(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • याला जीवन ऐसे नाव भाग २४

    पाणी शुद्धीकरण भाग चार

    पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात.

    दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. ही वात ओली करावी. त्याचे दुसरे टोक बाहेर काढून खालील मडक्यात असे लोंबत ठेवावे की, वरच्या मडक्यातील पाणी थेंब थेंब वातीवरून खाली ठिपकत राहील. दोन्ही मडक्यावर नीट आच्छादन घालावे.

    वरच्या मडक्यातील काही अशुद्धी, वातीमुळे खालील पाण्यात येणार नाही. फक्त वरच्या मडक्यातील तळापर्यंत गेलेल्या वातीच्या पातळीपेक्षा दुसरे टोक आणखी खालील पातळीवर आले पाहिजे, हे पहावे.

    ही वात घसरून खाली येऊ नये यासाठी वरच्या मडक्यात वातीवर एखादी वाटी वजनासाठी ठेवावी.
    टीप टीप बरसा पानी.... सुरू होईल.
    वरच्या मडक्यातील पाणी गाळून आपोआप खालील मडक्यात जमा होईल. वरच्या मडक्यातील पाणी कमी होत जाईल. खालचे मडके भरत जाईल.

    वातीला चिकटलेली धुळ, माती सारखी अशुद्धी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहाता येते. कापडाची वात धुवुन वाळवून ठेवली की, पुनः दुसऱ्या दिवशी वापरायला तयार !

    खर्च म्हणाल तर काही नाही. मडक्यामुळे पाणी थंड पण होईल. वरील मडक्यात रोज एखाददुसरे सुगंधीत फूल किंवा पान किंवा बी किंवा वाळ्यासारखे सुगंधी असलेले एखादे मूळ ठेवावे. त्याचा वास, अर्क, आणि काही प्रमाणात सूक्ष्म औषधी गुण पाण्यात येतील.
    दररोज औषधीयुक्त शुद्ध गाळलेले थंडगार पाणी मिळत जाईल.

    करून तर बघा,
    गंमत म्हणून !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    31.12.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बासस्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 18-पुष्प सहावे

    आपल्याकडे सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम असला की तोरणं बांधायची पद्धत आहे. आंब्याची पाने, नारळाच्या झावळ्या, भेडलेमाडाची कातरी पाने, केळीची झाडे, गोंड्याच्या माळा, नारळाचे तोरण, भाताच्या लोंब्या, इ.इ. नी अंगण, दरवाजे, प्रवेशद्वार सजवले जातात. याचं आयुर्वेदात काही महत्त्व असेल का ?

    आंब्याच्या पानाला एवढे महत्व का दिले असेल ? दरवाज्याच्या तोरणासाठी तेच, गुढीसाठी तेच, कलशस्थापना करण्यासाठी आंब्याचा टाळ हवाच. अभिषेक करताना देखील आंब्याची पाने हवीत, हळद चढवायला देखील आंब्याचीच पाने. इतकंच काय तर विवाह होमाच्या वेळी विस्तव आणताना देखील ताज्या आंब्याच्या पानानी हा विस्तव झाकून आणला जातो.

    उत्तम जंतुनाशक गुण आंब्याच्या पानात दडलेले आहेत. प्रमेहामधे आंब्याची पाने वापरली जातात. आंब्याच्या पानातून येणारा चीक आणि वास देखील औषधी आहे. म्हणून तर आंब्याच्या लोणच्यामधे देठाचा भाग असलेल्या फोडी आवर्जून घातल्या जातात. त्यातील औषधी चीक आणि वास यावा यासाठी आणि जंतुसंसर्ग न होता लोणचे वर्षभर टिकावे यासाठीच !

    हे आम्रपल्लव जसे आध्यात्मिक कर्मकांडामधे आहेत, आंबा, वड, पिंपळ, पायर (म्हणजे प्लक्ष किंवा पिंपुरणी,) औदुंबर याना अध्यात्मामधे विशेष महत्व आहे, तसेच पंचपल्लव आयुर्वेदात सांगितलेले आहेत.
    (आम्र जंबु कपित्थानाम् बीजपुरक बिल्वयो: ।।)

    जी गोष्ट आंब्याची तीच झेंडू किंवा गोंड्याची. गुढी तोरणामधून सर्वत्र सूक्ष्मातून जंतुनाश व्हावा, साथीचे रोग येऊ नयेत यासाठी केलेल्या या आध्यात्मिक उपाययोजना तर नसतील ?

    हे सामाजिक आरोग्य सांभाळण्यासाठी केले जाणारे सार्वजनिक उपचार असू शकतात का ? असा दावा नाही, पण काहीतरी तथ्य असणारच. आपण ते एकतर डोळस बुद्धीने म्हणजे ज्ञानयोग वापरून, किंवा सांगितलेले कर्म, रूढी परंपरा म्हणून करत रहावे, म्हणजे कर्ममार्गी व्हावे किंवा विकल्प मनात न आणता साध्या सोप्या भक्ती मार्गाने जावे. पण काहीच करणार नाही, आणि फक्त विरोधाला विरोध करीत रहायचे असे मात्र नको.

    गुढी उभारली जाते. सगळ्यांकडे एकाच वेळी एकाच पद्धतीने उभारली जाते. एकाच पद्धतीने गोंड्याची माळ, आंब्याची कडूलिंबाची पाने, तांब्याचा कलश, दरवर्षी ओला नवीन बांबू, दरवाज्यामधे स्थापना, कढीलिंबाची चटणी खाऊन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरवात करायची. हे सर्व का केले जाते ? केवळ भक्ती ? केवळ धर्म ? केवळ कर्मकांड ? केवळ रूढी परंपरा ? केवळ वार्षिक उत्सव ? केवळ दिखावा ?
    नक्कीच नाही. नीट डोळे उघडून पाहिले तर त्यात दडलेले सार्वजनिक आरोग्य दिसेल.

    सहस्त्र तुलसीदले, सहस्त्र दुर्वा, सहस्त्र बेल सहस्त्र नामानी कशासाठी वाहिले जातात ? एकीकडे सांगायचे सगळे देव एकच आहेत. कोणत्याही देवाला हाक मारा, ती एकाच ईश्वरापर्यंत पोचते, मग हजारदा त्याचेच नाव का उच्चारायचे ? एकदा हाक मारून पुरणार नाही का ? असे असंख्य प्रश्न आज केवळ अज्ञानामुळे अनुत्तरीत रहातात आणि धर्माकडे पहाण्याचा दृष्टीकोन विकृत होऊ लागतो.

    काही ना काही निमित्त करून ही कर्म कांडे पुनरावृत्त करण्यामागे "बूस्टर डोस" देण्यासारखा हेतू तर नसेल ?

    या सर्व कर्मकांडामागे लपलेले आरोग्य शोधायचे कुणी ? निदान विचार तरी सुरू करूया.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.06.2017

  • आहाररहस्य ७

    थोडं विषयांतर होईल पण सांगतो, आजकाल फळांचे भारीच फ्याड आले आहे.त्यात सगळ्यात जास्ती उड्या पडतात त्या नारळाच्या पाण्यावर ! नऊ महिने नऊ दिवस आणि बाळंत झाल्यानंतरदेखील नऊ महिने, पुढे अगदी फर्स्ट केजी पर्यत नारळाचे पाणी म्हणजे जणु काही अमृतच असे समजून प्याले जाते.

  • आहारातील बदल भाग ४३ – चवदार आहार -भाग ४

    आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले.
    बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ?
    होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना.

    म्हणजे ही पिढी बदलाला समोरी गेली. आता जी पन्नाशीला आलेली पिढी आहे, त्यांच्या बदललेल्या आहारात पिझ्झा, बर्गर, थाय फूड, साॅस हे पदार्थ आले आहेत.

    हे बदल होणारच आहेत. यालाच आपल्याला सामोरे जायचे आहे. आता ज्यांचे वय पंचवीस आहे, ते पन्नाशीच्या टप्प्यावर आले की, त्यांनासुद्धा आणखी एका बदलाला सामोरे जावे लागेल. ग्लोबलायझेशनच्या काळात, आहारात नवीन काॅम्बीनेशन्स तयार होणार आहेत. ती मान्य करताना त्यातील संभाव्य धोके लक्षात घेतले की झाले.

    आता चटणीची जागा 'साॅसने' घेतली आहे. आंब्याच्या पाकाची जागा 'जॅमने' घेतली आहे. आईची जागा 'बाईने' घेतली आहे.

    साॅस, जेली, जॅम,चीझ, मायोनीज, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ, बाईच्या ऐवजी आईने करायला सुरुवात केली तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. यासाठी या बदलाला आई बाबांनी सामोरे जायची, मानसिकता ठेवली पाहिजे.

    साॅस करताना जे टोमॅटो वापरले जातात, ते नीट पिकलेले बघून घ्यावेत, नीट धुवावेत, नीट शिजवावेत, शिजवताना त्यात योग्य ते स्टॅण्डर्ड मसाले घालावेत, कृत्रिम रसायनाऐवजी नैसर्गिक स्वाद असलेले मसाले घातले तर नुकसान नक्कीच होणार नाही. बाईने केलेल्या साॅसमधे काय काय घातले जाते, ते आपण वाचतो आहोतच. प्रिझर्वेटीव्ह घातले की, टिकणारच, मग त्यातील टोमॅटो कितीही किडके आणि सडलेले असतील तरीही !

    जेली जॅम करताना त्यात जिलेटीन मिसळले जाते, जे अॅनिमल सोर्सपासून बनवले जाते. त्यातील छापील घटकपदार्थांची यादी "कोडवर्ड" मधे असते. त्यावर प्रत्यक्ष नाव छापण्यामधे धोका असतो, त्यासाठी ही पळवाट असते.

    कृत्रिम रंग हा आणखीन एक धोका. ते रंग प्रमाणित केलेले वापरले नसतील तर धोका आणखीनच वाढतो. आताच्या संशोधनानुसार हे कृत्रिम रंग कॅन्सरचा धोका वाढवतात.

    त्याऐवजी नैसर्गिक रंग वापरले तर चव आणि वास आणि आरोग्य नक्की सुधारेल. म्हणून हे पदार्थ घरी करायची कृती शिकून घ्यावी. शिकायचं. पण कुठे कसं आणि कोणाकडून ?

    मोबाईल कसा वापरावा. हे घरातीलच पंचवीशीची पिढी ज्येष्ठ नागरीकांना शिकवते आहे. तसेच, या नवीन पदार्थांची चव त्यांना कशी हवी आहे तशी बनवून देण्यासाठी सुद्धा त्या पिढीचीच मदत घ्यायला हवी. ते पदार्थ स्वतः खाऊन बघितले पाहिजेत. तरच त्यातील दोष लक्षात येतील.

    पानावरील डाव्या बाजूचे पदार्थ बदलत आहेत. जे पदार्थ बदलले आहेत, तेच जास्ती गडबड करतात, म्हणून पानावरील डाव्या बाजूला होणाऱ्या बदलावर सावधपणे लक्ष ठेवले पाहिजे.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    04.11.2016

  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २०

    प्रमेहामधे नुसता जिभेवर संयम ठेवून चालत नाही. झोपेवर पण संयम ठेवावा लागतो. आपल्या मूळ श्लोकातील आस्यासुख शब्दानंतरचा दुसरा शब्द स्वप्नसुख.

    स्वप्न या शब्दाचा अर्थ निद्रा, झोप. नेहेमीची शांत झोप लागणे वेगळे आणि लोळतलोळत पडणे वेगळे!

    नेहेमीची शांत झोप आवश्यकच आहे. आरोग्याच्या प्रमुख घटकामधे ती आहार आणि ब्रह्मचर्याबरोबर स्विकृत झालेली आहे.

    झोप अशी हवी की, तिला अन्य गोळी, अभ्यास, अंथरूण पांघरूण, उशी, अंगाई, कोणाचीही गरज नसावी. पडल्या पडल्या ती आली पाहिजे. दिवसभर एवढे श्रम व्हावेत, की कधी एकदा आडवे टेकतोय असे व्हावे, आणि पाठ टेकताक्षणी ती प्रसन्न व्हावी. जसं झोपून उठून मलविसर्जनाला गेल्यावर पाच मिनीटात परत बाहेर यावेसे वाटले पाहिजे. आणि झोप पूर्ण झाल्यावर आणखी थोडावेळ झोपूया, असे न वाटणे म्हणजे झोप पूर्ण होणे. मुख्य म्हणजे या झोपेचे समाधान मिळाले पाहिजे.

    झोपेचा आणखी हव्यास वाटू लागणे म्हणजे प्रमेहाकडे वाटचाल सुरू होणे.

    अर्थात हे लहान मस्तीखोर मुले जी दिवसभर फक्त धावपळच करतात आणि झोपतात, त्यांच्यासाठी नाही सांगितलेले !

    ज्यांची झोप पूर्ण झालेली आहे आणि ज्यांना नुसते अंथरुणात लोळत पडायला आवडते, त्यांना थोडे लवकर अंथरूणातून उठून बाहेर पडायला हवे. ही जास्तीची झोप शरीरातील कफ दोष वाढवते.

    दोषांची प्राकृत कर्मे ही शरीरात होतच असतात पण या प्राकृत कामापेक्षा, गरज नसताना, आणखी जास्त कार्य घडून येणे म्हणजे प्रकोप होणे आणि गरजेपेक्षा काम कमी होणे हा दोषांचा क्षय मानावा. अतिरिक्त झोपेमुळे सुस्ती, येते. शरीर आळसावते. पचन मंदावते. अग्नि कमी होतो.

    आपण कसं रात्री झोपताना खोलीतील मोठा बल्ब कमी करून झिरोचा बल्ब सुरू ठेवतो, तसेच झोपल्यावर शरीरातील अग्निदेखील कमी केला जातो. म्हणूनतर झोपेपूर्वी पचन पूर्ण होऊन मगच झोपणे अपेक्षित आहे. म्हणून कामा निमित्त (वा असेच वाॅटसपसाठी) जागरण करणाऱ्या मंडळींना पचनाच्या विकृतींना सामोरे जावे लागते. पचनाचा आणि झोपेचा, झोपेचा आणि अग्नीचा खूप जवळचा संबंध आहे.
    अग्नि कमी झाला की स्थित्यंतर, बदल होणे कमी होते. स्थिरता येते. मेद वाढतो. जाडी वाढते. म्हणजेच प्रमेहाकडे वाटचाल सुरू होते.

    हे निरीक्षण फक्त आयुर्वेदात वर्णन केले आहे. ऋषींची ही दृष्टी आपल्याला आत्मसात होणे अपेक्षित आहे.

    मी या स्वप्नसुखमचा आणखी एक शब्दशः अर्थ लावतो, तो म्हणजे झोपेत स्वप्नातदेखील सुख बघणे. झोपेतदेखील सुखाचाच विचार करणारी स्वप्ने बघणे म्हणजे स्वप्नसुख.

    काही जणांना वाईट स्वप्न पडतात ते किंचाळत ओरडत उठतात, दुसऱ्यांची झोपमोड करतात. काही जणांना ही स्वप्ने आठवतात, तर काहींना अजिबात आठवत नाहीत. ही वाताची स्वप्ने.

    काहींना आपल्याला स्वप्न पडले होते एवढे आठवते, भानावर येतात आणि खुदकन हसतात आणि लगेचच परत झोपतात.ही स्वप्ने त्यांच्या लक्षात राहातात, ही पित्ताची स्वप्नप्रकृती.

    तर काहीजण या स्वप्ननगरीतून बाहेरच पडत नाहीत. जागे झाले तरी याच स्वप्नधुंदीत राहातात. झोपेतच हसतात, बोलतात, चालतात सुद्धा. पण भान नसते की आपण अजून झोपेतच स्वप्न बघत आहोत. पूर्ण भानावर येतात, तेव्हा जाग येऊन पुनः झोपतात. ही कफाच्या स्वप्नाची दुनिया असते.

    आणखीन एक झोप ही फक्त रात्रीच घ्यायची असते. दिवसाचे झोपणे हे शंभर टक्के वर्ज्य.
    वामकुक्षी वेगळी. आणि भरपेट जेवून, पंखा किंवा एसी लावून अंथरूण घालून, डोक्यावरून पांघरूण घेऊन, 'चला आता मस्त झोपतो', असे म्हणत जे झोपणार, त्यांचा सोबतीला प्रमेह नक्की येणार.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    05.02.2017

  • किचन क्लिनिक – आले आणि सुंठ

    किचन क्लिनिक ह्या आपल्या सदरा मार्फत आपल्या स्वयंपाकघराची एक नवीन ओळख करून घेत आहोत. मग सुरूवात झणझणीत मसाल्यांपासून करायची का? आज आपण आले आणि सुंठीची वैद्य ही नवी ओळख पाहूया तर !

    आपण सर्वच जण सुंठीचा वापर चहात आणि आल्याचा वापर चहा,चटण्या आणी आपल्या गोव्यात माशांचे सुके बनवण्यासाठी केला जातो. हा कंद जमीनी खाली उत्पन्न होतो, ओला असताना आले आणि वाळवलेली ती सुंठ. पण दोघांचे ही गुण वेगळे बरंका. सुंठ आणि आले दोन्ही चवीला तिखट आणि उष्ण गुणाचे पण गंमत बघाना आले अधिक प्रमाणात खाल्ले तर एॅसीडीटी वाढते तर सुंठ मात्र अपचनाने झालेली एॅसीडीटी कमी करते.

    आले:

    १)भुक लागत नाही का मग दररोज जेवणापुर्वी साधारणपणे १/२ तास आल्याचा छोटा तुकडा सैन्धव मीठासोबत खा आणी मग बघा पोटातील आगीचा वणवा कसा पेटतो ते.

    २)सुका खोकला येत असल्यास एक चमचा आलेरस +२ च ओल्या हळदीचा रस+१ च मध हे मिश्रण घ्यावे.

    ३)आल्याच्या रसापासून घरगुती आलेपाक बनवा हा सर्दी,खोकला,भुक न लागणे,तोंडास रूचि नसणे ह्यावर रामबाण उपाय.

    ४)वाढलेले काॅलेस्टरोल सतावतेय का मग सकाळी उपाशी पोटी आल्याचा छोटा तुकडा आणि एक लसूण पाकळी नियमीत खा आणी ह्रूदयाचे आरोग्य चांगले ठेवा.

    सुंठ:

    १)सुंठी वाचून नाही पण सुंठीने खोकला घालवायचा असेल तर सुंठीची राख मधासह चाटणे खोकला दमा पळालाच म्हणून समजा.

    २)शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सुज,मुरगळणे,मार लागणे,ह्यावर सुंठ आल्याच्या रसात उगाळून त्याचा गरम लेप त्या भागावर लावणे.

    ३)गळू पिकत नसेल तर सुंठपूड आणि खोबरेलतेल एकत्र शिजवा आणी सोसवेल एवढे निवल्यावर त्या गळूवर बांधा.

    ४)पोटात वात धरणे अथवा वारंवार आव पडणे ह्यावर घरी केलेला सुंठवडा उत्तम काम करतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – अननस

    अननस हे फळ आपल्या सर्वांच्याच आवडीचे.हे एवढे रूचकर लागते कि खायचा मोह आवरत नाही. ह्या पासून आपण सरबत,मुरंबा,जॅम,पाक,रायते,ज्युस आणी गोव्यात प्रत्येक मेजवानीत हल्ली हमखास अननसाचे सासव केलेच जाते.आणी हे सगळेच पदार्थ भयकंर चविष्ट लागतात ह्यात वादच नाही.

    ह्या अननसाचे रोप जमीनी लगत वाढते व ह्याच्या भक्कम बुंध्यास काटेरी पाने फुटतात आणी त्याच्या मधोमध हे फळ उगवते.लहान व कच्चे असताना हे फळ लालसर असते तर पिकल्यावर ते पिवळे होते.फळाच्या डोक्यावर मुकुट शोभावा अशी पाने असतात.

    हे पिकलेले असताना गोड व कच्चे असताना आंबट असते.हे थंड असल्याने वात व पित्त शामक आहे.

    आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमीत येत नाही त्यांनी कच्च्या अननसाचा रस मासिक पाळी येण्याच्या तारखे पुर्वी १/२-१ कप रोज प्यावा.

    २)१ ग्लास अननसाचा रस+१चमचा साखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे लघ्वीची जळजळ,लघ्वी कमी होणे,लघ्वीला उग्रवास येणे कमी होते.

    ३)अजीर्ण,उल्ट्या,जुलाब ह्यात उपवास करावा व अननसाचा रस+काळी मिरी+साखर हे मिश्रण थोडे थोडे प्यावे.

    ४)गजकर्ण,खरूज,ह्यात येणारी खाज कमी करायला अननसाचा रस लावावा.

    ५)पोटफुगणे,भुकमंदावणे,नियमीत संडासला न होणे ह्यात जेवणासह अननसांची फोड चावून खावी.

    अननस खायचा अतिरेक केल्यास अम्लपित्त व जुलाब होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेहेतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस

    बाबा सांगतात...

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    अष्टांग ह्दय या ग्रंथातील सूत्रस्थानातील चौथ्या अध्यायातील सर्वात शेवटच्या या श्लोकाचाच एक भाग म्हणून त्याअगोदर काही कायिक वाचिक मानसिक पथ्यापथ्ये सांगितलेली आहेत. जी "आई सांगते" या धर्तीवर आधारलेली होती.

    समाजात वावरताना कसे वागावे, याचे काही ढोबळमानाने नियम ठरवून दिले आहेत. जे आजही योग्य वाटतात. हे नियम आईच समजावून सांगू शकते. जसे ग्रंथकार म्हणतात, रस्त्याने जाताना आपल्याकडे इतरांचे लक्ष असते, तेव्हा आपले कपडे नीटनेटके असावेत. जुने, मळलेले, लालभडक रंगाचे, फाटलेले कपडे घालू नयेत.
    (वासोनधारयेत जीर्णम् मलिनं रक्तम् उल्बणम् )
    दुसऱ्याने वापरलेले कपडे आपण वापरू नयेत, केवळ कपडेच नव्हेत तर फुले, पुष्पमाला, कंठहार, दागिने, अंगठ्या, चप्पल इ.इ. वापरू नये.
    काय चुकले हो आईचे ? हे आज सांगण्याची काय आवश्यकता आहे, असे काही जणांना वाटेल.

    आज पहा काय चालले आहे, जीन्सची पॅन्ट विकत घ्यायची ती पण मळकट, कळकट, मुद्दाम फाटलेली, जेवढी मळकी तेवढी म्हणे फॅशन.

    एखाद्याचा सुरू असलेला मोबाईल काॅल जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो, तेव्हा तो चार वेळा पुसुन घेतो, कशासाठी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून! हे आपल्याला कळते, पण ओढणी, रुमाल, नेलपेंट, साबण, इयरींग, टिकल्या इ. वस्तु आपण सहजपणे एकमेकांच्या वापरत असतो. असे करू नये. असेच ग्रंथकार देखील सांगत आहेत. ते मी फक्त आईच्या तोंडी घातले एवढेच.

    आता या मागील अध्यायामधे वर्णन केलेली काही सूत्रे पाहूया. त्यांना आपण बाबा सांगतात, या मथळ्याने अभ्यासूया.

    सुखार्थाः सर्व भूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः।
    सुखंच न विना धर्मात् तस्मात धर्मपरो भवेत् ।

    सर्व प्राण्यांचे एकंदर उद्योग सुखाकरीता चालले आहेत.आणि सुख तर धर्मावाचून नाही. म्हणून निरंतर धर्मपर असावे.

    हे असे सर्व वर्णन आयुर्वेदात सांगितलेले आहे का, असा प्रश्न काही जणांना पडला होता. त्यांच्यासाठी खास हे ससंदर्भ सदर.

    आई जे सांगत होती, ते सुद्धा सुखासाठीच होते. फक्त तिथे व्यष्टी होती. बाबा काही सुखप्राप्तीच्या गोष्टी सांगताना समष्टीचा विचार करतात. शब्द वेगळे असतील पण भाव तोच आहे. काळ बदलला, पण सुखाची व्याख्या तीच आहे.

    अनुकुल वेदनीयम् सुखम्
    प्रतिकुल वेदनीयम दुःखम्

    अशा अनुभूती ज्यांने अनुकुलता म्हणजे बरे वाटणे, असे अनुभवता येते, ते सुख.
    आणि अशा अनुभूती, ज्यांनी प्रतिकुल म्हणजे बरे वाटत नाही, अशी संवेदना निर्माण होण्याला दुःख असे म्हणतात.

    इंग्रजी भाषेत वर्णन करायचे झाल्यास फीलींग वेल इज सुख आणि नाॅट फिलींग वेल इज दुःख ! नाॅट फिलींग वेल म्हणजे रोग. आणि फिलींग वेल म्हणजे निरोग.

    म्हणजेच निरोगी असणे हेच सुख आणि रोगी अवस्था म्हणजे दुःख.

    म्हणजेच आपली धडपड निरोगी रहाण्यासाठी चाललेली आहे. आणि त्यासाठी शास्त्रकार सांगतात, धर्मपर रहा. हिंदीत सांगायचे झाल्यास, नेकीसे रहो।
    काही जणांना धर्म शब्दाचीच अॅलर्जी आहे. त्यांच्यासाठी हिंदीतील अर्थ सांगितला.

    धर्म म्हणजे विशिष्ट रंग अपेक्षित नाही. सरळ सांगायचे झाल्यास हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन बौद्ध असे न म्हणता आपले विहित कर्म करणे म्हणजे धर्म होय.

    धारणात धर्मः अशी व्याख्या सुद्धा केलेली आहे. पण आम्ही व्याख्या आणि व्याकरण सुद्धा मानणार नाही, असे म्हणणाऱ्या मंडळींना काय म्हणावे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा

    विज्ञान शाप की वरदान-भाग तीन

    यंत्रांची निर्मिती ही टेक्नाॅलाॅजीची म्हणजे तंत्रज्ञानाची देणगी आहे की विज्ञानाची या वादात अडकून न पडता, आज या नवनवीन साधनांमुळे पूर्वीचा होणारा व्यायाम बंद झालाय, हे तरी मान्य करावेच लागेल. जाते, पाटा वरवंटा आता कोकलून सांगितले तरी शहरातील बायका काही या वस्तु परत वापरणारच नाहीत. परंतु भारतातील सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागात राहाते आहे. भारतातील जवळपास पन्नास टक्के ग्रामीण भागात विज्ञान आणि तंत्रज्ञान अजूनही पोचलेले नाही.

    ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्वाईन फ्लु सारखे साथीचे रोग वेगाने पसरतात. हे आपण पहातोच आहोत. जेव्हा शहरातील एखाद्या बऱ्या न होणाऱ्या रूग्णाला, डाॅक्टर खेड्यामधे हवापालट करण्यासाठी जायला सांगतात.
    शहरीकरणाचे वारे न लागलेल्या अशा एखाद्या खेड्यातील घरात एसी नसला तरी आरोग्य दडलेले असते.

    अशी खेडीदेखील आता दुर्मिळ होत चालली आहेत. प्रत्येक गावामधे टाळू न शकणारी मोबाईलची रेडीएशन्स पोचलेली आहेत. कर्करोगाला निमंत्रण देणारी कोल्ड्रींक्स पोचलेली आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे.

    या सर्व परिस्थितीत आपण स्वतःला कसे सावरायचे आणि पुढील पिढीला कसे आवरायचे हाच प्रश्न आहे. एका बाजूने रासायनिक खतांचा मारा असलेले अन्नधान्य आम्हाला विकत घेऊन खावे लागते आहे तर दुसऱ्या बाजूने अशा खतांशिवाय आम्हाला पैसा मिळत नाही, असे सांगणारा, कर्जबाजारी शेतकरी आहे.

    एका बाजूने डाॅक्टर चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खा, फळे खा, असे सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूने रासायनिक द्रव्यांमधे बुडवून काढलेली फळे, सांडपाण्यावर पोसवलेल्या पालेभाज्याच उपलब्ध आहेत.

    औषधांशिवाय कसे जगता येईल हे सांगणारा आयुर्वेद एका बाजुला आहे तर औषधांशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही, हे सांगणारी वैद्यकीय प्रणालीचा प्रचंड प्रभाव सरकारवर आणि जनमानसात आहे.

    एका बाजूने नैसर्गिक जीवनशैली तर दुसऱ्या बाजूने कृत्रिमपणे आधुनिकतेचा बाज घेतलेली झगमगीत लाईफस्टाईल.
    एका बाजूने भारत तर दुसऱ्या बाजूने इंडिया, हा वाद सुरूच राहणार आहे.

    एका बाजुला आधुनिकीकरण, विज्ञान तंत्रज्ञान तर दुसऱ्या बाजुला निसर्गातील सहज ज्ञान.

    एका बाजूने औषधे घेत घेत केवळ आयुष्य वाढवणे तर दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने जीवन जगणे.

    पाकिस्तानशी खेळायचे असेल तर आम्ही स्वतःला हिंदुस्थानी समजतो, इतर देशाविरूद्ध मात्र इंडिया खेळतो. तर आयपीएल मधे सर्वधर्मसमभावाचे भूत डोक्यावर नाचवीत गळ्यात गळे घालून मिरवतो.......

    या परिस्थितीमधे स्वतःला कसे जगवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

    पुढे धोका आहे, हे समजून उमजून तसेच हट्टाने पुढे जायचेच असेल तर कोणी कोणाला अडवणार नाही, पण आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या या घोड्याला जोपर्यंत भारतीय आध्यात्मिक दृष्टीचा लगाम नसेल तर विनाश अटळ आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.05.2017

  • विडा घ्या हो नारायणा – भाग १

    देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा.