(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सहासष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 22-धूपं समर्पयामी-भाग तीन

    दृष्ट काढणे ज्यांना अगदीच गावंढळ आणि कालबाह्य वाटत असेल त्यांच्यासाठी आणखी एक शास्त्रोक्त पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे अग्निहोत्र. वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या या यज्ञ चिकित्सेने फक्त भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा प्रचंड मोठे मानाचे स्थान मिळवलेले आहे. काही देशातील कायदे देखील या यज्ञासाठी पालटण्यात आलेले आहेत. एक भारतीय म्हणून अभिमान वाटावा अशी ही अग्निहोत्र चिकित्सा.

    अग्निहोत्र हा अगदी साधा सोपा विधी आहे. घरी, शेतावर, कार्यालयात, गाडीमध्ये अगदी 10 मिनिटात करता येतो. फक्त अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळा पाळायच्या असतात. त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत. यावर पुणे विद्यापीठामधे प्रबंध पण सादर झालेला आहे. आणि गंमत म्हणजे हा प्रबंध सादर केलाय ऑस्ट्रीया येथील एका अभ्यासकाने !

    अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे अथवा मातीचे पिरॅमिडच्या आकाराचे हवन पात्र.
    २. गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप २-३ चमचे.
    ३. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ४-५ तुकडे.
    ४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे म्हणजे अक्षता. ४-५ ग्रॅम. सूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून, त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेल्या अक्षता खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात.
    सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम् न मम ||
    प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम् न मम ||
    प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम ||
    इदम् न मम म्हणजे हे माझे नाही याची मला पूर्ण खात्री आहे. हे तुझे तुलाच अर्पण. हा भाव मनात ठेवणे म्हणजे इदम् न मम ।

    हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे. येत असलेल्या ज्वाळा आणि धूर याकडे शांत बसून ध्यान केल्यास खूप शांतीचा अनुभव येतो.

    हा निर्माण होणारा धूर अनेक रोगावरील औषध आहे. एन्फ्लुएन्झा, काॅलरा, टीबी, इ. रोगांचे जंतु या धुराने मरतात, असे (परदेशातील सुद्धा ) प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहे. अग्निहोत्राच्या राखेचे पाणी देखील अम्लपित्त, ग्रहणी, उष्णतेचे आजार, पचन विकृती आमि अनेक मानसिक आजारांवर अतिशय प्रभावी परिणाम दाखवतात.

    काळानुसार आपण बदलले पाहिजे, या तत्वानुसार मोठ्या यज्ञांपेक्षा हे छोटे अग्निहोत्र घरच्या घरी दररोज केले तर अधिक फायदा होतो.

    शेतीसाठी देखील हा धूर किटकनाशक म्हणून सिद्ध झालेला आहे. अनेक देशामधे आज अग्निहोत्र शेती सुरू आहे.

    अग्निहोत्रासाठी ज्या गोवऱ्या लागतात, त्या भारतीय गो वंशाच्याच लागतात. पाश्चात्य गोवंशामध्ये औषधी गुण नाहीत हे पण यापूर्वी अनेक वेळा सिद्ध झालेले आहे.

    म्हणजे घर निर्जंतुक होण्यासाठी धूर तयार व्हायला हवा, तो औषधी हवा, त्याठी अग्निहोत्र करायला हवे. अग्निहोत्रासाठी गोवऱ्या हव्यात. त्यासाठी शेण हवे, त्यासाठी गाय हवी, ती भारतीय वंशाचीच हवी. म्हणजे तिची जोपासना व्हायला हवी. ही एक साखळी आहे. आरोग्य मिळवण्यासाठी ही साखळी पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजेच पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी "भारतीयत्व" हा एक महत्त्वाचा दुवा आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    15.06.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तेवीस

    लंबी सफर का घोडा

    शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्थूल आणि सूक्ष्म हालचाल निरंतर होत असते. जिथे हालचाल आहे तिथे झीज आहे. ही झीज तर होणारच असते, ती अगदी कमीत कमी व्हावी याची काळजी घेणे हे आपले काम !

    कोणत्याही गाडीकडे बघा. त्याच्या बेअरींगची झीज होऊ नये याकरीता ग्रीसींग करणे, गंजू नये यासाठी त्याला ऑईलपेंट लावणे, केबल्स लवकर खराब होऊ नये म्हणून ऑईलींग करणे, त्या गाडीला धुणे, त्याच्या इंजिनमधील तेल पाणी बघणे, हे आपण करत असतोच. याला आजच्या भाषेत "मेंटेनन्स" म्हणतात. नियमितपणे, आठवणीने याचा "मेंटेनन्स" करणे महत्त्वाचे, म्हणजे गाडी वारंवार गॅरेजमधे न्यावी लागत नाही.

    ज्या गाडीचा मेंटेनन्स नीट नाही, ती गाडी, त्या गाडीचे अवयव लवकर खराब होतात. मग गाडी हळुहळू आवाज करू लागते. वारंवार गॅरेजमधे न्यावी लागते. तो सांगतो, या गाडीतल्या इंजिनमधील ऑईलची लेव्हल कमी झाली आहे, ऑईल बदलले पाहिजे, ब्रेक ऑईल संपले आहे, घालायला पाहिजे. चेनमधील ग्रीस संपले आहे, गियर केबल, क्लच केबल याना तेल सोडले पाहिजे.

    आपण टीव्हीवर जाहीराती पहातो, त्यातही ट्रकच्या इंजिन मधील ऑईलच्या जाहीराती मुद्दाम पहा. ज्या इंजिनमधील तेल कमी, किंवा हलक्या दर्जाचे, त्या इंजिनचे 'मायलेज' कमी. मग तो ट्रक लंबी सफर का घोडा बनू शकणार नाही. त्यामुळे आमच्या कंपनीचे अमुक तेल वापरा ते इंजिनमधील कचरा दूर करील वगैरे......

    तसेच शरीराचे देखील आहे.

    दैनंदिन जीवनात या तेलाचे अनन्य साधारण महत्व असते. शरीरावर जेवढी म्हणून छिद्रे आहेत, त्या सर्व छिद्रामधून दररोज तेल आत सोडावे. जसे नाक, कान, डोळे, मलद्वार मूत्रद्वार, योनीमार्ग, आणि सर्व घर्मछिद्रे यांना तेलाचे पूरण होणे आवश्यक असते. तर आतील सर्व स्थूल अवयव आणि सूक्ष्म इंद्रिये यांचे पोषण होत असते.

    शिलाई मशीनला जशी छिद्रे असतात. त्या छिद्राच्या जवळ लिहिलेले असते. "ऑईल." याचा अर्थ या छिद्रातून तेलाचे काही थेंब या मशीनमधे किमान आठवड्यातून एकदा तरी, सोडावेत, म्हणजे ही मशीन न झिजता उत्तम काम करेल.

    जेव्हा हे मशीन कामाला येते, तेव्हा त्याला डाॅक्टरांच्या गॅरेजमधे नेले जाते. ते सांगतील की ही झीज नैसर्गिक आहे, वाढत्या वयामुळे हे असेच होणार, हे दुखणे आता गृहीत धरायचे, आता कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची वेळ सुरू झाली हा सांधा झिजलाय बदलून टाकू, इ. इ. जे एकदा आपण गृहीत धरले की औषधे आयुष्यभरासाठी सुरू झाली किंवा कापाकापी आली.
    पण हेच मशीन जर वैद्यांकडे नेले तर वैद्य सांगतील, यातील तेल संपले आहे, तेल भरले पाहिजे, तेलाची बस्ती देऊया, शिरोधारा देऊया, अभ्यंग करूया, स्नेहन स्वेदन करूया, कर्णपूरण करूया, नस्य, मन्याबस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती, तेलधारा सोडूया. इ.इ.

    केरळीय पंचकर्म करणाऱ्या वैद्यांकडे नेले तर तेल डोणीत ठेवूया, पंधरा लीटर तेलाने चार जणांकरवी मालीश करूया, पिझिंचिल, आदि पूरक पंचकर्म करूया, इ.इ.

    चला या निमित्ताने आयुर्वेदात सांगितलेल्या या सर्व उपचारांची नावे तरी कळली !

    एक लक्षात येतंय का पहा, आयुर्वेदात चिकित्सा स्वरूप उपचारामधे, तेलाचा सढळ आणि मुक्तहस्ते वापर करायला सांगितलेला आहे. इथे कंजुषगिरी करून चालत नाही. जेवढे तेल इंजिनला आवश्यक आहे, तेवढे ते दिलेच पाहिजे. जर तुम्ही दररोज "मेन्टेनन्स" करणार नसाल तर कधीतरी पंचकर्म करायला तर हवेच !

    लंऽऽबी रेस का घोडा जो बनना है !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.04.2017

  • किचन क्लिनीक – मिरची

    किचन क्लिनीक – मिरची

    मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
    गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.

    लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
    औषध म्हणून कशी वापरू शकते.

    चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.

    अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील??.

    आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!

    १)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.

    २)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

    ३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.

    ४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.

    ५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.

    ६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.

    मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहार सूत्र – भाग ६

    केवळ दुधच नव्हे तर दुधाचे सर्व पदार्थ प्रमेह होऊ नयेत म्हणून कमी करावेत. खरवस, पेढा, खवा, कुंदा, बासुंदी, रबडी, रसमलाई, पनीर, चीज, बटर हे सर्व पदार्थ जे थेट दुधापासून बनवले जातात, ते तर प्रमेहाचे निमंत्रकच !

    दुधापासून बनविलेले हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. थोडक्यात बंगाली मिठाई अति खाई तो प्रमेही होई. असे म्हणायला काही हरकत नाही. मग बंगालमधे प्रमेहाचे प्रमाण जास्ती असेल का ? शोधावे लागेल, पण बंगाल या प्रांतात परंपरेने दुधाचे रोशगुल्ले, पनीर इ.पदार्थ वंशपरंपरेने खाल्ले जात असल्यामुळे ते तिथे सात्म्य झाले असावेत.

    या पदार्थांमधे वापरली जाणारी साखर ही पण प्रमेहाची सख्खी मैत्रिणच जणु ! आज आधुनिक विज्ञान पण तेच सांगते, साखर हे पांढरे विषच आहे. त्याच्या फारसे पाठी न लागलेले बरे !

    अर्थात एकदा हे पदार्थ खाऊन प्रमेह होणार नाही, पण दिवसातून एकदा खाल्ले तर मात्र नक्कीच होईल. त्यातून कफाची प्रकृती आणि पाणथळ दलदलयुक्त प्रदेशी रहाणाऱ्यांना अधिकच सावध रहायला हवे. त्यात भूक कमी असली तर बघायलाच नको. त्यामुळे सावध तो सुखी हेच खरे. सावधपणा पण एवढा नको की मनातून खूप घाबरत घाबरत खाल्ले जात आहे. तरीसुद्धा साखर वाढलेलीच राहाते.

    दूध हे मधुर रसाचे वर्णन केले आहे. मधुर रसाच्या गुणांचे वर्णन करताना वाग्भटजींनी सूत्रस्थान अध्याय दहामधे, मधुर रस अति सेवन करणाऱ्या मंडळींना सावधपणे प्रमेहाचा धोका असतो, असा उल्लेख पण करून ठेवलेला आहे.

    सद्यो शुक्रकरःपयम् म्हणजे अंतिम धातु (जो शुक्र) उत्पत्ती करणाऱ्या पदार्थात दूध हे सर्व श्रेष्ठ सांगितलेले आहे. उत्तम तर्पक, रसधातुपोषक, वातपित्त कमी करणारे पण कफ दोष वाढवणारे, शीत गुणाचे आणि पचायला जड असते. निरसे दूध, म्हणजे तापवायच्या अगोदरचे दूध पचायला अत्यंत जड असून, अभिष्यंद म्हणजे कफाचा स्राव निर्माण करणारे असते. पण दूध काढल्या काढल्या( म्हणजे धारोष्ण ) घेतल्यास अमृताप्रमाणे असते. पण खूप तापवले असता, पचायला जड होते. (उदा. बासुंदी) हे नीट लक्षात ठेवले पाहिजे. अग्निचा संस्कार बदलला की गुण बदलतात. इतर सर्व पदार्थ अग्निने पचायला हलके होतात तर दूध मात्र अग्निच्या संस्काराने जाड होत जाते, परिणामी पचायला जड होते. बासुंदीचे उदाहरण लक्षात ठेवावे. जसजसे दूध तापवत जावे, तसतसे, ते आटते. घट्ट होते. शेवट खवा बनतो, त्यात आणखी साखर घातली तर पेढा ! त्याच्याही पुढे संस्कार करून दुधाची पावडर बनवतात. आणि नंतर चाॅकलेट आणि मिठाया बनतात. म्हणजे हे अंतिम पदार्थ पचायला किती जड होत जातील याची कल्पना करावी. एका चाॅकलेट बारने काय होणार आहे असे म्हणून, एखादे जरी तोंडात टाकले तरी तो सारा ऐवज, लिटरभर दुधाचा असू शकतो.

    पोटावर अत्याचार करणे, म्हणजे यापेक्षा वेगळे काही नाही.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    22.01.2017

  • किचन क्लिनीक – दही खायचे नियम

    आपल्या पैकी बरेच जण आवडते म्हणून दही मिळेल त्यावेळेस हवे तसे खात असतो आणी कधी कधी तर आपल्या लक्षात देखील येत नाही की आपल्याला सतावणाऱ्या एखाद्या तक्रारीचे मुळ कारण आपण खात असलेले हे दहीच आहे म्हणून.

    तर मग दही कधी खाऊ नये ह्याचे काही नियम आयुर्वेद सांगते ते आपण पाहूयात:

    १)दही रात्रीच्या वेळेस मुळीच खाऊ नये.

    २)दही गरम करून खाऊ नये कारण गरम दही हे आयुर्वेद विषवत मानते.

    ३)अदमुरे दही तर मुळीच खाऊ नये हा पण जर संडासला घट्ट होण्याची सवय अथवा त्रास असेल तेव्हा काही दिवस उपचाराचा भाग म्हणून आपण ह्याचे सेवन करू शकता पण नियमीत नाही.

    ४)दही हा पदार्थ आपल्या आहारामंध्ये रोज खाऊच नये.

    ५)दही नुसते कधीच खाऊ नये तर त्यामध्ये सैंधव,खडी साखर असे काही तरी घालून खावे.

    ६)उन्हाळा,वसंत ऋतू,व शरद ऋतुमध्ये दही खायचे नाही कारण ते शरीरास अपाय कारक ठरू शकते तसे पाहता निसर्ग नियमच असा आहे की ह्या ऋतूत दही चांगले विरजत देखील नाही.

    ७)संडास मधून आव पडणे,डोके दुखी,सर्दी,पडसे,त्वचारोग,अम्लपित्त,संडासला आगहोणे,लघ्वीचीजळजळ,रक्तदोष,कोड,
    अंगावर सूज येणे,रक्तस्राव,पांडूरोग,चक्कर येणे ह्या तक्रारी असल्यास दही खाऊ नये.

    ८)दही हे मासे,अंडी,मांस,फळे,भाज्या,कडधान्य ह्यात मिसळून कधीच खाऊ नये कारण असे केल्यास शुक्रदोष,डोळ्यांचे विकार,त्वचा रोग,रक्त विकार,अंगावर किंवा आतील अवयवांना सूज येणे,रक्तविकार होऊ शकतात.

    म्हणूनच दही खा पण जरा जपून.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे  – भाग चार

    “शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. “

  • आहारातील बदल भाग ६२-चवदार आहार -भाग २४

    कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे पराठे, शेवग्याच्या पाल्याची भाजी. याचा अर्थ हे पदार्थ मधुमेहाचे शत्रू आहेत का ? हो. नक्कीच. फक्त प्रमाण लक्षात ठेवावे. पानाच्या डाव्या बाजूला !

    मधुमेहाचा शत्रू म्हणजे कडू चव असे का म्हटले जाते ? मधुमेहात शरीराला चिकटण्याचा गुणधर्म वाढतो. मग तो, क्लेद असेल नाहीतर मेद असेल, रस धातू असेल नाहीतर स्तन्य असेल. हे दोष विशेष शरीरातील स्रोतसांना चिकटून राहिले तरच दुष्टी निर्माण होते.
    कडू चवीच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमध्ये खर म्हणजे खरखरीतपणा, दोन पेशींना एकमेकांपासून वेगळे करण्याचा गुण, याला शास्त्रकार विशद असे म्हणतात. आणि रूक्ष म्हणजे कोरडेपणा हे महत्वाचे गुण असतात.

    मधुमेहामधे नेमके यांच्या विरूद्ध गुण शरीरात वाढलेले असतात, त्यामुळे गुणविपरीत औषध म्हणून कडू चवीची औषधे मधुमेहावर छान गुण दाखवतात.

    मधुमेहाशिवाय वाढलेली ढेरी कमी करणे, किंवा शरीराचा कोणताही भाग फाजीलपणे वाढणे, गळ्याच्या गाठी वाढणे, गर्भाशयात फायब्राॅईडची गाठ वाढणे,शरीरात आत बाहेर कुठेही अमर्याद स्वरूपात वाढणारी कर्करोगाची गाठ, डोळ्यांचे आजार, सांध्यांना येणारी सूज, रक्तातील चिकटपणा वाढल्यामुळे रिपोर्टमधे दिसणारे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड, वगैरे पॅथालाॅजिकलल आजारदेखील या कडू चवीने कमी होतात. आमामुळे पोट गप्प होणे, बरेच दिवसांच्या बऱ्या न होणाऱ्या जखमा, ती अगदी साधी सर्दी देखील कडू चवीने कमी करता येते.

    तापावर हटकून उपयोगी पडते ती कडू चव ! म्हणून तापाची कारणे शोधता न आल्यास, कडू चवीची औषधे वापरली की ताप जातो. जसे महासुदर्शन काढा.

    औषध कोणतेही असूदेत, ताप उतरला पाहिजे. एवढेच रूग्णाला अपेक्षित असते. मग ते कडू चवीचे महासुदर्शन चूर्ण असू देत नाहीतर, कडू चवीची पॅरासिटेमोलची कडू जार गोळी. कडू म्हणजे ताप उतरवणारे हे साधे सोपे समीकरण आहे.

    पुस्तकात लिहिलं नसलं तरी या कडू चवीचा अतिरेकी परिणाम म्हणून वात आणि पित्त हे वाढतेच, हे आपण व्यवहारात बघतोच! हातच्या ( दिसणाऱ्या) वातपित्ताला ग्रंथाधार कशाला ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    24.11.2016

  • नैवेद्य भाग ३

    प्रत्येक देवाचा नैवेद्य वेगळा !
    ज्याचे जे वैशिष्ट्य तसा त्याचा नैवेद्य !
    जसे, गणपतीला तूप आणि मोदक.
    मोदकच का ?
    मोदकाचे सारण गुळ आणि खोबरे.
    गुळ आणि खोबरे आणि त्यावर साजूक तूप हा उत्तम बुद्धीवर्धक योग आहे.

    गुळामुळे रक्तपेशी वाढायलाही मदत होते. सर्वात पहिला रस धातु तयार होण्यासाठी, गेलेला थकवा लगेचच परत मिळवण्यासाठी, गुळ मदत करतो.
    रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये, प्रवासामुळे आलेला थकवा नाहीसा व्हावा, म्हणून एकेकाळी आपल्याकडे गुळपाणी द्यायची पद्धत होती. (आजकाल पाहुण्यांच्या समोर विषाने भरलेली काळ्या कोल्ड्रिंक ? ची ठंडा बाटली आदळली जाते. )

    अर्थात गुळ सेंद्रीय पद्धतीने बनवला गेला पाहिजे. आणि ऊस देखील रासायनिक खतांचा वापर न करता पिकवला गेला पाहिजे. तरच त्याचे अपेक्षित औषधी गुण दिसतील नाहीतर, गुण नको पण दुष्परिणाम आवर असे म्हणण्याची वेळ आज आली आहे.

    जसे पाण्याला जीवन असे म्हटले आहे. पण शुद्ध स्वरूपात असेल तर शिशाच्या किंवा गंजलेल्या टाकीतील पाणी, शिळे पाणी, क्लोरीनयुकत पाणी, सतत झाकून ठेवलेले पाणी हे जीवन कसे ठरेल ?
    असो. !

    खोबरं म्हणजे नारळ.
    याबद्दल अपशब्द बोलायचे कामच नाही. उत्तम स्नेह, उत्तम केश्य म्हणजे केसांचे पोषण करणारा, उत्तम मल विबंधनाशक, उत्तम तर्पक म्हणजे , रसधातूचे पोषण करणारा, कठीण कवचातला असल्याने कॅल्शियम सारखे घटक वाढवणारा, पचनाला मदत करणारा............... श्री सत्यनारायणाची कशी सहस्त्रनामे आहेत, तशी या नारळाची देखील, गुणावरून, कर्मावरून, शंभर नावे सहज करता येतील, कोणत्याही नावानी हाक मारा, तो पावणारच.

    त्याच्या पर्यायी नावात,
    स्वभिषक् म्हणजे स्वयंघोषित किंवा स्वतःचा स्वतः जणुकाही डाॅक्टर. (बोगस नव्हे )
    चिकित्सकारी म्हणजे चिकित्सक
    लोकांचा अरी. ( याचे नित्य सेवन केले असता, चिकित्सक लोकांकडे चिकित्सेसाठी जावे न लागल्यामुळे, यांच्या पोटापाण्यावर पाय आणणारा )
    डाॅक्टरशत्रु म्हणजे डाॅक्टरांचा जणुकाही शत्रुच ! ( याचे नित्य सेवन केले असता डाॅक्टरकडे जायची वेळच येत नाही, म्हणून डॉक्टर मंडळींचा शत्रु, म्हणून बहुधा अजिबात खाऊ नका, असा सल्ला देऊ लागलेत.....)
    वैद्यमित्र - रोग होऊ नये म्हणून, आणि झालेला रोग दूर व्हावा यासाठी धडपडणाऱ्या वैद्यांचा मित्र.
    अशी काही नावे तयार करता येतील. (पुलदेशपांडे जर कदाचित वैद्य असते तर त्यांनी अशी कल्पवृक्षफल शतनामावली तयार केली असती.)

    असा हा बुद्धीदात्या गणरायाचा बुद्धीदाता नैवेद्य. हाच नारळाचा नैवेद्य आमच्या बजरंगबलींना पण प्रिय आहे. कारण जसा हा बुद्धीदाता आहे, तसाच शक्तीदाता पण आहे.

    ज्याने निर्माण केले, त्याचे त्यालाच परत करायचे आणि त्याचा सूक्ष्म सारभाग आपल्याला घ्यायचा. हा नैवेद्य दाखवण्यामागील मुख्य हेतु.

    ज्याच्याकडे जे आहे, ज्याच्याकडे ते मागीतले की लगेच मिळते, अश्या देवतांकडून जर शक्ती आणि बुद्धी मागितली तर त्या देवतांकडची शक्ती आणि बुद्धी संपूनच जाईल ना ! म्हणून भक्तीमार्गी लोक गणपतीला, हनुमंतांना स्थूल रूपात नारळ अर्पण करतात, आणि सूक्ष्मप्रसाद रूपात बाप्पा तो शक्ती बुद्धीच्या रूपात परत करतात. आणि आपणच तो तो स्थूलातून खातो.
    हा माझ्यासारख्या भोळ्याभाबड्या भक्तांचा भाव.

    हीच श्रद्धा. हीच भक्ती.
    नैवेद्य दाखवताना मला उमजलेली !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    09.09.2016

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग पंधरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यात मला जे सुचतंय, ते लिहितोय.

    उतु नको मातू नको
    घेतला वसा टाकू नको.

    चातुर्मासात कहाण्या वाचायची पद्धत आहे. या कहाण्यांची सुरवात, एक आटपाट नगर होते..... अशी असते, मधेच कुठेतरी एखादी देवी किंवा मैत्रिणीच्या तोंडी हे वाक्य असते, उतु नको मातु नको, घेतला वसा टाकू नको... आणि पाचागावची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण असा शेवट असतो.
    त्यात तुझ्यातील अहंकार सोडून दे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे. असा उपदेश केलेला असतो. जे व्रत तु स्विकारलेले आहेस, ते टाकू नकोस. तेच तुझे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. अशी समज दिलेली असते. म्हणून आई सांगते उतु नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.

    उष्टे खाऊ नये.
    एकमेकांच्या उष्टे खाल्ले की, जंतुसंसर्गामुळे होणारे व्याधी वाढतात, असे आधुनिक विज्ञान पण सांगते. पाश्चात्य संस्कारामुळे आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे, वेगवेगळ्या कुकरी शो मधे केक किंवा अन्य पदार्थ एकमेकांना हाताने भरवणे, किंवा त्याच उष्ट्या चमच्याने इतर सर्वांना भरवणे, या किळसवाण्या प्रकारामुळे, चलता है यार! उष्टे खाणे गैर नाही, असा चुकीचा संस्कार नकळतपणे होत जातो. आज असं चुकीचं का केलं जातं माहिती नाही, पण एकमेकांच्या उष्ट खाण्याची चुकीची प्रथा रूढ होत जातेय. यावेळी आईने किंवा बाबांनी आपल्या मुलामुलींना समजावून सांगितले पाहिजे, की उष्टे खाऊ नये. जंतुसंसर्गाचा पुढे धोका आहे.

    घटाघट पाणी पिऊ नये.
    पाणी सावकाश प्यावे. नाहीतर ठसका लागण्याचा संभव असतो. उगाचच बाटली लावली तोंडाला आणि संपवूनच तोंडातली काढली असं करू नये. पाणी वरून पिऊ नये. भांड्याला तोंड लावूनच प्यावे किंवा स्वतःच्याच ओंजळीने प्यावे.म्हणून पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचे स्वतःचे भांडे स्वतःबरोबर नेणारी मंडळी होती.

    उगाच आरश्यात पाहू नये.
    नटण्या मुरडण्याला पण मर्यादा असतात. सतत आरशासमोर उभे राहाणे, सतत चेहेरा पाहाणे, यात वेळ किती जातो, हे लक्षातच येत नाही. हे ज्या काळात सांगितले गेले, त्यापेक्षा आताचा काळ फार बदलला आहे. इतरांना आपण सुंदर दिसावे, ही विशिष्ट वयातील धडपड चुकीची नाही, पण सतत आरशासमोर उभे राहाणे चुकीचे आहे, हे मुलीला सांगितले तर आईचे काय चुकले ?
    आता तर सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी काढताना तोंडाचे चंबू, गडू करून, ओठांची तोंडली नि आवळे करत, डोळ्यावरच्या भुवयांची धनुष्ये वाकवित, जेवढा विचित्र चेहेरा करता येईल तेवढा विदूषकी चेहेरा करण्याचा फंडा आला आहे. या काळानुसार बदलणाऱ्या फॅशन्स आहेत. हे आयुर्वेदात कुठुन येणार ? पण मूळ सूत्र सांगितलेले आहे, त्यात विस्तार करायला हवाच. जसा भाव चेहेऱ्यावर असतो, तसा तो मनी रूजतो. म्हणून चेहेऱ्यावर कधीही आठ्या नकोत. काही जणांना आठ्या पाडल्याशिवाय बोलताच येत नाही. आठ्या पाडून बोलू नकोस. असं आईने सांगितले आणि चेहरा नीट ठेऊन सेल्फी काढ, असे बाबा ओरडले तर काही चुकले का ?

    परवाच एकाने प्रश्न विचारला, माझ्या चेहेऱ्यावर काळे डाग आहेत, मी काय करू ? विचारणाऱ्याने नाव सांगितलेले नाही, वय माहिती नाही, म्हणून सहज त्याचा डीपी पाहिला. तर डीपीवरच एवढा भेसूर चेहेरा ठेवलेला होता. आणि त्या चेहेऱ्यावर काळ्या रंगाचे पट्टे. मी सहज बापाच्या भूमिकेतून त्याला मेसेजलो, "अरे, आधी डीपी बदल. चेहेऱ्यावर काळे पट्टे ओढलेला हा भयानक डिपी कशाला ठेवलायस ?" त्यावर तो उत्तरला, "मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर द्या. नसत्या चौकशा कशाला ? "
    आता याला काय उत्तर देणार. ?
    माझेच चुकले म्हणा. मी कर्तव्य भावनेने त्याच्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायला हवं होतं. पण जळ्ळं बापाचं काळीज बाहेर पडलं. आणि हे असं उत्तर ऐकून घ्यावं लागलं.

    बदलत्या काळानुसार पालकांनी पण बदलणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाशी संवाद करताना पण त्यांना रूचेल अशा भाषेत बोलायला हवे, हे पालकांनी समजून घ्यायला हवं.

    केसांना हात लावू नये.
    हे वाक्य म्हणजे सरळ सरळ आरोग्य जपणारा सल्ला आहे. केसांवर धुळ माती, बसत असते. त्यावर अनेक प्रकारचे जंतु चिकटलेले असतात. उगाचच केसातून हात फिरवायची सवय असणारी अनेक मुलगे मुली दिसतात. केसांवरून फिरवलेला हात न धुताच, बर्गर पिझ्झ्याला पण लागतोच. तोही शेयरींग मधे. म्हणजे अर्धा मी अर्धा तू. म्हणजे तिथेही स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जंतुसंसर्गाचा धोका.

    केसांची मुळे नाजूक असतील तर ती सतत हलत रहातात. आणि गळतात. इतरत्र उडतात.

    आधी डोक्यावर तेल घालत नाहीत, त्यात स्टाईल म्हणून उडत्या भुरूभुरूत्या केसातून बोटे फिरवीत राहिले, तर लवकरच गाॅन केस व्हायला वेळ लागणार नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १०.०८.२०१७

  • प्रमुख आहारसूत्र – भाग ११

    आयुष्यभर औषधे घ्यावी लागू नयेत, असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी जे करावं लागतं ते करायची तयारी मात्र नसते.

    आणि असा समज करून दिला जातो, की एकदा डायबेटीस झाला की कायमचा चिकटला. ही निराशा मनातून काढून टाकली पाहिजे. हा आजार जर मनोशारिरीक असेल तर औषध फक्त शरीरात जाऊन काय करणार ? जर रोगाचे एक मूळ मनात असेल तर तिथपर्यंत पोचायला नको का ?
    मन कुठे आहे ते अजून माॅडर्न (?) मेडीसीनला समजलेलंच नाही. मन ह्रदयात आहे. आणि आज शोधलं जातंय मेंदूमधे. कसं सापडणार ?
    जाऊदे !

    प्रमेह होण्याचं मुख्य कारण दूध, दही, पाणी, अति, गोड, कफ वाढवणारे पदार्थ खाणे, हे तर आहेच पण यापेक्षादेखील खाल्लेलं पचवता न येणं किंवा पचवण्यासाठी काहीही कष्ट न करणे हे प्रमुख कारण आहे. मेहनत करा. म्हणजे मेह म्हणजे प्रमेह म्हणजे मधुमेह नत म्हणजे नाहीसा होईल.

    प्रमेह वाढण्याचं मुख्य कारण बदललेली जीवनशैली आहे. बैठे काम वाढलंय, सुखाचा अतिरेक झालाय. आम्ही खातोय खूप. खाऊन खाऊनच अशक्तपणा येतोय. मग पचवणार कधी ? त्यात कफ वाढवणारे सर्व पदार्थ निसर्गनियमाने मधुर रसाचे आणि पचायला जड असणारेच असतात.

    आमची वृत्तीच अशी झालीय की, आता दूध बंद करायचं, मग अशक्तपणा येणार, त्यासाठी परत टाॅनिक घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण असा विचार करू लागलोय, की अमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय माझं रक्त वाढणारच नाहीये, तमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय प्रोटीन्स मिळणारच नाहीत. कॅल्शियमसाठी हे खाल्लंच पाहिजे. ह्रदयासाठी हे, किडनीसाठी ते. असा विचार करणं योग्य नाही.

    शरीराचे तुकडे करून तपासणारी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत असल्यावर प्रश्न पडतो. संपूर्ण शरीराचा, मन आत्मा, इंद्रियासह विचार कोण डाॅक्टर किंवा वैद्य कधी करणार ? पायाला काटा लागल्यावर डोळ्यातून पाणी येणारं आपलं शरीर, प्रत्येक डाॅक्टरनी शरीर असं काही वाटून घेतलं आहे की, काही वर्षांनी वरच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा आणि खालच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा शोधावा लागेल. उजवा डोळा एक जण तपासेल, तर डावा डोळा दुसराच !
    जोक अपार्ट. चिकित्सा करताना संपूर्ण शरीराचा विचार करावा, असं आयुर्वेद मानतो.

    एवढे व्हिटॅमिन्स हवेतच, एवढे कॅल्शियम हवेच, हे नियम बनवले की कायदे आले. कायदा बनला की, पुरावे आले. पुरावे दाखवायची वेळ आली तर मन कसं दाखवणार ? आणि इंद्रियांचं काय करणार ? मग त्याला कोण विचारणार ? त्याला म्हणजे आत्म्याला !

    आयुर्वेद शास्त्र शरीराचे असे तुकडे पाडून विचार करतच नाही. अखंड शरीर, मन, इंद्रिय आणि आत्म्यासह चिकित्सा करण्यासाठी घ्यावे, असे शास्त्रकार म्हणतात.

    ही प्राथमिक माहिती समजल्याशिवाय प्रमेहाविषयी आयुर्वेदात सांगितलेली सूत्रे नीट लक्षात येणार नाहीत, म्हणून हे आधी आणि परत परत सांगावे लागत आहे. कारण आज आरोग्य हे चौकटीतल्या नियमांना बांधले गेले आहे. रक्तदाब एवढाच पाहिजे. रक्तातील साखर एवढीच हवी. वजन एवढेच हवे, कॅल्शियम एवढे हवेच ! कमी पडत असेल तर सरळ लेबल चिकटवले जाते, तू रोगी !
    ....... आणि आयुर्वेद म्हणतो.....
    ........ इथे प्रत्येकाचे नियम वेगळे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.01.2017