सायंकाळी सातला जेवण्याचा प्रयत्न केला. पण पुनः रात्री झोपताना भूक लागते. गेल्या अनेक वर्षांची सवय आहे. जात नाही.. पित्ताची प्रकृती आहे, काय करावे ? अशा सर्व सामुदायिक शंका लक्षात घेऊन ही सोयीस्कर टीप.
आपण आजच्या काळातील बिझ्झी लाईफमधील जेवणखाण कसे करतो ?
सकाळी उठतो आधी चहा. त्याबरोबर मैद्यापासूनचे टोस्ट, बटर, बिस्कीट, मारी, खारी. ती वचावचा खाऊन झाली की, आंघोळ वगैरे आटपून नाश्ता. काही जणांचा नाश्ता हा उपीट पोहे, तर काहींचा इडली, आंबोळी, तर काही जणांकडे चपाती भाजी तर काही जणांकडे पेज किंवा मऊ भात असतो. तर काही जण पावात टोमॅटो काकडी कांदा गुंडाळून खातात, तर काही जण चहात बुचकळून पाव खातात की झाला नाश्ता !
बायकोनं पहाटे लवकर उठून केलेला आणि आठवणीने बरोबर दिलेला डबा. बहुतेक वेळा डब्यात चपातीभाजीच असते. आणि भाजी म्हणजे सुक्या बटाट्याची. सांडायची भीती नाही. रसभाजी न्यायची म्हणजे पुलंच्या धड्यातील कोचरेकर मास्तर व्हायची भीती.
दुपारच्या वेळेत डबा खाणे म्हणजे, तिथल्या तिथे डब्यातल्या डब्यात दोन्ही हातानी चपाती ओढून तोडून भाजीबरोबर गिळायची. प्लॅस्टिकच्या बाटलीतले पाणी ढोसायचे, उरलेले पाणी हाताला लावून हात "शुद्ध" करायचे. वर फक्कड चहा मारायचा की झाले. चार पाच वाजता, कोणीतरी दिलाच तर वडापाव, समोसा सहज जातो. तब्येतीला बरा म्हणून ज्युसचा ग्लास पोटात रिकामा होतो. रंमत गंमत घरी येईपर्यंत आठ वाजतात.बूट साॅक्स फेकून दिले, शर्टची वरची दोन बटणं काढली की, सोफ्यावर आडवे राहात, पाय खुर्चीवर ताणून, चेहेऱ्यावर जमेल तेवढा दमल्याचा आव आणायचा आणि डोक्याला आठ्या घालत, अश्शी ताणून द्यायची, की बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की, साहेब कोणत्यातरी मोठ्या लढाईहून घायाळ होऊन परतलेले सैनिकच आहेत.
तिथूनच पोरांवर ओरडत, पंख्याची गरगर सुरू करायची ऑर्डर द्यायची, आणि आपण आल्याची वर्दी स्वयंपाकघरात आपसूक जायची. गरमागरम चहा आयता हातात पडेपर्यंत, बाहेर गरम झालेलं डोकं घरातल्या कुणावर तरी राग काढून शांत व्हायचं.भरपूर भुक लागलेली असल्यामुळे चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत चकली चिवडा फरसाणाचा डबाच घेऊन बसायचं. मग कुठेतरी जरा जीव शांत व्हायचा.
"टिव्ही समोर बसून खायचं नसतं" हे सकाळी पोरांना ऐकवलेलं वाक्य विसरून जात, चहा चकली पोटात विरून जाते. दिवसभराचा तथाकथित सगळा शीण, टीव्ही मालिकेतल्या सुंदऱ्यांनी आणि जाहीरातीतल्या चिचुंद्यांनी तासा दोन तासात घालवला, की टेबलावर ताट पाणी यायला सुरवात होते. "आता कसं शांतपणे जेवता येतं. एकत्र चर्चा होते." हीच वेळ असते मुलांसोबत त्यांच्याशी अभ्यासपूस करायची. म्हणजे पोरं सुद्धा वाढलेल्या ताटाखालचं मांजर होतात. दिवसभर सगळं वचावचा खाल्लेलं असल्यामुळे रात्रीचे जेवण कसं साग्र संगीत बनवलेलं असतं, पुनः गरमागरम चपाती भाजी, आमटी, भात, सॅलेड, भाजी, उसळ, तळलेली दोन चार कापं, लोणचं पापड. ताट असं गच्च भरलेलं. भरल्या पोटानं उठून, हात धुवत, दात कोरत, हालत डुलत स्वारी थेट शयनकक्षात. स्वयंपाकघरातली आवराआवरी करून बाईसाहेब तासाभरात पुनः दुधाचा ग्लास घेऊन प्रवेशतात. आणि दुधाचा ग्लास रिता करून आमचा दिवस संपतो. भरल्यापोटी कशी मस्त झोप लागते ना.
हे एवढं खाताना आपण चार ते पाचवेळा तरी ढेकरा दिलेल्या असतात.
या जीवनपद्धती मधे आम निर्मिती, क्लेदामधे रूपांतरण या क्रिया अगदी सहजपणे घडत असतात. पहिले अन्न पचायच्या आतच दुसरा अन्नाचा गोळा वरून आत पडत असतो.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चारच वेळा आपण खाल्लंय असं गृहीत धरू.
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी नाश्ता आणि रात्री पुनः जेवण.
आता आपण कायदा केला, सकाळी आणि सायंकाळी जेवावे. या कायद्याची सोयीस्कर पळवाट पाहून ठेवू.
असं करता येतं काय पहा.
टीव्ही बंद, घरात सौ. ला थोडी हाताखाली मदत करायची, भाजी चिरून देणे, टेबल साफ करणे, नारळ खोवून देणे, ताटपाणी घेणे, कपबश्या विसळणे, अशी कामे जरा चुकली तरी फारसा ओरडा खावा लागणार नाही, मुलांची शाळा अभ्यास जेवताना बिलकुल नाही.आणि जेवणाचे कौतुक करतच जेवायचं.
सकाळी नाश्त्याऐवजी जेवण करूनच बाहेर पडायचं. दुपारी जेवणाऐवजी नाश्ता करायचा. सायंकाळी घरी आल्यावर परत जेवायचे. आणि रात्रौ झोपताना भूक लागली तरच नाश्ता करायचा ! तोही अगदी सुका. दूध नको, पाणी नको. कुठेतरी राजगिरा लाडू, लाह्या, पाॅपकाॅर्न, चुरमुरे, भडंग, सुका मेवा, चिक्की, काॅर्नफ्लेक्स इ. पचायला हलके असणारा पण इकडे तर पोट भरती करणारा......
हा नियम नाही, पण नियमातील प्रॅक्टीकल पळवाट आहे. पण शास्त्र तत्वाला कुठेही बाधा येत नाही.
म्हणजे सकाळी जेवण सूर्याबरोबर, दुपारचा नाश्ता सूर्याबरोबर, सायं भोजन सूर्याबरोबर ! आणि रात्रौचा नाश्ता "सौ" बरोबर !!
ये हो गया हिसाब बराबर, सौ साल के लिए !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
07.03.2017
जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा.
आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये.
जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते.
जर पहिला घास पावाचा असेल, तर पाव सहज पचू लागतो.
जर पहिला घास इडली डोश्याचा असेल तर आंबवलेले पदार्थ सुपाच्य होतात. फार त्रास देणार नाहीत.
तसे पहिल्यापासून मांसाहार करायची सवय असेल तर तो कसा पचवायचा, हे शरीराला माहीत असते.
म्हणजे नाॅनव्हेज खाणे बंद करायची आवश्यकता नाही. आयुर्वेदात मांसाहार करूच नका, असे म्हटलेले नाही. मांसाहाराचे वर्णन करणारा एक स्वतंत्र अध्यायच वर्णन केला आहे.
वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस पचायला कसे असते, चवीला कसे असते, कच्चे खाल्ले तर काय होईल, शिजवून खाल्ले तर काय होईल, पचले नाही तर काय लक्षणे दिसतील, ते पचवण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, अमुक पदार्थाबरोबर खाल्ले तर काय होईल, कोणत्या पदार्थाबरोबर आवर्जून खावे, अमुक मांस कोणता परिणाम घडवणारे असते, इ. वर्णन केले आहे. तयार केलेल्या नवीन पदार्थांचे गुण काय असतील याचेही वर्णन आहे.
हे पण सांगितले आहे की आहे कि मांसाहार रज आणि तम गुण वाढवतो. जेव्हा रज आणि तम गुण वाढणे आवश्यक असेल तेव्हा तो वाढविण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे.
जसे, देशाच्या रक्षणासाठी आपला जीवही अर्पण करणार् या जवानाना, त्यांचे शरीरबल वाढवणे, मनोबल वाढवणे, प्रसंगी शत्रूचा म्हणजे चालत्या बोलत्या, आपल्याच सारख्या एका माणसाचा जीवही घेणे, आवश्यक असते. काही वेळा ही क्रूरता अंगी मुरवावी लागते.
पण कोणाला ?
ज्याच्या हातात सतत बंदुक असते, ज्याला सतत हिंसेसंबंधी विचार करावे लागतात त्याला.
दोन वेळा मस्त जेवून, मोबाईलवर लढाईचा गेम खेळणार् यला, आणि पांघरूण घेऊन, निवांत घरी झोपणार् याला नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021.
पाश्चात्य विद्वानांनी लावलेल्या शोधाबद्दल पूर्ण आदर ठेवून ही लेखमाला लिहितोय. कृपया गैरसमज नसावेत. आणि जे शोध लावले जात आहेत, ते विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळेच. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्रातील जे मौलिक संशोधन झाले आहे, त्याबद्दल वाद नाहीच आहे.
जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही.
जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये.
जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये.
आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ?
एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे गेले. दुसऱ्या बाजूने एक पाणी भरायला येणारी बाई येत होती. त्या बाईच्या मनात त्या नाण्याविषयी मोह उत्पन्न होऊ नये म्हणून साधू धावतच त्या नाण्याजवळ आला आणि त्या नाण्यावर पाय देऊन सहजपणे उभा राहिला.
ती बाई तिथून पलीकडे गेली, पुनः साधु पारावर बसला. पाणी भरून येताना ती बाई जशी जवळ आली तशी साधु पुनः उठला आणि रस्त्यावर येऊन नाण्यावर पाय ठेवून उभा राहिला. असं तीनचार झाल्यावर त्या बाईच्या मनात आलेला विचार तिने बोलून दाखवला. त्यावर प्रामाणिकपणे त्या साधूने बाईला सांगितले. तिथे एक सोन्याचे नाणे आहे, ते नाणे पाहून ते घेण्याचा मोह तुला उत्पन्न होऊ नये म्हणून, मी धावत येऊन त्या नाण्यावर उभा रहात होतो.
त्यावर ती बाई म्हणाली,
"त्यात एवढं काय आहे, ते नाणं गेले चार पाच दिवस तिथंच पडलेलं होतं. सगळ्यांना दिसतही होतं. पण पडलेलं घ्यायचं असतं हे आज प्रथमच आपण येऊन शिकवलंत महाराज. जे आपलं नाही, ते आपण घेऊ नये. हे गावातील सर्वांनाच माहिती आहे. म्हणून कुणालासुद्धा ते दिसून घेण्याचा मोह झालाच नव्हता. पण महाराज, आता मात्र आपण आलात आणि त्या नाण्यावर उभे राहिलात, तेव्हा मला शिकवलंत की, असं काहीजण घेतात ते !"
जे नाण्याचे झाले ते ग्लोबलायझेशनच्या काळात आमचे प्रत्येक वस्तू आणि अन्नप्रकाराचे होतेय. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपला बिझनेस दिसतोय. चकचकीत वेष्टण आणि जाहीरातबाजीला भुलुन, सारासार विवेक बाजुला होतोय. तसं पौष्टिक भाजी भाकरी भाताऐवजी चपाती जवळची वाटू लागली आहे. कोकणातील भाकरी तांदळाची किंवा नाचण्याची आणि बाकी सर्व ठिकाणी ज्वारी बाजरी मका हे विसरू नका.
मोह निर्माण होण्याआधी वैराग्याचे धडे मिळाले तर अधिक चांगले.
निरोगी कसे रहायचे असते, ते रोगी होण्याअगोदर समजले तर सोपे होईल ना !
आपणला हे सांगत नाहीये, आपल्या पुढच्या पिढीसाठी सांगतोय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.10.2016
प्रमेह हा कफाशी संबंधित आजार आहे. कफ दोषाचं विकृत झाल्यानंतरचं नाव क्लेद. क्लेद वाढवणाऱ्या पदार्थामधे दह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.पण दही न आवडणारा प्राणी तसा दुर्मिळच. दही म्हटलं की फक्त एकच प्राणी नाखुश असतो, तो म्हणजे आयुर्वेद वैद्य. खरंतर त्याच्याही जीवावर येतं, दही खाऊ नका म्हणून सांगायला. पण काय करणार? जे सत्य आहे ते कोणीतरी शेवटी सांगायलाच हवे ना ! ते अतिशय कठीण काम अखेर वैद्यालाच करावे लागते.
दही दूध म्हणजे काही अगदी विष नव्हे! अगदी बंद करण्याची आवश्यकता नाही. पण प्रकृती, लक्षणे, स्थळ काळ इ. ठरवून यांचे सेवन करावं लागतं.वाताचे काही आजार सोडले तर दही अनेक रोगांचे माहेरघरच आहे. युक्ती वापरून दही खाता येते. जिथे कायदा सांगितला जातो, तिथे पळवाट असतेच. ती युक्ती शोधून काढणारा वैद्य महत्वाचा !
दही लागते म्हणजे नेमके काय होते ? काही उपकारक जंतु विरजण स्वरूपात आपण त्या दुधात सोडतो. त्या दह्याच्या पहिल्या अवस्थेला आपण अदमुरे दही म्हणतो. साधारणपणे सात ते आठ तासात ही अवस्था येते. अजून तीन चार तास गेल्यावर पक्के वडी स्वरूप दही जमते. आणखी चार पाच तास गेले म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री ते चांगलेच आंबट होते. तिसऱ्या दिवशी आंबटपणाचा कहर होतो. त्यावरची साय सुद्धा आंबट दिसायला लागते. रंग बदललायला सुरवात झालेली असते. वास बदलतो. बुडबुडे यायला सुरुवात होते. हे सगळं वर्णन का करतोय ? तेच तर दही न खाण्यामागचे इंगित आहे.
ही जी प्रक्रिया दह्यामधे सुरू झालेली असते ती थांबतच नाही. अदमुऱ्या दह्याचे रूपांतर एव्हाना आंबट्टढ्ढाण्ण दह्यात झालेले असते. या प्रक्रियांचा विचार केला तर दुधापासून दह्यात रूपांतरण होणारी ही प्रक्रिया रासायनिक स्वरूपाची असते. म्हणजे एकदा दही बनवायला सुरवात झाली की, थांबायचे नाव नाही. कितीही थांबवायचं म्हटले तरी आता परत दुधात रूपांतर होणे नाही. गुण आणि कर्माने सुद्धा! चव तर होत्याची नव्हती होऊन जाते. दह्यावरची ही प्रक्रिया पोटात गेली तरी तश्शीच सुरू राहते. ते आणखीनच आंबट होते. दह्याचा हा आंबटपणा पित्ताला हमखास वाढवतो. आणि त्यातील बुळबुळीतपणा कफाला वाढवतो.
वायुचा विचार केला तर दह्यामधे बुडबुडे पण तयार झालेले दिसतात. दही घुसळल्यावर, दह्याची वडी / कवडी मोडल्यावर आतील हा वायु निघून जातो, म्हणून तयार झालेले ताक सुपाच्य असते. म्हणूनच नुसते दही घेणे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण असे न घुसळलेले दही तिन्ही दोषांचा प्रकोप करते.
नक्तं न भुञ्जात्
दही कधीच रात्रीचे घेऊ नये, कारण दह्यामधे सुरू असलेली किण्वन प्रक्रिया कारणीभूत होत असावी. वात वाढवायला ही प्रक्रिया मदत करणारी असते. आणि सर्वात महत्वाचे सूर्य असेपर्यंत, त्याच्या अग्निवर पचन पूर्ण करून घेतले गेले पाहिजे, मग जाठराग्निवर अतिरिक्त ताण निर्माण होत नाही.
असे हे स्वभावतः कफ आणि पित्त वाढवणारे,क्लेद निर्माण करणारे, दही प्रमेहामधे वर्ज्य सांगितले गेले नसते तरच नवल !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.01.2017
आता आपण कंदमुळ हा वर्गपुर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळूया तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट तो म्हणजे फळांचा.फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे.आपण सर्वच जण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो.उस वक्त हम आव देखते हैं न ताव.
हो खरेच फळे पौष्टिक,रूचकर असतात हे खरे तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिज् देखील असतात.पण हिच फळे खाताना जर आपण काही नियम पाळले तर मला वाटते आपण सेवन करत असलेल्या फळांचा आपल्या शरीराला अपाय न होता फायदाच होईल.
फळं खात असताना आपण हि खुण गाठ मनाशी घट्ट बांधावी कि ती कायम पोट रिकामी असताना एक आहाराचा भाग म्हणून खावी.कारण बरीच मंडळी भरपेट जेवण झाल्यावर फळे कापून खातात,हे असे करणे म्हणजे रोगाना आयते आमंत्रण होय.कारण जेवल्यावर फळे खाण्याने त्याचा विपरीत परिणाम खाल्लेल्या अन्नाच्या पचनावर होऊन रक्तातील ट्रायग्लिसराईड्स देखील वाढतात हे माझ्या वाचनात आले होते जे मला पटले.त्याचा विस्तार येथे करणे अयोग्य होईल.
दुसरा प्रकार म्हणजे हिच फळे दुध,दही,पनीर,चक्का,आयस्क्रीम ह्या सोबत खाणे जसे फ्रूट सलाड विथ कस्टर्ड,शेक्स इ वारंवार खाणे म्हणजे त्वचा रोग,सर्दी,दमा,खोकला,सायनस ह्याला आयतेच निमंत्रण होय.
तसेच काही मंडळींना फळांचा रस पिण्यात भारी रस असतो.पण गरज नसताना असे करणे म्हणजे आपल्या पचन शक्तीवर अतिरिक्त ताण देणे होय.कारण जेव्हा आपण सबंध फळ खातो तेव्हा आपल्या पोटात त्याचा चोथा ज्यास फायबर म्हणतात ते जाते,पण रस काढायला व त्यातून पोट भरायला भरपूर फळे वापरावी लागतात.त्यामुळे सहाजीकच जास्त साखर व पर्यायाने उष्मांक शरीरात गेले कि नाही.त्यामुळे मी तर कायम फ्रूट ज्युसच पिते पण वजन मात्र कमी होत नाही अशी तक्रार करणार्याॅनी हे लक्षात घ्यावे.
तसेच सकाळी नाश्त्याला इतर पदार्थ खाऊन असे पाश्चात्यांन प्रमाणे ज्युस पिणे म्हणजे पोटाचे विकार,अपचन,व वजन वाढीला आयतेच आमंत्रण आहे हे लक्षात असु द्यावे.
म्हणूनच फळे खा पण ते खायचे नियम पाळून बरे का!
ह्या विभागाची माहिती देण्यापुर्वी मला आपणांस हे सांगणे आवश्यक वाटले कारण आपल्या पैकी बरेच जण ह्या अशा चुका फळे खाताना हमखास करत असतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जगण्याची साधी सोप्पी तत्वे - भाग ९६
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग ५२
बायकांनी नमस्कार करायची पद्धत वेगळी. पुरूषांची वेगळी. पुरूषांचा नमस्कार साष्टांग. जमिनीवर पडून आठ अंगांचा स्पर्श जमिनीला करून पुनः उठायचे. नमस्कार जरी देवाला घालत असलो तरी फायदा आपल्यालाच होतो ना ! शरीराला आणि मनाला देखील.
नमस्कार म्हणजे लीनता. शरणागत भाव. माझ्यापेक्षा ज्ञानाने, तपाने, बुद्धीने, वयाने, सामर्थ्याने, अभ्यासाने, जे अधिक आहेत, त्यांच्या समोर नतमस्तक होताना मनातील दोष निघून जातात.
ज्याच्याकडे चाकरी करतोय, त्यांना मालक म्हणून केलेला नमस्कार वेगळा. त्यातील भाव वेगळा. मालकाने दिलेल्या पैशामुळे माझा चरितार्थ चालणार आहे, म्हणून याला नमस्कार करायला हवा. मालकाला खुश ठेवण्यासाठी, मालकाचा अहं सुखावण्यासाठी केलेला हा नमस्कार मनापासून केलेला नसतो.
राजकारणातल्या नमस्काराची रीतच वेगळी. न बोललेलंच बरं. हे नमस्कार म्हणजे नुसती चमचेगिरी ! पक्ष बदलला की व्यक्तीनिष्ठा बदलली. की नमस्कार बदलला.
नमस्कार करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे सॅल्युट. एनएसएसेस चे कॅडेटस, एनसीसी छात्र, स्काऊट गाईडचे कब, बुलबुल्स, मिलीट्रीमधले सैनिक, पोलीस जो नमस्कार करतात, ते सॅल्युट प्रकारामधे येतात. पण नेपाळी गुरखा जो नमस्कार करतो, त्यातला सॅल्युट भाव वेगळा आणि तिरंग्याला जेव्हा कडक सॅल्युट ठोकतो, तो भाव वेगळा. माझा नमस्कार कोणासाठी आहे तेवढा त्यातील भाव वेगळा. काहीवेळा तोंडदेखलेपणा किंवा ड्यूटी म्हणून तर काही वेळा मजबूरी म्हणून ! साहेबाची गाडी येत असते, तेव्हा त्या गाडीला देखील सॅल्युट ठोकावा लागतो.
राजाला करत असलेला मुजरा हा देखील नमस्काराचाच एक प्रकार. कमरेत नव्वद अंशात वाकत, हात जमिनीपासून आपल्या कपाळापर्यतदोन तीन वेळा वरखाली करणे हा राजाला दिलेला सन्मानाचा नमस्कार आहे.
गुरूला करत असलेला नमस्कार फारच वेगळा. गुरूच्या उजव्या पायाला आपल्या उजव्या हाताने आणि डाव्या पायाला आपल्या डाव्या हाताने, आपले हात एकमेकांवर स्वस्तिकासारखे करून केलेला नमस्कार जगात दुसरीकडे कुठेच आढळणार नाही. या नमस्कारातील भाव वेगळा.
एका हाताने कधीही नमस्कार करू नये, असे हिंदु धर्म सांगत असूनही कपाळाला, छातीला आणि दोन्ही खांद्यांना स्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत हिंदुमधे आली. हे केवळ हिंदु धर्माचा अभ्यास नसल्यामुळेच. हिंदु पद्धतीने नमस्कार करण्यामधे देखील शास्त्र आहे. पण आमच्या शालेय अभ्यासक्रमातूनच हे डिलीट केल्यामुळे केवळ हिंदु घरात जन्माला आलोय म्हणून हिंदु. पण इतर धर्मातील लहान लहान मुलांना त्यांनी नमस्कार कसा करावा, का करावा, हे त्या त्या धर्मानुसार, प्रत्येक घरात शिकवले जाते.
आणि बायकांचा नमस्कार कमरेमध्ये वाकून ! नुसतं वाकायचं नाही तर वाकून डाव्या पायाच्या करंगळीपासून उजव्या पायाच्या करंगळीपर्यंत नमस्कार अवस्थेमधे हात वर खाली हलवत अर्धगोलाकार वळायचे ! पोट दाबले जाते, गर्भाशयातील दोष पिळले जातात, कंबर हलवली जाते, खांदे हलवले जातात, पाठीचा कणा, वाकवला जातो, मनगटे सैल करून घेतली जातात, असा नमस्कार केला तर, किती उत्तम व्यायाम आहे हा !
"एक काम धड नीटपणे करता येत नाही" असं म्हणत दोन्ही हातानी टाळी वाजवत बायकोनं कोपरापासून केलेल्या नमस्काराला काय नाव द्यावं हो ? ही कदाचित जागतिक लेव्हलची शंका असेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
16.07.2017
आजची आरोग्यटीप
अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ?
उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं.
सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा तेवढा आतून वहाणारे द्रव पदार्थ जास्ती प्रमाणात जाणार. आणि जेवढा पाईप लहान तेवढा द्रव पदार्थ देखील पुढे ढकलायला जास्ती कष्ट पडणार. हे व्यावहारिक सत्य आपण बघतोच. बरं ही स्रोतसे आतून गुळगुळीत असतील तर आतील पदार्थ पटकन पुढे ढकलला असता. पण स्रोतसे आतुन वरखाली असतात. नुसत्या डोंगर आणि दऱ्या. याकरीता या स्रोतसांमधे लाळेसारखा एक बुळबुळीत पदार्थ सतत स्रवत असतो. यामुळेच तर अन्नाचा गोळा हळुहळू पुढे ढकलला जातो. पण स्रोतसांना चिकटणारे पदार्थ आत गेले तर या स्रोतसांच्या हालचाली थोड्या मंदावतात. आतमधे या आम सदृश पदार्थाचे लेपन झाल्यामुळे यांचा आकारदेखील थोडा लहान होतो. त्यामुळे आतील द्रव ज्या वेगाने पुढे सरकला पाहिजे, त्या वेगाने पुढे सरकत नाही.
दिवसाची मिळालेली सूर्याची उष्णता, या स्रोतसांमधील आतून चिकटलेला कफसदृश द्रवपदार्थ विलयीत करते आणि स्रोतसांचा आकारही वाढवला जातो, आणि अन्न पदार्थ सहजपणे पुढे ढकलायला मदत होते.
हे सर्व काम दिवसा उजेडी झाले तर बरे ना. म्हणून दिवसा जेवावे.
आणि रात्री सूर्य नसल्यामुळे स्रोतसांचे आकुंचन सुरू होते. स्रोतसे संकुचित होतात. आतून वाहाणारा द्रवाहार सावकाश जातो. काही वेळा तर अडकूनच रहातो. त्याला मागाहून येणारा रस चिकटत जातो. थरावर थर लागत जातात आणि स्रोतसांचा आकार आणखीनच कमी होतो. स्रोतसांमधे आतून साठण्याची वृत्ती वाढली की गोळा बनत जातो.
लहान रस्त्यावर ट्रॅफिक स्लो होते, रस्ता मोठा असला तर ट्रॅफिकजामची भीती नसते. म्हणून दिवसाचे अन्न लवकर पुढे सरकते, आणि पचते आणि रात्रीचे उशीरा !
ही संकोचनाची क्रिया होऊ नये या करीता, गती आणि उष्णता दोन्ही गोष्टी हव्यात. हे चक्क भौतिकशास्त्र सांगितलेले आहे.
ग्रंथकार एक सूचना अवश्य करीत आहेत. जर सायंकाळी घेतलेले अन्न चांगले पचले नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागेपर्यंत जेऊ नये. पण दिवसाचे अन्न पचले नसेल तर परत सायंकाळी जेवले तरी ते दिवसभराच्या उष्णतेमुळे पचून जाते.
याचा दुसरा अर्थ सायंकाळी जेवताना नीट विचार केल्याशिवाय जेऊ नये. एवढे लक्ष सायंकाळच्या जेवणाच्या वेळेवर ठेवावे.
कारण,
जंतुंची वाढ देखील रात्रीच्याच वेळी होते.
कारण त्यांचाही रात्रीस खेळ चाले....
हे आयुर्वेदातील जीवशास्त्र..
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.03.2017
१)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे.
२)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो.
३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले.
४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे.
५)अजीर्णाचा त्रास असताना तुप सेवन करू नये.
६)तुपाचा वापर करत असताना नियमीत गरम पाणीच वापरावे.
तुप कोणी खाऊ नये:
स्थूल मेदस्वीव्यक्ती,आमवात,भुकनसणे,
अजीर्ण,जुलाब व कफाचे विकार असल्यास तुप सेवन करू नये.
तूपसेवनाचाअतिरेक केल्यास,मळमळ,
उल्टी,जुलाब व शरीरात अवास्तव चरबी वाढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
आपण आहार का घेतो ?
…..शरीराचं नीट योग्य पोषण होण्यासाठी.
कशासाठी व्हायला हवे पुष्टीपोषण ?
…..शरीरातील धातूंची क्षमता वाढण्यासाठी.
कशाला हवी धारणक्षमता ?
……निरोगी रहाण्यासाठी
Copyright © 2025 | Marathisrushti