हे शारदे ! रूसलीस कां तू, माझ्या वरती ।
लोप पावली कोठे माझी, काव्याची स्फूर्ती ।।
दिनरात्रीं तव सेवा केली, मनोभावें ।
कळले नाहीं आज शब्द ओठचे, कोठे जावे ।।
दिसत होते भाव मजला, साऱ्या वस्तूमध्यें ।
उचंबळूनी जाई मन तेव्हां, नाचत आनंदे ।।
तेच चांदणे तारे गगनी, आणिक लता वेली ।
पकड येईना टिपण्या सौंदर्य, परि या वेळी ।।
जागृत केली मम हृदयांतील, सुप्त जी शक्ति ।
अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह, हे श्री सरस्वति ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम
हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम ।।
संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी
आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी
मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।।
आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती
नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल, मुक्ती
स्वानंऽद हे, आनंऽद दे, चरणीं करुं दे मुक्काम ।।
- - -
- सुभाष स. नाईक
दिव्यत्वाचा ध्यास जेव्हा मनास माझ्या घेरुन टाकतो
वेड्यासारखा मी पुटपुटतो
माझा भारत, माझा भारत ॥ १ ॥
तुझ्यावर जगणारी पाहून
टोपीखालची बांडगूळं
मी उगा विव्हळतो
माझा भारत, माझा भारत ॥ २ ॥
तुझ्या वेदनेची कळ
माझ्या काळजात उठते
माझ्या जीवनाचा मंत्र तेव्हा
माझा भारत, माझा भारत ॥ ३ ॥
तूच माझा जिव्हाळ्याचा
एकमेव अर्थ जगण्याचा
सत्ताधांना मग का न कळावा
माझा भारत, माझा भारत ॥ ४ ॥
अर्थ दुबळेपणाचा नसतो
तुझ्या सोशिक शांततेला
जिथे ज्योतीतही सामर्थ्य वणव्याचे
तो माझा भारत, माझा भारत ॥ ५ ॥
इथे असते गार सावली
-भव्य हिमालयाच्या छातीची
इथे सौंदर्याला येतो-
-गंध मोहक पावित्र्याचा
इथे निष्पापतेला जोड असते
--समर्थ अशा निर्भयतेची
इथे शांतिपूजक तुम्हां कवटाळतो
--माझा भारत, माझा भारत ॥ ६॥
परकी-संस्कार छायेतल्यांना
उमगत नाही भारताचा गाभा
अखंड इथे पाझरवतो वात्सल्यझरा
माझा भारत, माझा भारत ॥ ७।।
गुलामगिरीच्या निशाण्या अन्
बाळगिती, म्हणती निर्लज्जतेने
ज्ञानकक्षा की हो रुंदावल्या
हजारो अनामिक हुतात्म्यांचा
अपमान पाहून व्यथित होतो
माझा भारत, माझा भारत ॥ ८॥
गलिच्छ डाग पारतंत्र्याचा
पुसला अपुल्या रक्ताने
त्यांच्याशी कायम कृतज्ञ
माझा भारत, माझा भारत ।। ९ ।।
झगमगाटाहून दूर एकांती
स्मरतो भक्तीभावाने लोकमान्यांना
'मोडेल पण वाकणार नाही'
माझा भारत, माझा भारत ॥ १० ॥
माझ्या काळजाचा तुकडा
विसावा जेव्हा त्याच्या जखमेला
तेवढ्यानेही तो गद्गद्तो
माझा भारत, माझा भारत ॥ ११ ॥
शत्रूलाही 'सांभाळणाऱ्या खुर्चीचे
का न कळे, न जुळे आपल्याच मातीशी
पुकारतो दोन्ही हाती त्यांना
माझा भारत, माझा भारत ॥ १२ ॥
वैयक्तिक स्वार्थ जेव्हा तुडवतो
हजारो निष्पाप आशाआकांक्षा
अन्यायाने पेटून उठतो
माझा भारत, माझा भारत ॥ १३ ॥
माझ्या भारताला पोहोचतो
टाहो त्याच्या, कणाकणाचा
भरल्या नयनी तो तळमळतो
माझा भारत, माझा भारत ॥ १४॥
माझ्या भारताला आज-
गरज समर्थ हातांची
या शक्तींनो देऊ शाश्वती--
उज्वल उद्याच्या भवितव्याची
हाक तुम्हाला, तुमच्यासाठी-
आसुसलेल्या देशाची
माझा भारत, माझा भारत ॥ १५ ॥
सुवर्णधूर निघो हजार वाटा
हजार हातांनो अविरत झटा
समर्थतेच्या कळसास नेऊ या
माझा भारत, माझा भारत ॥ १६ ॥
कृष्णाची करांगुली कुणी मला द्या
ज्याने नेईन मी हा गोवर्धन
पुन्हा वैभवशिखरी विराजमान
माझा भारत, माझा भारत ॥ १७॥
-- यतीन सामंत
बाई मी शेतात, शेतातं निंदते,
काळ्या मातीतं, जिवनं सांधीते...
हाती खुरपं, खुरप्यानं खुरपीते,
काळ्या मायंवर,नक्षी मी काढीते....!
बाई मी पिकाशी,पिकाशी बोलीते...
मव्हा संसार, संसार सांगते...
मन हालकं, फुलकं करीते...
सुख द:खाचा हिशोब मांडीते...!
बाई खुरपं गं, खुरपं संवंगडी...
त्याच्या साथीनं, किटाळ काढीते...
तणं शावकार, देनं मी मोडीते...
काळ्या मायचं रून मी फेडीते....!
बाई जगाचा जगाचा जलम....
जलम जलमे काळीच्या पोटात...
नाना परीचे,जिवं लहान थोरं...
काळ्या मायचा पसारा आचाट...!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा
रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला १
विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी
कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला २
प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस
विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला ३
प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा
भावनेस व्यक्त करी कविता, ती अर्पितो मी तुजला ४
II शुभं भवतू II
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
घटना' जेव्हां घडली अघटित ।
कुणीही नव्हते शेजारी ।।
कां उगाच रुख रुख वाटते ।
दडपण येवूनी उरीं ।।
जाणून बुजून दुर्लक्ष केले ।
नैतिकतेच्या कल्पनेला ।।
एकटाच आहे समजूनी ।
स्वार्थी भाव मनी आला ।।
नीच कृत्य जे घडले हातून ।
कुणीतरी बघत होता ।।
सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे ।
हेच सारे सुचवित होता ।।
कोण असावा हा गुप्त साक्षीदार ।
नितिमत्ता शिकवी त्याला ।।
बाह्य जगातील द्रष्टा असूनी ।
अंतर्यामीही बसलेला ।।
त्या साक्षीदाराची जाणीव होता ।
कचरुनी जाते मन सदा ।।
अपप्रवृत्तींना आळा बसूनी ।
सत् कर्मे घडती अनेकदा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रभू दयेची बरसात, चालू असते सतत ।।
ज्ञानाची गंगोत्री वाहते, पिणाऱ्यालाच ती मिळते ।।
प्रत्येक क्षण दयेचा, टिपणारा ठरे नशिबाचा ।।
जलात राहूनी कोरडे, म्हणावे त्यास काय वेडे ।।
फळे पडतां रोज पाही, त्याची कुणा उमज न येई ।।
परि न्यूटन एक निघाला, बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।
चहा किटलीचे झाकण हाले, स्टिफनसनने इंजीन शोधले ।।
जीवनातील साधे प्रसंग, शास्त्रज्ञांची बनले अंग ।।
प्रभू असतो सतत तयार, ठरवा तुम्ही दया कशी घेणार ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चोविस तासहि विठ्ठलमंदिर राहिल हें उघडें
ना भक्तांना दर्शन घेण्यां आतां कष्ट पडे ।। १
जेव्हां जेव्हां विठ्ठल झोपे
मूर्ती दारामागुती लपे
भलीथोरली वारकर्यांची दारीं रांग अडे ।। २
पांडुरंग अन् भक्तांमधलें
हवें कशाला अंतर असलें ?
दार उघडुनी बडवे करती पुण्यकार्य तगडें ।। ३
आतां विठुला निद्रा नाहीं
अष्टप्रहर तो दर्शन देई
आतां त्याला भेटायाला होतिल ना झगडे ।। ४
वारकर्यांनो, भक्तांनो, या
वैकुंठाचा लाभ लुटाया
दिठी मारतां विठुस मिठी, मनिं चिदानंद लगडे ।। ५
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti