(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – कवठ

    किचन क्लिनीक – कवठ

    ह्याचा वृक्ष असतो ज्याची साल पांढरी धुसर असते.पाने बारीक व मेंदीच्या पानांसारखी असतात.फुले लहान व पांढरी असतात.फळाची साल कडक व रंग भुरकट पांढरा असतो.आतील गर पिवळा काळसर असतो व ह्यात भरपूर बिया असतात.

    ह्याचे कच्चे फळ उष्ण आंबट,तुरट व वातपित्तकर व कफनाशक असते.
    ह्याचे पिकलेले फळ गोड,आंबट,तुरट,थंड व त्रिदोष शामक असते.

    आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:

    १)पिकलेल्या फळाचा मगज साखर घालून खाल्ल्यास वाढलेले पित्त कमी होते.

    २)अन्न सेवनाची इच्छा नसल्यास २ चमचे कवठाचा गर हा सुंठ मिरी व पिंपळी चुर्ण एकत्रित पणे १/२ चमचा,१ चमचा मध,१ चमचा साखर घालून खावा.

    ३)कोरडा खोकला येत असल्यास कवठाचा गर जुना गुळ घालून खावा.

    ४)पोटात भुक असणे पण तोंडास रूची नसणे ह्यात कवठाची गुळ घातलेली चटणी १-३ चमचे खावे व लगेच जेवावे.

    ५)उचकी वारंवार लागत असल्यास कवठाचा कोळ व गुळ हे चाटण चाटून खावा.

    ६)थुकीतून रक्त पडणे आवळकाठी चुर्ण १ चमचा,१ चमचा कवठाचा गर ,१चमचा मध हे मिश्रण घेतल्यास उत्तम लाभ मिळतो.

    कवठाचे फळ अतिमात्रेत खाल्ल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 18, 2016


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्याहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 34

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग आठ

    नैवेद्य दाखवताना देवाला घास भरवायचे. त्याचा मंत्र आहे, "नैवेद्यम् समर्पयामी." असे म्हणून घास भरवायचे. थोडं थांबून देवाला पाणी प्यायला द्यायचे. त्याचा एक मंत्र असा आहे. "नैवेद्यम् मध्येपानीयं समर्पयामी ! " असे म्हणून देवाला थोडे भरवून झाल्यावर मधेच, ताम्हनामधे एक पळी पाणी सोडावे. आणि पुनः देवाला सहा घास भरवायचे.
    हे झाले कर्मकांड.

    यात देहासाठी काय आहे ?
    हे सर्व जेवायचे कसे पाणी कसे प्यावे याचे शुद्ध आयुर्वेदीय नियम आहेत. जे जे देवासाठी ते ते देहासाठी.

    आयुर्वेद मतानुसार पाणी जेवताना मधेमधेच प्यावे म्हणजे प्रकृती सम रहाते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने बारीक व्हायला होते,
    आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाड व्हायला होते. अर्थात आपण कसे पाणी प्यावे, हे आपल्या प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणजेच वैद्य सल्ला महत्त्वाचा ! उगाच आपले आपल्यावर प्रयोग करू नयेत.

    पण सर्वसाधारणपणे पाणी जेवताना मधे मधेच प्यावे, हा नियम आहे हे लक्षात ठेवावे. यासाठी हा नियम देवपूजेमध्ये देखील समाविष्ट केला गेलाय. "मध्ये पानीयं समर्पयामी....."

    पाणी कोणी किती कसे आणि का प्यावे, याविषयी सविस्तर टीपा मागील वर्षीच येऊन गेल्या आहेत. पुनरूक्ती दोष टाळतो. फक्त एक उदाहरण सांगतो, नारळाचे दूध किंवा नारळाचा रस काढायचा असेल तर, नारळ वाटतानाच त्यामध्ये पाणी घालावे लागते. अन्यथा रस चांगला निघत नाही.
    स्लॅब घालताना वाळू, सिमेंट, खडी, मिक्सरमध्ये एकत्र फिरवतानाच त्यात पुरेसे पाणी मिसळले जाते. अन्यथा लोखंडाच्या फ्रेममध्ये हे मिश्रण योग्य रितीने पसरलेच जाणार नाही. तसेच पाणी जेवता जेवता मधे मधे, स्वतःला आवश्यक असेल तेवढे, जरूर प्यावे. म्हणजे पुढे अन्नरस चांगला तयार होतो. कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, डायेटीशियन बोलली म्हणून, टीव्ही वर दाखवले म्हणून, अथवा कोणीतरी पाश्चात्य बुद्धीचा डाॅक्टर सांगतो म्हणून आपण आपल्या भारतीय भोजन परंपरा अजिबात बदलू नयेत. पारंपारिक आहार तसाच घ्यावा. आहाराचे जे अगदी साधे सोपे नियम आहेत, ते उगाच क्लीष्ट करून, शरीरामधे ताण वाढवणारे, चुकीचे नियम, चुकीच्या समर्थनासह करून, सोपे साधे जीवन कठीण करून, रोग वाढवून घेणे आहे.
    त्यामुळे पाणी फक्त जेवतानाच प्यावे. तहान नसताना, अन्य वेळी अजिबात नको. अन्य वेळी जे पाणी प्यायचे ते फक्त तळहाताच्या मधे राहील एवढे पळीभरच प्यायचे असते, हा नियम देखील देवपूजेतील आचमनातून आपण शिकलो आहोत.

    "मग बाकी सर्वजण पाणी जास्ती प्या" असं का सांगतात? ते त्यांनाच माहिती !!! आपल्याला तहान लागली की, स्वतःला तहान असेल तेवढे पाणी, आपणच ठरवून प्यायचे असते. एवढे लक्षात ठेवावे. बाकी विषय संपला.

    तर देवपूजा करणे हे सर्व जीवनावश्यक नियम समजावून सांगणे आहे. हे दररोज सांगावे लागतात. नाहीतर आपली चंचल बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हे सर्व उपचार दररोजच्या पूजेमधेच समाविष्ट करून टाकले.
    सततम् क्रिया अभ्यासः । एखादी क्रिया सतत केली गेली की ती अंगवळणी पडते.

    आजीआजोबा, आईबाबा यांनी जे नियम ठरवले ते तसेच पाळायचे असतात. स्वतःच्या पाश्चात्य बुद्धीने त्यात बदल केला की, पुढील पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जसे भरपूर पाणी प्या, म्हणून एका वडील पिढीने सांगितल्यामुळे आताच्या पुढील पिढीमधे पाण्यामुळे होणारे प्रमेह, रक्तदाब, संधीवात, इ.इ. रोग वाढलेले दिसतात. हे "जनुकीय" बदल नाहीत तर जीवनशैलीतील बदल आहेत, जे आपण बदलवू शकतो. ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका जर सहवास आणि साहचर्याने जर पुढील पिढी करीत राहिली तर जनुकीय बदल न होता, चुकीची जीवनशैलीजन्य रोगांची संख्या मात्र वाढतेय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर पहातोय.

    आपणाला हे सर्व बदलायचे आहे. रोग कमी करायचे आहेत. डायबेटीस रक्तदाब पीसीओडी थायराॅईड यावरील गोळ्या एकदा सुरू झाल्या की, त्या कायम स्वरूपात घ्याव्याच लागतात, हे धादांत खोटे गृहीतक, रोगाबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना डोक्यातून काढून टाकायच्या आहेत, जीवनशैलीतील दोष काढून टाकून, निरोगी, निरामय, निर्रौषध, जीवनशैली परत स्थापन करायची आहे. यासाठीच ही माझी देवपूजा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.06.2017

      June 27, 2017


  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग सतरा

    "गॅसवर तुमच्याकडे काही परमनंट औषध आहे काहो ? "

    90% पेशंटचा 100 % विचारला जाणारा एकमेव भाबडा प्रश्न. ज्यावर डाॅक्टरांची विकेटच पडते. आता या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत, एका शब्दात, आणि एखाद्या औषधांनी, कसं काय देता येणार ?

    अख्खं वर्ष हेच समजावून सांगण्यात गेलंय, की रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा होऊ नये यासाठी सावधानता बाळगणे, केव्हाही चांगलेच ना !

    दर दोन चार तासांनी खा खा खाल्ले तर पचन करायला वेळ कधी देणार ? मग वात बिघडणारच. आपल्याच कर्मानी विकृत झालेला हा वात म्हणजे आजच्या काळातील 'गॅस' होय.

    आपल्यासाठी हा वात वाढवणारे पदार्थ कोणते ते शोधून बंद करणे हे आपणच शोधायचे. कारण आपण काय खातोय यापेक्षा कसे पचवतोय हे जास्ती महत्त्वाचे आहे. खाल्लेल्याचे पचन होणे, त्यावर अग्निची प्रक्रिया होणे महत्त्वाचे ! अग्निच्या जे जे विरोधात ते ते सर्व वात वाढवणारे. जसे पाणी. अतिरिक्त प्रमाणात, चुकीच्या वेळी घेतलेले, पाणी हे वात वाढवते.

    आंबोळी इडलीच्या सुक्या पीठात पाणी घातल्यानंतरच आंबायला सुरवात होते ना ! पाणी घातल्यानंतरच पीठ फुगते, दुप्पट होते, पीठाची चव बदलते, स्वरूप पालटते, पीठ बुडबुडेयुक्त दिसते, हे सर्व बदल पीठामधे कोणी केले ? एका पाण्याने केले. म्हणजे इडली डोसा पाव पिझ्झा यासारख्या आंबवलेल्या पदार्थात गॅस मुळातच जास्ती असतो, म्हणजे आंबवलेल्या पीठाचे सर्व प्रकार गॅस वाढवतात.

    पण क्वचित प्रसंगी हे पदार्थ खावेच लागणार असतील तर याच पीठाचे खमंग, कुरकुरीत डोसे करून खावेत, खाल्ले तरी ते दिवसाचेच खावे आणि ते पचेपर्यंत दुसरे काहीही खाऊ नये, ही युक्ती आहे. हा पर्याय आहे. सोयीस्कर अर्थ काढू नयेत.

    जेवणामधे कच्चे तेल आणि सर्व प्रकारचे कच्चे मसाले वापरले तर गॅस कमी होतो.

    सूर्यास्तापूर्वी घेतलेले जेवण, गरम गरम जेवण, गोड, आंबट, खारट चवींनीयुक्त जेवण, वाताचा म्हणजे गॅसचा नाश करते. जेवणात सहा चवी आवश्यक आहेत. एखादी चव जरी कमी पडली तरी गॅस होणार.

    पाणी, तेल आणि अन्नपचन या विषयावरील मागील सर्व टीपा पुनः वाचाव्यात. नाहीतर पुनरूक्ती दोष उत्पन्न होईल.

    नियमितपणे मलप्रवृत्ती साफ राहील, असे पहावे. जेव्हा मलप्रवर्तन करावेसे वाटेल, तेव्हा "त्याचे" लगेचच ऐकावे. आणि मलमूत्र विसर्जन करून यावे. यासाठी आतून "तो" काय सांगतोय, यावर सतत लक्ष ठेवावे, म्हणजे गॅस होणार नाही.

    जे अन्नपाणी साठवलेले असते, ते गॅस वाढवणारे असते. अन्नपाणी कुजल्यावर त्यामधे गॅस तयार होतो. पालेभाज्या, कच्ची खाल्ली जाणारी आणि मोड आणून पचायला जड बनवलेली कडधान्ये, खूप पिकलेली फळे, फ्रीजमधील अन्नपदार्थ ( ते सर्व शिळेच होतात. ) रात्र उलटून गेलेला तयार आहार, गॅस वाढवतो.

    पोटात अवकाश न ठेवता ठासलेले, बकाबका खाल्लेले, बळेबळे भरवले जाणारे, मनाविरुद्ध खाल्लेले अन्न देखील गॅस वाढवणारे असते.

    जसे गाडीचे अग्निस्थान म्हणजे कार्बोरेटर आणि अतिरिक्त वायुवाहक पुंगळी म्हणजे सायलेन्सर साफ असेल, तरच गाडीचे अॅव्हरेज वाढते, हे खरे आहे ना ?

    -- वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    01.04.2017

      April 1, 2017


  • नमस्कार – भाग ४

    नमस्काराचा हा संस्कार आपण मुलांवर नकळत करायचा असतो. आपले अनुकरण मुले करीत असतात, समजा, दूरध्वनीवर बोलताना सुरवातच “हॅलो” या शब्दाऐवजी,” नमस्कार ” या शब्दाने करायची ठरवली तर ? सहज शक्य आहे. प्रयत्न करून पहा. मुले पण बदलतात.

      July 18, 2017


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग अठ्ठावीस

    बाबा सांगतात...

    बाबा म्हणजे आप्त म्हणजेच ग्रंथकार सांगतात,
    सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा आणि दुर्जनापासून लांब रहावे.
    हिंसा, चोरी, व्यभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य आणि असंबद्ध भाषा, दुसऱ्याचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य, आणि शास्त्र विरूद्ध विचार ही दहा प्रकारची पापकर्मे होत. यांचा काया, वाचा आणि मनेकरून त्याग करावा.

    या सर्व उपदेशात्मक उपचारांना हितोपदेश असे म्हटलेले आहे. जसे योग शिकताना, अष्टांग योगामधील यम नियम प्रथम पाळायचे असतात, त्यानंतरच त्यापुढील आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अंगांचा विचार करावा. तसेच आयुर्वेद शिकताना प्रथम हितोपदेश शिकावा, आचरावा, कृतीत आणावा. म्हणजे पुढील उपचार शिकणे सोपे असते.

    आजच्या काळात हे नियम पाळणे शक्य आहे का, असे म्हणून नियम टाळणे तर नक्कीच समर्थनीय नाहीत. काळानुरुप यात बदल अवश्य करावेत, पण ग्रंथातील मूळ सूत्र सोडू नये.

    ही दहा पापकर्म सांगितलेली आहेत.
    ही अशा प्रकारची कर्मे करू नयेत. असं सांगण्याचं कारण, कथनी और करनी मे यदी एकता नही है तो मन मे खोट जरूर पैदा होती है । जे आत असेल तेच बाहेर येते.

    विहिरीत किंवा टाकीमधे जे पाणी असते, बाहेर काढल्यावर तेच पाणी येणार ना. आपल्याला जर चांगले पाणी हवं असेल तर जिथून घेणार तो मूळ स्रोतदेखील चांगलाच हवा. म्हणजेच मन स्वच्छ असेल तर मनात काही पापभावना नसतील तर शरीरातील दोष देखील जरा अपथ्य झालं तरी संतुलीत रहातात. कारण या मनाचा संबंध थेट हार्मोन्सशी आहे. मन स्थिर आणि उच्च विचारांनी प्रेरीत असेल तर अंतःस्रावी ग्रंथींची कामे देखील स्थिर आणि उच्च दर्जाची होतात.

    या प्रत्येक शब्दावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही. कधी कोणाची शाब्दीक हिंसा देखील करू नये, कठोर बोलू नये, हे गांधीनी पण सांगितले होते. पण भविष्यातील सोय पाहून, सर्वधर्म समभावच्या नावाखाली काही ठिकाणी गांधींनी सोयीस्कर दुर्लक्ष देखील केले होते. या असत्याचाच राग पुढे व्यक्त झाला असे आफळेबुवांच्या एका किर्तनात ऐकले होते. नरो वा कुंजरो वा असे म्हणून धर्मराजाने देखील असत्य भाषण केले होते, ज्यामुळे त्याचा रथ पुढे स्वर्गापासून दोन बोटे लांब राहीला होता. नुकसान झालेच होते. याच असत्यामुळे गांधीना आपला प्राण गमवावा लागला होता, हे सत्य लक्षात घ्यावे.

    भविष्यात आपल्याला जे संभाव्य आजारपण येणार आहे, त्याचा आतापासूनच नीट विचार करावा. यासाठी आपल्याला उपयोगी होणाऱ्या मंडळींना प्रेमाने जिंकून घ्यावे. ही माणसे तुटु नयेत, यासाठी प्रयत्नशील रहावे. प्रयत्न करूनही काही फायदा होत नसेल तर समजावणे सोडून द्यावे. भविष्यात येणाऱ्या आजारपणात, आपत्तीत जी माणसे उपयोगी ठरतील अशांना हाताशी धरावे.

    केवळ आपलेच नव्हे तर आपल्या पुढच्या पिढीचे हित कशात आहे, हे ओळखून पावले उचलावीत.

    या हितोपदेशांचा आजच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

      August 23, 2017


  • याला जीवन ऐसे नाव भाग ३८

    पाण्याची प्रशंसता भाग तीन

    जेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते.
    जेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते.
    जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते.

    कसे ? आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे विचारांची किती भेसळ झाली आहे पाहा.

    नारळ वाटण्यापूर्वी पाणी घातले तरी रस येत नाही. आणि नंतर पाणी घातले तरी रस नीट निघत नाही. नारळ वाटता वाटता जर त्यात पाणी घातले तरच रस चांगला निघतो ना ! हे वाटप पाट्या वरवंट्यावर असू देत किंवा मिक्सरमधे !

    असेच व्यवहारात देखील दिसते.
    जेवता जेवता अन्नामधे लाळ चांगली मिसळली तर पचनही चांगले होते. तोंडात लाळ नीट निर्माण होण्यासाठी घोटभर पाणी घोळवले की उत्तम काम होते.

    पण नियम पाळायचे तर नीट ओळखून पाळावेत. जेवताना पाणी प्यायचे ते सुद्धा गरजेनुसार थोडे थोडे लागेल तसे प्यावे. उगाच नियम करून अमुकच लीटर पाणी हवे, असं अजिबात नको.

    मग आमची जेवतानाची पाणी पिण्याची परंपरा मोडली कधी आणि कोणी कशी ?
    हे शोधून काढणे जरा कठीण आहे. पण जे बदल झालेत, ते याच डोळ्यादेखत झालेत, हे नक्की आहे.

    जेवताना पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चवीचवीनं जेवता येतं. तिखट खाऊन झालं की नंतर गोड पदार्थ खायचा असेल तर दोन्ही चवींच्यामधे, चव नसलेलं पाणी घेतलं की दोन्ही चवीतला फरक नीट कळतो. नाहीतर प्रत्येक चव नीट कळत नाही. एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दुसरं गोड खाल्लं तर, दुसऱ्या गोड पदार्थाची चव कमी गोड लागते, हे पण व्यवहारात आपण बघतोच. मधे पाणी प्यायले तर नंतरच्या पदार्थाची चव आणि लज्जत आणखीनच वाढते.

    जे काही पाणी प्यायचे आहे ते जेवतानाच प्यावे. पाणी पिताना सावकाश प्यावे. लाळ मिसळून प्यावे. तहान लागली तर जरूर प्यावे. पण मुद्दाम जेवणापूर्वी , जेवणानंतर लगेच पिणे, नियम करून पिणे चुक आहे, हे लक्षात ठेवावे.

    पाणी पिण्याचा किंवा माझ्या उत्तम प्रकृतीसाठी कोणताही बदल मी आजपासून करेन, असा संकल्प केला तर तो उत्साह दोन तीन दिवस टिकतो, नंतर पहिला विरोध होतो, तो आपल्याच घरातून ! स्वयंपाकघरातून फक्त एक सूचना येते, आणि आपले प्रामाणिक संकल्प कुठल्याकुठे उडून जातात. बदल आपल्यात हवा असेल आपल्यालाच बदलायला हवे ना !

    तीळगुळ घ्या आणि 'तुम्ही' गोडगोड बोला, असा उपदेश आज सगळेच करतील. जे बदलायचे ते तुम्ही. 'मी' बदलणार नाही, असंच ठरवून तीळगुळ दिला की नंतर आपण शब्दात अडकायला आणि दुसऱ्याने शब्दात पकडायला नको.
    जर मनापासून बदलायचं असेल तर असं म्हणा,
    "तीळगुळ घ्या, 'मी' गोड बोलेन." असं वचन देतोय मी ! कारण बदल मला माझ्यात करायला हवाय.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.01.2017

      January 18, 2017


  • आहाररहस्य १५

    जेवण सुरू झालं की, मौन पाळावे. अजिबात बोलू नये. काही हवे असल्यास आधीच वाढून घ्यावे. परतवाढीचे घ्यायचे नाही, म्हणजे आतूनही खुणा करून बोलायचे नाही. मनानेपण मौन पाळायचे.

      September 15, 2016


  • मुस्ता/मुस्तक/नागरमोथा

    ह्याचे ०.३३-१ मी उंचीचे तृण जातीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे काण्ड पातळ,गडद व हिरव्या रंगाचे असते हे भौमिक काण्डापासून उगवते व वरच्या भागात त्रिकोणी असते.पाने लांब व मुळा सारखी असतात.फुले ५-२० सेंमी लांब असतात.काण्डाचा भौमिकभाग सुत्रवत भौमिक काण्डात रूपांतरीत होऊन त्याला १ सेंमी व्यासाचे बाहेरून काळे व आत धुरकट किंवा पांढऱ्या रंगाचे सुगंधी कंद येतात.

    ह्याचे उपयुक्तांग कंद असून मुस्ता चवीला कडू,तुरट व थंड गुणाचा असून हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्तनाशक व वातवर्धक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊ:

    १)मुस्ता त्वचा रोगात लेपासाठी उपयुक्त आहे.

    २)मुस्ता आमपाचक असल्याने पोटाच्या विकारात उपयुक्त आहे.

    ३)ताप आल्यामुळे लागणाऱ्या तहाने मध्ये मुस्ता सिद्ध जल देतात.

    ४)मुस्ता हा स्तन्यवर्धक व स्तन्यशोधक आहे म्हणून ह्याचा लेप बाळंतीणीच्या स्तनांवर करतात.

    ५)मस्तिष्क दौर्बल्यामध्ये मुस्ता गोदुग्धासह देतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2017


  • आहारातील बदल भाग ५१ – चवदार आहार -भाग १२

    रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.

    ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !

    डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.

    लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.

    या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.

    मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
    मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !

    चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.

    हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.

    मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    12.11.2016

      November 12, 2016


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग सहा !

    काही फळांचे "सीझन" असतात. काही फुलांचा "हंगाम" असतो. काही वनस्पतींची "बेगमी" विशिष्ट मोसमातच करावी लागते. भाताची शेती पावसाळ्यातच केली जाते. असे का ? यालाच तर "निसर्ग" म्हणतात.

    आंबे आंब्याच्याच दिवसात, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, या महिन्यातच का लागतात ?
    जांभळे, करवंदे, जाम, फणस ही फळेदेखील याच महिन्यात मिळतात. गुलमोहराचा बहर आत्ताच सुरू असतो. असे का होत असावे ?

    निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे.
    केवळ मानवालाच नव्हे तर निसर्गातील प्रत्येकाला इथे विशिष्ट जागा, आजच्या भाषेत "स्पेस" आहे.
    निसर्गातील प्रत्येकाला जगण्यासाठी आवश्यक ते सर्व निसर्गानेच तयार करून दिलेले आहे. सहा महिन्यांचा आदान काल आणि सहा महिन्यांचा विसर्ग काल त्यानेच बनवलेला आहे. पण आपण ते युक्तीने वापरत असतो. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधे शक्तीचे हे मैत्रीपूर्ण आदान प्रदान, कोणाच्याही, कोणत्याही तक्रारीशिवाय सुरू आहे. आणि असेच पुढे देखील सुरू राहणार आहे.
    ज्या कालावधीमधे निसर्गाने द्यायला सुरवात केली आहे, त्यावेळी त्याच्याकडून आनंदाने घेत जावे. फळे दिली फळे, फुले दिली फुले, ऊन दिले तर ऊन. पाऊस दिला तर पाऊस आणि देईल तेवढी थंडी. त्यापासून स्वतःचा फायदा करून घेत स्वतःचा बचाव कसा करायचा ही युक्ती आहे.

    उन्हाळ्यात मिळणाऱ्या फळांचा आस्वाद तेव्हाच घ्यावा. गरज असेल तर औषधी स्वरूपात टिकवून ठेवावा, औषधी स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आसव अरीष्ट, अवलेह, गुटी, वटी, गुलकंद इ. स्वरूपात कोणत्याही रासायनिक टिकाऊ द्रव्याशिवाय टिकवून ठेवायच्या पद्धती देखील अभ्यासक्रमात शिकवल्या जातात.

    व्यापारी वृत्ती आली आणि त्यातील औषधी गुण कमी होत गेले. हवं तसं ओरबाडण्याची वृत्ती निर्माण झाल्यामुळे देखील काही दिव्य औषधी कायमच्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन, संगोपन होणे तेवढेच गरजेचे आहे.

    जे द्रव्य नाशीवंत आहे, त्यावर प्रोसेस करून ते द्रव्य टिकवले जाईलदेखील, पण त्यातील औषधी गुणधर्म कमीच होतो, नैसर्गिक अधिवासामधे उगवलेली शतावरी, गुळवेल या सारख्या वनस्पती आणि कल्टीव्हेटेड वनस्पती यांच्या गुणांमधे नक्कीच फरक पडतो.

    औषध म्हणून वापरायचे असल्यामुळे चालेल. पण जीभेचे चोचले म्हणून, फक्त तीन महिन्यात मिळणारा आंबा, "रस" या स्वरूपात टिकवून ठेवून, पावसाळ्यात खाल्ला तर त्रास नक्कीच होणार.

    निसर्ग म्हणतो, तुम्हाला मी आंबे तयार करून पाठवलेले होते. तेव्हा तुम्हाला खायला वेळ नव्हता, तोच आंबा पुढे "अ-काली" खाल्ला तर, अकारण अग्निमांद्य निर्माण करून घेणार. जी गोष्ट आंब्याची तीच अन्य सर्व अन्नपदार्थांची ! इन्स्टंट फास्ट फूड आणि टू मिनटस मे रेडी पदार्थांची !

    पाश्चात्य देशात, त्या देशांची ती गरज आहे, त्यांना निसर्ग अनुकूल नाही.
    अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमधे ही मंडळी राहत असतात. चौवीस तास बर्फ, अवेळी पाऊस, चुकुन सूर्य दिसला तर आनंद होऊन, "गुड माॅर्निंग" म्हणणारे ते देश ! अन्य शेती व्यवसाय करायचा म्हटला तरी त्यांना ते शक्य होणारे नसते. म्हणून निसर्गाला पूरक परिस्थिती निर्माण करीत अन्नधान्यांचा साठा करावा लागणे, ही त्यांची गरज आहे.

    आमच्याकडे " एव्हरी डे इज गुड माॅर्निंग " असताना, सिझनल फळे, फुले, भाज्या इ.इ. सर्व उपलब्ध होत असताना, ज्युस काढून पुनः त्यात विषारी किटकनाशके घालून, टिकवून, निसर्गाच्या विरोधात जाऊन, अवेळी खाऊन, रोग वाढवून, पुनः त्यासाठी अनैसर्गिक औषधे खायची !

    ही हौस भारीच म्हणायची !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.05.2017

      May 11, 2017