आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा.
आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो हे एकुन आता तरी आपल्याला नवल वाटणार नाही हे मला पक्के माहित झाले आहे.
चला तर आता पहिल्या भाजी पासुन सुरूवात करूया ना.बरं मग हि पहिली भाजी कोणती बरे,चला एक क्लु देते रामदेव बाबांच्या योग शिबिरे व योग व्याख्यानांमुळे ह्या महाशयांना बरीच प्रसिध्दी लाभली आहे.
आता कसे बरोब्बर ओळखलेत तुम्ही हा दुसरा तिसरा कोणी नसून दुधीभोपळा किंवा ज्याला आपण कोकणदुधी म्हणतो तोच हा बरं का!

हा २०-३०मीटर उंच वृक्ष आहे.ह्याची त्वचा गडद तपकिरी रंगाची व खडबडीत असून हिरड्याचे लाकूड अत्यंत कठिण व घट्ट असते.ह्याची पाने ७-२० सेंमी लांब व ५-१० सेंमी रूंद व टोकदार असून पत्र शिरांच्या ६-८जोड्या असतात.फुले २.५-५ सेंमी लांब असून फळ २.५-५ सेंमी लांब व अण्डाकार असते आत कठिण मगज असतो व पृष्ठभागावर पाच पन्हाळी सारख्या उभ्या रेषा असतात.फळ कच्चे असता हिरवे व पिकल्यावर धुरकट पिवळे असते.प्रत्येक फळात एक कठिण बी असते.
हरितकीचे उपयुक्तांग आहे फळ.ह्याची चव लवण अर्थात खारट सोडुन पाच हि चवी असलेली असते व प्रमुख चव तुरट असते.हरडा उष्ण गुणाचा असतो व हल्का,कोरडा असून त्रिदोषनाशक असतो.
चला आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग पाहुयात:
१)जखम झाली असता ती हरड्याच्या काढ्याने धुवून साफ करतात.
२)बाळ हरडे चावून खाल्ल्याने भुक वाढते.
३)कफज अर्शामध्ये हरितकी हि गुळ व ताका सोबत देतात.
४)हरड्याचे चुर्ण मनुका व खडीसाखर सह देतात ह्याने अम्लपित्तामध्ये फायदा होतो.
५)हरडा दुषित कफ व मेद यांचा नाश करून बुद्धि व इंद्रियांचा जडपणा घालवून मेध्य कार्य करतो.
६)हरडा डोळ्यांच्या आरोग्यास देखील हितकर आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपण प्रत्येक जणच बदामाचे फॅन आहोत.अगदी लहान पणा पासूनच आपले नाते ह्याच्याशी जोडले जाते.लहान मुलांना बदाम पाण्यात भिजत घालून दुधात उगाळून देतात.परिक्षेच्या काळात अभ्यास चांगला लक्षात रहावा म्हणून आई मुलांना बदाम खायला देते.
बदामाचा शीरा,बदाम खीर,बदाम तेल,बदाम पाक असे बरेच प्रकारे बदाम आपण वापरतो.मिठाई मध्ये सजावटी करिता देखील ह्याचा वापर केला जातो.
चला मग बदामाचे गुणधर्म पाहूया:
बदाम चवीला गोड,तुरट,उष्ण,स्निग्ध,बलकारक,वातनाशक,
कफपित्तवाढविणारे,पौष्टिक,सारक,बुद्धिवर्धक,
पचायला जड,शुक्रवाढविणारे आहे.
आता बदामापासून बनविलेल्या व्यंजनाचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:
१)बदामखीर/मिठाई:
गोड,पौष्टिक,उष्ण,पचायला जड,झोप आणणारी,शुक्र धातूवाढविणारी,बुध्दिवर्धक,
वातपित्तनाशक,बलकारक आहे.
२)बदामाचे तेल:
गोड,स्निग्ध,पचायलाजड,वातपित्तनाशक,
कफकर,मेंदूलाशांतकरणारा,वृष्य,उष्ण,
पोषक,डोकेदुखी कमी करते.हे तेल कानाच्या रोगात देखील उपयुक्त आहे.
बदामाचे अतिसेवन केल्यास पित्तवाढून जुलाब देखील होऊ शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
पाणी शुद्धीकरण भाग पाच
पाणी शुद्ध करण्यासाठी आणखी एक पद्धत शाळेत शिकवली गेलीय, जी एकदम साधी सोपी आहे.
त्यातील मुळ कल्पना लक्षात घेतली की, आपल्याला हवे बदल त्यात करता येतील.
एका छोटे छिद्र असलेले मडके घेऊन त्या छिद्रावर एक तलम मलमलचे कापड आतल्या बाजूला ठेवावे. त्या मडक्यात चार इंच वाळू भरावी. त्यावर कोळसे टाकावेत. त्यावर माठे गुळगुळीत दगड भरावेत. वरून हळुवार पाणी ओतावे. मोठी अशुद्धी कोळशात अडकते. छोटी अशुद्धी वाळूच्या कणामधे अडकते. त्याहून छोटी अशुद्धी कापडात अडकते. आणि नंतर छिद्रांतून पाणी ठिपकू लागते. जे शुद्ध स्वरूपात मिळते. दररोज कापड स्वच्छ धुवुन घ्यावे.
याच यंत्रामधे थोडा बदल असाही करता येतो. दोन मडकी एकावर एक ठेवून वरील मडक्याच्या तळाला छोटे छिद्र करावे आणि सर्व सामग्री घालावी. खालील मडक्यात पाणी जमा होते.
हेच तत्व वाॅटर फिल्टर्स मधे वापरले जाते. वेगवेगळी मटेरीयल वापरून काही अडथळे (कांड्या ) निर्माण केले जातात, जेणेकरून पाण्यातील अशुद्धी त्यात अडकत जाईल. काही दिवसानी हया कांड्या बदलाव्या लागतात.
काही फिल्टर्स मधे इलेक्ट्रॉनिक रचना वापरली जाते. पण सर्वात उत्तम उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे.
पाणी किती उकळले म्हणजे त्यातील अशुद्धी दूर होईल ?
आजचे विज्ञान सांगते किमान चाळीस मिनीटे पाणी उकळत राहिले तरच त्यातील अशुद्धी जाते. काही जंतु असे असतात, की ते पाण्याचे तापमान जसे वाढत जाते तसे स्वतःभोवती एक कवच तयार करतात आणि उकळत्या पाण्यात चक्क खेळतात. हे छुपे रूस्तम चाळीस मिनीटापर्यंत जिवंत राहू शकतात नंतर मात्र ते मरतात.
पाण्याचा एक सोळांश काढा करणे, हा नक्कीच चांगला उपाय आहे. कोणत्याही वाॅटर फिल्टर मधले पाणी सोळा लीटर घेऊन ते एक लीटर उरेपर्यंत आटवावे.
केवळ उकळले तरी पुरत नाही. पुनः ते गाळावेही लागतेच. कारण उकळल्यामुळे त्यातील अविद्राव्य घटक तळाला बसतात आणि ते प्रत्यक्षात दिसतात. ते गाळल्याशिवाय दूर होतच नाहीत.
एक सोळांश उकळणे राहिले दूरच, किमान अष्टावशेष तरी राहूदेत, किंवा चतुर्थांश तरी आटवा, किंवा दोनाचे एक तरी करा, किमान उकळा तरी. यापैकी काहीही एक करा, पण करा.
नाहीतर तुमची पचन क्षमता एवढी वाढवा की, रोगाचे जंतु तुम्ही प्रत्यक्ष गिळलेत, तरी ते तुमच्या अग्निने सर्व भस्म करून टाकू शकाल.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
01.01.2017
तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
देहे दुःख ते सुख मानीत जावे....
सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे !
प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात,
सुखापेक्षा समाधान महत्वाचे.
सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख संपते तिथे समाधान सुरू होते. किती अर्थपूर्ण वाक्य आहे ना हे. एका गोष्टी मधे संतुष्टी होतच नाही. एकावर एक फ्रीचा जमाना आहे. तिथे सुख कुठे संपते हे कसं कळणार ?
प्रमेहाच्या सूत्रामधे या सुखासनाचा सर्वात प्रथम उल्लेख करावासा वाटला. आळशी बनत जाणे, वृत्तीने, कर्माने, तनाने आणि मनाने सुद्धा!
आजची तरूण पिढी. दोष देत नाही, पण नाक्यावरून दळण आणायचं झालं तरी बाईकचं बटन स्टार्ट केल्याशिवाय दळण सुद्धा आणले जात नाही. छोटी छोटी काम करायचा आळस हा पुढे मधुमेहासारख्या आजाराला जन्म देतो, हे लिहून ठेवणारे दूरदृष्टीचे ऋषी, भारतात होऊन गेले याचा अभिमान बाळगायलाच हवा. पण पाश्चात्यांच्या आपण एवढे आहारी गेलो आहोत की, आमच्या ऋषींचे कौतुक सोडाच, पण भारतीयांनाच मागासलेपणाचा शिक्का मारून आपण मोकळे होतो.
घरातील छोट्या छोट्या गोष्टी करायला लाज कशाला बाळगायची ? ही कामे करताना आरोग्याचे पण रक्षण होतेच आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.
किती सोप्पं आणि सुखासिन झालं आहे जगणं.
चुल फुंकावी लागत नाही, की जमिन सारवावी लागत नाही,
पाणी ओढायला लागत नाही, किंवा शेंदावे लागत नाही, नळ सोडला किंवा बटन दाबले की पाणी किचनमधे !
ठिबक सिंचनमुळे पाणी झाडांना सुद्धा द्यावे लागत नाही.
ट्रॅक्टरमुळे नांगर हातात धरावा लागत नाही,
मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंटाही गेला. टेबलखुर्ची आली नि खाली बसून जेवणारी पंगत संपली,
एवढंच काय वारा घेण्यासाठी सुद्धा हात हलवावा लागत नाही.
हळदीकुंकु असेल तर निमंत्रणे देण्यासाठी फिरावे लागत होते, वाॅटसपमुळे तेही नाही.
शाॅपिंगही ऑनलाईन. पैसे मोजायचे पण श्रम नाहीत, करा स्वाईप !
पाश्चात्य देशात काम करायला माणसं मिळत नाहीत म्हणून मशीनची निर्मिती करणे ही त्यांची गरज होती, पण माणसांची मुबलकता असलेल्या प्रिय भारत देशात, पाश्चात्यांनी बनवलेली मशिन्स घरात आणून, माणसे मुबलक मिळतात म्हणून मशिन चालवायला पुनः बाई किंवा बाबाला ठेवायला लागले. ही सुखासिनता नव्हे काय ?
नंतर आजारपण आल्यावर दिवसाला सोळा सोळा प्रकारची औषधे खात बसून आरोग्य विकत घ्यायचे ? याला काय म्हणावे ?
मध्यंतरी एक जपानी व्हिडिओ बघीतला होता, माणसाला बेड वरून हलवून उठवायला घड्याळ. त्याचा बेड आणि त्याला उभा करायला मशिनची प्रगत टेक्नाॅलाॅजी. त्याचे गाल बाजुला करून तोंडात टूथब्रश ढकलून त्याचे दात घासले गेले, नंतर चुळ भरायला पाणी तोंडात सोडले गेले, चुळ भरायला छोटे बेसिन, आपल्या पिकदाणी सारखे तोंडासमोर हजर.
रोबोच्या दुसऱ्या हातानी ओले झालेले तोंड पुसायचे. वगैरे वगैरे टेक्नाॅलाॅजीची कमाल दाखवली जात होती. हा सुखाचा अतिरेक नव्हे काय ?
अतिशयोक्तीचा दोष सोडून देऊ....
पण निदान...
आपली ताट वाटी आपली आपण उचलून ठेवावी, जमलं तर घासावी.
आपले कपडे आपण बुचकळून काढावेत.
आपली गाडी आपण धुवावी. पुसावी तरी.
आपले अंथरूण पांघरूण आपणच घालावे, आपणच आवरावे.
आणि
आपल्या देवघरात एकदा तरी त्याच्यासमोर ओणवे रहावे.
देहे दुःख ते सुख मानीत जावे......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.02.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग सहा !
काही फळांचे "सीझन" असतात. काही फुलांचा "हंगाम" असतो. काही वनस्पतींची "बेगमी" विशिष्ट मोसमातच करावी लागते. भाताची शेती पावसाळ्यातच केली जाते. असे का ? यालाच तर "निसर्ग" म्हणतात.
आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, या महिन्यातच का लागतात ?
जांभळे, करवंदे, जाम, फणस ही फळेदेखील याच महिन्यात मिळतात. गुलमोहराचा बहर आत्ताच सुरू असतो. असे का होत असावे ?
निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे.
केवळ मानवालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येकाला इथे विशिष्ट जागा, आजच्या भाषेत "स्पेस" आहे.
निसर्गातील प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक ते सर्व निसर्गानेच तयार करून दिलेले आहे. सहा महिन्यांचा आदान काल आणि सहा महिन्यांचा विसर्ग काल त्यानेच बनवलेला आहे. पण आपण ते युक्तीने वापरत असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधे शक्तीचे हे मैत्रीपूर्ण आदान प्रदान, कोणाच्याही, कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू आहे. आणि असेच पुढे देखील सुरू राहणार आहे.
ज्या कालावधीमधे निसर्गाने द्यायला सुरवात केली आहे, त्यावेळी त्याच्याकडून आनंदाने घेत जावे. फळे दिली फळे, फुले दिली फुले, ऊन दिले तर ऊन. पाऊस दिला तर पाऊस आणि देईल तेवढी थंडी. त्यापासून स्वतःचा फायदा करून घेत स्वतःचा बचाव कसा करायचा ही युक्ती आहे.
उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांचा आस्वाद तेव्हाच घ्यावा. गरज असेल तर औषधी स्वरूपात टिकवून ठेवावा, औषधी स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आसव अरीष्ट, अवलेह, गुटी, वटी, गुलकंद इ. स्वरूपात कोणत्याही रासायनिक टिकाऊ द्रव्याशिवाय टिकवून ठेवायच्या पद्धती देखील अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.
व्यापारी वृत्ती आली आणि त्यातील औषधी गुण कमी होत गेले. हवं तसं ओरबाडण्याची वृत्ती निर्माण झाल्यामुळे देखील काही दिव्य औषधी कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन, संगोपन होणे तेवढेच गरजेचे आहे.
जे द्रव्य नाशीवंत आहे, त्यावर प्रोसेस करून ते द्रव्य टिकवले जाईलदेखील, पण त्यातील औषधी गुणधर्म कमीच होतो, नैसर्गिक अधिवासामधे उगवलेली शतावरी, गुळवेल या सारख्या वनस्पती आणि कल्टीव्हेटेड वनस्पती यांच्या गुणांमधे नक्कीच फरक पडतो.
औषध म्हणून वापरायचे असल्यामुळे चालेल. पण जीभेचे चोचले म्हणून, फक्त तीन महिन्यात मिळणारा आंबा, "रस" या स्वरूपात टिकवून ठेवून, पावसाळ्यात खाल्ला तर त्रास नक्कीच होणार.
निसर्ग म्हणतो, तुम्हाला मी आंबे तयार करून पाठवलेले होते. तेव्हा तुम्हाला खायला वेळ नव्हता, तोच आंबा पुढे "अ-काली" खाल्ला तर, अकारण अग्निमांद्य निर्माण करून घेणार. जी गोष्ट आंब्याची तीच अन्य सर्व अन्नपदार्थांची ! इन्स्टंट फास्ट फूड आणि टू मिनटस मे रेडी पदार्थांची !
पाश्चात्य देशात, त्या देशांची ती गरज आहे, त्यांना निसर्ग अनुकूल नाही.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे ही मंडळी राहत असतात. चौवीस तास बर्फ, अवेळी पाऊस, चुकुन सूर्य दिसला तर आनंद होऊन, "गुड माॅर्निंग" म्हणणारे ते देश ! अन्य शेती व्यवसाय करायचा म्हटला तरी त्यांना ते शक्य होणारे नसते. म्हणून निसर्गाला पूरक परिस्थिती निर्माण करीत अन्नधान्यांचा साठा करावा लागणे, ही त्यांची गरज आहे.
आमच्याकडे " एव्हरी डे इज गुड माॅर्निंग " असताना, सिझनल फळे, फुले, भाज्या इ.इ. सर्व उपलब्ध होत असताना, ज्युस काढून पुनः त्यात विषारी किटकनाशके घालून, टिकवून, निसर्गाच्या विरोधात जाऊन, अवेळी खाऊन, रोग वाढवून, पुनः त्यासाठी अनैसर्गिक औषधे खायची !
ही हौस भारीच म्हणायची !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.05.2017
असे म्हटले जाते की स्वर्गलोकाचा राजा इंद्र ह्याला हि जे दुर्लभ होते ते ताक मात्र आपल्या पृथ्वी वासियांना सहज उपलब्ध आहे.तर असे हे ताक दुधाचे दही बनविले जाते व दही घुसळून त्याचे ताक बनते.
दहि कसे घुसवले जाते ह्यांवरून ह्या ताकाचे चार प्रकार पडतात ते खाल्ली प्रकारे:
१)घोल:
ह्यात पाणी न घालताच दही घुसळले जाते व ताक बनविले जाते. ह्या ताकाचे गुण साधारण पणे दह्या सारखेच असतात.हे वातपित्तनाशक आहे.
२)मथित(मठ्ठा):
दह्यात पाणी न घालता घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे ताक Irritable Bowels मध्ये चांगले काम करते कारण हे संडास बांधून ठेवते त्यामुळे परत परत जुलाब होत नाहीत.हे कफ पित्तनाशक आहे.
३)ताक:
दह्यात १/४ पाणी घालून घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे त्रिदोषनाशक असून थंडीच्या दिवसात प्यायला उत्तम.हे भुक वाढविते व तोंडावा रूची आणते.
४)उदश्वित:
दह्यात १/२ पाणी घालून घुसळून लोणी काढून केलेले ताक.हे कफकर असून बल वाढविणारे,शरीरातील विषार कमी करणारे आहे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सतरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
हे सर्व कशासाठी, तर रोग होऊ नयेत यासाठी. रोगामुळे काय होतं ?
आयुष्य कमी होतं.
त्याने काय होतं ?
जीवनातील आनंद हरवून जातो. जीवन हे आनंद निर्माण करण्यासाठी आहे. सद्गुरू वामनराव पै म्हणतात तसं, हे जग सुखी व्हावे. याचा दुसरा अर्थ दुःख नाहीसे व्हावे, असा आहे. रोगालाच दुःख असे पर्यायी नाव देखील आहे.
रोग म्हणजे दुःख. पण औषध म्हणजे सुख नाही.
एक गोष्ट लक्षात येतेय का बघा. निरोगी राहण्यासाठी ग्रंथकारांनी या श्लोकामधे कुठेही औषधांचा पुसटसा उल्लेख देखील केलेला नाही.
या श्लोकामधे नित्यं हिताहारविहार औषधसेवी.... असं म्हटलेलं नाही. तशी गरजच नाही, याचा विश्वास ग्रंथकारांना आहे.
याचा अर्थ रोग होऊ नयेत यासाठी औषधे कधीही काम करीत नाहीत. हे पटतंय का ?
आयुष्यभर, मरेपर्यंत औषधं खाणं ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे. आपल्याला त्रास असेपर्यंत औषध जरूर घ्यावे. भले कोणत्याही पॅथीचे असावे.
त्रास संपला की औषध संपलेच पाहिजे. जसं कावीळ झाल्यावर कावीळीवरील औषध जरूर घ्यावे.
किती दिवस औषध घ्यावे ?
कावीळ उतरेपर्यंत. म्हणजे कावीळीची शरीरावर असणारी लक्षणे नाहीशी होईपर्यंत औषधे जरूर घ्यावी. नंतर भूक वाढणारी औषधे घ्यावीत. नंतर मलप्रवृत्ती साफ होण्यासाठी एखादे जुलाबाचे औषध घ्यावे. नंतर औषधांची गरज संपते.
रोगाची लक्षणे संपल्यानंतर रोगही विसरून जायचा आणि औषधे देखील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगाचा मनातला विचार देखील काढून टाकायचा, की मला असा रोग होता......
भूक वाढल्यानंतर आपला आहार विहार नियंत्रित असेल तर आपल्या शरीराला जे घटक हवे आहेत, ते सर्व शरीरालाच निर्माण करू देत. बाहेरून सतत मोजून मापून औषधांनी मदत पुरवून, शरीर निरोगी राहील, हा भ्रम आहे. असे होत नाही.
जसं कावीळीचं, तसंच तापासाठी. ताप उतरला तरी औषधं खायची आवश्यकता नसते. पण आजकाल रक्तदाब, मधुमेह, पीसीओडी, डिप्रेशन, यासरख्या अनेक आजारात यासाठी कायमस्वरूपी औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. काही मोजकेच आजार असे असतात, की औषधं घेईपर्यंत बरे असतात, आणि औषधे संपली की पुनः डोके वर काढतात. याला याप्य असा शब्द आयुर्वेदात वापरलेला आहे. काही आजार असाध्यच असतात, त्यावर औषधेदेखील काही काम करीत नाहीत, मग औषधे पचवायचे ज्यादाचे काम तरी कशाला द्यावे ? औषधे कधीपर्यंत सुरू ठेवावीत हे सुद्धा रोग्याच्या लक्षणावर आणि रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते. याचा निर्णय एखादा कुशल वैद्यच घेऊ शकतो.
औषध हेच माझे सर्वस्व आहे. औषधे घेतल्याशिवाय माझं काही खरं नाही, ताकद वाढण्यासाठी औषधे घेतलीच पाहिजेत, टाॅनिकशिवाय बाळ अंग धरणारच नाही, असं नाही. न्यायालयाच्या भाषेत सांगायचे तर, हे सर्व खोटं आहे
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०६.०८.२०१७
आस्यासुखं स्वप्नसुखम दधिनी
ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
नवान्नपानं गुडवैकृतंच
प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम।।
मधुमेह होऊ नये यासाठी काय करू नये, यासाठी आपण बघत असलेल्या या श्लोकाचे सार काय ?
प्रमेह होऊ नये म्हणून
अंगाला घाम आणून ।
शरीरातील क्लेद काढून
राहून सदैव दक्ष ।
आहारावर असावे लक्ष ।। 1।।
प्रमेह होण्यासाठी मधुर रसाबरोबरच न पचलेल्या आहारातून निर्माण झालेल्या कफाचा विकृत चिकटपणा म्हणजे क्लेद कारणीभूत असतो. जो तयार होऊ नये यासाठी सदैव दक्ष राहीले पाहिजे.
केली जर मेहनत
प्रमेह होईल नत ।
शरीरा येई लघुत्व
शंका मनी आणू नये ।।2।।
मेहनत केली तर मधुमेह नाहीसा होतो.
शरीराच्या हालचाली जेवढ्या जास्ती तेवढा शरीराला हलकेपणा येतो.
फिरायचे फिरोन करावे
बसायाचे बैसोन लिहावे ।
बसणे ठिकाणी झोपणे
ऐसे करणे बरे नव्हे ।। 3 ।।
जे काम फिरून करता येण्याजोगे असते, ते बसून करू नये, जे बसूनच करायचे असेल ते झोपून करू नये.
दीवास्वाप टाळावे
टेबलावरी लवंडावे ।
पांघरूण घेऊन झोपावे
हे क्लेदाचे कारण ।। 4 ।।
दुपारची झोप अजिबात नको. अपवाद ग्रीष्म आणि शरद ऋतु.
झोपायचे असल्यास जेवणाअगोदर एक डुलकी टेबलखुर्चीत बसून काढावी.
कष्टाची कामे करोन
झोपावे निश्चिंत होवोन ।
फुका कारणे लोळोन
क्लेद माजतो अंगासी ।।5।।
झोप तेव्हाच लागते, जेव्हा मेहनत करून थकवा आलेला असतो. जेवणानंतर येणारा अशक्तपणा हा क्लेद वाढवणारा असतो.
आळसे सुख मानो नये
सुखाचा अतिरेक करो नये ।
दुःखाचे दुःख मानो नये
अंतिम सुखी होण्यासी ।।6।।
झोपेचे सुख हे थकवा घालवण्यापुरते असावे. झोप पूर्ण होऊनही लोळत राहाण्याचे सुख घेण्याचा प्रयत्न करू नये.
शरीराला सुखाचा अतिरेक झाल्यास आयुष्य दुःखाचा अतिरेक सहन करावा लागतो. म्हणून देहे दुःख ते सुख मानीत जावे, आत्ता थोडासा त्रास वाटला तरी अंतिम सुख म्हणजे आरोग्य मिळेल.
आपुले औषध स्वये करिती
ते कुऱ्हाडीचा दांडा होती ।
पथ्यापथ्य वैद्यास पुसती
तयांसी नाव विवेक ।। 7।।
मिडीयाच्या माध्यमातून अनेक सल्ले घरगुती औषधे वाचनात येत असतील तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी म्हणून प्रत्येकाचे औषध वेगळे या नियमानुसार सर्व सल्ले आपल्यासाठीच असतात असे नाही. त्यातील ज्याचा अधिकार आहे, अशा वैद्यांना जरूर विचारावे.
वेगान न धारयेत
तहान नसता पाणी घेत ।
वृक्कासी व्यर्थ ताण देत
हेची प्रमेहासी आमंत्रण ।।8।।
पाणी गरजेनुसारच प्यावे.
तहान नसताना पाणी पिऊ नये.
सक्काळी सकाळी पाणी नको. रात्री झोपताना मुळीच नको. दात असताना ज्युस नको. अति खाण्याची हौस नको.
दूर रहावे चार हातं
फवारणी आणि खतं ।
पिकवाव्या स्वकष्टातं
फळे आणि भाज्या ।।9।।
रासायनिक फवारणी केलेली फळे आणि पालेभाज्या खाणे म्हणजे पोटावर अत्याचार करणे होय.
बांधून ठेविली कोंबडी
खाल्ली तिची तंगडी ।
पडली रोगाची उडी
वरच्या वरी ।।11।।
खुराड्यात माजवलेल्या पशुपक्ष्यांचे मांस खाऊ नये, याऐवजी स्वतःचे अन्न स्वतः शोधून खाणाऱ्या प्राण्याची निवड करावी.
सूरव्यास साक्षी ठेवून
जे करिती भोजन ।
सुखे होई परिवर्तन
खाल्ल्या अन्नाचे ।।12।।
जे प्राणी सुर्यास्तानंतर खातात, त्यांचे मांस खाऊ नये. किंवा सूर्य नसताना जे खाल्ले जाते, त्याचे रूपांतर क्लेदात होते.
क्लेद राक्षस जाणावा
अन्नासी सूर्य दाखवावा ।
क्लेदासी ठार मारवावा
सूर्या करवी ।।13।।
धान्य किमान एक वर्ष जुने करून वापरावे, त्यासाठी कडकडीत उन्हात ते आधी वाळवावे. नाहीतर भाजून वापरावे.
मत्स्य कूर्म अथवा खेकडा
जलाधिपति प्रमेहासी वाकडा ।
असे अन्न त्वरीत सोडा
जे क्लेदासी कारण ।।14 ।।
ज्या अन्नात पाणी किंवा जलांश जास्ती आहे ते अन्न टाळावे, जे पाणथळ जागी रहातात किंवा पाण्यातच जगतात, त्यांच्या अंगी मुळातच पाणी जास्त असल्याने असे प्राणी क्लेद वाढवतात.
मधुर ते ते सर्व सोड
म्हणजे फक्त नव्हे गोड ।
पचायला होती जड
या नाव मधुर ।। 15।।
गोड पदार्थ म्हणजे फक्त गुळ आणि साखरच नव्हे तर पचायला जे जड ते सर्व मधुमेहाचे कारण आहेत.
गव्हाचा होतो गाजावाजा
मधुर रसाचा आहे राजा ।
प्रमेहाची मिळेल सजा
चटणी भाकरीत आहे मजा ।।16।।
समुद्र किनारी गहू नको. कुकरचा चिकट भात नको. चटणी भाकरी सोलकढीशिवाय जेवण नको. गरजेपेक्षा जास्त नको.
सेवा केल्यावीण खाणे
म्हणजे नरकात जाणे ।
कशाला मग दूध पिणे
ताक तूप असताना ।।17।।
श्रमाचे काम न करता भरपेट जेवणे, गाईची प्रत्यक्ष सेवा न करता पैसे देऊन विकतचे दूध दही खाणे, त्यापासून बनलेल्या चाॅकलेट, मिठाया यांच्यावर ताव मारणे हे प्रमेहाला बोलावणे आहे. जसे, दुध आणि दही हे पदार्थ वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत. वैद्यांना माहिती नसल्यास हा श्लोक वाचून दाखवावा. आणि अर्थ सांगावा. पण दुध आणि दही यांचा मोह वेळीच सोडावा.
अग्नीचा विसर पाडोन
कधीही केले अन्नसेवन ।
होणार नक्की अपचन
ऐसे न करावे ।। 18।।
भुक नसताना जेवणे, घड्याळ सांगते म्हणून जेवणे, सूर्यास्तानंतर जेवणे, ज्या अन्नाने आपल्याला त्रास होतो, हे माहिती असून जेवणे, पहिले खाल्लेले पचले नसताना परत जेवणे, आग्रहाचे जेवणे इ. प्रमेहाचे कारण आहे.
यंत्रावर विसंबून
मन भावना मारून ।
इंद्रियांना गुंडाळून
आणि त्याला विसरून
रोगी होईल जीवन ।।19 ।।
याकरीता,
अखंड असावे सावधान
खातापिता ठेवावे भान ।
आयुष्य जगावे छान
औषधाविना कायमचे ।।20।।
इति अल्पमति प्रमेहसंप्राप्ती समाप्ती
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.02.2017
Copyright © 2025 | Marathisrushti