कार्यकाळ: २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९
जन्म: २९ फेब्रुवारी १८९६ मृत्यू: १० एप्रिल १९९५
२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. १९७७ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यानंतर ‘जनता पक्षा’ची स्थापना झाली. बहुमत मिळून या पक्षाचे सरकार स्थापन झाले आणि मोरारजी यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली.
भारताचे चौथे पंतप्रधान म्हणून मोरारजी देसाई यांची ओळख आहे. सुरत जिल्ह्यातील भदेली गावी मध्यमवर्गीय कुटुंबात . त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रणछोडजी हे प्राथमिक शिक्षक होते. मोरारजी यांचे प्राथमिक शिक्षण बलसाड येथे झाले. ते १५ वर्षांचे असताना | त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्याच वर्षी गजराबेन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वडिलांच्या पश्चात कुटुंबाची सर्व जबाबदारी ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांच्यावर पडली. १९१२ मध्ये ते मॅट्रिक व पुढे १९१७ मध्ये मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून ते बी. ए. झाले. १९१८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात उपजिल्हाधिकारी म्हणून ते रुजू झाले. उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन १९३० साली ते महात्मा गांधी यांच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले. त्याबद्दल त्यांना तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. मुंबई प्रांतात गृह व महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केले. १९५२-५६ या काळात त्यांनी जमीन महसुलीबाबत काही सुधारणा करत मुंबई प्रांताची प्रशासनव्यवस्था कार्यक्षम केली. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात व्यापार व उद्योगमंत्री म्हणून प्रवेश केला. यावेळी त्यांनी भारताला कर्ज मिळवून देण्यासाठी विविध देशांना भेटी दिल्या. मंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी लोकपाल व लोक-आयुक्त यांची स्थापना करावी, अशी महत्त्वाची शिफारस त्यांनी केली होती.