आज आयुर्वेद व्यासपीठ या नामवंत संघटनेतर्फे पूर्ण महाराष्ट्रात तब्बल चारशे व्याख्यानांचा एक झंझावात उठत आहे. आयुर्वेद क्षेत्रातील ही एक मोठी क्रांतीकारी घटना असेल.
गेली सात आठ महिने सुरू असलेली कार्यकर्त्यांची बौद्धिक तयारी, सर्व तालुक्याच्या ठिकाणी काम करीत असलेल्या वैद्यांशी संपर्क, प्रत्यक्ष पत्र व्यवहार, आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी व्यासपीठच्या सर्व कार्यकर्त्यांनी जबरदस्त मेहनत घेतली.
ती सुद्धा स्वतःच्या खिशातील पैसे आणि वेळ संपवून.
सर्व ठिकाणी एकाच पद्धतीचे व्याख्यान घेतले जावे यासाठी प्रथमच ऑनलाईन वक्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील तब्बल साडेतीनशे वैद्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या घेतला.
काही वैद्य तर आज पहिल्यांदाच, स्टेजवरून जाहीर कार्यक्रमात बोलणार आहेत...
पण मनात ठाम विश्वास निर्माण झालाय,
निर्धार पक्का केलाय....
समाज मन बदलवून टाकण्याचा....
आरोग्य क्षेत्रात जे चुकीचे पायंडे पडत चालले आहेत ते बदलवण्याचा !
कोणाच्याही वैयक्तिक हितासाठी नसलेल्या या सेवाभावी कार्यक्रमाचे नियोजन पाहून ' महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन ' ने या कार्यक्रमात आपला बहुमोल सहभाग दर्शविला. जो सर्व वैद्यांना प्रेरणा देणारा ठरलाय.
एकाच दिवशी एकाच विषयावर एकच संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पोचत आहे.
ही आयुर्वेद क्षेत्रातील एक महान घटना आहे. असे मला वाटते.
आपल्या जवळच्या ठिकाणी आपणाला या व्याख्यानाला उपस्थित रहाता आले तर अवश्य पहावे. आपल्या नातेवाईक मित्र मंडळींना सांगावे.
एकच संदेश आज समाजात जाणार आहे तो म्हणजे इथे प्रत्येकाचे वेगळेपण जपले जाते.
इथे म्हणजे आयुर्वेदात !
आजच्या ग्लोबलाइज्ड युगात वावरतानादेखील प्रत्येकाचं अस्तित्व जपणं महत्वाचं आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, स्वभाव वेगळा, विचार वेगळा, हाताचे ठसे वेगळे, केसांची आणि डोळ्यांची रचनाही वेगळी. रोग होण्याची कारणे जरी एक असली तरी त्याची प्रकट होणारी लक्षणे मात्र वेगवेगळी निर्माण होतात. मग सर्वांना औषध एकच कसे चालणार ? वेगवेगळेच हवे. असा विचार फक्त आणि फक्त आयुर्वेदच करू शकतो.
आज जग फार झपाट्याने जवळ येत आहे. माणसे लांब गेली तरी त्यांचे विचार जवळ येत आहेत.
प्रदेश दूर दूर असले तरी पदार्थ मात्र कमीत कमी वेळात एका ठिकाणहून दुसरीकडे पोचताहेत. रेल्वे, विमान इ सोयीमुळे तयार अन्नपदार्थ देखील इकडून तिकडे पोचताहेत.
यामधला बिझनेस आणि राष्ट्रीय एकात्मता या एक दोन गोष्टी जमेच्या धरल्या तर बाकी आरोग्याचे एकुण तीन तेराच वाजतात.
हं.
हा विचार पटायला, आपली वैचारिक पचनशक्ती वाढवण्यासाठीच आजचा हा धन्वन्तरी जयंतीनिमित्त आयोजित केलेला महामहोत्सव !
थिंक ग्लोबली अॅक्ट लोकली या फ्रेझमधे थोडा बदल करून म्हणावेसे वाटते,
थिंक ग्लोबली बट इट लोकली.
वैश्विक जरूर व्हा, पण आपला आहार आपण रहातो त्या प्रदेशातीलच घ्या, जो आपल्या प्रकृतीला पोषक असेल. हा महत्वाचा संदेश आज समाजात पोचवला जात आहे.
येणारी धन्वन्तरी जयंती हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करून, आयुष विभागानेही दुधात साखरच घातली आहे.
इट लोकली सांगणारं आयुर्वेद, आज व्यासपीठच्या माध्यमातून अॅक्ट ग्लोबली करतंय हे मात्र नक्कीच !
-- वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
23.10.2016
पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ?
पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत.
जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे नाहीत.
मुंबई सारख्या शहरात पालेभाज्या रेल्वे लाईनच्या बाजुला कसल्या पाण्यावर पिकवतात ते सर्वजण बघतात.
पालेभाज्या जमिनीलगत वाढतात, म्हणून त्या नीट धुवूनच घ्याव्या लागतात. शहरात तर चक्क गटाराच्या पाण्यात धुवुन मार्केटमधे आणतात. अश्या धुण्याने किती जंतुसंसर्ग वाढेल?
कधी विचार केलाय याचा ?
बरं या पालेभाज्या अधिक हिरव्यागार दिसण्यासाठी, अधिक टवटवीत दिसण्यासाठी, अधिक लवकर तयार होण्यासाठी त्यावर रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातोय. एका सर्वेक्षणात तर असे आढळले आहे की जंतुनाश होण्यासाठी जे प्रमाण वापरले जायला हवे त्यापेक्षा किमान पाचशेपट अधिक जहाल रसायन या पालेभाज्यांवर फवारले जातेय. ही माहिती खते आणि फवारणीची रसायने विकणाऱ्या एका होलसेल विक्रेत्यानेच एका व्हिडिओ द्वारे सांगितली आहे. तो म्हणतो, "इसी से हमारे मार्केट मे माल जल्दी खतम हो रहा है, हमारा धंदा बढ रहा है ।"
स्वतःचा व्यवसाय तो वाढवून घेतोच, पण व्यवहारात तो डाॅक्टर मंडळींचा व्यवसाय देखील काही हजार पटीने वाढवित असतो. ते तर पुरस्कार करणारच. त्यांच्या टेक्समधे जे आहे, ते करायलाच हवे ना.
शुद्ध स्वच्छ निर्जंतुक हे शब्द केवळ पुस्तकात वाचण्यासाठीच शिल्लक राहिले आहेत की काय असे वाटते.
प्रत्येक जण आपला व्यवसाय कसा वाढेल हेच बघतोय.
इथे, कुणी कुणाचे नाही राऽजा,
कुणी कुणाचे नाऽही
मग काय करायचं ?
पालेभाज्या खायच्याच असतील तर त्या अगदी खात्रीच्या माणसाकडून विकत घ्याव्यात, ज्याने त्या चांगल्या पाण्यावर वाढवलेल्या आहेत. त्याच्या मुळात कोणतेही रासायनिक खत वापरलेले नाही आणि वरून फवारणीसाठी कोणतेही जहाल विष फवारलेले नाही.
दुर्दैवाने असा माणूस नाहीच मिळाला तर मार्केटमधील पालेभाज्या नीट पहाव्यात.
ज्या आकाराने लहान, ज्यांची पाने किडींनी कातरलेली आणि खाल्लेली असतील, ज्यांच्या पानावर भोके पडलेली दिसतील, त्या भाज्या जगायला योग्य वाटल्यामुळे त्या किडींनी खाल्लेली असतात, असा उदात्त विचार करून घरी आणावीत........
पालेभाज्याविषयी यापूर्वी तीन चार टीपांमधून बराच उहापोह झाला आहे. तरी पण नवीन सदस्यांना हा महत्वाचा विषय कळणे आवश्यक वाटते, म्हणून अजून एखादा भाग पालेभाज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.......
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
19.10.2016
जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे.
दत्तगुरूंची हि आवडीची भाजी म्हणून हिचा उल्लेख गुरुचरित्रात देखील आढळते.तसेच गुरुचरित्र वाचनाचे उद्यापन करतात तेव्हा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य केला जातो.अशी हि भाजी ब-याच जणांना आवडत असली तरी फारशी खाल्ली जात नाही त्यामुळे थोडी उपेक्षितच म्हणावी लागेल.
हि भाजी फार चविष्ट लागते.तशी चवीला तुरट गोड व थंड असून हि शरीरात वात दोष वाढविते व कफ व पित्त दोष कमी करते.
चला हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)घसा बसणे कोरडा खोकला ह्यात घेवड्याच्या शेंगांचा रस मध व ज्येष्ठमध घालून प्यायला द्यावा.
२)घेवड्याच्या शेंगांचे सूप करून सर्दी,घसादुखणे अशा तक्रारींमध्ये मिरपुड घालून प्यावा फायदा होतो.
३)आजारपणातुन उठल्यावर तोंडाला रुची नसल्यास घेवड्याची भाजी फुल्क्यांसह खावी.
४)पायदुखणे,गुडघे दुखी,पाय मुरगळणे ह्यात घेवड्याचा पाला व सुंठ एकत्र वाटून गरम करून लेप लावावा.
घेवडा अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटफुगते व गॅसेसचा त्रास होतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.
माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.
हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.
त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.
हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
कसा कळणार ?
मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
आपुला संवाद आपणासी.....
अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.
पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती - समाधान.
म्हणजेच तृष्णा आणि तृप्तीच्यामध्ये तो आहे.
त्याला विसरून कसे चालेल ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
10.12.2016
चवीनं खाणार त्याला देव देणार, अशी एक म्हण आहे. पानातली डावी बाजू ही चवींनी भरलेली असते. हे पदार्थ किती खावेत, याचे प्रमाण लक्षात घेणे, महत्वाचे असते.
म्हणून ते किती वाढावेत, हे पण ठरलेलेच असते.
लिंबामधे व्हिटामिन सी असते म्हणे. पण रोज किती लिंबे खावीत याचे काही ठरलेले प्रमाण ? माहिती नाही.
ते आपल्याला ताट वाढण्यातून आपसूकपणे कळते.
एका लिंबाचे आठ भाग केल्यावर त्यातील एक भाग पानावर वाढून घ्यावा. हे प्रमाण आहे. हवाच असेल तर जास्तीचा आणखी एक भाग. पण अर्धे किंवा एक लिंबू एकावेळी घेतले गेले तर ? आणि असे रोज !!! नक्कीच त्याचा त्रास होणार. असे अति करणारे रूग्ण अवस्थेत लवकर येतात. यासाठी ग्रंथांचा आणि व्यवहाराचा तौलनिक अभ्यास असणे महत्वाचा आहे.
आंबट चवीमुळे पोटातील पाचक स्राव वाढतात. चिंच आठवली तरी तोंडाला पाणी सुटते. साहाजिकच भूकही वाढते.
वाताला शरीराबाहेर यायला मदत करणारा असतो. याला अनुलोमक असे म्हणतात. पण हा आंबट रस पित्ताला आणि कफाला थोडा वाढवतोच. लिंबाचे सरबत घेतले तर काही जणांना पित्त वाढल्याचे जाणवते, तर काही जणांना पित्त कमी झाल्यासारखे वाटते. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते ना ! आंबट अति झाले तर रक्तपित्तासारखे आजार वाढतात.
ह्रदयाला हितकर असा हा आंबट रस अन्नपदार्थांची चवही वाढवतो. वरणभातावर पिळलेले लिंबू आठवतेय ना किंवा झणझणीत मिसळीवर पिळलेले लिंबू. व्वा! लिंबाचा वास येण्यासाठी मात्र लिंबू ताजेच हवे.ताज्या लिंबाच्या सालीतून येणारा विशिष्ट तेलाचा वास हा पण औषधी असतो. त्याची स्वतःची अशी वेगळी चव लागते. वरणभात असो वा मिसळपाव लिंबाशिवाय तृप्ती होत नाही. पूर्णत्व नाही.
ह.
आंबट चव ही तृप्ती करणारी सांगितली आहे.
अति प्रमाणात आंबट चव ही नुकसान करणारी असते. पेशींमधली बंधने लवकर मोकळी करतो. सैल करतो. त्यामुळे शरीराचा घट्टपणा निघून जातो. तेलाने ओषट झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून, लिंबाच्या साली वापरल्या जायच्या. किंवा जेवताना हाताला लागलेला तेलाचा कट जाण्यासाठी लिंबाची फोड बोटांना चोळली जाते, ती याच गुणाचा आधार घेऊन !
अतिसर्वत्र वर्जयेत !
आवडते म्हणून रोज पाणीपुरी खाणे, आंबट साॅस खाणे, आंबट चीज खाणे, व्हिनीगर घातलेले सूप पिणे, बाजारी लोणचे खाणे, इ.इ. हे काही रोगलक्षणे वाढवतात, ते या आंबट चवीच्या अतिरेक केल्यामुळे !
जास्त आंबट खाल्ले जात असेल तर डोळ्यांचे आजार, घश्याचे जीभेचे आजार, ताप येणे, चक्कर येणे, खाज येणे, सूज येणे, रक्ताचे कमी होणे, किंवा रक्तासंबंधी आजार वाढतात. अंगावर उष्णतेचे फोड येणे, पित्ताचे व्याधी असतील तर जरा जास्तच खबरदार असावे.
पण घाबरून जायचे कारण नाही, या आंबट पदार्थांचा वापर युक्तीने केला तर फायदा होतो. त्या युक्तीसाठी वैद्याचा सल्ला घ्यायलाच हवा.
आवडत असेल तर आंबटगोड खावे, पण फार आंबटशौकीन नसावे
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
02.11.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सात
रात्री काम करणे कधीपासून सुरू झाले ?
रात्रीचा दिवस कोणी केला ?
रात्रीची कामे कशी करावी हे कोणी शिकवले ?
रात्री काम करण्यातले अडथळे कोणी दूर केले ?
रात की नींद किसने चुरा ली ?
विज्ञानाने.
कसं काय ?
विज्ञानातील नवनवीन शोधांमधील एक अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे विद्युतीकरण !
या विद्युतीकरणामुळे अनेक कामे चुटकीसरशी होऊ लागली. जिथे शंभर माणसे कामाला लागायची तिथे दहा पंधरा माणसांमधे काम पूर्ण होऊ लागलं. वेळ वाचला. कामामधे सुबकता आली. कमी पैशात जास्ती काम होऊ लागले. आता हे चांगलं की वाईट ?
नक्कीच चांगलं.
पण,
या यंत्रांनी किती जणांचा रोजगार कमी केला ? किती जण नोकरीतून कमी झाले ? किती जणांना व्ही आर एस घ्यावी लागली ?.......
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे आरोग्य आम्ही मिळवले की घालवले ? आमची आदर्श जीवनचर्या या विज्ञानाने मुळातूनच बदलवून टाकली का ?
विज्ञानाने प्रगती नक्कीच केली, पण त्याने खरे आरोग्य मिळवले की घालवले याचा परत एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मी विज्ञान विरोधी अजिबात नाही. पण जी समीकरणे मांडत जातोय, त्यात जे समोर येतंय ते फक्त स्पष्टपणे मांडतोय.
विज्ञानाने जी देणगी दिली, त्यात मोठी देणगी विद्युतीकरण, त्यातूनच नंतर दिवाणखान्यात जन्माला आलेले दूरदर्शन, केबल, डीश, डीव्हीडी. इ.इ. स्वयंपाकघरात घुसलेल्या विज्ञानाने तर पार धुमाकूळच घातला. मिक्सर, ब्लेंडर, फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह, गॅस शेगडी, इ.इ.
बाथरूममधे जागा अडवून बसलेले वाॅशिंग मशीन, गीझर, इ.इ.
बेडरूम मधील एसी, कुलर, इस्त्री, पंखे, इ.इ.
ही सर्व उपकरणे विज्ञानाची पिल्ले नव्हेत काय ? यांनी आपल्याला आरोग्य दिले की, आरोग्य हिरावून घेतले ?
या प्रत्येक यंत्राचा स्वतंत्र विचार करणे आणि लिहिणे शक्य होणार नाही, पण एक नक्कीच पारंपारिक पद्धतीने, केलेली कोणतीही गोष्ट, ही यंत्रांचा वापर करण्यापेक्षा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम प्रतीची असते. असे लक्षात येते. रवीने केलेले ताक, ब्लेंडर किंवा मिक्सरमधून केलेले ताक, लोखंडी तव्यावर केलेली भाकरी आणि ओव्हन मधे किंवा रोटी मेकर मधली भाकरी, पाटा वरवंटा वापरून केलेले वाटप आणि मिक्सरमध्ये केलेले वाटप ही अगदी मोजकी उदाहरणे आहेत.
कामे करत असताना होणारा व्यायाम कमी होत गेला म्हणूनच जिमचा आणि योगा वर्गांचा उदय झाला. दिवसाची कामे दिवसाच होत होती. विज्ञानामुळे दिवसाची कामे रात्रीच्या वेळी करणे देखील सहज शक्य झाले.
विज्ञानाने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे, पण या विज्ञानाला घरात, विशेषतः स्वयंपाकघरात किती घुसु द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
उपभोगवादी संस्कृतीने आरोग्य हिरावूनच घेतले. विज्ञानाला माणसाने गुलाम बनवण्या ऐवजी, विज्ञानाने माणसालाच गुलाम बनवले. मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केलेल्या प्रत्येक प्रयोगातून आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास नुकसान होते आहे, हे अंतिम सत्य आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.05.2017
आपण घेतलेल्या अन्नाला शरीराला आवश्यक असणाऱ्या स्वरूपात बदलवणे आणि पुढे ढकलणे हे तोंडाचे काम. त्यासाठी जीभ, पडजीभ, दात, दाढा, गाल, टाळू हे अवयव मदत करीत असतात.
बत्तीस दातांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक ठरते. सावकाश जेवा, याचा आणखी एक अर्थ अभिप्रेत आहे, "नीट चावून चावून गिळा." यासाठी दात कणखर, बळकट असणे आवश्यक आहेत.
हल्ली लहान मुलांचे दात लवकर किडतात, दोन वेळा ब्रश करूनदेखील दात किडतात, यासाठी प्लॅस्टिकच्या ब्रशऐवजी बोटांचा वापर करणे, किंवा कडूनिंबाच्या काड्यांचे टोक चावून ब्रश तयार करून वापरणे आणि टूथपेस्ट ऐवजी दंतमंजन वापरणे योग्य ठरेल. दात दोन वेळा घासले पाहिजेत. तसेच चुळादेखील नीट भरल्या पाहिजेत, म्हणजे दात लवकर किडत नाहीत. दंतमंजन गोड नको, फेस येणारे नको आणि नुसती पांढरी पावडर नको. किंचीत कडू, किंचीत तिखट किंचित तुरट असावे.
प्रत्येकाच्या दातांची ठेवण वेगळी असते. पण काम एकच असते. अन्नाचे बारीक चूर्ण करणे. वरची किंवा खालची एक दाढ जरी पडली तरी त्या दाढेखाली येणारे अन्न भरडले जात नाही आणि तो तुकडा तसाच रहातो गिळला जातो आणि अपचन सुरू होते. त्यामुळे पचनाशी दातांचा संबंध देखील असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे.
किडलेल्या दात आणि दाढांवर वेळीच उपचार करून घ्यावेत. शक्यतो दात काढू नये. रूट कॅनाॅल सारखी पद्धत वापरून जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवावं. गडग्यातला एक दगड काढला तर बाजूचे दगड हलू लागतात आणि सर्व गडगा ढेपाळतो. (गडगा म्हणजे दगडाची भिंत जी, कुंपण म्हणून केली जाते.) किडलेला, हलणारा दात अथवा दाढ ही अपचनाची सुरवात असते. ती जास्तीत जास्त वाचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
त्याने जी बत्तीशी दिलीय, ते काही तरी कारण असेल म्हणूनच दिलीय ना ! त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी विशिष्ट हेतू असतो, ते ज्ञान मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणे म्हणजे खरे शिक्षण.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.03.2017
आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ?
दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे.
काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण घ्यावे. म्हणजे पचनाला पुरेसा वेळ मिळतो.
आधी पोटोबा मग विठोबा
आधी स्वार्थ मग परमार्थ
या म्हणी केव्हा तयार झाल्या असतील ? कोणत्या परिस्थितीमधे तयार झाल्या असतील, त्याचा परत एकदा विचार करायला हवा. एका पिढीपूर्वीची मुलाखत घेतली तर याचा उलगडा होत जाईल.
ती माणसे सांगतात, आमच्यावेळी सूर्यास्ताचे अग्निहोत्र झाले की लगेचच दिवसाउजेडी एकाने देवाकडे, अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा, ( घरात येणारी लक्ष्मी काळोखातून कशी येणार ? म्हणून अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा. ) तर दुसरीने स्वयंपाकघरात दिवा लावून पाटपाणी घ्यायचे. आधी स-अवकाश भोजन करून नंतर सावकाऽश भजन करीत बसायचे...... मग परमार्थ !
तेव्हा सारवलेल्या जमिनीवर ताट पाट मांडून खाली बसून, मांडी घालून पंगत वाढून जेवायचे. घरात कुटुंब नियोजन नव्हते, गोकुळ होते. दहा पंधरा माणसे एकमेकांशी बोलायची, शुभंकरोती एका सुरात म्हटली जायची,पाढे पावकी निमकी, सर्व श्लोक स्तोत्रे यांची उजळणी व्हायची.
चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या घरातील परिस्थिती आठवली तर टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे रेडीओ आणि सिनेमा थिएटर. थिएटरमधे जाऊन हौस म्हणून सिनेमा पहाणे त्या तिकिटासाठी तब्बल दोन ते अडीज रूपये खर्च करणेदेखील परवडत नव्हतं. एवढा श्रीमंत काळ आपण अनुभवला आहे.
त्याआधीची फक्त वीसेक वर्षे आता आठवून पहा. म्हणजे आपल्या बाबांच्या लहानपणीचा काळ सुखाचा......
रेडिओ ही अत्यंत प्रतिष्ठेची चीज होती, गावातील एखाद्या घरीच तो असायचा, बिनाका गीतमाला ऐकायला दर्दी गर्दी जमायची, तेव्हाच्या काळातील जेवणाच्या वेळा आठवून बघा, त्या काळातील ज्येष्ठ माणसांना आजही विचारून पहा. तेपण सांगतील, " आमच्या तारूण्याच्या सुवर्ण युगात आमची जेवणे दिवसाउजेडी संपायची. लाईटपण नव्हता तेव्हा. रात्री साडेआठ नऊ वाजता झोपी जात होतो."
विज्ञानयुग आले, विद्युतीकरण झाले, प्रगती झाली, विकास झाला. कोपऱ्यात टीव्ही आला. करमणुकीचे साधन बदलले, दूरदर्शनवर बातम्या देणारी माणसे, त्यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या माशा देखील पहाता यायला लागल्या. मालिका पहायला वेळ कमी पडू लागला. त्याच दरम्यान स्वयंपाकघरात कुकर आला, मिक्सरपण आला. मनोरंजन ही गरज बनली. खाना खान्यातला (म्हणजे स्वयंपाकघरातला) वेळ दिवाणखान्यात जाऊ लागला.
गोजिरवाण्या घरात लाजीरवाण्या सिरीयल सुरू झाल्या. बातम्यांपेक्षा जाहीरातीमधे जास्ती वेळ जाऊ लागला. आणि हळुहळू सगळंच बदललं. सुखाच्या कक्षा वाढत गेल्या आणि.....
विठोबा मागं गेला आणि पोटोबा पुढे आला........
कसं बदलत गेलं? कोण बदलत गेलं ? कोणी बदललं हे सगळं? कधी कळलंच नाही.
मुठीत घट्ट धरून ठेवलेल्या वाळूसारखं दोन्ही बाजूने ते बाजूला कधी पडत गेलं लक्षातही आलं नाही. आरोग्याची मूठ कधी रिकामी झाली, ते कधी समजलं देखील नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.03.2017
आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला.
Copyright © 2025 | Marathisrushti