ह्या भाजी बाबतीत आपल्याला मिश्र प्रतिक्रिया एकायला व अनुभवायला मिळतात.काहीजणांची अत्यंत आवडती तर काही जणांची अगदीच नावडती अशी हि भाजी(माझी सर्वांत आवडती आहे बुवा). आपण ह्याचे विविध प्रकार बनवून हिला खात असतो जसे मेथीचे पराठे,मेथी मलाई मटर,मेथीचे थेपले,मेथी आलू इ.पण प्रत्येक स्वरूपात हिच्यापासून बनविलेल्या व्यंजनांची लज्जतच काही निराळी आहे.
अशा ह्या मेथींच्या भाजीचे लहान क्षूप असते.तसेच हि चवीला कडू तुरट आणि थंड असते,त्यामुळे शरीरातील पित्त व कफ कमी करते.
हिचे देखील घरगुती उपचारांमध्ये बरेच उपयोग आहेत बरं का!चला तर मग आता ते पहायचे ना?
१)ज्या मंडळींना शौचास साफ होत नाही त्यांनी मेथीची भाजी जेवणात घ्यावी.
२)गळवांवर हिच्या पानांचा लेप लावावा म्हणजे वेदना व सूज कमी होते.
३)संडासला आव पडत असल्यास ५ चमचे पानांचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
४)वारंवार लघ्वीला होत असल्यास १/४ कप मेथी पाल्यांचा रस+१/२ चमचा कात+३ चमचे खडीसाखर हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.
५)डोक्यात कोंडा झाल्यास आंघोळी पुर्वी पाच मिनिटे केसांच्या मुळांना मेथीच्या पानांचा रस लावावा व नंतर साबण न वापरता केस धुवावेत.केस मऊ व चमकदार होतात.
६)चेहरा तेलकट होत असल्यास मेथीच्या पाल्याचा लेप चेह-यांवर लावून १/२ तास ठेवावे व कोमट पाण्याने धुवावे.
मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ व वारंवार होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.
लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
औषध म्हणून कशी वापरू शकते.
चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.
अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील
??.
आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!
१)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.
२)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.
३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.
४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.
५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.
६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.
मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
पानाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तिखट पदार्थात उसळ, रसभाजी आणि आमटी हे पदार्थ मुख्य असतात. कडधान्ये, भाज्या आणि डाळी या क्रमाने हे पदार्थ बनवले जातात.
उसळ आणि आमटी मधे वापरले जाणारे मसाले, हे जर शिजवताना घातले, तर त्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातील. पण जर फोडणीमधे मसाला घातला तर तो जळूनच जाईल.
फोडणीचे तेल हे गरम असते. त्यात प्रथम मोहोरी तडतवणे महत्वाचे असते. मोहोरीनंतर नंबर येतो हिंग किंवा मिरच्यांचा ! गरम तेलात हिंग फुलतो आणि शुद्ध होतो. हिंग वापरताना शक्यतो खडा हिंग आणावा. म्हणजे भेसळ कमी मिळते. आणून तो तूरडाळीमधे ठेवला तर डाळीला वास पण छान येतो आणि टिकते देखील.
सध्या पतंजलीचा हिंग चांगला आहे.
फोडणी करून झाली की त्यात
जी भिजवलेली कडधान्ये आहेत, ती घालावीत म्हणजे तेलाचा तडका आणि भडका कमी होतो नंतर हळद, उसळीचा मसाला, मिरचीपूड इ. घालावी, म्हणजे त्यातील औषधी गुण टिकून रहातील. नंतर थोडेसे परतून मग पाणी घालून शिजवावे.
यातील मसाले हे भूक निर्माण करतात, पचन घडवून आणतात किंवा वासाने सुद्धा पाचक स्राव वाढवतात. तिखट मिरची पूड नको असल्यास, आले, मिरी या मसाल्याचा वापर करावा.
पदार्थ शिजून झाला कि नंतर त्यात मीठ घालावे म्हणजे कमी पुरते. आणि उडून जात नाही.
युक्ती वापरून मसाल्याचा तीक्ष्ण उष्ण तिखट गुण कमी जास्त करावा. यासाठी प्रदेशानुसार नारळ किंवा शेंगदाणे कूट वापरावे.
कोणताही अन्नपदार्थ शिजवताना, त्यावर झाकण ठेवू नये, त्याला सूर्य, चंद्र, वारा, यापैकी कोणाचातरी स्पर्श व्हावा, असे विधान आहे. आणि पदार्थ शिजत असताना त्यातील काही घटक उडून जाणे देखील अपेक्षित असते. झाकण ठेवले तर आतील अन्नाला गरजेपेक्षा जास्त उष्णता लागते आणि जीवनसत्व नष्ट होण्याचीच शक्यता जास्त असते. झाकण ठेवून शिजवले असता, इंधन वाचेल पण पदार्थ अपेक्षेपेक्षा जास्ती लवकर शिजतो. आणि गडबड होते.
अपेक्षेपेक्षा जास्त लवकर वयात येणे धोकेदायकच असते ना !!!
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
13.11.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 37
नैवेद्यम् समर्पयामी - भाग अकरा
नैवेद्य सेवन करून झाल्यावर हात तोंड धुवुन झाल्यावर आणखी एक अनोखा उपचार केला जातो. तो म्हणजे चंदन लावणे.
"करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी" असा मंत्र म्हणून देवाच्या हाताला चंदन लावले जाते.
हे चंदन, चंदन या झाडाच्या खोडापासून उगाळलेलं असावं. चंदनाची पावडर, गोपीचंदन, कुंकू पाण्यात कालवून गंध तयार करणे, अष्टगंध पाण्यात कालवणे, यापेक्षा चंदन उगाळून ते वापरणे हे देवाला आवडते. देवाला म्हणजे आपल्या देहातील अंतःस्थ देवाला !
जेवढे जास्त उगाळावे तेवढा चंदनाचा सुवास आणि औषधी गुणधर्म बाहेर येत जातात.
चंदन कपाळाला लावले जाते, ते औषध म्हणून ! अतिशय थंड गुणाच्या या चंदनाची उटी अंगाला लावणे, ही पद्धत दक्षिण भारतात आजही आहे दक्षिण भारतातल्या सर्व देवालयामधून चंदन उगाळणारी खास माणसे असतात आपल्याकडे जसा तीर्थप्रसाद देतात, तसा दक्षिणेकडे उगाळलेले चंदनाची गोळी प्रत्येकाच्या हातावर देतात, ती प्रत्येकाने आपल्या कपाळावर लावावी, असा संकेत आहे. स्त्री आणि पुरूष असा भेद न करता हे चंदन लावले जाते. फक्त महाराष्ट्रात उभा टिळा लावतात, तर दक्षिणेत आडवा. एवढाच फरक. पण चंदन तेच. काम तसेच. औषधी गुण तेच.
जेवणानंतर हाताला जेवणातील पदार्थांचा वास राहिलेला असतो. किंवा काही तेलकट पदार्थ हाताला चिकटतात. ते निघून जावेत, असं हे कर्मकांड. आजही आपल्याकडे जेवण झाल्यावर पानात राहिलेली लिंबाची फोड अथवा मीठाची चिमूट जेवल्या हाताला चोळून घेतात. ती याचसाठी. लिंबाच्या रसामुळे बोटांना लागलेला रस्सा, भज्यांचे तेल, लोणच्याचा अंश, आदि भोजनांश सहजपणे निघून जावेत. हात स्वच्छ व्हावेत. उगाळलेल्या चंदनाची जागा फक्त ताटातील लिंबाच्या फोडीने घेतली इतकेच ! कालानुरूप फरक पडतो तो हा असा !
जेवणानंतर हाताला लागलेला मसाला आदि जरी अगदी विषारी नसले तरी दाह करणारे असतात. जसे पाटावरवंट्यावर मिरच्या वाटल्यानंतर बोटांची होणारी आग किंवा दाह केवळ पाण्याने धुऊन जात नाही, त्यासाठी तेल गुळ असे पदार्थ वापरावे लागतात. तसंच जेवणानंतर हाताला जो मसाल्याचा सूक्ष्म अंश असतो, तो जावा, यासाठी हे चंदन लेपन. हे कपाळावर नसून हाताला बोटाला आहे, हे लक्षात घ्यावे.
जे जे देवासाठी ते ते देहासाठीच असते, हे कधीही विसरून चालणार नाही. त्यातील कर्मकांडे ही मानवी मूल्यांच्या संवर्धनासाठी असतात. ही शोधण्याची दृष्टी तोच देत असतो, यालाच देवाची कृपा म्हणतात. तोच कर्ता करविता मी निमित्तमात्र !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
30.06.2017
पी हळद हो गोरी' ही म्हण मराठी मध्ये रूढ आहे.म्हणूनच तर भारतीय संस्क्रूती मध्ये हळदीला एक वेगळे स्थान आहे.अगदी आपल्या हिंदू धर्मात देवकार्या पासून ते लग्ना पर्यंत हिचा वापर होतो.बहुधा हिच्या मधल्या रक्षोघ्न ह्या गुणांमुळे अर्थात वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी हिचा वापर भोजना व्यतिरिक्त ब-याच अन्य कार्यात देखील केला जात असावा.
देवपूजेत देवाला हळद कुंकू वहातात,नव्या नवरा नवरीला हळदीच्या दिवशी हळद लावतात,तसेच लग्नामध्ये नवरा नवरीच्या हातालाहळदीचे गाठवळ बांधतात कारण त्यांना कोणतीही दुष्ट शक्तीच्या बाधा होऊ नयेत म्हणून.तसेच सुवासीनीची ओटी भरताना अथवा मानपान करताना तिच्या कपाळाला हळद कुंकू लावले जाते.
हे झाले हळदीचे बाह्य उपयोग पण हिच हळद जेवणात वापरली असता जेवण दिसायला सुंदर,रूचीकर,सुपाच् बनविते.उसळ,वरण,भाजी,आमटी,फोडणीचा भात,मासे,चिकन,मटण असे नानाविध पदार्थ बनवताना हळद हि लागतेच.थोडक्यात काय तर ह्या हळदी शिवाय आपल्या स्वयंपाक घराला देखील पूर्णत्व येणार नाही.
अशी हि बहूगुणी,बहूउपयोगी हळद.अहो प्रत्यक्ष महादेवाला देखील प्रिय असणारी अर्थात जेजूरीच्या खंडेरायांच्या भालमस्तकी भंडारा म्हणून मिरवणारी ही हळद,बरेच जण घरगुती औषधांमध्ये हिचा वापर करत असतातच.अहो घरच्या ग्रूहलक्ष्मीचे बोट स्वयंपाक करताना कापले तर ती प्रथम कापलेल्या बोटावर हळद दाबून धरते.
चला तर हिची थोडक्यात माहिती आणी घरगुती औषधांमध्ये वापर ह्या बद्दल जाणून घ्यायचे ना?
हळदीचे बहुवर्षायू क्षुप असते.आणी आपण वापरत असलेली हळद हा त्याचा कंद होय.हि चवीला कडू,गोड असते,आणि उष्ण असते.हि शरीरातील वात आणि पित्तदोष कमी करते.
उपयोग:
१)खरूज आली असता हळद+ आवळकाठी+ कडूनिंबाचा काढा घ्यावा.
२)हळद लोण्यात खलून त्वचेला लेप केल्यास त्वचा मऊ मुलायम होते.
३)ब-याच बायकांना अंगावर पांढरे जाण्याची सवय असते त्यांनी हळदीचा काढा मधासोबत घ्यावा.
४)मुळव्याधी मध्ये हळदकुंड भाजूनतिची पूड करावी आणी हि पूड १/२ चमचा + कोरफडीचा गर १/२ चमचा असे मिश्रण दिवसातून दोन वेळेस असे सलग सात दिवस घ्यावे.
५)आंघोळ करताना साबणा एवजी हळद+ बेसन+ कापूर हे मिश्रण वापरल्यास त्वचा नितळ व सतेज होते.
६)पायाला भेगा पडण्याची सवय असणा-यांनी हळद एरंड तेलात कालवून भेगांवर लावावी.
७)डोक्यात ज्यांना वारंवार कोंडा होतो त्यांनी हळद+रिठे +शिकेकाई घालून काढा बनवावा व ह्या काढ्याने केस धुवावेत.
८)मधुमेहामुळे जर फार लघ्वी होत असेल तर हळद १ चमचा+ काळेतीळ २ चमचे /हळद १चमचा+बेल पानांचा रस ४ चमचे घ्यावा.
हळदीच्या अतिसेवनाने संडासला पातळ होणे,तसेच स्त्रीयांच्या मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
डाळींबाच्या द्राक्ष्यांप्रमाणे लालचुटूक ओठ अशी उपमा सुंदर स्त्रीयांच्या ओठांना दिली जाते.खरोखरच हे डाळींबाचे दाणे जणू काही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात.ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेली मध्ये चव यायला हे डाळींब दाणे घातले जातात.
काही म्हणा पण हे डाळींब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते.ह्या डाळींबाचे १०-१५ फुट उंच वृक्ष असतो जो मध्यम आकाराचा असतो.ह्याची फुले नारंगी लाल रंगांची असतात तर फळे गोल लालसर व टपोरे दाणे युक्त असतात.
ह्याचे गोड फळ हे थंड व त्रिदोष शामक असून गोड आंबट चवीचे फळ हे किंचीत पित्तकर असते तर आंबट फळ हे कफवातनाशक असून पित्तकर असते.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)लहान मुलांना होणाऱ्या जुलाबात फळाची साल पाण्यात उगाळून मधासह त्याचे चाटण द्यावे.
२)पित्ताचा त्रास,आंबट ढेकर,जळजळ ह्यात १/२ डाळींब रस+१ चमचा खडीसाखर घ्यावी.
३)तापामध्ये तहान लागत असल्यास थोड्या थोड्या वेळाने डाळींबाचा रस प्यावा.
४)डाळींबाची साल सुकवून त्याची पूड करावी व त्याने दात घासावे ह्याने दात व हिरड्या बळकट होतात,रक्त स्त्राव होत असल्यास कमी होतो.
५)घसा बसणे,दुखणे,टाॅन्सील्स वाढणे ह्यात डाळींबाच्या ताज्या सालीचा काढा+चिमूटभर हळद घालून गुळण्या कराव्यात.
डाळींब अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब,सर्दी असे त्रास होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
काही भयानक रोगांमध्ये ऑपरेशन ऐनवेळेला टाळून किंवा ऑपरेशन करताना होणारा रक्तस्त्राव कमी करुन अथवा कॅन्सर हाताबाहेर गेल्यावर भयंकर त्रास टाळण्यासाठी क्ष किरण शास्त्र रुग्णाच्या मदतीसाठी धावून आले आहे व याचे तज्ञ खास प्रशिक्षण घेतलेले ब्लॅक कॅट कमांडोसारखे कलाबाज असतात.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषध काम करत नाही - भाग तीन
स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा दुरुस्तीची वेळ आली तर त्या गाडीच्या स्पेशल मेकॅनिककडे नेतो. पण नशीबाने एकदाच मिळणाऱ्या या शरीरावर असे काही अत्याचारी औषधी प्रयोग करीत बसतो, की जणुकाही आपणाला आपले शरीर संपूर्णपणे कळलेलेच आहे.
आपण कोणते औषध घेतोय, तो देणारा, तेवढा विश्वासार्ह आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता, भोंदू वैद्य आणि बोगस डाॅक्टरांच्या मागे अक्षरशः धावतो, यात औषध देणाऱ्याला आपण शास्त्र बदनाम करीत आहोत, याचेही भान नसते. आणि घेणाऱ्याने आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.
प्रत्येक राज्याचे एक वैद्यकीय व्यवसाय नियामक मंडळ असते. जसे महाराष्ट्रात एमसीआयएम. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन हे सरकारने नेमलेले मंडळ आहे. या मंडळाकडे जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विद्यापीठाचे अधिकृत प्रशस्तीपत्रक सादर केले जाते तेव्हा, असे केल्यानंतर डाॅक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा रितसर क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. ते दवाखान्याच्या दर्शनी भागात लावलेच पाहिजे. असा नियम आहे. आपण रूग्ण म्हणून ज्यांच्याकडून औषधे घेणार आहोत, ते योग्य शिक्षण घेतलेले अधिकृत पदवीधर आहेत का, याची खात्री करून नंतरच त्यांची औषधे घ्यायची असतात. नाहीतर औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम होतात, त्यांना सामोरे जावे लागते.
आयुर्वेद, होमियोपॅथी, अॅलोपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध आणि युनानी या किमान पदवीधारकाकडून औषध घ्यावे, असा दंडक आहे.
केवळ लक्षण सांगून, काही वेळा तर पूर्वीच्या डाॅक्टरनी केलेले निदान ऐकवून, स्वतःच पॅथाॅलाॅजीमधे जाऊन, रिपोर्ट करून, नेट वरून थोडीफार माहिती मिळवून, रोगाचे अचूक नावच सांगून, कोणत्याही पॅथीचे औषध घेणे ही खूप मोठी चूक होऊ शकते. यात मूळ शास्त्र बदनाम तर होतेच पण शरीराची जास्ती हानी होते, बोले तो, पूरी वाट लगती है । तेव्हा सावधान!!
रुग्णाची अवस्था, रोगाची व्याप्ती, गंभीरपणा, रोगाचे भविष्यातील धोके, औषधांचे डोस, किती कालावधीसाठी औषध घ्यावे, पथ्यापथ्य इ. सर्व तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ना ! केवळ वाॅटसपवरचे सल्ले, कुणातरी पुष्पादिदिवर विश्वास ठेवून, आंबट तिखट तेलकट बंद करा आणि आमची अमुक औषधे घ्या, टीव्ही वरील जाहीराती वाचून, शेजाऱ्यांचे ऐकून, घरी आलेल्या एजंटकडून औषधोपचार ठरवणे, हा चक्क मूर्खपणा आहे.
अनेक वेळा आयुर्वेदीय औषधांमधे अॅलोपॅथीच्या औषधांची भेसळ केली जाते. त्यातही त्वरीत वेदनाशामक म्हणून स्टिराॅईड असलेली औषधे जास्त प्रमाणात दिली जातात, याचे परिणाम न सांगता सुद्धा थोबाडावर दिसतात. कानाखाली सूज येणे, औषध घेतल्यावर लगेचच दुख कमी होणे, औषध थांबवले की परत त्रास सुरू होणे, भूक खूप लागणे, तेच औषध मला परत परत घ्यावेसे वाटणे, ही सर्व स्टिराईड पोटात जात असल्याची लक्षणे आहेत. जी भविष्यात खूप हानीकारक ठरू शकतात.
किडनी साफ करण्यासाठी लघवी होणारी औषधे, सेक्सची ताकद वाढवणारी, त्वचा विकार कमी करणारी काॅर्टीझाॅन मलमे, आवळा आणि कोरफड ज्युसच्या नावाने मिळणारे पाणी, कफ सिरपच्या नावाने मिळणारा साखरेचा पाक, नोनीचे मार्केटींग, एमेलेमच्या नावाखाली चाललेला टाॅनिकचा धुडगुस, जिममधे सुचवली जाणारी प्रोटीनची खिरापत, कित्ती किती अनावश्यक औषधे म्हणून सांगू...
औषधांचा काळाबाजार हा प्रथितयश औषधांच्या तुलनेत कदाचित दोन ते तीन पट अधिक असू शकेल. असा अंदाज आहे.
हे म्हणजे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशी अवस्था होते. आधीच्या चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम काहीवेळा सहा सहा महिने राहातात, आणि महत्वाच्या औषधाला गुण दिसत नाही, ही अवस्था तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी होते. हे केवळ एकाच पॅथीमधे होत असे नाही तर सर्वच पॅथीमधे हा घोळ दिसतो. यावर सरकारचे लक्ष असेल नसेल, पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्याला, आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी, अनावश्यक औषधांचा अनावश्यक वापर टाळावा असा सल्ला द्यावासा वाटतो.
नको त्या माणसाकडून, नको ती औषधे, नको त्या अवस्थेत घेतली की, परिणाम नको तेच दिसणार. आणखी दुसरं काय होणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.04.2017
नेहमीच्या वापरातील मसाल्याच्या तिखट पदार्थांच्या यादीतील एक प्रमुख औषधी घटक म्हणजे मिरी.
जिथे मिरची वापरता येणार नाही, अशा ठिकाणी मिरी वापरावी, एवढी तिखट. हिच्या तिखटपणापेक्षा भगभगीतपणा लक्षात रहातो. तोंडाची, जीभेची हायहुय करत, सर्वांना हाऽय् हाऽय् म्हणायला लावणारी, डोळ्यातून पाणी वाहायला भाग पाडणारी ही काळी मिरी आता जगप्रसिद्ध झाली आहे. सूप असो वा सॅलेड, मिरीशिवाय चवच नाही.
दिसायला बारीक सुरकुतलेली जरी दिसली, तरी जिभेवर चुरूचुर निर्माण करणारी चव काही औरच असते.
त्रिकटू या आयुर्वेदीय प्रक्षेप द्रव्यातील सुंठ आणि पिंपळीच्या मधे बसलेली ही मिरी कच्चीच वापरली जाते, हे बहुधा पाश्चात्य मंडळींनी पाहिले, तेव्हापासून ते काळी मिरीची पावडर सूप सॅलेडमधे वापरू लागले. मिरची वापरण्याएवढी आपली योग्य प्रकृती नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा मिरचीची तहान त्यांनी मिरीवर भागवली बहुतेक !
आजारपणातून उठल्यावर पहिला घासाच्या तूपभातावर मिरी हवीच. सकाळी दात घासण्याच्या दंतमंजनापासून, पापड आणि ऊसळीपर्यंत तर असतेच. पण अगदी आमरसाच्या वाटीत जावून तुपाच्या बरोबरीने विराजमान होणारी ही मिरी.
सणसणीत उष्ण तीक्ष्ण गुणाची, उत्तम दीपक म्हणजे भूक वाढवणारी, पाचक म्हणजे पचन घडवणारी, घाम आणून ताप कमी करणारी, ह्रदयाला हितकर, उत्तम जंतुघ्न, कृमींचा नाश करणारी, स्रोतसांमध्ये असलेला आमाचा चिकट अडथळा स्वशक्तीने दूर करणारी, आतून जखम स्वच्छ करणारी, सर्दी खोकल्यापासून डायबेटीस आणि ह्रदयरोगापर्यंत अप्रतिम रिझल्ट देणारी, वात कफावर विजय मिळवणारी आणि पित्ताला वाढवणारी असते. सर्व रोगांचे मूळ असलेल्या, मंद अग्निला वाढविणारी असल्यामुळे, वैद्यप्रिया बनलेली आहे.
जिथे पाणी, आंबटपणा, गोडपणा जास्त असतो, तिथे मिरी वापरली जाते. म्हणून कदाचित कोकणात जास्त वापरली जाते. कोकणात उत्पन्न होत असल्याने कोकणी प्रकृतीला सहजपणे मानवणारी, तसाच स्वभाव बनवणारी, पण अंतिमतः सुखकर ठरणारी, ही मिरी म्हणजे अगदी कोकणप्रिया. कोकणी महिलेला आपल्या गळ्यामधील मंगळसूत्रातील जणु काळे मणीच वाटावेत, एवढी प्रिय.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.11.2016
आधुनिक विज्ञानात प्रतिमाशास्त्राने कितीही प्रगती केली तरी क्ष किरणांचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कमी खर्चात भरपूर व सूक्ष्म माहिती देण्यात क्ष किरण शास्त्र समर्थ आहे आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणजे छातीचा एक्स-रे. क्षुल्लक तक्रारीतही डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात व यात डॉक्टरांची काहीही चूक नाही कारण छातीचा एक्स-रे म्हणजे रुग्णाच्या आरोग्याची कुंडलीच आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti