जातीचे प्रमाणपत्र आपल्याला उपजिल्हाधिकारी कार्यालयातून दिले जाते.आणि हे देत असताना तहसील कार्यालयामार्फत आपली सर्व कागदपत्रे तपासून पाहिली जातात आणि त्याची छाननी करून व सर्व सत्यता पडताळून पाहिली जावून आपली फाईल एकेक टेबल पुढे सरकत जाते. आणि शेवटी सर्व सोपस्कार पूर्ण करून आपल्याला जातीचे प्रमाणपत्र दिले जाते.
आपल्याला हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही आपली फरपट संपत नाही.जेव्हा केव्हा निवडणुका येतात तेव्हा याप्रमाणपत्राची वैधता ( VALIDITY ) करून घ्यावी लागते.हे कशामुळे?
ज्या यंत्रणेद्वारे जातीचे प्रमाणपत्र दिले गेले ती यंत्रणा म्हणजे शासन. मग या शासनाच्या अधिकृत क्लास वन आणि सुपर क्लास वन अधिकार्यांनी एकेक कागदपत्रे अक्षरश:चाळणीतून तपासूनच हे प्रमाणपत्र दिले ना.... मग हि यंत्रणा विश्वासार्ह नव्हे काय? जर विश्वासार्ह आहे तर मग VALIDITY कशासाठी?
जर का एखादी फाईल VALIDITY न होता लातूर येथून जर परत आली तर हे प्रमाणपत्र देणारा अधिकारी दोषी आहे असे समजावे काय?
VALIDITY चे एक टेबल जर उपजिल्हाधिकारी कार्यालयातच वाढविले तर जमणार नाही काय? काय तो येथेच फैसला होवून सामान्याची ससेहोलपट तरी होणार नाही.कारण जातीचे प्रमाणपत्र मिळविताना किती कष्ट लागतात हे प्रमाणपत्र काढ्लेल्यालाच माहित...
प्रशासनाने या बाबत जरूर सकारात्मक विचार केल्यास जनतेला नक्कीच दिलासा मिळू शकेल.
-- महादेव विश्वनाथ कापुसकरी
आला म्हणती तो काळ
असा पडतो दुष्काळ ||धृ ||
नसते पिण्यास पाणी
नसते खाण्यास धान्य
नसते रानात पळपळ
नसते वनात सळसळ ||१||
मरती भूकेली गुरंढोरं
पडती आजारी पोरंसोरं
होई जीवांची तळमळ
रडते कडेवर ते बाळ ||२||
मोकळी झालेली गव्हाण
दु:ख धरतीचं आंदण
होई ओसाड तो माळ
राती भेटेना सकाळ ||३||
कुठे घडतेय माळीण
कुठे गुडूप किल्लारी
कुठे तहानेने व्याकूळ
होई उध्वस्थ गोकूळ ||४||
असं माणसाचं जिण
जरा रहावेस जपून
माणसातील माणसा
कर पशूपक्षी सांभाळ ||५||
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि. बीड
मो. ९४२१४४२९९५
गुंतवणा-या परंपरा अन्
पंचांग मला दिसत नाही,
केला उपवास नाही तरी
देव माझा रुसत नाही .....
तिथी, वार-मुहुर्ताच्या
अडगळीत मी फसत नाही,
एक दिसाच्या भक्तीसाठी
देव माझा रुसत नाही .......
दलालांच्या जोखडात
कधीच ईश्वर बसत नाही,
दिला छेद परंपरेला तर
देव माझा रुसत नाही .......
तो असतो आमच्यात
आम्हालाच पटत नाही,
दुध तुपाच्या नैवद्यासाठी
देव माझा रुसत नाही .......
नसलो जरी नास्तिक मी
आस्तिक तेवढा दिसत नाही,
घेतलं नाही दर्शन तरी
देव माझा रुसत नाही .....
एक परिघ आंखले , विधात्याने विश्वाभोवतीं,
जीवन फिरते , त्याचे वरती ।।१।।
वाहण्याची क्रिया चाले, युगानुयुगें ह्या जगतीं,
कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा, एकांच परिघात फिरती ।।२।।
जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी,
जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।
मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित करी जगाला,
परिघ सोडूनी जाण्यासाठीं दिसत नसे मार्ग कुणाला ।।४।।
प्रयत्न तुमचा सदा असावा मध्यबिंदूकडे सरकण्याचा,
शक्तीरुप तेथेंच असूनी त्याच्यांत सामावून जाण्याचा ।।५।।
भीती मनीं वसते कसे जाऊं आंसाकडे,
तुकडे होतील देहाचे जेव्हां आसांत पडे ।।६।।
सोडूनी देण्या सारा खेळ केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे,
विसरुन जाता देहाला प्रभू समर्पण करण्यांत असे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये ,
एकदा झाला मोठा वाद,
सागराचे रौद्र रूप पाहूनी,
किनाऱ्याने दिलीच नाही साद…
फेसाळलेल्या लहरी मधुन,
तो ओकत होता आग,
सूर्य गेला समजवण्यास ,
पण तोही झाला बाद…
खवळलेल्या लाटांनी मग,
मस्तक आपटले किनाऱ्यावर,
हळूच वरती पाहुनी,
शिंपडले पाणी सूर्यावर…
शेवटी चमचमत्या चांदण्यांचं,
आकाश आले भेटीला,
सुंदर शांत संध्या,
होती त्यांच्या जोडीला…
आक्रोश करून सागराने ,
शेवटी स्मित हास्य केलेच,
दूर दृष्टीस गाभाऱ्यातील,
प्रीत मंदिर दिसले,
प्रीत मंदिर दिसले…
– श्र्वेता संकपाळ
ही गोष्ट एका लग्नाची
गोष्ट प्रेमाची
लग्नाची बेडी नाटकाची
यशस्वी अर्धशतकी प्रयोगांची
५० वर्षापूर्वी ह्या टॅामला
जेरीच प्रपोजल आल
आणि फायनल ड्राफ्ट तयार होऊन
स्वयंवरही झाल
तू तिथे मी ची शपथ घेऊन
ह्यांची वार्यावरची वरात निघाली
आणि नवा गडी नव राजं म्हणत
संसाराची नांदी झाली
सुख म्हणजे नक्की काय असत
शोधताना जरा फॅमिली ड्रामा झाला
आणि सुखाशी भांडतो आम्ही दोघ म्हणाले
तरी अवघा रंग एकचि झाला
आता विच्छा माझी पुरी करा
तिनही बेचकीत पकडल
एक यू टर्न आल्याच मात्र
एका क्षणात त्याला उमगल
मग काय विचारता?
तो नाइट रायडर, ती व्हाईट लिलि
फुलराणीच्या वेलीवर
लेकूरे उदंड जाली
पुढे मोरावळ्यासारख्या संसारात
थोडा संशयकल्लोळ थोड मानापमान
अगदी शाब्दीक वस्त्रहरण सुध्दां झालं
पण कुणासाठी कुणीतरी, हिमालयाची सावली ही बनल
आणि बघता बघता ५० वर्षाचा हा संसार
असा सही रे सही झाला
भावी वैवाहिक जीवनासाठी
ऑल द बेस्ट तुम्हांला
-- सौ. अलका वढावकर
गोड शब्द बोबडे, लकब त्याची मनास आवडे,
शब्दांची भासली जाण, नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान,
भावनांचा उगम दिसला, मनी व्यक्त होई हालचालीतूनी
रागलोभ अहंकारादी गुण, दिसून येती जन्मापासून
देश-वेष वा जातही कुठली, सर्व गुणांची बिजे दिसली
हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी
प्रसंग घडता अवचित , बाह्य जगाला विसरतो
उफाळून येती सुप्त भावना, मानवी धर्माच्या त्या जन्मखुणा.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वेदना विपन्नावस्थेची सारी भोगूनी झाली..
तरीही प्रारब्धयोगे सारे सुखऐश्वर्य लाभले..
तरीही जीव हा मोहपाशात कां ? गुंतलेला..
वाटते जीवा ! बरेच काही अजूनही राहिले..।।..१
सांग मना , आज तुज जवळ काय नाही..
तुज श्रेष्ठ विवेकी जन्म लाभला मानवाचा..
वात्सल्यप्रीतीच्या सरोवरी तुडुंब रे डुंबला..
अनंत जन्मांचे हे भाग्य अलौकिक आगळे..।।..२
आज जीवात्म्यावर मंडरते रे सांज केशरी..
आत्माही भाळला श्रीरंगी मंजुळ वेणूवरती..
जीव आता मुक्तीच्या त्या विरक्त वाटेवरती..
तरी कां भासते जगायचे बरेच काही राहिले..।।..३
जन्मासंगेच मृत्यू , हेच सुर्यप्रकाशी सत्य..
त्या सत्याची दोरी त्या अनामीकाच्या हाती..
युगायुगांची पराधिनता ही तुझीच रे मानवा..
हव्यास कशाला अजुन काही जगायचे राहिले..।।..४
©️ वि.ग.सातपुते..(भावकवी)
9766534908
रचना क्र.५१/ २-४-२०२१
देह चिंब-चिंब ओला, पाऊस दाटलेला डोळी
भिजलेल्या गौरदेही, आरस्पानी ही काचोळी
पावसाळी ऋतु जणू , मेघ मल्हाराची ताण
माती मुल्खाची सुग्रण,पावसाच्या ओठी गाणं
डोळे भरले नभाचे, धरणीच्या प्रीतिपोटी
खुळ्या पावसाची प्रीत,रानपाखरांच्या ओठी
नदी, नाले आळविती, पशु-पक्ष्यांची तहान
वृक्ष वल्लरीच्या देही, पहिल्या पावसाची खूण
अरे, पावसा पावसा, आम्ही गातो तुझी गाणी
असा ये रे ! तू बेताचा, होऊ दे रे ! आबादानी
डाॅ.धोंडोपंत मानवतकर,
२३ जलै २०२२
Copyright © 2025 | Marathisrushti