कोणी छानसा विनोदी चुटकुला सांगितला आणी सगळे जण हसायला लागले कि त्या व्यक्तीला दाद देण्यासाठी म्हटले जाते कि तुमच्या विनोदाने तुम्ही छान हास्याची खसखस पेरलीत.तर असा हा गरम मसाल्यातील पदार्थ.खरे तर ह्या अफूच्या बोंडामधील बिया होय पण ह्या मात्र अफूच्या प्रमाणे मादक नसतात.
खसखसचा उपयोग गरम मसाल्या मध्ये,तसेच खीर मिठाई इ पदार्थ बनवताना केला जातो.साधारण रव्या प्रमाणे दिसणारी हि खसखस देखील आपण घरगुती उपचारांमध्ये वापरू शकतो बरे का!
खसखस हि चवीला गोड,थंड असून शरीरामध्ये वात कमी करते व कफ दोष वाढवते.चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना?
१)संडास मधून आव पडत असेल तर चमचाभर खसखस दह्यात वाटून खावी.
२)खसखस,बदाम,चारोळी,समभाग घेऊन वाटावी व तिची गाईच्या दूधात खीर करावी त्यात १ चमचा साजूक तूप व १ चमचा गुळवेल सत्व आणी थोडी खडी साखर घालून हि खीर अशक्त व्यक्तीने खाल्ल्यास शरीरात ताकद वाढते.
३)काही व्यक्तींच्या डोक्यात केसांच्या मूळांशी बारीक फोड येतात त्यांनी दुधामध्ये खसखस वाटून केसांच्या मुळाशी लावून दोन तास ठेवून मग केस धुवावे.
४)पुष्कळ सुका खोकला येत असेल तर १ चमचा खसखस गाईच्या दुधात शिजवून खीर करावी व हि खीर गरम असताना खावी उपशय मिळतो.
५)सोमरोग अर्थात काही स्त्रीयांना लघ्वीच्या मार्गातून सारखे पाणी जात असते त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन त्यांना अशक्तपणा येतो ह्यामध्ये मुठभर खसखस रात्री पाण्यात भिजत घालावी व सकाळी वाटावी नंतर त्यात २ चमचे लोणी+ १ चमचा खडीसाखर + १/२ चमचा वेलची पूड घालून हे मिश्रण तिला सतत किमान तीन ते सात दिवस खायला द्यावे.
खसखस अतिप्रमाणात खाल्ल्याने मद वाढून अति झोप येऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 23, 2016
अकरावा भाग खास
विशेष आहे अभ्यास ।
धरूनी सर्व शास्त्रास
नैसर्गिक उपवास ।।
August 11, 2016
ताटात वाढलेलं जेवण ताटातून तोंडात आणि आता पोटात जाणारे. आपल्याला हवं तसं संस्कारीत करून अन्न खाल्ले. घश्यातून जेवढे बारीक होऊन उतरायला हवं तेवढं दातांनी दाढांनी, सुळ्यांनी बारीक केलं. दात दाढा सुळे प्रत्येकाचे काम वेगवेगळे. ज्याला जी जबाबदारी दिली आहे, तेवढं काम निमूटपणे करत असतो. कोणतीही तक्रार नाही, कोणतीही भांडणे नाहीत, मलाच मोठे तुकडे बारीक करायचं काम का, मी लहानच तुकडे बारीक करणार. मला नाही ते काम आवडत, मला आपलं एवढंच जमेल, असं कोणताही दंतप्रकार म्हणत नाही. मोठे तुकडे आपोआपच सुळ्यांनी फोडले जातात. फोडलेले तुकडे दाढांकडे येतात, ते बारीक करून झाले की, परत इकडे तिकडे फिरवून काही शिल्लक राहिले नाही ना, याची चाचपणी मधे मधे जीभ करत असते, काही काम बाकी राहिले असेलच तर दात आहेतच. दातांना घट्ट धरून ठेवायला हिरडी आहेच. म्हणजे दात घट्ट हवेत तर हिरड्याही तेवढ्याच मजबूत पाहिजेत. नाहीतर ज्या घराचा पाया कमकुवत असतो, ती घरे कितीही सुंदर टाईल्सनी सजवलेली असली तरी छोटा भुकंप सगळं घर उद्ध्वस्त करून टाकतो, तसं एखादा खडखडा लाडू किंवा चिक्की चा तुकडा देखील, सगळे दात खाली पाडू शकतो.
एकमेकांना पूरक असलेले हे इंजिनियरींग आधी नीट शिकले तर अन्य कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही समस्या सोडवता येतील, असे वाटते.
कोणतेही अन्नावशेष बाहेर पडू नये यासाठी गाल आहेत. ज्यांचे गाल कॅन्सर सारख्या आजाराने काढावे लागलेत, त्यांच्या व्यथा लक्षात घेतल्या की गालाचे महत्व समजते. केवळ गालावर खळी पुरते गाल लक्षात ठेवायचे नाहीत.
ज्या विधात्याने हे सर्व निर्माण केले तो केवढा मोठा स्ट्रक्चरल इंजिनिअर असेल ना !
बारीक झालेले अन्न घश्यातून आत खाली जाऊ शकेल अशी खात्री झाली की, जीभ आपले काम करते. आणि अन्न खाली उतरवले जाते.
ढकलून दिले जात नाही, तर सापाच्या तोंडातून जसे अंडे हळुहळू आत सरकवले जाते, तसा अन्नाचा गोळा आत लहरीप्रमाणे सरकवला जातो.
अगदी अलगद लहरेदार !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
25.03.2017
March 27, 2017
जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.
वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.
मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.
पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.
दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.
कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.
जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
पायांना भक्कम आधार हवा,
पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
21.09.2016
September 21, 2016
दिवसा सूर्य असतो. रात्री सूर्य नसतो.
सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पचनाला मदत करणारा. म्हणून तर आयुर्वेदात एक वचन आहे, आरोग्यम् भास्कराद् इच्छेत. म्हणजे आरोग्य ठीकठाक ठेवण्यासाठी सूर्याची भूमिका महत्वाची आहे.
सर्वात शुद्ध काय असते ? अग्नि सर्वात शुद्ध. सूर्य म्हणजे अग्नि. सूर्य म्हणजे शुद्धता. सूर्य उगवला की बाकी सर्व जीवजंतु नष्ट व्हायला सुरवात होते. या सूर्याची उष्णता त्यांना सहन होत नाही, आणि त्यातील काही जीवजंतुंचा जन्म संपतो.
आपण सूर्याला केंद्रस्थानी मानतो. आपली भूमाता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. केवळ भूमाता नाही तर तिचे सर्व मंगळ, बुध, गुरू, शनि, शुक्र हे सर्व भाऊबंद, आपल्या मुलाबाळांसह याच सूर्याला केंद्र मानतात. आणि त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालत आपली कामे करीत असतात.
आपण आपली दिनचर्या पाळतो. सकाळी उठतो, रात्री झोपतो. पशुपक्षीदेखील, सकाळी उठतात, रात्री झोपतात. म्हणजेच सर्व निसर्ग या सूर्याच्या अधिकारात काम करत असतो.
आजच्या वैज्ञानिक नियमानुसार "फोटो सिंथेसिस" ही प्रक्रिया देखील सूर्यावरच अवलंबून असते. पानातील हिरवा रंग देखील याच सूर्यामुळे मिळतो. रक्तातील लाल पेशी वाढायला, कॅल्शियम वाढायला, आणि मुख्य म्हणजे व्हिटामिन डी वाढायला फक्त सूर्य मदत करतो. कोणत्याही प्रकारे व्हिटामिन डी कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. जरी जाहिरातीतून तसे दावे केले जात असले तरी, जाहिरातीमधे दाखवतात, ते सर्व खरे कुठे असते ? असो.
तर आपण सूर्यवंशी आहोत. सूर्य उगवतो, त्याच्या स्वागताला आपण आधी उठतो, तो मावळला की आपले सर्व व्यवहार बंद करीत झोपी जातो. हा निसर्ग नियम आहे.
या सूर्याला साक्षी ठेवूनच आपण आपली सर्व महत्त्वाची कामे करीत असतो. जसे नेहमीचे पोटभरतीसाठीचे व्यवसाय, लग्न, मुंज, वास्तुशांत, गृहप्रवेश, होमहवन, वाढदिवस, देवदर्शन, बारसे, इ शुभकार्ये दिवसाचीच केली जातात. कधी विचार केलाय, असं का, असा ?
तेव्हा उत्तर मिळालं, सूर्य असतो म्हणून.
तसेच जेवणे हे जर यज्ञकर्म असेल तर ( तर म्हणजे ते यज्ञकर्मच आहे. वदनी कवल घेता...... जाणिजे यज्ञकर्म । ) ते सुद्धा सूर्य असे पर्यंत पार पडले पाहिजे ना !
म्हणूनच सूर्य असे पर्यंत जेवावे, कारण आपणही याच निसर्गाचा एक हिस्सा आहोत ना !!
तेच नियम आपणही पाळले पाहिजेत, जे "त्याने" ठरवून दिलेले आहेत.
निसर्गापुढे आपली बुद्धी म्हणजे किस झाड की पत्ती !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.02.2017
February 27, 2017
हि मध्यम उंचीच्या सुगंधी व्रुक्षाची पाने असतात.ह्यांचा उपयोग आपल्या स्वयंपाकात तसा पुष्कळ होतो असे नाही पण काही खास व्यंजनांमध्ये हटकून ह्याचा वापरहोतो.पुलाव,बिर्याणी,मसालेभात,तसेच गरम मसाला ह्यात ह्याचा वापर होतो.ह्याच्या विशिष्ट सुगंधाने हे पदार्थ जास्त खमंग लागतात ह्यात वादच नाही.
गोड,तिखट,कडू अशी ह्याची मिश्र चव असते आणी हि उष्ण असतात.ह्यास बोलू भाषेत तेजपत्ता असे ही म्हणतात.ह्याचे देखील काही औषधी उपयोग आहेत ते आता आपण पाहूयात.
१)१/२ चमचा तमालपत्र चुर्ण+४ चमचे लिंबाचा रस + १/२ ग्लास कोमट पाणी हे मिश्रण जेवताना मध्ये मध्ये थोडे थोडे घेतल्यास अन्नपचन नीट व्हायला मदत होते.
२)ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांनी १/२ चमचा तमालपत्र पूड +१/४ चमचा हिंग+ २ चमचे लिंबाचा रस+१ चमचा आल्याचा रस हे मिश्रण गरम पाण्या सह घ्यावे.
३)वारंवार जुलाब होत असल्यास १/२ चमचा तमालपत्र चुर्ण+१/२ चमचा सुंठ पूड गरम पाण्यासोबत घ्यावी.
४)ज्या स्त्रीयांना वारंवार गर्भपात होण्याची सवय असते त्यांनी १/२चमचा तमालपत्र पूड + ६ चमचे केळफूलाचा रस हे मिश्रण सलग तीन महीने घ्यावे पण क्रूपया वैद्यांचा सल्ला देखील घ्यावा हि विनंती.
५)सर्दी,डोकेदुखी,नाक चोंदणे ह्यात तमालपत्र पूड हुंगावी कफ पातळ होऊन पडतो.
तमालपत्र अधिक मात्रेत घेतल्यास पित्ताचा त्रास आणी शरीरातील धातू क्षीण होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 22, 2016
कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.
समर्थ म्हणतात,
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दुराभिमान
मत्सरे करी ।।
आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.
जसे काम तसे तसा आहार.
कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
" तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",
तर तो म्हणेल,
"काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.
आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.
म्हणजे
काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
ऊन्हात काम आहे की एसी मधे.
ऊद्याची चिंता आहे की नाही.
शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
गरज म्हणून की हौस म्हणून.
जीभेसाठी की पोटासाठी.
जीवासाठी की जातीसाठी.
हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
विचार वेगळा करावा लागेल. लागतो.
इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.
मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
24.09.2016
September 24, 2016
केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.
म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !
थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.
हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.
त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.
आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.
तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
यालाच म्हणतात,
चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
माझे काही चुकलंय का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.02.2017
February 22, 2017
भारतीय संस्कृती’ असा शब्द उच्चारला की, काही जणांच्या नाकाला अगदी मिरच्या झोंबतात. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं म्हणजे कालबाह्य गोष्टी ऐकायच्या, जग चाललं चंद्रावर आणि हे बेणं सांगतंय धोतर नेसाया हवं. असे काहीसे नाराजीचे सूर दिसतात.
February 3, 2018
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 38
नैवेद्यम् समर्पयामी - भाग बारा
अन्नंब्रह्मारसोविष्णुर्भोक्तादेवोमहेश्वरः।।
अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्नाच्या सहा चवी या स्वयं विष्णु आहेत. आणि भोजन करणारा हा प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव आहेत. म्हणजे आपण जे जेवतो ते भोलेनाथांसाठी असा भाव ठेवावा.
अहं वैश्वानरोभूत्वाप्राणिनांदेहमाश्रितः।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नंचतुर्विधम् ।।
अमृतोपस्तरणमसी...पाश्य मौनी ।
.....जलंस्पृष्ट्वा यथेष्टं भोजनंकुर्यात् ।।
एकदा जेवायला सुरवात केली की जेवण संपेपर्यंत मौन पाळावे. यथेष्ट (यथेच्छ नव्हे ! यथा इष्ट, म्हणजे जे आपल्या प्रकृतीला योग्य असेल ते! आणि यथेच्छ म्हणजे मला जे खावेसे वाटते ते. किती फरक आहे ना ! शेवटी आरोग्य महत्त्वाचे!
जेवण पूर्ण झाले की, जी आपोषणी घ्यायची असते, त्या पळीभर पाण्यामधील अर्धे पाणी अंगठ्यावरून पितरांसाठी जमिनीवर सोडायचे असते.
किती सूक्ष्म विचार केला आहे पहा, हात आणि तोंड धुवायला अंगणामधे जावे. (ताटामधेच किंवा बाऊलमधेच पुचुक पुचुक करू नये.) येताना पायावर बाहेरील जमिनीवरचे जे जीवजंतु अंगावर येऊ नये म्हणून परत येताना सुद्धा हातपाय धुवूनच घरात यावे. (अंगणादौ पाणिमुखेसंशोधयेत् । हस्तौ पादौ प्रक्षाल्याचम्य शतपदनिगत्वा।)
हातपाय धुवून येताना पोटावर हात फिरवत यावे आणि अग्निदेवतेला सांगावे, "मी जे अन्न खाल्लेलं आहे ते, काहीही शेष न राहाता जिरून जावे. या देहाला सुख प्राप्त व्हावे, या अन्नामुळे माझे सर्व शरीर रोगरहित व्हावे."
हे म्हणत म्हणत, असा भाव मनात ठेवत, पोटावरून उलटसुलट हात फिरवावा, म्हणजे जेवताना अन्नपाण्याबरोबर गिळली गेलेली हवा किंवा पचनामधून तयार झालेला वात बाहेर येतो. (ज्याला आपण ढेकर म्हणतो.) आणि पचन सुधारते.
(....इत्युदरंपरिमृज्य.....)
(ही सर्व संस्कृत अवतरणे ऋग्वेदीय ब्रह्मकर्म या पोथीतून घेतली आहेत.)
जेवण झाल्यावर पोटावरून हात फिरवणे ही किती छोटी गोष्ट आहे, ( असे रोज दोन्ही वेळा करावे, म्हणजे आपले पोट किती वाढत आहे याकडे आपले लक्ष वेधले जाते हा दूरदृष्टीचा अॅगल ) पण तेवढा सुद्धा वेळ आपल्याकडे असत नाही. पोट पुढे यायला लागले की मग मात्र पोट पुढे आलेल्याच डाॅक्टरांच्या दवाखान्यात किती वेळ जातो, याचे मोजमापच नाही. ????
भोजनापूर्वी कुत्रा, मांजर, पोपट आदि पाळीव प्राणी यांना जेवू घालावे. घरासमोर आलेल्या अतिथीला अन्नदान करावे. घरामागे बांधलेल्या गाईवासरांसाठी गोग्रास काढावा. जेवायला सुरवात करताना भूतबली काढावा, कावळ्याला घास ठेवावा. आणि जेवणानंतर पितरांसाठी अन्नपाणी द्यावे.
असा समष्टी विचार भारत सोडून अन्य कोणत्याही देशात केला जातो का ? केला जात असेल का ?
नक्कीच नाही.
म्हणून तर संपूर्ण जगामध्ये फक्त आपल्या प्रिय भारत देशाला "माता" असे संबोधले जाते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
01.07.2017
July 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti