एवढा सगळा खटाटोप कशासाठी ?.....
गेली चाळीस पन्नास वर्षे झाली, आमची वाढ होऊन, आत्ता कशाला एवढं बदलायचं ?...
आमची अर्धी लाकडं गेली मसणात.....
काय वाढणारे आयुष्य असं वाढून वाढून....
आणि खाव्या लागल्या अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणून कुठे बिघडणार आहे ?......
जगात एवढी लोक खातातच आहेत ना या अॅलोपॅथीच्या गोळ्या. ती काय सगळी वेडी आहेत का ?......
विज्ञानावर, त्याच्या नवनवीन शोधांवर, या आयुर्वेदीक वैदूंचा अजिबात विश्वास म्हणून नाही. भोंदूगिरी सगळी.....
असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आत खदखदत आहेत, हे कळतंय....
आजची टीप त्यांच्यासाठी...
आयुर्वेद सांगतो, निरामय जीवन जगावं. औषधांशिवाय जगावं, दिलखुलास जगावं, आपण निरोगी रहावं, इतरांना निरोगी होण्यास मदत करावी.
औषध कसं असावं यावर आयुर्वेद सांगतो, एक औषध घेताना अन्य कोणत्याही स्वरूपाचा बिघाड शरीरावर दिसू नये, आजच्या भाषेत सांगायचे तर कोणतेही साईड इफेक्ट, म्हणजे दुष्परिणाम नकोत. ज्या कारणासाठी औषध घ्यायचं ते कारण नाहीसे झालं की, औषध बंद व्हायला हवं.
पण आज काय होतंय ? आणि काय चाललंय ? हे सर्व आपल्याला दिसतंय.....
जगण्यासाठी, मरेपर्यंत औषधंच औषध!
त्यापेक्षा जीवनशैलीमधेच थोडेफार बदल केले, विचारामधे थोडी सकारात्मकता आणली की झालं.
काही आजार वंशपरंपरेने येतात, असे सांगितले जाते, हे पण अर्धसत्य आहे. जसे घरात एकाला "ह्रदयरोगी" असा शिक्का बसला की, त्याचे अख्खे घराणे वाताचे रोगी बनून जाते.
कारण ?
डाॅक्टरनी सांगितलेले चुकीचे पथ्यापथ्य.
भीतीने असेल किंवा आमच्यासाठी कुठे वेगळं करत रहाणार, या कारणाने असेल, पण, त्या एकाच्या जेवणातले तेल, तूप, नारळ, शेंगदाणे, आदि सर्व स्निग्ध पदार्थ बंद केल्यामुळे, सगळ्याच्याच जेवणातील स्नेह आटून जातो. (जेवणातील आणि जीवनातील सुद्धा !) आणि अख्खं घराणं चुकीच्या आहाराची शिकार होते. हे तसंच्या तसं पुढच्या पिढीत काॅपी पेस्ट होतं आणि नवीन (वंश /देश )परंपरा सुरू होते.
आपल्या घरात तर अशी चुकीची परंपरा सुरू तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवावे, यासाठी आपली वंश परंपरा, देश परंपरा नीट तपासून पहायला हवी. इतिहास आणि पुराणे वारंवार नव्याने अभ्यासायला हवीत.
ही नव्याने निर्माण होणारी चुकीची आहार परंपरा आपल्याला थांबवायची, बदलवायची आहे.
आणि मुख्य म्हणजे आपली (दोन किंवा एक) मुले. ज्यांच्या खांद्यावर आपण आपले भविष्य ठेवणार आहोत, ते सक्षम नकोत का व्हायला ? आम्ही ज्या चुका केल्या, किंवा करतोय त्याची चुकीची फळे त्यांना भोगायला लागू नयेत, मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब, संधीवात, स्थौल्य, पीसीओडी, थायराॅईड सारखे पसरत जाणारे आजार आपल्या घरात येऊ नयेत, यासाठी आपणच वेळीच सावध होऊन, बदलायला हवे.
मुलं आपलं अनुकरण करत असतात. काही गोष्टी न शिकवता आपल्याकडून शिकत असतात. याचे भान पालक म्हणून आपण ठेवायलाच हवे. माझ्या आई वडिलांच्या लहानपणी असलेली सकाळी सायंकाळी जेवायची वेळ एका पिढीने बदलली, आणि चुकीच्या रोगांची मालिका सुरू झाली. असे लक्षात येतेय. म्हणून आपणच जर आपल्या घरातील जेवायची वेळ बदलवायचे सकारात्मक नियोजन केले तर (तथाकथित) पिढीजात आजारापासून आपण आपल्या भविष्याला वाचवू शकतो.
अजूनही वेळ गेलेली नाही.
मी बदललो...
माझे घर बदलले....
असंच प्रत्येकाच्या घरी होत राहिलं तर...
लक्षात येईल.....
मेरा देश बदल रहा है..
सारा देश बदल रहा है......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.03.2017
गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना बघीतलंय ? नीट बघा.
कर्मकांडामधे आयुर्वेद कसा भिनलाय पहा.
नैवेद्याच्या ताटात पंचपक्वान्न सजलेली असतात.पाच प्रकारच्या भाज्या असतात. कोशींबीर, चटणी, वरण भात तूप असतेच.
नैवेद्य दाखवताना मंत्र आहेत.
प्राणाय स्वाहा
अपानाय स्वाहा
व्यानाय स्वाहा
उदानाय स्वाहा
समानाय स्वाहा
ब्रह्मणे स्वाहा
सहा वेळा हे मंत्र म्हणत ताटाभोवती पाणी फिरवायचे असते. हे घास आपण देवाला भरवतोय आणि देव जेवतोय, असा नामदेवाचा भाव मनात हवा.
लक्षात आले का , हे वायुचे पाच प्रकार आहेत. यातील प्रत्येक घास प्रत्येक वायुला अर्पण केला आहे. "आता याची जबाबदारी तुझी. पुढे न्यायचे, आणि पोटातील पाचकाग्नीच्या ताब्यात द्यायचे.माझी जबाबदारी संपली." आजच्या भाषेत रिले रेस !
त्यांच्या नावाचा पुकारा करून स्मरण केले की, तो तो वायु सूक्ष्म रूपात तिथे हजर राहून आपली जबाबदारी पूर्ण करतो.
एखाद्या संघटनेमध्ये कसे कामाचे वाटप केले जाते. पाहुण्यांची जबाबदारी एकाने, निमंत्रणे दुसर्याने, रंगमंच व्यवस्था तिसर्यावर, चौथा भोजन. ज्याला जे काम नेमून दिले आहे ते तेवढेच सांगितलेले काम त्याने पार पाडायचे. दुसर्याच्या कामात जरापण ढवळाढवळ करायची नाही, तरच सगळी कामे उत्तमरीत्या पार पडतात. तसेच प्रत्येक वायुला, प्रत्येक पित्ताला काम नेमून दिलेले आहे. याची आठवण फक्त त्यांना नावे घेऊन करून दिली जाणे, म्हणजेच नैवेद्य दाखवणे.
सहा वेळा पाणी फिरवून झाले की पुनः एक मंत्र म्हणतात,
"मध्ये पानीयम् समर्पयामी "
आणि ताम्हनात पाणी सोडायला सांगतात. म्हणजे देवाला अन्नाचे सहा घास भरवल्यानंतर भोजनाच्या मधे पाणी प्यायला दिले जाते. आणि पुनः सहा घास भरवले जातात.
"जेवताना मधे मधे पाणी प्यावे," हा साधासोपा नियम या नैवेदयामी मधे दिसला.
जे जे देवाला ते ते देहाला या नियमानुसार, तोच नियम आपणालाही लागू पडतो.
ज्ञानमार्ग्याला या नैवेद्याच्या ताटात तूप वरण भात आणि गुळखोबर्यातल्या कॅलरीज दिसतील, त्या बर्न करण्यासाठी किती पॅडलमारावे लागतील, याचे गणित त्याच्या डोक्यात सुरू होईल.
कर्ममार्ग्याला त्या मंत्रामागील अनुभव दिसेल, आणि ग्रंथोक्त रेफरन्स न शोधता, तो त्यामागील कार्यकारण भाव शोधेल.
भक्तीमार्गी व्यक्तीला त्यातील भोळा अर्पणभाव दिसेल. देवाचा प्रसाद म्हणून, अन्य कोणताही विचार न करता, ताटाभोवती निःशंक मनाने तो पाणी फिरवेल.
नैवेद्याचे भरलेले ताट तेच आहे, पण एखाद्या चिकित्सक मनात केवळ शंका आणि शंकाच येत रहातील. तो नजरेसमोर जिम ठेवील, त्याचे ग्रंथोक्त रेफरन्स शोधत बसेल आणि ताटाभोवती पाणी फिरवत उगाच नुसता चिखल करेल.
बाकी तिघेजण, तो समोरचा नैवेद्य सहज फस्त करून टाकतील, पण चौथा वैद्य मात्र केवळ त्याची चिकित्साच करत बसेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
07.09.2016
आपल्याकडे तिखट म्हणजे फक्त मिरचीच असा समज आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे तिखट आहेत जसे सुंठ, मिरी, पिंप्पळी, आले, इ.इ.
सर्व तिखट पदार्थ हे तेज म्हणजे अग्निमहाभूत प्रधान द्रव्य असतात.
आपल्याकडे म्हणजे भारतात दोन प्रकारचे मसाले आढळतात.
गोडा मसाला आणि यातच मिरचीपूड घातली की बनतो, तिखट मसाला. प्रदेशानुसार यांची नावे कदाचित बदलतील.
भारतीय आहारात पंधरावीस प्रकारचे मुख्य पदार्थ मसाला बनवण्यासाठी वापरले जातात. मुख्यत्वेकरून मिरी, दालचिनी, लवंग, बडिशेप, खसखस, तमालपत्र, जायफळ, जायपत्री, धने, मोहोरी, हिंग, हळद, यासारखे सुके पदार्थ वापरले की सुका मसाला आणि कांदा, लसूण, नारळ, शेंगदाणे वापरून केलेला ओला मसाला होतो.
मसाल्यातील एक दोन पदार्थ कमी जास्त केले की, मसाल्याचा स्वाद बदलत जातो. जिरे जास्ती वापरले की तो पावभाजीचा मसाला होतो, धनेपावडर जास्त वापरली की सांभार मसाला होतो. त्यामुळे प्रत्येक तिखट पदार्थ कमी जास्त प्रमाणात आपले परिणाम दाखवतात.
गंमत अशी आहे, हे मसाल्याचे पदार्थ तर सर्वच गृहिणी वापरतात, पण हे सर्व मसाल्याचे पदार्थ, आयुर्वेदीय औषधी आहेत, त्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्यांचा युक्तीने वापर केला तर आपला आहार हेच परिपूर्ण औषध होऊ शकतो, हे ज्या गृहिणींना समजले, त्या सुगृहिणी !
या प्रत्येक मसाल्यामधे एकतरी उडनशील तेल असते, जे त्या पदार्थाला विशिष्ट सुगंध, आणि विशिष्ट चव देते. हे तेल औषधी असते, औषध म्हणून पोटात जाणे अपेक्षित आहे.
पण जीभेच्या चोचल्याच्या मागे लागून आपण खमंगपणा वाढण्यासाठी मसाले भाजून वापरायला सुरवात केली आणि मूळ औषधापासून, आहार लांब होत गेला.
काही औषधी बनवताना भाजावी लागतात, शिजवावी लागतात, तळावी लागतात, त्यातील काही पदार्थांचे गुण वाढवायचे असतात तर काहींमधले दोष काढावयाचे असतात, जसे हिंग हा तुपात भाजून वापरावा, मोहोरी तेलात तडतडल्यावर शुद्ध होते. म्हणजे त्यातील उष्णतीक्ष्ण गुण थोडे कमी होतात.
त्यामुळे हा अग्निसंस्कार करणे आवश्यक असते. पण काही ठिकाणी मात्र हे मसाले औषध पूर्ण तयार झाल्यावर कच्च्या स्वरूपात वरून घालायला सांगितले आहे. याला आयुर्वेदीय औषधांच्या परिभाषेतमध्ये प्रक्षेप म्हणतात.
मसाल्याचे पदार्थ भाजले की त्यातील उडनशील तेल उडून जाते, जे पोटात जाणे अपेक्षित असते, त्यामुळे मसाला न भाजता आहारात वापरला तर आपले जेवणच औषधी होईल. म्हणजेच युक्ती वापरली तर आहार हेच औषध बनते.
"आम्हाला वगळा गतप्रभ जणु होतील तारांगणे" च्या धर्तीवर हे मसाल्याचे पदार्थ वापरायचे नाहीत, असे ठरवले तर जेवणातील औषधी भाग जवळपास संपूनच जाईल.
तिखट खाऊच नका, असे म्हणण्यापेक्षा युक्तीने तिखट खा, असे म्हणणे जास्त गोड वाटते ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
11.11.2016
वेदामधून घेतलेले, जवळपास सर्वांचेच पाठ असलेले, हे मंत्रपुष्प ही आपली भारतभूची राष्ट्रीय प्रार्थना आहे, हे कोणाला माहिती नसेल. ही जणु काही शपथ आहे. देवाच्या समोर उभे राहून एका सर्व शक्तीमान शक्तीला शरण जाऊन सांगतोय, की हे राष्ट्रदेवते, मी तुला साक्ष ठेऊन ही शपथ घेतोय,
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग सहा !
काही फळांचे "सीझन" असतात. काही फुलांचा "हंगाम" असतो. काही वनस्पतींची "बेगमी" विशिष्ट मोसमातच करावी लागते. भाताची शेती पावसाळ्यातच केली जाते. असे का ? यालाच तर "निसर्ग" म्हणतात.
आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, या महिन्यातच का लागतात ?
जांभळे, करवंदे, जाम, फणस ही फळेदेखील याच महिन्यात मिळतात. गुलमोहराचा बहर आत्ताच सुरू असतो. असे का होत असावे ?
निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे.
केवळ मानवालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येकाला इथे विशिष्ट जागा, आजच्या भाषेत "स्पेस" आहे.
निसर्गातील प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक ते सर्व निसर्गानेच तयार करून दिलेले आहे. सहा महिन्यांचा आदान काल आणि सहा महिन्यांचा विसर्ग काल त्यानेच बनवलेला आहे. पण आपण ते युक्तीने वापरत असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधे शक्तीचे हे मैत्रीपूर्ण आदान प्रदान, कोणाच्याही, कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू आहे. आणि असेच पुढे देखील सुरू राहणार आहे.
ज्या कालावधीमधे निसर्गाने द्यायला सुरवात केली आहे, त्यावेळी त्याच्याकडून आनंदाने घेत जावे. फळे दिली फळे, फुले दिली फुले, ऊन दिले तर ऊन. पाऊस दिला तर पाऊस आणि देईल तेवढी थंडी. त्यापासून स्वतःचा फायदा करून घेत स्वतःचा बचाव कसा करायचा ही युक्ती आहे.
उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांचा आस्वाद तेव्हाच घ्यावा. गरज असेल तर औषधी स्वरूपात टिकवून ठेवावा, औषधी स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आसव अरीष्ट, अवलेह, गुटी, वटी, गुलकंद इ. स्वरूपात कोणत्याही रासायनिक टिकाऊ द्रव्याशिवाय टिकवून ठेवायच्या पद्धती देखील अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.
व्यापारी वृत्ती आली आणि त्यातील औषधी गुण कमी होत गेले. हवं तसं ओरबाडण्याची वृत्ती निर्माण झाल्यामुळे देखील काही दिव्य औषधी कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन, संगोपन होणे तेवढेच गरजेचे आहे.
जे द्रव्य नाशीवंत आहे, त्यावर प्रोसेस करून ते द्रव्य टिकवले जाईलदेखील, पण त्यातील औषधी गुणधर्म कमीच होतो, नैसर्गिक अधिवासामधे उगवलेली शतावरी, गुळवेल या सारख्या वनस्पती आणि कल्टीव्हेटेड वनस्पती यांच्या गुणांमधे नक्कीच फरक पडतो.
औषध म्हणून वापरायचे असल्यामुळे चालेल. पण जीभेचे चोचले म्हणून, फक्त तीन महिन्यात मिळणारा आंबा, "रस" या स्वरूपात टिकवून ठेवून, पावसाळ्यात खाल्ला तर त्रास नक्कीच होणार.
निसर्ग म्हणतो, तुम्हाला मी आंबे तयार करून पाठवलेले होते. तेव्हा तुम्हाला खायला वेळ नव्हता, तोच आंबा पुढे "अ-काली" खाल्ला तर, अकारण अग्निमांद्य निर्माण करून घेणार. जी गोष्ट आंब्याची तीच अन्य सर्व अन्नपदार्थांची ! इन्स्टंट फास्ट फूड आणि टू मिनटस मे रेडी पदार्थांची !
पाश्चात्य देशात, त्या देशांची ती गरज आहे, त्यांना निसर्ग अनुकूल नाही.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे ही मंडळी राहत असतात. चौवीस तास बर्फ, अवेळी पाऊस, चुकुन सूर्य दिसला तर आनंद होऊन, "गुड माॅर्निंग" म्हणणारे ते देश ! अन्य शेती व्यवसाय करायचा म्हटला तरी त्यांना ते शक्य होणारे नसते. म्हणून निसर्गाला पूरक परिस्थिती निर्माण करीत अन्नधान्यांचा साठा करावा लागणे, ही त्यांची गरज आहे.
आमच्याकडे " एव्हरी डे इज गुड माॅर्निंग " असताना, सिझनल फळे, फुले, भाज्या इ.इ. सर्व उपलब्ध होत असताना, ज्युस काढून पुनः त्यात विषारी किटकनाशके घालून, टिकवून, निसर्गाच्या विरोधात जाऊन, अवेळी खाऊन, रोग वाढवून, पुनः त्यासाठी अनैसर्गिक औषधे खायची !
ही हौस भारीच म्हणायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.05.2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यात मला जे सुचतंय, ते लिहितोय.
उतु नको मातू नको
घेतला वसा टाकू नको.
चातुर्मासात कहाण्या वाचायची पद्धत आहे. या कहाण्यांची सुरवात, एक आटपाट नगर होते..... अशी असते, मधेच कुठेतरी एखादी देवी किंवा मैत्रिणीच्या तोंडी हे वाक्य असते, उतु नको मातु नको, घेतला वसा टाकू नको... आणि पाचागावची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण असा शेवट असतो.
त्यात तुझ्यातील अहंकार सोडून दे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे. असा उपदेश केलेला असतो. जे व्रत तु स्विकारलेले आहेस, ते टाकू नकोस. तेच तुझे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. अशी समज दिलेली असते. म्हणून आई सांगते उतु नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.
उष्टे खाऊ नये.
एकमेकांच्या उष्टे खाल्ले की, जंतुसंसर्गामुळे होणारे व्याधी वाढतात, असे आधुनिक विज्ञान पण सांगते. पाश्चात्य संस्कारामुळे आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे, वेगवेगळ्या कुकरी शो मधे केक किंवा अन्य पदार्थ एकमेकांना हाताने भरवणे, किंवा त्याच उष्ट्या चमच्याने इतर सर्वांना भरवणे, या किळसवाण्या प्रकारामुळे, चलता है यार! उष्टे खाणे गैर नाही, असा चुकीचा संस्कार नकळतपणे होत जातो. आज असं चुकीचं का केलं जातं माहिती नाही, पण एकमेकांच्या उष्ट खाण्याची चुकीची प्रथा रूढ होत जातेय. यावेळी आईने किंवा बाबांनी आपल्या मुलामुलींना समजावून सांगितले पाहिजे, की उष्टे खाऊ नये. जंतुसंसर्गाचा पुढे धोका आहे.
घटाघट पाणी पिऊ नये.
पाणी सावकाश प्यावे. नाहीतर ठसका लागण्याचा संभव असतो. उगाचच बाटली लावली तोंडाला आणि संपवूनच तोंडातली काढली असं करू नये. पाणी वरून पिऊ नये. भांड्याला तोंड लावूनच प्यावे किंवा स्वतःच्याच ओंजळीने प्यावे.म्हणून पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचे स्वतःचे भांडे स्वतःबरोबर नेणारी मंडळी होती.
उगाच आरश्यात पाहू नये.
नटण्या मुरडण्याला पण मर्यादा असतात. सतत आरशासमोर उभे राहाणे, सतत चेहेरा पाहाणे, यात वेळ किती जातो, हे लक्षातच येत नाही. हे ज्या काळात सांगितले गेले, त्यापेक्षा आताचा काळ फार बदलला आहे. इतरांना आपण सुंदर दिसावे, ही विशिष्ट वयातील धडपड चुकीची नाही, पण सतत आरशासमोर उभे राहाणे चुकीचे आहे, हे मुलीला सांगितले तर आईचे काय चुकले ?
आता तर सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी काढताना तोंडाचे चंबू, गडू करून, ओठांची तोंडली नि आवळे करत, डोळ्यावरच्या भुवयांची धनुष्ये वाकवित, जेवढा विचित्र चेहेरा करता येईल तेवढा विदूषकी चेहेरा करण्याचा फंडा आला आहे. या काळानुसार बदलणाऱ्या फॅशन्स आहेत. हे आयुर्वेदात कुठुन येणार ? पण मूळ सूत्र सांगितलेले आहे, त्यात विस्तार करायला हवाच. जसा भाव चेहेऱ्यावर असतो, तसा तो मनी रूजतो. म्हणून चेहेऱ्यावर कधीही आठ्या नकोत. काही जणांना आठ्या पाडल्याशिवाय बोलताच येत नाही. आठ्या पाडून बोलू नकोस. असं आईने सांगितले आणि चेहरा नीट ठेऊन सेल्फी काढ, असे बाबा ओरडले तर काही चुकले का ?
परवाच एकाने प्रश्न विचारला, माझ्या चेहेऱ्यावर काळे डाग आहेत, मी काय करू ? विचारणाऱ्याने नाव सांगितलेले नाही, वय माहिती नाही, म्हणून सहज त्याचा डीपी पाहिला. तर डीपीवरच एवढा भेसूर चेहेरा ठेवलेला होता. आणि त्या चेहेऱ्यावर काळ्या रंगाचे पट्टे. मी सहज बापाच्या भूमिकेतून त्याला मेसेजलो, "अरे, आधी डीपी बदल. चेहेऱ्यावर काळे पट्टे ओढलेला हा भयानक डिपी कशाला ठेवलायस ?" त्यावर तो उत्तरला, "मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर द्या. नसत्या चौकशा कशाला ? "
आता याला काय उत्तर देणार. ?
माझेच चुकले म्हणा. मी कर्तव्य भावनेने त्याच्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायला हवं होतं. पण जळ्ळं बापाचं काळीज बाहेर पडलं. आणि हे असं उत्तर ऐकून घ्यावं लागलं.
बदलत्या काळानुसार पालकांनी पण बदलणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाशी संवाद करताना पण त्यांना रूचेल अशा भाषेत बोलायला हवे, हे पालकांनी समजून घ्यायला हवं.
केसांना हात लावू नये.
हे वाक्य म्हणजे सरळ सरळ आरोग्य जपणारा सल्ला आहे. केसांवर धुळ माती, बसत असते. त्यावर अनेक प्रकारचे जंतु चिकटलेले असतात. उगाचच केसातून हात फिरवायची सवय असणारी अनेक मुलगे मुली दिसतात. केसांवरून फिरवलेला हात न धुताच, बर्गर पिझ्झ्याला पण लागतोच. तोही शेयरींग मधे. म्हणजे अर्धा मी अर्धा तू. म्हणजे तिथेही स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जंतुसंसर्गाचा धोका.
केसांची मुळे नाजूक असतील तर ती सतत हलत रहातात. आणि गळतात. इतरत्र उडतात.
आधी डोक्यावर तेल घालत नाहीत, त्यात स्टाईल म्हणून उडत्या भुरूभुरूत्या केसातून बोटे फिरवीत राहिले, तर लवकरच गाॅन केस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१०.०८.२०१७
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक - चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही.- भाग दहा
" जेनेरीक आणि ब्रॅण्डेड असं आयुर्वेदात नाही का हो भाऊ ?
सध्या जेनेरीक आणि ब्रॅण्डेडचे वारे वाहाताहेत वाॅटसप वर ! म्हटलं आपल्या आयुर्वेदात असं काही असतं का ? आयुर्वेदातील काही औषध महाग असतात, म्हणून विचारतोय राग मानू नका."
एका रुग्णाचा फोनवरून भाबडेपणाने विचारलेला एक सहज प्रश्न.
खरंतर हाच विषय यापूर्वी गेल्या वर्षी वेगळ्या टायटलने येऊन गेला आहे. त्यावेळी टायटल होते, "स्वदेशी देशी आणि विदेशी !"
एकदा अकबराने प्रश्न विचारला,
सर्वात मोठे शस्त्र कोणते ?
बिरबलाने नेहेमीप्रमाणे हजरजबाबी उत्तर दिलं, हाती असेल ते
आयुर्वेदाला काय जेनेरीक काय ब्रॅण्डेड ! रुग्णाला गुण येणं महत्वाचे !
न तु अहं कामये राज्यं
न स्वर्गं न अपुनर्भवम्।
कामये दु:खतप्तानां
प्राणिनाम् आर्तिनाशनम्।।
या श्लोकाचा अर्थ लक्षात घेतला कि औषधांच्या अर्थ व्यवस्थेत, काही अर्थ नाही हे लक्षात येईल.
श्लोककर्ते म्हणताहेत,
मला राज्य नको, मला स्वर्गातील इंद्रपदही नको, मला पुनः जन्म नको,
( मला कोणत्याही राजकीय पाठींब्याची गरज नाही, मला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा मोह पण नाही, मला परत इलेक्शनलाही उभे राहायचे नाही, )
रोगाच्या दुःखाने तप्त झालेल्या माझ्या रुग्णांच्या वेदना तात्काळ कमी करण्यासाठी जे काही करता येईल, ते मी करेन.
( पण समाजसेवा करण्यासाठी मला स्वतंत्र पक्षही काढायचा नाही, जे काही करायचे ते तुमच्याबरोबर राहून करेन, पण मला अढळपद द्यावे. )
मी ज्या वैद्यकीय क्षेत्रात आहे, त्या आयुर्वेद शास्त्रामधील हे वचन विसरून कसे चालेल ? भले चार पैसे कमी मिळतील, कंठलंगोट बांधता येणार नाही, पायाला कापडी पिशवी गुंडाळायला जमणार नाही. (टाय आणि पायमोजे ) आणि भारतात गरज तरी काय ? तसं या ब्रॅण्डेड औषधांच झालंय.
ह. अगदी फरक दाखवायचाच झाला तर ग्रंथोक्त आणि पेटंटेड असा दाखवता येईल. ग्रंथोक्त म्हणजे ग्रंथात जशी वर्णन केली आहेत तशी, जसे च्यवनप्राश. आणि मूळ औषधी फाॅर्म्युल्यामधे बदल करून सरकार दप्तरी नोंद केली ते पेटंट प्राॅडक्ट बनते, जसे आंबा फ्लेवर च्यवनप्राश किंवा सोन्यामारूती च्यवनप्राश इ. कितीही उत्खनन करून बघितले तरी यात सोनं आणि चांदी काही सापडणार नाही, पण किंमत मात्र चौवीस कॅरेटहून भारी.
त्यामुळे ग्रंथोक्त औषधे खूप स्वस्त असतात, गुणवान असतात, आजच्या भाषेत 'टाईम टेस्टेड' आहेत, हजारो वर्षे झाली तरी त्रिभुवनकिर्तीचे नाव त्रिखंडात तसेच गाजतेय, किंवा ग्रंथोक्त सूतशेखरची घटकद्रव्ये तशीच आहेत, मग भारतातल्या कोणत्याही कंपनीने ही ग्रंथोक्त औषधे बनवली तरी फाॅर्म्युला तोच रहावा अशी सरकारची अपेक्षा असते. (आता आयुर्वेदीय औषधांचा क्वालिटी कंट्रोल हा संशोधनाचा भाग आहे, हे गृहीत धरले आहे. )
आयुर्वेद महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या प्रत्येक वैद्याला दवाखान्यात आवश्यक असलेली औषधे, स्वतःची स्वतः तयार करता येतात, तेवढे प्रत्यक्ष ज्ञान त्याना महाविद्यालयाने दिलेले असते, (असे गृहीत धरलेले असते ) पण अन्य अभारतीय पॅथीमधली औषधे मात्र डाॅक्टर मंडळींना तयार करता येत नाहीत, त्यांच्या अभ्यासक्रमातील "औषध निर्माण" ही फार मोठी पोकळी आहे. त्यामुळे औषधांसाठी औषध कंपन्यावर अवलंबून रहाणे ही त्यांच्या व्यवसायाची गरज बनली आहे,
पण आयुर्वेदात मात्र अगदी कच्च्या मालापासून तयार औषध बनवेपर्यंतची सर्व औषध निर्माण कृती शिकवली गेल्याने, अगदी घरच्या घरी देखील स्वस्त आणि मस्त औषधे, कोणत्याही आयुर्वेद पदवीधारकांना बनवता येतात. त्यामुळे आयुर्वेदीय औषध कंपन्यांची बनवेगिरी कमी होते, साहाजिकच स्पर्धा कमी होते.
ब्रॅण्डेड वापरले नाही तर अवस्था जेनेरीकमधल्या त्या हिरो सारखी होते, असा एक फोटो व्हायरल होतोय. ब्रॅण्डेड म्हणजे खूप स्टॅण्डर्ड असा प्रचार मल्टीनॅशनल कंपन्याशिवाय आणखी कोण करणार ? यात नुकसान कंपन्यांचे होते आहे. डाॅक्टरांचे नाही. भारतातल्या डाॅक्टरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर नेम धरण्याचा कंपन्यांचा हा प्रकार आहे. इतकंच !
शेवटी औषध ते औषध. हाती असेल तर माती सुद्धा औषध ठरते, असं सांगणाऱ्या आयुर्वेदात ब्रॅण्डेड आणि जेनेरीक असा भेद कसा असू शकेल ?
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
28.04.2017
अग्नि महत्वाचा !
'अग्निमिळे' या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व !
पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा.
हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. (आणि तसं पाणी सूर्यास्तानंतर प्यायचेच नाही, अगदी उकळून गार झालेले पाणी देखील परत गरम करायचे नाही आणि रात्र उलटून गेली तर निषिध्दच ! )
सूर्याखेरीज आणखी कोणते अग्नि वापरले जातात. मोठ्या यज्ञामधे जी अग्निची स्थापना करतात, त्यासाठी लाकडी रवि लाकडी उखळात घर्षण करून अग्नि निर्माण केला जातो. स्वयमग्नि ! हा अग्नि अत्यंत शुद्ध असतो.
नंतर त्याची स्थापना करून इतर समिधा, लाकडे वगैरे इंधन वापरून वाढविला जातो.
एक अग्नि विवाहाच्या वेदीवर सप्तपदी करत असताना प्रज्वलीत केला जातो. या अग्निचे रक्षण पुढे समंत्र आयुष्यभर करायचे असते, जो मृत्युनंतर उरलेलं शरीर परत ईश्वरापर्यंत पोचवण्यासाठी, म्हणजेच दहन करण्यासाठी वापरला जातो. हा अग्नि अत्यंत पवित्र असतो. म्हणून अग्निला पावक असेही म्हणतात.
गारगोटीचा दगड वापरून अग्नि प्रज्वलीत केला जातो, तोही अग्निच, पण गरज म्हणून तयार केलेला. मंत्राशिवाय केवळ तंत्र वापरून.
एक अग्नी चुल पेटवण्यासाठी वापरतात. सध्याच्या जमान्यातील काडेपेटी वापरून म्हणजे गंधकाचा वापर करून. किंवा लायटर मधली चकमक वापरून ठिणगी तयार केली जाते. अशा प्रकारे तयार केलेला अग्नि हा दुय्यम दर्जाचा मानला जातो.
अग्नि रक्षणासाठी जे इंधन वापरले जाते, तेही महत्वाचे. जसे तेल, तूप, राॅकेल, कापूर, स्पिरीट, जसे इंधन तशी काजळी, तशी अग्निची तीव्रता !
विडी किंवा सिगरेट पेटवायची असेल तर देवघरातल्या निरांजनावर पेटवली जात नाही. जसे काम तसा अग्नि. जसे काम तशी पवित्रता.
अग्नि कोणत्या कारणासाठी हवाय, त्याप्रमाणे अन्य साधने. आयुर्वेदात काही भस्म बनवताना भट्टी वापरायला लागते. ही भट्टी विशिष्ट लाकडे वापरून, विशिष्ट संख्येमध्ये रानशेणी वापरून बनवायला सांगितली आहे. रानशेणींची संख्या बदलली की पुटाचे नाव बदलले. त्या औषधावर होणारा परिणाम बदलला. हे सगळं अग्निवरच अवलंबून आहे ना !
घरात जी चुल पेटवली जाते, त्या चुलीमागे एक उपचुल असते. तिला वाईल, वैल असे म्हणतात. त्यावर मातीचे मडके ठेवून त्यात पाणी ठेवून दिले जाई. पुढे मुख्य चुलीवर काम करत असताना मागे जाणारा अग्नि फुकट दवडू न देता, त्यावर मडक्यात पाणी तापवून घेतले जाई. आमटी भाजीत जर पाणी हवे असेल तर हेच गरम पाणी वापरले जाई. हे पाणी दिवसभर त्या वैलावरच. चुल प्रत्यक्षात थंड झाली तरी देखील चुलीचे दगड गरम असत, तेवढी उष्णता हे पाणी धगधगीत ठेवायला पुरेसे असे. या पाण्याला एक मस्त वास येतो. धुराचा वास. स्मोक फ्लेवर ! जो वास तयार अन्नाला आपोआपच येत असे. (आमच्याघरी आजही चुल आहे. आम्हाला पेज अजूनही चुलीवरची मिळते.) हे वैलावरचे पाणी सतत कोमट असल्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचे काही कारणच नाही.
काळ बदलत गेला, तसे अग्नि निर्माण करण्याची पद्धत बदलत गेली. ओव्हन आला. विद्युत उर्जा वापरून हा अग्नि तयार केला गेला.
आतातर चुंबकीय पद्धतीने अग्नि मिळतो म्हणे. मायक्रोवेव्ह !! आणि इंडक्शन प्लेट. !!! अग्निचे तेज हे हे रूप दिसतच नाही. केवळ तापणे.
एका अग्निवर एका पद्धतीने शुद्ध करून घेतलेले पाणी परत दुसऱ्या अग्नीच्या संपर्काने शुद्ध करायचे नाही. गुण बदलतात.
वेळ नाही, या सबबीखाली अन्न शिळं करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि गरम करायला सुद्धा सवड नाही, म्हणून मायक्रोवेव्ह मधे ठेवून परत गरम करून खायचं. अशी ही पाश्चात्य पद्धत !
मायक्रोवेव्हमधे गरम केलेलं पाणी आणि चुलीच्या अग्निवर केलेलं पाणी यावर तौलनिक अभ्यास झाला. दोन वेगवेगळ्या कुंडीतील एकाच वयाच्या, एकाच प्रकारच्या रोपट्यांना विशिष्ट दिवस या दोन्ही प्रकारानी गरम करून गार झालेले पाणी घातले. काही दिवसांनी असे लक्षात आले, की मायक्रोवेव्ह मधील अग्निचे जे तरंग निर्माण होतात, ते घातक असतात, त्यांनी गरम केलेले "शुद्ध" पाणी पिऊन रोपटे मरून गेले.
आज पाश्चात्य तंत्र आमच्या स्वयंपाकघरात येऊन पोचले आहे. ज्याच्या निर्धोक उपयोगिते विषयी अजून मोठे प्रश्नचिन्हच आहे. तरी आम्हाला जाग येत नाहीये. एका बाजूने तंत्रज्ञान वाढते आहे, तर एका बाजूने रोग वाढताहेत. नवनवीन रोग अक्राळविक्राळ स्वरूपात समोर येताहेत. आणि अजून आम्हाला जाग येत नाही.
याला काय अर्थ आहे ?
आमचं वैलावरचं पाणी मात्र त्यासाठी समर्थ आहे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
तांदुळजा (चवळीचा पाला) हि भाजी बारा महिने उगवते. हिची लहान रोपं असतात व पाने बारीक असतात. हि भाजी चवीला गोड व शीतल गुणाची असल्याने शरीरातील वात व पित्तदोष कमी करते.
हिचे बरेच औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:
१)भाजलेल्या जखमेवर तांदुळजाच्या भाजीचा रस लावावा.
२)डोळे,हातपाय,व लघ्वीची आग होणे ह्यात तांदुळजाच्या भाजीचा १/४ कप रस+ साखर हे मिश्रण उपाशी पोटी घ्यावे.
३)चाई अर्थात केसांना लूत लागणे असे बोली भाषेत म्हणतात, त्यांवर तांदुळजाच्या भाजीचा रस+हिंग हे मिश्रण डोक्यावरील केस गेलेल्या भागी जीरवावे.
४)वारंवार ताप येणे किंवा तीक्ष्ण औषधे घेतल्याने अशक्तपणा आल्यास ४२ दिवस पाल्याचा रस एक कप घ्यावा.
५)संडास साफ होत नसेल तर तांदुळजाचा + पालक घालून केलेला सूप तूप घालून घ्यावा.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास शौचास पातळ होते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
दान करणे ही भारतीय संस्कृती चा पाया म्हटले तरी चालेल. पण या दानाचा सर्वात मोठा धोका म्हणजे अहंकार वृद्धी. मी दान दिले. यातील मी म्हणजे अहंकार. अहंकार हा नेहेमीच सूक्ष्म असतो. पण केव्हाही मोठे रूप घेऊ शकतो. हीच वेळ धोक्याची असते. म्हणून तर आई म्हणते, उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालादेखील कळू नये. ते गुप्त असावे.
Copyright © 2025 | Marathisrushti