स्मरणगाथा : १०

(Gold)
सिंहावलोकन करताना आणि जपून ठेवलेली स्मृतिचिन्हे बघताना मनात कृतज्ञता दाटून येते . अर्ज करून , कागदपत्रे सादर करून आणि अनेकदा पैसे भरून पुरस्कार मिळवण्याचा आत्ताचा हा काळ . पण मला जेव्हा पुरस्कार लाभत होते तेव्हा यातील काहीही मी केले नव्हते , हा विचार माझ्या मनाला सुखावून जातो . कारण तेव्हा अनेक संस्था , व्यक्ती , वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे किंवा त्यांच्या व्यवस्थेतून माहिती मिळवून पुरस्कार देत असत .हा अनुभव अनेकांना त्याकाळात आला असेल .
मला वाटते की लेखन करणाऱ्याला , काम करणाऱ्या सेवाभावी वृत्तीला , सामाजिक कार्यात अखंड गुंतून पडलेल्या व्यक्तीला किंवा जगावेगळं काहीतरी करणाऱ्याला ऐन उमेदीत पुरस्कार लाभला तर उर्वरित आयुष्यात ती व्यक्ती किंवा संस्था अधिक कार्यप्रवण होऊ शकतात .
सतत लेखन करत राहण्याची उर्मी आणि प्रेरणा मला या पुरस्कारांनी दिली , असे म्हटले तर वावगे ठरू नये .
आपण काहीतरी चांगले काम करत असतो आणि कुणी ना कुणी त्याची दखल घेत असतो , हे मी अनुभवलं आहे .