(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • भिकारी (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३४)

    “बाबा, ओ बाबा, दया करा.
    जरा ह्या गरीब, भुकेलेल्या भिकाऱ्याकडे पहा.
    साहेब, तीन दिवसांचा उपाशी आहे, साहेब.
    ह्या थंडीत रात्री कुठे आसरा घ्यायचा तरी पांच रूपये द्यावे लागतात.
    मी शपथ घेऊन सांगतो, साहेब मी एका गांवात शिक्षक होतो पण दुसऱ्या मास्तरांनी हिशोबात गडबड केली आणि माझी नोकरी गेली.
    खोट्या साक्षीदारांनी मला बळीचा बकरा केला साहेब.
    एक वर्ष झालं, मला भाडं न भरतां आल्यामुळे मला खोलीही सोडावी लागली.
    मी रस्त्यावर आलो.”
    सरकारी वकिल साठे, यांनी त्यांच्या दारात येऊन ही बडबड करणाऱ्या इसमाकडे पाहिलं.
    त्याचा फाटका काळा कोट, त्याचे दारू पिऊन तांबारलेले डोळे, गालांवरचा लालसरपणा पाहून त्यांना वाटलं की त्यांनी ह्याला पूर्वी कुठे तरी पाहिलं आहे.
    तो छोट्या चणीचा भिकारी पुढे बोलू लागला, “आता तर एक नोकरी पण मला सांगून आलीय पण त्या गांवी जायला प्रवासासाठीही माझ्याकडे पैसे नाहीत.
    साहेब, मला तुम्ही थोडी सढळ हाताने मदत करा.
    तुम्ही उदार वाटतां.
    मला भीक मागायला लाज वाटते पण परिस्थितीने माझां नाईलाज केलाय.”
    तेवढ्यात साठे वकीलांच लक्ष त्याच्या पायांतल्या बूटांकडे गेलं.
    एक बूट कॅनव्हासचा होता तर एक चामड्याचा होता.
    अचानक त्याला कुठे पाहिले होते, हें त्यांना आठवले.
    ते म्हणाले, “काय रे, तुला आठवतंय कां ? आपण परवां लक्ष्मी रोडवर भेटलो होतो ?
    तू तेव्हां मला शाळेत शिक्षक असल्याचं बोलला नव्हतास.
    तेव्हा तू म्हणाला होतास की विद्यार्थी असतांनाच तुला शाळेतून काढून टाकलं होतं ? आठवतंय ?”
    भिकारी म्हणाला, “असं असूच शकत नाही.
    मी शिक्षकच होतो.
    तुम्हाला हवं असेल तर तें सिध्द करायला माझ्याकडे कागदपत्र आहेत.”
    साठे वकील रागाने लाल होत म्हणाले, “खूप झालं तुझं खोटं बोलणं.
    तू विद्यार्थी असल्याचं व तुला कोणत्या कारणाने शाळेतून काढून टाकलं, तेंही तू मला सांगितलं होतंस !
    तुला आठवतंय ? कां सांगू मी ?”
    साठे वकील वैतागाने त्या भिकाऱ्यापासून दूर जाणार होते.
    ते परत रागाने त्याला म्हणाले, “ही लबाडी आहे. उबग आणणारा खोटेपणा आहे.
    थांब, मी तुला पोलिसांच्याच ताब्यात देतो.
    तू गरीब आहेस, भुकेलेला आहेस, हे खरं आहे पण त्यामुळे तुला धडधडीत खोटं बोलायला लाज वाटत नाही ?”
    भिकाऱ्याने दरवाजाला घट्ट धरलं आणि असहाय्यपणे इकडे तिकडे मदतीसाठी पाहिलं.
    तो म्हणाला, “मी खोटं नाही बोलत. माझ्याकडे कागद... कागदपत्र आहेत.”
    साठे वकिल अजूनही रागांतच होते, ते म्हणाले, कोण विश्वास ठेवेल तुझ्यावर ?
    तुझी दया यावी म्हणून तू गांवच्या शाळामास्तरांचं आणि विद्यार्थ्यांच नांव घेतोस !
    हे अगदी नीचपणाचं आहे. वाईट. किळस वाटणारं आहे.
    अशाने उद्या खऱ्या गरजू माणसाला कोणी मदत करणार नाही.”
    साठे वकील त्या भिकाऱ्याला टाकून बोलले.
    त्यांच्या मते तो गुन्हा होता.
    ते संवेदनाशील, सहृदय होते आणि त्यांच्या अंत:करणात गरीबीने नाडलेल्या लोकांविषयी अनुकंपा होती.
    अशांना मदत करायला ते नेहमी तयार असत व त्याचा त्यांना अभिमान होता.
    त्याच्या खोटेपणामुळे त्यांच्या कनवाळुपणाला धक्का पोहोचवला होता.
    ते गरीबांबद्दल शंका न घेतां सढळ हाताने मदत करत.
    ह्याने त्याच्या खोटी कारणे सांगण्याने त्यांच्या त्या विश्वासालाच आव्हान दिले होते.
    भिकाऱ्याने प्रथम स्वतःच्या खोटेपणाचा बचाव केला.
    शपथा घेतल्या मग तो एकदम गप्प झाला.
    त्याची मान शरमेने खाली गेली.
    मग त्याने गळ्यावर हात ठेवत सांगितले, “साहेब, मी खोटंच बोलत होतो. मी विद्यार्थीही नाही आणि गांवचा शाळामास्तरही नाही.
    ह्या सगळ्या कल्पित गोष्टी होत्या.
    मी बँडपथकात एक वादक होतो.
    पण दारू पिण्याच्या व्यसनामुळे मला त्यांनी काढून टाकले.
    मी आता काय करू शकतो ?
    खरं सांगितलं तर मला कोण भीक देईल कां ?
    मी खरं सांगितलं तर भुकेने आणि थंडीने रस्त्यावरच मरेन.
    तुमचं म्हणणं मला कळतय, पटतय पण माझा नाईलाज आहे. मी काय करू ?”
    साठे वकिल म्हणाले, “ काय करावंसं ?
    तू स्वत:लाच विचार, तू काय करावंसं ते ?”
    ते त्याच्या जवळ जाऊन ठामपणे म्हणाले, “तू काम करायला पाहिजेस, काम ! समजलास ?”
    भिकारी म्हणाला, “मी काम करायला पाहिजे, हे म्हणणं ठीक आहे पण मला काम कोण देणार ?”
    साठे वकिल त्याला न्याहाळत म्हणाले, “तू तरूण आहेस, निरोगी आहेस.
    कांही ना कांही काम तुला नक्कीच मिळेल.
    पण तू आळशी, बेवडा आणि खोटारडा झाला आहेस.
    तुझ्या अंगाला दारूचा वास येतो.
    खोटेपणा आणि नीचपणा तुझ्यांत आतून बाहेरून अगदी ठासून भरला आहे.
    त्यामुळे तू भीक मागणं आणि खोटं बोलणं याशिवाय कांही करूच शकत नाहीस.
    तू चांगला वागला असतास तर एक वादक, एखाद्या सरकारी कचेरीत काम करणारा, एखाद्या क्लबमधे काम करणारा झाला असतास.
    तिथे तुला नियमित पगार मिळाला असता आणि कोणतीच अडचण आली नसती.
    तू सध्या मेहनतीचं काम करशील ?
    मला माहित आहे, तुला मजूर किंवा हमाल म्हणून काम करायला आवडणार नाही.
    तू त्या कामांसाठी नाजूक आहेस ना !”
    तो भिकारी कडवटपणे हंसला आणि म्हणाला, “तुम्ही काय बोलता आहांत ?
    मला शारिरीक मेहनतीचे काम कोण देणार ?
    मी दुकानात विक्रेता नाही होऊ शकत कारण तिथे काम करायला चौदा, पंधरा वर्षांच्या मुलांनाच घेतात.
    घरात नोकर म्हणूनही कोणी मला ठेवून घेणार नाही आणि मी कोणत्याही यंत्रावर काम करायला न शिकल्यामुळे कारखान्यांत कोण नोकरी देणार ?”
    “मूर्खपणा ! तुला नेहमी सबबी पुढे करायची संवय लागलीय.
    तू लाकडं फोडशील ?”साठे वकिलांनी स्पष्ट विचारल.
    तो म्हणाला, मी ‘नाही’ म्हणणार नाही.
    परंतु नेहेमीच्या सराईत लाकुडफोड्यांनाच आता काम मिळत नाही.”
    साठे वकिल म्हणाले, “ तू सारख्या सबबी शोधत असतोस.
    कांही काम देऊ केलं की कांही ना कांही सबब सांगू नकार देतोस ?
    लंगड्या सबबी चालणार नाहीत.
    मी स्पष्ट विचारतोय ! माझ्यासाठी लाकडं फोडणार कां ? बोल.”
    भिकारी म्हणाला, “होय, नक्की. मी तुमच्याकडची लाकडं फोडीन.”
    साठे वकिल म्हणाले, “फार छान ! उत्तम. बघूया आपण.” घाईघाईंनी थोड्याश्या आसुरी आनंदाने त्यांनी त्यांच्याकडे स्वैपाकाचं काम करणाऱ्या रागीट वत्सलाकाकूंना स्वैपाकघरांतून बोलावून घेतलं.
    त्या येतांच ते म्हणाले, “काकू, ह्या माणसाला परसदारी घेऊन जा आणि त्याला थोडी लाकडं फोडायला द्या.
    गोंधळात पडलेल्या भिकाऱ्याने खांदे उडवले व तो मुकाट काकूंच्या मागून गेला.
    त्याच्या एकंदरीत अवतारावरून त्याने लाकडे फोडण्याचे काम भुकेमुळे किंवा पैसे कमावण्यासाठी स्वीकारले नव्हते तर तो त्याच्या शब्दांत पकडला गेला होता आणि आता नाही म्हणायला त्याला लाज वाटत होती.
    हें स्पष्ट दिसत होते की दारूचा थोडा फार अंमल असल्यामुळे त्याला अजून ठीक वाटत नव्हते आणि लाकडे फोडण्याची त्याची अजिबात तयारी दिसत नव्हती.
    साठे वकिल घाईघाईने स्वयंपाकघराच्या खिडकीकडे गेले व बाहेर पाहू लागले.
    एका पत्र्याच्या छोट्या खोलीत लाकडाचे मध्यम आकाराचे ओंडके रचलेले होते.
    वत्सलाकाकू आणि त्यांच्यामागून मान खाली घालून पुटपुटत ढकलल्यासारखा जाणारा भिकारी त्यांनी पाहिला.
    वत्सलाकाकूंनी पुन्हां रागाने त्या भिकाऱ्यावर नजर टाकली आणि त्या लांकडाच्या खोलीचे कुलुप काढले व दरवाजा सताड उघडून टाकला.
    काकूंचा आवेश पाहून साठे वकिल मनांत म्हणाले, “काकूंच्या वामकुक्षीत व्यत्यय आल्याने बहुदा त्या भडकल्या असाव्यात.
    किती तिरसट आहेत काकू.”
    मग त्यांना दिसलं की तो भिकारी तिथल्या एका ओंडक्यावर बसला व विचारात गढून गेला होता.
    त्याच्या मास्तरीण बाई असाव्यात अशा पध्दतीने काकू त्याच्यावर पुन्हां खेंकसल्या.
    त्यांनी कोपऱ्यातली कुऱ्हाड आपल्या त्या नकली विद्यार्थ्याच्या पायाशी टाकली आणि बहुदा काकू त्याला लाखोली वाहू लागल्या.
    धडपडत उठून त्या भिकाऱ्याने कुऱ्हाड उचलली व काकूंनी त्याच्याकडे ढकललेला ओंडका त्याने जेमतेम पायांत धरला.
    मग त्याने आपल्या पायावर लागू नये म्हणून जपत कुऱ्हाडीचा घाव ओंडक्यावर घातला.
    तो ओंडका त्याच्या पायांतून निसटला.
    काकूंच्या ओठांच्या हालचालीवरून साठे वकिलांनी ओळखलं की त्यांनी त्याच्यावर आणखी शिव्यांची सरबत्ती केली असावी.
    त्या भिकाऱ्याने तो ओंडका जवळ ओढला व परत पायांत धरला.
    आपले पाय, बूट ह्यांना लागू नये म्हणून जपत त्याने पुन्हा एक घाव घातला आणि तो ओंडका परत त्याच्या पायांतून निसटला.
    एव्हाना साठे वकिलांना त्याची दया वाटू लागली.
    एका प्यायलेल्या श्रमाची संवय नसलेल्या कदाचित आजारी भिकाऱ्याला आपण कठीण काम करायला लावतोय, याचे त्यांना थोडे वैषम्य वाटले.
    पण त्यांनी विचार केला, “असू दे. करू दे त्याला जमेल तेवढं काम.
    मी त्याच्या भल्यासाठीच हें करतोय ना !”
    ते परत आपल्या दिवाणखान्यात येऊन बसले.
    तासाभरानंतर काकूंनी येऊन सांगितलं की लाकडं फोडून झालीत.
    साठे वकिल म्हणाले, “बरं झालं. त्याला तीस रूपये द्या आणि हवं तर दर पंधरवड्यांतून एकदा येऊन गरजेपुरती लाकडं फोडू द्या.
    त्याला म्हणावं तो येईल तेव्हा त्याला कांही ना कांही काम दिलं जाईल.”
    साठे मनांत म्हणाले, “काकूंच्या शिव्यांच्या माऱ्यापुढे त्याच्यासारखा निर्ढावलेला आळशीही अखेर नमला तर !”
    त्यानंतर दर पंधरा दिवसांनी तो येऊ लागला.
    दुसऱ्या वेळी तो धड उभाही राहू शकत नव्हता.
    तरी प्रत्येक वेळी त्याला कांही ना कांही काम दिले जाई.
    बरेचदा लाकडं फोडण्याचं तर कधी परसदारीचा सगळा केर गोळा करण्याचं किंवा सर्व गाद्यांवर काठीने आपटून त्या बडवून साफ करण्याचं.
    प्रत्येक वेळी काकू साठे वकिलांनी सांगितल्याप्रमाणे त्याला तीस, चाळीस रूपये रूपये देत.
    कधी तरी त्याशिवाय एखादा धड सदरा वा विजारही त्याला मिळत असे.
    जेव्हां साठे वकिल त्या शहरातून दुसरीकडे जायला निघाले, तेव्हा त्यांनी सामानाची बांधाबांध करणाऱ्यांबरोबर त्यालाही कामाला बोलावले.
    त्या वेळी भिकारी उदास व गप्प होता.
    तो न पितां आला होता.
    त्याने क्वचितच कांही सामानाला हात लावला.
    तो गाड्यांच्या मागे गेला नाही की त्याने आपण कामांत असल्याचे नाटकही केले नाही.
    तो फक्त थरथरत होता.
    इतर मजूर त्याचा अवतार आणि आळशीपणा पाहून त्याला हंसत होते पण त्याचंही त्याला कांही वाटत नव्हतं.
    सर्व सामान बांधून निघायची वेळ आली तेव्हां साठे वकिलांनी त्याला बोलावले.
    साठे वकिल त्याला म्हणाले, “तू माझं म्हणणं ऐकलसं.
    आज तर तू प्यालेलाही दिसत नाहीस.
    आता तुझी काम करायला हरकत दिसत नाही.
    फार बरे वाटले.
    हा घे तुझ्या आजच्या कामाचा मोबदला.”
    त्यांनी शंभर रूपयांची नोट त्याच्या हातांत ठेवली.
    त्यांनी विचारले, “तुझे नाव काय ?”
    तो म्हणाला, “साहेब माझे नांव किसन”
    साठे वकिल म्हणाले, “किसन, मी तुला ह्या कठीण आणि मेहनतीच्या कामाऐवजी सोपे काम देतो.
    मी देतो ती चिठ्ठी माझ्या मित्राला नेऊन दाखव.
    तो तुला लेखनिकाचे काम देईल.
    पैसेही बरे देईल.
    परंतु पुन्हा दारू पिऊ नकोस आणि मी सांगितलेले लक्षांत ठेव. अच्छा !
    आम्ही आता दुसऱ्या गांवी निघालो.”
    साठे वकिलांना मनापासून आनंद वाटत होता की एका माणसाला आपण विनाशाच्या मार्गावरून परत चांगल्या मार्गावर आणले.
    त्यांनी किसनच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व मित्राला लिहिलेली चिठ्ठी किसनच्या हातात ठेवली.
    त्याचे हात क्षणभर धरले व नमस्कार करून त्याचा निरोप घेतला.
    तेव्हांपासून किसन तिथे परसदारी लाकडं फोडायला यायचा बंद झाला.
    दोन वर्षे मधे गेली.
    एकदा साठे वकिल शहरांतील एका नाट्यगृहाच्या खिडकीवर तिकिटाचे पैसे देत होते.
    त्यांच्यापाठी एक बावरलेला, बारीक माणूस तिकिट काढायला उभा होता.
    त्याने तिकिटाच्या खिडकीतील कारकूनाकडे आपल्या हातातली बरीच नाणी सरकवली व एक बाल्कनीचे तिकिट मागितले.
    साठे वकिलांनी त्याला न्याहाळले व विचारले, “किसन, तू !”
    साठे वकिलांनी आपल्या पूर्वीच्या लाकडे फोडणाऱ्याला बरोबर ओळखले व विचारले, “तू इथे काय करतोयसं ?
    तुझं ठीक चालू आहे ना !”
    किसन म्हणाला, “उत्तम चालंलय साहेब.
    मी आता नोटरीची काम करतो.
    मला महिन्याला दहा हजार रूपये मिळतात.”
    साठे वकिल म्हणाले, “यासाठी देवाचेच आभार मानायला हवेत.
    किसन, तुला मी माझ्या मुलासारखाच मानतो.
    तुझी प्रगती झालेली पाहून मला खूप आनंद झाला.
    मी तुला चांगला मार्ग दाखवला.
    तुला आठवतंय, तू खोटं बोललास म्हणून मी किती बोललो होतो तुला !
    तेव्हा तुला खूप लाज वाटली.
    असो पण आता माझं सांगणं ऐकून तू सुधारलास हे पाहून मी खूप आनंदीत झालो आहे.
    तुला खूप धन्यवाद.”
    किसन म्हणाला, “मीही तुमचा खूप आभारी आहे.
    त्या दिवशी जर मी तुमच्या घरी आलो नसतो तर कदाचित अजूनही रस्त्यावर नोकरी गेलेला शाळाशिक्षक किंवा काढून टाकलेला विद्यार्थी म्हणून मी भीक मागत असतो.
    तुमच्या घराने मला वाचवले.
    मी दलदलीतून बाहेर आलो.”
    साठे वकिल म्हणाले, “तुझे हे शब्द ऐकून मी धन्य झालो.
    खूप आभारी आहे मी तुझा !”
    किसन म्हणाला, “वकिलसाहेब, तुमचे दयाळू शब्द आणि तुम्ही केलेली मदत मी आजन्म विसरू शकणार नाही.
    तुम्ही त्या दिवशी केलांत तो उपदेश योग्यच होता.
    मी तुमचा आणि तुमच्या स्वयंपाकीणबाई वत्सलाकाकूंचा कायम ऋणी राहीन.
    त्या मूर्तिमंत दयेची देवी असलेल्या काकूंवर देवाची नेहमी कृपा राहो.
    तुम्ही सांगितलेत ते मी ऐकलं पण नेहमीसारखं ते पालथ्या घड्यावर पाणी झालं असतं.
    खरं तर त्या वत्सलाकाकूंनी मला वाचवलं !”
    साठे वकिलांनी कुतूहलाने विचारलं, “तें कसं काय ? त्या तर तुला शिव्यांची लाखोली वहात.”
    किसन म्हणाला, “साहेब, त्याचं असं झालं.
    मी तुमच्याकडे लाकडं फोडायला आलो की काकू आपला तोफखाना चालू करत.
    ‘आलास बेवड्या ! ये.
    देवाने वाळीत टाकलेला माणूस आहेस तू ! तरी मेल्या मरत नाहीस !’
    मग त्या माझ्या समोरच्या ओंडक्यावर बसत.
    माझ्याकडे पहात, पश्चात्ताप करत, माझ्याकडे मायेने बघत ओरडत असत. 'अरे, अभाग्या, ह्या जगात तर तुला आनंद नाहीच मिळणार पण मेल्यावरही नरकांत यातना भोगशील.
    अरे बेवड्या, तुझी दोन्हीकडे सुटका नाही, समजलास !'
    काकू नेहमीच असं बोलत.
    तुम्हाला ठाऊक असेलच.
    त्यांची जीभ तिखट होती."
    "त्या माझ्यावर कितीदा रागावल्या आणि कितीदां त्यांनी माझ्यासाठी अश्रु गाळले, त्याला सीमाच नव्हती.
    पण सगळ्यात माझ्यावर कशाचा परिणाम झाला असेल तर तो ह्याचा की हे सर्व असं रागाने बोलत असतांना काकू स्वतःच ती सर्व लाकडं माझ्यासाठी फोडत असत.
    मी खरं सांगू साहेब, तुमच्या घरातल्या एकाही लाकडाच्या ओंडक्याचा एक तुकडा पण मी पाडला नाही.
    काकूच स्वतःच ते सगळं काम पुर्ण करत असत व तुम्हाला येऊन सांगत की ह्याने काम पूर्ण केलं म्हणून.
    असं त्यांनी मला वाचवलं आणि असाच त्यांनी माझ्यात बदलही घडवला.
    त्यांच्याकडे पाहता पाहता मीही बदललो.
    माझं दारूच व्यसनही सुटलं.
    हे कसं झालं तें मी सांगू शकत नाही पण त्यांच ते कळकळीचं टोंचून बोलणं आणि त्यांची ती दयाळू उदात्त कृती ह्यांनी माझ्यात आमुलाग्र बदल घडवला आणि मी हे त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही.
    पण चला, तिसरी घंटा व्हायची वेळ झाली."
    किसनने मला वाकून नमस्कार केला आणि तो बाल्कनीच्या दिशेने निघून गेला.

    -- अरविंद खानोलकर.

    मूळ कथा - द बेगर

    मूळ लेखक - अँटोन चेकॉव्ह (१८६० - १९०४)

    वि.वि.

    डॉक्टर अभिजीत सोनावणे पुण्यात प्रॕक्टीस करतात.
    विशेष म्हणजे ते भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर म्हणुनही काम करतात.
    सोमवार ते शनिवार रोज सकाळी १०-२ वाजेपर्यंत मंदिर / मस्जिद / चर्च/ गुरुद्वारा या ठिकाणी भीक मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर रस्त्यावर मोफत उपचार करतात.

    हे करत असतांनाच त्यांनी भीक मागणं सोडुन काम करावं म्हणुन प्रोत्साहित करतात आणि जे काम करायला तयार आहेत त्यांना झेपेल असं काम देतात.
    भिक्षेकरी ही आपल्यासारखीच माणसं आहेत आणि आपण त्यांना आपल्यात माणुस म्हणुन सामावुन घ्यावं...... ह्याचसाठी त्यांची ही धडपड आहे.
    ह्या धडपडीची दखल म्हणून असाच विचार मांडणारी ही कथा त्यांना अर्पण केली आहे.

    त्यांचा तपशील :

    डॉ. अभिजीत सोनवणे.

    डॉक्टर फॉर बेगर्स

    9822 26 73 57

    abhisoham17@gmail.com

  • डोक्याचे संरक्षण कवच

    बाहेर पाऊस वाढला होता हस्त नक्षत्राला सुरुवात झाली होती शिवाय दोन दिवसा मध्ये नवरात्राला सुरुवात होणार होती. या पावसाचे नक्षत्र मुळे शेतामध्ये भयंकर दलदल झाली होती. सफरातून बाहेर पडायची शिष्ट नव्हती इतका पाऊस वाढला होता त्यावेळी आम्ही सर्वजण आमच्या शेतामध्ये राहायला होतो. या पावसा मध्ये अधूनमधून वाऱ्याची झुळूक आली म्हणजे आंब्याच्या झाडाच्या डाळ्या एकमेकावर आदळत होत्या. सुनबाई च्या ओढ्याला भरपूर पाणी आले होते पूर्वेकडून वाहणारा सुनबाईचा ओढा पाण्याने भरभरून वहातहोता.

  • प्रवास… एक प्रेम कथा

    रिक्षातून प्रवास करत असताना प्रतिभाने विजयचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तू तिचा नाद सोडत का नाहीस ? ती कोठे ?  तू कोठे ?? नाही म्हणायला ती सुंदर आहे पण इतकीही नाही की तू तिच्या प्रेमात पडावं ! तू किती हुशार ! उद्या जग तुझी दखल घेईल !  हे तिच्या गावातही नसेल.

  • कला कशाशी खातात?

    मळकट- कळकट लाकडाच्या एखाद्या तुटलेल्या भागासारखी दिसणारी ती कलिंगडाची फोड एक कलाकृती आहे, हे आम्हाला कस कळणार, हा पवित्रा तिथल्या कर्मचा-यांनी घेतला. त्या कलाकाराला काय बोलाव समजेना.

  • काळोखी गुहेत (कथा २)

    खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती झिंटा. हात पायाच्या कड्या, पुढे आलेले पोट. खोल गेलेले डोळे, डोक्यावर हातात पाण्याची भांडी, खाच खळग्याची जमीन तुडवत एका डबक्याकडे चालल्या होत्या, भांडी कपडे धुवायचे आणी तेच पाणी पिण्यासाठी घेऊन यायचे, रोज ५ किमी चालणे तर कायमचे पुजलेले, पाण्याचे कायमच दुर्भिक्ष, पिण्या करता वेगळे पाणी असू शकते हे माहीतच नाही, विजेचा दीवा कधी पाहिलेलाच नाही, जेवणात भाताची पेज, व सुकी चवळी शिजवलेली, बटाटा कधी पाहिलेलाच नाही.

     

  • प्रवाशाची विचित्र व भयानक पलंगाची गोष्ट – भाग दुसरा (संक्षिप्त रूपांतरीत कथा २१)

    मी खोली तपासली.
    पलंगाखाली पाहिले कपाटात पाहिले.
    खिडकी तपासून पाहिली.
    दार आतून सर्व कड्या लावून घट्ट बंद केले.
    दाराशी एक टेबलही लावले.
    अंगावर रग ओढून पलंगावर झोपलो.
    मला समाधान वाटत होते की मी सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे.
    माझा धनाने भरलेला रुमाल मी उशी खाली ठेवला.
    मला लौकरच लक्षांत आलं की मी झोपू शकत नव्हतो, इतकंच नव्हे तर मी डोळेही मिटू शकत नव्हतो.
    माझे डोळे सताड उघडे होते.
    तापांत असावं असं वाटतं होतं.
    माझ्या शरीरातली प्रत्येक शीर न शीर थरथरत होती.
    मी कधी उशीत तोंड खुपसून तर कधी उताणा पडून, कधी पाय पोटाशी घेऊन, कधी पाय ताणून, कधी हात डोक्यावर धरून तर कधी हात पांघरूणाबाहेर काढून, सर्व प्रकारे झोपून पाहिले.
    पण झोप येईना.
    रात्र बहुदा झोंपेवाचून जाणार होती.
    मी काय करू शकत होतो.
    वाचायला तिथे पुस्तक नव्हतं.
    मनांत नाना विचार होते.
    मनाला सांवरण्यासाठी काही केलं नाही तर भितीतच माझी रात्र जाणार होती.
    खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशांत मी खोलीतील वस्तूंवरून नजर फिरवत असतांना एका लेखकाने अशावेळी काय कल्पना केली होती त्याची मला आठवण झाली.
    त्याने अशाच परिस्थितीत आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीची मनांत नोंद केली होती.
    ती सुध्दा त्या वस्तूच्या मूळ रूपापासून ती आताच्या स्थितीला येईपर्यत तीचा प्रवास कसा झाला असेल त्यासकट.
    म्हणजे खुर्ची, मूळचं झाड, लाकूड, वगैरे.
    पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
    आतांच्या भीतीदायक परिस्थितीचेच विचार मन:पटलावर परत परत उमटू लागले.
    मग मी नुसताच खोलीतल्या वस्तूंकडे पहात राहिलो.
    पहिला दिसत होता तो माझा पलंग.
    कलकत्यासारख्या शहरांत कोणा अस्सल ब्रिटीशाने स्वतःच्या पध्दतीचा बनवून घेतलेला ठोकळेबाज चार खांबी पलंग होता तो.
    अड्डेवाल्याने लिलावात घेतलाय की काय ?
    वरची जाड छतवजा फळी पाहिली.
    पलंगावरचे पडदे पाहिले.
    खोलीत आलो तेव्हा किंवा नंतरही मी पडदे पाहिलेच नव्हते जणू.
    मी प्रतिक्षिप्त क्रियेनेच पडदे दूर सारले होते.
    हात धुवायच्या संगमरवरी स्टँडवरून पाणी टपटप खाली पडत होतं.
    दोन खुर्च्या होत्या.
    त्यावर माझा कोट, पँट पडले होते.
    एक खण असलेले कपाट, त्याच्या पितळेच्या तुटलेल्या कड्या, वेशभूषा करायचं टेबल, त्यावरचा छोटा आरसा, इ. कडे बघत होतो.
    माझं लक्ष मोठ्या खिडकीकडे गेलं.
    नंतर वर टांगलेल्या एका जुनाट चौकटबध्द केलेल्या कुणाच्या तरी मोठ्या चित्राकडे माझी नजर गेली.
    कोणीतरी स्पॅनिश हॅट घातलेला माणूस होता.
    चित्रावरून तरी तो पक्का खलनायक वाटत होता.
    तो वर पहात होता.
    बहुदा त्याला फांशी देण्यांत येत असेल व तो त्या फासाकडे पहात आहे असेच वाटत होते.
    मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात एवढेच दिसत होते.
    ते चित्र जरा उंचावरच होते व मला मान वर करून पहावे लागत होते.
    मी त्याच्या टोपीची पिसे मोजली.
    तीन सफेद तर दोन हिरवी.
    टोपीचा वरचा भाग गोल नव्हता तर कोन करणारा होता.
    कोणी असेल त्याला जर फाशी देण्यात येत असेल तर ती शिक्षा योग्यच असावी असाच त्याचा चेहरा पाहून वाटत होते.
    त्या चित्राबद्दल मी असे विचार करत असताना माझे विचार आणखी भरकटू लागले.
    मला मसुरीला घालवलेली एक रात्र आठवली.
    ती सहलीनंतरची रात्र होती.
    चंद्रप्रकाशात गाडीतून प्रवास करताना पाहिलेलं सर्व निसर्गसौंदर्य मला आठवलं.
    पूर्वी कधी मला त्या रात्रीची अशी आठवण आली नव्हती.
    माणसाच्या ज्या कांही क्षमता त्याला तो अमर असल्याचं भासवतात, त्यांत ‘स्मरणशक्ती’ ही प्रमुख असावी!
    मी इथे विचित्र आणि कठीण अवस्थेत अडकलो होतो, भोंवती सगळी अनिश्चितता होती, कदाचित संकटही,
    आणि मला सर्व संवाद, हंसणं, इ. सह त्या सहलीनंतरच्या प्रसंगांची पूर्णपणे आठवण येत होती, हे नवलच.
    हे नवल केवळ चंद्रप्रकाशामुळे घडलं होतं.
    त्यावेळी एका मुलीने म्हटलेल्या गाण्याच्या ओळीही मला आठवू लागल्या होत्या आणि तेवढ्यांत अचानक तंद्री तुटली.
    मी परत वर्तमानात आलो.
    परत ते त्या स्पॅनिश टोपीवाल्याचं चित्र पाहू लागलो.
    तर अहो आश्चर्यम् !
    मला त्या माणसाचे डोळेच दिसत नव्हते.
    मला वाटले त्याने टोपी डोळ्यांवर ओढली की काय ?
    पण नीट पहातो तर टोपीच दिसत नव्हती.
    नव्हे त्या माणसाचे पूर्ण डोकेच दिसत नव्हते.
    पलंग हलत होता की काय ?
    मी उताणा झोपून वर पाहू लागलो.
    मी वेडा झालो होतो की पुन्हां शुध्द हरपण्याएवढा प्यायलो होतो ?
    की खरंच पलंगाची छताची फळी खाली खाली सरकत होती ?
    नक्कीच, ती फळी माझ्या दिशेने सरकत होती.
    अशीच खाली आली असती तर मला तिने चिरडून टाकलं असतं.
    खरंच फळी सरकत्येय कां बघण्यासाठी मी उशीवरची मान उजवीकडून डावीकडे फिरवली व परत चित्र पाहू लागलो.
    अरे बाप रे !
    आतां तर त्या स्पॅनिश टोपीवाल्याचा फक्त कमरेखालचा भाग दिसत होता.
    मी स्वभावत:च धीट आहे.
    अनेक संकटातून पार पडलो आहे कधीही घाबरून अवसान हरवून बसलो नाही.
    मला ती भुताटकी वाटली नाही.
    तरीही जेव्हा माझ्या लक्षांत आले की लौकरच ती फळी मला बिछान्यातच चिरडून टाकेल तेव्हां क्षणभर मला हतबल वाटलं, भीतीने गार पडतोय असं वाटलं.
    ही मारायची घाणेरडी यांत्रिक पध्दत होती आणि मी झोपलो होतो तिथेच माझा जीव घ्यायला ती फळी भरभर जवळ सरकत होती.
    मी न हलतां, न बोलतां, श्वासही न घेतां वर बघत होतो.
    घाबरल्यामुळे मी बिछान्याला खिळल्यासारखा पडलो होतो.
    तेवढ्यात मेणबत्तीही विझली.
    फळी जवळ येत होती.
    लाकडाचा वास येऊ लागला आणि त्याच क्षणी माझ्या स्वरक्षण करण्याच्या प्रेरणेने मला तंद्रीतून बाहेर काढलं आणि अगदी अखेरच्या क्षणी लोळत, सरकत बिछान्याच्या कडेवरून मी हळूच खाली पडलो.
    फळीचे एक टोक माझ्या खांद्याला पुसटसे चाटून गेले.
    मी गुडघ्यांवर बसून पहात होतो.
    पलंगाचं छत ही साधी फळी नव्हती तर एक मोठी जाड गादीच होती.
    सभोवती लांकडी चौकट होती.
    आतां ती गादी पूर्णपणे खालच्या झोपण्याच्या गादीवर जोराने दाबली जात होती.
    तिच्या वरच्या बाजूला मध्यभागी एक मोठा लांकडी स्क्रू होता.
    ज्याने ती सरकत सरकत खाली आली होती.
    दोन गाद्यांमधे चिरडून मारण्याचं साधं काम्प्रेसर सारखं काम करणार यंत्र होतं ते.
    पंधराव्या सोळाव्या शतकांत ‘इंन्क्विझिशनच्या’ काळांत युरोपमधे लोकांना मारायला वापरायला तयार केलं असावं, असं यंत्र एकोणीसाव्या शतकात बसवलेलं होतं.
    ते अजिबात आवाज न करता खाली आलं होतं.
    माझे विचारचक्र सुरू झाले.
    मी जेमतेम श्वास घेत होतो.
    मला कळत होतं की ही मला मारून टाकण्याचीच योजना होती आणि मनांत पुन्हां भीती दाटून येत होती.
    मला कॉफीतून गुंगीचं औषध देण्यांत आलं असावं.
    परंतु माझ्यावर त्याचा उलट परीणाम झाला होता.
    माझी झोप उडाली होती.
    मला जो ताप वाटत होता आणि त्रास वाटत होता, त्या जागेपणानेच मला वाचवले होते.
    मी किती अंधविश्वासाने तो सैनिक आणि अड्डेवाला यांच्यावर विश्वास टाकून ह्या खोलीत झोपायला आलो.
    माझी जिंकलेली पुंजी सांभाळण्यासाठी मी त्यांच्यावर विसंबून फसलो होतो व चालत त्यांच्याच सापळ्यात येऊन अडकलो होतो.
    माझ्यासारखे जिंकणारे आणखी किती जण असेच इथे मारले गेले असतील, याची कल्पना करवेना.
    अशीच दहा मिनिटे गेली असतील आणि ते छत पुन्हा वर जाऊ लागलं.
    बिलकूल आवाज न करतां.
    त्या दुष्टांना वाटलं असावं की आपलं काम झालं.
    ते वर जाऊन परत आपल्या जागी स्थिर झालं.
    आता तो साधासुधा पलंग वाटू लागला.
    मी माझ्या पायांवर उभा राहिलो.
    कपडे घातले.
    इथून लौकरांत लौकर कसं पळायचं त्याचा मी विचार करू लागलो.
    मी जरा जरी आवाज केला असतां तरी मी मेलो नाही, हे त्यांना कळलं असतं.
    बाहेर कुणाचीही चाहूल नव्हती.
    दारांतून पळून जाणे अशक्य होते.
    दार आतून घट्ट बंद करण्यासाठी मी लावलेले लाकडी टेबल
    सरकवल्यास आवाज झाला असता.
    शिवाय दाराकडील वाट बरीच लांब होती व मी नक्कीच पकडला गेलो असतो.
    सुटकेचा एकच मार्ग दिसत होता.
    तो म्हणजे खिडकी.
    मी आवाज न करतां खिडकीशी पोहोचलो.
    ती घराच्या मागच्या बाजूला उघडत होती.
    मी पहिल्या मजल्यावर होतो.
    अतिशय हलक्या हाताने मी खिडकी उघडली.
    जरासाही आवाज खतरनाक ठरला असता.
    खूनी घरात लक्ष तर ठेवलं जाणारच.
    ती पांच मनिटं मला पाच तासांसारखी वाटली.
    अखेरीस आवाज न करता खिडकी उघडण्यात मी यशस्वी झालो.
    बाहेर पाहिलं.
    त्या उंचीवरून उडी मारणं म्हणजे पुन्हां आत्मघातच.
    एवढ्यांत डाव्या बाजूला मला पाईप दिसला.
    पाईपवरून चढणे अथवा उतरणे हा माझ्या हातचा मळ होता.
    मी ही गोष्ट लहानपणापासून अनेकदा केलेली होती.
    मी एक पाय बाहेर टाकला आणि मला माझी पुंजी ठेवलेला उशीखालचा रुमाल आठवला.
    मी तो सोडून जाऊ शकत होतो पण मला ती पुंजी त्या चोरांना मिळायला नको होती.
    मी परत हलकेच पलंगापाशी गेलो.
    पुंजीसह रुमाल काढून घेऊन मानेवरच्या पट्ट्यात ठेवला.
    क्षणभर दरवाजाबाहेर आवाज आल्यासारखे वाटले.
    पण तो वाऱ्याचा आवाज होता.
    ताबडतोब मी खिडकी ओलांडून पाईपवरून सहज खाली आलो.
    खाली पाय ठेवताच मी जवळच्या पोलिस स्टेशनकडे धाव घेतली.
    मी पोलिस स्टेशनला पोहोचलो तेव्हां तिथे कलकत्त्यांत नुकत्याच झालेल्या व न उलगडलेल्या खूनाबद्दल चर्चा चालू होती.
    माझे मराठी माणसाचे इंग्रजी सुरूवातीला इन्स्पेक्टर साहेब ऐकत नव्हते कारण त्यांना मी प्यालेला इसम वाटत होतो.
    एकूण प्रकार लक्षांत येताच मात्र माझी गोष्ट पूर्ण होण्याच्या आधीच ते उठले.
    पोलिसांची एक तुकडी बरोबर घेतली व ते निघाले.
    इतरांना भराभर सूचना दिल्या.
    इन्स्पेक्टर लहान असतांना प्रथम बाहेर खेळायला जातांना जितके खुशीत होते असतील, तेवढेच ह्या जुगारी अड्ड्यावर छापा टाकण्याच्या कामगिरीवर खूष दिसले.
    पोलिसांनी अड्डयाला घेरले.
    मला एका पोलिसाआड लपवले.
    नंतर त्यानी जुगारी अड्ड्याचे बंद दार ठोठावायला सुरूवात केली.
    ते ओरडले. “दरबाजा खोलून, आमी पोलिस”.
    तेव्हां अनेक कड्या-कोयंडे काढण्याचा आवाज झाला व शेवटी दार उघडले.
    एक भीतीने फिकट पडलेला वेटर समोर आला.
    त्याला ते म्हणाले, “आम्ही इथे आलेल्या मराठी माणसाला पहायला आलोत.”
    वेटर म्हणाला, “तो तर तेव्हाच गेला.”
    इन्स्पेक्टर म्हणाले, “त्याचा मित्र गेला. तो इथेच राहिला.”
    वेटर म्हणाला, “मी शपथेवर सांगतो, तो इथे नाही.
    तो....”
    इन्स्पेक्टर म्हणाले, “ मीही शपथेवर सांगतो, तो इथेच राहिला. त्याला तुमचा पलंग आणि बिछाना आरामदायक वाटला नाही, म्हणून तो आमच्याकडे तक्रार घेऊन आला.
    तो आमच्या बरोबरच आहे.
    आता आम्हांला तुमच्याकडल्या बिछान्यांत ढेकूण आहेत की पिसवा, ते पहायचेय.”
    इन्स्पेक्टरनी त्या वेटरला ताब्यात घ्यायला सांगितले.
    घरांतील प्रत्येकाला, त्या म्हाताऱ्या सैनिकासकट, सर्वांना पोलिसांनी ताब्यांत घेतलं.
    मी ती खोली व पलंग इन्स्पेक्टरना दाखवला.
    त्यांनी तो नीट पाहिला.
    आम्ही बरोबर त्या खोलीच्या वरच्या खोलीत गेलो.
    तिथे कांही संशयास्पद दिसत नव्हतं पण इन्स्पेक्टरनी पाय आपटून चाचपणी केली व एके ठिकाणचा लाकडी तळ फोडायला सांगितला.
    तो फोडल्यावर आंत त्या लाकडी स्क्रूचा वरचा भाग दिसू लागला.
    अगदी उत्तम प्रकारे तो लाकडी दांड्याने खालच्या खोलीतील बेडशी जोडण्यात आला होता. त्याला भरपूर वंगण लावलेले होते.
    यांत्रिक युक्ती वापरून तो एखाद्या प्रेस सारखाच बसवलेला होता.
    इन्स्पेक्टरनी तो कसा वापरतां येऊ शकतो, तेही पाहिलं.
    मग तो चालवण्याचं काम पोलिसांवर सोपवून ते मला घेऊन खालच्या खोलीत आले.
    त्या पलंगाचे छत हळूहळू खाली येऊ लागले होते पण आवाज येत होता.
    मी त्याबद्दल विचारताच इन्स्पेक्टर म्हणाले, “माझे पोलिस प्रथमच हा प्रेस चालवत आहेत. तुम्हाला मारू पहाणारे तो वापरण्यात तरबेज झाले होते.”
    ती व्यवस्था प्रवाशाला दोन गाद्यांत चिरडून मारायसाठीच होती, याबद्दल इन्स्पेक्टरांची खात्री झाली.
    आम्ही पोलिस स्टेशनवर परत आलो.
    सगळ्यांचे जाब जबाब लिहून घेण्यात आले.
    मी इन्स्पेक्टरना विचारले, “तुम्हाला काय वाटते ?
    मला मारण्याचा प्रयत्न झाला तसेच इतर कुणाला मारण्यात आले असेल ?”
    इन्स्पेक्टर म्हणाले, “देशमाने, मी आतापर्यंत दोन डझनाहून जास्त प्रेतं भागीरथी (हूगळी अथवा गंगा) नदीतून काढलेली पाहिली आहेत.
    त्या सर्वांच्या खिशांत आत्महत्त्या करत असल्याची चिठ्ठी असे.
    त्यापैकी बरेच जण ह्या जुगारी अड्ड्यावर जाऊन जिंकलेले प्रवासी कशावरून नसतील ?”
    पोलिसांनी कसून चौकशी केली.
    सर्वांना वेगवेगळे करून प्रश्न विचारले.
    त्यातून स्पष्ट झाले की तो म्हातारा सैनिकच त्या जागेचा खरा मालक होता.
    तो सैन्यांतून पळालेला व कारवाई झालेला होता.
    त्याने अनेक गुन्हे केले होते.
    त्याच्याकडे बराच चोरीचा मालही मिळाला.
    त्याला, अड्डेवाला म्हणून बसणाऱ्याला आणि कॉफी बनवणाऱ्या बाईला त्या पलंगाची व त्याच्या गैरवापराची माहिती होती.
    त्या दोघांना मृत्युदंडाची तर त्या बाईला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.
    इतरांना संशयाचा फायदा घेऊन सोडून देण्यात आले.
    एवढं मात्र नक्कीच झालं की मी तेव्हांपासून जुगार खेळणं सोडलं.
    समाप्त.
    - अरविंद खानोलकर.
    मूळ लेखक : विल्की कॉलीन्स
    मूळ कथा : द ट्रॅव्हेलर्स स्टोरी ऑफ हॉरीबल अँड स्ट्रेंज बेड
    तळटीपः मूळ कथा पॅरीसमधे घडली असे दाखवले आहे. इन्क्विझीशनचा उल्लेख त्यामुळेच आहे. तेराव्या शतकांत धर्मावरून अतिशय कडक शिक्षा फर्मावण्यांत येत व अत्यंत क्रूरपणे अनेकांना वेगवेगळ्या भयानक शिक्षा देऊन मारलं जात असे.
  • गहाण मिशी

    खंडु पाटील मंजे गावातली नामी आसामी व्हती.आजुबाजुच्या दहा पंधरा खेड्यायतं गड्याचा रूतबा व्हता.गावातुन गडी निस्ता चालला तरी गावातल्या बायाबापड्या तटतट उठुन घरात पळायच्या.आलुतेदार बलुतेदार त्याच्या दाराम्होरून जातांनी पायतान हातात घेउन पुढ जातं.आसा गड्याचा रूबाब व्हता.लहानपणापसुन आखाड्यात कुस्त्या खेळुन पाटलानं शरीर कमावलं व्हतं.भल्याभल्या पैलवानांना त्यानं आखड्यातं पाणी पाजलं व्हतं.पंचक्रोशीत लय दिलदार माणुस मनुन प्रसिद्ध व्हता.त्याच्या दारालं आलेला दिन दुबळा कव्हाच रिता गेला नाही.पाटील जसा आडदांड व्हता तसाचं मानी, शब्दाचा पक्का,अभिमानी आन ईज्जतीलं जपणारा व्हता.

  • गोष्ट छोटी – दोन आज्यांची!

    एक आजी , आईची आई . शिक्षण जेमतेम दुसरी तिसरी. तिच्या उमेदीच्या काळात तिने खूप कष्ट केले. त्यावेळी बहुतेक एकत्र कुटुंबात सगळ्या स्त्रियांना करावे लागत. ती माझ्या आठवणीत असल्या पासून दमा वगैरे असल्यामुळे असेल जास्त बाहेर जायची नाही. पण बसल्या जागी कुठे काय चाललय तिला पक्क ठाऊक असायचं. कारण छान नऊवारी साडी नेसणारी ती अगदी पोलीस फाईल मध्ये दाखवतात त्या पद्धतीने दोन-चार लोकांशी एकाच गोष्टीविषयी गप्पा मारून त्यांच्या नकळत तिला हवी ती माहिती बरोबर काढून घ्यायची. इतकी चाणाक्ष !

  • खेड्यातले येडे

    लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्‍या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं.

  • बांगड्यांच्या काचा

    आमच्या समोर ती नवीन नवरी म्हणून रहाण्यास आली असेल मी ८ ते १० वर्षाचा. त्यावेळी टी व्ही वगैरे काही नव्हते . आम्ही मुले-मुली खेळत असू.