(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बारा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही - भाग तीन

    स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा दुरुस्तीची वेळ आली तर त्या गाडीच्या स्पेशल मेकॅनिककडे नेतो. पण नशीबाने एकदाच मिळणाऱ्या या शरीरावर असे काही अत्याचारी औषधी प्रयोग करीत बसतो, की जणुकाही आपणाला आपले शरीर संपूर्णपणे कळलेलेच आहे.

    आपण कोणते औषध घेतोय, तो देणारा, तेवढा विश्वासार्ह आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता, भोंदू वैद्य आणि बोगस डाॅक्टरांच्या मागे अक्षरशः धावतो, यात औषध देणाऱ्याला आपण शास्त्र बदनाम करीत आहोत, याचेही भान नसते. आणि घेणाऱ्याने आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.

    प्रत्येक राज्याचे एक वैद्यकीय व्यवसाय नियामक मंडळ असते. जसे महाराष्ट्रात एमसीआयएम. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन हे सरकारने नेमलेले मंडळ आहे. या मंडळाकडे जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विद्यापीठाचे अधिकृत प्रशस्तीपत्रक सादर केले जाते तेव्हा, असे केल्यानंतर डाॅक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा रितसर क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. ते दवाखान्याच्या दर्शनी भागात लावलेच पाहिजे. असा नियम आहे. आपण रूग्ण म्हणून ज्यांच्याकडून औषधे घेणार आहोत, ते योग्य शिक्षण घेतलेले अधिकृत पदवीधर आहेत का, याची खात्री करून नंतरच त्यांची औषधे घ्यायची असतात. नाहीतर औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम होतात, त्यांना सामोरे जावे लागते.
    आयुर्वेद, होमियोपॅथी, अॅलोपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध आणि युनानी या किमान पदवीधारकाकडून औषध घ्यावे, असा दंडक आहे.

    केवळ लक्षण सांगून, काही वेळा तर पूर्वीच्या डाॅक्टरनी केलेले निदान ऐकवून, स्वतःच पॅथाॅलाॅजीमधे जाऊन, रिपोर्ट करून, नेट वरून थोडीफार माहिती मिळवून, रोगाचे अचूक नावच सांगून, कोणत्याही पॅथीचे औषध घेणे ही खूप मोठी चूक होऊ शकते. यात मूळ शास्त्र बदनाम तर होतेच पण शरीराची जास्ती हानी होते, बोले तो, पूरी वाट लगती है । तेव्हा सावधान!!

    रुग्णाची अवस्था, रोगाची व्याप्ती, गंभीरपणा, रोगाचे भविष्यातील धोके, औषधांचे डोस, किती कालावधीसाठी औषध घ्यावे, पथ्यापथ्य इ. सर्व तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ना ! केवळ वाॅटसपवरचे सल्ले, कुणातरी पुष्पादिदिवर विश्वास ठेवून, आंबट तिखट तेलकट बंद करा आणि आमची अमुक औषधे घ्या, टीव्ही वरील जाहीराती वाचून, शेजाऱ्यांचे ऐकून, घरी आलेल्या एजंटकडून औषधोपचार ठरवणे, हा चक्क मूर्खपणा आहे.

    अनेक वेळा आयुर्वेदीय औषधांमधे अॅलोपॅथीच्या औषधांची भेसळ केली जाते. त्यातही त्वरीत वेदनाशामक म्हणून स्टिराॅईड असलेली औषधे जास्त प्रमाणात दिली जातात, याचे परिणाम न सांगता सुद्धा थोबाडावर दिसतात. कानाखाली सूज येणे, औषध घेतल्यावर लगेचच दुख कमी होणे, औषध थांबवले की परत त्रास सुरू होणे, भूक खूप लागणे, तेच औषध मला परत परत घ्यावेसे वाटणे, ही सर्व स्टिराईड पोटात जात असल्याची लक्षणे आहेत. जी भविष्यात खूप हानीकारक ठरू शकतात.
    किडनी साफ करण्यासाठी लघवी होणारी औषधे, सेक्सची ताकद वाढवणारी, त्वचा विकार कमी करणारी काॅर्टीझाॅन मलमे, आवळा आणि कोरफड ज्युसच्या नावाने मिळणारे पाणी, कफ सिरपच्या नावाने मिळणारा साखरेचा पाक, नोनीचे मार्केटींग, एमेलेमच्या नावाखाली चाललेला टाॅनिकचा धुडगुस, जिममधे सुचवली जाणारी प्रोटीनची खिरापत, कित्ती किती अनावश्यक औषधे म्हणून सांगू...

    औषधांचा काळाबाजार हा प्रथितयश औषधांच्या तुलनेत कदाचित दोन ते तीन पट अधिक असू शकेल. असा अंदाज आहे.

    हे म्हणजे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशी अवस्था होते. आधीच्या चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम काहीवेळा सहा सहा महिने राहातात, आणि महत्वाच्या औषधाला गुण दिसत नाही, ही अवस्था तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी होते. हे केवळ एकाच पॅथीमधे होत असे नाही तर सर्वच पॅथीमधे हा घोळ दिसतो. यावर सरकारचे लक्ष असेल नसेल, पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्याला, आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी, अनावश्यक औषधांचा अनावश्यक वापर टाळावा असा सल्ला द्यावासा वाटतो.

    नको त्या माणसाकडून, नको ती औषधे, नको त्या अवस्थेत घेतली की, परिणाम नको तेच दिसणार. आणखी दुसरं काय होणार ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.04.2017

  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ७

    जेवणे म्हणजे शरीराला फक्त कॅलरीज पुरवणे नव्हे. तसं असतं तर शरीराची रोजची गरज किती आहे ती पाहून तेवढीच एक कॅपसुल घेऊन पुरते का ? किंवा एका डब्ब्यातील ड्रींक्समधे भरून ते तेवढेच प्याले तर ?

    असं चालत नाही किंवा पुरत नाही.
    जेवण्यातून समाधान मिळत असते.
    अहो, अगदी घरच्या डब्यातील भाजी पोळी आमटीभात ऑफीसमधे खायचा असेल तर त्याच डब्यात बुचकुन बुचकुन खाणे आणि तोच डबा छान ताटात वाढून घेऊन खाणे यात कॅलरीज तेवढ्याच मिळतील, पण आनंद! समाधान !!

    ते या एका कॅपसुल किंवा टीनपाट हेल्थड्रिंकच्या पत्र्याच्या डब्ब्यातून कसे मिळणार ?

    मनाच्या प्रन्नतेवरच पचन देखील अवलंबून असते. मन हे अन्नापासूनच बनते, असंही उपनिषदामधे सांगितले आहे.
    आता उपनिषदे भारतीय आहेत, म्हणजे फक्त थापेबाजीच असणार, असं विधान कोणी केल्यावर त्यांना कसं पटवणार ना ? जाऊंदे.

    पाश्चात्य संस्कृतीला आत्ता आत्ता मनाचे अस्तित्व समजायला लागलंय. मन मानायला हवं, त्याचा अभ्यास करायला हवा, असं ते खुल्या दिलानं मान्य करताहेत. हा त्यांचा मोठेपणा नक्कीच आहे.

    मन दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व असतं. यावर आता संशोधन करायला त्यांनी सुरवात केली आहे. जे दिसत नसतं, ते नसतं, असं नसतं. हे आत्ता त्यांना पटायला लागलंय. पण आमच्याकडच्या अंनिस सारख्यांना हे कळायला अजून काही वर्षे जातील. सुदैव आहे पाश्चात्य देशात अंनिसची शाखा नाही. असो.

    आयुर्वेद म्हणतो, मन ह्रदयात आहे. पण शोधले जाते आहे मेंदूत. कसे मिळेल ? जिथे हरवले आहे, जिथून हरवले आहे, तिथेच जाऊन शोधले तरच मिळेल.

    आरोग्याचेही तसेच आहे. जिथून आपले आरोग्य हरवायला सुरवात झाली आहे, तिथपर्यंत जाऊन पोचायचा, हा एक छोटासा भारतीय प्रयत्न आहे.

    हो. भारतीय आरोग्य वेगळं आहे. ते शोधण्यासाठी तशी दृष्टी आवश्यक आहे.
    ईश्वर बघण्यासाठी डोळे पण तसेच असावे लागतात. आणि पात्रता पण !

    श्रीकृष्णांच्या विराट रूपाचे दर्शन घेण्यासाठी, अर्जुनाला पण, वेगळी दृष्टी देणं भगवंताना भाग पडलं.
    भारतीय आरोग्य अभ्यासण्यासाठी अशी दृष्टी हवी तरच आरोग्यात होत गेलेले फरक लक्षात येतील.
    बघा पटलं तर....

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    22.10.2016

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तेवीस

    लंबी सफर का घोडा

    शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्थूल आणि सूक्ष्म हालचाल निरंतर होत असते. जिथे हालचाल आहे तिथे झीज आहे. ही झीज तर होणारच असते, ती अगदी कमीत कमी व्हावी याची काळजी घेणे हे आपले काम !

    कोणत्याही गाडीकडे बघा. त्याच्या बेअरींगची झीज होऊ नये याकरीता ग्रीसींग करणे, गंजू नये यासाठी त्याला ऑईलपेंट लावणे, केबल्स लवकर खराब होऊ नये म्हणून ऑईलींग करणे, त्या गाडीला धुणे, त्याच्या इंजिनमधील तेल पाणी बघणे, हे आपण करत असतोच. याला आजच्या भाषेत "मेंटेनन्स" म्हणतात. नियमितपणे, आठवणीने याचा "मेंटेनन्स" करणे महत्त्वाचे, म्हणजे गाडी वारंवार गॅरेजमधे न्यावी लागत नाही.

    ज्या गाडीचा मेंटेनन्स नीट नाही, ती गाडी, त्या गाडीचे अवयव लवकर खराब होतात. मग गाडी हळुहळू आवाज करू लागते. वारंवार गॅरेजमधे न्यावी लागते. तो सांगतो, या गाडीतल्या इंजिनमधील ऑईलची लेव्हल कमी झाली आहे, ऑईल बदलले पाहिजे, ब्रेक ऑईल संपले आहे, घालायला पाहिजे. चेनमधील ग्रीस संपले आहे, गियर केबल, क्लच केबल याना तेल सोडले पाहिजे.

    आपण टीव्हीवर जाहीराती पहातो, त्यातही ट्रकच्या इंजिन मधील ऑईलच्या जाहीराती मुद्दाम पहा. ज्या इंजिनमधील तेल कमी, किंवा हलक्या दर्जाचे, त्या इंजिनचे 'मायलेज' कमी. मग तो ट्रक लंबी सफर का घोडा बनू शकणार नाही. त्यामुळे आमच्या कंपनीचे अमुक तेल वापरा ते इंजिनमधील कचरा दूर करील वगैरे......

    तसेच शरीराचे देखील आहे.

    दैनंदिन जीवनात या तेलाचे अनन्य साधारण महत्व असते. शरीरावर जेवढी म्हणून छिद्रे आहेत, त्या सर्व छिद्रामधून दररोज तेल आत सोडावे. जसे नाक, कान, डोळे, मलद्वार मूत्रद्वार, योनीमार्ग, आणि सर्व घर्मछिद्रे यांना तेलाचे पूरण होणे आवश्यक असते. तर आतील सर्व स्थूल अवयव आणि सूक्ष्म इंद्रिये यांचे पोषण होत असते.

    शिलाई मशीनला जशी छिद्रे असतात. त्या छिद्राच्या जवळ लिहिलेले असते. "ऑईल." याचा अर्थ या छिद्रातून तेलाचे काही थेंब या मशीनमधे किमान आठवड्यातून एकदा तरी, सोडावेत, म्हणजे ही मशीन न झिजता उत्तम काम करेल.

    जेव्हा हे मशीन कामाला येते, तेव्हा त्याला डाॅक्टरांच्या गॅरेजमधे नेले जाते. ते सांगतील की ही झीज नैसर्गिक आहे, वाढत्या वयामुळे हे असेच होणार, हे दुखणे आता गृहीत धरायचे, आता कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची वेळ सुरू झाली हा सांधा झिजलाय बदलून टाकू, इ. इ. जे एकदा आपण गृहीत धरले की औषधे आयुष्यभरासाठी सुरू झाली किंवा कापाकापी आली.
    पण हेच मशीन जर वैद्यांकडे नेले तर वैद्य सांगतील, यातील तेल संपले आहे, तेल भरले पाहिजे, तेलाची बस्ती देऊया, शिरोधारा देऊया, अभ्यंग करूया, स्नेहन स्वेदन करूया, कर्णपूरण करूया, नस्य, मन्याबस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती, तेलधारा सोडूया. इ.इ.

    केरळीय पंचकर्म करणाऱ्या वैद्यांकडे नेले तर तेल डोणीत ठेवूया, पंधरा लीटर तेलाने चार जणांकरवी मालीश करूया, पिझिंचिल, आदि पूरक पंचकर्म करूया, इ.इ.

    चला या निमित्ताने आयुर्वेदात सांगितलेल्या या सर्व उपचारांची नावे तरी कळली !

    एक लक्षात येतंय का पहा, आयुर्वेदात चिकित्सा स्वरूप उपचारामधे, तेलाचा सढळ आणि मुक्तहस्ते वापर करायला सांगितलेला आहे. इथे कंजुषगिरी करून चालत नाही. जेवढे तेल इंजिनला आवश्यक आहे, तेवढे ते दिलेच पाहिजे. जर तुम्ही दररोज "मेन्टेनन्स" करणार नसाल तर कधीतरी पंचकर्म करायला तर हवेच !

    लंऽऽबी रेस का घोडा जो बनना है !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.04.2017

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – मुळ्याचा पाला

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – मुळ्याचा पाला

    मुळ्याची भाजी आवडीने खाणारे लोक तसे कमीच आढळतात.आपण भाजी करताना पाल्यासोबत मुळा देखील वापरतो.पंजबी डिश मुलीके पर्राठे जाम फेमस आहे बुवा पण मला अजुनही तो खायचा योग आला नाही,मुळ्याच्या कोवळ्या पाल्याची लिंबू पिळून केलेली कोशिंबीर देखील सुरेख लागते बरं का.

    तर असा हा मुळ्याचा पाला आपण भाजी करायला तर वापरतोच पण ह्याचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते ही पाहणे गरजेचे आहे.

    मुळ्याचे झुडूप असते व मुळा जो पांढरा असतो जमिनीखाली उगवतो तर पाल्याला उगवणा-या शेंगामध्ये बिया असतात.मुळ्याचा पाला हा कडू,खारट व गोड अशा मिश्र चवीचा असमतोल तो शरिरातील कफ आणी वात दोष कमी करतो.

    आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)लघ्वीला कमी व बुळबुळीत होत असेल तर मुळ्याच्या पाल्याचा रस १/४ कप सकाळी अनशापोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावा.

    २)छोटा मुतखडा असल्यास मुळ्याच्या पाल्याचा रस १/२ कप + १ चमचा धणे पुड नियमीत ६ महिने घ्यावे तो खडी विरघळतो.

    ३)शौचास काळपट पांढरे होणे,भुक न लागणे,अंग जड होणे अशा तक्रारी मध्ये १/४ कप मुळ्याच्या पानांचा रस+१/४चमचा कळी मिरीपूड रोज दिवसातून ४ वेळेस काही दिवस घ्यावी.

    ४)संडासला साफ होत नसेल तर मुळ्याच्या पाल्याची भाजी नियमीत जेवणात असावी.

    ५)वारंवार सर्दी खोकला होत असल्यास २ चमचे मुळ्याच्या पाल्याचा रस+२ चिमूट मिरपुड+ १/४ चमचा मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस काहि दिवस घ्यावे.

    मुळ्याचा पाला खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास व वारंवार संडासला होते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • पाषाणभेद

    पाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग मुळ आहे.

  • आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ९

    इथे मूळ सूत्राच्या अर्थापेक्षा, त्यातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छीतो. इथे जेवणाच्या दोन वेळा अगदी स्पष्टपणे सांगितल्या गेल्या आहेत. प्रातः आणि सायम्. सकाळ आणि संध्याकाळ. काळाचा विचार करता त्या काळी सकाळी आणि संध्याकाळी जेवणे हे अगदी सामान्य होते. त्यामुळे त्यावर आणखी विशेष भाष्य पुढील टीकाकारांना करावेसे वाटले नसेल.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक पाच

    पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका - भाग 2

    घरातला तुरडाळ ठेवलेला डबा आठवतोय ? जेव्हा डब्यातील तुरडाळ संपतेय, तेव्हा मार्केट मधून तुरडाळ आणली जाते. तेव्हा डब्यात तळाला थोडी तुरडाळ शिल्लक असते. या शिल्लक असलेल्या तुरडाळीवर नवीन तुरडाळ ओतली जाते. असं जेव्हा वारंवार होईल, तेव्हा काय होतं ? तळातील जुनी तुरडाळ तशीच ठेवून जर त्यावर नवीन तुरडाळ ओतली गेली तर काय होईल ? जुनी तुरडाळ काही दिवसांनी खराब होईल. तिला दुर्गंध येऊ लागेल, अशी दुर्गंध येणारी डाळ डब्यात तशीच राहिली तर वरून पडणारी चांगली तुरडाळदेखील काही दिवसात दुर्गंधित होऊ लागेल आणि काही दिवसांनी डब्यातील सर्व तुरडाळ वास येणारी होईल.

    असं होऊ नये म्हणून काय करावे ?
    जी तुरडाळ तळात राहिलेली असते, तिला आधी एका ताटामधे काढून घ्यावी. नवीन तुरडाळ डब्यात भरावी. आणि डब्यात सर्वात वर जुनी तुरडाळ भरावी. त्यामुळे ती पहिल्यांदा वापरली जाईल. फुकट जाणार नाही.

    बेकरीवाल्याकडची बरणीतील शेव संपत आली की तो बेकरीवाला, ती बरणीतील तळातली शेव आधी वेगळी काढून मगच नवीन शेवेचं पाकीट बरणीत रिकामे करतो. आणि वर जुनी शेव परत भरतो, जेणेकरून पहिली शेव सहज संपून जावी.

    पहिलं संपल्याशिवाय दुसरं भरलं तर पहिलं पण फुकट जाते आणि दुसऱ्या पदार्थाचा आनंदही निघून जातो.

    अगदी तस्संच पोटामधे देखील होत असावं. आधी न पचलेल्या अन्नावर वरून कितीही सात्त्विक अन्न घातले तरी ते सर्व अन्न फुकट जाईल. कारण न पचलेलं अन्न म्हणजे आम. या आमामधे चांगले अन्न एकत्र झालं की, सर्वच अन्न "आममय" होईल.

    त्यामुळे पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न आत टाकलं तर नुकसान ठरलेलंच ! म्हणून पहिलं पचल्याशिवाय दुसरं आत टाकू नका.

    नासलेल्या दुधात कितीही चांगले दूध ओतले तरी सर्व दूध नासणारच !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    02.05.2017

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग अकरा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे त्रेपन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग अकरा

    घराबाहेर गेल्यावर स्नान, भोजन, जलपान आधी वाहनाला द्यावे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास रथातून असे, त्यांची व्यवस्था आधी पहावी. केवळ सारथीच नव्हे तर घोडे आदि प्राण्यांचे पोटापाण्याचे आधी पहावे. कारण परतीच्या प्रवासामधे हे वाहन, वा चालक पुनः ताजेतवाने व्हायला हवेत, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.

    अनोळखी ठिकाणी गेल्यावर माहिती नसलेल्या जलाशयात पोहायला अथवा आंघोळीला पण जाऊ नये. मगरीसारखे प्राणी आधी चाहुल लागू न देता हल्ला करतात. बाहुबली करतो, म्हणून बाहुंचे बळ दाखवून, नदीत पोहू नये. उंचसखल वाकड्यातिकड्या पर्वतावर चढू नये, या कड्यावरून त्या कड्यावर माकडासारख्या उड्या मारू नयेत. घसरून पडण्यामुळे, जीवाला धोका संभवू शकतो. पिक्चरमधे दाखवतात, ते सर्व खोटे असते, ब्लु व्हेलसारखे मोबाईल गेम तर प्रत्यक्षात मानसिकताच बदलवून टाकतात, याची जाणीव मुलांना वारंवार करून द्यावी.

    पेटलेल्या अग्निसमोरुन जाऊ नये, अग्निकडे पाठ करून कधी बसू नये, अग्निच्या आणि अग्निच्या जवळ बसलेल्या माणसाच्या मधूनही कधी जाऊ नये. अग्निशी विनाकारण खेळ खेळू नये. आज मंकी जंपिंग, रिव्हर राफ्टींग, व्हॅली क्राॅसिंग सारखे साहसी प्रकार केले जातात, तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे.

    हे साहस करणे देखील एकवेळ परवडेल, पण प्रत्यक्षात कोणतेही साहस न करता, साहस केल्याचा आभास निर्माण करीत स्वतःचा स्वतः फोटो काढणे हे जास्ती खतरनाक असते. आजच्या मराठी भाषेत याला "सेल्फी" म्हणतात. नाकाला हात बोट न लावता, नाकावरची माशी कशी उडवायची याचे प्रात्यक्षिक किंवा नसलेल्या भुवया ताण ताण ताणून त्याची धनुकली करायची, आणि ओठ जेवढे होतील तेवढे डुकराच्या तोंडासारखे करायचे, आणि हे सगळं करताना, एका हाताने अधांतरी राहात, दुसऱ्या हाताच्या तीन बोटानी मोबाईल सांभाळत, करंगळी मागे उचलून एका बोटाने फोटो काढायचा. महाडेंजरस. ग्रंथकार ग्रंथ लिहित होते, त्यावेळी जर हा सेल्फी प्रकार पाहिला असता तर त्याच्यावर तीन चार श्लोक तरी रचले असते.

    हे सर्व आपला जीव सुरक्षित रहावा यासाठी सांगितलेले आहे.

    याचा अर्थ असा नव्हे की, साहस करूच नये, गिर्यारोहण करूच नये, नदीमधे पोहूच नये. हे सर्व करताना आधी आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा. आपल्या सोबत ( नंतर ओरड मारायला तरी ) कुणीतरी असावे. एवढेच. बाकी व्हा बाहुबली !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ११.०९.२०१७

  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग २

    जेवण शाकाहारीच आहे, पण त्यातही किती विविध छटा दिसतात ना ? सात्विक राजसिक तामसिक इ.इ.

    आपण घेत असलेल्या आहारांचा गुणाशी काहीही संबंध असतच नाही, ही ऋषीमुनींनी केलेली थापेबाजी आहे, असे काही जणांना वाटते. पण वास्तवात असे नाही.

    बाजारात हाॅटेलमधे मिळणारे अन्नपदार्थ आणि घरात तयार होणारे अन्न यात फरक नाही ? घरात आईने केलेले पदार्थ आणि हाटेलातील बाईनं केलेले पदार्थ, यातील कॅलरीज कदाचित सारख्याच असतील, पण भावनांचा विचार केला तर निश्चित फरक पडतो.

    हाटेलमधे केलेल्या जेवणात घरच्या सारखी स्वच्छता, पवित्रता, विवेक आणि मांगल्य कुठुन येणार ? हाटेलच्या जेवणाने कदाचित पोट भरेल पण मन भरणार नाही. कारण त्यात भाव असत नाही. प्रेम असत नाही. असतो फक्त पैसा. बिझनेस ! जो वैश्यवृत्तीच्या इंग्रजाकडून आपण शिकलोय.

    तामसिक आहार घेणाऱ्याची वृत्ती केवळ चवीने जेवण करणे आणि पोट भरणे !
    राजसिक आहाराने मन आणि बुद्धी चंचल होते. राजसिक प्रवृत्तीची माणसे अत्यधिक महत्वाकांक्षी असतात!
    आणि सात्विक भोजन संतुलीत असते. कारण असं जेवण केल्याने मादकताही निर्माण होत नाही, ना आळस, ना अशक्तपणा ना उत्तेजना. केवळ स्फूर्ती येते आणि ताकद मिळते.

    समजा आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जेवायला गेलेला आहात. पंचपक्वान्नाचे संतुलीत, चौरस जेवण तयार आहे. परंतु जेवण वाढणाऱ्यांनी उपरोधाने आपणाला म्हटले,
    "काय हो ऽऽऽ, यापूर्वी असे जेवण तुमच्या उभ्या आयुष्यात कधी खाल्ले होते काय ?"
    तर तुम्हाला ते चांदीच्या ताटात वाढलेले जेवण आवडेल काय ?

    इथे भाव महत्वाचा आहे. कॅलरीज नाहीत.
    दुसऱ्याच्या घरातील जाऊदेत, आपल्याच घरात आपली आई किंवा सौभाग्यवती वा बहिणाबाई भाकरी करीत आहे. साध्या चटणीबरोबर ती गरम गरम भाकरी इतकी छान लागते. सहज तोंडातून शब्द बाहेर येतात,
    " व्वाह, क्या बात है, "
    एका भाकरीने भूक भागतच नाही. दुसरी भाकरी घेता, तिसरी मागता.. तसा आईचा चेहेरा खुलत जातो. वाटलं तर परत पीठ भिजवेन, पण जरा दमानं खा, असं प्रेमानं म्हणते. तेव्हा तिच्या डोळ्यातील भाव बघण्यासारखे असतात.

    आता सीन बदला.

    आपल्याच घरात स्वयंपाकाला आलेली बाई भाकऱ्या करीत आहे. त्याच चटणीबरोबर तुम्ही भाकरी खाताय. तुम्हाला भाकरी आवडली आहे. तुम्ही आणखी एक भाकरी तिच्याकडे मागताय. आता तिचा चेहेरा नीट बघा. कपाळावर आठ्या, डोळे वटारलेले, 'मेल्याला आजच भाकऱ्या खायची लहर आलीय, जरा कुठे घरी लवकर जाणार होते, तो बसला गिळायला' जणु असे भाव तिच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसताहेत.........
    तुम्हाला ते समजताहेत....
    असलेली भूक क्षणार्धात गायब होऊन जाते. आणि भरल्या ताटावरून ऊठावेसे वाटते ना ?

    असे का झाले ? तर भाव बदलले.
    भाव बदलले, तर चिडचिड वाढतेच ना !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    17.10.2016

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – ओव्याची पाने

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – ओव्याची पाने

    ओवाच्या पानांची बेसनाचे पीठ लावून केलेला कुरकुरीत भजी चटकदार लागतात.तसा ह्याचा विशेष वापर पालेभाजी म्हणून जेवणात होत नाही.तरी देखील ह्याच्या विशिष्ट गंधामुळे व त्यात असणा-या औषधी तत्वांमुळे आजीबाईंच्या औषधी बटव्यात हिचे महत्त्वाचे स्थान आहे.

    ओव्यांची पाने खण्डाकार,मऊ,लवयुक्त व जाड असतात.जणू खरेखुरे वेलवेटचेच पान?.ह्याचे १-३ फूट उंचीचे क्षूप असते.

    चवीला तिखट,कडू व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील कफ व वातदोष कमी करते व पित्त वाढवते.

    ह्या पानांचा उपयोग काढ्यात,पोट दुखीत रस घ्यायला करतात.तसेच ह्याचे अनेक औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:

    १)संधिवातावर पानांचा रस सांध्यांना चोळावा.

    २)तोंडास दुर्गंध येणे व चव नसणे ह्यात ओव्यांची पाने चावून लाळ थुंकावी.

    ३)खरूजेवर ओव्यांची पाने वाटून लावावी.

    ४)जेवणानंतर सुस्ती येणे,छातीत जडपणा वाटणे,अपचन,ह्यात ओवा पाने+कोथिंबीर +खोबरे+आले यांची चटणी जेवणात ठेवावी.

    ५)पोट दुखी व क्रुमी ह्यात ओव्याच्या पानांचा रस १ चमचा गरम पाण्यासोबत घ्यावे.

    ओव्याची पाने जास्त प्रमाणात खाल्ल्यास पित्त वाढते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४