(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठवाडा – स्वतंत्र राज्य ?

    महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्री. श्रीहरी अणे यांनी नुकताच, ‘मराठवाड्याचे वेगळे राज्य व्हावे’ असा विचार मांडला. (त्याआधीही त्यानी, ‘विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे’, असा विचारही मांडलेला आहे).

    श्री. अणे यांच्या वक्तव्यावर भिन्नभिन्न पक्षांमधल्या विविध राजकारण्यांनी ‘भावनिक गदारोळ’ केला ; इतका की, त्यानंतर श्री. अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. २३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखात, “श्रीहरी अणे यांच्यासारखा बुद्धिमान वकील, ‘चुकून बोललो’ या गटात मोडणारा नाहीं”, असे स्पष्ट म्हटलेले आहे. तो मुद्दा आपण ध्यानात घ्यायला हवा. ‘आपले काहीही चुकलेले नाही’ असाच स्टँड् राजीनामा देतांना अणे यांनी घेतलेला आहे. सरकारी पदावर असतांना एखाद्या व्यक्तीने सरकारच्या ऑफिशियल-स्टँडपेक्षा भिन्न मत मांडावे काय, हा एक वेगळाच विषय आहे. त्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. माझे ते प्रयोजन नाही. लहान-आकाराच्या राज्यांबद्दलचा ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखातील मुद्दा, हा राजकारण, ( मुख्यत्वे, सेंटर-स्टेट यांच्या संदर्भातील राजकारण), तसेच, अर्थकारण यांच्याशी संबंधित आहे. त्यावरही वेगळा विचार करता येईल. पण, अणे यांचा मूळ-मुद्दा कितपत योग्य आहे, हें मात्र आपण बघायला हवे.

    पुढे जाण्यापूर्वी आपण एक बाब घ्यानात घेऊ या, ती ही की श्रीहरी अणे हे वैदर्भीय आहेत, मराठवाड्यातील नाहींत. त्यामुळे, त्यांनी मांडलेला मराठवाड्यासंबंधीचा मुद्दा भावनिक दिसत नाहीं.

    (अर्थात्, विदर्भ व मराठवाडा असा दोहोंचाही मुद्दा मांडून, पश्चिम-महाराष्ट्राने राज्यातील अन्य भागावर केलेल्या अन्यायाचा मुद्दा त्यांना ब्रॉडन् करायचा असेलही. गरीब बिच्चारे कोकण ! त्याचा मुद्दा कोण उठवणार?).

    मी स्वत: मराठवाड्यातला नाहीं (आणि, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधितही नाही). मी या प्रश्नाकडे भावनिक दृष्टीने पाहत नाहीये. इतिहासाच्या दृष्टिकोनातून लॉजिकली पाहिल्यावर, या प्रश्नाची काही उकल होते का, हे पाहण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

    अगदी पुरातन-कालापासून या (सध्या ‘मराठवाडा’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या) भूभागाचे महत्व अखंड आहे. उत्तर-हडप्पीय संस्कृतीची नेवासे व दायमाबाद ही ठिकाणे, सध्याच्या-मराठवाड्याला अगदी लागूनच आहेत. एखाद्या ठिकाणी उत्खनन करून पुरातनकालीन वस्ती आर्कियॉलॉजिस्टांना सापडली, याचा अर्थ असा की, जवळच्या-प्रदेशात तशा प्रकारच्या अन्य वस्त्या (अजून सापडलेल्या नसल्या तरी), असू शकतात. (आणि, ती गोष्ट, सिंधु-सरस्वती संस्कृतीची जी नवनवीन ठिकाणे भारतात सापडत जात आहेत, त्यावरून सिद्ध होते). मात्र, एक गोष्ट निश्चित आहे की, जिथेजिथे अशा हडप्पीय वस्त्या सापडल्या, तिथे पाणी , greenery व शेती करण्यालायक जमीन आणि वातावरण असणारच . अशा वस्त्यांचा, त्यांच्याजवळच्या प्रदेशावरही सकारात्मक परिणाम झालेला होता असणारच, आणि परिणामस्वरूप तो भूभागही सांस्कृतिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्याही त्या काळी अधिक संपन्न झालेला होता असणार.

    याचा एक अन्य पुरावा आपल्याला थोड्या-नंतरच्या काळातील अन्य माहितीतूनही सापडतो. पुरातन काळापासून, शूर्पारक (सोपारा) इत्यादी पश्चिम किनार्‍यावरील व्यापारी बंदरांमधून जे व्यापारी सार्थ (तांडे) पूर्वेकडे जात असत, त्याचा एक महत्वाचा थांबा होता, ( आजच्या ‘मराठवाडा’ या भूभागातील), ‘तेर’, ‘धाराशिव’. तेर, धाराशिवपासून या तांड्यांचे, वेगवेगळ्या दिशांना जाणारे वेगवेगळे गट होत असत, व ते गट पुढे जात. तसेंच पूर्वेकडून येतांना, वेगवेगळे तांडे तेर, धाराशिव येथे एकत्र येऊन, तेथून पश्चिमेकडील व्यापारी बंदरांकडे जात असत. थोडक्यात काय, तर, त्या काळी तेर, धाराशिव महत्वपूर्ण व्यापारी-जंक्शन असण्याबद्दल शंका नाही. यावरूनही त्या काळातील मराठवाडा भागाचे महत्व ध्यानात येईल.

    सातवाहन काळात, पैठण ही राजधानी होती. (बर्‍याच नंतर ती आंध्रात हलवली गेली). राजधानीलगतच्या भागाचा उत्कर्ष होतोच. तसा तो सातवाहन काळातही झालेला असणारच. शालिवाहन शकही त्यांच्याच काळात सुरू झाला. त्यानंतरच्या काळातील राष्ट्रकूट नृप (ज्यांचे राज्य काहीसे खाली, दक्षिणेत होते), स्वत:ला ‘लत्तलूरपूरवराधीश’ असे बिरुद लावीत. त्यावरून, ते मूळचे मराठवाड्यातील लातूर या गावचे असावेत असे अनुमान इतिहाकारांनी काढलेले आहे. स्वत:च्या मूलस्थानाबद्दल प्रत्येकाला आपुलकी असतेच, आणि प्रत्येकजण आपल्या मूलस्थानाशी संपर्क ठेवायला उत्सुक असतो. त्यामुळे, राष्ट्रकूटांचे राजकीय वर्चस्व तत्कालीन मराठवाडा भागावर असो-नसो, पण सांस्कृतिक संबंध तर नक्कीच असणार. वाकाटक हे विदर्भातले, म्हणजेच मराठवाड्याच्या अगदी जवळच्या भागातले. नंतरच्या काळात, देवगिरी (औरंगाबादजवळ) ही यादवांची राजधानी होती. याचा अर्थ असा की, मराठवाडा भूभागाचा उत्कर्ष अनेक शतके झालेला होता असणार.

    अल्लाउद्दीन खिलजीने जरी यादवांचा पराभव केला, तरी देवगिरीचे (दौलताबाद) महत्व मात्र कमी झाले नाही. महम्मद तुघलकाने तर आपली राजधानी उत्तरेकडून (काही वर्षे) दौलताबादला हलवली होती. (आणि, तशीच ती पुढेही राहिली असती तर, १५२६ चे बाबर-इब्राहीम लोघी युद्ध झालेच नसते, असा विचार मनात येतो. तसेंच, नंतरच्या काळातही, तैमूरलंग, नादिरशहा, अहमदशहा अब्दाली यांनी राजधानी लुटण्याचा प्रश्नही उद्भवला नसता. ते दिल्लीपर्यंत सहज पोचू शकले, पण पुढे दौलताबादपर्यंत ते आले असते कां?).

    निजामशाहीची राजधानीही आधी दौलताबाद येथेच होती. नंतरच्या काळात ती अहमदनगरला हलवली गेली. अहमदनगर हें, मराठवाड्याला जवळजवळ चिकटूनच आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. शिवाजी महाराजांचे पूर्वज मालोजी राजे हेही या मराठवाडा भागातले होते. (नंतरच्या काळात, शहाजी राजांना पुणे-सुपे यांची जहागिरी मिळाली).

    त्यानंतरच्या काळात, मोगलांचे दक्षिणेतील सत्तास्थान, म्हणजेच दख्खनच्या सुभ्याची राजधानी, (औरंगाबादजवळ) खडकी येथे होती, व तेथेंच औरंगझेबानें औरंगाबाद शहर स्थापले. निझामाची राजधानीही आधी औरंगाबादेतच होती. (पहिल्या बाजीरावाच्या व नानासाहेबाच्या काळात त्याला मराठ्यांनी तडाखे दिल्यामुळे, निझामाने नंतर आपली राजधानी हैदराबाद येथे हलवली).

    याचा सरळ अर्थ असा की, उत्तर-हडप्पीय संस्कृतीच्या काळापासून, म्हणजे किमान इ.स. पू. च्या प्रथम सहस्रकाच्या आरंभापासून, किंवा द्वितीय सहस्रकाच्या मध्यापासूनय, अथवा त्याही आधीपासून, ते इ.स.च्या १८व्या शतकाच्या मध्यापर्यंत, अशा जवळजवळ ३०००-३५०० वर्षे अथवा त्याहून अधिक काळात मराठवाडा भूभागाला महत्व होते. (निझामाने राजधानी हलवल्यानंतर हे महत्व कमी झाले असणारच).

    आपण सांस्कृतिक अंगानेही मराठवाडा या भूभागाचा विचार करू या. सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या काळाबद्दल पुनरावृत्ती न करता, आपण त्यापुढला काळ बघू. इ.स.च्या सुरुवातीच्या काळातील ‘महाराष्ट्री’ या प्राकृत भाषेतील (जी आधुनिक-मराठीची पूर्वज आहे) एक महत्वाचा काव्यग्रंथ आहे ‘हालाची गाथासप्तशती’ (सतसई). हाल हा सातवाहन वंशातील राजा. सातवाहनांची राजधानी त्याकाळी पैठणला होती, हे आपण पाहिलेच आहे. यावरूनही, १९००-२००० वर्षांपूर्वी या भूभागात किती सांस्कृतिक प्रगती होती, हे ध्यानात येईल. अजिंठा-वेरुळची लेणी, व वेरुळचे ‘कैलास’ मंदिर, ही आज जागतिक महत्वाची हेरिटेज स्थळे मानली जातात. तीही याच भागात आहेत. ती आहेत इ.स. च्या पहिल्या काही शतकांमधील अगदी ८००-९०० वर्षांपूर्वीपर्यंत, काशीनंतर महाराष्ट्रात विद्वानांचे, ज्ञानी पंडितांचे स्थान म्हणून पैठण अत्यधिक प्रसिद्ध होते. पैठणला ‘दक्षिणेची काशी’ म्हणत. (पंढरपूरचे महात्म्य वाढले नंतरच्या काळात, वारकरी पंथामुळे. आणि, तसेही, पंढरपूरही मराठवाड्यानजिकच आहे). अगदी एकनाथ, शिवाजी यांच्या काळातही पैठणला महत्व होते.

    इ.स. च्या सुरुवातीच्या काही शतकांच्या काळात, देवनागरी लिपीचा ‘उगम’ पैठणमध्येच झाला, असे काही विद्वान मानतात. तसे असो-नसो, पण यावरून, पैठणचे व पर्यायाने मराठवाड्याचे तत्कालीन महत्व ध्यानात येईल.

    संतांचे पहाल तर, ज्ञानेश्वर, (आणि अर्थात्, त्यांची भावंडे), एकनाथ व रामदास हे मूळ मराठवाडा भागातीलच. संत नामदेव व संत जनाबाई हेही मूळचे मराठवाडा अथवा त्याच्या अगदी नजिकच्या भागातील. ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी लिहिली नेवासे येथे, आणि आपण पूर्वी पाहिलेच आहे की, नेवासे हे, आजच्या-मराठवाड्याला चिकटूनच आहे. (त्या काळी, मराठवाडा-सोलापूर भाग-अहमदनगर भाग, असे आजचे विभाजन नव्हते, हे सांगायला नकोच).
    समृद्धी असल्याशिवाय लेण्यांचे, मंदिरांचे काम सुरूही केले जात नाही, व ते पूर्णही होऊ शकत नाहीं. गाथासप्तशती काय, किंवा ज्ञानेश्वरी काय, कुठल्याही ग्रंथरचनेसाठी सुयोग्य वातावरण कुठले, तर परिसरात शांतता व स्थैर्य असावे लागते (मग, राज्य कोणाचेही असो). सभोती युद्ध चालू असतांना महिनोन् महिने, वर्षेन् वर्षे, बांधकाम, शिल्पकाम करत रहाणे, अथवा ग्रंथरचना करत रहाणें, हे अगदी कठीणच, किंबहुना अशक्यप्रायच, म्हटले पाहिजे. (पेशव्यांच्या काळात भव्य मंदिरांचे किंवा शिल्पांचे कुठलेही काम झाले नाहीं, याचे मुख्य कारण हेच, की ते सतत युध्दात किंवा युद्धजन्य परिस्थितीत वावरत होते. हे उदाहणही समजून घेतल्यावर, आपल्या वरच्या विधानाला पुष्टीच मिळते).

    शिवकालातील, शिवाजी महाराजांच्या निकटचे असलेले कवी परमानंद, यांचे उपनाम (आडनाव) नेवासकर. म्हणजे, त्यांचे घराणे मूळ नेवासे येथील, म्हणजेच मराठवाडा भूभागालगतचे. शिवरायांना राज्याभिषेक करणारे काशीचे पंडित गागाभट्ट यांचे घराणे मूळचे पैठणचे. यावरूनही पैठणचे काशीच्या संदर्भातील महत्व लक्षात येईल.

    शिखांचे दहावे गुरू गोविदसिंह हे त्यांच्या अखेरच्या काळात नांदेड येथे होते, म्हणजेच मराठवाड्यात. (पुरातन काळी, नांदेड हें नंदिग्राम या नांवानें प्रसिद्ध होतें) . गोविंदसिंहांना पंजाब सोडून अन्यत्र जायचे होते, तर त्यांनी मराठवाडा भागच कां निवडला, ही बाब विचारणीय आहे.

    १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, आणि वर्षभराने हैदराबाद संस्थानावर भारत सरकारनें कार्रवाई करून ते ताब्यात घेतले. त्यानंतर, १९५० च्या दशकात भाषावर प्रांतरचना झाली, व नंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. १९६० मध्ये, एकभाषिकत्वाच्या मुद्द्यावरून विदर्भ व मराठवाडा हे भाग महाराष्ट्रात सामील केले गेले. (त्याआधी तर, नागपूर हें शहर ‘मध्यप्रदेश’ या राज्याची राजधानी होते).

    या सार्‍याचा अर्थ असा की, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, भाषिक व अध्यात्मिक, या सर्व अंगांनी, मराठवाडा हा भूभाग शतकानुशतके महत्वपूर्ण होता.

    निझामाची राजधानी हैदराबादला हलविली गेल्यानंतर मराठवाड्याच्या महत्वाला उतरती कळा लागली, हे आपण पाहिलेच आहे. १९६० मधील राज्य-पुनर्रचनेत, मराठवाड्याला महाराष्ट्र राज्यात सामील केले गेले तेव्हा, आपल्या भूभागाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे मराठवाड्यातील जनतेला वाटले असल्यास नवल नव्हे. मात्र, नंतरच्या काळातील महाराष्ट्र राज्यात, विदर्भ, मराठवाडा व कोंकण या भागांवर अन्याय झाला, आणि त्यामुळे त्या-त्या भागातील जनतेची निराशा झाली व नाराजी ओढवली, ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाहीच. काही मुख्यमंत्री मराठवाड्यातील (किंवा विदर्भातील अथवा कोकणातील) होते, केवळ या एका गोष्टीवरून त्या-त्या भूभागाची प्रगती झाली, असे नक्कीच म्हणता येत नाहीं. एखादया शहराला केवळ, ‘राज्याची दुसरी राजधानी’ असा दर्जा देऊन (जसें की, नागपूर, बेळगाव), किंवा केवळ तेथें हायकोर्टाचे खंडपीठ असल्याने (जसें, औरंगाबाद), त्या भागातील मूलभूत प्रश्न सुटत नाहींत. एखाद्या भूभागाची, ‘आपल्यावर अन्याय झाल्याची भावना’ जर योग्य असेल, समर्थनीय असेल, तिला जर खरोखरच आधार असेल तर, त्याचे उत्तर नुसते ‘भावनिक’ असून चालणार नाही. तो अन्याय दूर होणे, हाच त्यावरचा खरा व सुयोग्य उपाय आहे. मराठवाडा (तसेंच विदर्भ व कोकण) या भागातील रहिवाश्यांच्या मनात असंतोष खदखदतो आहे, हे माझ्यासारख्या साधारण माणसालाही दिसते. राज्यकर्त्यांनी तो असंतोष दृष्टिआड करता कामा नये. नाहीतर एक दिवस त्याचा उद्रेक होऊ शकतो.

    पण होते काय, की प्रत्येक प्रश्नाला दुसरी (विरुद्ध) बाजूही असते, आणि त्या बाजूलाही काही लोक अस्तन्या सरसावून उभेच असतातच. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याला राजकारणी कचरतात, कारण ‘पुढील निवडणुकीत त्याचा विपरीत परिणाम होईल’, अशी भीती त्यांना सतत सतावत असते. मग, नेहरूंच्या-काळात आंध्रप्रदेशच्या निर्मितीसाठी एखाद्याला स्वत:ला जाळून घ्यावे लागते ; संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ लोकांना प्राण गमवावे लागतात ; ‘पंजाबी सूब्या’साठी अकाली दलाला ठाम भूमिका घ्यावी लागते ; हल्लीहल्लीच्या काळात वेगळ्या (सेपरेट)-तेलंगाणा राज्यासाठी एका राजकीय पार्टीला आंदोलन करावे लागते. आणि असे काही झाल्यानंतरच मग, ते-ते प्रश्न, ‘क्रायसिस मॅनेजमेंट’ अशा स्वरूपात तातडीने सोडवणे राजकारण्यांना भाग पडते. क्रायसिस निर्माण होत नाही तोवर, बेळगावसारखे प्रश्न अनिर्णित ठेवणेच राज्यकर्त्यांना सोयीचे पडते. हा धोकादायक ट्रेंड आहे.

    लहान राज्ये कितपत व्हाएबल् आहेत, या प्रश्नाला अनेक पैलू आहेत. त्यांत आपण तूर्तास जात नाही आहोत. पण, आपल्याला एक गोष्ट मात्र नक्कीच दिसते, ती ही की, आजवर मोठ्या राज्यांचे विभाजन होऊन लहान-राज्ये निर्माण झालेलीच नाहीत, असे मुळीच नव्हे. मुंबई राज्याचे महाराष्ट्र व गुजरात असे विभाजन झाले. ‘NEFA’ मधून छोटी राज्ये निर्माण केली गेली. पूर्वीच्या पंजाब राज्यामधून ‘हरियाणा’ , आसाममधून ‘मेघालय’, उत्तर प्रदेशातून ‘उत्तराखंड’ , बिहारमधून ‘झारखंड’ , मध्यप्रदेशातून ‘छत्तीसगड’, आंध्रमधून ‘तेलंगाणा’, ही राज्ये कार्व्ह् आऊट केली गेलीच की. अजूनही, उत्तरप्रदेशामधून ‘पूर्वांचल’ वेगळे राज्य करण्याची मागणी आहेच. बुंदेलखंड भागालाही, आपला भूभाग मध्यप्रदेश व उत्त्तरप्रदेश या दोन राज्यामध्ये विभागला गेल्याची खंत आहे, व त्यांना ते दोन्ही विभाग एकत्र करून आपले स्वतंत्र राज्य हवे आहे.

    ही व अशी उदाहरणे असतांना, विदर्भ व मराठवाड्याची स्वतंत्र राज्ये असावीत, असे कुणा विचारवंताला वाटणें कितपत अजिबात अयोग्य आहे ? एकतर त्याला सपोर्ट तरी करा, किंवा तर्काच्या आधाराने त्याला विरोध करा. भावनिक गदारोळ फक्त त्या-त्या वेळी दबाव उत्पन्न करतो, पण त्याने लाँग-टर्म उत्तर नक्कीच मिळत नाहीं.

    आणि समजा, विदर्भ व मराठवाड्याची उद्या स्वतंत्र राज्ये झालीच, तर एकच्याऐवजी तीन मराठी-भाषिक राज्ये होतील ! हिंदीचेंच पहा ना, किती हिंदीभाषिक राज्ये आहेत तें ! आता तेलगूभाषिकही २ राज्ये झाली. मराठी भाषेचा अभिमान, तुम्हाला-मला, सर्वांनाच आहे. पण, स्वतंत्र-राज्य-निर्मितीचे निकष वेगळेच आहेत, हे आपण मान्य करायला हवे.

    ‘शिशुपालाचे शंभर अपराध भरले’ या वाक्प्रचाराचा अर्थ हाच आहे, की ‘समोरच्याची सहनशक्ती, जी त्याने आजवर वापरली होती, ती, आता संपली; आता परिणाम भोगायला तयार हो’.

    तेव्हा, असे कळीचे प्रश्न वेळीच पुढाकार घेऊन सोडवलेलेच बरे. प्रोक्रॅस्टिनेशन करणे, चालढकल करणे, म्हणजेच ‘शंभर अपराध भरेपर्यंत वाट पहाणे’ ! तसे होऊ नये, हीच आशा.

    - सुभाष स. नाईक. सांताक्रूझ (प.), मुंबई.

    दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५. भ्रमणध्वनी : ९८६९०९२१२६.
    ईमेल : vistainfin@yahoo.co.in. वेब-साईट : www.subhashsnaik.com

  • सरकारचा बोलविता धनी कोण?

    फ्रेंच नौदलाच्या क्लेमेंस्यु या जहाजाची उपयुत्त*ता संपल्यामुळे हे जहाज तोडण्यासाठी गुजरातमधील अलंग शिप ब्रेकिंग यार्डमध्ये पाठविण्यात आले होते. या जहाजात मोठ्या प्रमाणात अॅस्बेस्टॉस असल्यामुळे प्रदुषणाचा मोठा धोका निर्माण झाला असता. हा धोका लक्षात घेऊनच क्लेमेंस्युला भारतीय सागरी हद्दीत प्रवेश देऊ नये अशी जोरदार मागणी पर्यावरणवाद्यांनी केली.

  • दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

    ‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’ या तत्वांना घेऊन आज आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करुया. अलीकडच्या काळामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन वस्तुंची खरेदी करणे, वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबासमवेत फिरायला जाणे, मौज मजा करणे, मित्रांसोबत पार्टी करणे, भरमसाठ महागाचे फटाके फोडणे इतकाच मर्यादित अर्थ आजच्या तरुणाईला माहीत आहे. हे तरुणाईच्या वेगळ्या प्रकारच्या उत्साहावरुन आणि वर्तनावरुन जाणवते.

  • शेतकर्‍यांवर संकटांची मालिका !

    शेतकर्‍यांची परिस्थिती उत्तरोत्तर बिकटच होत असेल, तर कुठेतरी मुळातच चूक होत असावी, हे सरकारच्या कसे लक्षात येत नाही? आजपर्यंत केवळ कुचकामी ठरलेले उपायच सरकार पुन्हा पुन्हा का योजत असते? जगातला कुठलाही उत्पादक आपले उत्पादन त्या उत्पादनासाठी आलेल्या खर्चापेक्षा कमी भावात विकत नाही. व्यापाराचे, धंद्याचे हे मूलभूत तत्त्व आहे, तशीच परिस्थिती आली तर तो आपला धंदा बंद करेल; परंतु भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकरी वर्षोनुवर्षे हा घाट्याचा सौदा करीत आलेला आहे, त्याला तसे करणे भाग पडत आहे, कारण सरकारची धोरणेच तशी आहेत.

  • झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे..!

    आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा.

  • कोरडेपणा नव्हे तर व्यवहार्यता!

    प्रकाशन दिनांक :- 19/12/2004

    अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा मुलभूत आहेत, याचाच अर्थ त्यांचे महत्त्व केवळ सामान्य पातळीवर, इतर साधारण प्राणी जगतात त्या पातळीवर जगण्यापुरते मर्यादित आहे. परंतु इतर प्राण्यांशी मानवाची तुलना करता येणार नाही. सर्वच बाबतीत मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची बौद्धिक, मानसिक क्षमता जशी उच्च कोटीची आहे, तशीच त्याची जगण्याची शैलीही वेगळी आहे. जगण्यासाठी त्याच्या पोटाला ज्याप्रमाणे चार घास आवश्यक आहेत त्याचप्रमाणे त्याच्या संवेदनशील मनाला जगण्याची उभारी येण्यासाठी, ती टिकण्यासाठी मायेची ऊब, निकटवर्तियांची सहानुभूती, प्रेम तितकेच आवश्यक ठरते. खरे तर मायेची ही ऊब, प्रेमाचा ओलावा हाच त्याच्या जगण्याचा आधार आहे. ज्यांना हा आधार मिळत नाही ती माणसं भौतिक सुखाची रेलचेल असूनही मनातून कायमची दु:खी असतात. प्रसंगी प्रचंड कर्तृत्त्ववान माणसांचे आयुष्यदेखील असा आधार न मिळाल्याने कोसळल्याचे दिसून येते. विशेषत: उतारवयात अशा मानसिक आधाराची नितांत गरज असते. हा आधार आई-वडील आपल्या मुलांमध्ये शोधतात. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच असते. आपल्या मुलांची त्यांच्या बालपणी आपण जशी काळजी घेतली, त्यांना जसे प्रेम दिले, तशीच त्यांच्या कडून म्हाताऱ्या आई-वडिलांची अपेक्षा असते. परंतु मोजके भाग्यवान आई-वडील सोडले तर बहुतेकांच्या वाट्याला या संदर्भात निराशाच येते. मुलं आपल्याला विचारीत नाही, हाच बहुतेकांचा अनुभव असतो. ज्यांची मुले विदेशात आहेत, त्यांच्याकडे तर आपले देशी आई-वडील टिकूच शकत नाही. विदेशात मोठ्या पदावर नोकरीला असलेल्या अथवा मोठा उद्योग सांभाळणाऱ्या मुलांकडे आता उर्वरित आयुष्य निवांतपणे घालवावे या विचाराने गेलेले आई-वडील चार-सहा महिन्यातच हिरमुसले होऊन भारतात परततात. त्यांच्या निवांत जगण्याच्या कल्पनेतील मुलभूत गरज असते, ती प्रेमाच्या, सहानुभूतीच्या, आपुलकीच्या ओलाव्याची. नेमकी हीच गरज तिथे पुरविली जात नाही. केवळ विदेशात मुले असणाऱ्या आई-वडिलांनाच हा अनुभव येतो असे नाही. अलिकडील काळात भारतातील मोठ्या शहरात, 'मेट्रो सिटी'तदेखील या 'कोरडेपणाची' मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे दिसते.
    माणसं एकमेकांच्या अगदी जवळ राहात असूनही खूप दूर गेलेली दिसत आहेत. आपुलकीचा झरा आटल्यासारखा झाला आहे. प्रेमाच्या ओलाव्याला शहरी माणसांच्या जगात जागाच उरली नाही. माणसांची मने सिमेंट-काँक्रिटसारखीच दगडी झाली आहेत. इथे स्थान उरले आहे ते केवळ कोरड्या, रुक्ष व्यवहाराला. शहरे अशी माणुसकीला, परस्परांच्या आपुलकीला हळूहळू पारखी होत असली तरी ठाामीण भागात मात्र परस्पर सहकार्य, एकमेकांना समजून घेण्याची, सांभाळण्याची भावना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. केवळ माणसात आढळणारा माणुसकीचा गुण शहरातून हद्दपार झाला असला तरी खेड्यापाड्याच्या सांदी कोपऱ्यात अद्यापही माणूसकी टिकून आहे. झोपड्यांच्या भिंती सिमेंट काँक्रिटसारख्या दगडी झालेल्या नाहीत. माणुसकीचा ओलावा या भिंतीतून अद्यापही पाझरत आहे. जुन्या काळी गावात एखाद्याच्या घरी पाहुणा आला तर तो केवळ त्या घरापुरता पाहुणा नसायचा, तर तो संपूर्ण गावाचाच पाहुणा असायचा. गावातील एखाद्याचा जावई संपूर्ण गावाचा जावई ठरायचा. आज परिस्थिती अगदी तशी नसली तरी पाहुण्यांचे आदरातिथ्य आजही गावात व्यवस्थित केल्या जाते. माणसा-माणसातील सहबंध शहराच्या तुलनेत आजही गावाकडे टिकून आहेत. गावाकडची माणसं आजही अघळपघळ आहेत. त्यांच्याकडे निवांतपणे गप्पा मारायला वेळ आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती आहे आणि ती त्यांची गरजसुद्धा आहे. ठाामीण भागातली जीवनशैलीच अशी आहे की खड्यातले प्रत्येक घर एकमेकांशी या ना त्या कारणाने जुळलेले असते. त्यामुळे ही माणसं जेव्हा शहरात येतात तेव्हा शहरी वातावरणाशी, तिथल्या जीवनशैलीशी त्यांना जुळवून घेता येत नाही. ज्याप्रमाणे नव्या आधुनिक पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या मुलांशी जुळवून घेणे आई-वडिलांना सहज शक्य होत नाही, त्याचप्रमाणे खेड्यातील लोकांनाही शहरी माणसं अतिशय कृत्रिम आणि कोरडे वाटतात. ही वस्तूस्थिती असली तरी नाण्याची दुसरी बाजूही समजून घेणे आवश्यक आहे.
    आज जग झपाट्याने बदलत आहे. जीवन अतिशय वेगवान झाले आहे. स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा केवळ व्यवसाय, उद्योगधंदा किंवा प्रगतीशी संबंधित राहिलेली नाही. प्रत्यक्ष जगण्याची स्पर्धाही तितकीच तीप झाली आहे. शहरी माणसाजवळ निवांतपणा उरलेला नाही. थांबण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नाही. 'जो थांबला तो संपला' अशी परिस्थिती आहे. या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर ऊर फाटेस्तोवर कष्ट करण्याला निदान शहरात तरी पर्याय नाही. याचा अपरिहार्य परिणाम त्याच्या वागणुकीवर आणि जीवनशैलीवर दिसून येतो.
    शहरातली माणसे आज एकलकोंडी, अतिशय आत्मकेंद्रीत झाली असली तरी ती त्यांची अपरिहार्यताच आहे. शहरी संस्कृतीच्या नावाने बोटे मोडणाऱ्या खेड्यातील लोकांना किंवा आपल्या मुलांनी आपल्यासाठी निवांत वेळ द्यावा अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-वडिलांना ही परिस्थिती समजून घ्यावी लागेल. बरेचदा खेड्यावरची एखादी व्यक्ती शहरातील नातेवाईकाकडे येते आणि त्याची अपेक्षा असते ती शहरातल्या या यजमानाने आपले साठासंगीत आदरातिथ्य करावे, आपल्यासाठी भरपूर वेळ द्यावा, हातातली सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या कामासाठी त्याने धावपळ करावी. ही अपेक्षा अवास्तवच म्हणायला पाहिजे. खेड्यातला निवांतपणा शहरात शक्य नाही, ही वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे. आज ग्रामीण आणि शहरी असे संस्कृतीचे विभाजन झाले असले तरी हे विभाजन परिस्थितीशी समायोजन साधण्याच्या प्रयत्नातून झालेले आहे. शहरी जीवनाच्या धावपळीचा अपरिहार्य परिणाम हा व्यावहारिक रुक्षपणातून समोर येतो. हा बदल आम्हाला स्वीकारावाच लागेल. प्रत्येक गोष्ट स्वत:ला अनुकूल असण्याचा हट्ट प्राप्त परिस्थितीत तरी योग्य म्हणता येणार नाही. जिथे जिवंत राहणेच हे एक आव्हान ठरले आहे तिथे मानवी भावभावनांच्या अस्तित्वाला अशी कितीशी किंमत मिळणार? नाण्यांच्या या दोन्ही बाजुतून हेच स्पष्ट होते की, परिस्थितीशी झगडत स्वत:चे अस्तित्व टिकविताना अनेक चांगल्या गोष्टींचा बळी जातच असतो. जीवनचक्रात या न टाळता येणाऱ्या बाबी आहेत. त्या समजून घेऊनच त्यातून मार्ग काढता येईल.

    -- प्रकाश पोहरे

  • धोरण शेतकरी केंद्रित असावे !

    आज गुजरात एक प्रगत राज्य म्हणविले जाते; कारण तिथला शेतकरी समृद्ध झाला आहे. गुजरातमध्ये भारनियमन नाही, शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला उचित दाम मिळण्याची काळजी तिथले सरकार घेते, शासन आणि प्रशासन स्तरावर भ्रष्टाचार अगदी नसल्यातच जमा आहे. गुजरात सरकारने शेतकऱ्यांना जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्याचाही परिणाम शेतकर्‍यांच्या उन्नतीवर झाला आहे. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही?

  • शेतीचे दिवस पालटत आहेत….

    ज्याकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, त्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी,हे सूत्र इथे मान्यताप्राप्त होते. शेतीला सर्वोच्च दर्जा दिल्यानेच या देशात सोन्याचा धूर निघण्याइतपत समृद्धी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.नंतरच्या काळात मात्र सगळे गणितच उलटेपालटे झाले. समृद्ध शेती भिकेकंगाल झाली, शेतीचा मालक पै पैसाठी मोताद झाला, परिस्थिती इतकी विकोपाला गेली की शेवटी शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ आली.

  • यशस्विता : काही पैलू  

    यशस्विता ही एखाद्या हिर्‍यासारखी आहे. हिर्‍याला विविध पैलू असतात, व वेगवेगळ्या दिशांनी बघितल्यावर त्याची खरी चमक उमगते, खरी किंमत कळते. यशस्वितेचंही तसंच आहे.

    भाग :

    ‘यशस्वी कोण’ असा प्रश्न जर आपल्याला कुणी विचारला तर एखादा खेळाडू, उद्योगपती, कलावंत, ख्यातनाम शास्त्रज्ञ वा समाजात काहीतरी चळवळ उभारू पहाणारा पुढारी, यांच्याकडे आपण बोट दाखवू. पण, यश म्हणजे काय, असं जर कुणी विचारलं तर पटकन सांगता येणार नाही. कारण यश ही बहुधा सामाजिक बाब मानली जाते. समाजानं दिलेला मान, आदर, लोकप्रियता, बक्षिसं, पदकं, इत्यादींच्या स्वरूपात व्यक्तीला ते मिळतं. परंतु, यशाला वैयक्तिक बाजू असतेच की ! ती समजण्यासाठी यशस्वी माणसांनाच प्रश्न विचारला की, ‘काय हो, तुम्ही स्वत:ला यशस्वी समजता का ?’, तर कदाचित बरीच यशस्वी माणसे निश्चित उत्तर देऊ शकणार नाहीत. ती बहुधा असं म्हणतील की, ‘अजून नाही’, किंवा ‘माझ्या मनात काही तरी अजून करायचं आहे’, किंवा ‘माझ्या मतें मी अजून पूर्णत्वाला पोचलेलो नाही’, इत्यादि.

    याचा अर्थ आपण एवढाच घेऊ या की, यश ही काही एकसंध बाब नव्हे. तिला सामाजिक, वैयक्तिक, झालंच तर, आर्थिक, कौटुंबिक इत्यादि अनेक पैलू आहेत, व या सर्वांना भाषेच्या दारिद्र्यामुळे एकच नाव आहे. तूर्तास आपल्यापुरता आपण, ‘यश म्हणजे, ज्या हेतूनं काम करायला हाती घेतो, ते काम समाधानकारकपणे पार पाडणं’ हा अर्थ घेऊ या.

    हे ईप्सित साध्य व्हायला कायकाय आवश्यक आहे ? असा समज आहे की, एकतर नशिबाची साथ हवी, किंवा थोडा ‘चक्रमपणा’ (दीवानगी, ध्यास, एककल्लीपणा,झपाटलेपणा) हवा, किंवा तुमच्यात असामान्य कौशल्य हवं, किंवा तुम्ही ज्याची भरभराट होत रहाणार आहे अशा क्षेत्रात असायला हवं.

    आता, ह्या गृहीतकामधे, या स्टेटमेंटमधे कितपत तथ्य आहे, हे पाहू या.

    • नशीब :

    आपण गृहीत धरतो की, कर्तृत्ववान माणसाच्या यशापाठी नशिबाचा काहीतरी वाटा असतोच. आपला असा समज असतो की, उद्योगपतीला धंदा वाढवण्यासाठी जी योग्य वेळ आवश्यक असते ती मिळते ; क्रिकेटपटूच्या घरी क्रिकेटला पोषक वातावरण असतं, झालंच तर त्याची वर्णी लावायला नातेवाइकांचं पाठबळ त्याला लाभतं ; एखाद्या प्रथम-श्रेणीच्या विद्यार्थ्याला जन्मजात अशी कुशाग्र बुद्धिमत्ता व

    उत्तम गुरु मिळालेले असतात ; एखादा मॅनेजर वरच्या जागेवर पोचतो कारण त्याच्या प्रमोशनच्या वेळेला खुर्ची रिकामी झालेली असते ; खुशमस्कर्‍या स्वभाव तसंच बॉसवर इंप्रेशन मारण्याची कला त्याला उपयोगी पडलेली असते.

    पण असं म्हणणं कितपत योग्य आहे ? खरं तर, ह्या सर्व केसेसमधे, ‘यशासाठी केवळ एकच घटक आणि तो म्हणजे नशीब’, असं कुणीच म्हणू शकणार नाही. कारण, एखादी गोष्ट यशस्वी होण्यामागे अनेक ‘जर-तर’ असतात. उदा. विद्यार्थ्याचे परीक्षेतील उत्तम मार्क. एकतर, त्यातल्या त्यात जो विषय चांगला समजला असेल त्यावर प्रश्न यायला हवेत, पेपर तपासणारे निरीक्षक काटेकोर मार्क देणारे नसावेत, विद्यार्थ्याची तब्येत व मूड उत्तम हवा, कुटुंबातील वातावरण त्या वेळेला आनंदी हवं, इत्यादि. या सर्व गोष्टी जमून आल्या तरच परीक्षेत चांगलं यश मिळू शकेल. एखाद्या माणसाला ह्या सर्वच गोष्टी अनुकूल असतील तर त्यात नशिबाचा वाटा किती ; आणि त्याचे परिश्रम, विषयाची समज, परिस्थितीचा व एकूण घटनांचा त्याचा अंदाज इत्यादींचा वाटा किती ?

    मला असं वाटतं की, जे घटक आपल्या हातात नाहीत त्यांच्या बाबतीत नशिबाचा वाटा आहे असं फारतर म्हणता येईल ; पण इतर बाबींमधे त्या व्यक्तीचे प्रयत्न, निर्णय, आकलन इत्यादींचा त्याच्या यशात मोठा वाटा आहे.

    कबूल, की काहींचं आयुष्य एखाद्या फटक्यासरशी उजळतं. एखादा माणूस जिथे काम करतो तिथल्या फर्मच्या मालकाच्या मुलीबरोबर त्याचं लग्न जमतं, लग्न होतं व ती फर्मच त्याच्या हातात येते. किंवा, शेअर्सचे भाव वाढून लक्षावधी रुपये एखाद्याच्या हातात येतात.

    नशिबाला दुसरी बाजूही असते. अत्यंत हुशार व मेहनती मनुष्य आहे. त्याने पेट्रोल वाचवण्याबाबत कष्टाने शोध लावला आहे, पण त्याच्या शोधाला मान्यता, पैसा मिळायच्या आधीच पेट्रोलचे भाव उतरले आहेत ; परीक्षेत विद्यार्थ्याला उत्तम यश मिळूनही बोर्डाच्या चुकीमुळे ‘नापास’ असा शिक्का बसला आहे, व त्यामुळे प्रचंड मानसिक धक्का त्या विद्यार्थ्याला सहन करावा लागत आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

    मला असं वाटतं की, काही माणसं जरा जास्त नशीबवान असतात, काही जरा कमी. बहुतेकांच्या आयुष्यात यशापयशाचे प्रसंग सारख्याच प्रमाणात असावेत. ‘ही जी थोडीशी काही नशीबवान माणसं आहेत ती केवळ नशिबाच्या जोरावर कीर्तीमान होतात व झाली आहेत, आणि बाकी सगळे नशिबाच्या अभावामुळे पाठीमागे राहिले आहेत’, असं म्हणणं बरोबर ठरणार नाही. अर्थात् , आपल्या सर्वांनाच असं समजणं दिलासा देणारं असतं की, ‘आपल्यातही काही कमी क्षमता नाही पण नशिबाची साथ हवी तेवढी नसल्यामुळे पाहिजे तितके यश आपल्या पदरी पडत नाही’.

    खरी मेख ही आहे की, नशीब काही आपल्याला दार ठोठावून सांगत नाही की ‘माझे स्वागत करा’ . माणसाला वेळोवेळी अनेक संधी उपलब्ध होत असतात. काहींची त्याला कल्पना असते, तर काही त्याला हुडकून काढाव्या लागतात. कोणत्या संधी स्वीकारायच्या हे त्याची निर्णयशक्ती, परिस्थितीबाबतचे आकलन, यशापयशाची भीती तसेच त्याबद्दलचे अंदाज, यावर असतं. यशस्वी माणसं संधी आल्या तर निष्क्रियपणे बघ्याची भूमिका न घेता, निश्चय, आखणी व स्वत:ची खास स्टाइल वापरून तिचं रूपांतर प्रयत्नात करतात ; एवढंच नाही तर कधी कधी संधी स्वत: निर्माण करतात.

    • असामान्य कौशल्य, गुणवत्ता, ‘चक्रमपणा’ (दीवानगी, ध्यास, झपाटलेपणा) :

    बहुधा आपण माणसं निर्णय घेतांना एक मध्यम-मार्ग अनुसरत असतो. म्हणजे असं की एखादी नवीन नोकरी मिळत असेल तर तिच्यामुळे कुटुंबाचे स्थलांतर करावं लागेल का ? मुलांचं शिक्षण तिथे कसं असेल ? हवापाणी कसं काय आहे ? मुख्य म्हणजे कष्ट किती करावे लागतील ? स्थैर्य कितपत आहे ? इत्यादि अनेक प्रश्न विचारात घेतले जातात व मग निर्णय होतो. म्हणजेच कुटुंब-आरोग्य, सुरक्षितता, चैन, मानमरातब ह्या सर्वांचा जमेल तेवढ्या प्रमाणात धस लावला जातो. त्यात काही चूक आहे असं जरी म्हणता आलं नाही, तरी, एक गोष्ट मात्र खरी आहे, की , ध्येयनिष्ठ माणसं एका विवक्षित गोष्टीचा ध्यास घेतात, एक ध्येयाकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं , त्यांनी अग्रक्रम (priorities) बहुतेक निश्चित केलेले असतात, प्रसंगी इतर बाबींकडे ते दुर्लक्ष करतात. वरील, नोकरीचं उदाहरण घेऊ या. एखाद्या नोकरीत नवीन शिकण्याची संधी असते, एखाद्या विशिष्ठ प्रकारचं तंत्रज्ञान आत्मसात करता येतं, त्याच्या जोरावर पुढं पाऊल टाकता येतं. एखाद माणूस असा विचार करेल की, आज मला हे शिक्षण कठीण जाणार असलं तर ते पुढच्या करीयरसाठी आवश्यक आहे ; मग मी ते, कितीही कष्ट पडले तरी करेनच. दुसरा एखादा असं म्हणू शकेल की, सध्याची नोकरी तशी बरी आहे, सगळं व्यवस्थित चाललंय. दुसरीकडे नवीन काम शिकता येईल हें खरं, पण असं तर होतच रहाणार, नवीन नवीन तंत्रज्ञानं, कामं, निर्माण होतच रहाणार. मला त्याच्यासाठी इतकी किंमत मोजावी लागणार असेल तर इथेच रहाणं बरं. थोड्याच वर्षांत प्रमोशन ड्यू आहे, इत्यादि. आता, ह्या दोन उमेदवारांमधला पहिला आहे तो माझ्या मते व्यवसायात अधिक यशस्वी होईल. कारण, त्याचा अग्रक्रम व ध्येय त्याने ‘ठामपणे’ ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी, तो चाकोरीबद्ध निर्णय घेत नाही. या दृष्टीनं, कीर्तिवान् माणसं सर्वसामान्य माणसांपेक्षा एककल्ली, धडपडी व चाकोरीबाहेरचं वागतात. म्हणून त्यांना ‘चक्रम’ (दीवाने, झपाटलेले, एककल्ली) म्हणायचं, इतकाच त्याचा अर्थ.

    खेळाडू, कलावंत, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, किंबहुना प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणार्‍या सर्वच व्यक्ती आपल्या यशाचं श्रेय आपल्या गुणवत्तेला देतात. त्यांच्या प्रत्येक यशस्वी प्रयत्नामागे त्यांची हुशारी असतेच ; परंतु इतरांच्यापुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम व योग्य प्रशिक्षणाचीही तितकीच आवश्यकता असत नाही का ? एवढंच नाही, तर योग्य अशा मानसिक दृष्टिकोनाचीही जरूरी असते. त्यानुसार ती व्यक्ती आपल्या प्रयत्नांची आखणी (स्ट्रॅटेजी) करते. उदा. काही वर्षांपूर्वी वर्ल्ड-कप क्रिकेटमधे श्रीलंकेला सर्वप्रथम मिळालेलं यश, (अर्थात् , त्यांनी पहिल्यांदा तो कप जिंकला). आखणी करतांना यशाची व्याख्या केली जाते. म्हणजेच, काय साधायचं आहे हे निश्चितपणे ठरवलं जातं, वेळोवेळी खेळ चाळू असतांना यशापयशाचे जे चढउतार होत असतात त्यांचं निदान व चिकित्सा केली जाते. याचा परिणाम एकूण वाटचालीवर होत असतोच. आपल्याला माहीतच आहे की, त्यापूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाची प्रतिमा दुय्यम किंवा कनिष्ठच होती. मग त्यांना ते उत्तुंग यश कसं मिळालं असेल ? मेहनत व गुणवत्ता,

    याबरोबरच त्यांचा दृष्टिकोण. तो म्हणजे, प्रचंड आत्मविश्वास, धडाकेबाज खेळ, दबावाला भीक न घालण्याची वृत्ती, वरचे खेळाडू लवकर आऊट झाले तरीही पुढल्या खेळाडूनं खेळ चालू ठेवण्याची ऊर्मी, इत्यादि कारणीभूत नाही असं कोण म्हणेल ?

    अगदी एकाच व्यवसायातल्या व्यक्ती घेतल्या तरी, सर्वांमधे सारखंच टॅलंट असत नाही. कोणाकडे कमी तर कोणाकडे जास्त. प्रश्न असा उपस्थित होतो की, टॅलंट कमी असलं तर मग कठोर परिश्रम, प्रशिक्षण असल्या गोष्टींमधे वेळ दवडणं कितपत योग्य आहे ? याचं उत्तर हे आहे की, आधी मेहनत करा आणि पहा काय परिणाम होतो ते. टॅलंट असलं तरी परिश्रमांनीच ते चकाकतं. योग्य प्रशिक्षणाशिवाय नैसर्गिक कौशल्याला पूर्णता येणार नाही. जितकी गुणवत्ता जास्त तितका श्रमांचा मोबदला अधिक मिळतो हेही सत्य आहे. परंतु अजिबात काही न करता नुसत्या टॅलंटवर अवलंबून राहिलं तर कदाचित काहींच मिळणार नाही.

    • योग्य क्षेत्र :

    काही उद्योग-व्यवसाय हे वाढणारे, फोफावणारे असतात, (उदा. आय्. टी. इंडस्ट्री), तर काही त्यामानाने कमी वाढीची असतात, (उदा. स्टील इंडस्ट्री). त्यामुळे, यश मिळण्यासाठी, वाढणार्‍या-क्षेत्रात असणं महत्वाचं ठरतं.

    एखाद्या विवक्षित क्षेत्रातही काही काळ भरभराटीचा असतो. तुम्ही त्यावेळी तिथे असलात तर तुम्हालाही त्याचा लाभ मिळतो. उदा. लश्करी अधिकार्‍यासाठी, शांततेच्या काळापेक्षा युद्धकाळात उदय होण्याची संधी जास्त असते. दुसरं म्हणजे, एखादं क्षेत्र एखाद्या विशिष्ठ गुणवत्तेला, विकासाची उत्तम संधी उपलब्ध करून देत असतं. उदा. जाहिरात क्षेत्रात सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) फायद्याची ठरते.

    भरभराटीच्या क्षेत्रात असणं हा योगायोगाचा किंवा जाणीवपूर्वक केलेल्या निवडीचा भाग असू शकतो. म्हणजे असं की, तुम्ही काही न ठरवता एखाद्या क्षेत्रात पाऊल टाकता, आणि ते वाढायला सुरुवात होते. किंवा, तुम्हाला अंदाज असतो की अमुक अमुक क्षेत्रांची झपाट्यानं वाढ होणार आहे. मग तुम्ही कसोशीनं त्यात जाता, प्रयत्न करता. हे ठीक आहे ; पण प्रश्न असा आहे की, तुमची गुणवत्ता, कौशल्य विशेष उपयोगात येत नाही अशा क्षेत्रात तुम्ही जर काम करत आहात, अगर क्षेत्राला आवश्यक असणारी गुणवत्ता तुमच्यापाशी नाही, तर अशा वेळी तुम्हाला यश मिळू शकेल का ? उदा. आय्. टी. क्षेत्रात जायची इच्छा आहे, पण सॉफ्टवेअर लिहिणं जमत नाही. याचं उत्तर असं आहे की, योग्य अशा क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी अनेक मार्ग विचारात घ्यावे लागतात. तुम्हाला सॉफ्टवेअर विकत घेता येईल, किंवा दुसर्‍याकडून लिहवून घेणं जमेल. शिवाय, एका कामामधे कौशल्य आहे, याचा अर्थ, दुसर्‍या कामामधे अजिबात नाही, असा होत नाही. समजा, सॉफ्टवेअर लिहायचं नसलं, तरी त्याच व्यवसायातलं दुसरं एखादं काम चांगलं जमू शकेल (उदा. प्रॉडक्ट मॅनेजमेंट). तसा प्रयत्न करून बघायला, किंवा निदान तसा विचार करायला काय हरकत आहे ? शाळेत गणित विषय उत्तम असणारा मुलगा मोठेपणी प्रोफेसर होऊ शकेल, पण त्याचबरोबर तो फर्ममधे एक्झिक्युटिव्ह म्हणूनही नाव काढू शकेल.

    • गुंतागुंतीचं समीकरण :

    वैयक्तिक दृष्ट्या मला हे पटत नाही की, यश मिळवण्यासाठी तुम्ही भाग्यवान, ‘चक्रम’ (ध्यास घेऊन झपाटलेले, दिवाणे झालेले), किंवा अतिहुशार, अथवा विवक्षित क्षेत्रात असायला हवं. पण असा सर्वसाधारण ग्रह आहे म्हणून हे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला. यशामधे या सर्व गोष्टींचा वाटा असू शकतो , एखाद्या व्यक्तीच्या भरभराटीमधे ह्यातला एखादा घटक अधिक जबाबदार असतो ; तर दुसर्‍या अनेक केसेसमधे यातला कुठलाच घटक ठळकपणे नजरेस पडत नाही. एखाद्या केसमधे यशामागलं समीकरण अगदी साधं असतं तर दुसर्‍या एखाद्या केसमधे तेच अतिशय गुंतागुंतीचं असतं. एखादं क्षेत्र झपाट्यानं वाढलं आणि त्याबरोबर एखादा माणूस भराभर वर चढत गेला, इतकं कारण एखाद्या केसमधे पुरेसं आहे ; तर काही वेळा वर उल्लेखलेली कारणंसुद्धा पुरेशी नसतात, तर त्यांच्याही पलिकडे आणखी काही घटक कारणीभूत झालेले बघायला मिळतात. अनेक अपयशांमधून जात असतां स्वत:ला नैराश्य (डिप्रेशन) येऊ न देण्याचा खेळकरपणा ; किंवा, जर व्यवसायात (उदा. व्यवस्थापन) अनेकांकडून काम करून घ्यायचं आहे तर माणसाची पारख, टीम-बिल्डिंग, लीडरशिप, हे गुण सुद्धा वरील कारणांबरोबर हातमिळवणी करतात.

    • विशिष्ठ फॉर्म्युला नसतो :

    थोडक्यात सांगायचं म्हणजे, यशाचा काही विशिष्ठ फॉर्म्युला नसतो. आपण जर यशवंत लोकांची, त्यांच्या यशाबद्दल, कामगिरीबद्दल मतं विचारली, तर प्रत्येकाचं ऍनॉलिसिस वेगळं असतं, आणि मुख्य म्हणजे कामाची जी एक स्वतंत्र शैली असते, व ती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर वा थोड्याफार प्रमाणात व्यवसायावर अवलंबून असते. वेगवेगळ्या व्यवसायात तर असंख्य शैली आणि अप्रोच. कुणाची सतत काम करत रहाणं याची ऊर्मी, तर आणखी कुणाचा आत्मविश्वास, कुणाचा कामचा उरक, तर कुणाचा मनाचा कणखरपणा.

    • समान सूत्रे :

    इतक्या विविध शैली, दृष्टिकोन, आणि यशाचे मार्ग असूनही, त्यांच्यातून काही समान सूत्रे निघतात.

    • उत्साह, चिकाटी, निश्चय, आणि एकतानता :

    हे सर्व गुण यशस्वी व्यक्तींमधे दिसून येतात. कामात दिरंगाई, धरसोडवृत्ती हे दुर्गुण यशाला आपलंसं होऊ देत नाहीत.

    • कृतिप्रियता :

    ही माणसं कृतिप्रिय असतात. स्वस्थ बसून रहाणं आणि काय घडतंय ते निष्क्रियपणे पहाणं, हे त्यांना पटत नाही; काहीतरी ठरवून ते स्टेप घेतात, मग दुसरी, तिसरी, इत्यादि.

    • स्वत:शी प्रमाणिक असणे :

    ह्या व्यक्ती स्वत:शी प्रामाणिक असतात. याचा अर्थ असा की, आपल्याला काय करायचं आहे, हे त्यांना ठाऊक असतं. ते योग्य आहे, एवढंच नव्हे तर, कां, कसं योग्य आहे, ते कशा प्रकारे साध्य करायचं आहे, याचं पक्कं भान त्यांना असतं. म्हणजे, त्यांचा वैचारिक गोंधळ होत नाही, किंवा ते कुणाचा सल्ला मानत नाहीत, असं नाही; पण स्वत:ची ओळख चांगल्याप्रकारे असल्यामुळे त्यांच्या विचारांना दिशा असते, विचार एकत्रित होऊन त्यांचा सुसंगत मिलाफ झालेला असतो. म्हणूनच, मार्गावर ज्या अडचणी येतात, त्यांच्यावर ते मात करू शकतात.

    • सकारात्मक विचारधारा :

    आज ना उद्या आपण लक्ष्य साध्य करू, अशी त्यांची सकारात्मक विचारधारा असते.

    • सृजनशीलता : (क्रिएटिव्हिटी) :

    सृजनशीलता म्हणजे, रुळलेल्या विचारांपेक्षा वेगळा विचार, चौकटीबाहेरचा विचार, या व्यक्ती करतात.

    • आलेल्या संधीची उचल :

    आलेली संधी ते उचलून धरतातच, तिचा फायदा घेतातच ; पण ते स्वत:ही संधी निर्माण करतात.

    • यश ही अंतिम पायरी नव्हे :

    एकदा एखाद्या कामात यश मिळालं की यश मिळवण्याची प्रक्रिया संपत नाही. जसं गिर्यारोहकांना एक शिखर चढल्यावर दुसरं एखादं अधिक-उंच शिखर चढायचं असतं, तसं धडपड्या माणसाला वेगवेगळ्या प्रांतांत काम करून दाखवायचं असतं. यश म्हणजे अशी वस्तू नव्हे. (उदा. प्रमोशन, नफा, परीक्षा, इत्यादि) , की एकदा मिळवली की संपलं.

    • जीवनशैली :

    यशस्विता ही एक प्रेरकशक्ती आहे, जीवनशैली आहे. ही प्रेरणा सतत मिळत राहिली तर यश आपोआप मिळतं.

    भाग – २ :

    आता आणखी काही गोष्टी पाहू. यशाला अनेक पैलू आहेत, पण त्यातले सामाजिक व व्यक्तिगत पैलू महत्वाचे आहेत.

    • यशाचा सामाजिक पैलू :

    एखादा माणूस यशस्वी आहे असे आपण म्हणतो, म्हणजेच त्याला समाजाने मान्यता दिलेली असते.

    याचाच अर्थ असा की, यशस्वितेसाठी समाजाची, किंवा समाजातील एखाद्या विशिष्ठ घटकाची, मान्यता प्राप्त असायला हवी. बरं, कुणा सोम्यागोम्याची मान्यता मिळून व्यक्तीला ते चालत नाही. व्यक्तीला आपल्या पीयर-ग्रूप (Peer-Group) चीच मान्यता लागते. म्हणजेच, समाजाचा जो घटक त्या व्यक्तीला महत्वाचा वाटतो, त्या घटकाकडूनच मिळालेली मान्यता त्या व्यक्तीला अपेक्षित असते. एखादा दरोडेखोर किंवा ‘सुपार्‍या’ घेणारा गुंड यांना समाज ‘यशस्वी’ म्हणत नाही ; आणि , समाज काय म्हणतो याची त्यांना पर्वाही नसते. ‘बदनाम हुए तो क्या, नाम तो हुआ’ असे एका शेरमधे म्हटले आहे, त्याप्रमाणे त्या दरोडेखोराचे वा गुंडाचे ‘नाव’ मात्र होते, व ती व्यक्ती दरोडेखोरांच्या-गुंडांच्या गोतावळ्यात ‘यशस्वी’ म्हणून गणलीही जाते. आय्. आर्. ए. (आयरिश रिपब्लिकन आर्मी) , पी.एल्. ओ. (पॅलेस्टाइन लिबरेशन ऑरगनायझेशन) , अल् कायदा , लश्करे तय्यबा , जैश-ए-मुहम्मद वगैरे संघटनांमधील पुढारी,

    ती-ती विशिष्ठ विचारधारा अनुसरणार्‍या व्यक्तींना ‘यशस्वी’ वाटले तर नवल नव्हे. (अशा संघटनांनी अवलंबलेल्या मार्गाचे मला मुळीच समर्थन करायचे नाही. परंतु, यशस्वितेचा मापदंड समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी कसा वेगवेगळा असू शकतो, एवढेच इथे दाखवायचे आहे). थोडक्यात काय की, व्यक्तीच्या ‘peer-group’ च्या नजरेत जे ‘यशस्वी’ ठरेल, ती त्या व्यक्तीच्या दृष्टीने ‘यशस्विता’ होय.

    • यशाचा व्यक्तिगत (personal) पैलू :

    सर्वसाधारणपणे पैसा, नाव, अधिकाराची जागा वगैरे मिळालं, की ती व्यक्ती यशस्वी झाली असे समाज म्हणतो. पण हा लौकिक अर्थ झाला. यशस्विता ही याहून अधिक कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीची अशी गोष्ट आहे. समाजाला दिसणार्‍या लौकिक यशस्वितेहून, व्यक्तीला स्वत:ला अभिप्रेत यशस्विता ही भिन्न असू शकते. आपण जरासं या ‘आस्पेक्ट’ च्या आत विविध बाजूंनी डोकावून पाहू या, व ही गोष्ट समजून

    घेऊ या.

    • पु. ल. देशपांडे यांच्या ‘आमचा धंदा : एक विलापिका’ नामक लेखातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी वेगळं व्हायचं असतं. डॉक्टरला गवई व्हायचं होतं, वकिलाला नट, तर प्रोफेसरला आय्. ए. एस्. व्हायचं होतं. यातील विनोदाचा भाग जरी सोडला तरी, पु.ल. या लेखात जीवनातील एक मोठं सत्य सांगून गेले आहेत, अन् ते हे की, समाजाला यशस्वी वाटणार्‍या व्यक्तीला स्वत:ला, ‘आपण यशस्वी आहोत’ असं वाटेलच असं नाही , आणि असं एखादं क्षेत्र, अशी एखादी कामगिरी असते जिच्यात यशस्विता मिळवायची त्या व्यक्तीची इच्छा असते.
    • आपण अशी उदाहरणे ऐकली-वाचली-पाहिली आहेत जिथे त्या व्यक्तीने आपल्या आय्. ए. एस्. वा आय्. पी. एस्. अथवा अन्य कुठल्यातरी मोठ्या पदाचा त्याग करून काही विशिष्ठ सामाजिक कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेले आहे. (चंद्रशेखर धर्माधिकारी, अरविंद केजरीवाल, माजी पोलिस अधिकारी वाय्.पी. सिंग, शेतकरी संघटनेचे शरद जोशी, ही काही नावे डोळ्यापुढे येतात) . अशाच

    एका राजस्थानी गृहस्थाची मुलाखत टी.व्ही.वर पाहिल्याचे मला स्मरते. त्याला विचारले गेले होते की, आय्. ए. एस्. म्हणून असलेले मोठे पद सोडून तुम्ही सामाजिक कार्यात पडला आहात, तर आता आपण यशस्वी आहोत असे तुम्हाला वाटते काय ? त्याचे उत्तर अर्थपूर्ण आहे. तो म्हणाला की, ‘लौकिक अर्थानं मी यशस्वी नाही असं कुणाला वाटेलही ; पण मला स्वत:ला जे काही करावं असं तीव्रतेनं वाटत होतं, ते मी आज करतो आहे याचं मला समाधान आहे ; म्हणजेच माझ्या दृष्टीनं मी यशस्वी आहे’. त्याचं हे स्पष्टीकरण पुरेसं बोलकं आहे, असं मला वाटतं.

    • लक्ष्य, यश व स्वत:चं परसेप्शन (perception) :

    वरील उदाहरणावरून हे स्पष्ट होईल की, आपण स्वत:साठी काय लक्ष्य ठेवतो, व तिथे पोचतो किंवा नाही (ते अचीव्ह करतो किंवा नाही) , यावर आपल्या स्वत:च्या नजरेत आपली यशस्विता असते. हे बघा, एक साधारण मुलगा आहे, फारसा हुशार नाही. त्याच्या घरच्या आर्थिक परिस्थितीनुसार, ‘कारकुनाची नोकरी मिळवणं’ हे तो स्वत:चं लक्ष्य ठरवतो ; तशी नोकरी त्याला मिळते, व तो स्वत:ला यशस्वी समजतो. याउलट, दुसरा एक अति हुशार मुलगा आहे. तो स्वत:चं लक्ष्य ठरवतो, ‘स्कॉलरशिप मिळवून परदेशीं उच्च शिक्षणासाठी जाणे’. पण ते त्याला जमत नाही, तो देशातच शिकतो व अधिकारी होतो. पण तो स्वत:ला अयशस्वी समजतो, कारण त्याचे स्वत:चे परदेशी-शिक्षणाचे त्याचे ध्येय साध्य झालेले नसते.

    • भूमिका (role) व यशस्विता :

    प्रत्येक व्यक्ती जीवनात वेगवेगळ्या भूमिका (roles) पार पाडत असते. त्या सर्व दृष्टिकोनांतून यशस्वितेचा निकष एकच (same) असेल, असे नव्हे.

    - एक उदाहरण पाहू. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक माणूस एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून आपले आयुष्य वेचतो, देशासाठी वारंवार तुरुंगात जातो, एक त्यागी नेता, एक सेनानी म्हणून पुढे येतो. समाजाच्या दृष्टीने तो एक यशस्वी सेनानी असतो. पण पती म्हणून, पिता म्हणून, त्याच्या कुटुंबियांच्या, त्याच्याकडून काही भिन्न अपेक्षा असतात. त्या तो पूर्ण करू शकत नाही. इथे,

    नेता म्हणून आणि पती वा पिता म्हणून, इतर व्यक्तींकडून त्या माणसाच्या यशस्वी असण्याबद्दलचे निकष नुसते भिन्नभिन्नच आहेत असे नाही, तर ते एकमेकांविरुद्धचेही (conflicting) असू शकतात. त्या व्यक्तीने स्वत: आपल्या ‘स्वातंत्र्यसैनिक’ या भूमिकेला प्राधान्य दिलेले असल्यामुळे, तो त्या दृष्टीने स्वत:च्या नजरेत यशस्वी झालेला आहे. परंतु, जर त्याची मुले त्याच्यापासून दुरावली, तर ‘एक पिता म्हणून आपण असफल आहोत’, असेच त्याला वाटते.

    - दुसरं एक उदाहरण पाहू या. एक राजा आहे. एक राजा म्हणून समाजाची त्याच्याकडून एक अपेक्षा असते, व तिची पूर्तता केल्यास समाज त्याला यशस्वी म्हणतो. पण, एक माणूस म्हणून, त्याला स्वत:ला काय हवे आहे ? उत्तररामचरित्रातील श्रीराम हा एक धोब्याच्या कथनामुळे असा निर्णय घेतो की समाजापुढे राजाचा आदर्श असायला हवा, राजावर कलंक नको; आणि म्हणून तो सीतेचा त्याग करतो. पती म्हणून, सीतेचा त्याग करतांना रामाला आनंद झाला असं नव्हे, उलट दु:खच झालं. पण, त्यानं आपल्या ‘आदर्श-राजा’ या भूमिकेला प्राधान्य दिलं, आणि त्या भूमिकेत तो यशस्वी झाला. याउलट, इसवी सन १९३६ मधे इंग्लंडचा राजा एडवर्ड तृतीय (नंतरचा ड्यूक ऑफ विंडसर) हा, अमेरिकन डायव्होर्सी मिसेस सिम्सन हिच्यावरील प्रेमाखातर राज्यावरून पायउतार झाला (abdicated). इथे, त्याने, समाज काय म्हणेल याची पर्वा केली नाही. ‘नाममात्र राजा’

    म्हणून रहाण्यापेक्षा, स्वत:च्या व्यक्तिगत जीवनाला त्यानं प्राधान्य दिलं, व स्वत:च्या नजरेत तोयशस्वी झाला.

    थोडक्यात म्हणजे, ईप्सित साधल्यावर मिळणारं मनाचं समाधान हेंच कुणाही व्यक्तीच्या दृष्टीनं यशाचं गमक आहे.

    • कालसापेक्षता :

    वर म्हटलंच आहे की, यश ही अंतिम पायरी नव्हे. याचाच अर्थ असा की, यशासाठी व्यक्तीने ठरवलेले निकष कालानुसार बदलू शकतात. एक लक्ष्य गाठलं की, माणूस दुसरं एखादं लक्ष्य ठरवतो. मग ते

    त्याच रस्यावरील अधिक उंच शिखर असो, किंवा एखाद्या पूर्णपणे भिन्न विषयाशी निगडित असो.

    किंवा, एखादं लक्ष्य गाठण्यात अयशस्वी झाल्यास माणूस स्वत:साठी कमी उंचीचं किंवा भिन्न दिशेचं लक्ष्य ठरवू शकतो. जीवनमार्गात असे यशापयशाचे अनेक मुक्काम येतच रहातात. थांबायचं की पुढे चालायचं हे जो-तो ठरवत जात असतो. एक लक्ष्य गाठण्यात माणूस यशस्वी झाला तरी दुसर्‍या एखाद्या ऍक्टिव्हिटीमधे तो अयशस्वी होऊ शकतो ; तसेच एखाद्या गोष्टीत अयशस्वी झालेली व्यक्ती दुसर्‍या एखाद्या गोष्टीत, किंवा नंतरच्या काळात, यशस्वी होऊ शकते. यश-अपयश, अपयश-यश, असं हे चक्र आहे. अपयशानंतर माणूस जर हताश-हतबल झाला नाही, हिंमत हरला नाही, त्याने जर प्रयत्न चालूच ठेवले, तर भविष्यकाळात तो यशस्वी होऊ शकतो. नव्हे ; होणारच.

    महाभारतातील पांडवाचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. द्यूतात युधिष्ठिर म्हणजेच पर्यायानं पांडव हरले, अपयशी झाले. परिणामीं द्रौपदीची विटंबना झाली, व पांडवांना वनवास अन् अज्ञातवास भोगावा लागला. अज्ञातवासातील कष्ट व अपमान यांची कल्पनासुद्धा करणे आपल्याला कठीण आहे. राज्ञी द्रौपदी ही दासी होऊन राहिली, वीरवर भीम हा बल्लव म्हणजे आचारी, तर अतुल धनुर्धर अर्जुन हा बुहन्नला म्हणजे तृतीयपंथी बनून राहिला. काय हे जीवन !! पण पांडवांनी धीर सोडला नाही, ते तावून-सुलाखून या दिव्यातून बाहेर पडले. पुढे कुरुक्षेत्रावरील युद्धात काय झाले, ते सर्वविदित आहे. तिथे पांडव यशस्वी झाले.

    • समारोप :

    थोडक्यात काय, यशस्विता समाजाभिमुख आहे तशीच व्यक्तिगत-दृष्टिकोनावर अवलंबून आहे, व ती कालसापेक्षही आहे. पण मुख्य म्हणजे, यशस्विता माणसाच्या मनातच सामावलेली आहे.

    यशस्विता ही एक प्रेरकशक्ती आहे, जीवनशैली आहे, जगायची ऊर्मी आहे. स्वत:च्या क्षमता वाढवून, त्यांचा कस लावून, जे काम आपण करतो ते जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, ही प्रेरणा ती आपल्याला देते. अशी प्रेरण सतत मिळत राहिली तर यश आपोआप मिळतं, मिळत रहातं.

    -- डॉ. स्नेहलता नाईक.

  • अशक्य ते शक्य केलं कोरोनाबाबांनी

    कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंबईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली, मग ती सरकारी असोत की खाजगी.