासाठी औषध घ्यायचं ते कारण नाहीसे झालं की, औषध बंद व्हायला हवं.
पण आज काय होतंय ? आणि काय चाललंय ? हे सर्व आपल्याला दिसतंय.....
जगण्यासाठी, मरेपर्यंत औषधंच औषध!
त्यापेक्षा जीवनशैलीमधेच थोडेफार बदल केले, विचारामधे थोडी सकारात्मकता आणली की झालं.
काही आजार वंशपरंपरेने येतात, असे सांगितले जाते, हे पण अर्धसत्य आहे. जसे घरात एकाला "ह्रदयरोगी" असा शिक्का बसला की, त्याचे अख्खे घराणे वाताचे रोगी बनून जाते.
कारण ?
डाॅक्टरनी सांगितलेले चुकीचे पथ्यापथ्य.
भीतीने असेल किंवा आमच्यासाठी कुठे वेगळं करत रहाणार, या कारणाने असेल, पण, त्या एकाच्या जेवणातले तेल, तूप, नारळ, शेंगदाणे, आदि सर्व स्निग्ध पदार्थ बंद केल्यामुळे, सगळ्याच्याच जेवणातील स्नेह आटून जातो. (जेवणातील आणि जीवनातील सुद्धा !) आणि अख्खं घराणं चुकीच्या आहाराची शिकार होते. हे तसंच्या तसं पुढच्या पिढीत काॅपी पेस्ट होतं आणि नवीन (वंश /देश )परंपरा सुरू होते.
आपल्या घरात तर अशी चुकीची परंपरा सुरू तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवावे, यासाठी आपली वंश परंपरा, देश परंपरा नीट तपासून पहायला हवी. इतिहास आणि पुराणे वारंवार नव्याने अभ्यासायला हवीत.
ही नव्याने निर्माण होणारी चुकीची आहार परंपरा आपल्याला थांबवायची, बदलवायची आहे.
आणि मुख्य म्हणजे आपली (दोन किंवा एक) मुले. ज्यांच्या खांद्यावर आपण आपले भविष्य ठेवणार आहोत, ते सक्षम नकोत का व्हायला ? आम्ही ज्या चुका केल्या, किंवा करतोय त्याची चुकीची फळे त्यांना भोगायला लागू नयेत, मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब, संधीवात, स्थौल्य, पीसीओडी, थायराॅईड सारखे पसरत जाणारे आजार आपल्या घरात येऊ नयेत, यासाठी आपणच वेळीच सावध होऊन, बदलायला हवे.
मुलं आपलं अनुकरण करत असतात. काही गोष्टी न शिकवता आपल्याकडून शिकत असतात. याचे भान पालक म्हणून आपण ठेवायलाच हवे. माझ्या आई वडिलांच्या लहानपणी असलेली सकाळी सायंकाळी जेवायची वेळ एका पिढीने बदलली, आणि चुकीच्या रोगांची मालिका सुरू झाली. असे लक्षात येतेय. म्हणून आपणच जर आपल्या घरातील जेवायची वेळ बदलवायचे सकारात्मक नियोजन केले तर (तथाकथित) पिढीजात आजारापासून आपण आपल्या भविष्याला वाचवू शकतो.
अजूनही वेळ गेलेली नाही.
मी बदललो...
माझे घर बदलले....
असंच प्रत्येकाच्या घरी होत राहिलं तर...
लक्षात येईल.....
मेरा देश बदल रहा है..
सारा देश बदल रहा है......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.03.2017
Copyright © 2025 | Marathisrushti