
वरूण चवीला कडू,तुरट,तिखट व गोड असून उष्ण गुणाचा व हल्का व रूक्ष असून तो प्रभावाने रक्तदोषनाशक व अशमरीभेदक आहे.ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने व मुळ.वरूण वातनाशक व कफनाशक आहे.
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस
बाबा सांगतात...
हितकारक, थोडे, गोड, सत्य, आणि प्रसंगोचित संभाषण करावे.
संभाषण कसे असावे तर हितकारक असावे, थोडे कमीच बोलावे, पण सत्य बोलावे, गरज असेल तेव्हा मौन सोडावे.
प.पू.स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या प्रमाणे "मित मधु भाषण" असावे.
श्रीकृष्ण बोलतात तसे बोलावे. थोडे गोड, थोडे सत्य ! जिथे जसे आवश्यक असेल तसे. प्रसंगोचित.
कसे बोलावे, याची इतिहासातील काही उदाहरणे लक्षात ठेवण्यासारखी आहेत.
विदुराने सांगितलेली विदुरनीती,
औरंग्याच्या दरबारातील शिवरायांनी दरबाराचा मान कसा राखायचा असतो, याबाबत राजा औरंगजेबाची त्याच्याच दरबारात केलेली कानउघाडणी,
शिवरायांच्या वकीलाने अफजलकडे जाऊन केलेली यशस्वी बोलणी,
रावणाच्या दरबारात जाऊन, सीतामाईना सोडून द्यावे अश्या अर्थाचे अंगदाचे बोलणे,
मुक्ताबाईनी ज्ञानेश्वरांना सांगितलेले ताटीचे अभंग, किंवा चांगदेव पासष्टी,
रामरायांनी वनवासात जाऊ नये याकरीता भरताने केलेली विनवणी आणि त्यावर श्रीरामांनी केलेले खंडन,
युद्ध नको म्हणून सांगायला श्रीकृष्ण कौरवांकडे गेला, ती प्रसिद्ध कृष्णशिष्टाई.
आणि अर्जुनाने युद्ध करावेच यासाठी श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता
ही सर्व उत्तम संवादाची उदाहरणे आहेत. मुद्दाम सांगण्याचे कारण आता ही उदाहरणे आपल्या शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली आहेत. ती मुळातून आपण अभ्यासावी आणि मुलांना शिकवावी.
संवाद शब्दांनी वाढतो. मनात काय आहे, हे सुरांवरून कळते. काय करायला हवे हे देहबोलीतून कळते. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून समाधान मिळते.
या सर्वांचा आरोग्याशी संबंध काय, असे मनात येणं साहाजिकच आहे.
पुनः एकदा सांगतो, आपल्याला फक्त शारीरिक संतुलन म्हणजे आरोग्य, या संकुचित कोशातून बाहेर यायचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यासाठी हे गुण अंगी असावेच लागतात.
आपल्याला काय होतंय, हे जर रूग्णाला सांगताच आले नाही तर, वैद्याला रुग्णाच्या वेदना समजणार तरी कश्या ? जर आपल्याला काय होतंय हे सांगता येत नसेल तर घरी असताना शांतपणे एका कागदावर अथवा वहीत लिहून काढावे. त्यावर तारीख, वेळ लिहावी, शक्य असेल तर त्रास होण्याअगोदर चार पाच दिवस आपण काय काय खाल्ले होते, कुठे फिरलो होतो, त्याचा त्रास झाला होता का, इ. गोष्टी पण लिहून ठेवाव्यात. जर ही सर्व माहिती आपल्याला, वैद्यांना नीट सांगता आली, तर वैद्यांना निदान करणे सोपे होते.
आपल्यालाच नंतर भविष्यात ही आरोग्यवही, (खरंतर अनारोग्यवही) उपयोगी ठरणारी असते.
रुग्णापेक्षा वैद्यांकडे ही संभाषण चातुर्य असले पाहिजे. योग्य प्रश्न विचारून रुग्णाला काय होते आहे, हे त्याच्याच तोंडून वदवून घेणं ही वैद्याची कला आहे.
(म्हणजे रुग्णाला पोपट बनवायचे !! )
विशेषतः पथ्य अपथ्य ठरवताना, रुग्णाचा आधीचा इतिहास समजावून घेणं, वैद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ज्या भाषेत वैद्य शिकलेला आहे, त्यापेक्षा रुग्णाची भाषा कोणती आहे, त्याला समजेल अशा भाषेत त्याला त्याचा रोग समजावून सांगता यायला हवा. त्याच्या बरोबर संवाद साधता यायला हवा. आजच्या भाषेत सांगायचे तर रुग्णाचे कौन्सिलिंग म्हणजे संवाद ! बरं हा संवाद साधत असताना आपली देहबोली म्हणजे हावभाव पण महत्त्वाचे असतात.
औषधांपेक्षा शब्द हे जास्ती गुणकारी असतात. कारण औषध फक्त पोटापुरते शरीरापुरते असते. शब्द हे त्यापलीकडील मनापर्यंत पोचतात. स्थूलापेक्षा सूक्ष्म हे जास्ती क्षमतेचे असते.
मनापेक्षा सूक्ष्म आत्मा. त्याच्याशी होणाऱ्या या आत्मसंवादाला शब्दांची पण गरज नसते. तिथे, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ही अनुभुति असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग चार
काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे... चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. बरं पाणी कमी प्यायले तर अंगाचा भडका होईल, एवढी उष्णता वाढते. करायचे तरी काय ? आणि जेवायचे तरी कधी ?
बरं औषध बंद करायची पण भीती वाटते, न जाणो चुकुन काही झाले तर ? कोणतातरी रिपोर्ट वाढला, कमी झाला तर ? रोगाविषयी एवढी भीती निर्माण करून ठेवली जाते की, औषधांचे दुष्परिणाम झाले तरी चालतील, किंबहुना ते गृहीतच धरले जातात.
भारत सरकारने जीवनावश्यक म्हणून अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात फक्त दीडशे ते दोनशे औषधे प्रकारची औषधे असतील. पण मार्केटमधे आज किमान पन्नास साठ हजार प्रकारची मिश्र औषधे विकली जात आहेत. ब्रुफेन सारखी काही औषधे तर प्रगत राष्ट्रामधे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच बॅन झालेली आहेत. पण भारतात मात्र ही औषधे आज भी धडल्ले से बेची जा रही है. डाॅक्टरांच्या चिठीशिवाय काऊंटरवर सुद्धा विकली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सावध आपणच रहायला हवे. सरकार तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार ना ?
औषधकंपन्याचा प्रचंड नफा हे या मागील खरे राजकारण आहे. जेनेरीक मेडीसीन आणि कंपन्यांनी बनवलेल्या औषधांच्या दरामधे असलेला फरक लक्षात घेतला, की समजेल किती नफा कंपन्या मिळवतात ते !
येनकेण प्रकारे औषधे विकायची त्यासाठी वाट्टेल ते प्रकार अवलंबायचे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.
असो.
एक विनोद म्हणून सांगावासे वाटते. आजारी पडलो की, डाॅक्टरांकडे जायचे, त्यांची जी फी असेल ती फी कुरकुर न करता द्यायची, कारण डाॅक्टर जगला पाहिजे. सांगितलेल्या सर्व तपासण्या करायच्या, कारण पॅथाॅलाॅजिस्ट जगला पाहिजे. परत डाॅक्टरांकडे जाऊन जी औषधे लिहून दिली जातात, ती केमिस्ट कडून विकत आणायची, कारण केमिस्ट जगला पाहिजे.
आणि...
....... आणलेली सर्व औषधं तशीच ठेवून द्यायची कारण........
.....
....
...
..
.
आपण जगलो पाहिजे.
विनोदाचा भाग सोडला तर परिस्थिती फार गंभीर आहे. नवीन औषधे शोधून शोधणार तरी किती ? मुळ द्रव्ये तर तेवढीच आहेत. त्यातील मुलद्रव्यांमधे, थोडाफार तर तम भावात फरक करून नवीन औषध करण्या पलीकडे गाडी पुढे जात नाहीये. मंदी येऊ नये, यासाठी सुद्धा काही वेळा विशिष्ट रोगाविषयी "हॅवाॅक" निर्माण केला जातो. याच्यामागे देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे भीती निर्माण करायची आणि आपला माल खपवायचा !
हे लिहिलेलं सुद्धा काहीजणांना "अति" कॅटेगरीमधील वाटेल. पण शेवटी सत्य कटू असते. कुठेतरी कोणाला तरी बोचणारच !
इलाज नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.04.2017
जेवण सकाळी आणि सायंकाळी करावे ?
काहीतरीच सांगताय राव ! ही काय जेवायची वेळ आहे ? भूक तर लागली पाहिजे ना ! आमचं सकाळचा नाश्ता खाल्लेलाच पचत नाही, तर जेवायचं कुठुन ?
यासाठी काही मुलभुत गोष्टी समजून घ्याव्या लागतील. आज जे काही सांगितले जातेय, ते कितपत योग्य आहे ते आधी ठरवावं लागेल.
दर दोन तास किंवा चार तासांनी सतत खात रहा, असे आज डाॅक्टरांकडून सांगितले जाते, नाहीतर म्हणे अॅसिडीटी वाढेल म्हणून खावे, असेही सांगितले जाते, असे रुग्ण सांगतात, डाएटीशियन तेच सांगतात, जिम इन्स्ट्रक्टर तेच सांगतात. मुळात प्राॅब्लेम इथेच सुरू होतोय. ज्यांना आरोग्य माहिती आहे त्यांना आहारशास्त्राची माहिती नाही. ज्या डाएटीशियनना आहारशास्त्र माहिती आहे, त्यांना आरोग्याची काहीही कल्पना नाही. आणि जिम इन्स्ट्रक्टरना फक्त प्रोटीन डाएट खपवणे एवढेच माहिती. बाकी त्यांना ओकी ठो माहिती नाही. पण आयुर्वेद तज्ञांना त्यांच्या सिलॅबसमध्ये दोन्ही शास्त्र शिकवली जातात. हेच आयुर्वेदाची प्लस बाजू.
आयुर्वेदात आहाराविषयीचे एक अत्यंत मह्त्त्वाचे सूत्र सांगितले जाते, ते म्हणजे "भूक असेल तेव्हा जेवावे, नसेल तर खाऊ नये." या सूत्राचा आधार घेऊन असे निश्चित सांगता येईल कि दर दोन चार तासांनी भूक नसली तर अजिबात खाऊ नये.
गॅस पेटलेला असेल तरच वर अन्न शिजेल ना. गॅस पेटलेलाच नसेल तर ? चमचाभर पाणी सुद्धा गरम होणार नाही. बरोबर आहे ना ? भूक नसताना जेवले तर अजीर्ण होईल. मग जेवायचेच कशाला ? सकाळ असो वा संध्याकाळ दुपार असो वा रात्र भूक नसताना अजिबात जेवू नये.
आयुर्वेद म्हणतो, वेगान् न धारयेत्
वेगान प्रवृत्तयेत् ।
शरीराकडून निर्माण केलेला वेग अडवू पण नये, किंवा त्याच्या मुद्दाम विरोधात जाऊ नये.
मग आज असे उलटे आणि चुकीचे का सांगितले जाते ?
ते मी कसं सांगू? मी सांगितले तर ते चुकीचे होईल ना.
तो नास्ति मम अधिकारः ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.02.2017
पानामधले महत्त्वाचे घटक झाले. पान, चुना, कात आणि सुपारी. हे सर्व पदार्थ एकमेकांना पूरक आहेत. यातील प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण हे पदार्थ जेव्हा चावले जातात, एकमेकात मिसळले जातात, आणि सर्वात महत्त्वाचे, चघळले जात असताना, त्यात लाळ मिसळली जाते, तेव्हा या सर्वांचे मुलभूत गुणधर्म थोडे बदलून सौम्य होतात.
प्रत्येक देवाचा नैवेद्य वेगळा !
ज्याचे जे वैशिष्ट्य तसा त्याचा नैवेद्य !
जसे, गणपतीला तूप आणि मोदक.
मोदकच का ?
मोदकाचे सारण गुळ आणि खोबरे.
गुळ आणि खोबरे आणि त्यावर साजूक तूप हा उत्तम बुद्धीवर्धक योग आहे.
गुळामुळे रक्तपेशी वाढायलाही मदत होते. सर्वात पहिला रस धातु तयार होण्यासाठी, गेलेला थकवा लगेचच परत मिळवण्यासाठी, गुळ मदत करतो.
रिकाम्या पोटी पाणी पिऊ नये, प्रवासामुळे आलेला थकवा नाहीसा व्हावा, म्हणून एकेकाळी आपल्याकडे गुळपाणी द्यायची पद्धत होती. (आजकाल पाहुण्यांच्या समोर विषाने भरलेली काळ्या कोल्ड्रिंक ? ची ठंडा बाटली आदळली जाते. )
अर्थात गुळ सेंद्रीय पद्धतीने बनवला गेला पाहिजे. आणि ऊस देखील रासायनिक खतांचा वापर न करता पिकवला गेला पाहिजे. तरच त्याचे अपेक्षित औषधी गुण दिसतील नाहीतर, गुण नको पण दुष्परिणाम आवर असे म्हणण्याची वेळ आज आली आहे.
जसे पाण्याला जीवन असे म्हटले आहे. पण शुद्ध स्वरूपात असेल तर शिशाच्या किंवा गंजलेल्या टाकीतील पाणी, शिळे पाणी, क्लोरीनयुकत पाणी, सतत झाकून ठेवलेले पाणी हे जीवन कसे ठरेल ?
असो. !
खोबरं म्हणजे नारळ.
याबद्दल अपशब्द बोलायचे कामच नाही. उत्तम स्नेह, उत्तम केश्य म्हणजे केसांचे पोषण करणारा, उत्तम मल विबंधनाशक, उत्तम तर्पक म्हणजे , रसधातूचे पोषण करणारा, कठीण कवचातला असल्याने कॅल्शियम सारखे घटक वाढवणारा, पचनाला मदत करणारा............... श्री सत्यनारायणाची कशी सहस्त्रनामे आहेत, तशी या नारळाची देखील, गुणावरून, कर्मावरून, शंभर नावे सहज करता येतील, कोणत्याही नावानी हाक मारा, तो पावणारच.
त्याच्या पर्यायी नावात,
स्वभिषक् म्हणजे स्वयंघोषित किंवा स्वतःचा स्वतः जणुकाही डाॅक्टर. (बोगस नव्हे )
चिकित्सकारी म्हणजे चिकित्सक
लोकांचा अरी. ( याचे नित्य सेवन केले असता, चिकित्सक लोकांकडे चिकित्सेसाठी जावे न लागल्यामुळे, यांच्या पोटापाण्यावर पाय आणणारा )
डाॅक्टरशत्रु म्हणजे डाॅक्टरांचा जणुकाही शत्रुच ! ( याचे नित्य सेवन केले असता डाॅक्टरकडे जायची वेळच येत नाही, म्हणून डॉक्टर मंडळींचा शत्रु, म्हणून बहुधा अजिबात खाऊ नका, असा सल्ला देऊ लागलेत.....)
वैद्यमित्र - रोग होऊ नये म्हणून, आणि झालेला रोग दूर व्हावा यासाठी धडपडणाऱ्या वैद्यांचा मित्र.
अशी काही नावे तयार करता येतील. (पुलदेशपांडे जर कदाचित वैद्य असते तर त्यांनी अशी कल्पवृक्षफल शतनामावली तयार केली असती.)
असा हा बुद्धीदात्या गणरायाचा बुद्धीदाता नैवेद्य. हाच नारळाचा नैवेद्य आमच्या बजरंगबलींना पण प्रिय आहे. कारण जसा हा बुद्धीदाता आहे, तसाच शक्तीदाता पण आहे.
ज्याने निर्माण केले, त्याचे त्यालाच परत करायचे आणि त्याचा सूक्ष्म सारभाग आपल्याला घ्यायचा. हा नैवेद्य दाखवण्यामागील मुख्य हेतु.
ज्याच्याकडे जे आहे, ज्याच्याकडे ते मागीतले की लगेच मिळते, अश्या देवतांकडून जर शक्ती आणि बुद्धी मागितली तर त्या देवतांकडची शक्ती आणि बुद्धी संपूनच जाईल ना ! म्हणून भक्तीमार्गी लोक गणपतीला, हनुमंतांना स्थूल रूपात नारळ अर्पण करतात, आणि सूक्ष्मप्रसाद रूपात बाप्पा तो शक्ती बुद्धीच्या रूपात परत करतात. आणि आपणच तो तो स्थूलातून खातो.
हा माझ्यासारख्या भोळ्याभाबड्या भक्तांचा भाव.
हीच श्रद्धा. हीच भक्ती.
नैवेद्य दाखवताना मला उमजलेली !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
09.09.2016
माणूस हा जन्मतः मांस न खाणारा प्राणी आहे. शरीर रचनेचा विचार केला असता, शारीरिक आणि मानसिक स्तरावर, मांस खाणाऱ्या प्राण्यांची तुलना, माणसाशी कधी होऊच शकत नाही. तरीदेखील माणूस मांस खाऊ लागला. काहीवेळा दुसरे अन्न मिळतच नाही म्हणून, तर काही वेळा केवळ चवीसाठी, काहीवेळा हाय प्रोटीन डाएट म्हणून तर काही वेळा औषध म्हणून.
शरीररचनेच्या विरोधात म्हणजे निसर्गदत्त नियमाच्या विरोधात जेव्हा आहार पोटात जाईल तेव्हा ते अनेक आजारांना जन्म देणारे असते.
माणसाच्या शरीराची रचना ही मांस खाण्यासाठी, बारीक करण्यासाठी, मांस पचवण्यासाठी, शरीरातून बाहेर काढण्यासाठी योग्य नाही, हे सिद्ध झालेले आहे. तरीदेखील कोणत्याही कारणांनी जर मांस खाल्ले गेले तर ते पचत नाही. किंवा काहीवेळा तर निसर्ग पुनः विरोधात जातो. आणि या द्वंद्वात नुकसान मानवी शरीराचे होते.
चरबी वाढणे, जाडी वाढणे, किडनीचे आजार, यकृताचे आजार, ह्रदयाचे आजार वाढलेले दिसतात, याचे एक कारण अति प्रमाणात खाल्ला जाणारा मांसाहार आहे.
कोकणात जी मंडळी मांसाहार करतात, त्यातील बहुतांश मंडळी "दिवस पाळून" मांसाहार करताना दिसतात. म्हणजे, रविवार आणि बुधवार या दोन दिवशी मांसाहार केला जातो. इतर दिवशी मात्र शुद्ध शाकाहारी जेवण घेतले जाते. यातील रविवार आणि बुधवार हे दिवस कोणी आणि कसे शोधून काढले माहिती नाही, पण औषध सुरू करताना ते रविवारी अथवा बुधवारी किंवा पुष्य नक्षत्रावर सुरू करावे, असं कुठेतरी वाचनात आलेलं आठवतंय.
काहीही मग जे औषध स्वरूपात घेतले जाते ते रविवारी किंवा बुधवारी घेतले जावे, या हेतुने आहार हाच औषधी स्वरूपात होण्यासाठी, मांसाहार करण्यासाठी, हे दोन दिवस गृहीत धरले गेले असावेत. असे मला वाटते.
म्हणजेच मांसाहार हा स्वस्थवृत्तार्थ नसून, व्याधी परीमोक्षार्थ सांगितला गेलाय. निरोगी रहाण्यासाठी नसून, रोगी अवस्था कमी होण्यासाठी, फक्त औषध स्वरूपात वापरावा असे म्हटले तर ते चुक ठरू नये.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
4.10.2016
होन्सफील्ड या शास्त्रज्ञाने संगणकाचा व क्ष किरण शास्त्राचा उपयोग करुन हाडे व फुफ्फुसे या व्यतिरीक्त क्ष-किरणांनी प्रतिमा निर्माण करुन व नुसत्प्रतिमाच नव्हे तर अतिसूक्ष्म फरक कळू शकणारे स्वच्छ व अचूक प्रतिमाशास्त्र मानव जातीला देऊन या क्षेत्रात क्रांतीच केली.
हि भाजी सर्व महाराष्ट्रभर आवडीने खातात व हि भाजी पथ्याची म्हणून देखील प्रसिद्ध आहे.ह्याचे रोप हातभर उंच असते.
हि चवीला गोड खारट व थंड असते.त्यामुळे ही शरीरातील वात व पित्त कमी करते.
आता आपण ह्याचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहूयात.
१)ताप उतरल्यावर ह्या भाजीचे सूप त्या व्यक्तीला दिल्यास त्याची भूक वाढते.
२)मुळव्याध असणार्या व्यक्तिंने हि भाजी गव्हाचे फुल्के व कारल्याच्या चटणी सह खावी त्यामुळे संडास साफ व मऊ होतो.
३)लघ्वीची जळजळ होत असल्यास धणे,जीरे घालून चाकवत भाजीचे सुप करून प्यावे.
४)कावीळ झालेल्या व्यक्तीला ही भाजी खायला देतात त्यामुळे संडास वाटे खराब व वाढलेले पित्त पडून जाते व कावीळ उतरायला मदत होते.
५)विद्यार्थी किंवा बुद्धिजीवी लोक ज्यांच्या बुद्धीवर प्रचंड ताण असतो त्यांनी लक्षात नीट रहाण्यासाठी रात्री झोपण्या आधी १/४ कप चाकवताचा ताजी रस+ १ चमचा मध हे मिश्रण १५ दिवस सलग घ्यावे फायदा होतो.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गॅसनामा
गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.
फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "
हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.
या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.
गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !
हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.
वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.
या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.04.2017
Copyright © 2025 | Marathisrushti