(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग ३ 

    हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव.

  • किचन क्लिनीक – शेंगभाज्या – फरसबी

    हिला वालपापडी असे देखील म्हटले जाते.संपुर्ण भारतात ही भाजी अत्यंत प्रसिध्द आहे.विशेषत: चायनीज पदार्थ बनवताना हिचा भरपूर वापर केला जातो.तसेच पंजाबी डिशेस मध्ये देखील हि वापरतात.हिची भाजी,उसळ देखील केली जाते.तसेच बिर्याणी,पुलाव ह्याच देखील हि घालतात.

    २-३ हात उंचीच्या झाडाला ह्या फरसबीचा शेंगा लागतात.ह्या कोवळ्या शेंगांचा वापर खायला केला जातो.हि भाजी चवीला गोड तुरट असून थंड असते त्यामुळे ती शरीरातील वात दोष वाढविते व कफपित्त हे दोष कमी करते.

    चला तर आता हिचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)गजकर्णा मध्ये फरसबीच्या पाल्याचा रस व लसणीचा रस एकत्र करून लावावा.

    २)खोल चरणा-या जखमेमध्ये फरसबीच्या पाल्याच्या रसात कापुस बुडवून वात करावी व दर दिवशी अशी नवीन वात त्या जखमेत ठेवावी साधारण पणे ३ आठवड्यात जखम भरते.

    ३)डोळ्यांची शक्ती वाढवायला इतर उपचारांसह रोज रात्री कोवळ्या फरसबीची भाजी जेवणात ठेवावी.

    ४)ज्या मधुमेह झालेल्या व्यक्तिच्या लघ्वीतून साखर जात असेल त्याला कोवळ्या फरसबीच्या शेंगा उकडून त्याला हळदींची फोडणी देऊन खायला द्यावी.

    फरसबी खायचा अतिरेक केल्यास पोटात दुखणे व संडासला घट्ट होण्याची तक्रार होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • विडा घ्या हो नारायणा – भाग १

    देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा.

  • याला जीवन ऐसे नाव अंतिम भाग ४०

    पाण्याचा सारांश

    पाणी पिताना तहान लागेल तेव्हाच प्यावे.
    तहान असेल तेवढेच प्यावे.

    तांब्या पितळीच्या कल्हई केलेल्या पातेल्यातील प्यावे, नाहीतर मातीचे मडके उत्तम.
    काच किंवा स्टील हे सुद्धा चांगले पर्याय आहेत, पण प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी ? कभी नही. विष आहे ते. आज दुधही प्लॅस्टिकच्या पिशवीतच मिळते. प्रत्येक वेळी हे प्लॅस्टीक फूड ग्रेडचे असेल, यावर माझा तरी विश्वास नाही.

    सकाळी उठल्यावर गरज असल्यास फक्त आठ घोट पाणीच प्यावे, ते सुद्धा तोंड धुवुन, दात घासून झाल्यावरच ! त्याअगोदर नाही.
    पाणी जेवता जेवताच प्यावे. सकाळी तहान नसताना, रात्री झोपताना, कधीही अधेमधे उगाच बाटली दिसली की, रात्री जर लघवी करून आले तरी पाणी शक्यतो नकोच.

    पाणी जेवताना जरूर प्यावे आणि जेवणानंतर पचन पूर्ण झाल्यावर, दोन तासांनी शरीराने मागितले तरच. नाहीतर फक्त एखादा कप भर. मिक्सरचे काम झाल्यावर मिक्सर कसा धुवुन ठेवला जातो, तसं.

    पावसाचे पाणी जमिनीला लागायच्या अगोदर साठवले तर शुद्धीकरण नको. नाहीतर शुद्ध केल्याशिवाय अजिबात नको.

    अति पाणी अतिरिक्त पिल्याने मधुमेह, मुतखडे, किडनीचे आजार, त्वचाविकार, दमा, अॅलर्जी, कफाचे सर्व आजार, जलोदर, संधीवात, सूज येणे, पीसीओडी, थायराॅईड, सारखे आजार तसेच वाताची दुखणी वाढतात. रक्तदाबासारख्या आजारात जर शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढणे, ही चिकित्सा असेल तर वरून पाणी का ढोसावे ?

    अजीर्ण, अपचन सारख्या आजारात अन्य काही न खाता, केवळ गरम गरम पाणी पिणे हे औषध आहे.

    प्रदेशानुसार पाणी आपले गुणधर्म बदलते.

    तहान लागली तर पाणी जरूर प्यावे. पण तहान हा रोग असेल तर मात्र साधे पाणी हे औषध नाही. त्यासाठी काही औषधे घालून मसाला पाणी घोट घोट घ्यावे.

    सूर्यास्त झाल्यावर पाणी पचनशक्ती बिघडवते, म्हणून रात्रौचे जेवण देखील सायंकाळीच करावे.
    संडास साफ होण्यासाठी पाणी पिणे भ्रामक आहे. पाणी संडासवाटे बाहेर पडतच नाही, ते लघवीवाटे बाहेर पडते. म्हणजे पुनः किडनीना गरज नसताना अतिरिक्त काम.
    मग संडास साफ कसा होणार ? त्यासाठी जेवताना तेल कच्च्या स्वरूपात वापरावे, आणि जेवताना गरम पाणी वापरावे. बात खतम.

    ग्रीष्म आणि शरद ऋतु सोडून निरोगी माणसाने देखील पाणी कमीच प्यावे.

    पाणी तोंडात घोट घोट घेऊन, घोळवून मगच हे लाळमिश्रीत पाणी प्यायले तर पचन सुधारेल.

    फ्रिजमधले पाणी. ना रे बाबा ना !

    आपण उजव्या हाताने जेवतो, पानातील उजव्या बाजुचे पदार्थ भरपूर खावेत, पण डाव्या बाजुचे पदार्थ कमी खावेत. म्हणून भारतीय परंपरेत पाण्याचे भांडे डाव्या बाजुला ठेवतात.

    सर्वात महत्वाचे आपण भारतात राहातो, भारतातील सर्व नियमांनी आपण बांधलेलो आहोत. उगाच पाश्चात्यांनी सांगितले म्हणून आपण तसेच वागायचे, हा गुलामीचा भ्रामक मूर्खपणा आता बंद करूया,
    भारतीय आहोत, भारतीय म्हणून जगुया.

    पाणी हे जसे जीवन देणारे आहे, तसे आलेला जलप्रलय जीवन उद्ध्वस्त करून जातो, हे पण लक्षात ठेवूया !

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.01.2017

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तीन

    आयुर्वेद समजून घेताना

    विशाल आयुर्वेद समजून घ्यायला, वृत्तीचा दिलदारपणा, चातकाची तहान, मनाचे मोठेपण, देवावर श्रद्धा, गुरूंवर विश्वास, भिकाऱ्याजवळचा निर्लज्जपणा आणि भावना टिपणारे तरूणीचे ह्रदय हवे. हे गुण नसल्यास ते आत्मसात करावे लागतील.तरच आयुर्वेद म्हणजे काय ते समजायला लागेल. कायद्यावर बोट ठेवून आणि महाविद्यालयात शिकून तीन तासात पेपर लिहून, पाच वर्षानी हातात उत्तीर्ण असे प्रशस्तीपत्र मिळाले तरी, आयुर्वेद समजतोच असे नाही.

    अभ्यासासाठी ग्रंथकारांनी याचे तीन भाग केलेत. शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिक. जसा रोग तसे त्याचे कारण. जसे कारण तसे औषधी उपाय योजना करणे, म्हणजे चिकित्सा करणे. रोग जर. शारीरिक कारणामुळे झाला असेल, तर उपाय देखील शरीरावर हवा, तिथे आश्वासन देऊन किंवा मानस चिकित्सा करून फरक पडणार नाही. जसे, पायात काटा गेलाय तर उपाय त्याच पायावर, तिथेच, करायला हवा, ज्या पायात काटा घुसलाय. इथे मंत्र म्हणून काटा बाहेर येणार नाही.

    पायात काटा गेलाय असे सारखे वाटत रहाणे, तपासण्या केल्या तरी त्यात काहीही व्रण किंवा काटा न दिसणे अशा लक्षणामधे मानसोपचारच उपयोगी पडणारा असतो जो, शंका या रोगाचे समाधान करतो.

    आणि सतत एकाच पायात, एकाच ठिकाणी, एकाच कारणानी, वारंवार काटा टोचणे आणि व्रण बरा न होणे, आणि याची सकृतदर्शनी कोणतेही कारणे लक्षात न येणे, यासारखी लक्षणे ही रोगाचे मुळ आत्मदोषापर्यंत नेऊन पोचवतात.

    भुवया उंचावून बघण्याची गरज नाही. हो. हा आत्मदोष जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा मान्य केला आहे. आज अंधश्रद्धा निर्मूलनसारख्या काही संघटनांच्या विरोधामुळे व्हावे तसे संशोधन या विषयावर होत नाही, ही खंत जरूर आहे. असे होऊ नये, आमचे शास्त्र लेबल बदलून, भाषा बदलून, 'त्यांना' ( म्हणजे पाश्चात्य लोकांना ) हवे तसे अर्थ काढून, आम्हालाच शिकावे लागणार आहे. वेदांचे पण तेच झाले आहे. मॅक्समुल्लरला समजलेला भारताचा इतिहास आज आम्हाला शिकावा लागत आहे. जो अतिशय चुकीचे अर्थ शिकवतो.

    शुद्धिकरण मुळापासूनच भारतीय मानसिकतेचा, भावनांचा विचार करून व्हायला हवे. केवळ शब्दाला प्रतिशब्द देणे म्हणजे वेदांचे प्रतिसंस्करण नव्हे. हे आयुर्वेद शिकताना लक्षात घ्यायला हवे.

    ही मानसिकता झाल्यावरच आयुर्वेदाचा श्रीगणेशा आरंभ होईल.

    आयुर्वेद समजून घ्यायला ती विशिष्ट दृष्टी हवी. जसं भगवान श्रीकृष्णांचे विराट रूप बघण्यासाठी अर्जुनाची सामान्य दृष्टी बदलून, वेगळी विशाल दृष्टी होणे आवश्यक होते, तसे आहे. भगवंत गीतेमधे हेच सांगत आहेत. मोक्ष समजून घ्यायला, कर्तेपण लयाला जायला, मी कोण हे शोधताना ती वेगळी विशाल दृष्टी आवश्यक आहे.

    भगवंताची कृपा झाल्यावर संजयाला आणि अर्जुनाला ती दृष्टी प्राप्त झाली. आपण सारे अर्जुन आहोत, या भावनेने जर भगवंताकडे ती दृष्टी मागितली तर तो निश्चितच ती दृष्टी देतो. फक्त भाव अर्जुनाचा हवा.
    ........आणि भक्तीदेखील !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    13.02.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग २२

    पाणी शुद्धीकरण भाग दोन

    पाणी भरपूर प्या, या वैद्यकीय सल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, "पाणी शुद्ध कसे करा" हे मात्र सांगितले जात नाही. "इट इज नाॅट अवर बिझनेस" असं म्हटलं की विषय संपत नाही राव !

    आर ओ फिल्टर वापरणे, वाॅटर फिल्टर वापरणे, ते स्वच्छ करणे, ठराविक दिवसांनी आतील फिल्टर, फिलामेंट, कॅन्डल जे काही असेल ते बदलणे, इ.इ. हे केले जातेय का ? कसे करायचे हे सुस्पष्ट सांगितले जातेय का ?

    परदेशी टेक्नाॅलाॅजी वापरून पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग, त्यातील पारदर्शकता अजूनही स्पष्ट होत नाही. एखादी कंपनी स्वतःची जाहिरात करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जावून एकमेकांच्या जाहीरातींशी जणुकाही स्पर्धाच करत असतात. मग त्यातील खरेखोटेपणा कसा तपासणार ?

    शेवटी जो दुसऱ्यावरी अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला हेच खरे !

    पाणी शुद्ध करण्यासाठी अस्सल भारतीय पद्धतींचा अभ्यासच होत नाहीये, या निमित्ताने आपण एक जल शुद्धीकरण मोहीम राबवूया. या मोहिमेअंतर्गत आपल्या प्राचीन अथवा आजही ज्या पद्धतीने जलशुध्दीकरण केले जात होते, त्या पुनः एकदा प्रकाशात आणूया. पुढील पिढीला या पद्धतींची ओळख तर करून देऊया.

    जसे पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातील गढुळपणा कमी होतो, पण तळात हा गढुळ भाग साठून रहातो. नंतर गाळून वरील स्वच्छ पाणी वेगळे करता येते.

    आपल्याला माहिती असलेली पाणी शुद्धीकरणाची एखादी पारंपारिक स्वदेशी पद्धत सांगा. त्यातील दोष त्रुटी कमतरता शोधून काढू. त्या दूर कशा करता येतील यावर चर्चा करू. मत मांडायला तज्ञच असले पाहिजे असे नाही.

    शाळेतदेखील आपल्याला पाणी शुद्ध करायच्या काही कृती शिकवल्या होत्या. शाळा आठवून पहा......

    नाहीतर आजी आजोबांना विचारा. या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधा. नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी, कोणीतरी विचारल्याने त्यांना पण आनंद होईल. आपल्याही मताला आज कुणीतरी तिसरी पिढी विचारणारी आहे, असं त्यांनाही वाटेल.

    ज्यांनी आपल्या जीवनातले अनेक चढउतार पाहिलेले आहेत, यशस्वीपणे पार केलेले आहेत, त्यांना 'या जीवनाच्या' शुद्धीकरणासाठीचा एखादा पर्याय सहज सुचेल. विचारून तर बघा.
    "आजी आजोबा घरातील पाणी कसे शुद्ध करीत होते".....

    घ्या वही पेन, द्या मुलांच्या हातात! सांगा आजीआजोबांची मुलाखत घ्यायला !! करूदेत शब्दबद्ध !!!

    जीवनाचा सर्वात मोठा भाग, ज्या 'जीवनावर' आहे, त्या अशुद्ध जीवनाकडे इतक्या उदासीनपणे बघून चालणार नाही.
    जीवनाचे शुद्धिकरण झालेच पाहिजे!!!

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    29.12.2016

  • आहारातील बदल भाग ६ – शाकाहारी भाग एक

    आपल्या अवतीभवती जे प्राणी आहेत, त्यांचे परीक्षण केले असता, असे लक्षात येते की, जगात कुठेही यांना बघीतलेत किंवा अभ्यासले तरी या प्राण्यांची वैशिष्ट्ये तीच रहातात. दक्षिण आफ्रिकेमधला कावळा काळाच असतो आणि अमेरिकन कावळा पण काळा तो काळाच ! रंगात बदल नाही, गुणसूत्रात बदल नाही, आहारात बदल नाही, की सवयी मधे. त्याचे काव काव ओरडणे सगळीकडे सारखेच ! कावळा हा एक स्वतंत्र अभ्यास करण्यासारखा विषय आहे. पुढे कधीतरी.

    आपण मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली आता शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये तपासून बघूया.

    सर्व शाकाहारी प्राणी जसे गाय, बैल, हत्ती, घोडा, गाढव इ.इ. पाणी पिताना ओठाने पितात, म्हणजे दोन्ही ओठांचा वापर करून पाणी ओढून घेतात व घोटतात. जीभेचा वापर नाही. जीभ फक्त अन्नाला तोंडातल्या तोंडात, इकडून तिकडे ढकलण्यासाठी, फिरवण्यासाठी वापरली जाते. आणि चव घेण्यासाठी सुद्धा ! पण यांच्या जीभेला धार नसते, खाचा नसतात. लाळ असते ती पण खूपच बुळबुळीत. एकावेळी भरपूर पाणी तोंडात ओढून घेता येते. गाय किंवा बैल पाणी पिताना आपण बघीतले आहेच.

    खाल्लेले अन्न, पाला बारीक तुकडे करून पोटात गिळले जातात. यासाठी यांच्या जबड्यात दातांची एक वेगळीच रचना दिसते. यांच्या वरच्या जबड्यातील दातामधे दोन दात सुळे प्रकारातील असतात. ज्यांना थोडेसे टोक असते. घास तयार करण्यासाठी हे सुळे त्यांना उपयोगी पडतात. जे खाल्ले आहे, ते तोंडातून परत बाहेर पडू नये यासाठी पण या सुळ्यांचा वापर केला जातो. गाय बैल घोडा यांच्या जबड्यात अशीच रचना असते. मुद्दाम बघा. यांच्या खालील जबड्यात सुळे असत नाहीत.

    यांना अन्नाचे मोठे तुकडे गिळता येत नाहीत. थोडे बारीक करावे लागते. रवंथ करावे लागते, पीठ करून आत ढकलावे लागते, म्हणून यांच्या जबड्यात वर आणि खाली दाढा जास्त यांच्या मधे जे काही येईल त्याचे पीठच.

    यांची लाळ जास्त बुळबुळीत असते. कारण पाल्यात भरपूर प्रमाणात असणाऱ्या स्टार्च किंवा शर्करेला पचवणारे " पिट्यूलीन" हे एक एन्झाईम यांच्या लाळेत जास्त असते.
    (जे एन्झाईम मांसाहारी प्राण्यांच्या लाळेमधे उपस्थित नसते. कारण त्यांना त्याची गरजच नसते. कारण मांसाहारामधे स्टार्च चे प्रमाण जवळपास नसतेच, किंवा अपवादानेपण अगदीच कमी असते. त्यामुळे त्यांच्या लाळेमधे स्टार्च पचवणाऱ्या एन्झाईमची आवश्यकताच नसते.
    पण मांसामधे प्रोटीन्स जास्त असतात. हे प्रोटीन्स पचवण्यासाठी आवश्यक असलेली एन्झाईम्स, पोटात हायड्रोक्लोरीक अॅसिड सारख्या रूपात भरपूर प्रमाणात निर्माण झालेली असतात.)

    चावून चावून चावून चावून गिळल्यामुळे लाळेची निर्मिती जास्त होते. हे एन्झाईम जास्त पाझरते, पचन सुलभ होते. या लाळेमुळेच गाय बैल या शाकाहारी प्राण्यांना, गिळलेले अन्न पुनः तोंडात आणणे आणि सावकाशपणे रवंथ करणे सोपे होते.
    कोणीतरी मांसभक्षी आपल्याला खाईल, या भीतीने, दिवसभर बकाबका खाऊन घ्यायचे, मग निवांत सुरक्षित ठिकाणी येऊन खाल्लेले परत पचवायचे.
    या दोन वेळा केलेल्या पचनामुळे या प्राण्यांना पण अपचन, अजीर्ण, पोटफुगी, गॅस, ढेकर यातले काही त्रास होत नाहीत.

    भक्ष्याला पकडायचे नसल्यामुळे पायाची नखे स्थिर असतात. त्यांना आपण खूर म्हणतो. गाय बैल, यांचे खूर विभागलेले असतात, तर घोडा, गाढव यांचे खूर विभागलेले नसतात. पण यांना टोके नसतात. हलवता येत नाहीत. जर यांना टोके असली असती तर चालणे मुश्किल झाले असते, जीव वाचवण्यासाठी पळणे किंवा धावणे दूरच राहिले. म्हणजे शाकाहारी प्राण्यांची नखे आत बाहेर करता न येणे, ही त्यांच्यासाठी "त्याने" दिलेली देणगीच म्हणायची !!!

    त्यांना जगवण्यासाठी केलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजेच ईश्वर !!!!

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    27.09.2016

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३९

    प्रशंसनीय पाणी भाग चार

    आपण म्हणता, पाणी कमी प्यायचे, पण.....
    काही जणांना शंका येतेय, आम्हाला मुतखड्याचा त्रास आहे, मग काय करायचे ?
    आम्हाला उष्णतेचा त्रास आहे मग आम्ही काय करायचे ?

    हो. नक्कीच पाणी गरजेप्रमाणे प्यायचे. धने जिरे घातलेले पाणी, गोड ताजे ताक, पिकलेल्या नारळाचे पाणी, बारली धान्याचे पाणी, लाह्या शिजवलेली खीर, वेगवेगळी सरबते, रसदार फळे, इ. अनेक उत्तम पदार्थ आपल्या देशात उपलब्ध आहेत.
    आणि हे पर्याय सुद्धा लिमिटेडच प्यायचे हा. नाहीतर याचेच अजीर्ण व्हायचे. म्हणून वैद्याच्या सल्ल्यानेच हे वापरले तर अधिक चांगले !

    उष्णता किंवा मुतखड्यासाठी कोल्ड्रींक्स पिणे किंवा बियर मारणे(?) ही कल्पना अभारतीय आहे. जिथे ऋतुनुसार बाराही महिने फळे मिळतील, अशा भारतात विषारी कार्बन डाय ऑक्साईड घातलेली पेय किंवा मद्यार्क अक्षरशः ढोसली जाताहेत, यापेक्षा दुर्दैव ते काय ? प्यायचंय ते पाणी. कोल्ड्रींक्सही नको, किंवा हाॅटड्रिंक्स !

    गरजेएवढे पाणी घेतले तर किडनींना सुद्धा तेवढीच विश्रांती! नाहीतर जास्त ढोसलेल्या पाण्याचा निचरा करता करता, तिचा बिचारीचा जीव अगदी मेटाकुटीला येत असेल.

    पाणी कमी प्यायला हवं असं नाही. पण जास्ती नको. एवढंच सांगायच आहे. पाण्याविषयी इतके गैरसमज, एवढ्या कमी काळात वाढतील असं वाटलं नव्हतं.

    सावकाश जेवावे, असे आपण म्हणतो, ते कृतीने अपेक्षित नाही तर अवकाशाने अपेक्षित आहे. पोटाचे चार भाग कल्पिले तर त्यातील दोन भाग घन अन्नाने, एक भाग द्रव आहाराने तर एक भाग अवकाश म्हणजे मोकळा ठेवावा. तरच पुढे अन्न छान घुसळले जाते. घुसळण्याच्या प्रक्रियेत पाणी आणि आकाश महत्वाचे आहे.

    मधे मधे पाणी प्यावे म्हणजे प्रत्येक घासाला पाणी प्यायलेच पाहिजे असेही नाही हं. इतके पाणी प्यावे की पोटाला अन्न चिकटूनही राहाणार नाही किंवा एकदम पुढे वाहूनही जाणार नाही. दोन भाग घन आहारात एक भाग पाणी हे प्रमाण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवले की झाले.

    हे पाणी सुद्धा मधेमधे घातले तर अन्नरस नीट तयार होतो.

    पारंपारिक देवपूजेमध्ये नैवेद्य दाखवताना पाणी ताटाभोवती फिरवायला सांगतात. कृती नीट आठवून पहा. मधेच पाणी खाली सोडायला सांगतात.
    मधे पाणी कशासाठी ?
    मध्ये पानीयं समर्पयामी. याचा भाव असा आहे की नैवेद्य दाखवताना देवासाठी मधेमधे पाणी प्यायला द्यावे. जे देवासाठी करतो ते उत्तमात उत्तम असते.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा नियम मान्य केला तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतात.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    15.01.2017

  • आहाररहस्य १५

    जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – अंतिम भाग पंचवीस

    निरोगी कोण ?

    आपण नक्की निरोगी आहोत का, हे समजण्यासाठी ग्रंथात एक व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या अधिक सोपी करून सांगितली तर समजेल.
    आपल्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे तीन दोष. सात धातु जसे, रस म्हणजे रक्ताला पातळपणा निर्माण करणारा द्रव पदार्थ, रक्त, मांस, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा म्हणजे हाडे कवटी इ. च्या मधला भाग म्हणजे जसे मेंदू, आणि शुक्र म्हणजे शक्ती हे सात धातु, मल, मूत्र, घाम हे तीन मल आणि आर्तव. हे सर्व आपल्या 'देवदत्त' प्रमाणात हवेत. म्हणजे देवाने दिलेले.

    यांच्या बरोबरीनेच, मन आत्मा इंद्रिये यांचे प्रसन्नत्व ओळखावे. तो निरोगी होय.

    जन्माला येताना जे शरीर संघटन असते, तसेच रहाणे म्हणजे आपली प्रकृती. ही प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. त्यात सहसा बदल होत नाही. जन्मतः जे शरीर संघटन असते, ते बदलत नाही. अगदीच मोठ्ठे उलथापालथ करणारे आजार झाले तरच शरीर संघटन बदलते. आणि याचे आपल्या दैनंदिन जीवनावर कोणतेही नकारात्मक परिणाम दिसले तर ती विकृती समजावी.

    जिममधे जाऊन फक्त मांस धातुचे संघटन बदलवू शकतो. मना मार्फत, विशिष्ट व्यायामांनी अग्निचे कार्य बदलवू शकतो. प्रकृती बदलवता येत नाही.

    प्रकृती आणि अग्नि सोबतच आणखी दोन गोष्टींचा विचार पचनामधे महत्वाचा असतो, कोष्ठ आणि सार. या दोन गोष्टींना सामान्य परिभाषेत समजावणे हे जरा अवघड आहे.
    कोष्ठ परीक्षणामधे, एखाद्याचा कोठा कसा असतो, याचे अनुमान केले जाते. व्यवहारात आपण म्हणतो, हलका कोठा, जड कोठा, मध्यम कोठा. स्रोतसांची आतड्यांची गती कशी आहे, त्यावर दाब किती आहे, हालचाली किती आहेत, अन्न पुढे पुढे सरकायला किती वेळ लागतोय, यावर कोठा ठरत असतो. हा सुद्धा सहसा बदलत नाही. ठरलेला असतो. प्रत्येकाचा "नाॅर्मल" वेगळा असतो. हे पण लक्षात ठेवावे. जर काही त्रास नसेल तर आपणच आपले ठरवून, ओढून ताणून बदलवणे घातक असते. काही जणांना दोन नंबरला औषधे घेऊनसुद्धा समाधानकारक होत नाही, हे कोष्ठावर अवलंबून असते.

    आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सार. मूळ प्रकृतीशी जवळ जाणारे, पण आपले स्वतःचे वैशिष्ट्य असणारे, प्रकृतीहून भिन्न असणारे हे परिक्षण असते. सारता ही धातूंवर अवलंबून असते. एखादी रस सार व्यक्ती ही रसरशीत दिसते. तिचे डोळे पाणीदार असतात. तिच्याकडे बघितल्यावरच प्रसन्न वाटते. त्वचा तुकतुकीत चमकणारी असते. अशी सात धातुंच्या सात सार परीक्षा करायच्या असतात. जसा वैद्याचा अनुभव वाढत जातो, तसा एखाद्याचा सार निर्णय त्याला सहज घेता येतो. आणि औषध ठरवावे लागते.

    म्हणजे एखाद्याला "तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल " असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा सर्व तपासणी म्हणजे पॅथालाॅजीची तपासणी अपेक्षित नसते तर आयुर्वेदीय पद्धतीने, हे सार परीक्षण, अग्नि परीक्षण, कोष्ठ परीक्षण करणे अपेक्षित असते, जे कोणत्याही पॅथ लॅबमधे शक्य नसते.

    पोट दाबून ते हलके आहे का, घट्ट लागते का, तिंबलेल्या कणकेप्रमाणे मऊ आहे की, आठ दिवस फ्रिजमधे मळलेली कणिक ठेवल्यानंतर जशी लागते, तसे पोट घट्ट लागते का, हे तपासून च ठरवता येते ना ?

    या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध पचनाशी येत असतो, त्यावर औषधे त्यांचे प्रमाण, औषध कशाबरोबर घ्यायचे, मधातून, तुपातून, दुधातून ते अनुपान, सकाळी, दुपारी, सायंकाळी रात्री , जेवतानामधे मधे, जेवणापूर्वी, जेवणात मिसळून, जेवणानंतर कधी घ्यायचे हे ठरवावे लागते.

    आयुर्वेद म्हणजे चार दोन मुळ्या एकत्र करायच्या, कशात तरी उकळवून कशाहीबरोबर, केव्हाही घ्यायच्या, एवढं सोप्प नाहीये. घरगुती औषधे सांगायला खूप मर्यादा येतात हे लक्षात ठेवावे. घरगुती उपाय करणे हा फक्त त्यावेळी अचूकपणे उपयोगी होणारा नुस्खा असतो. त्याला अनेक मर्यादा येतात. हे या निमित्ताने लक्षात घ्यावे. घरगुती (यथा मिलीतोपचार द्रव्यैः ) उपाय करणे म्हणजे आयुर्वेद चिकित्सा करणे नव्हे.
    पण जे उपलब्ध आहे त्यातच, हाताशी आहेत ती द्रव्ये वापरून, रूग्णाच्या आत्यंतिक वेदना कमी करण्याचे सामर्थ्य फक्त आयुर्वेदातच आहे.

    आपण निरोगी आहोत की नाही, हे कसे ठरवावे ?

    सकाळी हलकेच जाग यावी.
    उठल्यावर लगेच "ती" जागा आठवावी.
    पोट, शरीर हलके ही प्रसन्नता अनुभवावी.
    समाधानाची अनुभूती घ्यावी.
    सणसणीत भूक लागावी.
    मनमोकळ्या आहाराने ती भरावी.
    दिवसभर गाडी पळवावी.
    तरी सायंकाळी रिझर्वावर न यावी.
    शक्ती पुरवून वापरावी.
    विझत्या अग्नीवर पुरेशी लाकडे घालावी.
    पुनः भुकेची जाणीव व्हावी.
    हलक्या आहाराने ती पुरी करावी.
    झालेली कामे सहज आठवावी.
    ही ईश्वराची कृपा समजावी.
    आणि मस्त झोप यावी.
    निश्चिंत मनाने जबाबदारी सोपवावी.
    "तो" मला उठवणार, याची खात्री असावी.
    आणि सकाळी हलकेच जाग यावी.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.04.2017