(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • याला जीवन ऐसे नाव भाग ४

    आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार नाही.
    आपल्या शरीराला बरोबर कळते, आपल्याला पाणी किती हवे आहे ते. तेवढी तहान शरीर निर्माण करते. तेवढं पाणी जरूर प्यावं.

    आपण जिथे रहातो, तेथील हवामानानुसार आपली तहान कमी जास्त होत असते. जमिनीनुसार धान्यातील द्रव्य, भाज्यांमधील क्षार बदलत असतात.

    वाळवंटी प्रदेशात रहाणारा उंट एकदाच पाणी पिऊन घेतो. तेथील वनस्पतींना पाणी उत्सर्जित करणारी पाने कमी असतात. काटे जास्त असतात. त्यानेपानांचे देठ पाणी साठवण्यासाठी योग्य असे जाडजूड केलेले असतात. !
    तेथील अरब लोक पायघोळ पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतात, जे उष्णता फेकून देणारे असतात.

    इथे प्रत्येकातला तो वेगळा आहे. म्हणून प्रत्येकाची तहान वेगळी आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. जे उन्हात काम करतात, त्यांना पाणी जास्त लागेल. जे सावलीत काम करतात, त्यांना पाणी कमी लागेल, जे एसी मधे काम करतात, त्यांना पाणी लागणारच नाही.

    इथे प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत.

    एक नियम पाण्याविषयी सांगितला जातो. तो म्हणजे 30 मिली पर केजी बाॅडी वेट. म्हणजे एक किलो वजनाला सर्वसाधारणपणे 30 ते 40 मिली पाणी प्यावे. नियम केला कि तो युनिव्हर्सल असावा. आणि नियम पाळण्यासाठी करावा. टाळण्यासाठी नको.

    पण हा पण नियम, नियम म्हणून पाळू नये. कारण, मी सत्तर किलो वजनाचा आहे. सकाळ पासून सायंकाळच्या सातपर्य॔त एसी मधे बसून काम करतोय. आणि त्याचवेळी सत्तर किलो वजनाचा एक हमाल रस्त्यावर ओझे वाहातोय.30मिली /किग्रॅ. या नियमानुसार या हमालाने फक्त 2100 मिलीच पाणी प्यायचे, आणि गरज नसताना मी पण एवढे एकवीसशे मिली प्यायचे ?

    हे दोन्ही चुकच आहे.

    इथे प्रत्येकाची गरज वेगळी आहे.

    मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातील वैश्विक नियम मात्र इथे आरोग्यशास्त्रातील पाण्यालादेखील तंतोतंत लागू पडतो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.12. 2016

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – चाकवत

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – चाकवत

    हि भाजी सर्व महाराष्ट्रभर आवडीने खातात व हि भाजी पथ्याची म्हणून देखील प्रसिद्ध आहे.ह्याचे रोप हातभर उंच असते.

    हि चवीला गोड खारट व थंड असते.त्यामुळे ही शरीरातील वात व पित्त कमी करते.

    आता आपण ह्याचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहूयात.

    १)ताप उतरल्यावर ह्या भाजीचे सूप त्या व्यक्तीला दिल्यास त्याची भूक वाढते.

    २)मुळव्याध असणार्या व्यक्तिंने हि भाजी गव्हाचे फुल्के व कारल्याच्या चटणी सह खावी त्यामुळे संडास साफ व मऊ होतो.

    ३)लघ्वीची जळजळ होत असल्यास धणे,जीरे घालून चाकवत भाजीचे सुप करून प्यावे.

    ४)कावीळ झालेल्या व्यक्तीला ही भाजी खायला देतात त्यामुळे संडास वाटे खराब व वाढलेले पित्त पडून जाते व कावीळ उतरायला मदत होते.

    ५)विद्यार्थी किंवा बुद्धिजीवी लोक ज्यांच्या बुद्धीवर प्रचंड ताण असतो त्यांनी लक्षात नीट रहाण्यासाठी रात्री झोपण्या आधी १/४ कप चाकवताचा ताजी रस+ १ चमचा मध हे मिश्रण १५ दिवस सलग घ्यावे फायदा होतो.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • नैवेद्य भाग ७

    नैवेद्य दाखवताना शरीर आणि मन शुद्ध हवे, हेच खरं. भाव महत्वाचा !

    जेवणाला सुरवात करताना दारात आलेल्या याचकाला कधीही उपाशी, विन्मुख पाठवू नये. त्याला यथाशक्ती जे असेल ते द्यावे. इथे अतिथीची कधीही जातपात बघीतली जात नाही हे विशेष ! ही संस्कृती !

    आपल्याला वाढलेल्या अन्नातून सर्व पदार्थांचा मिळून एक घास होईल एवढे अन्न काढून बाजूला ठेवावे. हा घास गोमातेसाठी असतो. याला गोग्रास असे म्हणतात.
    ( आता काही जणांना गाईला माता म्हणण्यावरच आक्षेप असतो, त्यांनी काय करावे ? जसा संकल्प तसे फळ मिळते. असो.)

    घरातील कुत्रा, मांजर, पोपट, गाय बैल, इ.पाळीव प्राणी यांना प्रथम एक घास भोजन द्यावे.
    एवढेच नव्हे तर कावळ्याला सुद्धा घास बाहेर नेऊन ठेवावा.

    आणि भोजन संपल्यावर एक घास, संस्कार न होता मृत झालेल्या पितरांच्या नावे ताटाबाहेर ठेवावा. आपल्या पूर्वजांनी, आपण पोट भरत असताना इतरांचाही किती सूक्ष्मरीत्या विचार केला आहे ना !

    पान वाढायला सुरवात केली की त्रिसुपर्ण नावाचे अन्नाची, अग्नीची स्तुती करणारे एक स्तोत्र आहे, ते म्हणावे. येत नसल्यास अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे, तेही येत नसल्यास एखादा श्लोक म्हणावा. किंवा नामस्मरण करावे.

    सज्जनगडी भोजनप्रसादासाठी बसल्यावर श्रीराम जयराम जयजय राम असा मंत्र म्हणवून घेतात. राम नामाने विषहरण होते. म्हणून भोलेनाथांनीपण जो जप केला तो करावा. ( कदाचित ) प्रत्यक्ष अन्नामधील विष नष्ट होणार नाही, पण मनातील विचारांचे विष मात्र नक्कीच कमी होते, असा अनुभव आहे.

    मंत्र म्हणत असताना वातावरण सात्विक होत जाते. मनातील रज, तम दोष नाहीसे होत जातात, हे सेवन केले जाणारे अन्न मला शतायुषी निरोगी बनविणारे आहे, असा संकल्प करावा.

    कालानुरूप या अन्नामधे निर्माण झालेले दोष, देवाच्या नामस्मरणाने आणि आपण केलेल्या संकल्पाने नाहीसे होतात आणि अन्न शुद्घ होते. असा भाव मनात आणावा. म्हणजे जे दोष आपण टाळू शकत नाही त्याची तीव्रता कमी होते.

    काहीजणांना ग्रंथात जसे वर्णन केले आहे, तसे शास्त्रोक्त भोजन मिळणे, योग्य वेळी मिळणे, सहा चवींच्या सर्व गुणांनी संपन्न मिळणे, योग्य व्यक्तीने उजव्या हातानेच गरमगरम वाढणे, दुरापास्त आहे. अशांनी काय करावे, यासाठी संकल्प करावा. कालानुरूप बदल म्हणजे हे असे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    13.09.2016

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेबेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

    बाबा सांगतात...

    सांगेन गोष्टी हिताच्याच चार....

    निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत. केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे.
    तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला "जीवन" असा आणखी एक पर्यायवाची शब्द सांगितलेला आहे. जीवन सुखी होण्यासाठी सावध तो सुखी. नाहीतर सुखाच राहाणार. समुद्री चहुकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. अशी अवस्था होऊ नये, याकरता आधीच विचार करावा, असे आयुर्वेद सांगतो.

    याचा अर्थ असा नव्हे की, भविष्यात हाताच्या एखाद्या बोटाला चुकुन, अपघाताने, जखम झाली तर, "या जखमेचे रूपांतर पुढे कर्करोगात होऊ नये, म्हणून आत्ताच हे चांगले बोट आपण ऑपरेशन करून काढून टाकूया" असे म्हणण्यासारखे आहे. नाही का ? याला "प्रिकाॅशन" असे म्हणता येईल का ? आज व्यवहारात याला "प्रिकाॅशन" असे गोंडस असे नाव दिले जात आहे, आणि भीती उत्पन्न करून नको ती शस्त्रकर्मे जसे गर्भाशय निर्हरण, सिझेरीयन, अपेंडिक्स, थायराॅईड, पित्तखडे, मूतखडे आणि अगदी ह्रदयातील ब्लाॅकदेखील, लगेच इमर्जन्सीच्या नावाखाली, ही शस्त्रकर्मे केली जात आहेत. हे मी नव्हे तर अमीरखान सारखा सत्यशोधक सत्यमेव जयते मधून सांगतोय. पद्मभूषण डाॅ. बी एम हेगडे देखील आपल्या युट्युब मधील अनेक व्हिडिओ मधून सांगताहेत. हे व्हिडिओ शांतपणे यु ट्युबवर जरूर पहावेत.

    मनात भीती कधी उत्पन्न होते ? जर अभ्यास नसेल तर. जर एखाद्या विषयाचा अभ्यास झालेला असेल तर परीक्षेत नापास होऊ अशी भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अमुक गोष्ट केल्यावर, ती जाणून घेतल्यावर, तुला भीती वाटण्याचे काही कारणच नाही, याची खात्री पटली की, भीती उत्पन्न होतच नाही, असे विवेकानंद म्हणतात. म्हणजेच अज्ञान हीच सर्वात मोठी भीती आहे. ही अंधश्रद्धा नाही. मी जर आरोग्याच्या नियमांचे योग्य रितीने पालन करत असेन, तर मला भविष्यात काही रोग होईल, अशी भीती वाटण्याचे काही कारणच नाही.

    रोग झाल्यावर काय करावे, हे अभ्यासण्यापेक्षा रोग होऊ नयेत, म्हणून काय काय करावे, हे आयुर्वेदात खूप सखोल सांगितलेले आहे.

    रोग होऊ नये, यासाठी शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक या चारही गोष्टींचा साकल्याने विचार करावा. केवळ दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार विहार पथ्यापथ्य पालन करणे म्हणजे स्वस्थवृत्त नव्हे, हा शारीरिक अंतर्गत एक भाग झाला. इतर गोष्टी दुर्लक्षून कश्या चालतील ? आपल्याला जर पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करायलाच हवा. म्हणून हा आयुर्वेदीय हितोपदेश.

    काही जणांच्या मनात अज्ञानामुळे, अजूनही शंका आहेत, की " आई बाबा सांगतात" हे आयुर्वेदाच्या कोणत्या पुस्तकात सांगितले आहे ?
    कृपया आपली जातीयवादी विकृत दृष्टी, निदान आरोग्याच्या क्षेत्रात तरी, जरा बाजुला ठेवावी.

    जसे अग्निवेश, चरक, सुश्रुत होऊन गेले, तसे त्यानंतरच्या काळात 'वाग्भट' हे ग्रंथकार होऊन गेले. नागार्जुन, शारंगधर, काश्यप इ. अनेक ऋषी, आणि त्यांचे शिष्योत्तम, ही आरोग्य रहस्ये काळानुरूप त्यात योग्य ते बदल करीत, पुढील पिढीला देत गेले.

    गुरूशिष्य संवाद रुपात हे ज्ञानदान करण्याची भारतीय परंपरा जशी भगवद्गीता सांगितली, तशीच गुरूशिष्य संवादरुपी विवेचन या आयुर्वेदीय ग्रंथामधे देखील दिसते. शिष्य प्रश्न विचारतात, आणि गुरू त्या शंकेचे समाधान करतात. अशी ही परंपरा. पण दुर्दैवाने ही गुरुकुल शिक्षण परंपरा बंद पडली आणि महाविद्यालयीन चाकोरीबद्ध शिक्षण सुरू झाले....

    आई आणि बाबा हेच मोठे गुरू आहेत. जीवनाचे सार, चार हिताच्या गोष्टी, तेच अधिकाराने सांगत असतात. गुरुशिष्य परंपरा आई बाबा सांगतात, या नावाखाली सांगण्याचा हा प्रयत्न "वाग्भट" या ग्रंथाधाराने सुरू आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • याला जीवन ऐसे नाव भाग १६

    न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
    सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
    फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।

    वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 4

    ज्या पाण्याला गती नाही, त्या पाण्यावर शेवाळ धरते. बुळबुळीतपणा वाढतो. साठण्याची प्रक्रिया वाढली कि, कुजण्याची क्रिया सुरू होते. कुजणे म्हणजे बुडबुडे येणे. असे आपोआप बुडबुडे येणारे पाणी पचायला जड असते. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे जंतुनिर्मिती. जंतु पाण्याशिवाय वाढू शकतच नाहीत.
    म्हणजेच जिथे जंतु असतात, तिथे फरमेंटेशन सुरू असते. जिथे फरमेंटेशन असते तिथे पाणी असते. जे पाणी स्थिर असते तिथे जंतुसंसर्ग आणि फरमेंटेशन सुरू होते. म्हणजेच स्थिर असलेले पाणी पिऊ नये. स्थिर पाण्यात शेवाळ धरते असे म्हणतात. प्रत्यक्षात तसेच दिसते. समुद्राच्या किंवा नदी, धबधब्याच्या हलणाऱ्या पाण्यात शेवाळ धरत नाही. पण तलावाच्या काठाला शेवाळ आढळते.

    फेस आलेले पाणी पिऊ नये असेही ग्रंथकार म्हणतात. शुद्ध पाण्यात फेस येत नाही. याचा अर्थ ज्या पाण्यात फेस किंवा बुडबुडे दिसतात त्या पाण्यात काहीतरी अशुद्ध द्रव्य नक्कीच मिसळली गेली असणार. म्हणून हे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे.

    पाणी तापवून प्यावे. एकदाच तापवावे. वारंवार तेच पाणी गरम करू नये. अतिथंड पाणी देखील पिऊ नये. हे ग्रंथकर्ते सांगताहेत, त्या काळात फ्रिजपण नव्हते आणि कोल्ड्रींक्सही नव्हती.

    कार्बन डाय ऑक्साईड सारखे विषारी वायु, जे आपण उच्छ्वासावाटे बाहेर सोडतो, जे शरीरात राहिले तर शरीराचे नक्की नुकसान होणार असते असे आजचे विज्ञान पण सांगते, ते कार्बोनेटेड वाॅटर आपण गरज म्हणून पितोय कि गंमत म्हणून ????

    शास्त्रकार द्रष्टे होते, त्यांना माहिती होते, आमची पुढची अतिबुद्धिमान पिढी पाण्याबरोबर जीवघेणे खेळ खेळत आपले आयुष्य पणाला लावू पहात आहे.........

    निदान त्यांच्या पुढील पिढीच्या सुरक्षित आरोग्यासाठी तरी चार ओळी खरडून ठेवाव्यात, म्हणून जस्ट टाईमपास म्हणून लिहिले असावे कदाचित. एकतर त्यांच्या दौतीतली शाई संपत नसावी, किंवा बोरूच्या टोकाला, केवळ धार काढावी म्हणून बहुतेक लिहून ठेवण्याचे कर्म त्यांना सुचले असणार !

    ही कोल्ड्रींक्स हे विष आहेत, हे वारंवार सिद्ध झालेले असताना, त्यात बुडबुडे दिसताना, त्यांच्या पिण्यामुळे दात, हिरड्या, जीभ यांना झिणझिण्या येत असताना, पिल्यानंतर जीवघेणी ढेकर येत असताना, आपल्याला त्याची गरज नसताना, हे फेसयुक्त अतिथंड पाणी प्यायची काय हौस आहे, काही कळत नाही.

    विनाशकाले विपरीत बुद्धी. दुसरं काय ?
    शास्त्रकारांनी याच श्लोकाच्या तिसऱ्या ओळीत अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे,
    फेनिलं, जन्तुम्, अतप्तम्, दन्त अग्राह्यम्, अति शैत्यतः न पिबेत् !

    पण लक्षात कुणी घ्यायचे ?
    शास्त्रावर विश्वास नाही, शास्त्रकारांवर विश्वास नाही.
    आधुनिक विज्ञान सांगते तेही व्यवहार्य वाटत नाही.
    अंगवळणी पडले आहे, एवढे सवयीचे गुलाम झालो आहोत ?

    एवढं माहित असून पिणार असाल तर प्या. आणि भोगा आपल्या कर्माची फळे !
    दुसरं काय म्हणणार ना ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    23.12.2016

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अकरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सतरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    हे सर्व कशासाठी, तर रोग होऊ नयेत यासाठी. रोगामुळे काय होतं ?
    आयुष्य कमी होतं.
    त्याने काय होतं ?
    जीवनातील आनंद हरवून जातो. जीवन हे आनंद निर्माण करण्यासाठी आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसं, हे जग सुखी व्हावे. याचा दुसरा अर्थ दुःख नाहीसे व्हावे, असा आहे. रोगालाच दुःख असे पर्यायी नाव देखील आहे.

    रोग म्हणजे दुःख. पण औषध म्हणजे सुख नाही.

    एक गोष्ट लक्षात येतेय का बघा. निरोगी राहण्यासाठी ग्रंथकारांनी या श्लोकामधे कुठेही औषधांचा पुसटसा उल्लेख देखील केलेला नाही.
    या श्लोकामधे नित्यं हिताहारविहार औषधसेवी.... असं म्हटलेलं नाही. तशी गरजच नाही, याचा विश्वास ग्रंथकारांना आहे.

    याचा अर्थ रोग होऊ नयेत यासाठी औषधे कधीही काम करीत नाहीत. हे पटतंय का ?

    आयुष्यभर, मरेपर्यंत औषधं खाणं ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे. आपल्याला त्रास असेपर्यंत औषध जरूर घ्यावे. भले कोणत्याही पॅथीचे असावे.

    त्रास संपला की औषध संपलेच पाहिजे. जसं कावीळ झाल्यावर कावीळीवरील औषध जरूर घ्यावे.
    किती दिवस औषध घ्यावे ?
    कावीळ उतरेपर्यंत. म्हणजे कावीळीची शरीरावर असणारी लक्षणे नाहीशी होईपर्यंत औषधे जरूर घ्यावी. नंतर भूक वाढणारी औषधे घ्यावीत. नंतर मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी एखादे जुलाबाचे औषध घ्यावे. नंतर औषधांची गरज संपते.

    रोगाची लक्षणे संपल्यानंतर रोगही विसरून जायचा आणि औषधे देखील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगाचा मनातला विचार देखील काढून टाकायचा, की मला असा रोग होता......

    भूक वाढल्यानंतर आपला आहार विहार नियंत्रित असेल तर आपल्या शरीराला जे घटक हवे आहेत, ते सर्व शरीरालाच निर्माण करू देत. बाहेरून सतत मोजून मापून औषधांनी मदत पुरवून, शरीर निरोगी राहील, हा भ्रम आहे. असे होत नाही.

    जसं कावीळीचं, तसंच तापासाठी. ताप उतरला तरी औषधं खायची आवश्यकता नसते. पण आजकाल रक्तदाब, मधुमेह, पीसीओडी, डिप्रेशन, यासरख्या अनेक आजारात यासाठी कायमस्वरूपी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. काही मोजकेच आजार असे असतात, की औषधं घेईपर्यंत बरे असतात, आणि औषधे संपली की पुनः डोके वर काढतात. याला याप्य असा शब्द आयुर्वेदात वापरलेला आहे. काही आजार असाध्यच असतात, त्यावर औषधेदेखील काही काम करीत नाहीत, मग औषधे पचवायचे ज्यादाचे काम तरी कशाला द्यावे ? औषधे कधीपर्यंत सुरू ठेवावीत हे सुद्धा रोग्याच्या लक्षणावर आणि रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते. याचा निर्णय एखादा कुशल वैद्यच घेऊ शकतो.

    औषध हेच माझे सर्वस्व आहे. औषधे घेतल्याशिवाय माझं काही खरं नाही, ताकद वाढण्यासाठी औषधे घेतलीच पाहिजेत, टाॅनिकशिवाय बाळ अंग धरणारच नाही, असं नाही. न्यायालयाच्या भाषेत सांगायचे तर, हे सर्व खोटं आहे

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    ०६.०८.२०१७

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकोणीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे पंचवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    शब्दाने शब्द वाढवू नये.

    अरे म्हटले की, कायरे असे उत्तर येते. आणि अहो म्हटले की, काय हो, असा प्रतिध्वनी येतो.
    रामराम म्हटले की, राम राम असेच प्रत्युत्तर मिळेल.

    ही जगाची रिती आहे. जगायची नीती आहे.

    आणि गरज नसताना शब्दाने शब्द का वाढवावा ? याने भांडण वाढते. भांडण मिटवायचे असेल तर एकाने तलवार काढली तर दुसऱ्याने ढाल स्विकारावी. म्हणजे भांडण मिटते.

    उंबऱ्याची मर्यादा ओलांडू नये.
    या अशाच वाक्यामुळे शब्दाने शब्द वाढतात.अशावेळी शब्दच्छल न करता भाव लक्षात घ्यायचा असतो. हे वाक्य फक्त मुलींसाठी नाही सांगितले. मुलांसाठी सुद्धा तोच नियम आणि नवऱ्यासाठी पण !

    उंबरा हा घराला असतो. उंबरा ही घराची सुरवात आहे.
    बाहेरील काही सरपटणारी जनावरे दरवाजा आणि त्याखालील जमिनीच्या फटीतुन आत येऊ नयेत, यासाठी घराच्या पुढील आणि मागील मुख्य दरवाज्यांना उंबरठा असतो. म्हणजेच उंबरा हा घराचे एका अर्थाने संरक्षण करीत असतो.

    घर हे सर्वांचेच असते. घरात राहून काम करणाऱ्यांचे आणि घराबाहेर राहून घरासाठी राबणाऱ्यांचे. मग ती स्त्री असो वा पुरूष. आणि हो, घराच्या मर्यादाची काही लिखित संहिता नाही की, उंबरठ्यावर बसून नियम तपासून घरात प्रवेश. घराच्या मानमर्यादांचे उल्लंघन होऊ नये, एवढंच. या मानमर्यादा प्रत्येक घराच्या वेगळ्या असतील. काही जणांच्या कपड्यांच्या, काही जणांच्या सोवळ्याच्या, काही जणांच्या डोक्यावरून पदर घेण्याच्या तर काही जणांच्या चेहेरा सुद्धा झाकून घेण्याच्या या परंपरा त्या त्या घरानुसार पाळल्या गेल्या पाहिजेत. इथे त्या घराचा आत्मसन्मान, समाजातील स्थान, लपलेलं असतं. जसं एखाद्या डाॅक्टरकडे पहाण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन असतो. त्याने नीटनेटके कपडे घालावेत, जरा चांगले दिसावे, त्याच्याकडे बघितल्यावर प्रसन्न वाटतंय, असं बघणाऱ्याला वाटलं पाहिजे. हे चुक नाही. समजा, एखादा डाॅक्टर आडव्या चट्यापट्याचा शर्ट, शर्टची वरची दोन बटणं उघडी, डोळ्यावर मल्टीकलर गाॅगल, पान चघळतोय, केसांचा स्पाईक, खांद्यावर रूमाल आणि स्वतः रिक्शा चालवित, ओपीडी मधे आला तर वेटींगमधे बसलेल्या रुग्णांना कसे वाटेल ? त्यांच्या मनातील डाॅक्टर या प्रतिष्ठेला धक्का बसेल.

    अशीच प्रतिष्ठा प्रत्येक घराला जोडलेली असते. घराला म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला जोडलेली असते. घराची ही प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे.

    घराच्या उंबऱ्याचे हे नियम गृहीत धरलेले असतात. आणि तसं बघायला गेलं तर हे नियम कुठे आहेत? घराचा उंबरठा ही घराची प्रतिष्ठा आहे. तुम्ही असं काही करू नका, ज्याने आपल्या प्रतिष्ठेला बाधा पोचेल, असं खरं तर म्हणायचं असतं आईला !

    पण आता घराला उंबरेच कुठे दिसतात ? तेच तर गायब झालेत आणि त्याबरोबर घराची प्रतिष्ठा देखील !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १४.०८.२०१७

  • आजचा आरोग्य विचार – भाग चौतीस

    आहारामधे फळांचा वापर करावा. आहारानंतर फळ नको किंवा आहाराऐवजी फलाहार करावा. आज जेवणानंतर फळे खायची प्रथा पडली आहे. फळे पचायला जड असतात. जे पदार्थ पचायला जड ते अग्नि प्रखर असतानाच म्हणजे भूक कमी होण्याअगोदरच संपवावे.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग वीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही-भाग अकरा

    आयुर्वेदीय औषधांना लवकर गुण का येत नाही ?

    इंग्लिश औषधांप्रमाणे आयुर्वेदीय औषधांना झटपट गुण दिसत नाही, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वेधन, अग्निकर्म, यासारख्या काही चिकित्सा इतक्या जलद काम करतात, की अॅलोपॅथीमधील, कोणतेही वेदनाशामक वा भूल देणारे द्रव्य देखील एवढ्या जलद काम करत नसावे. आश्चर्य वाटण्याएवढ्या चमत्कारिक चिकित्सा ग्रंथात वर्णन केल्या आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव जवळच्या वैद्याकडून घेणे महत्त्वाचे आहे.

    आयुर्वेद म्हणजे एक जीवनप्रणाली असल्याने, त्यात औषधांपेक्षा, आहार विहार जास्ती महत्त्वाचा ! तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आधीच पाणी शोधून ठेवावे, तसे रोग झाल्यानंतर उपाय शोधत बसण्यापेक्षा, रोग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगणारे हे शास्त्र !

    आयुर्वेद ही कोणतीही 'पॅथी' नाही. हे पुनः एकदा लक्षात घ्यावे. त्यामुळे 'औषधे' हा चिकित्सेतील गौण भाग आहे. औषधे ही पूरक म्हणून वापरली जातात. ( तशी वापरली जावीत. )

    जसजसा काळ बदलत गेला तसे आयुर्वेदातील औषधांमधे भर पडत गेली. सुरवातीला केवळ वनौषधींनी समृद्ध असलेली ही संपदा रसौषधींनी आणखीनच बहरत गेली. शरीरातील दोष ( पंचकर्माचा वापर करून ) काढून टाकून नंतर औषधांचा वापर केला गेला तर औषधे कमी पुरतात, हे अभ्यासले गेले. किंवा औषधे पुनः लागतच नाहीत, हे पण लक्षात आले. आणि रोग पुनः उद्भवू नयेत, यासाठी आहारविहारातील पथ्यापथ्य सांगितले गेले. व्यवस्थित पथ्यापथ्य पाळले तर औषधांची गरज कमी होते.

    औषधे मग ती कोणत्याही पॅथीची असोत, ती विकतच घ्यावी लागतात, दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. पण पथ्यापथ्याचे तसे नसते. माझा माझ्या मनावर विशेषतः जीभेवर संयम आणता आला की, बाहेरील अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत नाही. बाहेरील सर्व परिस्थितीवर मनःस्थितीने नियंत्रण आणता येते.

    काही वेळा औषधांची मात्र कमी पडते, काही वेळा अनुपान चुकते. अनुपान म्हणजे औषध ज्याच्या बरोबर घ्यायचे ते द्रव्य. अनुपानासोबत जर औषध घेतले की औषधांची क्षमता वाढते. आजच्या भाषेत सांगायचे तर कॅटेलिस्ट. जसे, कफाच्या आजारात मधासोबत, पित्ताच्या आजारात तुपाबरोबर, आणि वाताच्या आजारात तेल हे पूरक औषध म्हणून वापरले तर रोगाची लक्षणे झपाट्याने कमी होताना दिसतात. काही वेळा तर औषधांची गरजच उरत नाही, अनुपान हेच औषध ठरते. पित्तामुळे डोके दुखते, या आजारात केवळ सकाळी रिकाम्या पोटी तूप खाऊन वर दोन घोट गरम पाणी पिणे, हा घरगुती उपाय देखील चमत्कार घडवतो. (तूप म्हणजे गाईचे. आणि गाय म्हणजे भारतीय, हे पण विसरायचे नाय्ये हं. ) प्रकृतीनुसार किती काळपर्यंत हे घृतपान सुरू ठेवावे लागेल, याचा सल्ला अर्थातच वैद्य चांगला देऊ शकेल. { वैद्य म्हणजे सरकारी नोंदणीकृत आयुर्वेद पदवीधारक, ज्याचा अनुभव आणि ग्रंथाचा अभ्यास देखील उत्तम आहे, असा आप्त (आप्त म्हणजे ओळख असलेला, घरचा. पैशासाठी औषधांचा व्यापार न करणारा ) ही व्यक्ती देखील योग्य सल्ला देऊ शकतो. आज हे मुद्दाम सांगावेसे वाटते कारण वाॅटसपच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे असे आरोग्याचे संदेश देणाऱ्या स्वयंघोषित वैद्यांचे पेव खूप आलेले आहे. त्यात विश्वास कसा आणि कोणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मग तो नागरमुन्नळीचा असो वा मुरगुडचा, कोल्हापूर सारख्या शहरातला असो वा अन्य कोणत्याही खेड्यातला. }

    आपली प्रकृती काय आहे, कोणते औषध, कोणते अनुपान, किती दिवसांसाठी, कधी घ्यायचे आहे, त्याचे पथ्यापथ्य काय आहे, हे हे जाणकार वैद्यच चांगलं सांगू शकेल ना !

    नाहीतर घेतलेल्या औषधाचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी पुनः दुसरा वैद्य असे व्हायला नको !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    29.04.2017

  • किचन क्लिनीक – पीच

    किचन क्लिनीक – पीच

    हे चीनी फळ आपल्या देशात देखील थंड हवेच्या ठिकाणी पिकविले जाते.हे फळ जेवढे दिसायला सुंदर तितकेच चवीला देखील सुरेख लागते.

    ह्याची चव आंबट गोड आता फिकट पांढऱ्या रंगांचा मऊ गर असतो.बाहेरून पिवळसर लाल रंगांचे असते.त्याला एक प्रकारचा मादक सुवास येतोय.हे थंड गुणाचे असून ते शरीरातील वातपित्त दोष कमी करते व कफ वाढविते.

    पीच कलर हे नाव ह्या रंगाला ह्याच फळाच्या रंगावरून पडले आहे जो बऱ्याच जणांच्या आवडीचा रंग असतो.

    चला आता आपण ह्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:

    १)मुत्राशयातील खडे विरघळायला १ कप पिचचा रस+१ चमचा धणे पुड हे मिश्रण रोज जेवणा आधी प्यावे.

    २)खुप ताप येऊन लघ्वी कडक होणे,जळजळ होणे,लघ्वीला कमी होणे ह्यात १ कप पिचचा रस+२ चमचे साखर हे मिश्रण २-३ वेळा प्यावे.

    ३)साल काढलेल्या पिचचा गर १ वाटी रोज रात्री खाल्ल्यास मळाचे खडे होणे,मलबध्दता कमी होते.

    ४)लहान मुले झोपेत लघ्वी करतात त्यांना रोज १ चमचा वावडींगाचे चुर्ण पाण्यासह प्यायली द्यावे व पीच खायला द्यावा.

    ५)ब्लड प्रेशर वाढून लघ्वी कमी होत असल्यास पिचचा रस १ कप+१/४ चमचा वेलची पूड+१ चमचा धणे पुड हे मिश्रण प्यावे.

    पीच खायचा अतिरेक केल्यास सर्दी,जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४