१० वर्ष आईची.. पुढली
१० बाबांची.
१० दिली नवऱ्याला..
१० दिली मुलांना..
सर्वार्थाने केवळ त्यांची.
आता मात्र मुक्त हो...
ही १० स्व:तःची...
वाच, नाच, मौज कर...
हवे ते ते स्वैर कर.
पुढील १० आहेत मग
त्याच्या-आपल्या तब्येतीची...
त्या पुढील १० वानप्रस्थ...
संसारातून निवृतिची.
म्हणून म्हणते...
हीच १० वर्षे फक्त तुझी
नाहीत दुसऱ्या कुणाची
सूनेच्या संसारातही
नाक न खुपसण्यायची
आताच मस्त जगून घे
खळखळून हसून घे
प्रेमात पड स्वतःच्याच
लाड कर स्वतःचेच
स्वतःवरच रुसून घे
नवऱ्याला मार काखोटीला
जग सारे फिरुन घे
देव करो तुला मिळावी
१० वर्षे स्वैर सुखाची.
देव करो तुला कळो
महती स्वत:च्या एका क्षणाची....
भावमनीचे उमटूनी पडती ज्याचे सहवासे
काव्यामधला ईश्वर मजला तोच परि भासे
शब्द तयाचे ऐकत असता मन येते भरूनी
शब्दांना त्या बांध घालता काव्य पडे उमटूनी
अनूभव ज्याचा वदला जातो कंठा मधूनी
भोगलेला असे परि तो एके काळी त्यांनी
सत्य सारे तेथे असता दिव्यत्वाची जाण
म्हणूनच पटते मनास तेंव्हां हेच खरे जीवन
वाचित गेलो धर्मामधूनी जे जे सारे काही
शिक्षीत नसूनी स्वानूभवे तेच व्यक्त होई
हेच भासले काव्य मजला साऱ्या जीवनाचे
उतरत होते लेखणीतूनी बोल अनूभवाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुझ्या अश्रुंच्या चांदण्यांना आवर....
माझ्या ओंजळीतल्या उन्हात पाघळतील...
तुझ्या अवखळ बटांना सावर...
माझा हलकेच घात करतील...
करू नकोस विषयांच्या शरांचा भडीमार...
सावरता येणार नाही स्वतःला...
मोहोर यौवनाचा सांभाळ
भ्रमिष्ट व्हायचं नाहीये मला....
स्ञीत्वाचा अंगार जपून ठेव थोडासा...
आहुती होण्याचं भान राहील मला....
मंञमुग्धतेची मशाल थोडीशीच पाजळ...
भोवतालचा तुझ्याच नुसता
आसमंत व्हायचं नाहीये मला...
बेगडी सौंदर्या च्या
सीमा पार कर जरा....
आश्वस्त, आधाराचा हात देईन तुला...
© लीना राजीव.
-- सौ. लीना राजीव देशपांडे
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
सत्य हे नेहमीच पोरकं असतं
माझ्या जीवनात जर तो आला नसता
तर कदाचित मीही हे मानलं नसतं
पण... तसं व्हायचं नव्हतं
अजूनही मला तो आठवतो आहे
उमदं, आकर्षक व्यक्तिमत्व-हसरा चेहरा
आणि हो, त्याचे डोळे!
त्याचे डोळे विलक्षण पाणीदार होते, विलक्षण बोलके होते
तो भेटताच त्याचे डोळे त्याच्या नकळत
तुमच्याशी संवाद साधायला लागायचे
सत्याबद्दल त्याला अपार आदर होता-असीम निष्ठा होती
आदर्श जगाबद्दल काही कल्पना होत्या त्याच्या
पहिल्या भेटीत मी काहीच बोललो नाही
नंतरच्या भेटीत त्याच्या डोळ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला
त्याची मूल्यांवरची निष्ठा अटळ होती
मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला
पण.... त्याने मानलं नाही
त्यानंतर तो अनेकदा भेटला
नेहमी काहीतरी आदर्शवादी बोलायचा
सगळंच काही लक्षात राहणं शक्य नव्हतं पण
त्याचे ते विलक्षण बोलके डोळे मात्र सतत जाणवायचे
असाच एकदा भेटला असताना
मिळालेल्या नोकरीविषयी उत्साहाने बोलत होता
मी त्याला आदर्शवादी भूमिका सोडून द्यायला सांगितली
तडजोडीचा व्यावहारिक अर्थ समजावला... पण
त्याने दुर्लक्ष केले
त्याला सत्यकाम बनायचं होतं
तेव्हाच मला त्याच्या गंभीर भवितव्याची कल्पना आली
पण तरीही; त्याच्या डोळ्यातील तेजस्वीपणाचा मला हेवा वाटला
मध्यंतरी त्याला नोकरीवरुन हाकलण्यात आल्याचं समजलं
'सत्यकाम'च भूत त्याला अद्यापि छळत होतं
एका खटल्यातही त्याला गोवण्यात आलं होतं
त्याबद्दल त्याला मी नंतर हटकल्यावर
'पराभव मान्य!'
एवढंच बोलून तो गप्प झाला
कदाचित ओठांतून व्यथा ओसंडेल म्हणून
ओठ घट्ट आवळून घेतले होते त्याने
आपली निराशा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यानं
पण; आपले डोळे विलक्षण बोलके आहेत
हे मात्र तो विसरला
त्या नंतरच्या भेटीमध्ये, त्याच्या डोळ्यातील तेज
अस्तंगत होत जाणं पहाणंच माझ्या नशीबी होतं
असेच काही दिवस गेले, आणि...
अचानक 'ती' बातमी कानांवर आदळली
झालं ते अटळ असूनही मला खूप वाईट वाटलं
जीवनभर सत्याच्या पाठी धावणाऱ्या वेड्याला
सत्य नेहमी पोरकं असतं हे कटू सत्य उमगलं नव्हतं
आणि अशाप्रकारे सत्य अखेरीस पोरकंच राहिलं
आणखी एका आहुतीनंतरही...!
-- यतीन सामंत
जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।
संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी
झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।
शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,
लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला तो मनी ।।
तूच दिसला नयनी, आई-बापा मांडी देऊनी,
माझे लक्ष तुझकडे, परि तू बघेना थोडे, ।।
आई – बापाच्या सेवेत, गुंगलास तूं सतत,
तुझी शक्ति मला छळे, तें तुला कांहीं न कळे, ।।
थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,
तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो ।।
टाकलेल्या विटेवरी, उभा राहिलो मी दूरी,
परि तू गेला निघूनी, मजला उभा करूनी ।।
होऊनी गेली अठ्ठावीस युगे,
आज देखील मी वाट बघे ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
धागा धागा विणून, केली तयार जाळी
गोलाकार नि बहुकोनी घरे, पडली निर निराळी....१,
स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे
सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे....२,
तुटेल फूटेल तरी, सैलपणा येणे नाही
जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही....३,
जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ
संसारामधील क्लेश, झेलीत होती त्याची पाठ....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti