
ह्याची वृक्षावर चढणार वेल असते.पाने १२-१५ सेंमी लांब व तीक्ष्णाग्र असतात.फुल लहान एकलिंगी व गुच्छात उगवते.फळ गोल मिरी प्रमाणे दिसते.पण ते गुळगुळीत व तांबूस रंगाचे व ६-८ मिमी व्यासाचे असते.त्याला वर एक छोटा देठ असतो व ते सुगंधी असून तोंडात धरले असता गार वाटते.
ह्याचे उपयुक्त अंग आहे फळ व तेल.कंकोळ चवीला तिखट,कडू असते व हे उष्ण गुणाचे असून हल्के रूक्ष व तीक्ष्ण असते.हे कफ व वातशामक असते.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)सुज व वेदना युक्त अवयवांवर कंकोळचा लेप करतात.
२)मुखरोगात कंकोळाचे फळ चघळायला देतात.
३)जखमेवर कंकोळाचे तेल लावतात.
४)कंकोळाने घामामुळे येणारी दुर्गंध नष्ट होते.
५)बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारीत कंकोळ उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
तसा कोहळा पौष्टिक असला तरी काही श्रध्दा अंधश्रद्धा ह्या फळाशी जोडल्या गेल्या आहेत जसे ह्याचा वेल बहरला आणी भरपूर फळे लागली कि ते अपशकुन मानला जातो,बऱ्याच घरात हा आणणे शिजविणे निषिद्ध असते.तसेच दृष्टबाधा होऊ नये म्हणून ह्याचे फळ धरा बाहेर बांधतात.
एवढे चांगले फळ पण किती शापित बिच्चारे नाही का हो!बरे ह्याचा उपयोग खायला देखील केला जातो बरं का.आग्रा फेमस पेठा कोहळ्यापासून बनवितात,आपण उन्हाळयात करतो त्या वड्या कोळ्याच्याच,खीर देखील करतात,काहीजण ह्याचा खवा देखील करतात.आणी हे सगळे पदार्थ पौष्टिक असतात बरं का.
कोहळ्याचा वर्षायू वेल असतो.ह्याची पाने ४-६ इंच लांब व हृदयाकृती असतात,पाने पिवळी २ इंच व्यासाची असतात.फळ अंडाकृती १-११/२ फूट लांब व वर सफेद पावडरचे आवरण असणारे असते.
हा चवीला गोड,थंड व वात पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
चला आता ह्याचे औषधी व घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:
१)अंगाची आग होत असल्यास फळाच्या गराचा लेप करावा.
२)अम्लपित्तामध्ये कोहळ्याच्या रसात साखर घालून प्यावे.
३)बुद्धि व धारणाशक्ती वाढवायला पिकलेल्या कोहळ्याच्या १/४ कप रसात १/२ चमचा ज्येष्टमध उगाळून घालावे व हे मिश्रण रोज सकांळी अनशापोटी प्यावे.
४)४ चमचे कोहळ्याचा रस+ ४ चमचे आवळा रस रोजसकाळीघ्यावाह्यानेथुंकी ,नाक,लघ्वी,
मुळव्याध ह्यातून होणारा रक्त स्त्राव कमी होतो.
५)डोळ्यांची आग होत असल्यास व डोळे लाल होत असल्यास कोहळ्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.
६)वजन वाढवायला ४ चमचे कोहळ्याचा रस +गव्हाचे सत्व १/२ चमचा+ खडी साखर १ चमचा रोज सकाळी अनशापोटी घ्यावे व वर १२ सुर्यनमस्कार घालावेत.
कोहळा अति खाल्ल्यास शरीर स्थूल होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आहारातील या ग्लोबल बदलाचे परिणाम रोग स्वरूपात भोगावे लागणार आहेत हे नक्की. बदलाचे परिणाम आपणा सर्वाना समोर दिसत आहेत. सुदृढ, काटक, कोकणी माणसाची पोटे सुटु लागली. बुद्धीजीवी, बैठे काम करणारा श्रमजीवी शेतकरी, मधुमेहासारख्या आजाराच्या फाईल्स, मोठ्या अभिमानाने डाॅक्टरांच्या टेबलवर आपटून टाकू लागला.
मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र आहे.
आस्यासुखम् स्वप्नसुखम् दधिनी
ग्राम्यौदक आनूपरसाः पयांसी
नवान्न पानं गुड वैकृतम् च
प्रमेह हेतु कफकृत्तच सर्वम् !!
ग्रंथातील या सूत्रातील आनूप या शब्दाकडे लक्ष वेधू इच्छितो. या शब्दाचा अर्थ आहे, पाणथळ प्रदेशातील मांस.
ज्या प्राण्यांच्या हालचाली खूप कमी आहेत, जे प्राणी भरपूर पाणी पितात, ज्यांची प्रकृती कफाची आहे, जे स्वभावतःच जाड आहेत, काहीही व्यायाम करीत नाहीत, मुद्दाम खुराक देऊन वाढवलेले, माजवलेले आहेत, अश्या प्राण्यांचे मांस खाणे हे प्रमेहाचे कारण आहे.
प्रमेह हा मूळ रोग. त्याचे एकुण वीस प्रकार त्यातील कफामुळे होणारे दहा, पित्तामुळे होणारे सहा आणि वातामुळे होणारे चार वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील वाताच्या प्रकारातील एक प्रकार म्हणजे मधुमेह.
हा मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे, काय सावधगिरी बाळगावी, हे सांगताना शास्त्रकारानी खूप छान संकल्पना मांडल्या आहेत. विषय फक्त मांसाशी संबंधीत असल्यामुळे त्याच संकल्पना इथे बघू.
वर वर्णन केल्यापेक्षा वेगळे मांसाहारी प्राणी, म्हणजे जंगली प्राणी. सुक्या कोरड्या जागी रहाणारे, सतत धावणारे, म्हणजे व्यायाम करणारे, गरजेनुसार पाणी पिणारे, अंगावर कमी चरबी असणारे प्राणी. या जंगली प्राण्यांचे मांस आणि आनूप प्रदेशातील प्राण्यांचे मांस यांच्या गुणातील सूक्ष्म फरक द्रष्ट्या शास्त्रकारांनी अभ्यासला होता, निरीक्षण केले होते, कदाचित भविष्यात काय होणार हे त्यांना आधीपासूनच माहीत होते, म्हणूनच एक सावधानतेचा इशाराच जणु त्यांनी देऊन ठेवला होता.
आयुर्वेदात मांसाहार निषिध्द सांगितलेला नाही. हे आपण आगदी पहिल्या लेखात पाहिले होते. मधे मधे पण त्याचा उल्लेख करीतच होतो,
भविष्यात रोग होऊ नयेत, यासाठी कोणते मांस खाऊ नये, हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. हे अश्या प्रकारचे मांस खाल्ले की कोणते रोग होणार यांच्या यादीत प्रमेहाचा, मधुमेहाचा क्रमांक वरचा आहे.
त्याकाळी सूत्र सांगून ठेवले, ते आजच्या काळानुसार अभ्यासले की कोणते मांस खावे आणि खाऊ नये हे स्पष्ट होत जाते.
ज्या प्राण्यांना सतत कोंडून ठेवले जाते, तयार अन्न त्यांना सतत दिले जाते, स्वतःचे अन्न स्वतःच शोधायचे असते, हा नियम न पाळणाऱ्या, म्हणजेच खुराड्यात कृत्रिमरीत्या वाढवल्या जाणाऱ्या पशुपक्ष्यांचे मांस आनूप प्रकारात येते. हे मांस सतत खाल्ले की प्रमेह होण्याची शक्यता काही पटीने वाढते, हे लक्षात येते. प्रत्यक्षातही तसेच दिसते.
या खुराड्यात वाढवलेल्या प्राण्यांचे पोषण मुद्दाम मांस खाण्यासाठी केलेले असते. म्हणून त्यांना दिवस रात्र सतत खायला दिले जाते. त्यांना लहान जागेत ठेवले जाते. जेणेकरून ती हालचाली कमी करतील, व्यायाम होणार नाही आणि नंतर त्यांचे वजनही वाढेल.
पशुपक्ष्यांचे वजन वाढवणे, हाच एकमेव बिझनेस असल्यामुळे खुराडे मालकांना तेच करावे लागते, जे त्यांना सांगितले गेले आहे.
मग ती ब्राॅयलर कोंबडी, बदके असोत वा, बकरे डुकरे असोत.
त्यांचे जास्तीतजास्त वजन कसे वाढेल हेच मालक पहाणार.
पण त्याचा परिणाम पुढे खाणाऱ्यांना भोगावाच लागणार. प्रमेह वाढणार.
तो वाढलेला आहेच, असं जागतिक आरोग्य संघटना अगतिकपणे सांगतेय.
पण इथे विचार करायला वेळ कोणाकडे आहे ?
पैसा फेकला की जसे टाॅनिक विकत मिळते, तसे आरोग्यही विकत मिळते, असे वाटणारी मंडळी काही कमी नाहीत.
सगळेच अगतिक...
वेळेला बांधलेले....
आयुष्याची गती कमी केलेले.....
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
5.10.2016
निषेधार्ह पाणी भाग एक
काही श्लोकांचे अर्थ कळले नाहीत तरी ते द्यावेत असे वाटते. म्हणजे त्याविषयी वाचणाऱ्याच्या मनात शंका रहात नाही.
जसे वाग्भटजी अध्याय क्र.5 मधील श्लोक 13/14 मधे म्हणतात,
नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
पाणडूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।
यांनी पाणी पिऊ नये, कोणी ?
ज्यांचा अग्नि मंद आणि अल्प आहे, ज्यांना गुल्म, रक्ताल्पता, जलोदर, अतिसार, मुळव्याध, संग्रहणी, सूज हे आजार असतील त्यांनी (अतिरिक्त) पाणी (आयुर्वेदीय डिग्रीहोल्डर आणि शुद्ध आयुर्वेदाचीच प्रॅक्टीस करणाऱ्या वैद्यांच्या सल्ल्याशिवाय ) पिऊ नये.
आयुर्वेदाची सरकारमान्य पदवी धारकाकडूनच आयुर्वेदीय उपचार करून घ्यावेत. हे सुशिक्षितांना पण सांगावे लागते, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?
बरं केवळ पदवी असून उपयोगी नाही. ते स्वतःला "वैद्य" म्हणवून घ्यायला लाजत नाहीत असे हवेत. (स्वतःला डाॅक्टर म्हणवून घेण्यात कोणता आनंद मिळतो कोण जाणे ? असो.
प्रत्येकाचा स्वतःकडे किंवा स्वतःच्या व्यवसायाकडे पहाण्याचा विचार वेगवेगळा असू शकतो. )
पदवी आयुर्वेदाची असेलही, पण ते प्रॅक्टीस आयुर्वेदाची करत असतील याची खात्री नाही. म्हणून म्हटले, शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टीस करणाऱ्यांचा सल्ला घ्यावा. माझे काही मित्र म्हणतात, शुद्ध आयुर्वेद हा शब्दच चुकीचा आहे. अशुद्ध आयुर्वेद नसतोच ! पण समाजात बघितले की कळते, राजस्थानी, बंगाली, हिमालयीन जडीबूटीवाले, यांनी आयुर्वेद पोटासाठी अशुद्ध करून ठेवलाय. वैदूंनी जिवंत ठेवलाय, पण सशास्त्र नाही. आणि ज्या शास्त्र जाणणाऱ्यांनी आयुर्वेदाचे संगोपन करायला हवे होते, त्यांनी मात्र आता तरी सवतीभावाने आयुर्वेदाकडे पाहू नये. ही वेळ आयुर्वेद पुनरूत्थानाची आहे.
असो !
वरील श्लोकाचे शास्त्रीय स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास असे सांगता येते की, ज्या रोगांची नावे उल्लेखित केली आहेत, ते रोग तर आहेतच, पण तशाच लक्षणसमुहाचे अन्य रोग देखील जाणावेत, (हे वाक्य अनुक्त प्रकारात येते. अनुक्त म्हणजे, प्रत्यक्ष सांगितलेले नाही, पण यापूर्वी सांगितले असल्यामुळे इथे परत सांगत नाही, असे. )
या रोगांची प्रातिनिधीक यादी बघीतली तर सात व्याधी अन्नवह स्रोतसाशी प्रत्यक्ष संबंधीत आहेत. आणि सूज हे लक्षण रक्त आणि मूत्रवह संस्थेशी निगडीत आहे. म्हणजे पाण्यापासून ज्या अवयवांना विशेष हानी होणार आहे, असे हे अवयव जाणावेत. असे ग्रंथकर्ते वाग्भटाचार्य सुचवतात.
त्यात प्रथम उल्लेख केला आहे, भूक मंद आणि कमी असलेल्यांचा. स्वल्पम् आणि अल्पम् असे दोन वेगळे शब्द ग्रंथकार वापरतात. ते केवळ यमक जुळवून घेण्यासाठी नव्हे !
सध्या भूक म्हणजे काय, असाच प्रश्न पडतो. कारण भुकेची जाणीव व्हायच्या आतच पुढची खाण्याची डिश किंवा डबा समोर येतोय. इतकं अरबट चरबट खाणं अधे मधे होत असतं. ग्रहण केलेले अन्न पचवायला देखील वेळ हवा असतो ना ! तर त्यातून पोषक अंश शरीर तयार करेल. नाहीतर खाल्लेलं अन्नच रोगाच कारण होतंय.
यालाच म्हणतात भस्मासूर उलटणे !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
“शरीर जे करते, ते शरीराच्या हितासाठीच असते. “
ह्या भाजीच्या बाबतीत तशा आपल्या प्रत्येकाच्याच भावना तशा मिश्र कारण हि तसेच आहे म्हणा हि भाजी आपल्या राष्ट्रात तयार होणारी भाजी नसून इंग्रजांनी आपल्या सोबत हिला येताना आणली होती.तशी हि भाजी काही वाईट नाही हं त्याच्या गो-या सायबा सारखी.हो अगदी तुम्ही हिला गच्चीत एखाद्या मोठ्या कुंडीत लावले तरी चांगली किचन गार्डनींगची हौस पुरी करता येईल तुम्हाला.
ह्या कोबीची फुले दिसतात भारी देखणी व चवीला देखील सुरेख लागतात.अगदी सुकी भाजी,भजी,कोशिंबीर,लोणचे सगळेच छान लागते ह्या भाजी पासून बनविलेले.मी तर अगदी झुणका व पराठे सुद्धा बनवून खाते ह्याचे मस्त लागतात.अगदी कांदा नसताना कांदे पोहे खाणे जरा जड जाते ना मग काय कोबी घाला कांद्याच्या बदली व पहा कसे झकास लागतात पोहे ते.
जसा ह्या भाजीचा वापर स्वयंपाकात होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हि भाजी वापरू शकतो.पण प्रथम तिचे गुण पाहूयात.कोबी हा चोवीस गोड थंड व शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करणारा असून वात दोष वाढवितो.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)थकवा जाणवणे,दम लागणे,तोंडास कोरड पडणे,छातीत जळजळ ह्या ५० ग्राम कोबी पाणी न घालता कुकर मध्ये वांफवा व त्याचा रस काढा नंतर त्यात १ चमचा मध व १/२ चमचा जिरेपूड घालून सुर्योदयाच्या वेळी तो रस प्यावा व तासभर काही खाऊ नये.ह्या प्रयोगाने ह्रदयात बळ मिळते.
२)पोट बिघडणे,शौचास भसर होणे,छातीत आग होणे,तोंडास पाणी सुटणे,वजन कमी होणे ह्या तक्रारीकडे १/२ कप कोबी रस+ १ चमचा मध+ १ चमचा गाजर रस हे मिश्रण जेवणा सह थोडे थोडे प्यावे.
३)थंडीत त्वचा रूक्ष होणे,फुटणे,खाजते ह्यात कोबीचा रस व कोथिंबीर रस एकत्र करून त्वचेवर लावावा.
४)लघ्वीची आग होणे,लघ्वी थोडी थोडी होणे,कंबर दुखणे ह्यात १ ग्लास कोबीरस +धणे पूड १ चमचा + २ चमचे खडीसाखर २-३ वेळा विभागून घ्यावे.
५)हिरड्यांतून पू रक्त येत असल्यास कोबीचा रस तोंडात धरून गुळण्या कराव्या व नंतर गाल व हिरड्यांना तीळ तेल लावावे.
कोबी खायचा अतिरेक केल्यास पोटात वात धरू शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
ऊसाची कांडे चरख्यात घालून रस काढताना त्यात आले आणि लिंबू घालतात. रसातील कफ दोष जाण्यासाठी आले आणि चव येण्यासाठी लिंबू. रस काढत असतानाच हे आल्या लिंबाचे तुकडे त्या चरख्यात घातले जातात. पिळ पिळ पिळल्यानंतर त्यातील रस एका ठिकाणी जमा होतो आणि चोथाचिपाड दुसऱ्या ठिकाणी. एक भाग चांगला एक वाईट. सार आणि किट्ट.
तसेच अन्नरस तयार झाला की, त्यातून दोन घटक बनवले जातात. एक चांगला सार भाग दुसरा टाकावू किट्ट भाग. सार भागापासून सात धातुंची निर्मिती केली जाते. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे ते सात धातु. (धातु म्हणजे धातु, मेटल नव्हे.) आणि किट्ट भागापासून मल, मूत्र आणि स्वेद निर्माण होतात. या निर्माण कार्यात सात धातुंचे सात अग्नि, पंचमहाभूतांचे पाच अग्नि आणि मुख्य जाठराग्नि असे एकुण तेरा प्रकारचे अग्नि भाग घेतात. सार भागापासून उत्तम धातु निर्माण कसे केले जाते याचे वर्णन गेल्या वर्षीच्या आरोग्यटीपेमधील अन्नपचन या मालिकेमधे केलेले आहे.
टाकावू भाग जर योग्य वेळी, योग्य मार्गाने शरीराबाहेर टाकला गेला नाही, तर चांगला सार भाग कितीही उत्तम रीत्या तयार झालेला असला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. जसे उसाचा रस काढला जात असताना त्यातील कचरा रसात येऊ नये म्हणून रस दोन वेळा गाळून कचरा वेगळा केला जातो. ऊसाच्या रसापासून गुळ करताना देखील वारंवार त्यातील मळी वेगळी केली जाते, तरच उत्तम प्रतीचा गुळ तयार होतो. म्हणजे कचरा साफ करणारी यंत्रणा देखील तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे.
तसेच अन्नरसातील कचरा, विषारी पदार्थ वेगळे करणारी यंत्रणादेखील शरीरात काम करत असते. यामधे यकृत, वृक्क हे प्रमुख अवयव आहेत. अन्नरसाचे रूपांतर शुक्रापर्यत करीत असताना वेळोवेळी त्यातील टाकावू भाग वेगळा केला जातो. योग्य त्या मलमार्गामधे ( वेशीवर ) आणून ठेवला जातो. घन भाग गुदमार्गाने, आणि द्रव भाग मूत्र आणि स्वेद (म्हणजे घाम ) मार्गाने बाहेर काढला जातो. हिवाळा पावसाळ्यात ऋतु बदलला की, लघवी जास्ती होते आणि उन्हाळ्यात घाम जास्ती येतो. हे बाहेरील ऋतु ओळखून तसे बदल आतमधे करवणारा तो सिंपली ग्रेट !
गावातील गटारे, कचऱ्याच्या कुंड्या, रस्त्यावरील घाण, जर योग्य वेळेला साफ केले गेले नाहीत, तर केव्हाही, साथीचे आजार वेशीवर, घुसखोरीच्या संधीची वाट बघत बसलेलेच असतात. म्हणून ही स्वच्छ भारत यंत्रणा पुनः एकदा नीट लक्ष देऊन कार्यरत करण्यासाठी आपण सगळे झटत आहोत.
जसे देशासाठी, तसेच देहासाठी सुद्धा जागरूक राहीले पाहिजे. जर देशातील आणि देहातील हा कचरा योग्य वेळी, योग्य यंत्रणामार्फत, सदैव जागरूक राहून, देहाबाहेर बाहेर काढला गेला नाही, तर वेशीवरचे राक्षस आत आलेच म्हणून समजा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
30.03.2017
किचन क्लिनिक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेत आहोत. मग सुरूवात झणझणीत मसाल्यांपासून करायची का? आज आपण आले आणि सुंठीची वैद्य ही नवी ओळख पाहूया तर !
आपण सर्वच जण सुंठीचा वापर चहात आणि आल्याचा वापर चहा,चटण्या आणी आपल्या गोव्यात माशांचे सुके बनवण्यासाठी केला जातो. हा कंद जमीनी खाली उत्पन्न होतो, ओला असताना आले आणि वाळवलेली ती सुंठ. पण दोघांचे ही गुण वेगळे बरंका. सुंठ आणि आले दोन्ही चवीला तिखट आणि उष्ण गुणाचे पण गंमत बघाना आले अधिक प्रमाणात खाल्ले तर एॅसीडीटी वाढते तर सुंठ मात्र अपचनाने झालेली एॅसीडीटी कमी करते.
आले:
१)भुक लागत नाही का मग दररोज जेवणापुर्वी साधारणपणे १/२ तास आल्याचा छोटा तुकडा सैन्धव मीठासोबत खा आणी मग बघा पोटातील आगीचा वणवा कसा पेटतो ते.
२)सुका खोकला येत असल्यास एक चमचा आलेरस +२ च ओल्या हळदीचा रस+१ च मध हे मिश्रण घ्यावे.
३)आल्याच्या रसापासून घरगुती आलेपाक बनवा हा सर्दी,खोकला,भुक न लागणे,तोंडास रूचि नसणे ह्यावर रामबाण उपाय.
४)वाढलेले काॅलेस्टरोल सतावतेय का मग सकाळी उपाशी पोटी आल्याचा छोटा तुकडा आणि एक लसूण पाकळी नियमीत खा आणी ह्रूदयाचे आरोग्य चांगले ठेवा.
सुंठ:
१)सुंठी वाचून नाही पण सुंठीने खोकला घालवायचा असेल तर सुंठीची राख मधासह चाटणे खोकला दमा पळालाच म्हणून समजा.
२)शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सुज,मुरगळणे,मार लागणे,ह्यावर सुंठ आल्याच्या रसात उगाळून त्याचा गरम लेप त्या भागावर लावणे.
३)गळू पिकत नसेल तर सुंठपूड आणि खोबरेलतेल एकत्र शिजवा आणी सोसवेल एवढे निवल्यावर त्या गळूवर बांधा.
४)पोटात वात धरणे अथवा वारंवार आव पडणे ह्यावर घरी केलेला सुंठवडा उत्तम काम करतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

आला पावसाळा… असं म्हणत असतानाच विविध आजारही सोबतीला येतात. या आजारांना वेळीच रोखायचं, तर आहारात काही पदार्थांचा वापर वाढवायला हवा. यात आलं, सुंठ आहेत. आणि गवती चहा हे पदार्थ महत्वाचे आहेत.
डॉ. अर्पिता काजरेकर यांचा लेख
Copyright © 2025 | Marathisrushti