(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • जीवाशी खेळ

    डॉक्टरची मनमानी

  • खूप जुने मित्र

    मी आणि ती खूप जुने मित्र आहोत. खूप काही बोलतो, मी भडकतो कधी कधी पण ते तितकेच असते. आज कधी नव्हे तो वर्षा दीड वर्षाने बीअर पीत हॉटेलमध्ये बसलो होतो..

  • एका माणसाची गोष्ट

    एका शेतक-याच्या मुलाची शिकून ही होणारी फरफट व जगण्यासाठीचा संघर्ष शब्दबध्द करणारी लघुकथा

  • अविस्मरणीय क्षण

    आयुष्यात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात, ज्यांची पुन्हापुन्हा उजळणी करावीशी वाटते. काही हक्काची ठिकाणे असतात_ मनाला उभारी देणारी, जगण्याची नवी उमेद देणारी… ज्यांच्या आठवणीत आपण रमून जातो, कधी अभिमानाने उर भरून येतो..प्रसंगी हळवेही होतो. माझ्यासाठी माझी बँक ही त्यापैकीच एक.

  • कारखाना

    पांडबाच्या छपराच्या भोवताली धूर घोटळत होता.निळ्या रंगात वस्ती गुडूप झाल्ती.वस्तीवर सगळ्या घराच्या चुली पेटल्या होत्या.मसाला भाजल्याचा वास येत होता.काहीतरी गोडधोड ,मसालेदार खाण्याचा बेत सार्‍या वस्तीचा असावा असे वाटत होते. वस्ती धुंदाळल्यासारखी भासत होती. काळ्या कॅरीबॅगा वार्‍यानी उडून जात तराडाच्या झाडाला गुतल्या होत्या.येणारा जाणाराच्या नजरा रोखत होत्या.पळापळ वाढली होती.पोर्‍ही-सोरी लगबगीन इकडं-तिकडं पळत होत्या.गोठयातली जनावरं कावरी-बावरी झाली होती.

    रस्ता मात्र झोपलेल्या अजगरासारखा गच्च होता. येणारा-जाणाराची वर्दळ कमीच होती.गावाकडून बगीररोडानं येणारी मोटरसायकल दिसत होती.धुरळा उधळीत येत होती.पँटशर्टातली एकच व्यक्ती गाडीवर होती.मसुबाला वळण घेत ती गाडी नजरेच्या आवाक्यात येत होती.रस्त्यावरच्या बुचाडाजवळ ती थांबली.गाडी स्टँडवर लावून ती व्यक्ती हातात काहीतरी घेऊन येताना वस्तीवरच्या लोकांनी पाहयलं.

    "आमचे सर आल्येत..आमचे सर आल्येत" - सदाची पोर्गी वरडत गेली तव्हा कळल.
    वस्तीवरची लोक जमा व्हायला लागली.गावाचे मास्तर आल्येत म्हटल्यावर वस्ती जागी झाली.
    "या गुरूजी या ." धोतराचा पदर सावरीतच पांडबा पुढं झाला.दोनचार पडल्याले चिपाड उचलून बाजूला करत होता.

    ''ये पोरी सतरंजी आण. तिकडं लपती कशाला.आज शाळात गेली न्हाय म्हणून आलं दिसतय गुरूजी. त्यान्लाबी लई दट्टया असत्यूय वरून.' पांडबा अंदाज बांधत होता.भीताडाला उभी केलेली बाज आडवी केली.गुरूजी जवळ येत होते.तसे पांडबाची गरबड वाढली होती.तोपर्यंत पोरीन सतरंजी आणून दिली.पांडबान झटकली.बाजावर आणून टाकली.गुरूजीकडे इशारा "बसा गुरूजी बसा.'लई दिसा येण केल वस्तीला.ये पोरी बघतीस काय.पाणी आण की तांब्याभरून.आन्‌ ऐक , तुझ्या मायीला म्हणाव.च्या टाक कप-दोन कप ''- पांडबा समजावत होता.गुरूजीनी कागद काढले .पेन घेतला अन लिहू लागले पांढर्‍याफट्ट कागदावर सूर्यप्रकाश पडत होता.पांडबाचे डोळे दिपत होते.मिचमिच्या डोळयाने पांडबा गुरूजीकडं पाहू लागला.तसे गुरूजी त्याला म्हणाले.

    'तुमचं पुर्ण नाव''
    ''पांडू नारायण जाधव''
    ''वय''
    ''चाळीस-पंचेचाळीस करा''
    गुरूजींनी जात न विचारताच तशीच लिहली
    ''का हो गुरूजी कशाला पाहिजी हे सारं?''
    ''ते सर्वेंक्षण असतय शासनाच.आपलं लिहून न्याव लागतय.आम्हाला.''
    'व्हय का ? असुद्या , असुद्या.'
    ' किती माण्सयत घरात सगळी. लहान मोठी ?'
    'लहानी चार आन्‌ मोठी तीन.'आम्ही दोघं नवरा-बायको आन म्हातारी एक.सात करा.'
    'जमीन कितीय ?'
    'आता कशाचीय जमीन ?' -पांडबा हतबल झाल्यासारखा झाला होता.
    'म्हणजे ?'
    ' ती पलीकडं तरटीच्या डव्हाकडं सतरा गुंठे होती ती आन्‌ ही तेवीस गुंठे ..'पांडबाने वाक्य मधीच तोडलं.
    ''एक एक्कर म्हणा की''
    ''आता कशाची एक एक्कर
    मग ?''

    ''काल दिले ना कागद करून.'
    'म्हणजे ! ' गुरूजी कुतूहलाने विचारत होते.
    ' सगळया वस्तीचा ठराव झाला.त्या सनगराला कारखाना काढायचाय.'
    'कसला ?'

    'साखर कारखाना काढायचाय म्हणतूय.सहकारी. आम्हाला पाच हजार रूपये एकरानी पैसे दिले. परत खुटागणिक एकजण नवकरीला घितूय म्हणाला.त्याच्या लईमोठया शाळायेत. दूधाच्या डेर्‍यायत.पेट्रोलचे पंप का फंप काय म्हणतेत त्येय.एकेक पोर्ग चिटाकल तरी बास झालं ना.काय ह्या शेतात ? त्येबी बरडाच . कुसाळबी नीट यायनात. बाजरी कमी आन्‌ कुर्डू वाढलाय नामी अशी गत.ठेवूनतरी काय व्हायचयं. आमच्या त्‌ पाचवीलाच उसतोड आलीय पोरांचतरी कल्याण व्हईल.''

    ''मंग आता मजूरी करू का ?'- गुरूजी स्वत:च्या गालाला हात लावत बोलेले.

    'आम्ही येव मजूर आन त्येव मजूर.पोरांना आरक्षण नाही.शिक्षण नाही.नोकर्‍या नाहीत.जे पुढं गेले त्ये मागच्याला विचारीत न्हायीत.मरणादारी का तोरणादारी अशी आमची अवस्था.म्हणून सगळयानी चकाट सगळया रजिस्टर्‍या दिल्या काल.मोकळे खट्ट झाले.''

    'न्हाय म्हणजे मला काय यातल करायचय पण सहज विचारतो.कारखान्याच्या नावावर दिल्या का वैयक्तीक मालकाच्या?

    "वैयक्तीक दिल्या काही.काही त्याच्या बायकांपोरांच्या नावावर आन काही जणांच्या कारखान्याच्या नावावर...''

    'तुमची ?'
    ''आमची काय , आमची दिली त्याच्या बायकोच्या नावावर''
    ''व्हय का "

    "का काही धोका व्हयील का काय? दोन तीनशे एकर जमीन दिलीय लोकांनी एवढे लोक हैत ना. परत मोठमोठे नेते-पुढारी येणारेत उद्घाटनाला.ती काय कालच बोर्ड लागलाय.तिथं पलीकडं त्ये रचलय ना तिथं. मंत्र्याच्या हातानी भूमीपुजन व्हणारेय."

    "बss रं ! म्हण्जी आता ऊसतोडीला जाण्यापेक्षा कारखान्याचा मालकच झालात म्हणायच तुम्ही.काय नाव म्हणालात कारखान्याचं?"
    "काहीतरी कर्परा का काय दिलय जणू ."
    "इथ नदीच्या नावावर ठेवलयं म्हण.आपून कहयाला हया भानगडीत पडायच.आमचा त्यो भावकीतला पोर्‍या.पमा. जरा शिकला सवरल्याला.हिंडतू फिरतू इकड तिकडं त्योच पुढं व्हवून करतोय सम्दं."
    " पाच हजार एकरानी म्हंजी जरा कमीच भाव झाला न्हाय काय ?"

    "हाय कमीच जरा.पण पोर्ग नवकरीला लागलं.त्यालाबी भरावा लागले आस्ते त्ये वाचले ना."
    "पुढचंबी पाव्हा लागल ना काहीतरी.म्हातारपणाला व्हणारेय का हयो कुटाळ धंदा.तुम्ही कसं पोर्‍ह शिकविता रोजाचा पैका घट्ट . परत आठवडयाला सुट्टी. दिवाळीत सुट्टी.उन्हाळयात सुट्टी."

    गुरूजींनी रंग ओळखला अन्‌ चर्चा आटोपती घेण्याचा प्रयत्न केला.पांडबा फूल मोसममधी होता. काल खरेदीच्या टायमाला च्याऊ-म्याऊ झाल होत. पुरता भारीला होता.त्यामुळं त्याच्या डोक्यातली हवा काही केल्या उतरत नव्हती. वेळ वाढतोय हे पाहून पांडबान तशी हाक दिली.

    " आरं ऊक्काळलाका न्हायी चहा. लवकर आटपा की !" "गुरूजी आता जेवूनच जावा." - बाजावर टेकत गुरूजीला बोलला

    "न्हायी अजुन बर्‍याच घरांना भेटी द्यायच्यात.सर्व्हे लवकर सादर करायचाय.सुमन आली नाही तुमची शाळेत दोन तीन दिवसापासून शाळेत." थोडा वेळ थांबून गुरूजीनी विषय काढलाच.

    'हयोच राडा होता ना दोन तीन दिवस.कुणी आता येईल उद्यापासून.'

    कधी नव्हे एवढया पांढर्‍याफट्ट रंगाच्या गाडया वस्तीला धुळ उधळीत येवून गेल्या होत्या.पांढर्‍या फट्ट कपडयाची पांढरी माणसं कावळ्यासारखे इकडून तिकडं वस्त्यांवर हिंडताना दिसली होती.वातावरण तसं बनवल होतं.गावातले गावपुढारी हाताखाली धरले होते.त्यांना झेड्.पी.,पंचायत समिती,बाजार समित्या,नाहीतर सरपंच सोसायटयाचं गाजर दाखविलं होते.त्ये खूष होते.रात्री -अपरात्री बोलून घेतले होते.काही विरोध करणारे मॅनेज केले होते.रोटी , बोटी अन्‌ नोटाच्या बळावर हे घडत होतं.साखर कारखान्याच काम उद्याच सुरू होतय अस प्रत्येकालाच वाटलं. स्वप्नही पडत होते.वाहनांची वर्दळ वाढणार होती.छोटे-मोठे उद्योग वाढणार होते.सगळे लोक खुशीत दिसत होते.टीका करणारावर गुरकून माघारी बोलत होते. बाया-बापडया , पोर्‍ह - सोर्‍ह सगळयांचा एकच विषय होता. कर्परा सहकारी साखर कारखान्याचा .गुरूजींनी चहा घेतला. पांडबानंबी चहाचे घोट घेतले.नरडयाखाली उतरवले.गुरूजींना म्हणयाचं होत मनात क्षणभर विचारही आले.जर साखर कारखाना नाही झाला तर तुमच्या जमीनी परत मिळतील काय ? ही तुमच्या बापजादयाची इस्टेट . तुमची ओळख कुणी हिरावून तर घेणार नाही ना.याचा तुम्हाला काही मेळ आहे का ? तुमचे माणसं हाताशी धरून तुम्हाला दगा-फटका होऊ शकतो.तुम्ही तसा लेखी करार केलाय का पण गुरूजींनी तोंड आवरलं. काही न बोलताच ते निघू लागले. पांडबामात्र गुरूजींच्या धुसर होणार्‍या पाठमोर्‍या आकृतीकडे टक लावून पाहत राहीला.मागे वळून गुरूजींनी पुन्हा आठवण करून दिली. "तेवढं मुलीला पाठवा उद्यापासून नियमित शाळेत ."

    पांदीच्या बाजून वळणा-वळणाची वाट जाते.केकताडाचे अड्डेच जणू ते.बाजूला त्यांचे अणकुचिदार काटे टोचण्यासाठी टोकत होते .बेशमीचे झाड तर एवढे होते की वाट काढायलासुध्दा जागा नव्हती. अधुनमधून गाजरगवतातून जागा करून जाव लागायच.सगळी रान तणकाटान जुळली होती.मशागती कमी पडायला लागल्या होत्या की काय कोण जाणे ! गुरूजी चालत होते. गाडीजवळ जात होते.चावी चाचपत होते . गाडीवर टांग मारून नाहीसे झाले.समाजाला शिक्षण देणार्‍या शाळेत.

    आज त्या गोष्टीला सात-आठ वर्ष झाले असतील.पांडबा शिर्राच्या बाजारला निघाला होता.मागून पांढरीफट्ट कार हॉर्न वाजवीत येत होती.पांडबा पाठीमाग वळून पाहू लागला. गाडीच्या काचा बंद होत्या.आतला माणूस काही दिसत नव्हता.पण जरा हळूच गाडी आलीय म्हणाल्यावर आपल्या ओळखीचीच कुणाचीतरी गाडी असेल असे त्याला न जाणे वाटलेच.इथून शिर्रापर्यंत लिप्ट मिळाली तर बर होईल असं मनात वाटलं देखील .

    आशाळभूतपणे तो गाडीकडे पाहू लागला.
    "काय पांडबा कुणीकडं ?"- गाडीची काच खाली घेत आतली व्यक्ती बोलली.

    पांडबाला नवल वाटल.गाडीतली माणसं मोठी.श्रीमंत.आपल्या गरीबाला कशाला हाक मारतील.असं मनाशीच पुटपुटला.गाडी अधिकच जवळ आल्यान आतली व्यक्ती टपकळपणे दिसली.

    " ओळखल का नाय ? "ती व्यक्ती पांडबाला जवळची वाटत होती.पण विस्मृती झाली की काय म्हणून डोक खाजवलं

    "बस बस.बाजाराला जायच वाटतं"

    ' हूँ ss निघालोय .म्हण्ल होउन जाईन कामात काम.'-पांडबा सांगायला लागला.

    "म्हण्जी ?.''

    " आज तहेशीलीवर मोर्चा हायी.पण म्या नाय ओळखिल तुम्हाला."
    " मी तुमच्या गावात नवकरी केली.बरेच दिवस.प्राथमिक शाळेला नव्हतो का ? सर्वे करायला यायचो.तुमची मुलगी शिकली राव माझ्या हाताखाली."

    "व्हय,व्हय आता आलं ध्यानात.हल्ली मला असंच होतय बघा.ध्यानात त्‌ असतय पण ध्यानातबी येत न्हाय. बरं कसे कायेत तुमचे पोर्‍ह बाळं?'

    'बरेयत सगळे.आता बीडलाच गेलोत र्‍हायाला.पोरांची बी सोय लागती.नोकरीला जायला काय आता गाडी घेतलीय.चार-दोन आमचे जोडीदार सीटावारी आणायचे.डिझेलच भागतय.'

    'शाळासाठी गेलात व्हय.'
    ' हूँ..काय म्हणत होता कसला मोर्चाय. ?'
    'काय धोका झाला बघा.'
    ' म्हण्जी ?'
    'साखर कारखान्याच्या मालकांन दिला ना धोका.'
    ' व्हय का ? मंग..'
    'लुबाडली सारी जमीन.नवकर्‍या गेल्या मातीत.अन्‌ शेर्स गेले मातीत.दिवसा लुटलंय आम्हाला."
    "मधी तर उद्घाटन झाल्त त्याचं."

    "मस्स झाल्त उद्घाटन.मंत्री-संत्री झाडून सारे पुढारी आल्ते.नरडं ताणूस्तर भाषणं दिल्ती.आठ दिसात काम सुरू करतोत म्हणत सगळ्यांनी मिळून जत्रा केली आमच्या रानांवर अन्‌ दुसरं काय ? उघड्यावर आलोत आम्ही."

    "मंग आता काय म्हणतोय तो.कारखाना झाला नाही त्‌ शेतकर्‍याची जमीन परत द्यावा असा कायदाय."
    "स्वत:च्या , बायकापोरांच्या नावावर करून घेतली जमीन त्यानं. नाकब्लीला आलाय आता.द्यायची नाही म्हणतोय.दिवाळं निघालं म्हणतोय.काय करता येतय आता.लुटलं म्हणायचं दिवसा."

    "म्हणून मोर्चा काढलाय का काय ?"
    "सगळे जमून देणारेयत निवेदन.म्हण्लं आपलं सगळ्याबरोबर र्‍हावा हजर."
    "मधी काहीतरी चाललं व्हतं ना माघारी द्यायचय.माघारी द्यायचय म्हणून."

    "आमचा म्होरक्या. चोरांवर मोर झाला. मोर्चा काढायला लावायला त्योच.पैसे खाउन म्यानेज व्हणारा त्योच.आमच्या भांडवलावर त्याची झाली मांडी ओली. लाख -दोन लाख घेतले त्याच्याकडून झाला मिंधा.दिलं सोडून वार्‍यावर.सगळा खेळच बिघडलाय.."

    "व्हय.."

    "नितीमत्ताच र्‍हायली नाही. मधी आमच्या भावकीतल पोर्ग जमिनीसाठी भांडत होत.त्या पोराला त्यांनीच पुढं केल.कोण्त्यातरी समितीवर घेतल.त्येबी येड झालं खुश .जमिनी र्‍हायल्या की तशाच.कोणत्या धुंदीत वागत्येत लोकं कुणास ठाऊक. धा-पाच प्यायाला दिले की भाळले त्याच्यावर.आजचा मोर्चा तसाच प्रकार व्हायचा."

    गुरूजी आता शहरात जावून सर झाले होते.सर गाडी चालवीत होते.मागे कान देउन ऐकत होते.माझ्या समोर हा प्रकार घडला. या गरीब लोकांचे संसार बघता बघता उघड्यावर आले याची त्यांना चुरचूर लागली होती.मनात अनेक विचार येत होते.पण आपण सरकारी नोकर आपल्याला काय करता येतय ? याच्यात नाही तर लढा, उभारला असता.उपोषण केले असते.शेतकर्‍यांची भाकरी त्यांना मिळवून दिली असती.सारं जीवन कसं साचेबंद झालय याचा विचार केला अन गुरूजी मनातल्या मनात शांत झाले.अस्वस्थता पुन्हा वाढत होती. बाजारकर्‍यांची वर्दळ वाढली होती.जनावराचे टेंम्पो भरून बाजाराला येत होते.थोडे अंतर कापून गेले की तहसिल येणार होती. स्टेंरीगवर हात फिरवत गुरूजी बोलते झाले.

    "पांडबा, तुम्ही लढा तुमची जमीन तुम्हाला परत मिळेल'.सगळे एक्या जागंवर या. कुणी फूटू नका.मोहाला बळी पडू नका.कोर्ट प्रकरण करा.नियमान तरी जमीन परत मिळायलाच पाहिजे."
    हे शब्द सरांचे एकले की पांडबाला हायसे वाटले.गुरूंजीवरच्या विश्वासापोटी शब्दावर विश्वास बसला. आपली जमीन नक्की परत मिळेल आपला संघर्ष संपेल.अंधुकशी किनार आशादायी वाटली.पोरांबाळांचा घास तरी त्यांना मिळेल.असं उगीचच वाटून गेल.गाडी पुढे पुढे जात होती.तशी पांडबाला उतरण्याची घाई झाली होती.पण तरी गुरूजीबद्दल काहीतरी बोलाव म्हणून बोलला.

    " गुर्जी ,या एकदा गावाकड.पुढच्या महिण्यात हरिनाम सप्ताह गावात.मोठमोठे महाराज येणारेत किर्तनाला.नावाजलेले गायक-वादक सम्दे येणारेत.वर्गणी-फिर्गणी सम्द झालय."

    "हो , येईन की मला बर्‍याच दिवसापासून यावा वाटतय.पण काही निमीत्त नव्हत येईल सप्त्याला.किती किती दिली वर्गणी."

    "माणसी हजार दिल्येत."
    " व्हय का !"
    "परत लाल्याचे पैसे आले होते सरकारचे बँकीत.त्ये सम्द्यांनी सहया-आंगठे करून दिले सप्त्यावाल्याला."
    "बरं, मंग तर बरेच जमले असतील."

    "हूँ सगळा लाखातच खर्च म्हणायचा"
    "परत त्ये कुपनावरचा गहू - तांदूळ कुणीच उचलला नाही.तो तसाच तिकडं वळती केलाय.मोठा सप्ता होणारेय.या बरका तुम्ही, तेवढयाच गाठी-भेटी व्हत्यात."
    "बरंय, येईन बरं.किर्तन ऐकेल मंग तर झालं."

    पांडबा चर्चा करत होता.तहसिल जवळ येतय का ते पाहत होता.न झालेल्या कारखान्याची जमिनी आता परत मिळती का काय अस झाले होत.स्वप्न डोळ्यासमोर दिसत होते.
    " पोर्‍ह काय करत्येत आता."-गुरूजींनी विषय काढला.
    "मोठ जातय बांधकामावर"

    "म्हंजी,शिकले न्हायीत का काय पुढं."
    " शिकले पण नोकरी काय लागली नाही जातेत आता थापी घेउन .कधी बिगारकाम करत्येत.कधी दुकानावर कामावर जातेत.पोट भरायचे म्हणल्यावर कराव लागतय काहीबी."
    "बरं बरं तहसिलजवळ उतरायच ना आता."

    "हूँ.बघतो ना कुणी मोर्चेकरी आल्येत का त्ये.आला असला तर तिथच त्यांच्यात थांबतो.ह्यो तिढा काय लवकर सुटन अस वाटत नाही."

    तहसिल जवळ आल होतं.गाडी थोडी उताराला लागली.रस्त्यावरच्या खड्डयात आदळली.पण गाडीचे सीट मजबूत होते.मउशार सीटावर माणूस आदळत नव्हत.परत आलेला घाम पार कमी झाल्ता.गा र वाटत होत.एसी चालू केल्यामुळ काचा बंद झाल्या होत्या.काचातून बाहेरच दिसत होतपण आतलं दिसत नव्हतं.न झालेल्या कारखान्याचा बोर्ड मात्र स्वप्नात आल्यासारखा भासत होता.गाडीचं ब्रेक कचकन दाबल गेल.एक दचका घेउन गाडी थांबली.दार उघडल गेलं.पांडबा गाडीतून उतरला.हात जोडून उपकार झाल्यासारखे वाकून निरोप घेतला.गुरूजीची गाडी भुर्रकन निघून गेली.नोकरदार गाडीत अन्‌ शेतीचा मालक उघडयावर अशीच गत झाल्ती.पण त्यांनी तरी आपल्याला लिप्ट दिली.आपली चौकशी केली म्हणून काहीसे दु:ख कमी झाले नसता बाकीचे साले तसेच कट मारून पुढे जातात अनेक प्रश्न मनात उपस्थित होत होते.

    हळुहळू माणसं गोळा होत होती.एकमेकांशी चर्चा करत होती पांडबा त्या गर्दीत सामील झाला होता.घोषणा काय द्यायच्या याचा सराव होत होता.उन्मळून पडण्यापेक्षा इथ ताठपणे उभं राहणच बर असं वाटून गेलं.एक दोन नेहमीचेच कार्यकर्ते झगे घालून तयार होते.घोषणांचे फलक आणले गेले.कर्मचारी जिल्हयावरून पांढत्याफट्ट गाडयात येत होते. उतरत होते.आफिसात जात होते.पांडबाला मनात वाटल आपलं काट्ट शिकल असतं तर असच गेल असत हाफीसात.

    मोर्चा निघाला.'आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. देणार कशा नाहीत? घेतल्याशिवाय राहणार नाहीत.एक , दोन,तीन,चार...'....परिसर दणाणून गेला होता. निवेदन दिल गेल.तुमच्या भावना मी वरीष्ठांपर्यंत पोहोचवतो.एवढे आश्वासन मिळाले.मागं पोलीस .पुढं पोलीस करत मोर्चा संपन्न झाला.

    मोर्चा, निवेदन यातच दिवस गेला. बाजार संपला.पालं उठली. भाजीपाल्यावाले परत गेले.पांडबा भानावर आला. बाजार करायचा तसाच र्‍हायला. सूर्य डोंगरावर टेकला आता कसला मिळतोय बाजार ? या विचारांन डोक्यात प्रकाश पडला.गुलाल खांदयावर टाकलेले बैल परत जात होते.काही बैलाचे मालक बदलले होते.काहींचे ते तसेच होते काही बैल टेंपोत भरून चालले होते.तर काहींच्या नशीबी पायी चालणे आले होते.वाहनं माघारी घराच्या वडीनं निघाली होती. ही वाहनं निघून गेली की आपल्याला घरी जायला सुध्दा काही मिळणार नाही.पांडबाच्या मनात आले आता घर गाठलेलेच बरे. म्हणून तो रस्त्यावर आला. वाहनाला हात करत होता.पण गच्च भरलेल्या वाहनात पांडबाला कुणीच जागा देईना.

    झाकड पडली होती. वाहनांचा उजेड भक्कदिशी पांडबाच्या अंगावर पडायचा.डोळे दिपायचे.भूंगे किलकिले डोळे करून आशाळभूतपणे वाहनांकडे पाहत होता.पण एकही वाहन उभे राहीले नाही.एकतर पांडबाच सीट त्यांना परवडणार नव्हतं.दुसरं म्हणजे त्यांच्याकड जागाच शिल्लक नव्हती.काय कराव ? काय कराव या विचारात पांडबा तसाच तडा-तडा पायी निघाला.घामाघूम होत चालतच होता. घराच्या वडीनं,पोर्‍ह अन्‌ लेकराबाळांत जाण्यासाठी...

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार,जि.बीड-4132449
    मो.9421442995
    vitthalj5@gmail.com

  • घर हरवलेला पोलीस

    घर हरवलेला पोलीस

    शासकीय विभागातच नाही तर खाजगी क्षेत्रातसुध्दा काही ठिकाणी कामकाज चोवीस तास चालू असतं. परंतु अशा क्षेत्रात आठ किंवा बारा तासांच्या शिफ्टमध्ये कामकाज चालतं. काही क्षेत्रात तर फक्त दिवसा काम चालतं. रात्री कार्यालयं बंद असतात. अनेक अशी सरकारी कार्यालयं आहेत, ज्या ठिकाणी जनतेशी निगडीत कामकाज चालतं, पण ते फक्त दिवसापुरतं मर्यादित असतं.

  • चमेली! (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३६)

    चमेली! (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३६)

    चमेली! (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३६)

    गांवठी व डॅशहाउंड ह्यांच मिश्रण असलेली, कोल्हाच वाटणारी कुत्री फुटपाथवर अस्वस्थपणे फिरत होती.
    मधेच भूंकून आणि पंजे चाटून आठवत होती की ती घरी जायचा रस्ता कसा विसरली ?
    आजचा दिवस कसा गेला तें आठवत होते पण शेवटी ती ह्या अनोळखी फूटपाथवर कशी आली ?
    सकाळी कोंड्या सुताराने, लाकडाची वस्तु कागदात गुंडाळून कांखेत मारली आणि तो तिला म्हणाला, “चल, चमेली.”
    ताबडतोब ती खुर्चीखालून बाहेर येऊन आळस झटकून मालकामागे धांवली होती.
    कोंड्याचा ग्राहक दूर रहात होता.
    वाटेत कोंड्याने संवयीप्रमाणे दोन गुत्त्यांमधे ताकदीसाठी दोन प्याले रिचवले.
    चमेलीला आठवले रस्त्यात ती अगदी चक्रमपणे वागली.
    बाहेर फिरायला आणल्याच्या आनंदात उड्या मारल्या, गाड्यांच्या मागे भुंकत धांवली आणि तिने रस्त्यावरच्या कुत्र्यांना पळवून लावले.
    ती कोंड्याच्या नजरेआड झाली की तो ओरडे, “कुठे गेली बदमाष ! चल सरळ !”
    कोंड्याचं काम झाल्यावर तो बहिणीच्या घरी गेला.
    तिथेही प्याला, कांही खाल्ले आणि एका पुस्तकं बांधणाऱ्याकडे गेला.
    तिथून खानावळीत व नंतर एका मित्राकडे गेला.
    संध्याकाळपर्यंत कोंड्याने बरीच दारू ढोंसली होती व तो धड चालू शकत नव्हता.
    तो तत्त्वज्ञान बरळत होता, “माणसाची सगळी मस्ती जीता असेपर्यंतच, मेला की फक्त राख.”
    मधेच चमेलीला म्हणे, “चमेली, तू एक क्षुद्र प्राणी आहेस. माणसासमोर तू म्हणजे एखाद्या मोठं कपाट बनवणाऱ्या कारागीरापुढे एक छोटी घडवंची घडवणारा सुतार.”
    एवढ्यांत बँडचा आवाज येऊ लागला.
    सैनिकांची संचलनाला निघालेली तुकडी त्यांच्याकडेच येत होती.
    तो आवाज चमेलीला असह्य वाटला.
    चमेलीचं धैर्य गळालं, ती गोल गोल फिरत भुंकू लागली.
    तिला कळेना की तिचा मालक सैनिकांकडे आनंदाने कां पहात होता आणि त्याने सलाम कां ठोकला ?
    ती जोरांत भुंकत पलिकडल्या फूटपाथवर पळाली.
    ती भानावर आली, तेव्हां बँड गेला होता पण मालकही गायब होता.
    ती डावीकडे, उजवीकडे, समोरच्या फूटपाथवर सगळीकडे मालकाला शोधून आली पण त्याला जणू जमिनीने गिळले असावे.
    ती जमिनीचा वास घेऊ लागली पण तिथून बरेच लोक जाड बूट घालून गेल्यामुळे मालकाच्या पायांचा वास नाहीसा झाला होता.
    तिथे रबराचाच वास येत होता.
    तोपर्यंत रात्र झाली.
    रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवे लागले.
    घोडागाड्या, हातगाड्या, भराभर जात येत होत्या.
    फूटपाथवर माणसांची वर्दळ वाढली होती.
    अनोळखी माणसे उगाचच ये जा करून तिला अडथळा करत होती.
    तिने माणसांची वर्गवारी मालक आणि ग्राहक अशी केली होती.
    कोंड्याला तिला बोलायचा, मारायचाही अधिकार होता. ग्राहकांना नाही.
    जाणारे, येणारे तिला पायांनीच ढकलू पहात होते आणि ती त्यांच्या पायाला चावू पहात होती.
    माणसांची गर्दी कमी झाली.
    चमेली फिरून आणि भुंकून थकली.
    थंडी वाढली होती.
    ती जवळच्याच घराच्या दाराशी गेली आणि मुटकुळे करून झोपली.
    दिवसभरांत एकाकडे एक बिस्कीट तर खानावळीजवळ एक मांसाचा छोटा तुकडा एवढचं खाल्ल्यामुळे ती भुकेली होती.
    ती माणूस असती तर म्हणाली असती, “एवढ्यावर कशी जगू, त्यापेक्षा जीव देते.”
    थकव्यामुळे तिला डुलकी लागली तोंच दरवाजा उघडला.
    दरवाजा तिला जरासा लागला आणि एक माणूस बाहेर आला.
    ती कूं कूं करत त्याच्या पायांत घोटाळली आणि त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
    त्याने खाली वांकून तिला विचारले, “अरे, भू भू, तूं कुठून आलीस ? लागलं कां तुला ? माफ कर. अशी रागावू नकोस, ये.”
    चमेलीने त्याच्याकडे पाहिलं.
    तो गुबगुबीत इसम बाहेर चालला होता.
    त्याने टोपी घातली होती.
    चमेलीला त्याची भाषा कळली नाही पण आवाज आश्वस्त करणारा वाटला.
    ती त्याचा हात चाटू लागली व करूणपणे कूं, कूं करू लागली.
    तो म्हणाला, “मजेशीर आहेस तू ! कोल्हा वाटतेस अगदी ! कधी तरी उपयोगी येशील.”
    त्याने तिला खूण केली. “चल माझ्या बरोबर !”
    तें चमेलीने ओळखलं.
    चमेली त्याच्यामागून गेली.
    पंधरा वीस मिनिटांनी ती एका मोठ्या खोलीत होती.
    तो डायनिंग टेबलाशी बसला होता आणि ती मान एका बाजूला कलती करून त्याच्याकडे कुतूहलाने पहात होती.
    तो जेवताना अधून मधून तिच्याकडे चपाती, चीज,मांसाचे तुकडे, कोंबडीची हाडकं असं कांही टाकत होता.
    जे पडेल ते ती पटापट खात होती.
    जशी खायची तशी तिची भूक वाढायची.
    तिचं तें भराभरा खाणं पाहून तो म्हणाला, “तुझा मालक बहुदा तुला खायला पुरेसं देत नसावा !
    किती हडकुळी झालीयस तू ?”
    चमेली खाण्यात मग्न होती.
    खाऊन ती समाधानाने बसली व शेपूट हलवू लागली.
    मालक आरामखुर्चीत बसला असतांना चमेली विचार करत होती की सुताराकडे ती बरी होती की इथे बरी आहे ?
    ह्याच्या खोलीत फारच थोडे सामान होते.
    कोंड्या सुताराकडची खोली वस्तूंनी भरलेली होती.
    शिवाय व्हार्निशचा सुंदर वास यायचा.
    तिथे बसायला किती जागा होत्या.
    पण ह्या माणसाकडे खायला खूप असावं.
    तो बाजूलाच सिगार ओढत बसला असताना एकदाही तिच्यावर डाफरला नाही.
    कोंड्या सुताराने एवढ्या वेळात दहादा शिव्या देऊएकदा तिचा उध्दार केला असता आणि एखादी लाथही पेकाटात घातली असती.
    मग तो परका इसम बाहेर जाऊन एक दरी घेऊन परतला.
    ती त्याने कपाटाच्या बाजूच्या कोंपऱ्यांत अंथरली आणि म्हणाला, “ये, इकडे. ह्याच्यावर झोंप.”
    चमेली जाऊन मऊ दरीवर झोंपली.
    तो दिवा घालवून खोलीतून गेला.
    चमेलीला झोपेत मधेच कुत्र्यांचे भुंकणे ऐकू आले.
    ती प्रतिसाद देणार होती पण एकदम आपल्यावर आलेला प्रसंग आठवून दुःखी झाली.
    तिला चुकल्या-चुकल्यासारखे वाटू लागले.
    कोंड्याचा नाठाळ मुलगा बबन्या तिला आठवला.
    ती अशी बसली की बबन्या तिच्याशी खेळायला येई.
    त्याचे खेळ तिचे डोळे पांढरे करत.
    मालक बाजूला आराम करत असे.
    बबन्या तिचे मागचे पाय धरून तिला बांकाखालून ओढून बाहेर काढी.
    मग तिला धरून फक्त मागच्या दोन पायावर चालायला लावी.
    तिला उचलून घंटा हलवावी तशी हलवे.
    तिला सिगारच्या तंबाखूचा वास घ्यायला लावी.
    चमेली ह्या विचारांतून लौकर बाहेर आली आणि पेंगू लागली.
    स्वप्नात तिने कितीतरी कुत्रीं पाहिली. माणसे पाहिली.
    ती आणि बबन त्या माणसांच्या मागे धावत होती.
    मग अचानक बबनही कुत्रा झाला व त्या माणसांवर भुंकू लागला.
    दोघानी एकमेकांच्या नाकाचा वास घेतला मग दोघं मजेत धांवत सुटले.
    सकाळी चमेली जागी झाली तेव्हां खोलीत एकटीच होती.
    तिने खोलीच्या सर्व कोपऱ्यांचा वास घेतला.
    लक्ष घालण्यासारखं काहीच तिला मिळालं नाही.
    तेव्हा खोलीच्या दुसऱ्या दरवाज्यावर तिने खुडबुड केली आणि जरा छातीने ढकलला तर तो उघडला.
    आंत तोच इसम झोपेत घोरत होता.
    एक दोनदा भुंकून तिने त्याला जागं करायचा प्रयत्न केला मग तो नाद सोडून दिला.
    खुडबुड करून तिने त्याही खोलीचा दुसरा दरवाजा उघडला.
    आत जाताच तिला वेगळाच वास जाणवला आणि सावध होऊन ती थबकली.
    खोलीच्या भिंतीना ठिपके ठिपकेवाला कागद डकवला होता.
    चमेली आत शिरताच एक राखी रंगाचा हंस पंख पसरून आवाज करत तिच्या अंगावर आला.
    त्याच्या जवळच एक केसाळ मांजर होते.
    चमेलीला पहातांच त्याने अंगावरचे केस फुलवले, डोळे वटारले आणि पाठ फुगवून तें ही “फीस्स्” आवाज करू लागले.
    चमेली जरा घाबरलीच पण ते बाहेर न दाखवतां भुंकत ती मांजराच्या दिशेने पुढे जाऊ लागली.
    मांजराने आपली पाठ आणखीच धनुष्यासारखी वांकवली व फिस्कारत आपला पंजा चमेलीच्या डोक्यावर हलकेच मारला.
    चमेलीने मागे उडी घेतली व मध्येच बसून ती कर्कश भुंकू लागली.
    तोपर्यंत मागून येऊन हंसाने आपल्या चोचीचा प्रसाद चमेलीला पाठीवर दिला.
    चमेलीने हंसावर उडी मारायचा प्रयत्न केला.
    तो इसम आत येऊन ओरडला,“काय चाललंय ? ह्या गडबडीचा अर्थ काय ? चला, आपापल्या जागेवर जा.”
    मांजराकडे जाऊन थोपटत तो म्हणाला, “काय मन्या ! तुला लढाई करायचीय ? चल गप्प बस बघू.”
    मग हंसाकडे वळत म्हणाला, “हंसराज, तुझ्या घरात जागेवर जा बघू.”
    मांजर आपल्या दरीवर आडवे झाले व त्याने डोळे मिटून घेतले.
    त्याच्या चेहऱ्यावरून त्याला उगीच चिडल्याचा पश्चात्ताप होत होता.
    चमेली गुरगुरत होती तर हंसराज भराभर आवाज करून मालकाला बरंच कांही आपल्या भाषेत सांगत होता.
    मालक म्हणाला, “ठीक आहे, ठीक आहे पण तुम्ही मित्र बनून शांततेने राहिलं पाहिजे.”
    मग चमेलीला जवळ घेत तो म्हणाला, “आणि तू घाबरू नको. ते चांगले दोस्त आहेत. ते तुला त्रास नाही देणार.
    अरे, तुला कांही तरी नाव द्यायला हवं. हं ! तुला आपण आंटी म्हणूया. ठीक आहे, आंटी !”
    मग पुन्हा पुन्हा आंटी म्हणत तो बाहेर गेला.
    चमेली बसली आणि पाहू लागली.
    मन्या दरीवर डोळे मिटून झोपल्याच सोंग करत होता.
    हंसराज पाय आपटत मान उंच करून भराभर कांहीतरी बोलतच होता.
    तो हुशार असावा.
    एक लांबलचक भाषण करून एक पाऊल मागे जाऊन आपल्याच भाषणावर खूष झाल्याचं दाखवायचा.
    त्याच्या बोलण्याला गुर्रर्र ची साथ देत चमेली बसली होती.
    मग ती उठली आणि तिने सर्व कोपरे हुंगले.
    एका कोपऱ्यात एका वाडग्यांत पावाचे तुकडे आणि वाटाणे पडलेले होते.
    चमेलीने दोन तुकडे खाल्ले.
    आपलं खाणं चमेली खाते आहे म्हणून हंसराजला बिलकुल राग नाही आला.
    तो अधिक उत्साहाने बोलू लागला व त्यानेही येऊन कांही वाटाणे खाल्ले.
    कांही वेळानंतर तो इसम परत आला.
    त्याने बरोबर कांहीतरी विचित्र वस्तु आणली होती.
    ती दोनच्या आकड्यासारखी होती.
    मधोमध दोरी बांधलेली घंटा होती.
    तिथे एक पिस्तुलही होते.
    त्याने ती वस्तु खोलीच्या मधोमध ठेवली.
    मग त्याने हंसराजला बोलावले.
    हंसराज पुढील आज्ञेची वाट पाहू लागला.
    तो इसम म्हणाला, “हंसराज, प्रथम सर्वांना वांकून नमस्कार कर. व्यवस्थित.”
    हंसराजने मान प्रथम उंच करून चारी बाजूना फिरवली मग पाय दुमडत मान झुकवली.”
    तो इसम म्हणाला, “खूप छान ! आता मरून जा.”
    लागलीच हंस पाठीवर उताणा झोपला व पाय वर करून पडला.
    अशाच आणखी कांही गोष्टी करून दाखवल्यावर तो इसम ओरडला, “आग, आग, बचाव.”
    हंसराज त्या वस्तूकडे गेला व दोरी धरून जोरजोरात घंटा हलवू लागला.
    तो इसम खूष झाला.
    त्याने हंसराजच्या मानेवरून मायेने हात फिरवला.
    “शाब्बास, हंसराज. आता तू हिरे, सोन्याचे दागिने विकणारा व्यापारी आहेस.
    तुझ्या दुकानात चोर घुसतात.
    मग तू काय करशील ?”
    हंसराजने जाऊन पिस्तुलाशी जोडलेला दोर ओढला.
    मोठ्ठा आवाज झाला.
    चमेलीला ह्या दोन्ही गोष्टी पाहून एवढा आनंद झाला की त्या चौकटीभोवती भुंकत ती गोल गोल फिरली.
    तो इसम म्हणाला, “आंटी, बस. गडबड नको करूस.”
    हंसराजचं काम अजून बाकी होतं.
    आणखी एक तास त्या इसमाने त्याला गोल फिरायला लावलं.
    वाटेत असलेल्या रींगमधून उड्या मारायच्या, मधेच बसायचे, वगैरे त्याला करायला लावत होता.
    चमेलीला ते फार आवडलं.
    एक-दोनदा तीही त्याच्या मागे फेरी मारून आली.
    त्याने मोलकरणीला हाक मारून म्हटले ‘मारीयाला आण’.
    थोड्याच वेळात एक वेगळाच आवाज खोलीत आला.
    चमेली घाबरली नव्हती पण सुरक्षेसाठी त्या इसमाजवळ जाऊन बसली.
    मोलकरणीने एक काळी डुक्करीण खोलीत आणली.
    चमेलीच्या ओरडण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आत येताच डुक्करीणीने बसून आपले दोन्ही पुढचे पाय उचलले व आनंद दाखवत हवेत हलवले.
    ती मालकाला, हंसराजला व मन्याला पाहून खूष झाली होती.
    ती हंसाच्या व मांजराच्या जवळ जाऊन आनंद दाखवून आली.
    तिच्या हालचाली आणि आनंद पाहून चमेलीला वाटले हिच्यावर भुंकणं व्यर्थ आहे.
    मालकाने ती चौकट बाजूला ठेवली व मन्याला हांक मारली, “मन्या, चला, आता पिरॅमिड करूया.
    मन्या आळस झटकत अगदी नाईलाजाने पुढे आला आणि डुक्करीणीजवळ गेला.
    मग मालकाने बराच वेळ तिघांना कांही समजावले व तो म्हणाला, “एक, दोन.. तीन.”
    त्या बरोबर हंसराज उडी मारून डुक्कराच्या पाठीवर उभा राहिला.
    मग अगदी कांही विशेष न केल्यासारखं दाखवत मन्या आधी उडी मारून डुक्करीणीच्या पाठीवर आणि मग हंसराजच्या पाठीवर जाऊन मागच्या दोन पायांवर उभा राहिला.
    चमेली खूषीने भुंकू लागली.
    मग अशाच कांही गोष्टी तो मालक त्या तिघांना शिकवत राहिला.
    त्या दिवशीचा अभ्यास संपला.
    चमेलीला वेळ कसा गेला तेंच कळलं नाही.
    मोलकरीण येऊन डुक्करीणीला घेऊन गेली.
    मन्या कांही झालंच नाही असं भासवत आपल्या दरीवर जाऊन झोपला.
    रात्रीसाठी चमेलीची दरी पण त्याच खोलीत आणली गेली.
    भरपूर खाऊन चमेली तिथेंच हंस आणि मन्या यांच्याबरोबर झोंपली.
    असा एक महिना गेला.
    चमेलीला भरपूर खायची संवय झाली होती.
    तिने नवे आंटी हे नावही स्वीकारले होते.
    तिला त्या मालकाची आणि नव्या सोबत्यांचीही संवय झाली होती.
    दिवस आरामात चालले होते.
    रोज सर्वात आधी हंसराज उठे व त्याचं अखंड बोलणं सुरू होई.
    मग चमेली जागी होई.
    चमेली त्याची वटवट ऐके.
    लौकरच तिच्या लक्षांत आलं की तो उगीचच बडबडतो.
    तशी ती त्याच्या बडबडीकडे दुर्लक्ष करू लागली.
    मन्या सर्वांत शेवटी जागा होई व तरीही डोळे मिटून पडून राही.
    त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन “हे जग तुच्छ आहे” असा होता.
    चमेली उठल्यावर सर्वत्र फिरून वास घेई.
    तिला आणि मन्याला घरभर फिरायची परवानगी होती.
    हंसराजला मात्र त्याच खोलीत रहावं लागे.
    डुक्करीणीच घरं कुठे तरी बाहेर बागेत होतं.
    मोलकरीण तिला फक्त सरावाच्या वेळी घेऊन येई. मालक उशीरा उठे.
    उठल्यावर चहा घेऊन तो त्यांना नव्या गोष्टी शिकवत असे व सराव करून घेत असे.
    रोज तीच तालीम.
    तीन चार तासांनी मन्या थकून दारूड्यासारखा चाले तर हंसराज चोंच उघडून श्वास घेऊ लागे.
    मालक सारखा कपाळावरचा घाम पुसे.
    ती तालीम आणि जेवण चमेलीला आवडत होतं पण तिची संध्याकाळ खराब जाई.
    रोज मालक संध्याकाळी हंसराज आणि मन्या दोघांना घेऊन बाहेर जाई.
    चमेली तेव्हा कंटाळून नुसती पडून राही.
    तिला व्हार्निशचा वास आठवे.
    कांही माणसं आठवत.
    तिची शेपटी हलू लागे.
    मग परत ती निपचीत पडून राही.
    तिची वाढ आता पूर्ण झाली होती आणि प्रकृतीही चांगली झाली होती.
    एक दिवस मालक म्हणाला, “आंटी, आता तू पण कांही तरी काम करायला पाहिजे. तुला कलाकार व्हायचंय ना !”
    त्याने तिला वेगवेगळ्या कसरती शिकवल्या.
    मागच्या दोन पायांवर उभं रहाण्याचा पहिला धडा ती पटकन शिकली.
    दुसऱ्या धड्यात मागच्या दोन पायांवर उभं राहून उंच उडी मारून मालकाच्या हातातले बिस्कीट खाऊ लागली.
    मग ती नाच करायला शिकली, दोरीबरोबर गोल फिरू लागली, घंटा वाजवू लागली, पिस्तूलाचा बार काढू लागली आणि पिरॅमीडमधे मन्याची जागा घेऊ लागली.
    ती भराभर शिकायची.
    प्रत्येक गोष्ट केल्यानंतर भुंकून आनंद व्यक्त करायची.
    तिचा मालक खूश होता.
    तो म्हणे हिच्यात उपजत कला आहे.
    खरी कलाकार आहे.
    तिला 'कला' शब्द इतका आवडे की कला म्हटल्याबरोबर ती उडी मारत असे, जणू कांही ते तिचं नांव होतं.
    एकदा चमेली अथवा आंटीला कुत्र्यांना पडावं असं स्वप्न पडलं.
    ती धांवत होती व एक हमाल झाडू घेऊन तिचा पाठलाग करत होता.
    ती दचकून उठली.
    आजूबाजूला अंधार होता.
    खोली कोंदट होती.
    तिला काळोखाची भीती वाटत नसे पण आता ती भ्यायली व तिला भुंकावेसे वाटू लागले.
    तिच्या मालकाने दुस-या खोलींत उसासा सोडलेला तिने ऐकला.
    आदल्या दिवशी मन्याच्या वाटणीचा कबाब तिने मधेच पळवला होता व कपाटाआड दडवला होता.
    त्याची तिला आठवण झाली पण रात्री अंधारात फिरायची मनाई होती.
    मग झोपण्यासाठी तिने पुन्हा डोळे मिटले आणि अचानक हंसराजने किंचाळल्यासारखा विचित्र आवाज केला.
    काय झालं तें न कळल्यामुळे तिने नुसतीच गुरगुर केली.
    तिने परत जरा डुलकी घेतली.
    स्वप्नांत दोन मोठे कुत्रे कांही तरी खात होते व तिच्यावर गुरगुरत होते.
    एका शेतकऱ्याने त्यांना हांकलले मग ती तें खाऊ लागली.
    एवढ्यात हंसराज पुन्हा जोरात किंचाळला.
    आंटीला हंसराज ओरडतोय, हे लक्षांत आले नाही.
    खोलींत कुणीतरी आलंय अशी तिची खात्री झाली.
    ती भुंकू लागली.
    बाहेर डुक्करीणही आवाज करत होती.
    तिचा मालक हातात दिवटी घेऊन आला.
    आंटीला खोलीत कुणी परका दिसला नाही.
    हंसराज झोपला नव्हता.
    त्याचे पंख पसरले होते व चोंच
    उघडी होती.
    तो खूप थकलेला दिसत होता.
    मन्याही जागाच होता.
    मालकाने विचारले, "हंसराज काय होतंय तुला? तुला बरं नाही वाटत म्हणून ओरडतोयस?"
    हंसराज गप्पच होता.
    मालकाने थोडा वेळ त्याच्या मानेवरून हात फिरवला मग तो परत गेला.
    पुन्हा काळोख झाला.
    आंटी पुन्हा घाबरली.
    कुणीतरी बाहेरचे खोलीत आहे असे तिला सारखे वाटत होते.
    बाहेर डुक्करीणीची खुडबुड चालूच होती.
    मन्याही अस्वस्थ होता.
    सर्व गोष्टी चिंताजनक होत्या. पण कां?
    मग कधी नव्हे तो मन्या जवळ येऊन तिचे पाय चाटू लागला.
    तिनेही त्याला चाटले.
    हंसराज पुन्हा किंचाळला.
    मालक आत येत म्हणाला, “हंसराज,” हंसराज पंख पसरून गप्प पडून होता.
    मालक त्याच्या बाजूला बसून हात फिरवत म्हणाला, “हंसराज, तूं मरत आहेस कां ? अरे देवा ! मी विसरलोच.
    आज घोड्याने तुझ्यावर पाय दिला होता !”
    आंटीला त्याचं बोलणं कळलं नाही पण मालकालाही कांही भयानक घडणार आहे, असे वाटतेंय, हे तिला समजले.
    ती मालकाकडे पाहून भूंकू लागली.
    मालक म्हणाला, “आंटी, हंसराज मृत्यूला सामोरा जातोय.
    मृत्यू ह्या खोलींत आलाय ! आपण काय करणार ?”
    मालक उदास होऊन बाहेर गेला.
    घाबरलेली आंटी त्याच्याबरोबर बाहेर आली.
    थोड्याच वेळांत मन्याही तिथे आला.
    मालक सारखा, “काय करणार ?” म्हणत होता.
    मग त्याने एका थाळ्यात पाणी भरलं आणि हंसराजपुढे ठेवलं, “पी, हंसराज !”
    पण हंसराज पाणीही पिऊ शकत नव्हता.
    मालकाने त्याची मान वाकवून चोच थाळ्याला टेकवली.
    ती चोच तशीच तिथे राहिली.
    हंसाने पंख जास्तच पसरले.
    मालक म्हणाला, “कांहीच उपयोग नाही. हंसराज आपल्याला सोडून गेला.
    माझ्या प्रिय मित्रा, किती बेत केले होते मी !
    ह्या वसंत ऋतुंत तुला गांवी नेणार होतो गवतावर चालतांना तुझा रूबाब मला पहायचा होता. कां गेलास लवकर ?
    आता तुझ्याशिवाय मी काय करू ?”
    सकाळी येऊन माळी हंसराजला उचलून घेऊन गेला.
    आंटी खोलीतून बाहेर आली.
    कपाटाआड दडवलेला कबाबचा तुकडा तिथेच होता पण आंटीला तो खावासा वाटला नाही.
    ती सोफ्याखाली जाऊन बसली.
    एका संध्याकाळी मालक कांही ठरवून आत आला.
    तो म्हणाला, “आंटी आज तू आमच्या बरोबर चल. आता पिरॅमिडमधे हंसराजची जागा तुला घ्यायचीय.”
    मग तो स्वत:शीच बडबडू लागला.
    “आज आपलं हसं होणार. आपण कांही तयारी केली नाही.
    आपण तालमी पण नाही घेतल्या. छे !”
    तो बाहेर जाण्याचा वेश करून आला होता.
    त्याने मन्याला उचलून घेतले व तो म्हणाला, “आंटी चल.”
    आंटी उठली आणि त्यांच्यामागून जाऊ लागली.
    ते गाडीतून एका नव्याच जागी येऊन पोहोचले.
    गाडीतून उतरल्यावर समोर मोठी खोलगट बशी उलटी करून ठेवली तर दिसेल अशा आकाराचं कापडाचं घर दिसत होतं.
    त्यावर सर्व ठिकाणी दिवे होते.
    प्रवेशद्वारावर खूपच रंगीत दिवे होते आणि माणसांची गर्दीही होती.
    बरेच घोडेही दिसत होते.
    पण आंटीला कुत्रे दिसत नव्हते.
    आंटीला आणि मन्याला उचलून घेऊन मालक एका काळोख्या रस्त्याने आंत एका खोलीत गेला.
    आंटीला जातांना एक खूपच मोठी खोली दिसली.
    त्यांत माणसांची भीतीदायक गर्दी दिसत होती.
    आंटी थोडी घाबरली.
    मन्या जणू कांही बेफिकीर असल्यासारखा चेहरा करून होता.
    त्या खोलीच्या पडद्यातूनही माणसांची गर्दी थोडी थोडी जाणवत होती.
    खोलीत आल्यावर मालकाने दोघांना खाली उतरायला सांगितले.
    त्याच्या हातांतून त्यांनी खाली उडी मारली.
    त्या खोलीत एक टेबल होतं आणि एक स्टूल होतं.
    मन्या जाऊन स्टूलाखाली बसला.
    मालकाने आपला वेश बदलायला सुरूवात केली.
    प्रथम डोक्यावर एक रंगीबेरंगी उंच टोपी घातली.
    तोंडाला पांढरं कांही तरी फासलं.
    मग जाड मिशा लावल्या.
    भुवयांवर जाड भुंवया लावल्या.
    मग फुलं फुलं असलेल्या कापडाची विचित्र पँट घातली.
    ती बूटांवरून खाली येत होती.
    आंटीने अशी पँट कधीच पाहिली नव्हती.
    मग विचित्र रंगाचे साॅक्स घातले.
    वर जाकीट घातलं.
    त्यावर पाठी एक तारा होता.
    तर पुढचा भाग रंगीत होता.
    आंटीला विचित्र वाटत होते पण स्थितप्रज्ञ मन्याकडे पाहून तिला धीर वाटत होता.
    आंत येऊन एक मुलगी मालकाला म्हणाली, “आतांचा एक खेळ झाला की तुमची वेळ. तयार रहा.”
    त्यांचा मालक अस्वस्थ होता.
    आज गोंधळ होणार अशी त्याला भीती वाटत होती.
    ती मुलगी परत येऊन म्हणाली, “चला, तुमची वेळ झाली.”
    मालक उठला, “आंटी, चल.”
    असं म्हणतं त्याने मन्याला एका पेटीत घातले व ती पेटी हातांत घेतली.
    आंटीला काय चाललंय ते कळत नव्हतं.
    मालकाने तिलाही उचलली आणि पेटीत टाकली.
    मन्या तिच्या पायांखालून सुटायसाठी प्रयत्न करू लागला.
    ती पेटीच्या बाजूवर नखांनी कुरतडू लागली.
    अंधारात तिला आवाज येऊ लागले.
    मग मालकाचा मोठा आवाज आला, “नमस्कार, आम्ही आज परत आलो आहोत.”
    लोकांचा आरडाओरड ऐकू आला.
    मालक गर्दीच्यावर मोठा आवाज काढत म्हणाला, “ऐका.”
    लोक शांत झाले.
    “माझी काकी स्वर्गात गेली. जातांना ही पेटी मला देऊन गेली. पाहूया आपण पेटीत काय आहे ? बहुतेक खूप नोटा असतील. मलाही माहित नाही. उघडू ?”
    त्याने पेटीच कुलुप काढून झाकण काढताच आंटीने व मन्याने खाली उडी मारली.
    लोकांनी मोठा ओरडा केला.
    आंटी घाबरली. ती भूंकत मालकाभोवती फिरू लागली.
    मालक म्हणाला, “अरे हा तर मन्याकाका आणि ही आंटी. माझे नातलग.”
    असं म्हणत मालक जमीनीवर उपडा पडला व मन्याला आणि तिला त्याने जवळ घेतले.
    थोड्याच वेळांत आंटी त्याच्या हातून निसटून उभी राहिली.
    त्याने जवळ घेतले म्हणून झालेला आनंद गिरक्या घेऊन दाखवू लागली.
    तिला सभोंवताली चेहरे, चेहरे आणि चेहरेच दिसत होते.
    बाक असे वर वर गेले होते आणि वरपर्यंत माणसे भरली होती.
    “आंटी, आपण बसाल कां ?” आंटीला कळलं काय करायचं ते.
    ती टूणकन उडी मारून एका खुर्चीवर बसली.
    लोकांनी टाळ्या वाजवल्या, गिल्ला केला.
    मालकाच्या डोळ्यात नेहमीप्रमाणेच माया होती पण तो हंसत होता, हातवारे करत होता.
    आंटीला कळले की मालक खूष आहे.
    तीही प्रेमाने मोठ्याने भुंकली.
    मग मालक म्हणाला, “आंटी मी आणि मन्याकाका नाच करतो, तोपर्यंत तू बसून रहा.”
    मग त्या दोघांचा बँडच्या तालावर नाच सुरू झाला.
    मन्या त्यात मजा वाटत नसल्यासारखा पण शिकवल्याबरहुकुम नाचत होता.
    त्यांच्या नाचाला लोकांनी खूप दाद दिली.
    मग मालक आंटीला म्हणाला, “आंटी, आतां तू !”
    त्याने एक बाजा खिशातून काढला व तोंडाला लावून तो वाजवू लागला.
    आंटीला वाद्यवादन आवडत नसे.
    ती चुळबुळ करू लागली. भुंकू लागली.
    चारी बाजूनी त्याला लोकांनी दाद दिली.
    त्याने एक वरचा सूर लावला आणि अचानक प्रेक्षकांमधून एक मुलगा मोठ्याने ओरडला, “आंटी ? ही आंटी नाही. ही तर चमेली ! चमेली !”
    लगोलग बेवड्या कोंड्या सुताराचा आवाज आला, “ही आपली चमेलीच आहे. बबन्या ! ही चमेलीच ! चमेली !”
    एकाने शिट्टी वाजवली. व दोघांनी परत हांक मारली, “चमेली, इकडे.. इकडे ये !”
    आंटीने आवाजांच्या दिशेने पाहिलं.
    उभे राहिलेल्या दोघांचे चेहरे तिला उजेडात दिसले.
    एक कुरळ्या केसांच्या झिपऱ्यावाला बेवडा चेहरा तर दुसरा गुबगुबीत गालांचा गोल चेहरा.
    तिला ओळख पटली.
    ती धडपडत उठली, खूर्चीवरून खाली पडली, वाळूत कसंबसं तिने सांवरलं आणि पडत धडपडत त्या दोघांच्या दिशेने धांवू लागली.
    लोकांनी मोठा आवाज केला.
    पुन्हा बबन्याची हांक आली, “चमेली, चमेली.”
    चमेलीने सर्कशीतल्या गोल कठडा ओलांडला लोकांच्या गर्दीत उडी घेतली.
    सर्वांचे हात तिला पुढे पुढे जायला मदत करत होते.
    ती ते हात चाटत होती.
    चेहरे चाटत होती आणि वरच्या बाकांच्या, त्या आवाजांच्या, दिशेने जात होती.
    शेवटी गॅलरीत बबन्याच्या हातांत ती विसावली.
    अर्ध्या तासानंतर चमेली व्हार्निश आणि शिरस ह्यांचा वास येणाऱ्या माणसाच्या मागून चालत होती.
    गटारापासून लांब कसं रहायचं, हे तिला ठाऊक होतं.
    कोंड्या म्हणत होता. “किती पापी मी ! आणि चमेली तुलाही जरा अक्कल कमीच आहे.
    माणसासमोर तू म्हणजे एखाद्या मोठं कपाट बनवणाऱ्या कारागीरापुढे एक छोटी घडवंची घडवणारा सुतार.”
    बाजूने बापाची टोपी घालून बबन्या चालत होता.
    चमेलीला मागून चालतांना घामट कपड्यांतल्या त्यांच्या पाठी दिसत होत्या.
    ती त्यांच्यामागून अशी अनंत काळ चालत आली होती व तिला वाटत होतं तिच्या आयुष्यांत त्यांत एका मिनिटाचाही कधी खंड पडला नव्हता.
    तिला ती कळकट खोली, तो हंसराज, मन्या, ते चविष्ट जेवण, ती तालीम, ती सर्कस, हे सर्व आठवलं.
    पण तिला अनेकदा पडणाऱ्या स्वप्नातलं तें एक घाणेरडं भयानक स्वप्न ह्या सदरांत तिने टाकून दिलं.

    -- अरविंद खानोलकर.

    मूळ कथा - काष्टंका

    मूळ लेखक - अँटन चेकॉव्ह

  • ऍबॉर्शन! ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ४

    डॉ. कर्णिक, साठीच्या आसपास वय असलेले, नावाजलेले गायनीक होते. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहमीच गर्भवती महिलांची गर्दी असायची. आजचा दिवसहि त्याला अपवाद नव्हता. रात्रीचे साडेनऊ वाजत आले होते. शेवटचा पेशंट तपासला कि, मॅटर्निटी वॉर्डातून राऊंड आणि मग ते या कामाच्या रगाड्यातून मोकळे होणार होते.

  • अप्रूप

    परवा बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो होतो… फिरता फिरता एक कपाट नजरेस पडलं…… वर लिहिलं होतं.. “हरवले सापडले विभाग”

  • मेरे घर राम आये हैं

    वरात एकाएकी थांबली . गाणं वाजवण्यात दंग झालेला बँड बंद झाला . भल्या मोठ्या स्पीकर्सच्या प्रचंड भिंती अचानक अबोल झाल्या . रस्त्यावर बेभान होऊन नाचणारे , लोळण घेवून नागीण डान्स करायला अधीर झालेले , मान खाली घालून एक हात उंचावत , वाद्यांच्या ठेक्यावर डोलणारे इकडे तिकडे बघू लागले .