ताटात वाढलेलं जेवण ताटातून तोंडात आणि आता पोटात जाणारे. आपल्याला हवं तसं संस्कारीत करून अन्न खाल्ले. घश्यातून जेवढे बारीक होऊन उतरायला हवं तेवढं दातांनी दाढांनी, सुळ्यांनी बारीक केलं. दात दाढा सुळे प्रत्येकाचे काम वेगवेगळे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे, तेवढं काम निमूटपणे करत असतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही भांडणे नाहीत, मलाच मोठे तुकडे बारीक करायचं काम का, मी लहानच तुकडे बारीक करणार. मला नाही ते काम आवडत, मला आपलं एवढंच जमेल, असं कोणताही दंतप्रकार म्हणत नाही. मोठे तुकडे आपोआपच सुळ्यांनी फोडले जातात. फोडलेले तुकडे दाढांकडे येतात, ते बारीक करून झाले की, परत इकडे तिकडे फिरवून काही शिल्लक राहिले नाही ना, याची चाचपणी मधे मधे जीभ करत असते, काही काम बाकी राहिले असेलच तर दात आहेतच. दातांना घट्ट धरून ठेवायला हिरडी आहेच. म्हणजे दात घट्ट हवेत तर हिरड्याही तेवढ्याच मजबूत पाहिजेत. नाहीतर ज्या घराचा पाया कमकुवत असतो, ती घरे कितीही सुंदर टाईल्सनी सजवलेली असली तरी छोटा भुकंप सगळं घर उद्ध्वस्त करून टाकतो, तसं एखादा खडखडा लाडू किंवा चिक्की चा तुकडा देखील, सगळे दात खाली पाडू शकतो.
एकमेकांना पूरक असलेले हे इंजिनियरींग आधी नीट शिकले तर अन्य कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही समस्या सोडवता येतील, असे वाटते.
कोणतेही अन्नावशेष बाहेर पडू नये यासाठी गाल आहेत. ज्यांचे गाल कॅन्सर सारख्या आजाराने काढावे लागलेत, त्यांच्या व्यथा लक्षात घेतल्या की गालाचे महत्व समजते. केवळ गालावर खळी पुरते गाल लक्षात ठेवायचे नाहीत.
ज्या विधात्याने हे सर्व निर्माण केले तो केवढा मोठा स्ट्रक्चरल इंजिनिअर असेल ना !
बारीक झालेले अन्न घश्यातून आत खाली जाऊ शकेल अशी खात्री झाली की, जीभ आपले काम करते. आणि अन्न खाली उतरवले जाते.
ढकलून दिले जात नाही, तर सापाच्या तोंडातून जसे अंडे हळुहळू आत सरकवले जाते, तसा अन्नाचा गोळा आत लहरीप्रमाणे सरकवला जातो.
अगदी अलगद लहरेदार !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.03.2017
March 27, 2017
आतमधे साधं मोबाईलवर बोलत बसलो तरी जे तोंड उघडं रहातं, तेवढा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त. त्यामुळे भलाई यातच आहे की रिकाम्या हातानी आत जावं आणि लगेचच रिकामं होऊन यावं.
February 16, 2018
आपण सर्वच जण वाळा ह्या वनस्पतीला ओळखतो.पुर्वीच्या काळी राजे महाराजे ह्यांना वाळ्याच्या पंख्यानी वारा घालत असत. तसेच वाळ्याचे सरबत हे देखील बऱ्याच जणांना आवडते.चला तर आता ह्या वाळ्याची आपण पुर्ण ओळख करून घेऊयात.
वाळ्याचे तृणमूल असून काण्ड १-१.५ मी उंच व सुगंधी असते.ह्याची बेटं असतात.ह्याची पाने २५-५० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असतात.हि सरळ असून वरच्या भागात गुळगुळीत व पृष्ठ भागी रोमश असतात.फुलाचा देठ १०-३ सेंमी लांब असून मुळ सुगंधी असते ते वाळल्यावर सुगंध वाढतो.
ह्याचे उपयुक्तांग मुळ असून वाळा चवीला कडू,गोड व थंड गुणाचा व हल्का आणी रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर अाहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)त्वचारोग व अतिघाम येणे ह्यात वाळ्याचा लेप करतात.
२)वाळा अतिसारात आमपाचक म्हणून चांगले कार्य करतो.
३)वाळा तापामध्ये देण्यात येणाऱ्या षडंगोदकात वापरतात.
४)वाळा दाहनाशक असल्याने दाहात साखरे सह वापरतात.
५)वाळा मुत्रल असल्याने मुत्रदाह व लघ्वीच्या त्रासात तांदुळाचे धुवण व साखरे सह वापरतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2017
चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते.
म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते.
लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही.
ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे कळते.
एका लिंबाचे आठ भाग केल्यावर त्यातील एक भाग पानावर वाढून घ्यावा. हे प्रमाण आहे. हवाच असेल तर जास्तीचा आणखी एक भाग. पण अर्धे किंवा एक लिंबू एकावेळी घेतले गेले तर ? आणि असे रोज !!! नक्कीच त्याचा त्रास होणार. असे अति करणारे रूग्ण अवस्थेत लवकर येतात. यासाठी ग्रंथांचा आणि व्यवहाराचा तौलनिक अभ्यास असणे महत्वाचा आहे.
आंबट चवीमुळे पोटातील पाचक स्राव वाढतात. चिंच आठवली तरी तोंडाला पाणी सुटते. साहाजिकच भूकही वाढते.
वाताला शरीराबाहेर यायला मदत करणारा असतो. याला अनुलोमक असे म्हणतात. पण हा आंबट रस पित्ताला आणि कफाला थोडा वाढवतोच. लिंबाचे सरबत घेतले तर काही जणांना पित्त वाढल्याचे जाणवते, तर काही जणांना पित्त कमी झाल्यासारखे वाटते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते ना ! आंबट अति झाले तर रक्तपित्तासारखे आजार वाढतात.
ह्रदयाला हितकर असा हा आंबट रस अन्नपदार्थांची चवही वाढवतो. वरणभातावर पिळलेले लिंबू आठवतेय ना किंवा झणझणीत मिसळीवर पिळलेले लिंबू. व्वा! लिंबाचा वास येण्यासाठी मात्र लिंबू ताजेच हवे.ताज्या लिंबाच्या सालीतून येणारा विशिष्ट तेलाचा वास हा पण औषधी असतो. त्याची स्वतःची अशी वेगळी चव लागते. वरणभात असो वा मिसळपाव लिंबाशिवाय तृप्ती होत नाही. पूर्णत्व नाही.
ह.
आंबट चव ही तृप्ती करणारी सांगितली आहे.
अति प्रमाणात आंबट चव ही नुकसान करणारी असते. पेशींमधली बंधने लवकर मोकळी करतो. सैल करतो. त्यामुळे शरीराचा घट्टपणा निघून जातो. तेलाने ओषट झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून, लिंबाच्या साली वापरल्या जायच्या. किंवा जेवताना हाताला लागलेला तेलाचा कट जाण्यासाठी लिंबाची फोड बोटांना चोळली जाते, ती याच गुणाचा आधार घेऊन !
अतिसर्वत्र वर्जयेत !
आवडते म्हणून रोज पाणीपुरी खाणे, आंबट साॅस खाणे, आंबट चीज खाणे, व्हिनीगर घातलेले सूप पिणे, बाजारी लोणचे खाणे, इ.इ. हे काही रोगलक्षणे वाढवतात, ते या आंबट चवीच्या अतिरेक केल्यामुळे !
जास्त आंबट खाल्ले जात असेल तर डोळ्यांचे आजार, घश्याचे जीभेचे आजार, ताप येणे, चक्कर येणे, खाज येणे, सूज येणे, रक्ताचे कमी होणे, किंवा रक्तासंबंधी आजार वाढतात. अंगावर उष्णतेचे फोड येणे, पित्ताचे व्याधी असतील तर जरा जास्तच खबरदार असावे.
पण घाबरून जायचे कारण नाही, या आंबट पदार्थांचा वापर युक्तीने केला तर फायदा होतो. त्या युक्तीसाठी वैद्याचा सल्ला घ्यायलाच हवा.
आवडत असेल तर आंबटगोड खावे, पण फार आंबटशौकीन नसावे
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
02.11.2016
November 2, 2016
कोणी छानसा विनोदी चुटकुला सांगितला आणी सगळे जण हसायला लागले कि त्या व्यक्तीला दाद देण्यासाठी म्हटले जाते कि तुमच्या विनोदाने तुम्ही छान हास्याची खसखस पेरलीत.तर असा हा गरम मसाल्यातील पदार्थ.खरे तर ह्या अफूच्या बोंडामधील बिया होय पण ह्या मात्र अफूच्या प्रमाणे मादक नसतात.
खसखसचा उपयोग गरम मसाल्या मध्ये,तसेच खीर मिठाई इ पदार्थ बनवताना केला जातो.साधारण रव्या प्रमाणे दिसणारी हि खसखस देखील आपण घरगुती उपचारांमध्ये वापरू शकतो बरे का!
खसखस हि चवीला गोड,थंड असून शरीरामध्ये वात कमी करते व कफ दोष वाढवते.चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?
१)संडास मधून आव पडत असेल तर चमचाभर खसखस दह्यात वाटून खावी.
२)खसखस,बदाम,चारोळी,समभाग घेऊन वाटावी व तिची गाईच्या दूधात खीर करावी त्यात १ चमचा साजूक तूप व १ चमचा गुळवेल सत्व आणी थोडी खडी साखर घालून हि खीर अशक्त व्यक्तीने खाल्ल्यास शरीरात ताकद वाढते.
३)काही व्यक्तींच्या डोक्यात केसांच्या मूळांशी बारीक फोड येतात त्यांनी दुधामध्ये खसखस वाटून केसांच्या मुळाशी लावून दोन तास ठेवून मग केस धुवावे.
४)पुष्कळ सुका खोकला येत असेल तर १ चमचा खसखस गाईच्या दुधात शिजवून खीर करावी व हि खीर गरम असताना खावी उपशय मिळतो.
५)सोमरोग अर्थात काही स्त्रीयांना लघ्वीच्या मार्गातून सारखे पाणी जात असते त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्यांना अशक्तपणा येतो ह्यामध्ये मुठभर खसखस रात्री पाण्यात भिजत घालावी व सकाळी वाटावी नंतर त्यात २ चमचे लोणी+ १ चमचा खडीसाखर + १/२ चमचा वेलची पूड घालून हे मिश्रण तिला सतत किमान तीन ते सात दिवस खायला द्यावे.
खसखस अतिप्रमाणात खाल्ल्याने मद वाढून अति झोप येऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 23, 2016
आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले आहे. बाहेरील उष्णतेमुळे अंगातील पाण्याची पण वाफ होत असते. घाम येत असतो. पाणी कमी होत असते. पाणी कमी झाले तर नाजूक अवयवांना त्रास होतो, म्हणून पाणी भरपूर प्यावे असे आजकाल डाॅक्टरमंडळींकडून सांगितले जाते. बरोबर आहे, काही चूक नाही. पाण्याला जीवनच म्हटले आहे. पण अति तिथे माती हे पण विसरून चालणार नाही.
आपल्या शरीराला बरोबर कळते, आपल्याला पाणी किती हवे आहे ते. तेवढी तहान शरीर निर्माण करते. तेवढं पाणी जरूर प्यावं.
आपण जिथे रहातो, तेथील हवामानानुसार आपली तहान कमी जास्त होत असते. जमिनीनुसार धान्यातील द्रव्य, भाज्यांमधील क्षार बदलत असतात.
वाळवंटी प्रदेशात रहाणारा उंट एकदाच पाणी पिऊन घेतो. तेथील वनस्पतींना पाणी उत्सर्जित करणारी पाने कमी असतात. काटे जास्त असतात. त्यानेपानांचे देठ पाणी साठवण्यासाठी योग्य असे जाडजूड केलेले असतात. !
तेथील अरब लोक पायघोळ पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतात, जे उष्णता फेकून देणारे असतात.
इथे प्रत्येकातला तो वेगळा आहे. म्हणून प्रत्येकाची तहान वेगळी आहे. प्रत्येकाची गरज वेगळी आहे. जे उन्हात काम करतात, त्यांना पाणी जास्त लागेल. जे सावलीत काम करतात, त्यांना पाणी कमी लागेल, जे एसी मधे काम करतात, त्यांना पाणी लागणारच नाही.
इथे प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत.
एक नियम पाण्याविषयी सांगितला जातो. तो म्हणजे 30 मिली पर केजी बाॅडी वेट. म्हणजे एक किलो वजनाला सर्वसाधारणपणे 30 ते 40 मिली पाणी प्यावे. नियम केला कि तो युनिव्हर्सल असावा. आणि नियम पाळण्यासाठी करावा. टाळण्यासाठी नको.
पण हा पण नियम, नियम म्हणून पाळू नये. कारण, मी सत्तर किलो वजनाचा आहे. सकाळ पासून सायंकाळच्या सातपर्य॔त एसी मधे बसून काम करतोय. आणि त्याचवेळी सत्तर किलो वजनाचा एक हमाल रस्त्यावर ओझे वाहातोय.30मिली /किग्रॅ. या नियमानुसार या हमालाने फक्त 2100 मिलीच पाणी प्यायचे, आणि गरज नसताना मी पण एवढे एकवीसशे मिली प्यायचे ?
हे दोन्ही चुकच आहे.
इथे प्रत्येकाची गरज वेगळी आहे.
मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रातील वैश्विक नियम मात्र इथे आरोग्यशास्त्रातील पाण्यालादेखील तंतोतंत लागू पडतो !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.12. 2016
December 11, 2016
अन्न, अथवा पाणी गिळताना अडचण येत असल्यास, अन्न वर येत असल्यास, सारखी उचकी लागत असल्यास किंवा आवाजामध्ये झालेला एकदम बदल म्हणजे बेरियम स्वॅलो करण्यास आमंत्रण.
October 2, 2010
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 29
नैवेद्यम् समर्पयामी-भाग तीन
नैवेद्य करताना सोवळ्यातच करावा, असा दंडक आहे.
नेमके सोवळे म्हणजे काय हो ? पीतांबर ? रेशमी वस्त्र? की धूतवस्त्र ? की आणखीनच काही ? आणि काय आवश्यकता आहे या सोवळ्याची ? त्याच्यावर काय फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे काय ?
कधीच नव्हती, कधीच नाही, कधीच नसावी.
सोवळे म्हणजे शुद्धता. स्वच्छता.
आपण जे स्वच्छतेचे नियम पाळतो ते जरा कडक केले तर शुद्धता मिळते. नेहेमीच्या वापरातील कपडे आणि सोवळ्यातील कपडे, वेगवेगळे ठेवण्याचे हेच एकमेव कारण. आपण बाहेर हवे तसे फिरतो. बाह्य वातावरणातील जीवजंतु आपल्या अंगाखांद्यावर, हातापायावर बसतात, आपल्याबरोबर ते आपल्या घरात येतात. स्वयंपाकघरात येतात. अन्नापर्यंत पोचतात. आणि अन्नातून आपल्या पोटातही जातात. जीवजंतुंचा, अन्न आणि आहार ते आपले शरीर अवयव, हा प्रवास जेवढा टाळता येईल, तेवढा टाळला जावा, यासाठी हे सोवळे ! काय चूक आहे असे सोवळे पाळण्यात ?
बाहेरून घरात आल्यावर हात पाय धुवुन कपडे बदलून घरात यावे असा कडक नियम एकेकाळी ब्राह्मण घरात होता. मी जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करतोय. काही कर्मठ ब्राह्मण घरात तर बाहेरून आल्यावर कपडेच काय, जे बरोबर आणलेले सामान, वस्तु,भेटी, पिशव्या, भाजी, जेवढे धुता येईल तेवढे सर्व धुवुन घेतले जायचे. का ? कशासाठी? एवढा कर्मठपणा आवश्यक होता का ? उलट गत कालापेक्षा आताच्या कालात असा कर्मठपणा घरात आणला तरी पन्नास टक्के आजार कमी होतील. आमच्या सौभाग्यवती नोटादेखील धुवुन घेतात, कारण विचारले तर सांगतात, "लोक नोटा मोजताना थुंकी लावून मोजतात, या नोटा खाटीकखान्यातून आल्या असतील तर मांस लागलेले असेल, मासळी बाजारातून आल्या असतील तर रक्त लागलेलं असेल, रस्त्यावर ही नोट पडलेली असेल तर तिथली घाण लागलेली असेल, म्हणून मी त्या नोटा धुते." काय चुकले तिचे ? ( मनात म्हटलं दोन हजाराची नोट फक्त धुवु नकोस, रंग जातो म्हणे !जोक अपार्ट,) पण हे सोवळे नव्हे काय ?
बाजारभर फिरायचे आणि घरात, अगदी स्वयंपाकघरात देखील तसेच त्याच बूटांनी फिरायचे ? बूट काढले तर साॅक्सची घाण म्हणे घरात येते. एवढे सोवळे कळते तर स्वच्छता कोणी ठेवायची ? बूट साॅक्स, बाहेरचे कपडे यावर जी घाण आहे ती घराबाहेर ठेवावी. हातपाय धुवून आत यावे, एवढे सुद्धा समजत नाही ?
आणि स्वयंपाकघरात तर आंघोळ केल्याशिवाय जायचेच नाही, समजा चुकुन गेलात तर कशालाही स्पर्श करायचा नाही. हे पण सोवळेच. देवघरातील गोष्टच वेगळी!
देवघरात पूर्वीच्या काळी वर्षाच्या बेगमीची लोणची, सांडगे कुरडया, पापड, मुरांबे, गुलकंद आदि "आयसोलेट " करून ठेवलेले असायचे ! हे पण सोवळेच ! तिथे तर आणखीनच कडक सोवळे. नेहेमीच्या धुतलेल्या वस्त्राने पण तिथे जायचे नाही. आंघोळ झाली की तडक देवघरात जाऊन तिथेच ठेवलेले सोवळे नावाचे वस्त्र नेसायचे. त्यानंतर कश्याकश्यालाही स्पर्श करायचा नाही. आणि देवपूजा नैवेद्य सर्व कर्मकांड पार पडायचे. हे सर्व कर्मकांड ब्राह्मण घरात इमाने इतबारे व्हायचे ! काय ही स्वच्छता, हे सोवळे चुकीचे होते ?
या देवासाठी नैवेद्याचा स्वयंपाक देखील सोवळ्यातच व्हायला हवा, असा दंडक चुकीचा होता का ? जे जे देवासाठी ते ते देहासाठी या नियमानुसार, जर देवाला शुद्ध आणि सात्विक लागते तेच आपणाला सुद्धा.
आणि काय हो,
आज डाॅक्टर मंडळी सांगतात, कुत्रा मांजर या प्राण्यांपासून लांब रहा, त्याना "टच" करू नका, त्यांच्या अंगावरील केसापासून तुम्हाला अॅलर्जी होईल, दमा चाळवेल, तेव्हा तुम्ही मान्यच करता ना कि या प्राण्यांच्या अंगावरील जे काही अदृश्य जीवजंतु, "अॅलर्जिक सबस्टन्स " आपणाला पुढे जाऊन त्रास निर्माण करू शकेल, त्यापासून सावध राहिलेले बरे. ही "प्रिकाॅशन" घेणे म्हणजेच सोवळे.
ऑपरेशन थिएटरमधे एखाद्याचे शस्त्रकर्म करायचे असेल तर तिथे कोणाला प्रवेश असतो ? नन अदर दॅन डाॅक्टर अॅण्ड सिस्टर्स. फक्त नर्स आणि डाॅक्टरच तिथे जाऊ शकतात. का ? आम्ही का नाही जाऊ शकत ? तर आपण त्या ऑपरेशन थिएटरमधील नर्स आणि डाॅक्टरांसारखा "स्टरलाईझ्ड ऑटोक्लेव्हड" पोशाख घातलेला असत नाही, हे एक कारण असते.
अरे, म्हणजे आज "ऑपरेशन थिएटर" मधे देखील सर्व डाॅक्टर सोवळ्यातच असतात म्हणा की !
हो.
हे सर्व डाॅक्टर्स ऑपरेशन थिएटरमधे सोवळे नेसलेले अगदी कर्मठ ब्राह्मणच असतात, मग त्यांची जात काही का असेना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.06.2017
June 22, 2017
स्वयंपाकघरात मधे वाढलेली राईस प्लेट थेट टेबलावर आणून समोर ठेवणे आणि टेबलावर ताट ठेवून एकामागून एक पदार्थ आणून वाढणे, यात फरक आहे. पदार्थ कोणत्या क्रमाने वाढले जातात, त्या क्रमालाही महत्व आहे. सुरवात लिंबू मीठाने करून शेवट वरणभातावर वाढलेल्या तुपाने करावा. तूप वाढून झाले की बसलेल्यांनी समजावे, आता वाढायला येणारी आणखी कोणी नाही. आता फक्त "हर हर महादेव" म्हणून आक्रमणाला सुरवात करायची, एवढे समजले तरी पुरे.
ताटात जसजसा एक पदार्थ येत जातो, तस तसा डोळ्यांनी म्हणजे चक्षुरेंद्रियांनी, घ्राणेंद्रियांनी म्हणजे नाकाने वास घेत त्याची वार्ता आतमधे पोहचवलेली असते. बाकी सगळे अगदी तैय्यार असतात. प्रत्येक पदार्थ वेगळा वाढल्यामुळे प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण अगदी उत्तम करता येते.
मीठ वाढताना त्याची सूक्ष्म चव आपण अनुभवतो, लिंबू वाढताना, त्याच्या रसाचा फवारा आपल्या तोंडात उडायला सुरवात होते, पापड वाढताना त्याचा कुर्रकुर्र आवाज कानात नाद निर्माण करतो. भजी आल्यावर त्याचा खमंग वास चोंदलेलं नाक सैल करून टाकतो. लालबुंद रस्सा डोळ्यांनी बघताक्षणी पोटात भूक चाळवायला सुरवात झाली नाही, तरच नवल.
(काहीजण एवढे चाळवतात, की वाढला पापड झाला गट्टम, कोशिंबीर पुढच्या पानात वाढायच्या अगोदर ही संपली सुद्धा. वाढली भाजी खाऊन टाकली. याला पंगत म्हणत नाही. त्याचेही काही भारतीय नियम असतात, तेही "मॅनर्स" पाळलेच पाहिजेत. थोडा संयम हा हवाच. तरच "सहना ववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम्, यातील सह ला महत्व आहे. ) असो.
तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड त्याच्या आवाजाने, पुरणपोळी आपल्या स्पर्शाने, भजी आपल्या वासाने, चटणी आपल्या चवीने, आणि सुंदर रंगसंगतीने, असं छान वाढलेलं, पदार्थांनी भरलेलं ताट, बघताक्षणी डोळ्यांचेही पारणे फिटते. म्हणजे डोळ्यांनी ते पचवायला सुरवात केलेली असते.
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या तन्मात्रा या परिपूर्ण आहारात एकवटलेल्या असतात. केवळ कॅलरीज मोजून जेवणे, वजनी प्रमाणात जेवणे, याला चौरस आहार म्हणता येईल का, विचार करून पहावे.
एकापेक्षा एक उत्तम पदार्थांचे एकमेकांमधे एकत्र झालेले वास. आणि आग्रह करून, प्रेमाने वाढणाऱ्यांचा सहवास यामुळे अग्निवृद्धी आपोआपच होत जाते. कधी एकदा ताटातले हे उत्तम पदार्थ पोटात जातात असे होऊन जाते.
हे सर्व मीच अगोदर अनुभवणार अशी जणु काही स्पर्धाच लागते सगळ्या इंद्रियामधे.
जो जे वांछील तो ते लाहो, अशी अनुभुति इंद्रिये घेत असतात, तो आनंद शब्दात वर्णन करणं अशक्यच आहे. याचा दृष्य परिणाम म्हणून हर हर महादेव चा गजर होण्याअगोदरचा कल्ला, पुढील पाच मिनिटांसाठी पूर्ण बंद झालेला असतो. निमूटपणे सर्वजण आतील प्रज्वलीत अग्निनारायणाला एकेका पदार्थाची आहुती देत असतात.
पंचहाभूतात्मक आहार, पंचमहाभूतात्मक शरीरासाठी, पंचमहाभूतांच्या तन्मात्रांसह...
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
18.03.2017
March 18, 2017
जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी
भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी,
प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण,
आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन.
August 31, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti