प्रकाशन दिनांक :- 01/02/2004
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, हे संतवचन निश्चितच प्रेरणादायी आहे. फक्त बदलत्या काळानुरूप या वचनात किंचित बदल सुचवावासा वाटतो. केवळ केल्याने काही होईल याची आता शाश्वती राहिलेली नाही.
माननीय राजसाहेब ठाकरेजी, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला कोण नाही ओळखत? मी आपल्याच महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य नागरिक आहे. म्हणजे तुमचे फ़ोटो मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवणारा, कामाला दांडी मारुन तुमचे भाषण ऎकायला येणारा, टी.व्ही मध्ये जर तुमची मुलाखात असेल तर सगळी कामं बाजूला ठेऊन ते पाहणारा, तुमच्या चळवळींना (अहिंसक मार्गाने) पाठींबा देणारा आणि मतदानाच्या वेळी तुम्हाला मत देणारा, मी एक सर्वसामान्य मराठी हिंदु नागरिक आहे.
लहान असताना रेडिओवर ‘ आवाज के दुनिया के दोस्तो ’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. खरंच ह्या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंर्तजगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनी प्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकांनी ठरवायचे.
दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील.
उत्साहाने सळसळणा-या ऐन तारुण्यात भविष्याची सुंदर स्वप्नं रंगवत फिरण्याच्या नितांतसुंदर वयात जी घरं आणि त्या घरांना ख-या अर्थाने घरपण प्राप्त करून देणारी माणसं भेटतात त्यांना आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या जुन्या भागातील ‘वाडा संस्कृती’ला तब्बल पंचवीस वर्षांनंतर मी कडकडून भेटलो. व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने पाचवीला पुजलेल्या भटकंतीमुळे इच्छा असूनही व्यास्तेतून वेळ काढता आला नव्हता. एकदा तरी वाड्यात राहणा-या सर्वांना भेटायला पाहिजे, असं म्हणता म्हणता अनेक वर्षं निघून गेलीत आणि ‘देखावे बघण्याचे वय निघून गेले’ या ओळी ओठाबाहेर पडण्याचं वय गाठण्याच्या आत तो वाडा ज्या गल्लीत होता तिच्यात अखेर मी प्रवेश केला.
अनेक जुन्या वाड्यांनी आपली कात टाकून धारण केलेल्या त्यांच्या नव्या रूपाकडे मी एखाद्या छोट्याशा गावातून आलेल्या मुलागत बावचळून बघू लागलो. हे वाडे जर एवढे बदललेत तर त्यांच्यात वास्तव्य करणारी माणसं किती बदलली असतील या विचाराने मी उगीचच काळजीत पडलो. वाडा पूर्णत: नामशेष होऊन त्याच्या जागी एक टुमदार इमारत दिमाखात उभी होती. कौलारू घर, सारवलेलं अंगण, त्या अंगणातलं तुळशी वृंदावन यापैकी कशाचाही आता तिथे मागमूस उरला नव्हता. सारवलेल्या अंगणात फिरण्याची सवय असलेली माझी पावलं इमारतीच्या पार्किंगमध्ये काही क्षण रेंगाळली. तुळशी वृंदावनाच्या कोनाड्यात ठेवलेली पणती पूर्ण अंगणात मंद प्रकाश पसरवायची. आज त्याच जागेत अनेक निर्जीव वाहनं स्वत:चा तोरा सांभाळत उभी होती.
वाड्यातील जुन्या मित्रांनी त्यांचे नवीन ब्लॉक्स उत्साहाने दाखवायला सुरुवात केली. एकेकाळी अंधारलेल्या खोल्यांची जागा आता गुळगुळीत टाइल्स व फॉल्स सीलिंगने सजलेल्या प्रशस्त रूम्सने घेतली होती. त्या दुमजली इमारतीतील ब्लॉक्सवर इंटेरिअर डेकोरेटरचा हात फिरला होता. पूर्वी ‘आजी’ नावाच्या संस्थेच्या अखत्यारित असलेल्या स्वयंपाकघरातील मातीची चूल, घडवंची, माठ, ओगराळं इत्यादी बहुपयोगी वस्तूंनी सक्तीची रिटायरमेंट घेतल्यामुळे त्यांची जागा आता मॉड्यूलर किचनमधील स्टेनलेस स्टीलच्या चकचकीत भांड्यांनी घेतली होती. आधुनिकतेचे सगळे अलंकार अंगाखांद्यावर कौतुकाने मिरवणा-या त्या घरांमधील मंडळींना आधुनिकतेचा स्पर्श नक्कीच झाला असणार, असा विचार करत असतानाच मोबाइल पिढीच्या प्रतिनिधींनी मला वाकून नमस्कार करण्यास सुरुवात केली आणि मी उडालोच! ‘हॅलो अंकल’च्या ऐवजी चक्क वाकून नमस्कार? या मुलांना झालंय तरी काय? मी चांगलाच चक्रावलो. ज्यामध्ये अनैतिक संबंधांशिवाय दुसरं काहीही दाखवलं जात नाही अशा सीरियल्स सतत बघूनही ही मुलं बिघडायला तयार नाहीत म्हणजे काय? मी अवाक् झालो असतानाच एका मित्राच्या बायकोने माझ्यावर आणखी एक बॉम्ब टाकला. ‘दर रविवारी तीनपैकी एका घरी एकत्र जमून आम्ही जेवणाचा उत्सव मनवतो!’ आता मात्र हद्द झाली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वत:ला फ्लॅट नावाच्या चौकोनी डब्यात बंदिस्त करून घेतलेली व शेजा-याचा खून पडला तरी त्याबद्दल अनेक दिवस अनभिज्ञ असलेली माणसं ज्या कलियुगात राहतात तिथे सर्वांनी एकत्र जमून जेवणाचा आनंद लुटणं हे एक आक्रितच होतं.
वाडा अस्तित्वात नसला तरी त्याचा आत्मा मात्र प्रत्येकाच्या शरीरात वास्तव्य करत होता हे बघून मी विलक्षण सुखावलो आणि पुन्हा सर्वांना आवर्जून भेटण्याचं आश्वासन देऊन अत्यंत समाधानाने मित्रांचा निरोप घेतला.
-- श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
लग्नसराई सुरू असते. प्रत्येक जण लग्नाच्या गरबडीत असतो.घरामध्ये उत्साह असतो.याच उत्साही वातावरणात आपण काय करतो.याचे भान नसते. लग्नकार्यात अनेक बाबी हितकारक घडतातच असे नाही. काही परंपरा जपल्या जातात. वधुवरांची मिरवणूक असते. वर्हाडींचा थाटमाट असतो. पै पाहुण्यांचे आदरातिथ्य असते. भोजनावळी उठतात.हे प्रत्येक धर्मामध्ये कमीअधिक प्रमाणात घडत असते. त्यामुळे मानवी जीवनात आनंद घेणो हा एक हेतू यामागे असतो.
लग्नामध्ये अक्षता टाकणो हा प्रकार असतो. आशिर्वाद द्यावेत हा त्यामागचा मुळ हेतू आहे. लग्नमंडपात विवाहानिमित्त आलेल्या मंडळीना या अक्षता वाटतात. ज्वारी वा तांदुळास हळद वा रंग टाकून रंगीत बनवलेली असते. काहीठिकाणी त्यामध्ये धने टाकले जातात. ह्या धान्य मिश्रणास मग प्लास्टिकच्या पिशवीत भरतात. पुड्या बनवतात .त्यात 'आम्ही आपले सहर्ष स्वागत करित आहोत' असा मजकूर असलेली, परिवाराच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठी लावलेली असते. साधारणत: एका लग्नामध्ये पंधरा ते वीस किलो धान्य अक्षता तयार करण्यासाठी वापरतात. परवाच्या एका लग्नामध्ये एक व्यक्ती 'फुलं आहेत का?' असा असा प्रश्न करत होती. मी सहजच प्रश्न केला तर मिळालेले उत्तर खूपच उद्बोधन करणारे होते. ती व्यक्ती म्हणाली 'मी कुणाच्याही लग्नात अक्षता न फेकण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण या हाताने अन्नधान्याची नासाडी आपण का करावी?' त्याचा प्रतिप्रश्न बरेच काही सांगत होता. आणि ते बरोबरही होते. 'फुलं नाही मिळाली तर मग काय करता?' आम्ही विचारलेल्या प्रश्नावर ती व्यक्ती पटकन उत्तरली. 'मग काहीच नाही. हाताने टाळी.बस्स. अहो कितीतरी होणारे नुकसान आपण टाळू शकतो.' मला ते पटले. मग निर्णय घेतला. अक्षताऐवजी फुलं फेकण्याचा. काही ठिकाणी जाणिवपूर्वक धान्याऐवजी फुलांचा वर्षाव करतात. काही परंपरा मोडीत निघाल्या पाहिजेत तर चांगल्या परंपरा नवीन सुरू केल्या पाहिजेत. त्यांचे जतनही झाले पाहिजे.
लग्न लागल्यानंतर भूकेजलेले वर्हाड लगेच पंगतीला जेवायला बसते. एकतर वधुवर पक्षाचा तसा आग्रह असतो! भूक असो वा नसो पण लग्नसोहळय़ात जेवण्याचा आनंद घेणो वेगळेच असते.पंगती बसतात. वाढपी वाढतात. लहान मोठे वयाचा विचार न करता वाढतात. जेवण पोटभर होते. उरलेले अन्न तसेच पात्रामध्ये शिल्लक असते. असे कितीतरी अन्न फेकून दिले जाते. अन्नाची नासाडी होते.वाया जाते.ते आपण टाळू शकतो. त्यासाठी मानवी प्रयत्न होणे आवश्य़क आहेत. काही व्यक्ती यासाठी झगडतात.त्यांना बळ मिळायला हवे.
वाढत्या लोकसंख्येत एकीकडे भूकबळी होताहेत आणि एकीकडे अन्न वाया घालवून नासाडी केली जाते ही विसंगती योग्य नाही. पंचतारांकित हॉटेल, ढाबे, खानावळी येथे भोजन मिळते . तिथे व्यवहार असतो. पण खूप अन्न वाया जाते. हॉटेलमध्ये अन्नग्रहण करत असताना सोबतच्या द्रव्यांमुळेही अन्न वाया जाते. मोठमोठय़ा सार्वजनिक ठिकाणी अन्नदान केले जाते तिथेही अन्नाची नासाडी होते. हे वाया जाणारे अन्न ही गरीब लोकांची गरज आहे.देवस्थाने अन्नदान करतात. लग्नकार्य आणि इतर धार्मिक उत्सवप्रसंगी वाया जाणारे अन्न आपण वाचवू शकतो. जेवढे लोक जमणार आहेत. तितक्यांचा स्वयंपाक करणो . ताटात जेवणानंतर अन्न शिल्लक पडणार नाही. याची काळजी संयोजकांसह पाहुण्यांनी घेतली पाहिजे. तरच अन्नाची नासाडी थांबेल.पाणीबचत, उर्जाबचत जशी काळाची गरज आहे तद्वतच अन्नाची नासाडी थांबविणे ही देखील काळाची गरज आहे.त्यासाठी प्रचार आणि प्रसार होणो आवश्य़क आहे. अन्न आणि पुरवठा विभागासह समाजाचे ते काम आहे. ही समस्या केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक स्तरावरील आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर या बाबीचा विचार व्हावा.
प्रत्येकाने प्रत्येक जेवणावेळी हे आठवावे की जगातील कोणीतरी व्यक्ती अन्न नाही म्हणून मृत्यूला जवळ करतोय.कुपोषणामुळे बालमृत्यू होताहेत. पुर्णांन्न न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण करोडोत आहे. एकट्या बंगळुरू शहरात दरवर्षी लग्नात ९४२ टन अन्न वाया जाते. मग जगाची आकडेवारी किती मोठी असेल? त्याप्रती संवेदना जागृत झाल्यास अन्नाची बचत होईल. त्यासाठी कायदा करून कडक अंमलबजावणी करता येईल. बहुतांश लग्नकार्यामध्ये भिकारी अथवा दुर्लक्षित समाज जेवणासाठी पंगतीला बसतो किंवा अन्न मागत असतो आणि दुसर्या बाजुला पोटावरून हात फिरवत मनसोक्त भोजन केले जाते ही विसंगती कधी मिटणार? 'अन्न हे पुर्णब्रह्म आहे.ते यज्ञकर्म आहे' असे म्हणतात. हे ब्रम्ह सर्वांसाठी सारखे नको का ?
-- विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड. मो.9421442995
पुण्यनगरी/12 मे 2017
शेतकरी संघटित झाले, तर सरकारला त्यांच्या पायाशी लोळण घेणे भाग पडेल, परंतु तसे होऊ नये याची सरकार पुरेपूर काळजी घेत असते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना विभाजित करून त्यांच्यातच संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. हे कमी की काय म्हणून खते, बियाणे वगैरेंचा पुरवठा करणारे व्यापारीही त्याला लुटण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो तो शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करणारा आहे कोण? प्रश्नाचे उत्तर कुणीच नाही, हेच आहे, सगळेच शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. दुर्दैव हेच आहे, की या देशात याकुबसाठी गळा काढणाऱ्या लोकांची रिघ लागते, परंतु शेतकऱ्यांच्या मरणावर साधे दोन अश्रू डोळ्यातून गाळणारा कुणीच नाही.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकुब मेमनला गुरुवारी फासावर लटकविण्यात आले. त्याला प्रथम टाडा कोर्टाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी दोन वेळा आणि राज्यपालांनी एकदा त्याची दया याचिका फेटाळली, तरीदेखील त्याला न्याय मिळण्याची एकही संधी नाकारली जाऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या शेवटच्या याचिकेवर विचार करण्यासाठी रात्री तीन वाजता सुनावणी केली, दोन तास युक्तीवाद ऐकून घेतला आणि आपला निर्णय दिला. तत्पूर्वी भारतातील अनेक विचारवंतांनी, ज्यामध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश वगैरेंचा समावेश होता, राष्ट्रपतींकडे याकुबची फाशी रद्द करावी म्हणून निवेदन दिले होते, एवढेच नव्हे तर या निवेदनाला दया याचिका समजण्यात यावे, अशी विनंतीही केली होती. याकुब मेमन त्या अर्थाने भाग्यवानच म्हणायला हवा, त्याचा जीव वाचविण्यासाठी इतक्या सगळ्या लोकांनी इतके सगळे प्रयत्न केले, अगदी सर्वोच्च न्यायालयानेही ऐतिहासिक पुढाकार घेत रात्री तीन वाजता त्याची याचिका सुनावणीसाठी घेतली. याकुबवर देशद्रोहाचा, देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप होता आणि ज्या अर्थी सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशी अनेक सुनावण्यानंतरही कायम ठेवली त्याअर्थी त्या आरोपात तथ्य होते, असे म्हणावयास हरकत नाही. अशा या देशद्रोही याकुबच्या नशिबी आलेले हे भाग्य या देशाचे पोट भरण्यासाठी आपल्या शरीराची माती करणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांच्या नशिबी कधीच आले नाही. तो बिचारा रोज मरत आहे, परंतु त्याला जगविण्यासाठी, त्याच्या आत्मसन्मानासाठी एकही विचारवंत आवाज उठविताना दिसत नाही. साधा न्याय त्याला नाकारला जातो आणि कुणालाच त्याचे काहीही वाटत नाही. कदाचित ते शेतकरी म्हणून जन्माला आले हा त्यांचा याकुबपेक्षाही भयंकर अपराध असावा.
आपल्या देशात किमान वेतन कायदा आहे, किमान मजुरी किती असावी हे सरकारने निश्चित केले आहे. त्यापेक्षा कमी मजुरी देता येत नाही, तो अपराध मानल्या जातो, परंतु शेतकऱ्यांना या किमान मजुरीएवढेही पैसे वर्षभर शेतात राबून मिळत नाही. सरकारच्या लेखी ते शेतीचे मालक आहेत, म्हणून मजुरांच्या वर्गवारीत मोडत नाही, मालक असल्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे आणि सरकारचा अजून एक मोठा गैरसमज म्हणजे शेती हा बिनभांडवली धंदा आहे. शेतीतून जे उत्पन्न मिळते ते सगळेच निखळ उत्पन्न असते. त्यामुळेच शेतीमालाचे हमीभाव जाहीर करताना सरकार उत्पादनखर्चाचा विचार करीत नसल्याचे दिसते.
शेतकऱ्यांना गोड आश्वासन देताना मोदींनी आपल्या प्रचार दौऱ्यात उत्पादनखर्च अधिक पन्नास टक्के नफा हे सूत्र ठेवण्यात येईल असे सांगितले होते. त्याला भुलून शेतकऱ्यांनी मोदींच्या पारड्यात मतांची रास ओतली; परंतु आता याच सरकारच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देता येत नाही, असे शपथपत्र दाखल केले आहे. नुकतेच सरकारी समितीने जे हमीभाव घोषित केले, ते तर अगदी चक्रावून टाकणारे आहे. कापसाचा उत्पादनखर्च प्रतिक्विंटल जवळपास सहा हजार रुपये आहे; परंतु सरकारने घोषित केलेला हमीभाव चार हजार रुपये आहे. सूत्रात बसवायचे, तर हा हमीभाव उत्पादनखर्च उणे पन्नास टक्के असा येतो. मोदी सत्तेवर येताच उत्पादनखर्च अधिक पन्नास टक्क्याचे उणे पन्नास टक्के कसे झाले, हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांवर हा ढळढळीत अन्याय होत असताना सारेच विचारवंत शांत बसले आहेत. याकुबसाठी आतडे पिळवटून आकांत करणारे शेतकऱ्यांच्या मरणावर दोन शब्द बोलायला तयार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग तयार केला जातो, त्याच्या शिफारसी जशाच्या तशा स्वीकारल्या जातात, परंतु शेतमालाचा भाव निश्चित करताना सगळ्याच शिफारसींना कचऱ्याची टोपली दाखविली जाते. हमीभाव निश्चित करताना केंद्र सरकार राज्यांकडून प्रत्येक पिकासाठी शिफारस मागविते; परंतु आजपर्यंत एकदाही राज्य सरकारने शिफारस केलेला भाव शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या शिफारसीपेक्षा किती कमी भाव केंद्राने द्यावा यालाही काही मर्यादा नाही. कापसासाठी राज्य सरकारने सहा हजारांची शिफारस केली आणि केंद्राने चार हजार भाव निश्चित केला. खरे तर राज्य सरकारनेच अपेक्षेपेक्षा तीन हजारने कमी भावाची शिफारस केली. सुत्रानुसार सहा हजार उत्पादनखर्च आणि पन्नास टक्के नफा म्हणजे नऊ हजारांची शिफारस करायला हवी होती, परंतु ती सहा हजारांचीच करण्यात आली आणि त्यातही केंद्राने अजून दोन हजारांची कपात केली. हाच न्याय सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या वेतन आयोगाच्या शिफारसींना लावेल का? तसे कधीच होणार नाही, शेवटी पंतप्रधान, मंत्रिमंडळ वगैरेंचे सरकार असले, तरी खरा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, सनदी अधिकाऱ्यांच्याच हातात असतो. तेच लोक आपल्या पगाराची निश्चिती करतात आणि तेच लोक ती मान्य करतात. सरकारी तिजोरीवर त्यांचाच ताबा असतो. सरकारी कर्मचारी, सनदी अधिकारी आपल्या संघटित ताकदीच्या जोरावर सर्वशक्तीमान वगैरे मानल्या गेलेल्या सरकारला सहजच गुडघ्यावर टेकायला भाग पाडतात. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध होणारा हा पैसा आकाशातून पडत नाही, एक टेकडी तयार करायची असेल, तर कुठेतरी तितकाच मोठा खड्डा खोदावा लागतो. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा हा डोंगर पेलण्यासाठी सरकार मग शेतकऱ्यांना खड्ड्यात टाकत असते. खरे तर शेतमालाचा हमीभाव ठरविताना जे काही निकष सरकार लावत असते किंवा हमीभाव निश्चित करण्याची जी काही पद्धत अवलंबिली जाते तीच या कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना अंमलात आणायला हवी, तसे झाले तर सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार निम्म्यावर आल्याशिवाय राहाणार नाही, परंतु तसे होत नाही, कारण या देशात अप्रत्यक्षपणे दुहेरी नागरिकत्वाचे तत्त्व राबविले जाते. सरकारी कर्मचारी, धनाढ्य उद्योगपती, मस्तवाल व्यापारी हे सगळे प्रथम दर्जाचे नागरिक तर हातावर पोट असणारे मजूर, हमाल, शेतकरी हे सगळे दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत. त्यांच्या हिताचा विचारच केला जात नाही किंवा केला जात असेल, तर तो सगळ्यात शेवटी केला जातो. म्हणजे प्रथम वर्गातील लोकांनी पोटभर जेवून उरलेल्या उष्ट्या-खरकट्यावर दुसऱ्या वर्गातील नागरिकांची वासलात लावली जाते. शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला काही प्रमाणात तोदेखील जबाबदार आहे. आपल्या देशात संघटनांची दादागिरी चालते, हे वास्तव अजून त्याला उमगलेले नाही. सरकारी कर्मचारी संघटित शक्तीच्या जोरावरच आपल्या मागण्या मान्य करून घेतात. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार केला, तर सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाच ते सात टक्केच असेल, त्या तुलनेत शेतकऱ्यांची संख्या साठ टक्क्यांच्या आसपास आहे. उद्या हे साठ टक्के शेतकरी संघटित झाले तर सरकारला त्यांच्या पायाशी लोळण घेणे भाग पडेल, परंतु तसे होऊ नये याची सरकार पुरेपूर काळजी घेत असते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना विभाजित करून त्यांच्यातच संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. ओलिताची शेती करणारा शेतकरी वेगळा, कोरडवाहू वेगळा, कापूसवाला वेगळा, ऊसवाला वेगळा, द्राक्षवाला वेगळा, फळबागा करणारा शेतकरी वेगळा, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालचा अशा वेगवेगळ्या गटांत शेतकरी विभागून सरकारने त्यांच्यातच संघर्ष पेटवून दिला आहे. हे कमी की काय म्हणून खते, बियाणे वगैरेंचा पुरवठा करणारे व्यापारीही त्याला लुटण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो तो शेतकऱ्यांच्या हिताची काळजी करणारा आहे कोण? प्रश्नाचे उत्तर कुणीच नाही, हेच आहे, सगळेच शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. दुर्दैव हेच आहे, की या देशात याकुबसाठी गळा काढणाऱ्या लोकांची रिघ लागते, परंतु शेतकऱ्यांच्या मरणावर साधे दोन अश्रू डोळ्यातून गाळणारा कुणीच नाही.
-- प्रकाश पोहरे
रविवार, दि. 2 ऑगस्ट 2015 (दै. देशोन्नतीमधील प्रहार या सदरात प्रकाशित)
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.
‘‘चाँद मिलता नही - सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’
खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.
ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.
सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. - थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला - 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही.
नेपोलियन समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे....
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.
मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.
‘‘ कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत
अरे डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत.’’
-- डॉ. दत्ता कोहिनकर यांचा हा लेख फेसबुकवरुन फॉरवर्ड केला आहे.
आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चा होत आहे ती केवळ घोटाळ्यांची. प्रत्येक क्षेत्रात घोटाळा आहे आणि त्याचे आकडेही केवळ काही कोटींचे राहिले नसून लाखो कोटींचे झाले आहेत.
पूर्वीच्या काळाची आठवण झाली. एक शिक्षक अनेक वर्गांना शिकवीत असत. या शाळेत मुळात एकच शिक्षक आहे. जगातले हे विलक्षण ज्ञानपीठ आहे. इथे मी काय शिकलो याची चाचणी देणे बंधनकारक नाही. मी जर एक चांगला माणूस बनू शकलो व निसर्गाचा आदर केला तर शाळा सोडल्याचा दाखला मला नक्की मिळेल.
Copyright © 2025 | Marathisrushti