लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6
एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात....... इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.
.......रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, "हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्." असं म्हणून टेबलावर आपटतात.
एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
असो.
.......तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, "बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! "
नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, "मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !" त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?
संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, "काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? " मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
ती तोंड एवढंस करत म्हणाली, " कशातच दोष मिळाला नाही."
"बरं झालं ना मग."
"एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?" आता मात्र मला हसू आले, "अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? "
म्हणाली,
"मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?"
बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.
आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
औषधे कोणाला द्यायची ?
जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????
शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
Please correlate clinically.
कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.
म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !
सुटले कोडे मिळाले उत्तर!
आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.02.2017
हे सर्व शरीर, मन, आत्मा, इंद्रीय व्यापार, संसार, प्रपंच, परमार्थ हे सर्व कशासाठी? असे चिंतन करताना जाणवते की, आपण या सृष्टीकर्त्यांच्या हातातील एक बाहुले आहोत. जसं रंगमंचावर एकेका कलाकाराचा प्रवेश होत असतो, त्याचा संवाद संपला की तो दुसऱ्या बाजूने रंगमंचावरून मागे जातो. पुनः तिस ऱ्या बाजूने पुनः प्रवेश घेतो. समोर काही पात्रे नाचत असतात. त्यांच्या बरोबर काही वेळ काही संवाद करायचे आणि पुनः निघून जायचे असते.

ह्याची वृक्षावर चढणार वेल असते.पाने १२-१५ सेंमी लांब व तीक्ष्णाग्र असतात.फुल लहान एकलिंगी व गुच्छात उगवते.फळ गोल मिरी प्रमाणे दिसते.पण ते गुळगुळीत व तांबूस रंगाचे व ६-८ मिमी व्यासाचे असते.त्याला वर एक छोटा देठ असतो व ते सुगंधी असून तोंडात धरले असता गार वाटते.
ह्याचे उपयुक्त अंग आहे फळ व तेल.कंकोळ चवीला तिखट,कडू असते व हे उष्ण गुणाचे असून हल्के रूक्ष व तीक्ष्ण असते.हे कफ व वातशामक असते.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)सुज व वेदना युक्त अवयवांवर कंकोळचा लेप करतात.
२)मुखरोगात कंकोळाचे फळ चघळायला देतात.
३)जखमेवर कंकोळाचे तेल लावतात.
४)कंकोळाने घामामुळे येणारी दुर्गंध नष्ट होते.
५)बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारीत कंकोळ उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 1
हिंदुधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामधे मूर्तीपूजा, पुनर्जन्म, श्राद्ध, एकत्र कुटुंब व्यवस्था, विवाह, उपनयन, प्रदक्षिणा, ओवाळणी, तेहेतीस कोटी देवता, दशावतार, देवपूजा, इ. अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
या वैशिष्ट्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांड आहे.
कर्मकांडाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर त्यातून काही गोष्टी शिकता येतात.
त्यातील काही गोष्टींचा आपण विचार जरूर करूया, जे आपण दैनंदिन जीवनामधे आचरणात आणत असतो. ते शोधण्यासाठी काही गोष्टींचा परत अभ्यास करूया.
आपण जे जे काही देवासाठी म्हणून करत असतो, ते खरं तर आपल्यासाठीच, आपल्या आरोग्यासाठीच असते. हा नियम ग्रंथोक्त (म्हणजे ग्रंथात वर्णन केलेला ) नाही. पण काही प्रथा कशा निर्माण झाल्या असतील, याचा घेतलेला हा मागोवा आहे. यात काही चुकत असल्यास जरूर सांगावे.
जसे देवपूजा करणे, देवपूजेसाठी काही उपचार केले जातात. पंचोपचार, षोडशोपचार इ.इ. यांचा काही विशिष्ट आध्यात्मिक अर्थ असणार आहेच, पण आरोग्याच्य दृष्टीने काही छुपे, गर्भित अर्थ आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करूया. जे नास्तिक आहेत, त्यांना या कर्मकांडामागील विचार पटला तर पटला.
केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ते हरये नमः श्रीकृष्णाय नमः पर्यंत ही चौवीस नावे घेतली जातात. ही नावे घेतली असताना ईश्वर प्रणिधान हे एक कर्म असते. नामस्मरण हा महत्त्वाचा हेतू असतो. हे नामस्मरण करत असताना भटजी एक पळीभर पाणी प्यायला सांगतात. याचा अर्थ काय आहे ?
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा विचार पटला की उत्तर मिळत जाईल.
देवपूजेची सुरवात या मंत्रानी होते. तेव्हा हे मंत्र म्हणताना घसा सुका असतो. हे मंत्र केवळ भटजींनी म्हणायचे नसतात, तर यजमानांनी सुद्धा म्हणायचे असतात. हे मंत्रोच्चार उच्चार करत असताना, त्यांच्या उच्चारांनी शरीरात एक उर्जा तयार होत असते. तसे या उच्चारामुळे आरोग्य देखील मिळते, असे मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीमधे लिहिलेले आहे.
या मंत्राच्या स्पंदनांचा, त्यातून वाढलेल्या उर्जेचा, त्याचा घशाला त्रास होऊ नये, हा एक हेतु. एकुण चौवीस वेळा ही नावे उच्चारली जातात. सत्यनारायणाची तर एक हजार नावे सांगितलेली आहेत. ही नावे कालानुरूप, कार्यानुरूप, गुणवाचक, काही कर्मवाचक आहेत. नावे ( मग त्याला ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, आकाशातला बाप म्हणा नाहीतर अन्य काही,) नावे कितीही असली तरी तो एकच आहे. हे त्यातून समजून घ्यायचे असते.
यातील पहिली तीन नावे म्हणत असतानाच एकेक पळी पाणी प्यायला सांगितले जाते. एकेक पळीच का ? तिथे एकेक ग्लास किंवा एकेक पंचपात्री भरून का सांगितले नाही.
जे पाणी तहान नसताना प्यायचे असते, ते पळीभरच प्यायचे असते. केवळ घसा ओला होण्यापुरते ! नाहीतर हे अतिरिक्त पाणी अग्निमांद्य निर्माण करणारे ठरेल, हा आयुर्वेदातील दृष्टीकोन देखील इथे परत एकदा सिद्ध होतो.
............. हरये नमः श्रीकृष्णाय नमः !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.05.2017
वदनी कवल घेता
नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते
नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा
अन्न हे पूर्ण ब्रह्म
उदर भरण होणे
जाणिजे यज्ञकर्म
हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया.
मुखी घास घेता करावा विचार.
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझे हाती नित्य देशसेवा
म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा
असा परिवर्तित श्लोक देखील म्हटला जातो. हे श्लोक सामुहीकरीत्या म्हटले जातात.
समुहाने किंवा एकत्रितरीत्या हे श्लोक म्हणण्याचा एक वेगळा अर्थ अपेक्षित आहे.
आपण सारे एक आहोत,
सहनाववतु सहनौ भुनक्तु
यामधे देखील तोच अर्थ अभिप्रेत आहे.
एकत्र बसून भोजन करणे, हे एकमेकांची शक्ती वाढवणारे आहे.
आजकालच्या प्रथेनुसार एकत्र जरी आलो तरी, बसून भोजन काही होत नाही. ते यथाकालोद्भव उभ्याउभ्याच होते. डाव्या हाताने कधीही वाढू नये, वाढून घेऊपण नये. पण डाव्या हाताने घेतल्याशिवाय बुफेभोजन होतच नाही. याकरीता, ( फार फार वर्षा) पूर्वी (सौ.) अन्नपूर्णा सर्वांना वाढून नंतरच आपण जेवायला बसत असे. जे काही हवे ते एकदाच घेऊन नंतरच ती जेवत असे. वाढपी लोकांची संगत हीच तिची पंगत. पण तिच्या चेहर्यावर इतरांना वाढण्याचे समाधान झळकत असे.
सर्व पदार्थ वाढून पूर्ण झाल्यावर, अन्नशुद्धी वाढली जाई.
अन्नशुद्धी म्हणजे लोणकढे तूप.
हे तूप (आडव्या चमच्याने) वाढून झाले की, आता आणखी पदार्थ ताटात येणे शिल्लक नाही, असा जणुकाही इशाराच जेवणार्यांना मिळत असे.
म्हणजे अन्नशुद्धी वाढून होईपर्यंत, समोर वाढलेल्या ताटाला हातही लावायचा नाही. असा अलिखित नियमच होता त्यावेळी.
कोशींबीर वाढून होईपर्यंत लोणचे संपलेले, भाजी येईपर्यंत कोशींबीर संपवलेली. याला सहभोजन म्हणत नाहीत.
आता पंगतही कालबाह्य झाली आहे.
एका ओळीत मांडलेली केळीची हिरवीगार पाने, त्यावर रंगीबेरंगी पदार्थांनी सजलेलं आणि गच्च भरलेलं ताट, उदबत्यांचा सुवास,
एका सुरात, एका तालात म्हटलेले श्लोक, हा सर्व माहोल पाहून आधीच अग्निनारायण अवतीर्ण झालेले असत. आणि वाट बघत बसलेले असत फक्त गजराची !
जय जऽय रघुवीर समर्थ ऽऽऽ
हरऽऽहर महाऽऽदेव
आणि नंतर आक्रमणाला जी सुरवात होई, ती अग्निनारायणाने अगदी तथास्तु म्हणेपर्यंत.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
04.09.2016
ह्याचे ०.३३-१ मी उंचीचे तृण जातीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे काण्ड पातळ,गडद व हिरव्या रंगाचे असते हे भौमिक काण्डापासून उगवते व वरच्या भागात त्रिकोणी असते.पाने लांब व मुळा सारखी असतात.फुले ५-२० सेंमी लांब असतात.काण्डाचा भौमिकभाग सुत्रवत भौमिक काण्डात रूपांतरीत होऊन त्याला १ सेंमी व्यासाचे बाहेरून काळे व आत धुरकट किंवा पांढऱ्या रंगाचे सुगंधी कंद येतात.
ह्याचे उपयुक्तांग कंद असून मुस्ता चवीला कडू,तुरट व थंड गुणाचा असून हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्तनाशक व वातवर्धक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)मुस्ता त्वचा रोगात लेपासाठी उपयुक्त आहे.
२)मुस्ता आमपाचक असल्याने पोटाच्या विकारात उपयुक्त आहे.
३)ताप आल्यामुळे लागणाऱ्या तहाने मध्ये मुस्ता सिद्ध जल देतात.
४)मुस्ता हा स्तन्यवर्धक व स्तन्यशोधक आहे म्हणून ह्याचा लेप बाळंतीणीच्या स्तनांवर करतात.
५)मस्तिष्क दौर्बल्यामध्ये मुस्ता गोदुग्धासह देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय,
हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग एक
आपण सूर्यवंशी आहोत. आपला दिवस सूर्योदयाला सुरवात होतो आणि रात्री संपतो. सर्वसाधारणपणे सगळीकडे असेच चालते. असेच चालावे, कारण दिवसा सूर्य असतो आणि रात्री सूर्य नसतो.
निद्रा म्हणजे झोप ही रात्रीच प्रशस्त आहे. शरीर दिवसभर काम करून दमते, त्याला विश्रांती ही हवीच ! अन्यथा इंजिनकडून फक्त काम करून घेतले गेले आणि पुरेशी विश्रांती दिली नाही तर इंजिनचे आयुष्य लवकर संपुष्टात येते. साधा ब्लेंडर आणला तर त्याच्यावर सूचना लिहिलेली असते. हे मशीन फक्त दहा मिनीटे सुरू ठेवावे. नाहीतर याची गॅरंटी वाॅरंटी काही मिळणार नाही. अगदी बारीक अक्षरात हे लिहिलेले असते. त्यामुळे कोणी नीटसे वाचत नाही, वाचले तरी फारसे लक्ष देत नाही, शेवटी परिणाम व्हायचा तोच होतो, मशीन अकाली बंद पडते.
इसापनीती मधील दोन कष्टकरी मुलांची ती गोष्ट आठवत असेलच ! वडील आपल्या दोन्ही मुलांना एका दिवसात जास्त उत्पन्न आणण्यासाठी काम करायला सांगतात. पहिला एक जण न थांबता, दिवसभर राब राब राबतो, न थांबता कष्ट करतो. न थांबल्यामुळे त्याच्याकडील हत्यारे देखील दमतात, त्यांची धार जाते. धार गेलेल्या हत्यारांनी काम करायला जास्ती शक्ती संपून जाते. उत्न्नावर परिणाम होतो. उत्पादन कमी भरते.
तर दुसरा मधे मधे थांबून पुरेशी विश्रांती घेऊन पुनः दुप्पट वेगाने काम करतो, विश्रांतीच्या वेळी आपल्या हत्याराना धार काढून परत कार्यक्षम बनवणे, आदि कामे करतो. ( विश्रांती म्हणजे गाढ झोपलेच पाहिजे असे नाही हो, ) परिणाम दुसऱ्या मुलाची कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता दोन्ही वाढते.
माॅरल ऑफ द स्टोरी काय ?
काम करताना पुरेशी विश्रांती घ्यावी.
"पुरेशी" या शब्दाचा आणखी थोडा खुलासा, स्पष्टीकरण करावे लागेल. प्रत्येकाचं हे "पुरेसं " वेगळं असतं. हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरतं. पुनः त्यासाठी नियम करून काम करू नये, किंवा तशी विश्रांती ठरवू नये. नाहीतर पुनः गोंधळ होईल. हेच तर आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून तर आपण पहिला नियम केला की, "कोणताही नियम पाळू नये."
आयुर्वेद सांगतो, विश्रांती ही रात्रीच घ्यावी. निसर्ग पण हेच सांगतो, विश्रांती रात्रीच घ्यावी. सगळे पशुपक्षी दिवसा खातापितात, आणि रात्री विश्रांती घेतात. अपवाद वटवाघुळ, घुबड आदि निशाचर प्राणी. आणि माणसांमधील शिफ्ट ड्यूटी करणारे प्राणी !
गरज म्हणून, पोटासाठी, रात्री जागरण करून नोकरी चाकरी करावी लागते. आपले आपल्या कुटुंबाचे पोट एका बाजूने भरत जायचे, रात्री पैसे मिळवत जायचे, तर दुसऱ्या बाजूने ते दिवसाढवळ्या डाॅक्टरांचे पोट भरायला सहजपणे देऊन जायचे !
असंच चाललंय, अवतीभवती. पोटाला चिमटा घेत, श्रम करायचे आणि अन्न पचत नाही, पोट दुखतंय ही तक्रार घेत डाॅक्टरांकडे जायचं. पोट आणि खिसा दोन्ही फाडून घ्यायचं. हे कुठंवर चालायचं ?
हे असंच चालायचं, असं म्हणून नाही चालायचं. समस्या आहे तिथे उत्तर आहे. शोधा म्हणजे सापडेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.05.2017
अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.
अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
हृदयाला हितकर असतात.
अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.
अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
ह्या भाजी बाबतीत आपल्याला मिश्र प्रतिक्रिया एकायला व अनुभवायला मिळतात.काहीजणांची अत्यंत आवडती तर काही जणांची अगदीच नावडती अशी हि भाजी(माझी सर्वांत आवडती आहे बुवा). आपण ह्याचे विविध प्रकार बनवून हिला खात असतो जसे मेथीचे पराठे,मेथी मलाई मटर,मेथीचे थेपले,मेथी आलू इ.पण प्रत्येक स्वरूपात हिच्यापासून बनविलेल्या व्यंजनांची लज्जतच काही निराळी आहे.
अशा ह्या मेथींच्या भाजीचे लहान क्षूप असते.तसेच हि चवीला कडू तुरट आणि थंड असते,त्यामुळे शरीरातील पित्त व कफ कमी करते.
हिचे देखील घरगुती उपचारांमध्ये बरेच उपयोग आहेत बरं का!चला तर मग आता ते पहायचे ना?
१)ज्या मंडळींना शौचास साफ होत नाही त्यांनी मेथीची भाजी जेवणात घ्यावी.
२)गळवांवर हिच्या पानांचा लेप लावावा म्हणजे वेदना व सूज कमी होते.
३)संडासला आव पडत असल्यास ५ चमचे पानांचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
४)वारंवार लघ्वीला होत असल्यास १/४ कप मेथी पाल्यांचा रस+१/२ चमचा कात+३ चमचे खडीसाखर हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.
५)डोक्यात कोंडा झाल्यास आंघोळी पुर्वी पाच मिनिटे केसांच्या मुळांना मेथीच्या पानांचा रस लावावा व नंतर साबण न वापरता केस धुवावेत.केस मऊ व चमकदार होतात.
६)चेहरा तेलकट होत असल्यास मेथीच्या पाल्याचा लेप चेह-यांवर लावून १/२ तास ठेवावे व कोमट पाण्याने धुवावे.
मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ व वारंवार होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti