(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग दहा

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6

    एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
    माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात....... इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.

    .......रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, "हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्." असं म्हणून टेबलावर आपटतात.

    एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
    असो.

    .......तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, "बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! "
    नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, "मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !" त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?

    संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, "काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? " मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
    ती तोंड एवढंस करत म्हणाली, " कशातच दोष मिळाला नाही."
    "बरं झालं ना मग."
    "एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?" आता मात्र मला हसू आले, "अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? "
    म्हणाली,
    "मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?"

    बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.

    आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
    औषधे कोणाला द्यायची ?
    जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????

    शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
    Please correlate clinically.
    कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
    म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.

    म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !

    सुटले कोडे मिळाले उत्तर!
    आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.02.2017

  • मॅमोग्राफी

    मॅमोग्राफी

    मॅमोग्राफीमध्ये दोन्ही स्तनांचा दोन अॅंगल्समध्ये फोटो घेतला जातो. हा अतिशय स्पष्ट व अतिसूक्ष्म एक्स-रेच असतो व या मशिनची ट्यूब स्पेशल असल्याने क्ष-किरणांची मारक शक्ती कमीत कमी केलेली असते. त्यामुळे दरवर्षी मॅमोग्राफी केली तरीही काहीही धोका नाही.

  • याला जीवन ऐसे नाव भाग २५

    पाणी शुद्धीकरण भाग पाच

    पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.

    त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
    एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.

    याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.

    हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
    काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.

    पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
    आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.

    पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.

    केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.

    एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.

    नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    01.01.2017

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग ३

    दुसऱ्याच्या ताटात बघण्याअगोदर स्वतःचे ताट बघावे, या अर्थाची एक म्हण आहे.

    म्हणजे दुसरा काय करतोय, कसं करतोय, कशासाठी करतोय, हे पहाण्यापेक्षा मला कशाची गरज आहे ते पहावे, म्हणजे जीवनातील बहुतेक सर्व दुःखे नाहिशी होतील असे वाटते.
    अगदी तिच गोष्ट जेवणाची सुद्धा !

    दुसरा काय खातोय, कशासाठी खातोय, का खातोय, हे खरंतर बघूच नये.
    कदाचित म्हणूनच माझी आजी मला लहानपणी ओरडायची,
    "जेवताना दुसऱ्याच्या पानात लक्ष घालू नको, तो किती आणि काय खातोय यावर तुझं पोट भरणार आहे का ? तुला काय हवंय ते तू ( जे समोर आहे त्यातून ) घे."
    खरं होतं तिचं. प्रत्येकाची गरज वेगळी, प्रत्येकाचे समाधान वेगळेच असते.

    तसं गटामधे एका विचाराची माणसं कुठे भेटतात ? आणि कितीवेळा सांगूनही अॅडमिनचं कुठं ऐकतात. ? आपण सांगतोय तेच बरोबर, तुम्ही पण तस्सच वागलं पाहिजे असा हट्ट पण प्रत्येकाचा असतो. असो !

    माझी गरज काय आहे, माझी पचनशक्ती कशी आहे, मला काय केलं की बरं वाटतंय, माझ्यासाठी काय योग्य आहे, हे मला दुसऱ्या कुणी सांगण्याची गरज नसते. मी काय जेवायचे, हे घरातले, समोरचे उपलब्ध पदार्थ ठरवतात. माझा चाॅईस एवढाच मर्यादित ठेवायचा. त्यातीलच एक दोन अथवा सर्व पदार्थ निवडायचं स्वातंत्र्य मला आहे. हा नियम पाळला की अन्नपचन सोपे होते.

    माणूस म्हणून जन्माला आलो तर माणूस म्हणून जगले पाहिजे एवढी माफक अपेक्षा स्वतःकडून ठेवायची. माणसासाठी जे नियम " त्याने" ठरवून दिले आहेत, ते आत्मसात करून घ्यायचे. आणि मस्त जगायचं.

    कोणत्या तरी पुस्तकात वाचलं म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, मला वाटतं म्हणून, मी मांसाहारी पदार्थ खाणार हे म्हणजे पोटावर केलेले अत्याचारच आहेत. त्याचे परिणाम आज नाही तर उद्या भोगावेच लागणार, जर आपल्याला शंभर वर्षे निरोगी आणि औषधांशिवाय जगायचं असेल तर !!

    मी शाकाहारी मांसाहारी यापैकी काय जेवावे ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपलं पोट भरण्यासाठी, दुसरे अन्य पुरेसे सक्षम पर्याय उपलब्ध असताना, दुसऱ्याचा जीव घेणे ही कल्पनाच थोडी विचित्र वाटते.
    मग अंडी शाकाहारी की मांसाहारी, दूध शाकाहारी की मांसाहारी, जीव तर पाण्यातही असतात. या सर्व गोष्टी गौण ठरतात.

    मॅन व्हर्सेस वाईल्ड नावाचा एक डिस्कव्हरी शो आहे. त्यातील एॅकर काहीही चित्रविचित्र, रानटी पद्धतीने खाताना दाखवतात. ती क्रूरताच आहे. तो हे पण सांगतोय,
    "अश्या अत्यंत वाईट आणि अन अॅव्हाॅईडेबल कंडीशनमध्ये जर जगायचे ठरवले तर काय फंडे वापरायचे, याचं हे प्रात्यक्षिक मी करून दाखवत आहे. असं खाणं, डे टू डे साठी योग्य नाही."

    आपण स्वतःला सोयीस्कर अर्थ काढणारी माणसं. मग जगण्यासाठी मांसाहार किती आवश्यक आहे हे प्रोटीन्सच्या चार्टवरून पटवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. दोन चार वेगवेगळ्या पुस्तकातील संदर्भ बघीतले की, पुस्तकंपण सोयीस्कर बोलतात, असं लक्षात येतं.

    प्राणी म्हणून जन्माला आलो. समाजाकडून माणूस म्हणून घडवले गेलो. काही कारणाने माणुसपण विसरलो. आचार विचाराने मांसाहारी झालो. आता परत सुलट्या दिशेने प्रवास सुरू करूया. जे मांसाहारी आहेत, त्यांनी शाकाहारी व्हावे, जे शाकाहारी आहेत, त्यांनी फ्रूगीव्होरस म्हणजे माणूस नावाचा प्राणी होण्याचा प्रयत्न करावा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    3.10.2016

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – पुदीना

    पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात.

    ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप असते.ह्याची पाने आपण स्वयंपाकात वापरतो.ह्या पानांना एक छान ताक्ष्ण सुगंध येतो.

    पुदीना हा चवीला तिखट व उष्ण असतो आणी तो शरीरातील वात व कफ दोष कमी करतो.ह्याचा वापर जसा स्वयंपाकामध्ये होतो तसाच तो घरगुती उपचारात देखील केला जातो.

    चला तर पाहूयात ह्याचे औषधी उपयोग:

    १)वेदना असलेल्या भागावर पुदिन्याची चटणी वाटून तिचा लेप लावावा.

    २)नैसर्गिक माऊथवाॅश होय,पुदिन्याचा २ चमचे रस ग्लास भर कोमट पाण्यात घालून गुळण्या करा म्हणजे मुखदुर्गंधी कमी होते.

    ३)भुक न लागणे,तोंडास रूची नसणे,ह्यात पुदिन्याची चटणी खायला द्यावी.

    ४)त्वचेवर नायटा झालं असल्यास त्या जागी पुदिन्याच्या पानांचारस लावावा.

    ५)पोटदूखीमध्ये १ चमचा पुदीना रस+ १ चमचा आल्याचा रस+ १/४ चमचे सैन्धव घालून हे मिश्रण घ्यावे.

    ह्याचे जास्त सेवन केल्यास एॅसीडीटी होऊ शकते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३

    निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.

    माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.

    हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.

    त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.

    हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
    कसा कळणार ?
    मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
    आपुला संवाद आपणासी.....
    अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.

    पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती - समाधान.
    म्हणजेच तृष्णा आणि तृप्तीच्यामध्ये तो आहे.
    त्याला विसरून कसे चालेल ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    10.12.2016

  • आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग चार

    महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि स्वतःची साधना वाढवली.

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकवीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सत्तावीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकवीस

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    कुणाचे वर्म काढू नये
    कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये.

    बऱ्याच वेळा माणसे दुखावली जातात, ती चुकीचे शब्द, चुकीच्या पद्धतीने उच्चारल्यामुळे. वर्म काढू नये म्हणजे अपमान होईल असे बोलू नये. परिस्थिती कोणावर कशी येईल, रावाचा रंक कधी होईल ते कधीच सांगता येत नाही. आंधळेपणा, पांगळेपणा ह्या वर्मावर बोट ठेवून कधी कोणाला दोष देऊ नये. हेच आई शिकवित असते. बाबा पण कधीतरी ओरडत असतात.

    पण काहीही म्हणा हं आईचं शिकवणं आणि बाबांचं शिकवणं यात फरक असतोच. अगदी नव्वद टक्के मुलं सांगतील, आई शिकवित होती तेच बरं होतं. फक्त ओरडाच खायला लागायचा, मार तर नाही.

    वर्म काढू नये. घालून पाडून बोलू नये. भांडणाची पण एक शैली असते. त्या शैलीतच भांडता आलं पाहिजे. अहो, हल्ली मुलांना नीट भांडतासुद्धा येत नाही. त्या वाॅटसप मुळे भांडण होतात, ती सुद्धा ऑनलाईनच ! समोरासमोर.

    भांडायला शब्द सुचावे लागतात. आणि शब्द सुचले नाही की थेट हल्लाबोलच.
    आणि भांडायचं असतं ते मातृभाषेत. आणि शिक्षण होतं पूतना मावशीच्या भाषेत ! त्यामुळे भांडायला जे इरसाल शब्द भांडार लागतं, ते असतं मातृभाषेत! म्हणून तरी मातृभाषेत शिका !

    बोलताना जशी भाषा समृद्धता असणं आवश्यक आहे, तशी भांडताना सुद्धा ही भाषा समृद्धता दिसणं आवश्यक आहे.
    तुटे वाद संवाद तो हितकारी असे समर्थांचे बोल आहेत.

    संवादाचे रुपांतर विवादात होऊ नये, यासाठी हितकर असणारे शब्द योजावे लागतात. अर्थात शहाण्याला शब्दांचा मार, बाकीच्यांची पूजा कशानी करायची ते, आपल्या मराठी वाड़मयात तेपण सांगितलेले आहे.

    वर्म म्हणजे दुर्गुण, कमीपणा. कुणाचा दुर्गुण कुणाला सांगू नये, कारण त्यावरून आपलीच परीक्षा होत असते. आपले दुर्गण शोधावे आणि इतरातील सद्गुण.

    हे उपदेशात्मक लिखाण फार गांधीगिरीचे वाटत नाही ना ?

    वर्म म्हणजे वेदनेचे ठिकाण. नेमके इथे बोट ठेवले तर दुखणारच ना ! पण जिथे पूय साठून साठून जमा झालेला असतो, तिथे वेदना निर्माण होणारच ना. ? असणारच. आणि जिथे जिथे पूयसंचिती तिथून तो बाहेर काढावा, असे वैद्यक शास्त्र सांगते. जखमेतील वेदना कमी होण्यासाठी काहीवेळा ऑपरेशन करावेच लागते, मग ती जखम प्रत्यक्षात शरीरावरील असो, वा मनावर आघात करणारी. हेपण आईकडूनच शिकायचे असते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 19

    गणपती बाप्पाचा सकाळच्या महापूजेचा नैवेद्य पंचपक्वान्नाचे भरलेले ताट असते. पण सायंपूजेचा नैवेद्य काय असतो ? तर वाटीभर पंचखाद्य किंवा एखादा लाडू.
    कशासाठी ?
    जे जे देवासाठी, ते ते देहासाठी. या न्यायाने देवाच्या भोजनाचा नियम आपल्यालादेखील तसाच लागू होतो. सकाळचे भोजन आणि सायंकाळचे भोजन याच प्रमाणात घ्यावे, असे आपली संस्कृती पण सुचवते.

    कमळ कधी उमलते ?
    कमळ कधी मावळते ?
    सूर्योदय झाला की उमलते, आणि सूर्यास्त झाला की मावळते. सूर्यफुलाचे नावच मुळी सूर्यावरून ठेवले आहे. त्यांच्याकडे कोणतेही घड्याळ नाही, तरीदेखील त्याला बरोबर कळते, दिवस आणि रात्र. कधी कसे वागायचे, कधी कसे फुलायचे, कधी कसे वळायचे ते !

    सूर्योदयाला सुरू झालेला आपला दिवस सूर्यास्ताला संपतो. (निशाचर प्राणी अपवाद आहेत.)

    मनुस्मृतिमधील निद्रा प्रकरणामधे देखील "सूर्यामुळे दिवस होतो आणि सूर्यामुळे रात्रही होते, असे सांगितलेले आहे. रात्र ही झोपण्यासाठी, विश्रांतिसाठी. तर दिवस हा दैनंदिन कामे करण्यासाठी आहे.
    केवळ आपली पृथ्वीच नव्हे तर सर्व ग्रह देखील सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. सूर्यापासूनच शक्ती, उर्जा मिळवित असतात. सूर्याच्या अस्तित्वामुळेच आपले अस्तित्व आहे, याचे ज्ञान आमच्या ऋषीमुनीना होते. आणि ते त्यांनी लिहूनदेखील ठेवले आहे.

    सगुणरूपातील एकमेव देवता म्हणजे सूर्य. रामदास स्वामीनी सर्व तरूणांना सूर्यनमस्काराचे, व्यायामाचे महत्व पटवून दिलेलेच होते.ते स्वतः दररोज शेकडो समंत्र सूर्यनमस्कार घालीत असत.

    भोजनाच्या संदर्भात आणखी एक श्लोकात सांगितले आहे,
    सायंकृते प्रभाते जीर्यती,
    प्रभातकृते सायं जीर्यती.
    सकाळी जेवलेले अन्न सायंकाळी पचते, तर सायंकाळी घेतलेले अन्न सकाळी पचते.
    सायंकाळी आणि सकाळी असेच शब्द या श्लोकामधे आहेत. दुपार आणि माध्यान्ह असे शब्द नाहीत. याचा अर्थ जेवायचे कधी तर सकाळी आणि सायंकाळी.

    काही जण म्हणतील, या जेवायच्या वेळा त्याकाळात ठीक होत्या. आजच्या काळात त्या सुसंगत नाहीत. काळ बदलला आहे, त्यानुसार आपण बदलायला नको का ?

    ज्या ठिकाणी सूर्य सहा सहा महिन्यात दिसतंच नाही, अशा ठिकाणी रहाणाऱ्या लोकांनी कोणता नियम पाळायचा ?
    जिथे सूर्य नाहीच दिसत त्याठिकाणी अन्य नियम वापरू शकतो. पण जिथे सूर्य दिसतोय तिथे तर या जेवणाच्या वेळा पाळायला सुरवात करूया. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आम्ही पहिल्यांदा शंका घेणार. "कसं शक्य होणार ? हे असं लवकर जेवणं जमणारच नाही." सुरवातीलाच नकारघंटा वाजवली की पुढे सगळं चुकतंच जात ना. मग काही करावसं वाटत नाही.

    या वेळा पाळणे तर्कसंगत नाही, व्यवहार्य नाहीत. हे एकवेळ मान्य करूया. पण पचन होण्यासाठी लागणारी उर्जा कुठुन आणणार ?

    विज्ञानाने बाकी सगळी सोंग आणता येतील पण सूर्याचा प्रकाश आणि त्याची शक्ती तर आणू शकणार नाही ना. शेवटी कुठेतरी निसर्गाला शरण जायलाच हवं ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.03.2017

  • दवणा / दमनक

    ह्याचे उपयुक्तांग पंचांग व क्षार असून हे चवीला कडू,तुरट व उष्ण गुणाचे व हल्के रूक्ष तीक्ष्ण असते.हा त्रिदोषशामक असून प्रामुख्याने कफवातनाशक आहे.