(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ऐशी

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 37

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग अकरा

    नैवेद्य सेवन करून झाल्यावर हात तोंड धुवुन झाल्यावर आणखी एक अनोखा उपचार केला जातो. तो म्हणजे चंदन लावणे.
    "करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी" असा मंत्र म्हणून देवाच्या हाताला चंदन लावले जाते.

    हे चंदन, चंदन या झाडाच्या खोडापासून उगाळलेलं असावं. चंदनाची पावडर, गोपीचंदन, कुंकू पाण्यात कालवून गंध तयार करणे, अष्टगंध पाण्यात कालवणे, यापेक्षा चंदन उगाळून ते वापरणे हे देवाला आवडते. देवाला म्हणजे आपल्या देहातील अंतःस्थ देवाला !

    जेवढे जास्त उगाळावे तेवढा चंदनाचा सुवास आणि औषधी गुणधर्म बाहेर येत जातात.

    चंदन कपाळाला लावले जाते, ते औषध म्हणून ! अतिशय थंड गुणाच्या या चंदनाची उटी अंगाला लावणे, ही पद्धत दक्षिण भारतात आजही आहे दक्षिण भारतातल्या सर्व देवालयामधून चंदन उगाळणारी खास माणसे असतात आपल्याकडे जसा तीर्थप्रसाद देतात, तसा दक्षिणेकडे उगाळलेले चंदनाची गोळी प्रत्येकाच्या हातावर देतात, ती प्रत्येकाने आपल्या कपाळावर लावावी, असा संकेत आहे. स्त्री आणि पुरूष असा भेद न करता हे चंदन लावले जाते. फक्त महाराष्ट्रात उभा टिळा लावतात, तर दक्षिणेत आडवा. एवढाच फरक. पण चंदन तेच. काम तसेच. औषधी गुण तेच.

    जेवणानंतर हाताला जेवणातील पदार्थांचा वास राहिलेला असतो. किंवा काही तेलकट पदार्थ हाताला चिकटतात. ते निघून जावेत, असं हे कर्मकांड. आजही आपल्याकडे जेवण झाल्यावर पानात राहिलेली लिंबाची फोड अथवा मीठाची चिमूट जेवल्या हाताला चोळून घेतात. ती याचसाठी. लिंबाच्या रसामुळे बोटांना लागलेला रस्सा, भज्यांचे तेल, लोणच्याचा अंश, आदि भोजनांश सहजपणे निघून जावेत. हात स्वच्छ व्हावेत. उगाळलेल्या चंदनाची जागा फक्त ताटातील लिंबाच्या फोडीने घेतली इतकेच ! कालानुरूप फरक पडतो तो हा असा !

    जेवणानंतर हाताला लागलेला मसाला आदि जरी अगदी विषारी नसले तरी दाह करणारे असतात. जसे पाटावरवंट्यावर मिरच्या वाटल्यानंतर बोटांची होणारी आग किंवा दाह केवळ पाण्याने धुऊन जात नाही, त्यासाठी तेल गुळ असे पदार्थ वापरावे लागतात. तसंच जेवणानंतर हाताला जो मसाल्याचा सूक्ष्म अंश असतो, तो जावा, यासाठी हे चंदन लेपन. हे कपाळावर नसून हाताला बोटाला आहे, हे लक्षात घ्यावे.

    जे जे देवासाठी ते ते देहासाठीच असते, हे कधीही विसरून चालणार नाही. त्यातील कर्मकांडे ही मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी असतात. ही शोधण्याची दृष्टी तोच देत असतो, यालाच देवाची कृपा म्हणतात. तोच कर्ता करविता मी निमित्तमात्र !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    30.06.2017

  • किचन क्लिनीक – शेंगभाज्या – घेवडा

    दत्तगुरूंची हि आवडीची भाजी म्हणून हिचा उल्लेख गुरुचरित्रात देखील आढळते.तसेच गुरुचरित्र वाचनाचे उद्यापन करतात तेव्हा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य केला जातो.अशी हि भाजी ब-याच जणांना आवडत असली तरी फारशी खाल्ली जात नाही त्यामुळे थोडी उपेक्षितच म्हणावी लागेल.

    हि भाजी फार चविष्ट लागते.तशी चवीला तुरट गोड व थंड असून हि शरीरात वात दोष वाढविते व कफ व पित्त दोष कमी करते.

    चला हिचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)घसा बसणे कोरडा खोकला ह्यात घेवड्याच्या शेंगांचा रस मध व ज्येष्ठमध घालून प्यायला द्यावा.

    २)घेवड्याच्या शेंगांचे सूप करून सर्दी,घसादुखणे अशा तक्रारींमध्ये मिरपुड घालून प्यावा फायदा होतो.

    ३)आजारपणातुन उठल्यावर तोंडाला रुची नसल्यास घेवड्याची भाजी फुल्क्यांसह खावी.

    ४)पायदुखणे,गुडघे दुखी,पाय मुरगळणे ह्यात घेवड्याचा पाला व सुंठ एकत्र वाटून गरम करून लेप लावावा.

    घेवडा अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटफुगते व गॅसेसचा त्रास होतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग १०

    नैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय.
    छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ? वेळच नाही हो.
    आम्ही घरीच येतो आठ वाजता

  • आजचा आरोग्य विचार – भाग दोन

    हल्ली लवकर उठणे विसरायलाच झालं आहे. लवकर उठून करायचंय तरी काय, हे विचारणारी नवीन पिढी ! त्या पिढीला शिकवण्यासाठीच दीपावलीसारखा सण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिला. अभ्यंग स्नान कसे करावे हे आम्हाला शिकवले.

  • आहारातील बदल भाग ६२-चवदार आहार -भाग २४

    कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे पराठे, शेवग्याच्या पाल्याची भाजी. याचा अर्थ हे पदार्थ मधुमेहाचे शत्रू आहेत का ? हो. नक्कीच. फक्त प्रमाण लक्षात ठेवावे. पानाच्या डाव्या बाजूला !

    मधुमेहाचा शत्रू म्हणजे कडू चव असे का म्हटले जाते ? मधुमेहात शरीराला चिकटण्याचा गुणधर्म वाढतो. मग तो, क्लेद असेल नाहीतर मेद असेल, रस धातू असेल नाहीतर स्तन्य असेल. हे दोष विशेष शरीरातील स्रोतसांना चिकटून राहिले तरच दुष्टी निर्माण होते.
    कडू चवीच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमध्ये खर म्हणजे खरखरीतपणा, दोन पेशींना एकमेकांपासून वेगळे करण्याचा गुण, याला शास्त्रकार विशद असे म्हणतात. आणि रूक्ष म्हणजे कोरडेपणा हे महत्वाचे गुण असतात.

    मधुमेहामधे नेमके यांच्या विरूद्ध गुण शरीरात वाढलेले असतात, त्यामुळे गुणविपरीत औषध म्हणून कडू चवीची औषधे मधुमेहावर छान गुण दाखवतात.

    मधुमेहाशिवाय वाढलेली ढेरी कमी करणे, किंवा शरीराचा कोणताही भाग फाजीलपणे वाढणे, गळ्याच्या गाठी वाढणे, गर्भाशयात फायब्राॅईडची गाठ वाढणे,शरीरात आत बाहेर कुठेही अमर्याद स्वरूपात वाढणारी कर्करोगाची गाठ, डोळ्यांचे आजार, सांध्यांना येणारी सूज, रक्तातील चिकटपणा वाढल्यामुळे रिपोर्टमधे दिसणारे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड, वगैरे पॅथालाॅजिकलल आजारदेखील या कडू चवीने कमी होतात. आमामुळे पोट गप्प होणे, बरेच दिवसांच्या बऱ्या न होणाऱ्या जखमा, ती अगदी साधी सर्दी देखील कडू चवीने कमी करता येते.

    तापावर हटकून उपयोगी पडते ती कडू चव ! म्हणून तापाची कारणे शोधता न आल्यास, कडू चवीची औषधे वापरली की ताप जातो. जसे महासुदर्शन काढा.

    औषध कोणतेही असूदेत, ताप उतरला पाहिजे. एवढेच रूग्णाला अपेक्षित असते. मग ते कडू चवीचे महासुदर्शन चूर्ण असू देत नाहीतर, कडू चवीची पॅरासिटेमोलची कडू जार गोळी. कडू म्हणजे ताप उतरवणारे हे साधे सोपे समीकरण आहे.

    पुस्तकात लिहिलं नसलं तरी या कडू चवीचा अतिरेकी परिणाम म्हणून वात आणि पित्त हे वाढतेच, हे आपण व्यवहारात बघतोच! हातच्या ( दिसणाऱ्या) वातपित्ताला ग्रंथाधार कशाला ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    24.11.2016

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – शेपू

    शेपूची भाजी हि ब-याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणा-या विशिष्ट गंधामुळे ती ब-याच लोकांना आवडत नाही.(मला देखील आवडत नाही). हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या बाळऔषधांत वापरतात.

    हिचे झाड तीन फूट उंचीचे असते.हि भाजी चवीला गोड व उष्ण असते हि शरीरातील कफ व वात दोष कमी करते.भाजी म्हणून जरी हि तेवढी चांगली लागत नसली तरी हिचे देखील बरेच औषधी उपयोग आहेत बरे का!

    चला मग शेपूचे औषधी उपयोग पहायचे ना!

    १)जखमेवर हिच्या पाल्याची चटणी वाटून लेप करावा.

    २)तोंडास रूची नसणे,जीभ जाड होणे,तोंडाला दुर्गंध येणे अशा तक्रारींमध्ये शेपूचा कोवळा पाला व आल्याचा एक तुकडा चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावी.

    ३)लहान मुलांना शेपूची ताजी पाने एक कपभर पाण्यात उकळावे व पाव कप पाणी शिल्लक ठेवावे व हे पाणी प्रत्येक दुग्धपानापुर्वी १-१ चमचा द्यावे त्यामुळे बाळाचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते.

    ४)शेपूची पाने घालून तीळाचे तेल उकडून ते गाळावे हे तेल मार लागणे,मुरगळणे,संधिवात ह्यांच्या वेदनांमध्ये लावल्यास उत्तम.

    ५)बाळंतीणीस रक्तस्राव कमी होण्यास व दुधभरपूर येण्यास शेपूची भाजी देतात.
    हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पित्त वाढते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहाररहस्य १३

    लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो,
    हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ?
    याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ?
    मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ?
    एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत.
    एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ?
    मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये.

  • प्रमुख आहारसूत्र – भाग ११

    आयुष्यभर औषधे घ्यावी लागू नयेत, असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी जे करावं लागतं ते करायची तयारी मात्र नसते.

    आणि असा समज करून दिला जातो, की एकदा डायबेटीस झाला की कायमचा चिकटला. ही निराशा मनातून काढून टाकली पाहिजे. हा आजार जर मनोशारिरीक असेल तर औषध फक्त शरीरात जाऊन काय करणार ? जर रोगाचे एक मूळ मनात असेल तर तिथपर्यंत पोचायला नको का ?
    मन कुठे आहे ते अजून माॅडर्न (?) मेडीसीनला समजलेलंच नाही. मन ह्रदयात आहे. आणि आज शोधलं जातंय मेंदूमधे. कसं सापडणार ?
    जाऊदे !

    प्रमेह होण्याचं मुख्य कारण दूध, दही, पाणी, अति, गोड, कफ वाढवणारे पदार्थ खाणे, हे तर आहेच पण यापेक्षादेखील खाल्लेलं पचवता न येणं किंवा पचवण्यासाठी काहीही कष्ट न करणे हे प्रमुख कारण आहे. मेहनत करा. म्हणजे मेह म्हणजे प्रमेह म्हणजे मधुमेह नत म्हणजे नाहीसा होईल.

    प्रमेह वाढण्याचं मुख्य कारण बदललेली जीवनशैली आहे. बैठे काम वाढलंय, सुखाचा अतिरेक झालाय. आम्ही खातोय खूप. खाऊन खाऊनच अशक्तपणा येतोय. मग पचवणार कधी ? त्यात कफ वाढवणारे सर्व पदार्थ निसर्गनियमाने मधुर रसाचे आणि पचायला जड असणारेच असतात.

    आमची वृत्तीच अशी झालीय की, आता दूध बंद करायचं, मग अशक्तपणा येणार, त्यासाठी परत टाॅनिक घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण असा विचार करू लागलोय, की अमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय माझं रक्त वाढणारच नाहीये, तमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय प्रोटीन्स मिळणारच नाहीत. कॅल्शियमसाठी हे खाल्लंच पाहिजे. ह्रदयासाठी हे, किडनीसाठी ते. असा विचार करणं योग्य नाही.

    शरीराचे तुकडे करून तपासणारी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत असल्यावर प्रश्न पडतो. संपूर्ण शरीराचा, मन आत्मा, इंद्रियासह विचार कोण डाॅक्टर किंवा वैद्य कधी करणार ? पायाला काटा लागल्यावर डोळ्यातून पाणी येणारं आपलं शरीर, प्रत्येक डाॅक्टरनी शरीर असं काही वाटून घेतलं आहे की, काही वर्षांनी वरच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा आणि खालच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा शोधावा लागेल. उजवा डोळा एक जण तपासेल, तर डावा डोळा दुसराच !
    जोक अपार्ट. चिकित्सा करताना संपूर्ण शरीराचा विचार करावा, असं आयुर्वेद मानतो.

    एवढे व्हिटॅमिन्स हवेतच, एवढे कॅल्शियम हवेच, हे नियम बनवले की कायदे आले. कायदा बनला की, पुरावे आले. पुरावे दाखवायची वेळ आली तर मन कसं दाखवणार ? आणि इंद्रियांचं काय करणार ? मग त्याला कोण विचारणार ? त्याला म्हणजे आत्म्याला !

    आयुर्वेद शास्त्र शरीराचे असे तुकडे पाडून विचार करतच नाही. अखंड शरीर, मन, इंद्रिय आणि आत्म्यासह चिकित्सा करण्यासाठी घ्यावे, असे शास्त्रकार म्हणतात.

    ही प्राथमिक माहिती समजल्याशिवाय प्रमेहाविषयी आयुर्वेदात सांगितलेली सूत्रे नीट लक्षात येणार नाहीत, म्हणून हे आधी आणि परत परत सांगावे लागत आहे. कारण आज आरोग्य हे चौकटीतल्या नियमांना बांधले गेले आहे. रक्तदाब एवढाच पाहिजे. रक्तातील साखर एवढीच हवी. वजन एवढेच हवे, कॅल्शियम एवढे हवेच ! कमी पडत असेल तर सरळ लेबल चिकटवले जाते, तू रोगी !
    ....... आणि आयुर्वेद म्हणतो.....
    ........ इथे प्रत्येकाचे नियम वेगळे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.01.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग पंधरा

    ऊसाची कांडे चरख्यात घालून रस काढताना त्यात आले आणि लिंबू घालतात. रसातील कफ दोष जाण्यासाठी आले आणि चव येण्यासाठी लिंबू. रस काढत असतानाच हे आल्या लिंबाचे तुकडे त्या चरख्यात घातले जातात. पिळ पिळ पिळल्यानंतर त्यातील रस एका ठिकाणी जमा होतो आणि चोथाचिपाड दुसऱ्या ठिकाणी. एक भाग चांगला एक वाईट. सार आणि किट्ट.

    तसेच अन्नरस तयार झाला की, त्यातून दोन घटक बनवले जातात. एक चांगला सार भाग दुसरा टाकावू किट्ट भाग. सार भागापासून सात धातुंची निर्मिती केली जाते. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे ते सात धातु. (धातु म्हणजे धातु, मेटल नव्हे.) आणि किट्ट भागापासून मल, मूत्र आणि स्वेद निर्माण होतात. या निर्माण कार्यात सात धातुंचे सात अग्नि, पंचमहाभूतांचे पाच अग्नि आणि मुख्य जाठराग्नि असे एकुण तेरा प्रकारचे अग्नि भाग घेतात. सार भागापासून उत्तम धातु निर्माण कसे केले जाते याचे वर्णन गेल्या वर्षीच्या आरोग्यटीपेमधील अन्नपचन या मालिकेमधे केलेले आहे.

    टाकावू भाग जर योग्य वेळी, योग्य मार्गाने शरीराबाहेर टाकला गेला नाही, तर चांगला सार भाग कितीही उत्तम रीत्या तयार झालेला असला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. जसे उसाचा रस काढला जात असताना त्यातील कचरा रसात येऊ नये म्हणून रस दोन वेळा गाळून कचरा वेगळा केला जातो. ऊसाच्या रसापासून गुळ करताना देखील वारंवार त्यातील मळी वेगळी केली जाते, तरच उत्तम प्रतीचा गुळ तयार होतो. म्हणजे कचरा साफ करणारी यंत्रणा देखील तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे.

    तसेच अन्नरसातील कचरा, विषारी पदार्थ वेगळे करणारी यंत्रणादेखील शरीरात काम करत असते. यामधे यकृत, वृक्क हे प्रमुख अवयव आहेत. अन्नरसाचे रूपांतर शुक्रापर्यत करीत असताना वेळोवेळी त्यातील टाकावू भाग वेगळा केला जातो. योग्य त्या मलमार्गामधे ( वेशीवर ) आणून ठेवला जातो. घन भाग गुदमार्गाने, आणि द्रव भाग मूत्र आणि स्वेद (म्हणजे घाम ) मार्गाने बाहेर काढला जातो. हिवाळा पावसाळ्यात ऋतु बदलला की, लघवी जास्ती होते आणि उन्हाळ्यात घाम जास्ती येतो. हे बाहेरील ऋतु ओळखून तसे बदल आतमधे करवणारा तो सिंपली ग्रेट !

    गावातील गटारे, कचऱ्याच्या कुंड्या, रस्त्यावरील घाण, जर योग्य वेळेला साफ केले गेले नाहीत, तर केव्हाही, साथीचे आजार वेशीवर, घुसखोरीच्या संधीची वाट बघत बसलेलेच असतात. म्हणून ही स्वच्छ भारत यंत्रणा पुनः एकदा नीट लक्ष देऊन कार्यरत करण्यासाठी आपण सगळे झटत आहोत.

    जसे देशासाठी, तसेच देहासाठी सुद्धा जागरूक राहीले पाहिजे. जर देशातील आणि देहातील हा कचरा योग्य वेळी, योग्य यंत्रणामार्फत, सदैव जागरूक राहून, देहाबाहेर बाहेर काढला गेला नाही, तर वेशीवरचे राक्षस आत आलेच म्हणून समजा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    30.03.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेवीस

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    अंथरूणातून सूर्य बघू नये
    अर्थ सरळच आहे. सूर्योदयानंतर अंथरुणात राहू नये. म्हणजेच ग्रंथात सांगितलेला नियम ब्राह्म मुहूर्तावर उठावे. "लवकर निजे लवकर उठे, त्यास धन आरोग्य संपदा मिळे" असं एक सुभाषित शाळेतील लाकडी खांबावर लिहिलेले आठवते.

    पण आता जमाना बदल गया है.
    आता आम्ही फार उशीर करत नाही, बारा साडेबाराला झोपतो. (झोपतो म्हणजे बाकीच्यासाठी ! डोक्यावरून पांघरूण घेऊन आत माझ्यासकट वाॅटसप जागा असतो. जास्त नाही दीड दोन वाजताच झोपतो. )

    लवकर उठायला ज्यांना जमत नाही, त्यांचे पचन बिघडते. लवकर झोपणे होत नाही, याची अनेक कारणे असतील. पण लवकर उठणे होत नाही याला कोणताही युक्तीवाद नको. किमान सहा साडे सहाला उठलेच पाहिजे. रात्रीच्या जागरणाचे संयुक्तिक कारण असेल तर ती झोप दुपारी घ्यावी. पण जेवणानंतर नको. त्याने पुनः आम निर्माण होणार. इथे युक्ती वापरावी. दुपारची झोप आधी घ्यावी आणि उठून नंतर जेवावे. म्हणजे कफ प्रकोप होणार नाही. अर्थात ही पळवाट आहे. नियमाला पळवाट असावी पण पळवाट हा नियम बनू नये.

    एवढ्या लवकर उठून करायचे काय, असाही प्रश्न काही जणांना पडेल. काही जण म्हणतील, आम्हाला जाग येते पण उठवत नाही. उठलो तरी ताकद असत नाही. उठायचं असतं, पण पाय दुखतात, पायाची टाच दुखते, गुडघे दुखतात, लवकर उठले तर म्हणे पित्त वाढते, चक्कर येते, डोके दुखते इ. इ. अनेक तक्रारी सक्काळी सकाळी सुरू होतात. या सर्व तक्रारींवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे रात्रीचे जेवण सायंकाळी सातला संपलेच पाहिजे. अन्यथा जेवूच नये. जेवण नाहीतर फळ, ज्युस वगैरे वगैरे. नाही चालणार. पोट हलके सैल, रिकामे करूनच तर झोपायचे आहे.

    आणि समजा उशीरा झोपणे झाले आणि सकाळी जाग आली तरी
    गादीवर जास्त लोळू नये
    असे आई सांगते.

    मस्त बेड टी प्यावा, बायकोने हातात टीव्ही चा रिमोट आणून द्यावा, तिथूनच योगाचे चॅनेल सुरू करावे. आणि चकली वेफर्स खात खात योगा करणाऱ्यांना बघण्याचा व्यायाम करावा. नाहीतर साखरझोप अनुभवावी, पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात, म्हणून आपल्याला हवी तशी सुंदर सुंदर स्वप्ने पहावीत. आणि कानावर गोड हाक यावी,
    "मोऽहऽअऽन्ऽ", जागो प्यारेऽऽऽऽऽ"
    डोळे उघडून पहावे तर नेहेमीचीच......

    सकाळी लवकर उठावे, आह्निक उरकावे, जमल्यास स्नानसंध्या करावी. ज्ञानमार्गाने जाणारे असू तर काहीबाही वाचन करावे, भले ते ज्ञान दै. लोकसत्ता, मटा किंवा वाॅटसप महाराजांकडून आलेले का असेना !
    काही लेखन करावे. वाॅटसप वर लेखन करावे.ट्विटरवर टिवटिव करावी. मराठी इंग्लिश अथवा हिंग्लीश भाषा वापरावी. फेसबुकवरील असंख्य मित्रांना तत्वज्ञानाचे डोस पाजावेत. (आपण कोरडे पाषाण रहावे.)

    ज्ञान ग्रहणाची आवड नसेल तर कोणतेही आवडीचे काम करावे. बागेत जावे, व्यायम करावा, जेवण बनवावे, टीव्ही मात्र पाहू नये.

    कर्ममार्ग पण नको असेल तर सरळ साध्या सोप्या भक्तीमार्गाने जावे. देवळात जावे, तुळशीला, वडा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. घरातच राहायचे असेल तर लोटांगणे घालावीत, नाहीतर खुर्चीवर बसून नामस्मरण करीत राहावे, पण झोपून राहू नये. हे झोपणे मधुमेहाकडे नेणारे आहे. हे पक्के लक्षात ठेवावे. ( मी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत जागा असतो, पण सकाळी सहा साडेसहाला नक्कीच उठतो. आणि रात्रीचे जागरण झाले तरी आम निर्माण होतच नाही, कारण माझे रात्रीचे भोजन सायंकाळी आटपलेले असते. )

    आई जे सांगते त्यामधे काहीतरी अर्थ नक्कीच दडलेला असतो, कारण अनुभवाचे चार पावसाळे तिने जास्ती पाहिलेले असतात. भले त्यामागील शास्त्र, विज्ञान तिला माहिती नसेल. कारण तिला तिच्या आईने तसेच सांगितले होते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.