आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात
निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच - भाग सात !
जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात.
एकाच मातीच्या गोळ्यात या सर्व बीया एकत्र करून ( सीड बॅक करून ) जरी जमिनीत पुरल्या तरी त्या बीयांना आवश्यक ते सर्व पोषण त्याच जमिनीतून घेतले जाते. आणि या बियांतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक झाडाला गोड आंबट तिखट तुरट फळे लागतात. यालाच निसर्ग म्हणतात.
तसंच प्रकृतीचं आहे. एकाच आई वडीलांच्या जीन्समधून जन्माला आलेल्या बहिण भावंडांच्या प्रकृती वेगवेगळ्या असतात, विचार वेगळे असतात. पचनशक्ती वेगळी असते, ताकद, प्रतिकारशक्ती सगळंच वेगळं असतं. यालाच निसर्ग म्हणतात.
प्रकृती म्हणजेच निसर्ग !
सगळा निसर्ग, अख्खं ब्रह्मांड नाही समजलं तरी चालेल. आपली प्रकृती ओळखता आली तरी पुरेसं आहे. कारण आपली प्रकृती हे विश्वाच छोटंस रूप आहे. या प्रकृतीलाच निसर्ग म्हणतात.
बीयापासून झाड बनायला प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक झाडावर कळी यायचा वेळ वेगळा असतो. कळीचं रूपांतर फुलात आणि पुढे फळात व्हायला काळ जावा लागतो. या काळालाच निसर्ग म्हणतात.
रोगाची सुरवातीला काही लक्षणे निर्माण होतात. या लक्षणांना योग्य वेळी ओळखता आले पाहिजे. नाही तर ती लक्षणे पुढे रोगात रूपांतरीत होतात. ही लक्षणे निसर्ग आपणाला सांगत असतो. निसर्गाशी एकरूप होता आलं, की ही लक्षणे आपणाला सहजपणे कळतात. या जाणीवेला निसर्ग म्हणतात.
ही जाणीव प्रत्येकाला जन्मापासूनच असते. किंबहुना जन्मापूर्वीपासूनच असते. म्हणून तर जन्माला आल्यावर लगेचच दूध ओढून आत गिळायचे असते, हे बाळाला न शिकवता कळत असते. हे शिकवणाऱ्याला निसर्ग म्हणतात.
हे सर्व शिकवणारा निसर्ग हा सर्वात मोठा गुरू आहे. शिकण्यासाठी आवश्यक असतील ते सर्व गुण, प्रत्येक शिष्याने योग्य प्रकारे आत्मसात केले की, कोणाही शिष्याला ज्ञानप्राप्तीला वेळ लागत नाही.
कारण,
शिकवणारा गुरू सर्वांना एकाच पद्धतीने शिकवत असतो. कारण निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.05.2017
दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे.
याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा.
अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो.
पानामधले महत्त्वाचे घटक झाले. पान, चुना, कात आणि सुपारी. हे सर्व पदार्थ एकमेकांना पूरक आहेत. यातील प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण हे पदार्थ जेव्हा चावले जातात, एकमेकात मिसळले जातात, आणि सर्वात महत्त्वाचे, चघळले जात असताना, त्यात लाळ मिसळली जाते, तेव्हा या सर्वांचे मुलभूत गुणधर्म थोडे बदलून सौम्य होतात.
हा खेळ आकड्यांचा
पालेभाज्या आज ज्या पद्धतीने वाढवल्या जातात, खाल्ल्या जातात, पालेभाज्यांचे समर्थन केले जाते, (आणि पाश्चात्य सांगतात म्हणून?) ते अगदी चुकीचे आहे. हे लक्षात घ्यावे.
आपण अगदी मुळापर्यंत जाऊ.
अमुक ग्रॅम तांदुळ किती कार्बोहायड्रेटस देतो, किती कॅलरीज मिळतात, हे स्टॅण्डर्ड आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या थिएरीने ? हे आकडे जे प्रसिद्ध केले जातात, ते कोणत्या आधारावर ?
भारतात हैद्राबाद येथे एक युनीट आहे, जे भारतातील अन्नधान्याचे स्टॅण्डर्डायझेशन ठरवते.
ती संस्था नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ न्युट्रीशन. एन आय एम.
ही संस्था आपल्या अन्नधान्यांच्या व्हॅल्युज नक्की करत असते. याची तपासणीची नेमकी पद्धत काय आहे ? हे आकडे येतात कुठुन ? म्हणजे एक वाटी तांदुळामधे किती कॅलरीज आहेत हे मोजण्यासाठी हे तांदुळ एका क्लोज चेंबर मधे ठेवून जाळले जातात. आणि या जळण्यातून किती उर्जा तयार होते, किती वायु बाहेर पडतात, त्यातून किती ह्युमीडीटी तयार होते, किती तेल शिल्लक राहाते, राखेत काय काय मिळते इ. च्या आधारावर हे " आकडे " प्रसिद्ध केले जातात.
हा केवळ आकड्याचां खेळ आहे. त्यात फार काही तथ्य नाही. केवळ कागदोपत्री पुरावे हवेत म्हणून किंवा काही तरी व्हॅल्युज नक्की करण्यासाठी, अभ्यासाला एक दिशा मिळावी म्हणून ही पद्धत स्विकारली गेली आहे.
आता लोच्या इथे आहे की, हे केवळ पुस्तकी ज्ञान झाले. व्यवहारात एवढी परम्युटेशन काॅम्बीनेशन दिसतात, त्यांचा विचारच कोणी करत नाही. परदेशात असा विचार शिकवणारा आयुर्वेद नाही. म्हणून आज पाश्चात्य लोक आयुर्वेद शिकायला भारतात येताहेत.
जसे
भारतात पन्नास साठ प्रकारचे तांदुळ मिळतात,
या प्रत्येक प्रकारातील तांदळाच्या गुणधर्मात फरक असणार नाही ?
फरक असतो.
आयुर्वेद सांगतो, गुणात फरक असतो. पंजाब मधे तयार झालेले तांदुळ, महाराष्ट्रात तयार झालेले तांदुळ आणि केरळ मधे तयार झालेले तांदुळ यातील गुणांमधे खूप मोठ्ठा फरक आहे. बासमती तांदुळ महाराष्ट्रात खाल्ला गेला तर परिणाम वेगळे. पंजाबमधे दिसणारे परिणाम वेगळे.
आनूप आणि जांगल असे दोन प्रदेश आणि त्याचे अन्नावर होणारे परिणाम आम्ही आमच्या आयुर्वेदाच्या सात वर्षाच्या अभ्यासक्रमात शिकलो आहोत. त्याची सरकारी परीक्षा दिलेली आहे. मान्यताप्राप्त सरकारी यंत्रणेने तसे प्रमाणपत्र आम्हाला दिलेले आहे.
आयुर्वेद म्हणजे केवळ पाळेमुळे आणि सापसरड्यांच्या प्रदेशातील आणि भिकारडी माणसे रहात असलेल्या भारत देशातील, रस्त्यावर पाळेमुळे विकणारी मंडळी म्हणजे आयुर्वेद नव्हे. (काही सुशिक्षित व्हाईट काॅलर्ड मंडळींना अजूनही तसे वाटतेय हे भारताचे दुर्दैव आहे. असो. )
काही तांदुळ साठ दिवसात तयार होतात,
काहींना नव्वद दिवसही लागतात,
यांच्या कार्बोहायड्रेटस मधे फरक असणार की नाही ?
फरक पडतो.
आयुर्वेद सांगतो, फरक पडेल.
तयार झाल्यावर लगेच वापरला, तर आणि दोन वर्षे जुना करून वापरला तर फरक पडणार नाही ?
फरक पडतो.
आयुर्वेद सांगतो, फरक पडेल.
सालासकट ( म्हणजे भात while rice with छिलका ) ठेवला तर गुण वेगळे, साल काढून तांदुळ तयार करून ठेवला तर गुण वेगळे. त्यातही पाॅलीश केलेला असेल तर गुण आणखीनच बदलणार.
सालासकट शिजवून वाळवला तर गुण वेगळे, (ज्याला आपण उकडा तांदुळ म्हणतो. ) सुरय तांदुळाचे गुणधर्म वेगळे.
तांदुळ भाजून ठेवला, आणि वापरला तर गुण बदलतात, तेलात भाजून शिजवला तर गुण बदलतात, तुपात भाजला तर गुण बदलतात, मंद विस्तवावर भाजला तर गुण बदलतात, अग्नि प्रखर असेल तर फक्त बाहेरून साल जळेल पण आतून कच्चाच असेल, याच्या गुणात फरक पडणार नाही ?
पाश्चात्यबुद्धीची कावीळ झालेल्यांना कदाचित फरक समजणार नाही, पण ज्यांच्या सरकारमान्य आयुर्वेद सेवेला वीस पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना हे फरक दिसतातच.
तांदुळ ज्या पद्धतीने खाणार त्या पद्धतीने, (विशेषतः अग्नीचा विचार करून. हा आयुर्वेद तज्ञांचा अगदी आवडीचा शब्द आहे. ) त्याची तपासणी झाली तर ती स्टॅन्डर्ड समजावी असे आयुर्वेदतज्ञ म्हणतात.
व्यवहारातही असेच दिसते.
लिखाण वाढतंय, पण विषय पूर्ण होऊदे,
100 ग्रॅम श्रीखंड दहा निरोगी माणसांना सकाळी दहा वाजता खायला दिले. आजच्या स्टॅन्डर्ड रक्त तपासणी वगैरे सोपस्कार पूर्ण केले.
पुनः दोन तासानंतर तपासणी केली. तर त्या सर्वांचे रक्त तपासणी रिपोर्ट एकच येतील का ? खरंतर यायला पाहिजेत. पुस्तकात लिहिलंय ना. पण व्यवहारात असं दिसत नाही. त्या प्रत्येक माणसाच्या पचनशक्तीवर त्या श्रीखंडाचा परिणाम वेगवेगळा दिसतो. म्हणून काही जणांची साखर वाढलेली दिसते, काही जणांची कमी होईल काही जणांवर विशेष परिणाम दिसणार नाही.
केवळ अन्नपदार्थ जाळून त्याची राख तपासणे आणि त्या पदार्थाची गुणवत्ता ठरवणे हे कितपत संयुक्तिक आहे ? राख तांदुळाची आहे इथपर्यंत ठीक आहे. पण ते तांदुळ या प्रकारच्या जमिनीमधे एवढ्या दिवसात तयार झालेले होते. त्यांचा गुणस्वभाव अमुक आहे, हे कसं सांगू शकणार ?
हे म्हणजे एखाद्या बेवारस प्रेतावर दहन संस्कार झाल्यावर, चार दिवसांनी अस्थि गोळा करायला जावे आणि त्या जळलेल्या हाडावरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचे गुणांकन करावे तसे झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
21.10.2016
माड,पोफळी ह्या जातीचे हे झाड उष्ण प्रदेशामध्ये उत्पन्न होते.उंच वृक्ष असतो.तसेच ह्या झाझापासून ताडी काढली जाते जी प्यायला वापरतात तर फळे ज्यांना ताडगोळा म्हणतात त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात कच्चे ताडगोळा हा चवीला गोड,थंड गुणाचा व कफ वाढविणारा व वातपित्त दोष कमी करणारा असतो.
चला मग ह्याचे घरगुती उपयोग पाहूयात ना:
१)उष्णतेमुळे लघ्वीची जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.
२)डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.
३)गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.
४)ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा.
५)अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो.
ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण करण्यासाठी चांगले कपडे घालायचे असतात, हा उद्देश नाहीच आहे. शरीर आणखी आकर्षक कसे दिसेल यासाठीच आज ते कपडे घालतात. त्यातूनच रॅम्पवाॅक कॅट वाॅक, फॅशनशो आणि स्त्री शरीराचा बाजार इ. प्रकार पुढे येत गेले.
आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले.
बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ?
होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना.
म्हणजे ही पिढी बदलाला समोरी गेली. आता जी पन्नाशीला आलेली पिढी आहे, त्यांच्या बदललेल्या आहारात पिझ्झा, बर्गर, थाय फूड, साॅस हे पदार्थ आले आहेत.
हे बदल होणारच आहेत. यालाच आपल्याला सामोरे जायचे आहे. आता ज्यांचे वय पंचवीस आहे, ते पन्नाशीच्या टप्प्यावर आले की, त्यांनासुद्धा आणखी एका बदलाला सामोरे जावे लागेल. ग्लोबलायझेशनच्या काळात, आहारात नवीन काॅम्बीनेशन्स तयार होणार आहेत. ती मान्य करताना त्यातील संभाव्य धोके लक्षात घेतले की झाले.
आता चटणीची जागा 'साॅसने' घेतली आहे. आंब्याच्या पाकाची जागा 'जॅमने' घेतली आहे. आईची जागा 'बाईने' घेतली आहे.
साॅस, जेली, जॅम,चीझ, मायोनीज, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ, बाईच्या ऐवजी आईने करायला सुरुवात केली तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. यासाठी या बदलाला आई बाबांनी सामोरे जायची, मानसिकता ठेवली पाहिजे.
साॅस करताना जे टोमॅटो वापरले जातात, ते नीट पिकलेले बघून घ्यावेत, नीट धुवावेत, नीट शिजवावेत, शिजवताना त्यात योग्य ते स्टॅण्डर्ड मसाले घालावेत, कृत्रिम रसायनाऐवजी नैसर्गिक स्वाद असलेले मसाले घातले तर नुकसान नक्कीच होणार नाही. बाईने केलेल्या साॅसमधे काय काय घातले जाते, ते आपण वाचतो आहोतच. प्रिझर्वेटीव्ह घातले की, टिकणारच, मग त्यातील टोमॅटो कितीही किडके आणि सडलेले असतील तरीही !
जेली जॅम करताना त्यात जिलेटीन मिसळले जाते, जे अॅनिमल सोर्सपासून बनवले जाते. त्यातील छापील घटकपदार्थांची यादी "कोडवर्ड" मधे असते. त्यावर प्रत्यक्ष नाव छापण्यामधे धोका असतो, त्यासाठी ही पळवाट असते.
कृत्रिम रंग हा आणखीन एक धोका. ते रंग प्रमाणित केलेले वापरले नसतील तर धोका आणखीनच वाढतो. आताच्या संशोधनानुसार हे कृत्रिम रंग कॅन्सरचा धोका वाढवतात.
त्याऐवजी नैसर्गिक रंग वापरले तर चव आणि वास आणि आरोग्य नक्की सुधारेल. म्हणून हे पदार्थ घरी करायची कृती शिकून घ्यावी. शिकायचं. पण कुठे कसं आणि कोणाकडून ?
मोबाईल कसा वापरावा. हे घरातीलच पंचवीशीची पिढी ज्येष्ठ नागरीकांना शिकवते आहे. तसेच, या नवीन पदार्थांची चव त्यांना कशी हवी आहे तशी बनवून देण्यासाठी सुद्धा त्या पिढीचीच मदत घ्यायला हवी. ते पदार्थ स्वतः खाऊन बघितले पाहिजेत. तरच त्यातील दोष लक्षात येतील.
पानावरील डाव्या बाजूचे पदार्थ बदलत आहेत. जे पदार्थ बदलले आहेत, तेच जास्ती गडबड करतात, म्हणून पानावरील डाव्या बाजूला होणाऱ्या बदलावर सावधपणे लक्ष ठेवले पाहिजे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
04.11.2016
ex - आय.व्ही.पी. हा स्पेशल एक्स-रे मूत्रपिंडाचा त्रास असणार्या बर्याच रुग्णांस माहीत आहे. या एक्स-रेमुळे मूत्रपिंडे कार्य करतात की नाही हे समजते.
आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ?
दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे.
काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण घ्यावे. म्हणजे पचनाला पुरेसा वेळ मिळतो.
आधी पोटोबा मग विठोबा
आधी स्वार्थ मग परमार्थ
या म्हणी केव्हा तयार झाल्या असतील ? कोणत्या परिस्थितीमधे तयार झाल्या असतील, त्याचा परत एकदा विचार करायला हवा. एका पिढीपूर्वीची मुलाखत घेतली तर याचा उलगडा होत जाईल.
ती माणसे सांगतात, आमच्यावेळी सूर्यास्ताचे अग्निहोत्र झाले की लगेचच दिवसाउजेडी एकाने देवाकडे, अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा, ( घरात येणारी लक्ष्मी काळोखातून कशी येणार ? म्हणून अंगणात तुळशीकडे दिवा लावायचा. ) तर दुसरीने स्वयंपाकघरात दिवा लावून पाटपाणी घ्यायचे. आधी स-अवकाश भोजन करून नंतर सावकाऽश भजन करीत बसायचे...... मग परमार्थ !
तेव्हा सारवलेल्या जमिनीवर ताट पाट मांडून खाली बसून, मांडी घालून पंगत वाढून जेवायचे. घरात कुटुंब नियोजन नव्हते, गोकुळ होते. दहा पंधरा माणसे एकमेकांशी बोलायची, शुभंकरोती एका सुरात म्हटली जायची,पाढे पावकी निमकी, सर्व श्लोक स्तोत्रे यांची उजळणी व्हायची.
चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपल्या घरातील परिस्थिती आठवली तर टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हता. करमणुकीचे एकमेव साधन म्हणजे रेडीओ आणि सिनेमा थिएटर. थिएटरमधे जाऊन हौस म्हणून सिनेमा पहाणे त्या तिकिटासाठी तब्बल दोन ते अडीज रूपये खर्च करणेदेखील परवडत नव्हतं. एवढा श्रीमंत काळ आपण अनुभवला आहे.
त्याआधीची फक्त वीसेक वर्षे आता आठवून पहा. म्हणजे आपल्या बाबांच्या लहानपणीचा काळ सुखाचा......
रेडिओ ही अत्यंत प्रतिष्ठेची चीज होती, गावातील एखाद्या घरीच तो असायचा, बिनाका गीतमाला ऐकायला दर्दी गर्दी जमायची, तेव्हाच्या काळातील जेवणाच्या वेळा आठवून बघा, त्या काळातील ज्येष्ठ माणसांना आजही विचारून पहा. तेपण सांगतील, " आमच्या तारूण्याच्या सुवर्ण युगात आमची जेवणे दिवसाउजेडी संपायची. लाईटपण नव्हता तेव्हा. रात्री साडेआठ नऊ वाजता झोपी जात होतो."
विज्ञानयुग आले, विद्युतीकरण झाले, प्रगती झाली, विकास झाला. कोपऱ्यात टीव्ही आला. करमणुकीचे साधन बदलले, दूरदर्शनवर बातम्या देणारी माणसे, त्यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या माशा देखील पहाता यायला लागल्या. मालिका पहायला वेळ कमी पडू लागला. त्याच दरम्यान स्वयंपाकघरात कुकर आला, मिक्सरपण आला. मनोरंजन ही गरज बनली. खाना खान्यातला (म्हणजे स्वयंपाकघरातला) वेळ दिवाणखान्यात जाऊ लागला.
गोजिरवाण्या घरात लाजीरवाण्या सिरीयल सुरू झाल्या. बातम्यांपेक्षा जाहीरातीमधे जास्ती वेळ जाऊ लागला. आणि हळुहळू सगळंच बदललं. सुखाच्या कक्षा वाढत गेल्या आणि.....
विठोबा मागं गेला आणि पोटोबा पुढे आला........
कसं बदलत गेलं? कोण बदलत गेलं ? कोणी बदललं हे सगळं? कधी कळलंच नाही.
मुठीत घट्ट धरून ठेवलेल्या वाळूसारखं दोन्ही बाजूने ते बाजूला कधी पडत गेलं लक्षातही आलं नाही. आरोग्याची मूठ कधी रिकामी झाली, ते कधी समजलं देखील नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.03.2017
आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ?
आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे.
आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते.
शिल्लक काय रहाते ?
जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते.
मागे साधे मीठच उरते !
जे खरंतर औषधी आहे.
आणि आम्हाला ऐशी पैसे किलोने मिळते. !!
मग आयोडीनयुक्त मीठ खाऊन फायदा कुणाचा ?
आणि आजचा सर्व्हे असा सांगतो, की भारतात अति उंचावर असणाऱ्या काही डोंगराळ प्रदेशामध्येच आयोडीनची कमतरता भासते. अन्य ठिकाणी आयोडीनची गरजच नाही. अन्य ठिकाणी समुद्रमीठातून, रंगीत फळामधून, रंगीत भाज्यांमधून, कडधान्याच्या वरील सालीतून, मासे,इ. समुद्री प्राण्यांमधून, सर्व प्रकारच्या लाल औषधामधून, कोकम, चिंच, शेंगदाणे, या आहारीय पदार्थातून, आपल्याला रोजच्यारोज आयोडीन मिळतेच. वेगळे आयोडीन घेण्याची तशी गरजच नाही.
हं, गरज आहे, मल्टीनॅशनल कंपन्यांची !
या ना त्या मार्गाने पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत.
मध्यंतरी काही जागरूक नागरीकांनी या विरोधात आवाज उठवला होता,
पण पुनः ये रे माझ्या मागल्या....
मोरारजी आणि जाॅर्ज फर्नांडिस यांच्या काळात...विदेशी, घातक, रसायनयुक्त कोल्ड्रींक्सवर बंदी आणली गेली.
नंतर ???
पुनः हातमिळवणी झाली. जाहीराती झाल्या, स्टार मंडळीनी त्यात सहभाग घेतला, राजकीय समीकरणे बदलली, त्यांचे अधिकृत आर्थिक प्रशिक्षण झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने विक्री वाढू लागली. तसेच, आयोडीनयुक्त मीठाचे झाले. नंतर काय ? ठेंगा
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.11.2016
Copyright © 2025 | Marathisrushti