असा एकटाच
जीव श्रमलेलेला
असह्य वेदनां
श्वास कोंडलेला
अंतरी कोलाहल
अश्रु ओघळलेला
उद्वेग भावनांचा
विचार बावरलेला
मन दिशाहीन
आव्हान विवेकाला
कसे सावरावे
अशांत मनाला
भौतिक सुखाचीच
आसक्ती जीवाला
निर्मळ सुखसौख्यदा
त्यजीता षडरिपुला
सांज रेंगाळलेली
माहोल गहिवरलेला
अंती लोचनी
सारा गोतावळा....
--वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १९९
१४/८/२०२२
लाभले असता सर्व काही..
त्याची कधी मोजदाद केली नाही..
जे थोडेसे काही मिळाले नाही..
त्याची मात्र मोजणी थांबली नाही..।।..१
मन मोकळे कधी ठेवले नाही..
फक्त स्वानंदात रमलो..
मी , फक्त मीच एकटा सर्वज्ञ..
हा अहंकार कधी सोडला नाही..।।..२
काय म्हणावे अशा प्रवृत्तीला ?..
अरे झाडा सारखे जीवन असावे..
जे जे आहे , ते ते सर्व देत रहावे..
सर्वांती उमजावे , इथे आपुले काही नाही..।।..३
©️वि.ग.सातपुते.( भावकवी)
9766544908
रचना क्र.५२ / ६-४-२०२१.
नातवंड म्हणजे काय चीज असतं ,
आजी आजोबा मध्ये दडलेलं सँडविच असतं.
नातवंड म्हणजे काय चीज असते ,
आई रागावली की आजी कडील धाव असते.
नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा,
पाळण्यातून अलगद काढून घ्यावा.
नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी
पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.
नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद
सगळ्या चवींना बांधतो एक संध.
नातवंड म्हणजे खव्याचा पेढा
अखंड आनंद घ्या हवा तेवढा.
नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
तिस-या पिढीचा असतो उगम.
नातवंड म्हणजे आनंद तरंग
आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग.
किरणात चमक ती असूनी, तेजोमय भासे वस्तूंचे अंग
सूक्ष्म अवलोकन करीता, कळे तेज ते, वस्तूचाच भाग.....१,
जसे तेज असे सूर्याचे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते
दृष्टी मधले किरणे देखील, सर्व जनांना हेच सांगते...२,
तेजामुळेंच वस्तू दिसती, विना तेज ती राहील कशी
तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी...३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
विधी लिखीत असे अटळ
त्याच प्रमाणे होई निश्चित
कोण बदले मग काळाला
प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।
राम राज्याभिषेक समयीं
असता सर्वजण आनंदी
राज्य सोडूनी वनी जाईल
जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।
नष्ट करुनी सर्प कुळाला
तक्षकावरही घात पडे
परिक्षिताचे प्रयत्न सारे
फिके पडती नियती पुढे ।।३।।
आकाशवाणीचे शब्द ऐकतां
हादरुनी गेला कंस मनीं
काळाने त्या झडप घातली
प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।
दुर्दैवी होते विधी विधान
हरिश्चंद्र तारामती यांचे
राजा राणी असूनी दोघे
जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।
सुख दुःखानें भरले असे
प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
सहज लीलेने घ्यावे सारे
प्रभूचेच आहे समजून ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@mail.com
क्रियेला प्रतिक्रिया,
ध्वनीला प्रतिध्वनी ।
तत्व ते सनातन,
दिसे नित्य जीवनी ।।१।।
फेकतां जोराने,
आदळे भिंतीवरी ।
प्रवास परतीचा,
होई तुमचे उरीं ।।२।।
शिवी वा अपशब्द,
दिले कुणासाठी ।
येऊनी धडकतील,
तुमचेच पाठीं ।।३।।
प्रेमाने बोलणे,
सुंगध आणिते ।
आनंदी लहरी,
मनां सुखावते ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
पुरातन काळापासून
खांद्यावर ओझे वाहणे
हाच एककलमी कार्यक्रम
समाजातील सामान्यांसाठी !
त्यावेळी पालखीत बसलेले
मंदिरातील देव होते,
सरदार होते , दरकदार होते !
संत होते , महंत होते, पंडित होते !
आज सजलेल्या पालखीत
खासदार आहेत, आमदार आहेत ,
मंत्री आहेत , संत्री आहेत
त्यांचे काटेचमचेपळ्या आहेत !
ओझे वाहणारे भोई मात्र
तेच आहेत, समाजातील सामान्य
विवेक विकलेले, पिचलेले,
पिढ्यान पिढ्या जोपासलेला
खांद्यावरील जू व कासरा
स्वतःहून सांभाळणारे
ओझ्याचे बैल !
त्यावेळी चाबूक आणि
तलवारीच्या धाकात जगणारे
आज लाचार लोकशाहीच्या
व आभासी मतदानाच्या
खुळखुळ्याच्या नादाला
नादावले आहेत !
पळताहेत आपले ,
नेते म्हणतील तिकडे
पक्ष नेतील तिकडे !
आणि डोईतील वळवणाऱ्या
टोचणाऱ्या मेंदूचा विवेकीदाह
कमी होण्यासाठी किंचाळताहेत
बेंबीच्या देठापासून ....."जय हो !!"
राजवाड्यातील राजे होते ,
-आनंद बावणे.
१४ ऑगस्ट २०२३.
जिथे वेचला प्राजक्त
तिथे गोवऱ्या नशिबी आल्या
कोमल निशिगंधाच्या पाकळया
नजरेसमोर चोरीला गेल्या
कुठे मागावी दाद फिर्याद
सुगंधच फितूर झाला
बघता बघता चोराच्या
श्वासात तो सामावला
शुन्य नजर,मती गुंग, बधिर मी
स्वतः ला हरवून बसलो
स्वतः च पेटवलेल्या चितेत
धुमसत जळु लागलो
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं;
अचानक स्वप्नात दिसणं !
खटयाळ पावसात चिंब न्हायचं !
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं !!
केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो
ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो !
आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर!
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली !!
माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात!
उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!
अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते !
अखेर ती उगवते !!
इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही !
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !!
मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं ! तुझ्याआधी काही क्षण!"
काळावर मात अशी !
तिच्यासोबत भुलत जायचं!
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
एकच वचन
कितीदा देतो आपण !
एकच शपथ कितीदा घेतो आपण !
तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात !
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात !!
साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते !!
उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं !!
भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं !!
- मंगेश पाडगांवकर मराठी कविता
झालो मी अठरा वर्षांचा
म्हणुन मिळे अधिकार नामी.
मत देण्याचा.
या दिवशी मी आहे राजा
ताजा ताजा.
उलथिन मी नेत्यांची तख्तें
बदलिन मी नावांचे तक्ते.
-
तख़्त - सिहासन
-- सुभाष स. नाईक
Copyright © 2025 | Marathisrushti