(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्पेशल एक्स-रे (आय.व्ही.पी)

    ex - आय.व्ही.पी. हा स्पेशल एक्स-रे मूत्रपिंडाचा त्रास असणार्‍या बर्‍याच रुग्णांस माहीत आहे. या एक्स-रेमुळे मूत्रपिंडे कार्य करतात की नाही हे समजते.

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग दहा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सोळा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आप्त म्हणजे ज्याला आपली निरपेक्ष काळजी आहे.
    अशी अनेक मंडळी आपल्या आसपास असतात, ज्यांना आपली काळजी वाटते. पण ही माणसे कधीच समाजासमोर येत नसतात. पडद्यामागून आशीर्वाद देण्याचे काम करत असतात.

    अशा मंडळींना संत असे म्हणतात. यांनी त्यांचे चांगले विचार स्वतःमध्ये एवढे रूजवलेले असतात, की त्यांच्या संपर्कात जे येतील, त्यांनाही चांगला विचार करणे भाग पडते. या संपर्काला सत्संग म्हणतात.

    यांना ओळखायचे कसे ? हे आपल्या सान्निध्यात आले की, यांची वंदावी पाऊले..., ...तोची दिवाळी दसरा, असे आपल्याला वाटले पाहिजे ते संत.

    ग्रंथकार असे म्हणतात, की सतत यांच्या सेवेत राहिले म्हणजे आरोग्य मिळते. यासाठी आप्त-उपसेवित असा शब्द शास्त्रकार वापरतात.

    सेवा असोत वा उपसेवा म्हणजे इथे कुणाचे पाय चेपणे, त्यांच्या घरची बाजाररहाटादि कामे करणे, त्यांची सतत चमचेगिरी करणे नव्हे, ही असली कामे तर राजकारणी लोकांचे फंटर देखील करत असतात. किंवा पेड सर्व्हंटदेखील करत असतात. सेवा या शब्दाचा त्याहीपेक्षा वेगळा अर्थ इथे अपेक्षित आहे.

    आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या अशा संत लोकांमधील आप्त असण्याचे गुण शोधणे, आणि सतत ते गुण आपल्या अंगी आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे म्हणजे सेवा.

    संत म्हणजे प्रत्येक वेळी भगवे कपडे, गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, कमंडलू घेतलेले, सर्वसंग परित्याग केलेले, घर दार सोडून, बायको मुलांना टाकून, हरिहरि करत असतात असे नाही. तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक. ऐसी मती जयाची स्थिर असे सज्जन लोक हे पण आप्तच असतात.

    अशी मंडळी प्रसिध्दीपरान्मुख असतात. आतून बाहेरून वेगळे नसतात. सतत सकारात्मक विचारात असतात. त्यांचे विचार त्रिकालाबाधीत स्थिर असतात, बोलणे कमी आणि कृती जास्त असते.

    बाह्यलक्षणावरून यांना ओळखता येत नाही. त्यासाठी तशीच संतदृष्टी असावी लागते. तरच ते आपल्या आत प्रकट होतात. आणि चांगले विचार करायला लावतात. कारण ते आपले असतात. आप्त असतात.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०५.०८.२०१७

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग सात

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे एकोणपन्नास
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग सात

    न हुं कुर्याच्छवं पूज्यं प्रशस्तान मंगलानि च !
    कोणाच्याही मृत शरीर म्हणजे शवाकडे पाहून तिरस्कार युक्त हुऽऽ असे तुच्छता पूर्वक संबोधू नये.

    मरणानंतर वैर संपते, नंतर त्याच्या शवाची हेटाळणी किंवा विटंबना होऊ नये. श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर त्याचे केलेले और्ध्वदेहिक प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवरायांनी अफजलखानाला वधल्यानंतर त्याचे थडगे बांधले. दुर्दैवाने पश्चात या थडग्याचे रूपांतर वातानुकूलित महालामधे केले गेले, हे उदात्तीकरण न्यायालयाने देखील अव्हेरले आहे. या उलट पाकिस्तानी सैनिकांनी अनेक वेळा भारतीय सैनिकांच्या मृतदेहाची केलेली विटंबना आपणाला आठवण असेलच. इथे भारतीय संस्कारांचे महत्त्व लक्षात येते.

    प्रसिद्ध व्यक्ती, विद्वान व्यक्ती, कुठेही दिसल्या तरी त्यांना नमस्कार करावा. एवढेच नव्हे तर सिद्ध वनस्पती दिसताच त्या वनस्पतीना देखील नमस्कार करावा. सिद्ध म्हणजे ज्यांचे औषधी गुणधर्म प्रसिद्ध आहेत अशा वनस्पतीना मनोमन वंदन करावे.

    वेली वनस्पतीना देखील भावना असतात, त्यांना देखील स्पंदने कळतात. प्रत्यक्ष डोळे नसले तरी आजुबाजुला काय आहे, याची माहिती त्या घेत असतात. त्याचा आधारही आपल्या तंतु प्रतानाद्वारे घेतात. आपल्या आवाजाला, बोलण्याला, स्पर्शाला त्या प्रतिसाद देतात. माणसाच्या सहवासाने चाफा बहरतो, लाजरी स्पर्श झाला की लाजते, राहत्या घराजवळील काजु अधिक फळ देतो. हे तर प्रत्यक्षात दिसते.

    आपला जन्म ज्या नक्षत्रावर झालेला असतो, त्या नक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो. म्हणजेच आपला तो वृक्ष आराध्य असतो. आपले रक्षण करणारा आपला वृक्ष आपल्याला माहिती हवाच. जेव्हा कुठेही उत्तर सापडत नाही, तेव्हा हा वृक्ष आपले आरोग्य रक्षण करायला मदत करतो.

    नक्षत्र वृक्ष या कन्सेप्ट अनुसार काही ठिकाणी नक्षत्र उद्यान, हर्बल गार्डन, सुरू झालेल्या आहेत.

    नक्षत्र कोणतेही असो. वनस्पतीचे संरक्षण तर झालेच पाहिजे. त्यासाठी वनस्पतींची ओळख करून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आजुबाजुला असंख्य वनस्पती दिसतात, त्यांची नावे औषधी गुणधर्म आपणालाच माहिती असत नाहीत. हे गुणधर्म जर समजून घेतले तर अनेक छोट्या छोट्या आजारामधे आपण त्या वापरू शकतो. आणि हे ज्ञान फक्त आयुर्वेदच देऊ शकतो.

    या वनस्पतीचे संरक्षण व्हावे, यांची ओळख पुढील पिढीला व्हावी, एखादी वनस्पती आपल्या जवळपास कुठे आहे याची आपल्याला माहिती असावी, यासाठी देवाच्या नावाने पत्री पूजा वाहाण्याचे कर्मकांड आपल्या धर्मात सांगितलेले आहे. वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, आवळी भोजन, कुष्मांड नवमी, शमी आपट्यासाठी दसरा, दुर्वांसाठी गणपती, बेलासाठी महादेव, देवीसाठी कमळ, विष्णुंसाठी तुळस, मारूतीरायासाठी रूईची माळ, अशा अनेक वनस्पतीसाठी अनेक सण आणि देवता निश्चित करून ठेवण्यामागील दृष्टीकोन लक्षात घ्यावा. म्हणजे या प्रथा आणि कर्मकांडे का सुरू झाली याची उत्तरे सहज मिळतील.

    प्रत्येक वनस्पतीकडे आदराने पहावे, तिच्यातील औषधी गुणाचे ज्ञान मिळवावे, तिचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी या वनस्पतीना देवतेसमान दर्जा देणारे आमचे ऋषी खरंच "ग्रेट" होते.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०७.०९.२०१७

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३७

    पाण्याची प्रशंसता भाग दोन

    जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाडी वाढते. असं वाग्भटजी म्हणताहेत. असं नव्हे तर व्यवहारातही तेच दिसते. जसं जेवायच्या अगोदर पाणी प्यायले की अग्नि कमी होतो, पचन मंदावते आणि कृश होतो. तसं जेवणानंतर पचन सुरू करण्याचे सिग्नल गेलेले आहेत, ( गाडीमधे प्रवासी जेव्हा पूर्ण क्षमतेने प्रवासी भरलेले आहेत, वाहकाने दोनदा घंटा वाजवलेली आहे, ) आणि आता आपल्याला काम सुरू केले पाहिजे असे वाटून पोटाने आतल्या आत स्वतः भोवती फिरायला सुरवात केलेली आहे. तेवढ्यात प्रचंड पाण्याचा धबधबा वरून आत येतो. काय होईल, जरा कल्पना करून पहा.
    (गाडी सुरू झालेली आहे, दोन घंटा दिलेल्या आहेत. आतमध्ये माणसे दाटीदाटीने ठासून भरलेली आहेत, तेवढ्यात आणखी चार पाच माणसे हात दाखवून गाडी थांबवताहेत, तेव्हा जर चालकाने गाडी थांबवली तर बसलेले प्रवासी कसे कलकलाट करतात.)

    सारंच बिघडून जातं. फिरणारी यंत्रणा सावकाश होते. मुख्य म्हणजे आतले तापमान बदलते. सुरू झालेली गाडी परत थांबते. कलकलाट सुरू होतो. कोणी का कशासाठी आधी येता येत नव्हतं का, आधीच उशीर झालाय, आणि इथे जागा तरी कुठेय, चला हो तुम्ही पुढे, येतील ती मागच्या गाडीने, या प्रकारचे उदगार गाडीत सुरू होतील. बरोबर आहे ना ?

    अगदी तसंच पोटात सुरू होतं.
    ऊर्ध्वम आमाशयात कफम् अंते करोति स्थूलत्वम् म्हणजे वरच्या पोटापासूनच चिकट कफाची संचिती म्हणजे साठवणूक सुरू होते. जाडी वाढायला इथेच सुरवात होते.

    जेवणानंतर लगेचच पाणी ढोसल्याने हे परिणाम दिसतात. आणि हे पाणी जर फ्रीजमधले गारेगार असेल तर आणखीनच सत्यानाश. म्हणजे जेवणानंतर लगेच गरम पाणी प्यायले तरी नाही हो चालत. एकदा मिक्सर सुरू केला की आता मधे थांबणे नाही.

    आणि पचनाला जेव्हा हवे तेव्हा पाणी देणार नाही, नको तेव्हा ते आत भरणार त्याचा काय उपयोग ?

    म्हणजे मरताना उपयोगी पडावी म्हणून काशीहून गंगा आणून ठेवली होती. तहानेने जीव जायची वेळ आली तरी म्हणायचे, मरताना शेवटचा घोट गंगेचा जावा, म्हणून आणली आहे तर आत्ताच कशाला फोडा, नंतर उघडू. आता बाटली फोडली तर नंतर काय उपयोग ? हा विचार करेपर्यंत प्राण गेलेले असतात. आता बाटली फोडली तरी गंगा पोटात काही जात नाही. ज्यावेळी जी गंगा पोटात जायला हवी, त्याचवेळी ती पोटात गेली तर उपयोग.
    घोडे नाचवून मजा बघायची असेल तर वराती मधेच घोडे नाचले पाहिजेत.
    वराती मागून घोडे नाचवून काय उपयोग ?

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    13.01.2017

  • किचन क्लिनीक – काही दुधांचे उपयोग भाग २

    ब) म्हशीचे दुध:

    १)भस्मक रोगात किंवा जेव्हा अतिभूक लागते व काही खायला न मिखाल्याच त्रास होतो तेव्हा नियमीत आहार मध्ये म्हशीचे दुध,तुप,लोणी हे पदार्थ असावेत.

    २)रात्री शांत झोप लागण्याकरिता म्हशीच्या १ ग्लास दुधात १/४ चमचा जायफळ घालून उकळावे व खडीसाखर घालून हे दुध प्यावे.

    ३)ज्या पुरूषाचे पुरुष बीज प्रमाण कमी असते त्यांनी आहारात म्हशीचे दुध,तूप व लोणी वापरावे.

    म्हशीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्यास अती झोप येते व स्थूलपणा येऊ शकतो.

    क) बकरीचे दुध:

    १)टिबी,खोकला,छाती व बरगड्या ह्यात वेदना होणे ह्यात बकरीचे दुध पिणे उत्तम.

    २)वारंवार होणाऱ्या जुलाबात बकरीचे दुध फायदेशीर ठरते.

    ३)डोळ्यांचा थकवा,डोळे दुखणे,ह्या तक्रारीमध्ये बकरीच्या दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.

    बकरीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्याने संडासला घट्ट होऊ शकते.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग चार

    आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.

    यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.

    मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.

    नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.

    रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.

    मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.

    आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.

    हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.

    जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.

    प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.

    निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
    याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.

    अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
    .....आणि वैद्यांनी सुद्धा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.02.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग चार !

    एक माणूस सोडला तर कोणी पशुपक्षी सहसा आजारी पडत नाहीत, हे कटु सत्य आहे. इतर प्राणी आणि माणूस यात एक धर्म सोडला तर बाकी आहार निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टी समान आहेत. या अर्थी एक सुभाषित पण शिकल्याचे स्मरते.

    या सगळ्या पशुपक्ष्यांना नियत आयु मिळाली आहे. निसर्गाचे वरदान आहे. निसर्गच त्यांना शिकवत असतो. प्रत्येकाचा आहार ठरवून दिलेला आहे, त्यात ते बदल करीत नाहीत. गाई म्हैशीला कितीही उपाशी ठेवले तरी मांस भक्षण करणार नाही, वाघसिंहाला कितीही उपाशी ठेवले तरी ते गवताला तोंडही लावणार नाहीत. यामुळे की काय त्यांचे आरोग्य चांगले रहाते. शिकार करून पोट भरलेले असले तर समोर हरीण फिरले तरी सिंह त्याच्याकडे बघत सुद्धा नाही,

    पोपट फक्त झाडावरचाच पेरू खातो, शिळा पेरू अजिबात खात नाही. शिळा म्हणजे झाडावरून जमिनीवर पडलेला सुद्धा खात नाही. कावळ्याला मात्र किडे पडलेला उंदीर सुद्धा चालतो, किंवा विष घालून मारलेला उंदीर देखील चालतो. गटारात पडून मेलेला पण चालतो, अपघाताने गाडीखाली सापडून मेलेला उंदीर ही त्याची जणुकाही फीस्टच !

    प्रत्येक पशुपक्ष्याच्या नवीन पिल्लांसाठी प्रत्येक वेळी नवीन घरटे बांधले जाते. जुन्या घरट्याचा वापर कुंभारमाशीदेखील करत नाही. फळांनी लगडलेल्या झाडावर पक्ष्यांचे घरटे दिसत नाही, छोटे पक्षी छोट्या झाडांवर तर, गरूडासारखे मोठे पक्षी मोठ्या झाडाच्या अगदी वर घरटे बांधतात. ही यांची जीवन वैशिष्ट्य दिसतात. स्वतः जगण्यासाठी किंवा त्यांचा वंश वाढण्यासाठी असे करणे त्यांना निसर्गाने शिकवलेले असते.

    जाती वर्ण भेदानुसार हे वरवर दिसणारे फरक असले तरी सूर्यास्त झाल्यावर मात्र कोणीच खात नाही, हे मात्र वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

    माणसाने पाळलेल्या प्राण्यांमधे मात्र ही वैशिष्ट्ये बदललेली दिसतात. माणसाप्रमाणे, माणसाने पाळलेल्या पशुपक्ष्यांनीही आपली जीवनपद्धती बदलली आणि माणसांप्रमाणे त्यांनाही डाॅक्टरांची गरज भासू लागली.

    निसर्गात आढळणारे प्राणी आणि माणसाच्या अवतीभवती वावरत असले तरी, माणसाने ज्यांना पाळलेले नाहीत, अश्या पशुपक्ष्यांनी मात्र आपली जीवनपद्धत बदललेली नाही.

    त्याचाच परिणाम म्हणून असेल, पण सर्व कावळे एकाच आकाराचे दिसतात. एक जाड, एक बारीक, असे दिसत नाही. जसा कावळा तशीच चिमणी, तसाच पोपट, तसेच कबुतर.

    निसर्गातील सर्वच प्राणी आहेत त्या आकारामधे बंदिस्त आहेत....
    .
    .
    .
    .
    .
    .

    फक्त माणूस सोडला तर !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    09.05.2017

  • बाकूची/बावची

    ह्याचे ०.५-१.५ मी उंच वर्षायू क्षुप असते.काण्ड सरळ असून फांद्या मजबूत असतात.पाने २.५-८ सेंमी लांब किंचित गोल अथवा हृदयाकृती,एकान्तर असतात पत्र धारा दन्तुर असतात.फुले पिवळसर निळे पुष्प दंड मोठा व त्यात १-३० फुले गुच्छात उगवतात.फळ काळे व गुच्छात येते.बीज काळे लहान कोवळे व विशिष्ट उग्रगंधी असते.बीज मगज पांढरा असतो.

    बाकुचीचे उपयुक्तांग बीज व बीज तैल आहे.हे चवीला गोड,कडू,तिखट असून उष्ण आहे.तसेच हल्के व रूक्ष आहे.बाकुची कफवातनाशक व पित्त प्रकोपक आहे.

    चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)कृमींवर ५ दिवस बाकुची चुर्ण देऊन मग त्यावर एरंडाचे तेल पोटात देतात संडासला पातळ होऊन कृमी पडून जातात.

    २)श्वित्र कुष्ठात व जीर्ण त्वचारोगात बाकुचीचा उपयोग होतो.

    ३)उष्ण असल्याने बाकुची कामोत्तेजक आहे म्हणून ती क्लैब्यात वाजीकर कार्य करते.

    ४)खरजेवर बाकुचीबी व कारळे गोमुत्रात वाटून लेप लावतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©Dr Swati Anvekar

  • प्रमुख आहारसूत्र – भाग १३

    घुसळण्याची' प्रक्रिया महत्वाची. दही 'घुसळण्याच्या' प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते.

    या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो.
    जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप धावले की पाय गरम होतात, विचार खूप झाले तर डोस्कंही गरम होते, वृक्ष एकमेकांना घासले की प्रत्यक्ष वडवानलच तयार होतो. घर्षणाचा अग्निशी अगदी जवळचा संबंध असतो, हे तर आपण व्यवहारातही बघतो.

    हा अग्निच रूपांतरणाची प्रक्रिया घडवण्यासाठीचे मुख्य कारण आहे. जेवढा अग्नी जास्ती, तेवढे रूपांतरण जास्ती.

    रूपांतरण म्हणजे बदल. किंवा आपण असेही म्हणू शकतो, की जिथे जिथे बदल होतो तिथे तिथे अग्निचे कार्य सुरू असते. बदल म्हणजे अग्नी.

    तांदुळ आणि पाणी एकत्र करून बदल होत नाही, तर त्याला योग्य अग्नी दिला तर त्याचे रूपांतर भातामधे होते, नाहीतर एकतर मऊभात अन्यथा खरपूस खमंग !

    कुठेही गेलात तरी अग्नीचे कार्य लक्षात घ्यावेच लागते.
    हा अग्नी प्रमेहामधे विचारात घ्यावा लागतो. क्लेद कमी करण्यामधे अग्नी महत्वाचा. म्हणजे प्रमेहाचा मुख्य शत्रु जो क्लेद, तो नष्ट करणारा अग्नी, हा प्रमेहाचा शत्रू ठरतो. प्रमेहाचा शत्रू तो आपला मित्र !

    दही घुसळण्याच्या प्रक्रियेत अशीच अप्रत्यक्ष उर्जा तयार होते.
    आता दही घुसळणे कसे करतो यावर त्यातील क्लेदाचे रूपांतरण होणे अवलंबून आहे. ही युक्ती आहे.
    हाताने लाकडी रविने दही घुसळणे, ताकमेढीला दोरी गुंडाळून दोन्ही हाताने उलटसुलट रवि घुमवणे, आणि मिक्सरमधून दही फिरवणे, आणि चमच्याने दही ढवळणे, या कृतीवर तयार होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता ठरत असते. चमच्याने दही कालवण्यामुळे केवळ त्यातील वायु बाहेर पडेल, त्याची वडी मोडेल, एवढेच काम होईल, पण 'क्लेद' कमी होणार नाही. क्लेद कमी होण्यासाठी आणखी उष्णतेची गरज असते.

    हो. हो. हो. दही गरम करता येईल का असं अजिबात मनातही आणू नका. ओहोऽऽऽ.
    दही गरम करायचे नाही. कधीही नाही. अगदी पंजाबी ग्रेव्हीमधे पण नाही.

    कोणत्याही गोष्टीत इन्स्टंट, शाॅर्टकट उपयोगी नाही. ज्या गोष्टीला जेवढा वेळ जाणं अपेक्षित असते, तेवढा वेळ देणं अपेक्षितच असते. नाहीतर एक वर्षाच्या पोरग्यानं बाबांचा शर्ट घातला आणि बूटात पाय घातले तरी तो 'बाप' होत नाही ना !

    तसंच दह्याचंही आहे. त्याचे रूपांतर ताकात करताना काही काळ जाणं अपेक्षित असतं. सावकाश आणि सतत घुसळणं,
    हो, हातानं रवीनं घुसळणं वेगळं, रवी दोरीला बांधून घुसळणे वेगळे, मिक्सरमधून फिरवण्याची तऱ्हा वेगळीच ! आणि लस्सी करणं वेगळं. प्रत्येकावर होणारी अग्नीची प्रक्रिया वेगळी !
    इथं प्रत्येकाचं वेगळेपण वेगळं....
    त्याचंच नाव आयुर्वेद !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.01.2017

  • नैवेद्य भाग १

    गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना बघीतलंय ? नीट बघा.
    कर्मकांडामधे आयुर्वेद कसा भिनलाय पहा.
    नैवेद्याच्या ताटात पंचपक्वान्न सजलेली असतात.पाच प्रकारच्या भाज्या असतात. कोशींबीर, चटणी, वरण भात तूप असतेच.
    नैवेद्य दाखवताना मंत्र आहेत.
    प्राणाय स्वाहा
    अपानाय स्वाहा
    व्यानाय स्वाहा
    उदानाय स्वाहा
    समानाय स्वाहा
    ब्रह्मणे स्वाहा
    सहा वेळा हे मंत्र म्हणत ताटाभोवती पाणी फिरवायचे असते. हे घास आपण देवाला भरवतोय आणि देव जेवतोय, असा नामदेवाचा भाव मनात हवा.

    लक्षात आले का , हे वायुचे पाच प्रकार आहेत. यातील प्रत्येक घास प्रत्येक वायुला अर्पण केला आहे. "आता याची जबाबदारी तुझी. पुढे न्यायचे, आणि पोटातील पाचकाग्नीच्या ताब्यात द्यायचे.माझी जबाबदारी संपली." आजच्या भाषेत रिले रेस !

    त्यांच्या नावाचा पुकारा करून स्मरण केले की, तो तो वायु सूक्ष्म रूपात तिथे हजर राहून आपली जबाबदारी पूर्ण करतो.

    एखाद्या संघटनेमध्ये कसे कामाचे वाटप केले जाते. पाहुण्यांची जबाबदारी एकाने, निमंत्रणे दुसर्‍याने, रंगमंच व्यवस्था तिसर्‍यावर, चौथा भोजन. ज्याला जे काम नेमून दिले आहे ते तेवढेच सांगितलेले काम त्याने पार पाडायचे. दुसर्‍याच्या कामात जरापण ढवळाढवळ करायची नाही, तरच सगळी कामे उत्तमरीत्या पार पडतात. तसेच प्रत्येक वायुला, प्रत्येक पित्ताला काम नेमून दिलेले आहे. याची आठवण फक्त त्यांना नावे घेऊन करून दिली जाणे, म्हणजेच नैवेद्य दाखवणे.

    सहा वेळा पाणी फिरवून झाले की पुनः एक मंत्र म्हणतात,
    "मध्ये पानीयम् समर्पयामी "
    आणि ताम्हनात पाणी सोडायला सांगतात. म्हणजे देवाला अन्नाचे सहा घास भरवल्यानंतर भोजनाच्या मधे पाणी प्यायला दिले जाते. आणि पुनः सहा घास भरवले जातात.

    "जेवताना मधे मधे पाणी प्यावे," हा साधासोपा नियम या नैवेदयामी मधे दिसला.
    जे जे देवाला ते ते देहाला या नियमानुसार, तोच नियम आपणालाही लागू पडतो.

    ज्ञानमार्ग्याला या नैवेद्याच्या ताटात तूप वरण भात आणि गुळखोबर्‍यातल्या कॅलरीज दिसतील, त्या बर्न करण्यासाठी किती पॅडलमारावे लागतील, याचे गणित त्याच्या डोक्यात सुरू होईल.
    कर्ममार्ग्याला त्या मंत्रामागील अनुभव दिसेल, आणि ग्रंथोक्त रेफरन्स न शोधता, तो त्यामागील कार्यकारण भाव शोधेल.
    भक्तीमार्गी व्यक्तीला त्यातील भोळा अर्पणभाव दिसेल. देवाचा प्रसाद म्हणून, अन्य कोणताही विचार न करता, ताटाभोवती निःशंक मनाने तो पाणी फिरवेल.

    नैवेद्याचे भरलेले ताट तेच आहे, पण एखाद्या चिकित्सक मनात केवळ शंका आणि शंकाच येत रहातील. तो नजरेसमोर जिम ठेवील, त्याचे ग्रंथोक्त रेफरन्स शोधत बसेल आणि ताटाभोवती पाणी फिरवत उगाच नुसता चिखल करेल.
    बाकी तिघेजण, तो समोरचा नैवेद्य सहज फस्त करून टाकतील, पण चौथा वैद्य मात्र केवळ त्याची चिकित्साच करत बसेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    07.09.2016